Saturday, August 3, 2024

🛑 ढवणसरांची अकाली एक्झिट

🛑 ढवणसरांची अकाली एक्झिट

        बदली ही शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कधी सुखाची तर कधी दुःखाची गोष्ट बनलेली असू शकते. मला याचा अनेकदा दुःखदायक अनुभव आला आहे. त्यामुळे मी आता बदलीला सकारात्मक पद्धतीने बघू लागलो आहे. 

         काही शिक्षकांच्या बाबतीत खूपच सुखदायक बदल्या होताना मी पाहिल्या आहेत. मी मात्र नेहमीच अडचणींचा सामना करतच बदल्यांना सामोरा जात आलोय. त्यामुळे मला आता त्यांची सवय झाली आहे. पण सर्वांनाच त्यांची सवय होईल याची अजिबात खात्री देता येणे कठीण आहे. प्रत्येकाचा दृष्टिकोन त्याला कारणीभूत असू शकतो. तरीही मनात घडणाऱ्या मानसिक तणावांच्या लहरी थांबवणे हे ज्याला त्याला कसे शक्य होईल हे त्याच्यावर होणाऱ्या प्रसंगानुरूप बदलत राहू शकते. 

         मी कणकवलीत राहणारा असून वैभववाडीतील मांगवली नं.१ शाळेत सात वर्षे अतिशय सुखदायक नोकरी केली आहे. १२० पेक्षा जास्त किलोमीटरचा दैनंदिन प्रवास करुनही शारीरिक, मानसिक तणावावर सात वर्षे राज्य केलं. ऑनलाईन बदली झाली म्हणून आता ६० किलोमीटर अंतरावरची शाळा मला जवळ वाटू लागली आहे. हल्लीच्या मे मधील समुपदेशनात मी बदली झाली नाही म्हणून हसत हसत आलो आहे. हसत यासाठी कारण मला एकही शाळा मिळाली नाही म्हणून मी नकार देऊन पूर्वीचीच शाळा नवीन मिळाल्यासारखा चेहरा करुन दालनाच्या बाहेर पडलो होतो. तुम्ही एकदा नोकरी स्वीकारली की हे असे घडणार याचा कायमच स्वीकार करत राहण्याशिवाय पर्याय नसतो हे मान्यच करायला हवे. असो. 

         लक्ष्मण ढवण सरांची निधनाची बातमी समजली आणि मला त्यांच्याविषयी लिहावेसे वाटले म्हणून मी मध्यरात्री लिहावयास बसलो. मला त्यांच्याविषयी अतिशय आदर आहे. त्यांची आणि माझी वैभववाडी तालुक्यात भेट झाली. माझ्या आणि त्यांच्या मैत्रीला एका तपाचा काळ लोटून गेला आहे. या काळानंतर एक असा काळ त्यांच्यावर येईल असे कधीच वाटले नव्हते. चांगला धटधाकट वाटणारा माणूस अचानक ब्रेन हॅमरेज सारख्या आकस्मिक आजाराने आपल्यातून कायमचा निघून जातो यासारखी वेदनादायक गोष्ट दुसरी असूच शकत नाही. 

         सर्वच माणसांना तणाव असतात. पण कधीतरी अनेक तणावांची बेरीज होऊन वेगळेच विपरीत घडलेले पाहिले की आपणही आता सावधान झाले पाहिजे ही घंटा आपल्या सर्वांच्याच मनात कायम वाजत राहणार आहे. माणूस अतिविचार करु लागला की त्याचे व्यवस्थापन करणे त्याला जेव्हा अजिबात शक्य होत नाही तेव्हा अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता असते. 

         ढवण सर म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. शिक्षक म्हणून त्यांच्यात अनेक उत्तम गुणांचा संगम झालेला होता. शाळेत त्यांचे काम पहात राहण्यासारखे असे. शिक्षक समितीचा खंदा कार्यकर्ता. वैभववाडी तालुक्याची शिक्षक समिती सचिव पदाची धुरा सांभाळत असताना त्यांची इतिवृत्ते मी बऱ्याचदा ऐकली आहेत. ते अभ्यासू होते. त्यांचे बोलणे ओघवते असे. त्यांची संघटनेवर अपार निष्ठा होती. त्यांच्या जाण्याने एक निष्ठावंत कार्यकर्ता आपल्यातून कायमचा हरपला आहे. 

         ते सांगुळवाडी शाळेत असताना कणकवलीत राहत असत. त्यांनी कोकिसरे गावात सुंदर घर बांधले आहे. त्यांच्या घरी मी एकदा गेलो होतो. त्यांच्या स्वतःच्या घराबद्दल खूप सुंदर संकल्पना होत्या. तरीही मुलाच्या शिक्षणासाठी त्यांना कणकवलीत घर घ्यावसं वाटलं. त्यांनी फ्लॅट घेतला. मुलाचं शिक्षण सुरु होतं. त्यांचं वैभववाडी सांगुळवाडी ते कणकवली रोजचं अपडाऊन मी कित्येकदा पाहिलं आहे. मीही त्यांना महिन्यातून सात आठ वेळा तरी सतत सहा सात वर्षे कणकवली ते वैभववाडी किंवा वैभववाडी ते कणकवली येता जाता कधीना कधी टू व्हीलरने नेले आणले आहे. एकटं जाण्यापेक्षा सोबतीला ढवण सरांसारखे सोबती असताना प्रवास कमी वाटत असे. बोलता बोलता कणकवली कधीच येत असे. प्रवास सुखकर होऊन जाई. गजाली मारत असताना त्यांच्यातील आतला आवाज मला खूप काही देऊन जाई. ते खरंच खूप चांगले मित्र आणि मार्गदर्शक होते. वैभववाडीत काही सलग वर्षे त्यांनी पगाराचा खोका सांभाळला होता. आकडेवारीमध्ये त्यांचे ज्ञान आम्हांला लाजवणारे होते. 

        २०१९ मध्ये ऑनलाईन बदल्या झाल्या. मी कणकवली तालुक्यात आलो. त्यांनीही कणकवली तालुक्यातील भरणी नं. १ शाळा निवडली. आता ते कणकवलीत कमी आणि कोकिसरे गावी जास्त जाऊ लागले होते. कितीही काहीही झाले तरी प्रत्येकाला आपला गाव प्रिय असतोच. त्यांचे पुन्हा कणकवली वैभववाडी अपडाऊन सुरु झाले. त्यांना ते त्रासदायक होऊ लागले म्हणून त्यांनी शेर्पे केंद्रशाळेत कामगिरी मागून घेतली. ती आमची केंद्रशाळा असल्यामुळे पुन्हा शिक्षण परिषदेच्या निमित्ताने त्यांच्या भेटी घडत असत. कामगिरी शेवटी कामगिरीच असते. ती कधीच कायमची नसते. त्यामुळे त्यांना पुन्हा भरणी शाळेत हजर व्हावे लागले. मे मधील समुपदेशनात त्यांना वैभववाडीतील शिराळे शाळा प्राप्त झाली होती. पण बदल्या झाल्याच नाहीत. कदाचित त्यामुळेही त्यांचा तणाव वाढला असेल नक्की सांगता येणे कठीण आहे. पण मी त्यांच्या जागी असतो तर मलाही नक्कीच तणाव आला असता. आता मात्र त्यांनी पदवीधर पदावरून पदावनत होण्याचा निर्णय घेतला होता असे समजले. शेवटी माणसं आपला तणाव कमी होण्यासाठीच असं करत असावीत असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांना आता त्यांच्या घरापासून जवळची शाळा मिळत होती असेही ऐकले. त्या शाळेत ते हजर होण्यासाठी जाण्याआधीच जर त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होऊन त्यातच त्यांची वणवण कायमची संपणार असेल तर देव खरंच आहे का हा मला प्रश्न पडतो. सर्वांना आवडणारं व्यक्तिमत्व देवालाही आवडतं आणि तो त्यांना आकस्मिक घेऊनही जातो तेव्हा माझ्यासारख्या अनेकांच्या मनाला खूप खोलवर वेदना होतात. 

         ढवणसर आता मला कधीही भेटणार नाहीत याचं अपार दुःख आहेच. कदाचित त्यांनाही माहित नसेल की त्यांना अचानक असे काय झाले ते. मृत्यूदेवतेनं इतकं कठोर वागायला नको होतं. माझ्या बाबांना, आईला आणि पत्नीलाही तिनं असंच अकाली नेलं आहे. नियती, प्राक्तन  आणि जे जे लिहिले भाळी वगैरे ऐकून ऐकून कानांचे पडदे फाटले आहेत. 

         आदरणीय कै. ढवण सरांच्या पवित्र मृतात्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबल





1 comment:

  1. जवळपास दीड वर्षे सरांसोबत आचीर्णे घाणेगड येथे काम केले. सर नेहमीच आपुलकीने वागायचे. त्या दीड वर्षांत सरांकडून खूप काही शिकायला मिळालं. सरांचा स्नेह, आपलेपणा करून घेणारा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत नेहमीच लक्षात राहील.

    भावपूर्ण आदरांजली!

    ReplyDelete

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...