काल कणकवली तालुका प्राथमिक शिक्षक समितीची नियामक सभा संपन्न झाली. तीन वर्षे परिपूर्ण झाल्यानंतर किंवा मुदत पूर्ण झाल्यामुळे नवीन कार्यकारिणी गठित करण्यासाठी अशा सभा घ्याव्या लागतात. मी अशा सभेला पहिल्यांदाच उपस्थित होतो. सभेचे कामकाज पाहण्याचा भाग्यशाली योग आला.
मागील तीन वर्षांपूर्वीच्या इतिवृत्ताचे वाचन झाले. त्यावर आवश्यक चर्चा झाली. चर्चा नेहमी साधक आणि बाधक दोन्ही प्रकारे व्हावी लागते असेही लक्षात आले. सर्वांच्या सकारात्मक किंवा नकारात्मक मतांचा सन्मान केला जातो , आदर करायचा असतो हे त्या निमित्ताने माझ्या लक्षात आले. प्रत्येकाचे मत हे स्वतःचे वैयक्तिक असते. या वैयक्तिक मताला सभागृहात मांडले जाते , हा खऱ्या लोकशाहीचा विजय ठरतो हे समितीच्या या सभेने अधोरेखीत केले आहे.
समितीचा तळागाळातील किंवा ग्रास रुटवर काम करणारा अत्यंत महत्त्वाचा असतो हे स्पष्ट झाले आहे. हे सगळेच आपले धडाडीचे शिलेदार असतात. या सगळ्यांनाच पदाशिवाय काम करण्यात धन्यता वाटत असते.
काल मला तिसऱ्यांदा पावनखिंड चित्रपट बघण्याची संधी मिळाली. त्यामुळे माझ्यावर त्याचा असर होताच. मला आमचे समस्त समितीचे शिलेदार बाजीप्रभू , अगिन्या , शिवा काशिद , रायाजी , कोयाजी आणि समस्त मावळ्यांसारखे वाटू लागले.
चित्रपटातील काही वाक्ये मला इथे मुद्दाम सांगावीशी वाटतात. " मराठे कधी पळत नाहीत , ते पळायला लावतात. " हे खरंच आहे. आमचे समितीचे निष्ठावंत शिलेदार कधीच पळत नाहीत , तेही पळायला लावतील असे कार्य करताना दिसतात. " हट्टाला पेटतो , त्याला मरहट्टा म्हणतात " या वाक्याला अनुसरुन आमचे समितीचे शिलेदार जर एखाद्या हट्टाला पेटले तर ते कार्य पूर्ण केल्याशिवाय गप्प बसणारे नाहीत.
विशाळगडावर शिवाजी महाराजांसोबत प्रयाण करताना मावळ्यांना कित्येक समस्यांचा सामना करावा लागला होता. वाटेतल्या गांधीलमाश्यांचे चावे त्यांना वेदना देत होते. पण शिवरायांचे मावळे अजिबात मागे हटले नाहीत. आता आमच्या समितीच्या मुख्य नेतृत्वाखाली काम करत असताना अनेकदा अध्यक्ष आणि पदाधिकारी यांना अनेक शासकीय संघर्षांना नेहमीच तोंड देत राहावे लागते. परंतु आपल्या मताशी नेहमी ठाम राहत झुंजत राहणारे समितीचे शिलेदार पाहिले की थक्क व्हायला होते. त्यावेळी नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची पाठ थोपटावी तितकी थोडीच असते. शिवाजी महाराजांना त्यांच्या मावळ्यांनी जसे बळ दिले , तसे बळ समितीचे शिलेदार आपल्या खंबीर नेतृत्वाला नेहमीच देत असतात. या शिलेदारांच्या निस्सीम पाठिंब्यावर आपलं नेतृत्व अधिक आत्मविश्वासाने लढत असतं. आपल्या समितीच्या शिक्षक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अगदी असेच काम केल्याचे दिसून येते आहे.
पावनखिंडीत लढताना बाजीप्रभू शिवाजी महाराजांना म्हणाला होता , " महाराज , कुणाचं नाव कुठं कोरलं जातं , आमचं इथं कोरलं जाणार आहे , आजचा उत्सव साजरा करु द्या. " आमच्या समितीच्या सर्व शिलेदारांनी नेहमी हिच भावना ठेवली आहे. त्यांनी आपली नावे प्रत्येक नेतृत्वाच्या हृदयात अशीच अप्रत्यक्षपणे कोरुन ठेवलेली दिसून येतात.
पावनखिंड पार करताना सगळे मावळे शिवरायांना विनम्र विनंती करतात , " जा राजं जा , जा राजं जा " त्यावेळी शिवाजीराजे विशाळगडाकडे जायला निघतात. आमच्या समितीची नेतृत्वे जेव्हा शासनाशी संघर्ष करत असतात , तेव्हा आमचे शिलेदार असेच त्यांच्या सदैव पाठीशी असतात. या शिलेदारांच्या जीवावरच ते शासनाच्या लढ्यात न घाबरता नेटाने लढताना पाहून आम्हालाही स्फुरण चढते.
" न्यायाची चाड आणि अन्यायाची चिड " सदैव बाळगणारे समितीची नेतृत्वे जणू म्हणत असतात , " आज तुम्हाला लढावं लागेल स्वतःसाठी , शैक्षणिक विकासाचा सूर्य उगवू पाहतोय , घाबरु नका. तुमचं युद्ध आहे तुमच्या कमजोरीशी , उमेदीच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा. " अशी उत्स्फूर्त मार्गदर्शन करणारी नेतृत्वे समितीने कायमच दिली आहेत.
समितीची एक नवीन नेतृत्व असलेली कार्यकारिणी गठित झाली आहे. त्यांना आपण अशीच साथ द्यायची आहे. मागील केलेल्या कार्याची जाण ठेवून अधिक प्रेरणेने उत्साहाने काम करत राहायचे आहे. " जय शिक्षक समिती " च्या घोषणेचा दीप सदासर्वकाळ तेवत ठेवत आपलं कार्य समितीच्या सर्व शिलेदारांनी असेच वृद्धिंगत करत राहिले पाहिजे. समितीचे नवे शूरवीर रणी निघाले आहेत , ते मागे फिरणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
.jpeg)
प्रविण भाई समिती शिलेदारांना प्रेरीत करणारा , प्रोत्साहन देणारे तुमचा आजचा लेख ,
ReplyDeleteअप्रतिम
🙏🙏🙏🙏
धन्यवाद सरजी
ReplyDeleteजय हो
ReplyDeleteथँक्स
ReplyDeleteसुंदर लेख सर👌👌
ReplyDelete