Showing posts with label मला सापडलेले सोनेरी अनुभव. Show all posts
Showing posts with label मला सापडलेले सोनेरी अनुभव. Show all posts

Thursday, October 31, 2024

🛑 आली दिवाळी घरोघरी

 🛑 आली दिवाळी घरोघरी


          दिवाळी जवळ आली कि कधी एकदा दिवाळीची सुट्टी पडते असे होऊन जाते. मुलांना आणि मोठ्यांना दोघांनाही दिवाळीच्या सुट्टीची ओढ असते. शाळा आणि दिवाळीची सुट्टी हे दरवर्षीचं समीकरण आहे. मुलांना सुट्टी हवीसुद्धा असते आणि पालकांना ती कधी हवी किंवा नकोसुद्धा असते. 

          दिवाळीत खूप मौज करायची असते. मामाच्या घरी जायचे असते. ज्यांना मामा असतात, त्यांना होणारा आनंद वर्णनीय असतो. मुलांच्या मामाच्या घरी जायच्या ओढीने आईलासुद्धा आपल्या माहेरी जायची संधी मिळत असते. एखादी रात्र मामाच्या किंवा भावाच्या घरी राहण्यातली मज्जा तिथे आनंद उपभोगणाऱ्या माझ्यासारख्या भाच्याला नक्कीच सांगता येईल. 

          “ दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा ” हे जे म्हटलं गेलं आहे ते अगदी खरंच आहे. आमच्या मामांच्या घरच्या दिवाळीने आमच्या तनमनात दिवाळी साजरी केली आहे. बालपणापासूनच आम्हां सर्व भावंडांना आजोळीची आत्यंतिक ओढ होती. ती अजूनही आहे. मामांनी आम्हाला खूप दिले. धन, धान्य, संस्कार, प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा हे सर्व शब्द कमी पडतील. आम्हाला घडवणारे आमचे आजोळच होते. कारण प्रत्येक मामा म्हणजे आमच्यासाठी एकेक संस्कारयुक्त शिदोरीच असे. त्यांच्या सहवासात गेल्यावर आमच्या सहवासाला सुगंधी उठण्याचा वास येऊ लागला.

          मामांच्या घरचे संस्कारांचे मोती आम्हांला नेहमीच चकचकीत करीत होते. त्यांची वागणूक आम्ही प्रत्यक्ष पाहात होतो. दिवाळी सणाला माझ्या बाबांनी माझ्या आजोळी जाऊन ‘ नरक चतुर्दशीच्या ‘ चाव दिवशी एकत्र घेतलेला फराळ मला अजूनही आठवतो आहे. सर्व मुले, माणसे एकत्र येऊन त्यांचं ते आनंदाचं आदरातिथ्य फराळातल्या गोड पदार्थांपेक्षाही कित्येक पटीने गोड असे. मामांच्या या गोडपणाचा स्पर्श आम्हांला झाला आणि आम्हीही काही प्रमाणात गोड बनण्याचा प्रयत्न केला. मामा, मामी आणि त्यांची मुले आम्हांला आपल्या घरातील समजत. त्यांचं नारळाचं दुकान, सलून दुकान, काहींच्या खाजगी नोकऱ्या, काहींच्या सरकारी नोकऱ्या या सगळ्या गोष्टींचं मला अप्रूप असे. आपणही त्यांच्यासारखं व्हावं असं वाटायला लागावं असं प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व. आमच्या मामांनी आमच्या घराला नेहमीच आपलंसं मानलं त्यात माझ्या आई बाबांचा सिंहाचा वाटा आहे. आम्ही गरीब असलो तरी मामांनी आमच्या आईबाबांचा नेहमी सन्मानच केला आहे. 

          फराळ खाण्यात मजा नसते, तो एकत्र खाण्यात मजा असते. एकत्र गप्पा गोष्टी मारत मारत फराळाची गोडी अधिक वाढत जाते. आमच्या मामांनी भाऊबीजेला आमच्या घरी येणं, हा म्हणजे आमच्यासाठी खरा दिवाळीचा सण असे. मामांनी आणलेली प्रत्येक गोष्ट माझ्या आईसाठी सन्माननीय असे. आईने आपल्या मोठ्या भावांना कधी ‘ अरे ’ म्हटले नाही. भावांचा निरतिशय आदर करणारी आई आम्हांला लाभली होती. अशी प्रेमळ आई, प्रेमळ मावशी, प्रेमळ आत्या, प्रेमळ बायको आणि प्रेमळ आजी होणे कठीण आहे. आईने केलेले गोड पोहे, कांदेपोहे, रव्याचे लाडू, बेसनलाडू, करंज्या, चकल्या, शंकरपाळ्या अजूनही आठवतात. त्या करतानाच आम्ही जास्त खाल्ल्या असतील. पण तिने त्या आम्हांला खायला दिल्या. कधीही हे खाऊ नकोस म्हणाली नाही. 

          दिवाळीचा ‘ आकाश कंदील ’ बनवणे माझे आवडते काम. मी आणि माझा भाऊ चिव्याच्या काठ्यांचा आकाश कंदील बनवत असू. काहीवेळा तो आम्हांला नीटसा साधत नसे. तेव्हा मोठी ताई, आक्का यांची साथ मिळे. पताकाच्या कागदांना कापून त्याच्या करंज्या बनवून लावणे भारीच असे. आपण स्वतः केलेल्या ‘ कंद्याची ’ मज्जा काही औरच. आता तसे घडत नाही. घडले तरी तो आनंद अगदी तस्साच मिळत नाही. 

          आज ही माझी पहिली दिवाळी असेल, माझी दिवाळी आहे, पण ती बघायला बाबा फोटोत आहेत. ते नाहीत, आई नाही. माझ्या कुटुंबाने केलेली दिवाळी कायम लक्षात राहण्यासारखी असते. त्यात एखाद्या माणसाची उणीव म्हणजे फराळात लाडू नसल्यासारखेच. माणसांनी दिवाळी नक्की करावी, असलेल्या माणसांना सुखी ठेवत, त्यांच्या मनातले दिवे सतत जिव्हाळ्याने पेटते ठेवलात तर ती समाधानाची दिवाळी होईल यात अजिबात शंका नाही. 


लेखन : श्री. प्रवीण अशितोष कुबल ( मुख्याध्यापक, शिडवणे नं. १) 

दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२४ 

वेळ : सायंकाळी ७. १५ वाजता

Saturday, October 26, 2024

🛑 अंधाराच्या बेटावर गेलो तेव्हा .......

🛑 अंधाराच्या बेटावर गेलो तेव्हा ....... 

          एखाद्या खऱ्याखुऱ्या बेटावर जाण्याची वेळ अजूनतरी माझ्यावर आलेली नाही. कदाचित तसा योग पुढे कधी येईल असेही वाटत नाही. तरीही काल एका अंधाराच्या बेटावर जाण्याची संधी ‘ ध्यास परफॉर्मिंग आर्टस् , पुणे ’ यांच्या दोन अंकी नाटकानं दिली. वामन पंडितांच्या Whats App मेसेजमुळेही संधी मिळत असली तरी ‘ निलायम ’ या त्यांच्या वैयक्तिक थिएटर मुळे माझ्यासारख्या नाटकाची आवड असणाऱ्या माणसांना चांगलं बघण्याची सुवर्णसंधी मात्र प्राप्त झाली आहे असे मी म्हटले तरी तेही ‘ सोळा आणे ’ सच आहे. 

          नाटकाचे अप्रूप मला लहानपणापासूनच आहे. ते आजही तसेच आहे. नाटक घरात प्रवेश करताना आज मला एका बेटावर जायला मिळणार ही उत्सुकता होतीच. नाटक सुरु होण्याच्या अर्धा तास अगोदरच मी ‘ निलायम ‘ मध्ये पोहोचलो. काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच नाट्यवेडी माणसं तिथे माझ्याआधीच येऊन बसलेली दिसली. त्यात माझ्याहीपेक्षा वयाने मोठी असलेली माणसंच अधिक प्रमाणात होती. नंतर हळूहळू माणसांची संख्या वाढत गेली. तिकीट काढलं आणि तिकीट काढणाऱ्या काकांशी बोलत बसलो. नाटक घरात लवकर प्रवेश करता यावा ही अधीरता होतीच. सात वाजता नाटकाची वेळ होती. बरोबर सात वाजता नाटकघराचं दार उघडलं. मी एक नंबरवालं तिकीट काढणारा होतो याचा मला आनंद वाटत होता. माझ्यासारखे नाटक बघायला आतुर झालेले नाट्यवेडे दरवाजाकडे गर्दी करु लागले. मीही त्यात मिसळून गेलो. प्रवेश करताना स्वतः कलाकारांनी आमचं स्वागत केलं. त्यांनी आमच्या हाताला ‘ नाटकाचं अत्तर ’ लावलं. हातात एक ‘ हिरवं पान ’ दिलं. ते पान आणि तो अत्तराचा वास घेत मी माझ्या आसनावर जाऊन बसलो. नाटकातील काही कलाकार रंगमंचावर आधीच उपस्थित होते. हसतमुखाने स्वागत करताना स्वतः एक वाद्य वाजवत एक वेगळालं गाणं म्हणत होते. तो रिदम आपलासा वाटत होता. प्रेक्षक बसेपर्यंत कलाकारांचं हे वादन जणू आपल्याला वंदन करत आहे असा भास होत होता. नाटकाचं हे एक भन्नाट नैसर्गिक संगीत रसिकांच्या मनात पुढील नाटक बघण्याचं कुतूहल वाढवणारं होतं. 

          मी माझ्या हाताचा वास घेत असताना मिळालेल्या पानाकडे बघत राहिलो होतो. ते पान म्हणजे रंगमंचावर केलेल्या बेटाच्या नेपथ्याचा एक भाग होतं. बेटावरील अनेक वेलींच्या कुंजातील पाने प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या हातात एकेक दिसत होती. आपणही या बेटावर गेल्याची ही नाटकाची खरी सुरुवात होती. 

          नाटक बरोबर सव्वा सात वाजता सुरु झालं. नाटकातील सर्व कलाकार अप्रतिम अभिनय करत होते. प्रत्येक कलाकार आपला अभिनय नैसर्गिक करत आहेत असं वाटत होतं. उगीच आपले शब्द फेकत राहावेत असं काही घडत नव्हतं. त्यामुळे ते नाटक लवकरच आपलंसं झालं होतं. ज्या लेखकाने नाटक लिहिलं त्यानेच ते परफॉर्म करावं ही नेहमीच अधिक चांगली गोष्ट असते. कारण एक तर ते नाटक म्हणजे त्याचंच अपत्य असतं. त्या अपत्याशी कसं वागावं हे त्याच्याशिवाय अधिक चांगलं कुणालाच कळू शकत नाही. नाटकाचे लेखक , दिग्दर्शक , मुख्य अभिनेते नाटकवेडे ‘ श्रीकांत भिडे ’ यांनी लिहिलेले नाटक अफलातून आहे. एकांकिकेचं एका दिर्घांकात रुपांतर झाल्यानंतर देखील नाटकाला बघताना शेवटपर्यंत कंटाळा येत नाही हे विशेष आहे. कुडाळचे श्रीकांत भिडे खरंच माझ्या मनात भिडले. 

          सुरुवातीपासूनच हे नाटक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतं. कलाकारांनी स्वतः ते नाटक जगले आहेत. सर्व कलाकारांचं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. जी भूमिका मिळाली , त्या भूमिकेचं प्रत्येकानं ‘ सोन्याचं हिरवं पान ’ केलेले होतं , जे आम्ही आमच्या हातात अत्तराच्या वासासहित घरापर्यंत घेऊन आलो होतो. माझ्या घरातल्या सदस्यांनाही मी या नाटकाचं वेगळेपण सांगितल्यावर त्यांनाही आपण नाटकाला न गेल्याचं शल्य जाणवावं इतकं नाटक मनात रुजलं होतं. 

          अर्थात प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. नाटकाबद्दल माहिती असणारे आणि नाटकावर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला अतिशय आवडावं असंच हे नाटक आहे. मी या नाटकाबद्दल सकाळी लवकर उठून लिहितो आहे , असं मला का वाटलं ? यातच त्याचं खरं उत्तर दडलेलं आहे. हा लेख लिहिताना माझ्या हाताला लावलेल्या अत्तराचा मी वास घेतो आहे , तो अजूनही तसाच आहे. दिलेले ते हिरवं पान माझ्यासमोर आहे आणि हसत हसत ते माझ्याकडे बघतं आहे. 

          एका अंधाराच्या बेटात गेलेल्या ‘ राख्या ’ नावाच्या कलाकाराची ही कथा आहे. नाटक तसं म्हटलं तर पैसे देणारं , नाहीतर असलेले पैसे घालवणारं असतं . एखादं नाटक प्रेक्षकांच्या मनात रुजायला वेळ लागतो. हे नाटक नाटकवाल्यांची ‘ व्यथा ’ सांगणारं नाटक आहे. बेटावरील बोचरी थंडी लागते म्हणून केलेली शेकोटी प्रत्येक रसिक प्रेक्षकालाही ऊब देणारी ठरली. शेकोटीत तयार झालेली राख तोंडाला फासून ‘ आपल्या नाटकाच्या आयुष्याचं नाटक ’ दाखवताना श्रीकांत भिडे यांनी केलेला अभिनय टाळ्या द्यायलाही विसरायला लावतो. इथे विनोद नाहीत , पण आपण स्वतः मनातल्या मनात आपल्यावर हसण्यासारखं खूप काही आहे. नाटकाचा शेवट झाला तरी प्रेक्षक टाळ्या द्यायला विसरतात , कारण त्यांना हे नाटक संपूच नये असं वाटत राहतं म्हणून. 

          नाटकाचा सूत्रधार म्हणून डॉक्टरांची भूमिका केलेल्या कलाकाराने केलेला अभिनय , आवाजाची शब्दफेक थेट मेंदूत जाते. राख्याच्या मित्रांनी , मैत्रिणींनी राख्यावर केलेलं प्रेम त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणून गेलं तेव्हा त्या कलाकारांचा त्या नाटकाचा अभ्यास किती सखोल असेल याची कल्पना येते. नाटकाच्या संहितेबद्दल परिपूर्ण लिहिणं चुकीचं आहे , कारण रसिक प्रेक्षकांनी तिकीट काढून हे असलं नाटक थिएटर मध्ये जाऊन बघतानाचा आस्वाद घ्यायला हवा. नेपथ्य , प्रकाश योजना , ध्वनी योजना खरंच भडकावू नाहीत. 

          नाटकात एक दोन प्रणय प्रसंग आहेत. तेही अश्लिल नाहीत , ते श्रुंगारपूर्ण आहेत. नेपथ्याचा केलेला काळजीपूर्वक वापर , ती वस्तू तिथेच चांगली आहे असं वाटावं. राजाच्या मुलीने केलेली वेशभूषा आणि अभिनय अप्रतिम. रात्रीच्या अंधारात कंदिलाचा केलेला वापर ‘ अंधाराचं बेट ’ प्रत्यक्ष समोर ठाकल्यासारखा. या नाटकाविषयी बरंच काही लिहिल्यानंतरही आठवत राहावं असं बरंच काही अजूनही मनात रेंगाळतं आहे. पण नाटक करणाऱ्यानं कधी थांबायचं , हे जसं त्याला कळलं पाहिजे , अगदी तसंच लिहिणाऱ्यानेही कधी थांबावं हे त्याला कळलं पाहिजे. नाटकाबद्दल काहीतरी रिव्ह्यू द्यावा म्हणून हा लेखनप्रपंच नसून , तो लिहिल्याशिवाय राहवलं नाही म्हणून लिहून मी स्वतः समाधानाने मोकळा झालो आहे. 

© प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १ ( मोबाईल : 9881471684 ) 
















Tuesday, September 10, 2024

🛑 मत्स्यगंधा

🛑 मत्स्यगंधा

          मत्स्यगंधा माझ्या आयुष्यात आली. माझ्या बालपणात या मत्स्यगंधेची आणि माझी भेट झाली. मत्स्यगंधा म्हणजे कोण ? हा प्रश्न वाचकांना पडणार याचे मला भान आहे. तिचा आणि माझा संबंध होता याबद्दलही अनेकांना कुतूहल वाटल्याशिवाय राहणार नाही. 

          काल कितीतरी वर्षांनी मला ही मत्स्यगंधा पुन्हा एकदा भेटली. मला खूप आनंद झाला. सलग पाऊण तासापेक्षा जास्त काळ मी तिच्यासोबत होतो. हे वाचून तर तुमचा गैरसमज अधिकच वाढणार याबद्दल मला खात्रीच झाली आहे. 

          मला लहानपणापासून भजनांची खूप आवड. ही भजने करताना, भजने ऐकताना ही मत्स्यगंधा मला भेटली. ही अदृश्य मत्स्यगंधा मला पुढे दरवर्षी गणेश चतुर्थीला भेटू लागली. गेले काही वर्षे ती मला भेटली नव्हती. काल ती अनेक वर्षांनी पुन्हा भेटली तेव्हाचा आनंद मी शब्दांत व्यक्त करताना कमी पडेन. 

          आमचा नेहमीचा बुवा. हेमंत बुवा लाड याने आमची आणि तिची अनेक वर्षानंतर पुनःश्च भेट घडवून आणली. या अविस्मरणीय भेटीचे श्रेय पूर्णपणे ' हेमंत लाडबुवा ' यांनाच द्यायला हवे. त्यामुळे माझ्या तिच्यासोबतच्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या.

         कोकण दर्शन गजराचे निर्माते कै. परशुराम पांचाळ यांनी माझ्या बालपणात सादर केलेल्या ' मत्स्यगंधा ' भारुडाबद्दल मी बोलतोय. परशुराम पांचाळबुवा माझे आवडते भजनीबुवा. त्यांना मी प्रत्यक्ष ऐकले आहे. त्यांचा ' कोकण दर्शन ' हा गजर माझा सर्वात लाडका गजर. डीएडला असताना ' कोकण दर्शन ' हा गजर मी एकदा किंवा दोनदा तरी परिपाठात सादर केल्याचे आठवते. त्यावेळी कॅसेट्स होत्या. टेपरेकॉर्डर होते. त्यांची ही कॅसेट मी कित्येकदा ऐकली असेन. त्यामध्ये मला ' मत्स्यगंधा ' सापडली. पांचाळबुवांनी रचलेले मत्स्यगंधा भारूड लोकं अजूनही शेवटपर्यंत ऐकतात. त्यांच्या आवाजात ताकद होती. त्यांच्या शब्दांना अर्थ होता. त्यांचा लय, सूर आणि ताल उल्लेखनीय होता. त्यातील कथा सांगण्याची त्यांची पद्धत पुढे पुढे ऐकत राहण्यासारखी असे. त्यामुळे त्यांना पुन्हा ऐकावे असे अजूनही वाटते. कंटाळा येत नाही. आळस तर अजिबातच येत नाही. उलट आळस कुठल्या कुठे पळवून लावण्याची किमया पांचाळबुवांच्या गायनात होती. 

कोळ्याची कन्या मत्स्यगंधा आणि पराशर ऋषी यांच्याबद्दल त्यात अधिक माहिती सांगितली आहे. नव्या आणि जुन्या गीतांच्या चालींचा त्यात सुरेख संगम साधला आहे. म्हणून आपण पण पांचाळबुवांनी सादर केलेल्या रचनांच्या प्रेमात पडतो. 

          मला जात्याच गाण्यांची आवड आहे. त्यात असे पांचाळबुवांसारखे शास्त्रीय गायन करणारे बुवा असले तर माझ्यासारख्या भजनवेड्यांसाठी ती पर्वणीच असते. मी आणि माझा भाऊ दोघांनीही त्यावेळी अनेकदा या मत्स्यगंधा भारुडाचे पारायणच केले होते म्हणानात. 

          हेमंत बुवांनी हे ' मत्स्यगंधा ' भारूड म्हणून पुन्हा आमच्या दोघांच्या लहानपणीच्या आठवणी जागृत करुन आम्हांला जो आनंद दिला आहे त्याची गणना करता येणार नाही. अशी ही ' मत्स्यगंधा ' पुनःश्च मला भेटली होती. ती पुन्हा जेव्हा कधी भेटेल तेव्हा कदाचित एखादे वर्ष झालेले असेल. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

मुख्याध्यापक शिडवणे नं. १

Thursday, August 8, 2024

🛑 हेमलो

🛑 हेमलो

         नाव वाचल्यानंतर आश्चर्यचकीत झाला असाल ना? हे नाव मराठीतील आहे. मालवणीत ' हेमंत ' नावाची माझ्या बाबांनी मारलेली प्रेमाची हाक आहे ती. 

         हेमंत म्हणजे आमच्या किर्लोस आंबवणेवाडी मधला खालच्या लाडवाडीतील हेमंत लाड. साधा, सरळ आणि शास्त्रीय भजन, गायनाची आवड जोपासणारा आजच्या काळातील तरुण बुवा. 

         त्याची आणि माझी ओळख खूप वर्षांपूर्वीची आहे. तो आमच्या कुटुंबाचा नेहमीच आदर करत आला आहे. माझ्या बाबांचे आणि त्याचे चांगलेच जमे. ते त्याला प्रेमाने काही गोष्टी ऐकवत. तो त्या मंत्रमुग्ध होऊन ऐकायचा. त्याचे भजन आम्हांला आवडते. 

         कै. परशुराम पांचाळबुवांचा तो फॅन आहे. राजापूरच्या संतोष शिर्सेकरबुवांचा तो पट्टशिष्य आहे. तो त्याच्या गायन आणि संवादिनी वादन कलेत पारंगत आहे. तो या कलांची आराधना करताना स्वतःचे भान हरपून जातो. त्याचे गायन लांब राहून ऐकलात तर कै. परशुराम पांचाळबुवाच गात आहेत असा भास होतो. 

         सुरुवातीच्या काळात तो शिकत असताना घाबरत असे. हे घाबरणे म्हणजे त्याचे लाजणे होते. त्याने आतापर्यंत अनेक संगीत बाऱ्या केल्या आहेत. त्याला साथ देणारे कोरस तरुण अतिशय मनापासून गाताना पाहून मला माझे बालपण आठवते. मी मला त्यांच्यात पाहतो. कारण मीसुद्धा हेमंत सारखाच भजनवेडाच आहे. त्याचं गायन माझ्या मनाचा ठाव घेतं. त्यामुळे माझा त्याच्याबद्दलचा आदर अधिकाधिक वाढतच जातो. 

         त्याचे वडिलही बुवा आहेत. त्यांचं गायनदेखील मला आवडते. नव्या दमाचा, नव्या युगाचा गायक म्हणून ' हेमंत लाडबुवा ' आमच्या पिढीचं नेतृत्व करतो तेव्हा माझी छाती आनंदाने फुलून येते. मला त्याचा सार्थ अभिमान वाटतो. मला माझ्या भजनमंडळींचा आदर वाटतो. आमच्याकडे त्यांनी केलेल्या भजनांच्या व्हिडीओज आहेत. आठवण आली कि आम्ही त्या बघत बसतो. 

         गणेश चतुर्थीला आमच्या हेमंतला खूप मागणी असते. तो शक्यतो कोणाला नाही म्हणत नाही. पण तो एकटा कोणाकोणाला पुरणार. तरीही तो कोणाला नाराज करत नाही. जमतील तेवढी भजने करत राहतो. जुन्या कलाकार मंडळींचा तो आदर करतो. नुकताच त्याने मला आमच्या जुन्या तमाशा मंडळाचा फोटो पाठवला. त्यात माझे बाबा आणि काका आहेत. त्यावेळचे धुरंधर कलाकार. अजूनही त्यातील काही कलाकार आपली कला जोपासत आहेत. काही आज हयात नाहीत. त्यांच्या आठवणी मात्र हेमंतच्या मनात हयात आहेत. त्याने त्यांचा तो दुर्मिळ फोटो पाठवला, त्यावेळी ' जुना सोना ' असे कॅप्शन लिहून पाठवले. खरंच तो फोटो पाहून माझ्याही अंगावर सरकन काटा उभा राहिला. असं २४ कॅरेटचे सोने आता मिळणे खूप कठीण आहे. 

         मला वाटते हेमंत लाड म्हणजे आजच्या युगातील भजनी बुवांच्या भाषेत बोलायचे तर शंभर नंबरी सोने आहे. त्यामळे ते जिथे जिथे जाईल तिथे तिथे चमकल्याशिवाय राहणार नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १

Tuesday, August 6, 2024

🛑 बाराव्याला बाबा आले

🛑 बाराव्याला बाबा आले

          बाबांचा बारावा दिवस. सकाळपासून माणसांची गर्दी व्हायला सुरु झाली होती. बाबांसाठी हाक मारायला येणाऱ्या हजारो माणसांना शोकाकुल होताना पाहून बाबांचा मोठेपणा अधिक ठळकपणे दिसू लागला होता. मी त्यांच्यासमोर काहीच नाही. ते नेहमीच म्हणत, " मी जे नखाने करीन, ते तुम्हाला कुऱ्हाडीने जमणार नाही. " बाबांचे हे वाक्य अगदी खरे आहे. त्यांनी केलेल्या गोष्टी मला करता येणार नाहीत. त्यांच्या सानिध्यात इतकी वर्षे राहूनसुद्धा मला त्यांच्या नखाचीही सर येणार नाही इतके ते मोठे होते. 

         दहाव्या दिवशी बाबांच्या पिंडाला काकस्पर्श झाला नाही म्हणून बाबा माझ्यावर नाराज असतील असे मला वाटणे साहजिकच होते. माझे प्रेम खरे असेल तर बाबा माझ्यावर नाराज होऊच शकत नाहीत असा भाबडा विश्वास मी नेहमीच बाळगत आलो आहे. 

         त्यांच्याशी माझे मित्रत्वाचे नाते होते. बाबा रागावले तरी त्यांचा तो राग तात्पुरता असे. माझ्या प्रेमाने ते पुनःश्च मेणासारखे विरघळून जात.  मी अगदी त्यांच्यासारखाच झेरॉक्स कॉपी आहे. माझाही राग असाच विरघळून जात असतो. त्यांच्याकडूनच वारसा मिळालाय. प्रेमाने राग जिंकता येतो. 

         दिवसभर बाराव्या दिवसाचे विविध धार्मिक विधी संपन्न होत असताना दुपारनंतर ' सुत '  घालण्याचा विधी सुरु झाला. हा विधी बघवत नाही. तो करत असताना मी डोळे बंद करुन बाबांची आराधना करत होतो. परंपरेने चालत आलेल्या या विविध प्रथा करताना त्या बाबांसाठी करतो आहोत याची जाणीव होती. त्यामुळे बाबांसाठी काहीही करण्याची तयारी असणारा मी निमूटपणे सर्वकाही करत राहत होतो.

         ज्येष्ठ व्यक्तींनी मार्गदर्शन करायला सुरुवात केली होती. माझे लक्ष त्यांच्या शब्दांकडे होते. ते शब्द बाबांचेच आहेत असे मला वाटत होते. मला आलेल्या सर्वांचे हृदय आभार मानावेसे वाटले. मी स्वतःहून उभा राहून बोलू लागलो. मला सर्वांचे आभार मानायचे होते. मी सर्वांच्या ऋणात राहण्याचे ठरवले असल्याचे सांगितले. घरच्यांनी गेले काही दिवस माझ्यासोबत जो प्रेमळ व्यवहार केला होता त्यामुळे मी भावनाप्रधान झालो होतो. माझ्या अश्रुंचा बांध फुटू लागला होता. मी रडताना मलाच मी आवडत नव्हतो. पण रडू काहीकेल्या थांबवता येत नव्हते. मी माझ्या चुका मान्य करुन टाकल्या होत्या. बाबा मला जाताना काहीही सांगून गेले नव्हते. बाबा गेल्याचे दुःख सर्वांनाच झाले होते, पण मला झालेले दुःख मला क्षणाक्षणाला बाबांची माफी मागत राहायला लावणारे होते. बाबा नेहमीच क्षमाशील होते. ते मला क्षमा करणार ही काळ्या दगडावरची रेघ. पण तरीही मनातील भिती डोके वर काढत होती. जाता जाता त्यांनी मला काहीतरी सांगावे असे मला वाटत होते, जे त्यांच्या अचानक जाण्याने राहून गेले होते. 

         त्यांनी आमच्या संगोपनात कोणतीही कसूर सोडली नसताना आम्ही त्यांच्या सेवेत काहीतरी दिरंगाई केली की काय ? अशा प्रश्नांनी माझा मीच व्याकुळ होत होतो. 

        रात्री भजन सुरु झाले. भैरवीचे आर्त सूर आणि टाळांचा आवाज टिपेला पोचत असतानाच आमचे बाबा तेजस्विनीच्या ( वहिणी ) अंगात संचारू लागले होते. ते बाबाच आहेत का याची खात्री करण्यासाठी माझ्या बालाकाकांनी नेहमीप्रमाणे तीन फुले ठेवून त्यातले एक उचलण्याची विनंती केली. काकांच्या मनातील चाफ्याचे फुल त्यांनी न ओळखता पिवळे झेंडूचे फुल त्यांनी निवडले. मी मात्र पिवळे फुलच मनात धरले होते. ते बाबाच आहेत याची मला अगदी खात्री झाली होती. 

         तरीही मी धुपारतीचे भांडे घेऊनच होतो. त्यांनी मला स्वतःहून हाक मारावी अशी माझी इच्छा होती. माझी इच्छा त्यांना कशी समजली तेच जाणो. त्यांनी काहीवेळातच पहिली मलाच हाक मारली. मी आणि सगळेच अवाक झाले. मी धावतच त्यांच्यापाशी गेलो. त्यांनी मला गोंजारले. मी त्यांच्यापाशी काही दिवस सतत बसून होतो. माझी अपेक्षा त्यांनी पूर्ण केली होती. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मी आणि माझा भाऊ पेलू शकतो हे त्यांना जिवंतपणीच माहिती होते. तरीही त्यांनी दिलेली ही धुरा मी समर्थपणे सांभाळण्यासाठी त्यांचा भक्कम आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असणार याबाबत मी निशंक झालो आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १










Sunday, August 4, 2024

🛑 शिक्षक स्मृती ठेवुनी जाती

🛑 शिक्षक स्मृती ठेवुनी जाती

          बदली हवी असली तर ती झाली पाहिजे अशी प्रत्येकाची तीव्र इच्छा असते. कोकणात येणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला परत आपल्या जिल्ह्यात जायची इच्छा झाली तर नवल वाटायला नको. आमचे काही मित्र एकदम बदली न करता सामूहिक राजीनामे देऊन आलो तेव्हा असेच झाले होते. सिंधुदुर्गात नोकरी मिळाली म्हणून आम्हांला खूप आनंद झाला होता. एक नोकरी सोडताना डोळ्यात आसू होते आणि दुसरी लगेचच स्वीकारताना ओठात हसूही होते.

         खोत आणि कासार दोघेही कोकणातील सिंधुदुर्गात मिसळून गेले होते. दोघेही तंत्रस्नेही. उच्चविद्याविभुषित. ज्या शाळेत जातील तिथे वेगळा ठसा उमटवणारे नवोपक्रमशील शिक्षक. 

         रस्सा मंडळातील काही सदस्य आधीच बदलीने निघून गेल्यानंतर आता तर रस्सा संपून गेल्याची जाणीव होऊ लागली आहे. रस्याची चव तेवढी जिभेवर रेंगाळते आहे. असे गेट टुगेदर करताना त्यांनी केलेली नियोजने नेहमीच भाव खाऊन गेलेली. आपुलकीचे शब्द आणि जिव्हाळ्याचा रस्सा थंड होत असताना तो पुनरुज्जीवीत करण्याची जबाबदारी नवनियुक्त शिक्षकांनी पेलावी अशी आम्ही जुने शिक्षक अपेक्षा बाळगून आहोत. नवनियुक्त शिक्षक नव्या दमाचे आहेत. ते जुन्यांपेक्षा अधिक तंत्रस्नेही असतील तर त्यांच्याकडूनही खूप शिकण्याची आमची तयारी आहे. 

         अनिल खोत आणि प्रवीण कासार मला येथेच भेटले. त्यांच्याकडून आम्ही सगळेच शिक्षक खूप काही शिकलो आहोत. अनिल खोत म्हणजे जणू केंद्राचे खोतच. त्यांनी एखादी गोष्ट सुचवली त्यावेळी ती आम्ही सर्वांनी उचलून धरली आहे. त्यांचं बोलणं नेहमीच ऐकत राहावं असं. बोलण्यात विनोदी शैली आणि विषयाचे मुद्देसूद विवेचनसुद्धा. त्यांनी अनेकदा सूत्रसंचालन केलेले मी पाहिले आहे. त्यांचे वक्तृत्व ओघवते असते म्हणून ते सर्वांना आवडते. ते उभे राहतील तिथे त्या जागेचे सोने करतील. सोने म्हणजे ते सोने नव्हे. ते नेहमीच सभा जिंकत. यापुढेही त्यांनी असेच करावे. संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्यांना अधिक जवळून पाहता आले. त्यांनी केलेली शैक्षणिक साहित्याची पखरण वर्गभर वर्षत राहणारी अशीच. ते पुढे अजून अधिक शिकत आहेत म्हणून मला त्यांचा अधिक अभिमान वाटतो. 

         कासार ह्यांच्या नावातच प्रवीण आहे. त्यांचं हसणं लाजबाब. त्यांचं सहकार्य लाखमोलाचं असतं. त्यांनी कमी कालावधीत सजवलेला वर्ग आमच्याशी शिक्षण परिषदेच्या वेळी बोलला आहे. ज्यांच्या वर्गाच्या भिंती बोलतात, त्यांचा वर्गही तसाच बोलू लागतो. त्यांनी अगदी तसेच केले आहे. पुढे हजर होणाऱ्या शिक्षकांना असे वर्ग अधिक पुढे नेण्यासाठी खूप सोपे जाणार हे नक्कीचे आहे. मला एकदा एका लिंकबद्दल काही अडचणी आल्या होत्या. मला काहीकेल्या जमत नव्हते. मग मला कासारांच्या प्रवीणतेची आठवण आली. मी त्यांना फोन करुन समस्या सांगितली. त्यांनी पाचच मिनिटात माझे काम करुन त्याचा स्क्रिनशॉट सुद्धा पाठविला. क्रीडास्पर्धेच्या वेळी या सर्वांनीच मला उदंड सहकार्य केलेले आहे. शेर्पे केंद्रातील सर्वच शिक्षकांकडून आपल्याला हवा असतो त्यापेक्षा जास्त आदर मिळत असतो हे त्यांचे मोठेपणच आहे. 

         असे हरहुन्नरी शिक्षक बदली होऊन जातात तेव्हा खूप हुरहूर लागते. चणचण भासते. त्यांची उणीव भरुन काढणारे शिक्षक नियुक्त होतीलच. तरीही त्यांच्यासोबत घालविलेल्या आठवणी आम्हां सर्वांसाठी अनमोल ठेवा असणार आहेत. 

         आमच्या शाळेतील सुजाता कुडतरकर मॅडम यांचीही बदली झाली आहे. गेली ५ वर्षे आम्ही शिक्षक जे टीमवर्क करत होतो त्याला तोड नाही. प्रत्येकाचे काम आणि कामाची पद्धत वेगळी असते. त्यांच्या कामाचा उरक चांगला होता. मी नसताना त्यांनी माझ्यापेक्षा शिस्तबद्ध शाळा ठेवली आहे. वृक्षारोपण कार्यक्रमात मी नसताना त्यांनी मारलेली बाजी मी लोकांच्या तोंडून ऐकली आहे. मला त्यावेळी जो आनंद झाला तो शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. 

         बदली होऊन गेलात,  तुम्हांला चांगलं वाटावं म्हणून मी हे लिहित नसून मला मनापासून लिहावेसे वाटले म्हणूनच लिहित आहे. तुमचा सर्वांचा आदर करत शब्दप्रपंच थांबवतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शिडवणे नं. १

Saturday, August 3, 2024

🛑 ढवणसरांची अकाली एक्झिट

🛑 ढवणसरांची अकाली एक्झिट

        बदली ही शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कधी सुखाची तर कधी दुःखाची गोष्ट बनलेली असू शकते. मला याचा अनेकदा दुःखदायक अनुभव आला आहे. त्यामुळे मी आता बदलीला सकारात्मक पद्धतीने बघू लागलो आहे. 

         काही शिक्षकांच्या बाबतीत खूपच सुखदायक बदल्या होताना मी पाहिल्या आहेत. मी मात्र नेहमीच अडचणींचा सामना करतच बदल्यांना सामोरा जात आलोय. त्यामुळे मला आता त्यांची सवय झाली आहे. पण सर्वांनाच त्यांची सवय होईल याची अजिबात खात्री देता येणे कठीण आहे. प्रत्येकाचा दृष्टिकोन त्याला कारणीभूत असू शकतो. तरीही मनात घडणाऱ्या मानसिक तणावांच्या लहरी थांबवणे हे ज्याला त्याला कसे शक्य होईल हे त्याच्यावर होणाऱ्या प्रसंगानुरूप बदलत राहू शकते. 

         मी कणकवलीत राहणारा असून वैभववाडीतील मांगवली नं.१ शाळेत सात वर्षे अतिशय सुखदायक नोकरी केली आहे. १२० पेक्षा जास्त किलोमीटरचा दैनंदिन प्रवास करुनही शारीरिक, मानसिक तणावावर सात वर्षे राज्य केलं. ऑनलाईन बदली झाली म्हणून आता ६० किलोमीटर अंतरावरची शाळा मला जवळ वाटू लागली आहे. हल्लीच्या मे मधील समुपदेशनात मी बदली झाली नाही म्हणून हसत हसत आलो आहे. हसत यासाठी कारण मला एकही शाळा मिळाली नाही म्हणून मी नकार देऊन पूर्वीचीच शाळा नवीन मिळाल्यासारखा चेहरा करुन दालनाच्या बाहेर पडलो होतो. तुम्ही एकदा नोकरी स्वीकारली की हे असे घडणार याचा कायमच स्वीकार करत राहण्याशिवाय पर्याय नसतो हे मान्यच करायला हवे. असो. 

         लक्ष्मण ढवण सरांची निधनाची बातमी समजली आणि मला त्यांच्याविषयी लिहावेसे वाटले म्हणून मी मध्यरात्री लिहावयास बसलो. मला त्यांच्याविषयी अतिशय आदर आहे. त्यांची आणि माझी वैभववाडी तालुक्यात भेट झाली. माझ्या आणि त्यांच्या मैत्रीला एका तपाचा काळ लोटून गेला आहे. या काळानंतर एक असा काळ त्यांच्यावर येईल असे कधीच वाटले नव्हते. चांगला धटधाकट वाटणारा माणूस अचानक ब्रेन हॅमरेज सारख्या आकस्मिक आजाराने आपल्यातून कायमचा निघून जातो यासारखी वेदनादायक गोष्ट दुसरी असूच शकत नाही. 

         सर्वच माणसांना तणाव असतात. पण कधीतरी अनेक तणावांची बेरीज होऊन वेगळेच विपरीत घडलेले पाहिले की आपणही आता सावधान झाले पाहिजे ही घंटा आपल्या सर्वांच्याच मनात कायम वाजत राहणार आहे. माणूस अतिविचार करु लागला की त्याचे व्यवस्थापन करणे त्याला जेव्हा अजिबात शक्य होत नाही तेव्हा अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता असते. 

         ढवण सर म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. शिक्षक म्हणून त्यांच्यात अनेक उत्तम गुणांचा संगम झालेला होता. शाळेत त्यांचे काम पहात राहण्यासारखे असे. शिक्षक समितीचा खंदा कार्यकर्ता. वैभववाडी तालुक्याची शिक्षक समिती सचिव पदाची धुरा सांभाळत असताना त्यांची इतिवृत्ते मी बऱ्याचदा ऐकली आहेत. ते अभ्यासू होते. त्यांचे बोलणे ओघवते असे. त्यांची संघटनेवर अपार निष्ठा होती. त्यांच्या जाण्याने एक निष्ठावंत कार्यकर्ता आपल्यातून कायमचा हरपला आहे. 

         ते सांगुळवाडी शाळेत असताना कणकवलीत राहत असत. त्यांनी कोकिसरे गावात सुंदर घर बांधले आहे. त्यांच्या घरी मी एकदा गेलो होतो. त्यांच्या स्वतःच्या घराबद्दल खूप सुंदर संकल्पना होत्या. तरीही मुलाच्या शिक्षणासाठी त्यांना कणकवलीत घर घ्यावसं वाटलं. त्यांनी फ्लॅट घेतला. मुलाचं शिक्षण सुरु होतं. त्यांचं वैभववाडी सांगुळवाडी ते कणकवली रोजचं अपडाऊन मी कित्येकदा पाहिलं आहे. मीही त्यांना महिन्यातून सात आठ वेळा तरी सतत सहा सात वर्षे कणकवली ते वैभववाडी किंवा वैभववाडी ते कणकवली येता जाता कधीना कधी टू व्हीलरने नेले आणले आहे. एकटं जाण्यापेक्षा सोबतीला ढवण सरांसारखे सोबती असताना प्रवास कमी वाटत असे. बोलता बोलता कणकवली कधीच येत असे. प्रवास सुखकर होऊन जाई. गजाली मारत असताना त्यांच्यातील आतला आवाज मला खूप काही देऊन जाई. ते खरंच खूप चांगले मित्र आणि मार्गदर्शक होते. वैभववाडीत काही सलग वर्षे त्यांनी पगाराचा खोका सांभाळला होता. आकडेवारीमध्ये त्यांचे ज्ञान आम्हांला लाजवणारे होते. 

        २०१९ मध्ये ऑनलाईन बदल्या झाल्या. मी कणकवली तालुक्यात आलो. त्यांनीही कणकवली तालुक्यातील भरणी नं. १ शाळा निवडली. आता ते कणकवलीत कमी आणि कोकिसरे गावी जास्त जाऊ लागले होते. कितीही काहीही झाले तरी प्रत्येकाला आपला गाव प्रिय असतोच. त्यांचे पुन्हा कणकवली वैभववाडी अपडाऊन सुरु झाले. त्यांना ते त्रासदायक होऊ लागले म्हणून त्यांनी शेर्पे केंद्रशाळेत कामगिरी मागून घेतली. ती आमची केंद्रशाळा असल्यामुळे पुन्हा शिक्षण परिषदेच्या निमित्ताने त्यांच्या भेटी घडत असत. कामगिरी शेवटी कामगिरीच असते. ती कधीच कायमची नसते. त्यामुळे त्यांना पुन्हा भरणी शाळेत हजर व्हावे लागले. मे मधील समुपदेशनात त्यांना वैभववाडीतील शिराळे शाळा प्राप्त झाली होती. पण बदल्या झाल्याच नाहीत. कदाचित त्यामुळेही त्यांचा तणाव वाढला असेल नक्की सांगता येणे कठीण आहे. पण मी त्यांच्या जागी असतो तर मलाही नक्कीच तणाव आला असता. आता मात्र त्यांनी पदवीधर पदावरून पदावनत होण्याचा निर्णय घेतला होता असे समजले. शेवटी माणसं आपला तणाव कमी होण्यासाठीच असं करत असावीत असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांना आता त्यांच्या घरापासून जवळची शाळा मिळत होती असेही ऐकले. त्या शाळेत ते हजर होण्यासाठी जाण्याआधीच जर त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होऊन त्यातच त्यांची वणवण कायमची संपणार असेल तर देव खरंच आहे का हा मला प्रश्न पडतो. सर्वांना आवडणारं व्यक्तिमत्व देवालाही आवडतं आणि तो त्यांना आकस्मिक घेऊनही जातो तेव्हा माझ्यासारख्या अनेकांच्या मनाला खूप खोलवर वेदना होतात. 

         ढवणसर आता मला कधीही भेटणार नाहीत याचं अपार दुःख आहेच. कदाचित त्यांनाही माहित नसेल की त्यांना अचानक असे काय झाले ते. मृत्यूदेवतेनं इतकं कठोर वागायला नको होतं. माझ्या बाबांना, आईला आणि पत्नीलाही तिनं असंच अकाली नेलं आहे. नियती, प्राक्तन  आणि जे जे लिहिले भाळी वगैरे ऐकून ऐकून कानांचे पडदे फाटले आहेत. 

         आदरणीय कै. ढवण सरांच्या पवित्र मृतात्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबल





Monday, July 1, 2024

🎈स संदीपचा , क कदमांच्या , क कवितेचा

 🎈स संदीपचा , क कदमांच्या , क कवितेचा 


संदीप कदम हे एक गुणी आणि आदर्श शिक्षक आहेत. त्यांचा आणि माझा परिचय देवगड तालुक्यातला. अनेकदा आम्ही प्रशिक्षणे , स्पर्धा आणि एकाच तालुक्यात असल्यामुळे एकत्र आलो आहोत. कणकवली तालुक्यात माझ्या कणकवलीतील घरापासून तीन ते चार किलोमीटरवर त्यांचे जानवली येथे घर आहे. मला त्यांच्या घरी जाण्याचा एकदाही योग आलेला नाही. तरीही संदीप कदम सरांच्याकडे बघून मीही त्यांचे काही गुण घेतले असावेत. 

‘ एक घास चिऊचा ’ हा त्यांचा सुप्रसिद्ध शालेय उपक्रम मलाच काय कोणालाही भुरळ पाडू शकतो. शाळेत जाऊन प्रामाणिकपणे फक्त शिकवावे असे म्हणणाऱ्या शिक्षकांच्या व्याख्येला त्यांच्यासारखेच शिक्षक बदलवू शकतात. त्यांनी शाळेच्या भिंतींच्या बाहेर जाऊन शिकवले आहे. शिक्षण हे कधी चार भिंतींच्या आत घडत नसते हे त्यांनी प्रात्यक्षिकाने सिद्ध केलेले आहे. त्यांच्या सहवासात राहणारा माणूस सुजनवाक्य बोलणारा नाही झाला तरच नवल. ते आपला अभ्यासक्रम जगत असतात. 

सानेगुरुजींच्या ‘ भूतदया ’ या गोष्टीची आठवण येते. झाडावरुन खाली पडून मरत असलेल्या पक्ष्याला छोट्या श्यामने जीवदान दिले होते खरे , पण तोच पक्षी जेव्हा हे जग सोडून गेला तेव्हा झालेले दुःख सानेगुरुजींनी अत्यंत करुण शब्दांत व्यक्त केलेले दिसते. या मृत पक्ष्याला मातीत पुरुन त्यावर आठवणीसाठी झाड लावणारे छोटे सानेगुरुजी मला म्हणूनच आठवतात. मुलांनी पक्ष्यांवर प्रेम करावे , प्राणिमात्रांवर दया करावी यालाच भुतदया असे म्हणतात. हीच भुतदया मुलांमध्ये निर्माण होण्यासाठी संदीप कदम सरांनी राबविलेला छोटासा उपक्रम खूप मोठे आणि चिरकाल टिकणारे संस्कार करुन जातो. या उपक्रमाची संकल्पना त्यांच्या डोक्यात कशी आली असावी याचा विचार केला तरी कदमांच्या विचारांतील दम लक्षात येतो. 

त्यांचे अक्षर मोत्यासारखे म्हटले तरी वावगे ठरूच नये. अक्षरांचे मोड त्यांच्याकडून शिकलेली मुले भाग्यवान म्हटली पाहिजेत. शिक्षकाचे अक्षर सुंदर असलेच पाहिजे. त्याने लिहिलेला फळा कधीच पुसू नये असे वाटत राहावे असे कदमसरांचे अप्रतिम लेखन असते. त्यांनी कलेची कोणतीही डिग्री घेतली असेल तर मला माहिती नाही. तरीही हस्ताक्षरात त्यांचा हात धरणारे विरळेच असावेत. सध्या ते नडगिवे नं. 1 शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून अतिशय उपक्रमशील रीतीने कार्यरत आहेत. त्यांच्यासारखे शिक्षक मिळणे हे त्या शाळेचे आणि केंद्राचेही भाग्यच म्हणायला हवे. आदर्शवत राहणीमान बघून ते शिक्षक आहेत हे कोणीही सांगेल. ते अतिशय नम्र आहेत. 

मिठबांव , शिरगांव अशा ठिकाणी आमची दहा दहा दिवसांची प्रशिक्षणे झाली आहेत. प्रत्येकवेळी त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केलेली ऐतिहासिक पात्रे अजूनही डोळ्यासमोर उभी राहतात. त्यांचा इतिहासाचा गाढा अभ्यास आहे. त्यांनी आपल्या शिक्षकमित्र चमूंसोबत अनेकविध कार्यक्रम केलेले असू शकतात. आत्मविश्वास त्यांच्यात ठासून भरलेला आहे. ते मार्गदर्शक म्हणून बोलू लागले कि श्रोत्यांना याचा प्रत्यय आल्याशिवाय राहायचा नाही. 

शिक्षक संघटना आणि सामाजिक संघटनेमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर असूनही त्यांनी कधीही अहंकार केलेला असेल असे वाटत नाही. ते अतिशय संवेदनशील आणि सहनशीलही आहेत. आपल्यापेक्षा कमी सेवा झालेल्या आम्हांलाही ते अतीव आदर देतात. त्यांच्यासोबत काही तासांचा कालावधी जाणे हेही माझ्यासारख्याला अतिशय आनंददायी असू शकतं. त्यांना हल्लीचं हे बेगडी जग आवडत नाही. त्यांना प्रसिद्धीही नको असते. प्रसिद्धीपासून ते जरा दूरच राहणं पसंत करतात. 

ते कविमनाचे आहेत हे माहिती होते. पण नुकत्याच आमच्या मुख्याध्यापक सहविचार सभेत त्याची प्रचिती आली. त्यांनी आणि त्यांच्या कवीमित्रांनी लिहिलेल्या एका काव्यसंग्रहाचे नुकतेच समारंभपूर्वक प्रकाशन झाले होते. कदम सरांनी आम्हांला ही माहिती दिली आणि आम्हीही आनंदलो. आमच्या एका शिक्षक मित्राच्या काही सुंदर निवडक कविता काव्यसंग्रहात छापून येतात हेच आमच्यासाठी अभिमानाची बाब असते. मग काय त्यांना केंद्रप्रमुख पवार साहेबांनी कविता वाचन करण्याची अनमोल संधी दिली. आमच्यासाठी ऐकण्याची ती सुवर्णसंधी होती. पुढील पाच दहा मिनिटे कदम सरांच्या सुंदर शब्दांचा जागर आमच्यासमोर धबधब्यासारखा कोसळत राहिला होता. ‘ स संदीप सरांच्या ’ ‘ क कदमांच्या ’ ‘ क कवितांचा ’ तास कधी संपूच नये असे मला अजूनही वाटते आहे.   


Ⓒ प्रवीण अशितोष कुबल ( मुख्याध्यापक , शिडवणे नं. 1 )  








Thursday, February 29, 2024

🛑 दक्ष राहणारी दक्षता

 🛑 दक्ष राहणारी दक्षता

          माणसं जन्माला येतात, मरुनही जातात. कधीतरी मरुन जाणार हे प्रत्येकाला माहित असतं. माणसाचं मरण कधी येणार हे माहित असतं तर!!! तर माणसाची जगण्याची इच्छाच मरुन गेली असती. मरणार कधी हे माहित नसतं, म्हणून आपण सुखाने जगत राहात असतो.

          काही लोकांचं वय झालेलं असतं. त्यांना त्यांच्या जीवनाचा कंटाळा आलेला असतो. कंटाळून जगणं हेच त्यांच्या जीवनाचं गणित झालेलं असतं. ज्यांना जगायचं असतं, त्यांना मात्र नियती लवकर का घेऊन जाते ते समजत नाही. जगायची तीव्र इच्छा असते. जीवनाकडे आशेने पाहत असताना अचानक एखादी व्याधी जडते आणि जगण्याच्या उमेदीचेच खच्चीकरण होते.

          दक्षता एक गुणी मुलगी. खेड्यात राहणारी. तिचे कुटुंब अतिशय प्रेमळ. तिचे आई, वडील, बहिण, भाऊ, आजी सगळे दक्षताला जीव की प्राण. तिनेही या सर्वांवर अतिशय जीव लावला. तिला गप्पा मारायला खूप आवडत असे. ती गप्पांमध्ये रंगून जाई. तिचा हसरा चेहरा त्यावेळी अधिक खुलून दिसे.

          तिचं बोलणं, वागणं, मिसळणं, मैत्री करणं लक्षात राहण्यासारखंच होतं. तिची आणि माझी भेट तिच्या वडिलांमुळे झाली. वडील समाजाची सेवा करण्यात आनंद मानणारे. समाजाची सेवा करताना त्यांनी आपल्या मुलांनाही चांगले संस्कार दिले हे विसरून चालणार नाही. आपल्या मुलांना मार्गदर्शन करताना आपल्या समाजातील मुलांनाही मार्गदर्शन करताना ते नेहमीच तहानभूक हरपून जात असतात.

          मुलगी शिकली की पुढे काय करावे हा प्रत्येक बापाला प्रश्न पडतो. दक्षताच्या बाबांनी तिला ब्युटीपार्लरचे शिक्षण देण्याचे ठरवले. एका प्रसिद्ध ब्युटीपार्लरमध्ये ती ' कमवा आणि शिका ' पद्धतीने शिकू लागली. एकदा बघितले की दक्षताला चांगले लक्षात येई. तिने सर्व प्रकारच्या थेरपी लवकरच आत्मसात केल्या. बोलता बोलता तिचे हातसुद्धा सफाईने चालत असत. तिचं बोलणं गोड होतं. त्यामुळे तिच्या हातून ब्युटी थेरपी करायला आलेली महिला कस्टमर खुश होऊन जाई. दिसत असे शिकण्यात सुंदर रितीने निघून जाताना समाधान आणि सुखाचा अनुभव येत होता.

          अचानक दक्षताला त्रास सुरु झाला. तिला कॅन्सर असल्याचे समजले तेव्हा तर संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. ती स्वतः मात्र खंबीर होती. तिने धीटपणे दुर्धर व्याधीला पळवून लावण्याचे ठरवले होते. तिच्या वागण्या - बोलण्यात काहीच फरक जाणवत नव्हता. ती जशी पूर्वी होती, तशीच हसरी मुद्रा घेऊन समोर येई. तिचे दुःख तिने स्वतःच सूर्यासारखे गिळून टाकले होते. कर्करोगाला पळवून लावण्याचं धारिष्ठ्य करणारी दक्षता अजिबात हार मानायला तयारच नव्हती.

          ती आली की हसतमुखाने यायची. तिची लहान मुलांशी लगेच मैत्री व्हायची. मग तिच्या अमर्याद गप्पा सुरु होत. ती मनुष्यवेल्हाळ होती. तिला माणसांमध्ये राहायला खूप आवडे. तिने एकदा मैत्री केली की कायमची. तिच्या अनेक मैत्रिणी होत्या, तसे मित्रही. तिची मैत्री निरागस होती.

          बऱ्याचदा तिला केमोथेरपीसाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावे लागे. तिथल्या स्टाफबरोबर तिने मैत्री केली होती. केमोमुळे तिचे केस जाऊ लागले होते. ब्युटी थेरपी करणारी मुलगी केसांच्या गळण्याने डगमगली नाही. तिने निकराने प्रतिकार केला. ती आली की तिचा निस्तेज झालेला चेहरा पाहून काळीज आतून चर्र होई. ती आपल्या त्या जीवनावर अजिबात नाखुश नव्हती.

          त्यादिवशी तिला ताप आला होता. ताप आला आणि तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. डॉक्टर उपचार करण्यासाठी पुन्हा लांबच्या हॉस्पिटलमध्ये नेणे भाग होते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला तिला होणारा त्रास असह्य मानसिक वेदना देत होता. हॉस्पिटलाईज करुन सुद्धा तिच्या तब्येतीत काहीच चांगला फरक पडत नव्हता. तिचे शरीर निश्चल पडू लागण्याची लक्षणे डॉक्टरांनाही दिसू लागली होती. तिचा हसरा चेहरा हळूहळू शांत शांत होत जाऊन कायमचा शांत झाला होता. तिचे हसणे आता पुन्हा कधीही पाहता येणार नव्हते. कायमची दक्ष असणारी दक्षता खूप खूप दूर निघून गेली होती.

©️ प्रवीण अशितोष कुबल, कणकवली

Saturday, November 11, 2023

🛑आली दिवाळी

 🛑 दिवाळ सण आला

          दरवर्षी दिवाळी सण येतो. प्रत्येक वर्षाला नवीन आकर्षण असते. तो येतो तेव्हा उत्साह घेऊनच येतो. माणसं तीच असतात, त्यांच्यात उत्साह मात्र नवीन येत असतो.

          शाळांना सुट्ट्या लागतात. दिवाळीची सुट्टी हिवाळी सुट्टी म्हणून देण्यात येते. यंदा हिवाळी सुट्टीत हिवाळा जाणवताना दिसत नाहीय. नोव्हेंबर आला तरी गारवा, थंडी कुठे अनुभवायला मिळताना कठीणच झालेली दिसते आहे. कपाटातील स्वेटरे तशीच पडून आहेत.

          उद्या नरक चतुर्दशी. अनेक ठिकाणी नरकासुराचे मोठाले देखावे मांडले जातात. स्पर्धा भरवल्या जातात. अगडबंब राक्षस जाळले जातात. भावना महत्वाची असल्याने सगळेच त्यात सहभाग घेताना दिसतात.

          सकाळी लवकरच फटाक्यांच्या अतिशबाजीने जाग येते. शहरात रात्री बारा वाजल्यानंतर फटाके सुरु होतात, ते सकाळी दिसू लागले तरी वाजतच असतात. कानठळ्या वाजवणारे बॉम्ब बोंब मारत असतात. रोशनाईने शहरे झगमगून उठतात. लोकांच्या रोमारोमात चैतन्य संचारु लागते. तेही त्या आवाजाचा एक भाग बनून जातात.

          अभ्यंग स्नान करताना सुगंधी उटण्याचे सार्थक होते. अंग सुगंधाने दरवळू लागते. गरमागरम पाण्याचा शिडकावा अंगावर घेताना शहारे येतात. नवीन फोडलेला सुगंधी साबण अंगावर चोळताना पूर्वीची दिवाळी आठवून शहाऱ्यांची संख्या वाढत जाते.

          बाहेर पेटणाऱ्या पणत्या, आकाशकंदील हसत हसत नव्या दिपवर्षाचे स्वागत करताना अधिक सुंदर दिसू लागतात. आईने केलेल्या फराळाचा वास तोंडात पाणी आणू पाहत असतो. नवीन खरेदी केलेले कपडे आज घालताना खूप मस्त वाटत असते. कांदेपोहे, चकल्या, करंज्या आणि लाडवांची ताटे समोर येऊ लागतात. फराळ खाण्याचा अतिआग्रह केला जातो. हे खाऊ कि ते खाऊ असे होऊन जाते. गोड पदार्थांपेक्षा तिखट व कुरकुरीत पदार्थांचा फडशा पाडला जातो.

          जवळच्या मंदिरात काकड आरती सुरु होते. अजित कडकडे आणि सुरेश वाडकरांची गाणी कानांना तृप्त करु लागतात. परिवारासह मंदिरात जाताना वाटेतले विविध प्रकारचे आकाशकंदील, आकर्षक रांगोळ्या पाहताना मनाला अपार आनंद होऊ लागतो.

          तुळशी वृंदावनासमोर कडू कारेटांची फोडलेली रांगोळी दिसू लागते.



Tuesday, August 8, 2023

🛑 ' कारटो ' ची कल्पना

 🛑 ' कारटो ' ची कल्पना

          कल्पना धाकू मलये नावाची माझी डीएडची मैत्रीण. तिने ' कारटो ' नावाची एक बालकादंबरी लिहिली आहे. ती खूप छान लेखन करते. तिने केलेलं लेखन वाचकाला भावणारं आहे. लहानपणी घडणाऱ्या कित्येक गोष्टी कल्पनाने लक्षात ठेवल्या आहेत. गोष्टी नुसत्या लक्षात ठेवून चालत नसतात , त्या काळजीपूर्वक आणि क्रमबद्ध मांडाव्या लागतात. कल्पनाने अगदी तसंच केलंय. 

          बालमनाला दांडगा अभ्यास असणारी व्यक्तीच असं करु शकते. प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा बारकाईने विचार केल्याने कादंबरी वाचनीय झाली आहे. कादंबरीच्या नावामुळे तर ती हातात घेऊन बघण्याचा आणि वाचण्याचा मोह व्हावा. कल्पना चांगलं लिहिते एवढं मला माहिती होतं. पण ती अतिशय कसदार आणि दर्जेदार लिहू शकते हे ' कारटो ' वाचल्यानंतर कोणीही सांगू शकेल. लेखिका म्हणून कल्पना जिंकली आहे. तिने कारटो मध्ये अनेकानेक परखड मतं व्यक्त केली आहेत. एक महिला असं लिहिते आहे म्हणून आणखी अभिमानास्पद आहे.

          मालवणी बोलणारी अनेक प्रसिद्ध माणसे मी बघितली आहेत. नटवर्य कै. मच्छिंद्र कांबळी यांना मी लहानपणापासून ऐकत आलोय. मी ज्याठिकाणी राहायला होतो , तिथे शेजारी गॅरेज होते. त्या गॅरेजमध्ये ते एकदा आले होते. मी धावत जाऊन त्यांची सही घेतल्याचे मला चांगलेच आठवते आहे. त्यावेळीसुद्धा ते माझ्याशी शुद्ध मालवणीत बोलले होते. त्यांची बरीच नाटके प्रत्यक्ष पाहिली , तेव्हा त्यांचं मालवणी भाषेवरील प्रभुत्व लक्षात येतं. कल्पनाची मालवणी भाषेवरील तशीच पकड असल्याचे दिसून येते. शक्यतो तिची मालवणी भाषा शुद्ध आणि जिव्हाळ्याची वाटते. मालवणी शब्दांना तिने लहानपणापासून अधिक आपलेसे केले असावे. आम्हां लोकांना प्रमाणभाषेचं कोडकौतुक वाटत असतं. ती बोलताना आम्ही मालवणी भाषेचं टोनिंग वापरताना अनेकदा चुकत असतो. हे चुकलेलं पुण्यातील लोकांना लगेच समजतं. कारण आमची प्रिय मालवणी भाषा हेल काढणारी आहे. ती हेल वगैरे काढणारी असली तरी ती आम्हाला प्रिय आहे. 

          कल्पना मलये हिने लहान असतानाच्या तिला शंका वाटणाऱ्या गोष्टी जशास तशा मालवणीत शब्दबद्ध केल्या आहेत. तिची मराठी भाषाही स्वच्छ आणि शुद्ध असते. तिला दोन्ही भाषेतून बोलताना आणि तिने दोन्ही भाषेतून लिहिलेले वाचताना तिची साहित्यविषयक उंची लक्षात येते. मीसुद्धा थोडेफार लेखन करतो. तरीही तिची उंची गाठू शकण्यासाठी मला भरपूर अभ्यास करावा लागेल. 

          तिच्या पुस्तकाला वाचल्याशिवाय बोलणे हे कधीही मूर्खपणाचे ठरेल. तिच्या पुस्तकाच्या चार आवृत्त्या निघू शकतात म्हणजे तिचे पुस्तक वाचायलाच पाहिजे असा अर्थ होतो. कोणत्याही लेखकाचे किंवा लेखिकेचे पुस्तक न वाचता आपल्याला कोणतेही भाष्य करता येणार नाही. ते पुस्तक वाचल्याशिवाय त्यात काय वेगळं आहे ते समजणारही नाही. त्यासाठी ते स्वतः विकत घेऊन वाचले पाहिजे. विकत घेऊन पुस्तक वाचण्यात नक्कीच मजा असते. पुस्तक संग्रही राहतं हा आणखी एक फायदा. 

          पुस्तकाचं शीर्षक खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतं. ' कारटो ' हे नाव म्हणजे एका आपल्यासारख्याच प्रश्न विचारणाऱ्या मुलाच्या नावाचं संक्षिप्त रुप आहे. हा मुलगा चोखंदळ आहे , विज्ञानावर प्रेम करणारा आहे. शंकांची उत्तरं शोधून काढणारा आहे. म्हणून हा कल्पना मलये यांचा ' कारटो ' सर्वांनाच सतत भुरळ घालत राहणार आहे. यांवर आधारित एखादा चित्रपट किंवा बालनाट्य बनायला हरकत नाही. कल्पनाने केलेल्या कल्पना जर समजून घ्यायच्या असतील तर प्रत्येकाने हे पुस्तक नक्की घ्या आणि नुसतं घेऊन उपयोग नाही , ते शेवटपर्यंत वाचून काढा. मग समजेल ' कारटो ' म्हणजे काय रसायन आहे ते !!!

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



Monday, June 5, 2023

🛑 दमदार वक्तृत्वाचा आविष्कार : किशोर कदमसर

🛑 दमदार वक्तृत्वाचा आविष्कार : किशोर कदमसर

          शिक्षकी पेशामध्ये पदार्पण केले कि अनेक पैलूंवर काम करावे लागते. कसलेला आणि दमदार शिक्षक तयार होण्यासाठी डी. एड , बी. एड. कॉलेजातील वर्षे अतिशय महत्त्वपूर्ण असतात. नोकरीला लागल्यानंतर होणारी सेवांतर्गत प्रशिक्षणे  शिक्षकातील अंतरंग , बाह्यरंग दोन्ही बदलून टाकत असतात. 

          किशोर कदम हे माझे खूप जवळचे शिक्षक मित्र. त्यांची पत्नी शुभांगी. ती माझी क्लासमेट. तिचे पती किशोर कदम आहेत एवढाच सुरुवातीचा परिचय. त्यानंतर अक्षरसिंधु संस्थेत काम करताना कधीतरी किशोर कदमांची गाठ पडली. धावती भेट झाली. त्यांचं राजबिंडं व्यक्तिमत्त्व त्यावेळी माझ्यावर प्रभाव टाकून गेलं होतं. 

          मग पुन्हा माझी आणि त्यांची भेट थेट पुण्यात झाली. बाहुली नाट्य प्रशिक्षणात. दहा दिवसीय प्रशिक्षणात आम्ही दोघे सिंधुदुर्गवासीय असल्याने एकत्र बसत होतो. मालवणीत बोलत होतो. तिथे मला त्यांच्या अभिनय प्रतिभेचा परिचय घडला. त्यांच्या आवाजाचे टोन , आरोह , अवरोह ऐकून मी अक्षरशः भारावून गेलो. त्यांचं ऐतिहासिक नाट्यात्मक बोलणं माझ्यासाठी नवीन होतं. तेव्हाच माझ्या लक्षात आलं. या कदमांमध्ये चांगलाच दम आहे. त्यांनी ऐतिहासिक वाक्यांची फेक करताना एकदा दम घेतला कि वाक्य संपेपर्यंत ते दम सोडत नाहीत हे विशेष. अशी वाक्ये बोलताना त्यांच्या अंगात जणू ती पात्रेच शिरलेली असतात असे वाटते. 

          त्या दहा दिवसात आम्ही दोघे एकमेकांच्या अधिक जवळ आलो होतो. आम्ही जेवायला , नाश्त्याला एकाच हॉटेलमध्ये जात असू. दोघांचा गट असल्याने सादरीकरण करताना मला त्यांची खूपच मदत झाली होती. ते खूप हुशार आहेत. 

          त्यानंतर पुन्हा एकदा ' अतिपरिणामकारक व्यक्तींच्या सात सवयी ' हे तीन दिवसांचं जिल्हास्तरीय प्रशिक्षण नांदगांव शाळेत होतं. तिथे हे किशोर कदम मस्त सुट सफारी घालून आले होते. ते आमचे तज्ज्ञमार्गदर्शक होते. त्यांनी मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि पुन्हा मला त्यांचा अधिक अभिमान वाटू लागला. त्यांचं बोलणं तुफान होतं. ते इतक्या जलद गतीने बोलत होते कि ते इतक्या जलद कसे बोलू शकतात हा मला त्यावेळी प्रश्न पडला होता. पुस्तकातील मुद्दे भरपूर होते. तीन दिवसांत ते सर्व समजून सांगायचे तर वेगवान वक्तृत्व गरजेचं होतं. आम्हाला एवढ्या वेगाने ऐकण्याची सवय नव्हती , त्यामुळे त्यातला काही भाग आमच्या डोक्यावरुन गेला ही गोष्ट वेगळी. पण त्यात त्यांचा अजिबात दोष नव्हता. आमची ग्रासपिंग पॉवर तेवढी काम करत नव्हती हेही त्याचे कारण असू शकते. 

          त्यांच्या दोन्ही मुली खूप हुशार आहेत त्यांच्यासारख्याच. ' बाप तश्या बेट्या ' असे म्हटले तरी वावगे ठरु नये. मुलींनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वक्तृत्वाचा वसा पुढे चालवला आहे. विविध स्पर्धांमध्ये केवळ भागच घेत नाहीत , तर ठरवून प्रथम क्रमांकाचे बक्षीसही मिळवतात. तीन ते चार मिनिटांच्या भाषणात श्रोत्यांच्या मनाचा ताबाच घेतात म्हणा ना !! शब्द बाबांचे आणि आवाज मुलींचा. बाबांना अपेक्षित यश मिळवत पुढे जाताना त्यांनी कधीही मागे वळून बघितलेले नाही. कालपेक्षा आज जास्त जिद्दीने लढा देत ' वक्ता दशसहश्रेषु ' हे सिद्ध करण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला आहे असे वाटते. 

          भाषण करत असताना ज्यांच्यावर त्या बोलत असतात त्यांचा पोशाख परिधान करुन त्यांनी कित्येकदा ' भूमिकाभिनय देखील केला आहे. यांच्या भाषणाच्या सुरुवातीच्या वाक्यांपासून प्रेक्षकांच्या टाळ्या सुरु होतात. भाषण संपताना मात्र लोक टाळ्या वाजवायचे विसरुन जातात एवढे ते त्यांच्या भाषणात एकरुप झालेले असतात. 

          किशोर कदम यांना या सर्व गोष्टींचे श्रेय जाते. दोन्ही मुलींना असे वक्तृत्व शिकवत असताना त्यांनाही अधिक उत्तम वाचावे लागते. त्यांनी एकदा लिहायला घेतले की विषयाची मांडणी पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत. त्यांचं व्यक्तिचित्र प्रत्यक्ष बोलण्यासाठी तयार झालेलं असतं. या शब्दांमध्ये आवाजाचे प्राण ओतले कि एक सुंदर प्रभावी वक्त्याचं दर्शन घडायला वेळ लागत नाही. 

          असे वक्तृत्व लेखन करता करता किशोर कदम यांच्या दिव्य लेखणीतून एक पुस्तकच जन्माला आले आहे. त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक सर्व विद्यार्थी , पालक , शिक्षक आणि वाचक यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. शाळेतील जयंत्या , पुण्यतिथी कार्यक्रम साजरे करत असताना मुलांनी या पुस्तकातील भाषणांचा वापर केला तर समोरचे श्रोते खुश होऊन टाळ्या वाजवल्याशिवाय राहणार नाहीत. आवाजात ताकद असली तरी किशोर कदमांनी लिहिलेल्या शब्दांच्या ताकदीमुळे पुस्तक बेस्टसेलर ठरायला हवे यांत शंका असण्याचे कारण नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , पदवीधर शिक्षक , शाळा शिडवणे नं.१ ( 9881471684 )



Sunday, June 4, 2023

🌏 शिक्षक झालो म्हणून

  🌏 शिक्षक झालो म्हणून

लहानपणापासून प्रत्येकाला कोणीतरी होण्यासाठी प्रयत्न केले जातात. प्रत्येकजण काहीतरी करणारच असतो. काय होणार ? कोण होणार ? हे कोणाला माहिती नसते. " तुझे बाबा डॉक्टर आहेत , म्हणून तुला डॉक्टर व्हायला लागेल. नाहीतर हा एवढा मोठा डोलारा कोण सांभाळणार ? " अशी वाक्यं ऐकायला मिळतात. मग त्या मुलाला डॉक्टर होण्याशिवाय पर्याय उरत नाही. शेवटी उपजीविकेचे साधन म्हणून डॉक्टरी पेशा त्याला स्विकारणे भाग पडते. असेच इतर सर्व बाबतीत घडत असावे.
शिक्षक शिक्षिका असलेल्या आईबाबांना आपली मुलं शिक्षण क्षेत्रात किंबहुना शिक्षकी पेशात पाठवायला कितपत आवडतील हा सुद्धा एक प्रश्नच आहे. त्यांचा पाल्य आपल्या आईबाबांची वाटचाल बघत असतो. त्यामुळे की काय त्याला तो व्यवसाय स्वतःहून स्वीकारावासा वाटत नाही. ते म्हणतात , " शिक्षकी व्यवसाय सोडून मी दुसरे काहीही करेन. " आईबाबा सुद्धा त्याला दुजोरा देत असतील. कारण त्यांनी भोगलेले त्यांच्या मुलांनीही भोगावे असे त्यांनाही वाटत नाही. त्यांचा हाच उद्देश असेल , इतर कोणता उद्देश असेल असे वाटत नाही.
शिक्षकी पेशा हा पेशा आहे. तो धंदा नाही. ते एक समाजव्रत आहे. ते स्वीकारणे सोपे असू शकते , पण जोपासणे कठीण असू शकते. आपण या शिक्षकी पेशाला योग्य न्याय देऊ शकलो नाही तर त्याचा आपल्यालाच त्रास होऊ शकतो.
' थ्री ईडीएट्स ' चित्रपटात एका मुलाला फोटोग्राफीची आवड असूनही वडिलोपार्जित व्यवसाय करण्यासाठी आग्रह धरला गेला. त्याला वडिलांच्या व्यवसायात अजिबात रस नव्हता. ज्यावेळी त्याचे वडीलच त्याला फोटोग्राफी करण्याची परवानगी देतात तेव्हा तो आपल्या करारी वडिलांना घट्ट मिठी मारुन आपला आनंद व्यक्त करतो.
मला लहानपणी जेव्हा प्रश्न विचारला जाई , " तू मोठेपणी कोण होणार ? " तेव्हा माझे उत्तर ठरलेले असे. " मी इंजिनिअर होणार ... " इंजिनिअर म्हणजे कोण ? हे मला त्यावेळी माहितीही नव्हते. कोणीतरी सांगितले होते म्हणून मला तसे बनायचे होते. माझे स्वतःचे त्यावेळी नक्की कोणते मत होते ते सांगणे कठीण आहे.
मी शिक्षक झालो आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न हवेत विरुन गेले. मी इंजिनिअर झालो नाही ते एका अर्थाने बरेच झाले. कारण शिक्षक झाल्यामुळे माझ्या हाताखालून अनेक इंजिनिअर बनू शकले आहेत.
मी शिक्षक झालो म्हणून मला आज आदर मिळतो आहे. शिक्षक नसतो तर हा आदर नक्कीच मिळाला नसता. हल्ली या आदराचे प्रमाण खूप कमी झाले आहे. शिक्षकाला अध्यापनाव्यतिरिक्त कामे करावी लागत असल्याने त्याचे हे असे झाले असावे. कोणीही शिक्षकांबद्दल काहीबाही बोलू लागले आहेत. त्यात चांगलं कमी आणि बोचेल असे जास्तीचे आहे. त्यामुळे आपली अशी समाजात होणारी अवहेलना पाहून तो ' दीन ' होत चालला आहे.
कितीही चांगले काम केले तरी शाबासकीची थाप मिळणे दुर्मिळ झाले आहे. अर्थात अपवादात्मक असू शकेल , पण हे प्रमाण कमी झाले आहे असे राहून राहून वाटते.
आजही शिक्षक दिनानिमित्त अनेकांचे शुभेच्छा संदेश येतात. फोन येतात. हे लिहीत असतानाच मला एक फोन आला. त्यांनी मला शिक्षक दिनाच्या मनस्वी शुभेच्छा दिल्या. मी भरुन पावलो. मी त्यांना शिकवलेच नव्हते , तरीही त्यांनी मला फोन केला होता. त्यांनी मला वैयक्तिक फोन केला असला तरी मी तो सर्व शिक्षकी पेशालाच फोन आला होता असे समजतो. अजूनही कुठेतरी शिक्षकांबद्दल आदर जिवंत असल्याचे ते एक उदाहरण आहे. प्रत्येकाने असाच शिक्षकांबद्दलचा आदर दाखवण्याची गरज आहे. शिक्षकांच्या पाठीशी राहण्याची गरज आहे.
आपल्या शिक्षकांनी जर आपल्या लेकरांना शिकवायचे असेल तर जनमानसातून शिक्षकांना पाठिंबा मिळायला हवा. शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या विरोधात शिक्षकांनीच उभे राहण्यापेक्षा शिक्षकेतर सर्वांनीच ठाम उभे राहिल्यास शिक्षक पूर्णवेळ वर्गात शिकवू शकेल. पुन्हा एकदा अशी क्रांती घडेल याची वाट बघण्याशिवाय माझ्यासारख्या शिक्षकाला दुसरे काहीही करता येत नाही.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 )

Saturday, May 27, 2023

🛑 एका तेजस्वी सूर्याचा खडतर प्रवास : सुर्यकांत चव्हाण

🛑 एका तेजस्वी सूर्याचा खडतर प्रवास : सुर्यकांत चव्हाण 

           " मुलाचे पाय पाळण्यात दिसतात " असे म्हटले जाते. अर्थात मुलाचे पाळण्यात हलणारे पाय बघूनच अशी कल्पना करण्यात येते. हळूहळू मोठा होताना त्याचे गुण अधिक लक्षात येत राहतात. मुलं नुसती वयाने आणि वजनाने मोठी झालेली कोणालाही आवडणार नाहीत. त्यांनी वर्तमान आणि भविष्य उजळून टाकावं असं भव्य दिव्य करावं अशी सर्वांचीच इच्छा असते. त्यामुळे प्रेरणा देत देत मुलांचं भविष्य घडवणं हे मोठ्यांचं आद्यकर्तव्य ठरतं. 

          ग्रामीण भागातील मुले विशेषतः तावून सुलाखून निघालेली असतात. विविध संकटांचा सामना करुन वज्रासारखी बनून जातात. गरीबी असली तरी त्यात सुखासमाधानाची भाकरी खाण्यातला आनंद विरळाच. 

          सुर्यकांत चव्हाण हे माझे भावोजी. मोठ्या मामांच्या मोठ्या मुलीचे पती. त्यांचा जन्म हिवाळे गावात झाला. वडिलांच्या तुटपुंज्या मिळकतीत पाच मुलांना उच्च शिक्षण देत मोठं करणं सोपी गोष्ट नव्हतीच. पण शिक्षणच आपणांस चांगले दिवस दाखवू शकतं हा ठाम विश्वास वडिलांनी सदैव बाळगला होता. मुलं मोठी मोठी होत गेली आणि शिक्षण घेता घेता कधी समंजस झाली ते वडिलांनाही कळलं नाही. 

          वडिलांनी मग आपली आणि कुटुंबाची जबाबदारी मोठ्या सुर्यकांतवर सोपवली. सुसंस्काराने वाढलेले झाड वाढायचे थांबत नसते. सुर्यकांत आणि त्यांची भावंडे जिद्दी होती. त्यांनी आपल्यावर आलेली जबाबदारी आनंदाने स्वीकारली.

          वडील आजारी पडले आणि मोठ्या सुर्यकांतने कुटुंबाची स्विकारली. सर्वांची लग्न लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. मोठा असल्यामुळे  स्वतः सुर्यकांत यांचा नंबर होता. माझी मोठी मामेबहिण सुर्यकांत यांच्याशी विवाहबद्ध झाली. 

          घर अगदी जुनेच होते. सुर्यकांत भावोजी कणकवलीत खाजगी नोकरी करत होते. मोठमोठ्या प्रोजेक्टची इंजिनिअरिंग डिझाईन करण्यात ते पटाईत होते. एकदा मला त्यांच्या त्या ऑफिसमध्ये जाण्याचा योग आला होता. तेव्हा मी त्यांचे काम अगदी जवळून पाहिले आहे. खाजगी नोकरी करत असताना एवढ्या मोठ्या कुटुंबाचा गाडा ओढताना त्यांना त्यांच्या भाऊरायांची साथ लाभली. 

          बांदा हायस्कुलमध्ये  सुर्यकांत रुजू झाले. एक भाऊ , एक वहिनी शिक्षिका आहेत. एक भाऊ इलेक्ट्रॉनिक दुकान चालवता चालवता जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. वित्त व बांधकाम सभापती झाले. एक बहिण आरोग्य विभागात नोकरीला लागली. एक बहीण पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये लेक्चरर झाली. सुर्यकांत यांचा सूर्य उगवू लागला होता. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. पत्नीची जबरदस्त साथ त्यांना वेळोवेळी मिळत होतीच. 

          जो प्रामाणिकपणे काम करतो , त्याच्या कार्याचा नक्कीच गौरव होत असतो. सुर्यकांत चव्हाण  बांदा हायस्कुल मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून  या पदावर काम करत असताना त्यांनी स्वतः अनेक प्रयोग करुन पाहिले आहेत. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी जिल्हास्तरावर नंबर यावा लागतो. आपल्या ज्ञानाच्या आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी सहा वेळा राज्यस्तरासाठी निवड झाली एक वेळा राज्यात उत्तेजनार्थ तिसरा क्रमांक व यावर्षी राज्यात तिसरा क्रमांक मिळाला. ही यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. यश मिळवत राहणे हे त्यांच्या रक्तात भिनलेले आहे. कितीही यश मिळवले तरीही त्यांना अहंकार नाही. त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. 

          यावर्षी होणाऱ्या माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत त्यांनी सहभाग नोंदवला आहे. ते उमेदवार जिल्ह्यासाठी इतर मागास प्रवर्गातून(OBC) उभे आहेत. त्यांनी केलेलं शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहेच. त्यांच्या अभिनव ज्ञानाचा उपयोग बँकेच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि पर्यायाने सभासदांच्या विकासासाठी नक्कीच होईल असा विश्वास वाटतो. हा विश्वास प्रत्येक मतदारालाही वाटेल यांत तिळमात्र शंका वाटत नाही. 

          शिक्षक बंधु आणि भगिनींनो , आपण आपल्या एका तळागाळातील कार्यकर्त्याला जिल्हा उमेदवार म्हणून निवडून द्याल आणि बँकेच्या तख्तावर बसवाल अशी कळकळीची विनंती करतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( पदवीधर शिक्षक , शिडवणे नं.१ )





🛑 दारु आणि मी

🛑 दारु आणि मी

          दारुबद्दल लिहायचे असेल तर दारु पिणाऱ्याबद्दल लिहिले पाहिजे असे बिल्कुल नाही.  दारु बनवणाऱ्यांची घरे , दारु विकणाऱ्यांची दुकाने चालली पाहिजेत म्हणून की काय काही लोक त्यांची दया येऊन दारु पित असावेत. तंबाखूमुक्त चळवळ जशी सुरु असते , तशी दारु विरोधी चळवळी सुरु असतात. 

          क्वचित एखादा चित्रपट असेल की ज्यात दारु दाखवली नसेल. आजच्या काळातील प्रत्येक चित्रपटात तिचा बेसुमार वापर केलेला दिसून येतो. सकाळ ते रात्री कोणत्याही वेळीचा प्रसंग असो , त्यात तिला मोठं स्थान दिल्याचं जाणवतं. पुरुषच काय , पण काही चित्रपटात स्त्रिया सुद्धा पिताना दाखवल्या जातात. 

          Drinking of Alcohol is injurious to health असं वाक्य चित्राच्या खाली बारीक अक्षरात लिहायला अजिबात विसरले जात नाही. आता ती मदिरा पिणे ही फॅशन आणि पॅशन झाली आहे. उलट ही मदिरा न पिणाऱ्यांची हसून खिल्ली उडवली जाते. 

          " अहो , महाशय , तुम्ही किती मागे आहात ? जरा पुढे जा आता !!! " हे वाक्य ऐकून जर तुम्ही घ्यायला किंवा प्यायला गेलात तर तुम्ही नक्कीचे पुढे जाणार हे ठरलेले आहे.   हे पुढे जाणं विनाशाच्या दिशेने असणार आहे हेही लक्षात असू द्या. 

          एकदा माझ्या जवळच्या नातेवाईकाच्या लग्नाला चाललो होतो. एसटीतून प्रवास सुरु होता. मला गाडीत दारुचा घाणेरडा वास आला. मी मागे वळून पाहिलं. कोणीतरी हळूच पित असल्याचे समजले. मला तो घाण वास सहन होईना. मी कासावीस झालो होतो. प्रवास कधी एकदा संपतो असे मला झाले होते. मी काहीही करु शकत नव्हतो. शेवटी प्रवास संपल्यावर एसटीतून उतरताच मी सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. 

          हल्ली पिणारी माणसे तिचा घाण वास येऊ नये म्हणून तीव्र वासाचे सेंट लावतात. त्यामुळे आणखी तयार झालेल्या मिश्रित वासाचा सामना करत राहावा लागतो. त्यांना बिचाऱ्यांना सवय झालेली असते , त्यामुळे त्यांना स्वतःला त्याचे काहीच वाटत नसावे. पण त्यांच्या सोबतीने जाण्याचे दुर्भाग्य लाभलं तर काही खरं नाही. 

          आपल्याला तशा अनेक सवयी असतात. त्यापैकी ही पिण्याची सवय असली तर ती घातक असू शकते हे लक्षात घ्यावे. कित्येकांचे संसार या अतिपिण्याने उध्वस्त झाल्याचे मी प्रत्यक्ष बघितले आहेत. दारु पिणाऱ्या माणसाला एकदा दारु पिऊ लागली कि तो माणूस संपलाच असे समजावे. 

          त्यादिवशी एके ठिकाणी एक चांगले इस्त्रीचे कपडे घातलेला चांगल्या घरातील माणूस दारु पिऊन रस्त्यात पडलेला मला दिसला. त्याचा हा अवतार बघून येणारे जाणारे लोक त्याच्याकडे तुच्छतेने बघताना दिसत होते. अगदी मीही. या दारुमुळे माणसाचं एका झटक्यात काय घडते ते पहा. 

          कधीकधी माझी छोटी मुलगी मला म्हणते , "  पप्पा , तुम्ही जर कधी दारु पिऊन घरी आलात ना , तर तुम्हाला मी अजिबात घरात घेणार नाही." तिचंही बरोबर आहे. तिलाही आता अशी माणसं चित्रपटात , यु ट्युबवर दिसत असतात. अशा पिणाऱ्या माणसांचा लहान मूलसुद्धा तिटकारा , तिरस्कार करत असतं हेही लक्षात असू द्या. 

          काही लोक तर सकाळी उठले की त्यानेच तोंड धुतात. उठले की सुटले. जोपर्यंत पित नाहीत , तोपर्यंत त्यांना बरे वाटत नाही. प्यायलेले नसले की ते थरथरत उभे राहतात , पुरेशी प्यायले की नीट उभे राहतात एवढी त्यांना सवय झालेली असते तिची. या सवयीच्या अधीन झालेल्या लोकांचं काय करायचं ते समजण्याच्या पलीकडचे आहे. 

          एकदा एक पोट धरुन हसवणारा नट कणकवलीत येणार होता. आम्ही त्याचे फॅन होतो. अर्धा तास लवकरच आम्ही त्याचा कार्यक्रम बघायला गेलो होतो. अजून तो नट आलाच नव्हता. नंतर कुणीतरी हळूच बोलताना ऐकू आले. तो पीत बसला होता. त्याचे पेग संपल्यावर तो आला. पण त्याचा कार्यक्रम बकवास झाला. पुन्हा तो पित असल्याचे समजल्याने त्याच्याबद्दलचा आमचा आदर कमी झाला तो कायमचाच. 

          काही माणसं पितात , पण अजिबात कळू देत नाहीत. या माणसांचा कोणालाही अजिबात त्रास नसतो. अशा माणसांना अति ताण आणि तणाव असतात , म्हणून ते पितात असे म्हटले जाते. पिल्यामुळे त्यांचा ताणतणाव कुठल्या कुठे पळून जातो असे तेच सांगतात. 

          या जगात ताण तणाव सगळ्यांनाच असतात. म्हणून दारु पिण्याचा मार्ग अवलंबून स्वतः बरोबर कुटुंबाची वाताहात करणे अजिबात समर्थनीय नाही. 

          जगात अशी दुःखी माणसे असंख्य असू शकतात , म्हणून ती सगळी दारु पिणारी आहेत का ? नाही ना ? अशा दुःखाचा सकारात्मक सामना करणाऱ्या माणसांकडे बघून तरी या माणसांनी आपल्या दुष्ट मैत्रिणीची साथसंगत सोडली पाहिजे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



🛑 इस्त्री आणि मी

🛑 इस्त्री आणि मी

          लहानपणीपासून कपड्यांना इस्त्री करण्याची सवय लागली आहे. स्वतःचे कपडे स्वतः इस्त्री करुन घालायचे. त्यावेळी इस्त्री कुठे होती ? पितळेचा तांब्या होता. त्यात पेटते निखारे घालायचे. थोडी फुंकर मारुन निखारे फुलवायचे. तांब्याचा तळ चांगलाच तापतो. त्यासोबत धातूच्या उष्णता संक्रमणामुळे तांब्याच्या तोंडापर्यंत उष्णता जाणवे. हात चांगलेच भाजत. ते भाजू नयेत , म्हणून ' भानशिरे ' घेतले जाई. भानशिरे म्हणजे जुना कापडी सुती फडका असे. तो चुलीवरची भांडी उचलून उचलून काळाकुट्ट झालेला असे. 

          इस्त्री करुन सुरकुत्या घालवून शर्ट , पॅन्ट छान दिसत. शाळेचा गणवेश जुना असला तरी नवीन वाटे. शाळेत जाताना पॉश कपडे घातल्याचा अनुभव येई. इतर मुलांचे नवनवे युनिफॉर्म बघून माझे इस्त्री केलेले कपडेही फिके पडत. 

          इस्त्री करुन करुन कपडे कोरम होत. शर्टाची कॉलर विरघळे. पँटीचा रंग बदलून जाई. पण पँट , शर्ट दोन्ही पूर्ण फाटेपर्यंत वापरावे लागत. उसवले तर बाबा शिवून देत. फाटले तर रिपू करावा लागे. हा रिपू कसातरीच दिसे. तरीही फाटक्या कपड्यांपेक्षा रिपू केलेले कपडे वापरणे केव्हाही चांगले. आता हे फाटलेले कपडे किंवा नको तिथे ठिगळ , रिपू ही फॅशन झाली आहे. 

          तांब्यानंतर बाबांनी हप्त्यावर एक साधी इस्त्री घेतली. तिला विजेची आवश्यकता असे. भाड्याने राहत असल्याने मालकांच्या परवानगीने लाईट वापरावी लागे. या नवीन इस्त्रीने इस्त्री करताना मजा येई. पटापट इस्त्री करता येई. कपडे आणखी चांगले दिसत. मामांकडे आजोळी माझे मामेभाऊ कसे इस्त्री करतात ते मी नीट बघून ठेवले होते. त्या निरीक्षणाचा उपयोग झाला. 

          आम्ही सर्व भावंडे इस्त्री करुनच कपडे वापरत असू. आता ऑटोमॅटिक इस्त्री आहे. ती कमी जास्त करता येऊ शकते. ती हलकी व सहज करता येण्यासारखी सुलभ आहे. 

          इस्त्री करताना आपण इतर काहीही करत नसतो. म्हणून मी नेहमी गाणी ऐकत इस्त्री करत असतो. आता मला ती सवयच जडली आहे. इस्त्री , गाणी आणि मी असे समीकरण झाले आहे. एखाद्या वेळी मी इस्त्री करताना गाणी लावली नाही तर माझ्या मुली मला विचारतात , " पप्पा , आज गाण्याशिवाय इस्त्री करताय , कमाल आहे ? " एवढी मला सवय झाली आहे म्हणजे बघा. 

          इस्त्री करताना मी अनेकदा भूतकाळात जात असतो. जुनी आणि मला नेहमी आवडणारी गाणीच मी ऐकत असतो. त्या गाण्यांचीही सवय झाली आहे म्हणा ना !! ही गाणी ऐकता ऐकता मी भराभर इस्त्री करत जातो. माझ्या आठवड्याच्या कपड्यांचा ढिग पडलेला असतो. 

          सलग दोन तासांचा हा इस्त्रीचा कार्यक्रम गाण्यांसह सुरुच असतो. इस्त्री कपड्यांच्या सुरकुत्या घालवत असते आणि गाणी माझ्या मनावरच्या. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर





Thursday, May 25, 2023

🛑 मोटू और पतलु की जोडी

🛑 मोटू और पतलु की जोडी

          बालपणी साधारण हिंदी भाषा समजू लागल्यानंतर ' लोटपोट ' हे हिंदी बाल मासिक हाती आले. कणकवली एस.टी. स्टँडवर असलेल्या पेपर स्टॉलवर हे मासिक मला पाहायला मिळाले. मी ते एकदा घेतले. त्यातील चित्रे आणि हिंदी भाषा जवळची वाटत गेली. 

          मुखपृष्ठावरील मोटू आणि पतलु या दोन कार्टून्सची चित्रे मला आकर्षित करु लागली होती. हळूहळू ही दोन्ही पात्रे माझे मित्र कधी झाली मला समजलेही नाही. मी वाचत गेलो आणि पुनःपुन्हा वाचतच राहिलो. एखाद्या महिन्यात ' लोटपोट ' आले नाही तर मी खट्टू होऊन परत येत असे.  मासिक वाचताना खरंच मी लोटपोट होऊन जात असे. आता हे मासिक जिओ मॅगझीन यावर ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध आहे. त्याचे वाचन करत गेलात तर तुमची हिंदी नक्कीच सुधारु शकते. 

          लहान मुलांनी अवांतर वाचन करणे ही आजची गरज आहे. आम्ही आमच्या लहानपणापासून ही वाचनाची आवड जोपासली आहे. मिळतील ती पुस्तके वाचून संपवली आहेत. सर्वच पुस्तके आता लक्षातही राहिली नाहीत. मराठीप्रमाणेच हिंदी वाचन करणेही गरजेचे आहे. कारण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. इंग्रजीकडे जास्त लक्ष देण्याच्या हव्यासापोटी हिंदीकडे होत असलेला दुर्लक्ष नाकारुन चालणार नाही. 

          लोटपोट सारखी बालमासिके वाचून आपण आपलं हिंदी भाषेतील ज्ञान वाढवत जाण्याची हिच वेळ आहे. आता सर्वकाही इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे इंटरनेटचा असा फायदा करुन घ्यायला हवा. उगीचच निरर्थक सर्फिंग करणे थांबवायला हवे. सर्वच गोष्टी गुगल करण्याची वाईट सवयसुद्धा सोडून द्यायला हवी. 

          एलईडी टिव्ही नावाच्या आयताकृती वस्तूसमोर बसून संपूर्ण दिवसभर कार्टून्स बघणारी मुले बघितली तर पुढील भावी पिढीची चिंता सतावते आहे. काय करायचं या मुलांचं ? कसं होणार या मुलांचं ? हे आणि असे अनेक प्रश्न प्रत्येक पालकाला पडत असावेत. टिव्ही बंद केला तर , मोबाईल आहेतच. मोबाईलच्या छोट्या स्क्रिनवर डोळे मिचिक मिचिक करत का होईना कार्टून्स आणि रिल्स बघणे सुरुच राहते आहे हा खरा घोळ आहे. 

          एका गोष्टीवर निर्बंध घातले तर दुसरी चुकीची गोष्टच करण्याकडेच मुलांचा कल असतो. त्यांना एखादी गोष्ट करु नका म्हटले तर तीच गोष्ट ती पुनःपुन्हा करत राहतात. मग आपणच कंटाळतो. विषयच सोडून देतो. काय करायचं ते करा असे म्हणत वैतागत आणि चरफडत राहतो. 

          आमच्याकडे बऱ्याचदा ही ' मोटू पतलु' मालिका सुरु असते. त्यातली पात्रं कमालीची आकर्षक आहेत. स्वतः मोटू हा धाडसी आहे. आपल्या ताकदीच्या जोरावर तो कितीही मोठ्या संकटांचा सामना करण्यास पुढे सरसावतो. समोसे खाल्ल्याशिवाय त्याला ताकद येत नाही. तो समोसे कधी चावताना दिसत नाही. तो समोसे गिळतो. आपल्याला असं समोसे गिळंकृत करणं या जन्मात तरी शक्य नाही. 

          पतलु हा त्याच्या नावाप्रमाणे बारीक आहे. तो अतिशय हुशार आहे. त्याने सुचविलेल्या युक्त्या भन्नाट असतात. या दोघांची जोडी म्हणूनच बालांच्याच नव्हे मोठ्यांच्याही मनावर अधिराज्य गाजवत आहे. तुम्ही अगदी कंटाळून घरी आलेले असाल तर ' मोटू पतलु' ही मालिका बघा. तुमचा सगळा शीण कुठल्या कुठे निघून जाईल. 

          त्यांच्यासोबत कायम ' चिंगम ' नावाचा पोलीस अधिकारी असतो. तोही अफलातून कॉमेडी दाखवला आहे. मोटू पतलु या द्वयींच्या मदतीने तो अनेकदा दुष्टांना पकडताना दिसतो. त्याने आपल्या बंदुकीने झाडलेली प्रत्येक गोळी नारळ पाडल्याशिवाय राहत नाही. नारळाचे झाड जवळपास नसले तरी नारळ पडतात त्यामुळे गंमत वाटत राहते. 

          डॉ. झटका यांची संशोधने हटके असतात. प्रयोग करताना होणाऱ्या गमतीजमती पाहताना हसू अजिबात आवरत नाही. ' यार ' हा त्यांच्या तोंडी दिलेला नेहमीचा शब्द तुमच्याही तोंडात कधी येईल ते सांगताही येणार नाही. सोबत घसीटाराम असतो. हे पात्र सुद्धा अवलीच आहे. 

          जॉन आणि त्याच्यासोबत असलेले दोन सहकारी काहीतरी कुरघोडी करण्यात पटाईत असतात. ' जॉन बनेगा डॉन ' असं म्हणत तो मोटू पतलु यांना नामोहरण करण्याचा सदैव प्रयत्न करतात. पण त्यांचे फंडे त्यांच्यावरच उलटतात. त्यामुळे गंमत वाढत राहते. 

          या पात्रांच्या हालचाली मजेशीर असतात. ते आकाशात स्वैरपणे संचार करतात. गाडीखाली सापडले तर त्यांची चपाती होते. पण ते कदापि मरत नाहीत. अशी ही सुखांतिका असलेली बालमालिका अतिशय मनोरंजक आणि हिंदी भाषा बोलण्यास प्रवृत्त करणारी आहे. आपणांस वेळ असेल तर आपणही ही ' मोटू और पतलु की जोडी ' जरुर पाहा आणि हास्याचे फवारे उडवून आपलं रक्त शुद्ध करा. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...