🔴 आजोळच्या आठवणी: नात्यांचा गोडवा आणि नव्या पिढीचं नातं
काल कणकवलीतील कलमठ येथे चव्हाण कुटुंबीयांच्या सत्यनारायण पूजेनिमित्त माझ्या आजोळी जाण्याचा योग आला. माझं आजोळ असल्याने मी अनेकदा तिथे जातो. माझ्या मामी, मामेभाऊ, बहिणी आणि त्यांच्या मुलांना भेटताना होणारा आनंद खरंच अवर्णनीय असतो.
या भेटीमुळे माझ्या बालपणीच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या. आम्ही सर्व भावंडे एकत्र असतानाचे ते सोनेरी क्षण मी आजही जपून ठेवले आहेत. माझ्या सर्व मामा-मामींचा प्रेमळ स्पर्श मी नेहमीच अनुभवला आहे. तोच गोडवा मला काल पुन्हा जाणवला आणि मी मनापासून सुखावलो. ते जुने दिवस पुन्हा अनुभवता येत आहेत, हे पाहून खूप समाधान वाटलं. मला असं वाटतं की, आताच्या नव्या पिढीनेही हे आपुलकीचे आणि प्रेमाचे नातं जपायला हवं.
माझे मोठे मामा, अण्णा मामा, नाना मामा, भाई मामा, भाऊ मामा, बाला मामा यांच्यासोबत घालवलेले ते सुखमय क्षण मी कधीच विसरू शकत नाही. माझी सर्व मामे भावंडं आजही आमच्या घराला विसरलेली नाहीत. आज एका घराची अनेक घरे आणि अनेक कुटुंबे झाली आहेत, तरीही गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वजण एकत्र येतात. गप्पा, गोष्टी, फोटोसेशन आणि बरंच काही घडतं. या सगळ्यामुळे आम्ही एकत्र येतो, हेच मला खूप चांगलं वाटतं.
एक वर्षानंतर पुन्हा भेटण्याच्या आनंदात सगळे आपापल्या कामाला वेगवेगळ्या ठिकाणी निघून जातात. आपलं नियमित आयुष्य सुरू होतं, पण त्यात या माणसांच्या आठवणी नेहमीच येत राहायला हव्यात. माणसं कितीही वर्षांनी भेटली, तरी त्यांच्यामधला जिव्हाळा वाढतच जायला हवा असं मला वाटतं. माझी सर्व मामे भावंडं आज व्यवस्थित आहेत आणि आयुष्यात खूप मोठी झाली आहेत, याचा मला अभिमान वाटतो.
माझ्या आईचं माहेर हे आम्हांला नेहमीच स्वतःचं घर वाटलं आहे. हा प्रेमाचा गोडवा असाच कायम राहील.

No comments:
Post a Comment