Showing posts with label शैक्षणिक. Show all posts
Showing posts with label शैक्षणिक. Show all posts

Wednesday, April 12, 2023

🛑 Tag's Swag

 🛑 Tag's Swag


          2018 पासून ब्रिटिश कौन्सिल अंतर्गत शिक्षक उपक्रम समूह बनविण्यात आला. मी त्यावेळी वैभववाडी तालुक्यातील मांगवली नं.१ शाळेत होतो. आम्हाला मंगला कदम या अत्यंत हुशार अशा टॅगच्या समन्वयक होत्या. त्यांची शिकविण्याची शैली समजून सांगण्याची होती. अध्यापनात जास्तीत जास्त इंग्रजीचा वापर करण्याचे कौशल्य त्यांनीच आम्हाला शिकवले. आम्ही त्यापूर्वीही इंग्रजी शिकवीत होतोच. पण त्यांच्या सुचनांनी आम्ही विशेषतः  प्रभावित होत गेलो. मनात इंग्रजी बोलण्याची भीती पाठ सोडायला तयार नव्हती. या भीतीला सोबत घेऊनच शिक्षक असूनही सामोरा जात होतो. 

अर्थात ही भीती फक्त मलाच होती असे नसावे. ती प्रत्येकाच्या मनात होती. पण कोणीही स्पष्ट बोलताना दिसत नव्हते. आम्ही सगळे विद्यार्थी म्हणून शिकत असताना पाचवीपासून इंग्रजी शिकलो होतो. आता पहिलीपासून इंग्रजी सुरु झाले होते. सेमी इंग्रजीचे वारे सगळीकडेच वाहू लागल्यामुळे आम्हीही त्यासोबत वाहण्याचा प्रयत्न करत होतो. प्रयत्न सफल होताना दिसत होते. महिन्यातून एक दिवस इंग्रजी शिकविणारे प्रत्येक शाळेतील एक किंवा दोन शिक्षक आमच्यासोबत इंग्रजी बोलण्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत होते. 

आम्ही सगळे भाषांतर पद्धतीने इंग्रजी शिकलेले होतो. त्यामुळे मराठीत विचार करुन इंग्रजीत बोलण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू असताना होणाऱ्या चुकांना हसण्याशिवाय पर्याय नव्हता. मजा येत होती ती आमच्या फजितीची. हळूहळू आत्मविश्वास वाढताना दिसत होता. दोन ते तीन टॅग मिटिंग झाल्यानंतर त्यात भर पडली. वर्गातही जाणीवपूर्वक इंग्रजी विषयाकडे लक्ष देणे सुरु झाले. शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांची यादी तर दररोज वाढत चाललेली दिसत होती. नवीन आलेली धोरणे राबवण्याची इच्छा असूनही इंग्रजी सराव कमी पडताना दिसत होता. शिक्षक संख्याही कमी कमी होत सहाची तीन झाली. काम तेवढेच होते. सहांनी करायची कामे तिघांना करताना दमछाक होत होती. टॅग मिटिंग झाल्यानंतर प्रभावित झालेले सगळे शिक्षक शाळेत आणि वर्गात जाताच टॅगला विसरुन जुनुच पद्धती वापरताना दिसत होते. पुन्हा भाषांतर पद्धती वापरण्याशिवाय पर्यायच दिसत नव्हता. अखेर बदलीची ऑर्डर आली. शिडवणे नं. १ शाळा मिळाली. नवीन शैक्षणिक वर्षात पुन्हा टॅग मिटिंग सुरु झाली. साळीस्ते केंद्रात दोन केंद्रांची टॅग अनुभवताना विविध शिक्षकांचे इंग्रजीवरील प्रभुत्व पाहून विलक्षण प्रभावित होत गेलो. आपणही अधिक प्रभुत्व मिळवावे असे वाटत होते. इंग्रजी ऱ्हाईम्स पाठ होत्या. पण त्यापुढे जाणं ही काळाची गरज होती. टॅग समन्वयक गोविंद वावदाने यांनी अजिबात मराठी बोलायचे नाही असे निक्षून सांगितले होते. सलग तीन तास फक्त ऐकायचे आणि बोलायचे होते. नवीन उपक्रमात सहभागी व्हायचे होते. आपण बोलताना कमी पडू याची भीती सतत सतावत होती. पण त्यामुळे जास्त वाचन करायला हवे याचीही जाणीव डोके वर काढत होती. 

वावदाने सरांच्या नियोजनपूर्वक टॅग मिटिंगमुळे इंग्रजी बोलण्याचा जास्त सराव झाला. तरीही मराठीत विचार करुन बोलण्याची सवय काहीकेल्या जात नव्हती. वर्गातही इंग्रजी शिकवताना मराठीचा वापर करणे कमी होतच नव्हते. पण दर महिन्याला होणाऱ्या टॅग मिटिंगमुळे अजून आत्मविश्वास वाढला. कधीकधी टॅग मिटींगला जायला मिळाले नाही. त्यामुळे तोटाच झाला असे म्हणायला हवे. आमचे हे शैक्षणिक नुकसान कधीही भरुन निघणारे नाही. वावदाने सरांनी नेहमीच सर्व शिक्षकांना इंग्रजी बोलण्यासाठी वाव दिला. त्यांना इंग्रजी विषयाचे गोविंद म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

पुन्हा एकदा खारेपाटण आणि शेर्पे केंद्राच्या संयुक्त टॅग मिटिंग होऊ लागल्या. तिथेही पुन्हा नवे शिक्षक शिक्षिका इंग्रजी बोलताना पाहून त्यांच्यासोबत बोलण्याचा सराव होऊ लागला. ऊन , पाऊस , थंडी काहीही असले तरी टॅग काही थांबली नाही. कोरोना काळातही ग्रुपवर चर्चा सुरु असे. कोरोना असतानाही ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन पद्धतीने टॅग करणे आम्हाला योग्य वाटले. घाबरत घाबरत आम्ही दोन पेक्षा जास्त टॅग पूर्ण केल्या. कोरोनाची आणि इंग्रजीची दोन्हींची भीती कमी कमी होऊ लागली. यात आम्हाला प्रोत्साहन देणारे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबलसर आणि नवे केंद्रप्रमुख संजय पवार यांचाही वाटा आहे. शेर्पे केंद्राची वैयक्तिक टॅग सुरु झाल्यानंतर प्रत्येकाचा सहभाग वाढत गेला. तरीही मराठीत विचार करुन इंग्रजीत बोलणे सुरुच आहे. मराठी , हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांचे अध्यापन करताना होत असलेली नेहमीचीच कसरत अशीच पुढे चालू राहणार आहे. पण टॅग आणि टॅग समन्वयक यांच्या मार्गदर्शनाने इंग्रजीच्या ज्ञानात पडलेली ही भर कधीही कमी न होणारी आहे. प्रत्येक शिक्षकाने इंग्रजीत विचार करता करता बोलण्याचा सराव करायलाच हवा. इंग्रजी साहित्य वाचायला हवे. इंगबंराजी ऐकायला हवे. इंग्रजी वर्तमानपत्र वाचायला हवे. इंग्रजी बातम्या समजल्या नाही तरी ऐकत राहत अर्थ समजून घेत राहायला पाहिजे. या सरावाने मनातील इंग्रजीच्या भीतीला पळवून लावण्याचे सामर्थ्य आहे.आपल्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी सुधारायचे असेल तर प्रथम सर्व शिक्षकांनी आपले स्वतःचे इंग्रजी सुधारायला हवे. मग बघा , प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी दोन्ही न घाबरता इंग्रजी बोलू लागतील. हा क्षण प्रत्येक शिक्षक आपल्या जीवनात आणेल तो क्षण विद्यार्थी आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत भाग्याचा असेल यात कोणतीही शंका नाही. 


Ⓒ प्रवीण अशितोष कुबल ( पदवीधर शिक्षक ) शाळा शिडवणे नं. १


Sunday, March 19, 2023

संप आणि कंप

        १४ मार्चपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु झालाय. आज सहावा दिवस संपत आलाय. तरीही संप मिटण्याचं चिन्ह दिसत नाहीय. मीही या संपात सहभागी आहे. वाटलं होतं , संप सुरु केला कि एक दोन दिवसांत तो मिटेल. आज आणि पुढेही सगळेच सरकारी कर्मचारी आपल्या ' एकच मिशन , जुनी पेन्शन ' या मागणीवर ठाम आहेत. 
        सरकारने २००५ नंतर नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ' कुटुंब निवृत्ती योजना ' पुनरुज्जीवित केली आहे. तशीच ' जुनी पेन्शन ' सुरु करावी ही सर्व कर्मचाऱ्यांसाठी असलेली हक्काची मागणी अजून प्रलंबित ठेवली जात आहे. 
        मी एक पदवीधर शिक्षक आहे. कोरोना काळात शाळा बंद असतानाही मी चेकपोस्टवर जास्तीत जास्त वेळा ड्युटी केलेली होती. शिकवणेही सुरु होतेच. कामाचे सहा तास असताना चोवीस तास काम करावे लागत होते. मुलं अंतर ठेवून शिकत होती , तरीही शिक्षण सुरु होते. आज मात्र मी शाळेत नाही. संपात सहभागी आहे. त्यामुळे मुलांच्या पासून दूर झालो आहे. मुलांवर त्याचा कितपत परिणाम झाला आहे हे सांगू शकत नाही. पालकांवर किती परिणाम झाला आहे हेही मला सांगता येणे कठीण आहे. घरात बसून संपाच्या संदर्भातील बातम्या बघण्याचे काम नित्याचे झाले आहे. त्याचाही कंटाळा आलाय. काय करावे ते समजत नाहीय. अजून किती दिवस संप सुरु राहील याचाही अंदाज बांधता येत नाहीय. 
        मी २००५ पूर्वी नोकरीला लागलेला शिक्षक आहे. मला पेन्शन मिळणार याबद्दल खात्री आहे. पण २००५ नंतर आणि पुढेही नोकरीला लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरी संपल्यानंतर न मिळणाऱ्या आर्थिक सुरक्षिततेविषयीबद्दल असलेला हा लढा आहे. कधीकधी लढा दिल्याशिवाय मागण्या मान्य होत नाहीत. म्हणून नाईलाजास्तव संपाचे हत्यार उपसावे लागते. लोकांचे , मुलांचे , रुग्णांचे होणारे हाल बघून व्यथित व्हायला होत आहे. बातम्या बघता बघता डोळ्यात पाणी येऊ लागले आहे. संपकऱ्यांच्या अंगात कंप येऊ लागलाय. 
        घरात कधीही निवांतपणे न बसणारे माझ्यासारखे अनेक सरकारी कर्मचारी हवालदिल झाले असतील अशी मी कल्पना करतो आहे. पेपर वाचूनही संपला आहे. पुस्तके वाचायलाही मन लागत नाहीय. शाळेतील मुले बंड करुन डोळ्यासमोर उभी राहिली की काय करावे तेच समजत नाही. बायको , मुले आणि कुटुंबातील सर्वांनाच आपण पूर्वीसारखेच हसतखेळत आहोत असा खोटा अभिनय करावा लागतोय. सामाजिक उपक्रमात भाग घेतानाही कधीतरी एका क्षणी मन सुन्न एकाकी बनू पाहत आहे. घरातले काय बोलत आहेत , त्याकडे नीटसा लक्षही नाही. त्यांचं बोलणं कानावर आदळलं की तो डीजेचा आवाज वाटत आहे. शिक्षक म्हणून नेहमी आपल्याला बोलण्याची सवय. आताशा मला सर्वांचं ऐकावं लागत राहण्याची जणू शिक्षाच मिळाली आहे असंही वाटतंय. संप संपेपर्यंत माझ्यासारखा विचार करणाऱ्या शिक्षकांचे काय होईल माहिती नाही. संयम सुटत चाललेला नसला तरीही सहनशक्ती कमी होत चालली आहे. त्याचं रुपांतर गप्प गप्प राहण्याकडे जाईल अशीही भीती वाटतेय. 
        कोणीही सोबत नसलं तर आपला मोबाईल आपली साथ करतो. सध्या तोही गपगार झालाय. त्याला स्वीच ऑफ ठेवून ' डिजिटल उपास ' करावा असाही एक विचार येऊन जातोय. मुख्यमंत्र्यांच्या खचाखच भरलेल्या सभा टीव्हीवर पाहताना ते आमच्या संपाचा विचार करत असावेत का ? असाही प्रश्न पडलाय. संपाबद्दलची अनेकांची नकारात्मक विचारसरणी ऐकून ऐकून कान बहिरे होऊ पाहत आहेत. काय ऐकावं तेच कळेनासे झालेय. रडू येतंय , पण डोळ्यांतून एक टिपूस पाणी येईल तर शपथ !! झोपही धड लागत नाहीय. झोप लागलीच तर स्वप्नातही संपाची धडधड सुरु आहे. अचानक जाग आलीच तर पुन्हा संप सर्व शरीर कंपित करत आहे. 
        ५४ दिवसांचा संप करणाऱ्या आमच्या पहिल्या पिढीतील कर्मचाऱ्यांचा इतिहास पाहिला तर तो आम्हांला थक्क करुन सॊडणारा आहे. त्यांच्यात एवढा संयम कोठून आला असावा ? हा संयम आमच्यात का नाही ? आम्ही आजची पिढी का इतक्या लवकर ढेपाळतोय ? त्या शिक्षकांनी आमच्यात स्वाभिमान पेरला होता. त्यांचा आम्हांला सार्थ अभिमान आहे. तरीही त्यांच्याइतके आम्हांला संयमाने नक्कीच जगता येणं कठीण आहे. सगळे लोक पगाराच्या नावाने बोलत सुटले आहेत. किती दिवस , किती सुट्ट्या यांचा हिशेब घालून दाखवू लागले आहेत. सरकारी नोकरी करणं ही अवघड गोष्ट नसली तरी सोपी नाही हे यांना कोण सांगणार ? आलेल्या आदेशांचे पालन करत राहणं हेच आयुष्यभर करत राहणारे आम्ही , स्वतःचं घर , कुटुंबही विसरत चालतो आहोत. सरकारसाठी प्रामाणिकपणाने नोकरी करायची आणि सर्वांचं बोलूनही घ्यायचं असं सध्या सुरु आहे. हे कधीही न संपणारं आहे. नकारात्मक आणि आम्हाला लागेल असे बोलणाऱ्यांना बोलताना काहीच वाटत नाही. कदाचित त्यांच्या घरी एकही शासकीय कर्मचारी नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना असं बोलणं सुचू शकतं. 
        काहीही झाले तरी आमच्या अठरा लाखांची संख्या असणाऱ्या सर्व संपकरी शासकीय कर्मचाऱ्यांना धन्यवाद देण्यापेक्षा त्यांच्या कायम ऋणात राहायला हवे. ' काम नाही तर दाम नाही ' असे शासनाच्या म्हणण्यानुसार दररोजच्या आर्थिक उत्पन्नावर पाणी सोडणाऱ्या सर्वांना माझा मानाचा मुजरा. 
© प्रवीण अशितोष कुबल ( कणकवली ) 



        

Thursday, December 8, 2022

🔴 कुप्पम ज्ञानम खुप्पम : भाग १

🔴 कुप्पम ज्ञानम खुप्पम : भाग १

          कुप्पम येथील अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन अंतर्गत प्रशिक्षणाचा पहिला दिवस अतिशय प्रेरणादायी ठरला. हे बघू की ते बघू असे प्रत्येकाला झाले होते. आदल्या दिवशीचा प्रवासाचा शीण कधीच निघून गेला होता. सगळीकडे वैज्ञानिक रचना दिसू लागल्या होत्या. 

          172 एकर जमिनीच्या मोठया प्रदेशात आमचं प्रशिक्षण सुरु झालं होतं. अगस्त्या फाऊंडेशनच्या रेखाचित्राने आकर्षित व्हायला झाले. त्यात मोबाईल लॅब , सायन्स सेंटर , सायन्स फेअर , लर्निंग मेथड्स , टिचर ट्रेनिंग , कॅम्पस इत्यादींचा उल्लेख करण्यात आला होता. म्हणजे हे सर्व आम्हाला चार दिवसांत बघायला मिळणार होते. 

          मानवता , आत्मविश्वास , कुतूहल या तीन गोष्टी नजरेसमोर ठेवून शिक्षण , संस्कार आणि संसार निर्माण करणं अगस्त्याला अतिशय गरजेचं वाटलं. 

          " आ , आहा आणि हाहा " या तीन शब्दांनी आश्चर्य , मनोरंजन आणि आता मला खरे काय ते समजल्याची भावना प्रगट होते. 

          ज्ञानरचना संकल्पना सांगणारा ज्ञानरचनावाद सगळीकडे ओसंडून वाहताना दिसत होता. " जाऊ तिथे शैक्षणिक वैज्ञानिक पाहू" असंच काही तिथलं शैक्षणिक वातावरण दिसत होतं. फुलपाखरांनी बागेत उडावं आणि पकडणाऱ्यांना हे पकडू की ते पकडू असं वाटावं असा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा ' आहा आणि हाहा ' खूप काही सांगून जात होता. प्रत्येक गोष्टीत ज्ञानाची रचना कशी करावी याचे धडे प्रत्येकाच्या डोक्यात धडाधड आपटत होते. 

          दररोज सकाळी 7 वाजता राहत्या खोलीच्या तळमजल्यावर गरमागरम ग्रीन टी येत होता. चालत्या जमिनीवर पानांचे ठसे कोरलेले दिसत होते. प्रत्येक इमारतींची नियोजनपूर्वक बांधणी केलेली दिसून येत होती. या इमारतींना दिलेली नावेही आमचं लक्ष वेधून घेत होती. मल्लिका , नथीनी , रजनीगंधा अशी ती नावे होती. आम्ही नथीनीमध्ये राहत होतो. मल्लिकामध्ये जेवत होतो. प्रत्येक ठिकाणी दगडांचे आकार बनवून त्यातून वैशिष्टयपूर्ण आकार बनवलेले होते. फुलझाडे , शोभेची झाडे , औषधी झाडे सगळीकडे विखुरलेली होती. आम्हांला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. 

          ट्रेनिंग सेंटरवर प्रवेशद्वारापाशी सुंदर दगडी  पार्श्वभूमी असलेला सेल्फी पॉईंट कमालीचा लक्षवेधी होता. तिथेच एक निरुपयोगी रबरी टायरपासून बनवलेला हत्ती शांतपणे आम्हांला पाहात आहे असे वाटत होते. गुरु शिष्य परंपरा सांगणारी उठावाची भित्तिचित्रे सेल्फी घेण्यास आकर्षित करणारी होती. ' जाऊ तिथे एक सेल्फी घेऊ ' असं प्रत्येकाला वाटत असतानाच त्यांच्याकडून सेल्फी घेण्याचा मोह आवरता येत नव्हता. पिण्यासाठी गरमागरम पाण्याचीही सोय अगस्त्याने केली होती. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची त्यांनी घेतलेली काळजी उल्लेखनीय अशीच होती. दररोज दिले जाणारे बदलते जेवणाचे , नाश्त्याचे मेनू चविष्ट असेच. वर्गात कंटाळा न येणारी मार्गदर्शने म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच. 

          प्रशिक्षण कक्षात पहिले पाऊल टाकताच एका मॉडेलवर प्रत्येकाची नजर फुलपाखरांसारखी भिरभिरली. त्यावर लिहिलं होतं , " Butterfly makes the world beautiful , Acharya Initiative makes Teaching beautiful. " याचा अर्थ असा आहे , " फुलपाखरं जसं आपलं जग सुंदर बनवतात , तसंच हे प्रशिक्षण शिक्षकांचं शिकवणं सुंदर बनवते. "

          सर्व शिक्षक प्रशिक्षण घेण्यासाठी आतुर झाले होते. स्वागत समारंभ संपन्न झाला. अगस्त्या टीमने फाऊंडेशनची संक्षिप्त ओळख करुन दिली. व्हिडीओ क्लीपचे सादरीकरण करण्यात आले. तज्ज्ञांनी आपली ओळख करुन दिली. त्यानंतर चार दिवसांत करावयाचे " डूज अँड डोंट्स " समजावून सांगण्यात आले. एका वर्गाचे तीन वर्गात विभाजन करण्यात आले. प्रत्येक वर्गाला वेगळी खोली देण्यात आली. आईस ब्रेकिंग उपक्रम घेऊन यलो , ग्रीन , रेड , ब्लू , व्हायलेट असे पाच ग्रुप बनवण्यात आले. प्रत्येक सदस्याने आपल्याला मिळालेल्या फुग्याला फुगवून त्या रंगाची वैशिष्ट्ये सांगितली. त्यासोबत आपला परिचय दिला. इथूनच ज्ञान रचनावाद सुरु झाला. 

          सुधाकर सर आणि विजयाशांतीमॅडम यांनी आमच्या वर्गाचा ताबा घेतला. इंग्रजीचा जास्तीत जास्त वापर आणि हिंदीचा आवश्यक वापर करत मार्गदर्शन सुरु झाले. पूर्वचाचणी घेण्यात आली. वर्ग कशाप्रकारे घेण्यात येणार ते स्पष्ट करण्यात आले. उद्दिष्टे सांगण्यात आली. त्यानंतर चहासाठी विश्रांती घेण्यात आली. 

          कागदी कपात ओतप्रोत पाणी भरुन त्यांवर येणाऱ्या ताणाचे निरीक्षण करण्यात आले. ड्रॉपरने हळूहळू पाण्याचे थेंब अलगद टाकताना पाण्याचा दंडगोलाकार पृष्ठभाग पाहता आला. त्यानंतर त्यात बॉल बेरिंग टाकण्यात आले. नव्यान्नव बॉल टाकेपर्यंत पाणी सांडले नाही हे विशेष होते. त्यामुळे दिसणे आणि प्रत्यक्ष असणे यांत फरक असतोच याची जाणीव झाली. शाळेतील मुलांकडून असे छोटे छोटे प्रयोग करुन घेतल्यास त्यांच्या मेंदूतील ज्ञानाची रचना अधिक दृढ होण्यास नक्कीच मदत होऊ शकते हे विश्वासही या प्रयोगाने सर्वांना दिला. 

          त्यानंतर भोजनासाठी ' मल्लिका ' येथे नेण्यात आले. सर्वांनी चवदार व गरमागरम भोजनाचा यथेच्छ आस्वाद घेतला. अगस्त्याने प्रत्येक शिक्षकाला एक पर्यावरणप्रेमी हँडबॅग भेट दिली. ती घेऊन फिरताना आपण विज्ञान गणित शिक्षक असल्याची अधिक जाणीव झाली. सात भौमितिक आकारांपासून एक एक वेगळी भौमितिक आकृती बनवण्यास शिकलो. आपणही विद्यार्थी बनलो आहोत आणि विद्यार्थी राहूनच आपल्याला आजन्म अध्ययन , अध्यापन करत राहायला हवे हा दृष्टीकोन निर्माण झाला. 

          सायंकाळी कला दालनात नेण्यात आले. मुलांनी बनवलेली अनेक हस्त कला प्रदर्शन रुपात मांडण्यात आल्या होत्या. त्या सर्वांना नीट बघण्यास वेळ पुरत नव्हता. हे सर्व कला कौशल्य डोळ्यात आणि मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्याचे कार्य सातत्याने सुरुच होते. सुरु झालेला दिवस संपूच नये असे प्रत्येकालाच वाटत होते. 

          रात्रीच्या भोजनानंतर खोलीत गेल्यावर अंथरुणावर पडल्या पडल्या कधी झोप आली ते समजलेही नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )





Friday, November 25, 2022

🛑 होईल समदं ठिक

 🛑 होईल समदं ठिक


          कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण आम्हां सर्व शिक्षकांसाठी महत्त्वाचे होते. नेरुर माड्याची वाडी माध्यमिक विद्यालयातील एक दिवस सर्वच उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला असेल. माझ्यासाठीही हा प्रशिक्षण दिवस अनमोल असाच होता. 

          प्रत्येक तालुक्यातील दहा निवडक शिक्षकांची निवड करण्यात आली होती. तसं पाहिलं तर सगळेच शिक्षक निवडकच असतात. त्यातून निवडून काढणं जिकिरीचे काम असावे. किंवा स्वतःहून प्रशिक्षणाला जाणारे मोजके असावेत. कारण प्रशिक्षण करण्यापेक्षा शाळेत काम करणं काही शिक्षकांसाठी अधिक महत्त्वपूर्ण असतं. अर्थात सर्व शिक्षक हे शाळेत शिकविण्यासाठीच असतात , तरीही शाळेचा एक एक दिवस विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोलाचा असतो. आपल्या वर्गशिक्षकांची ते आतुरतेने वाट पाहत असतात. 

          प्रत्येक शिक्षकासाठी प्रशिक्षण हे नवनवीन अनुभवांची शिदोरी उघडण्यासारखं असतं. ते उघडून बघितल्याशिवाय आणि त्याचा परिपूर्ण आस्वाद घेतल्याशिवाय त्याची चव कशी समजणार ? जेवणात विविध प्रकारच्या संतुलित आहाराचे सेवन करताना जशी तृप्ती होते , तसा तृप्तीचा ढेकर कालच्या प्रशिक्षणात घेता आला. 

          प्रारंभीच माड्याची वाडी शाळेच्या वाद्यचमूने केलेलं उत्साहवर्धक स्वागत  भारावून टाकणारं होतं. अतिथींचं असं झालेलं स्वागत आमच्यासाठी तसं नवीन नव्हतं. आतापर्यंत आम्ही पदाधिकारी , अधिकारी यांचं स्वागत केलं होतं , आज आमचं असं धुमधडाक्यात झालेलं स्वागत भाव खाऊन गेलं. 

          सिंधुदुर्ग शिक्षण विभाग , माड्याची वाडी शिक्षण संस्था आणि भगीरथ प्रतिष्ठान यांच्या वतीनं घेतलं गेलेलं कौशल्य विकासाचं प्रशिक्षण प्रत्येक शिक्षकाला खूप अनुभुती देऊन गेलं. असं आगळं आणि वेगळं प्रशिक्षण कदाचित प्रत्येक शिक्षकाच्या आयुष्यातील पहिलंवहिलं आणि अविस्मरणीय असावं असं म्हटलं तरी वावगं ठरु नये. 

          औपचारिक स्वागतासाठी जास्त वेळ खर्च न करता प्रत्यक्ष प्रशिक्षणाला आरंभ झाला. माड्याची वाडी विद्यालयाने केलेले शैक्षणिक प्रयोग व व्यावसायिक होण्याचे धडे देणारी संस्कार शाळा पाहून सगळे शिक्षक अचंबित झालेले दिसले. विद्यालयाचे सर्व विद्यार्थी , शिक्षक आणि कर्मचारी आपापलं दिलेले काम मनापासून करत होते. प्रत्येकाचं सादरीकरण आत्मविश्वासयुक्त होतं. त्यात नाटकी भाव अजिबात नव्हता. येथील सर्व शिक्षक मुलांकडून हे सर्व कधी करुन घेतात हा प्रश्न आम्हां प्रत्येकाला पडला. कार्यानुभव विषयांच्या तासिका एकत्र करुन शुक्रवारी आणि शनिवारी जास्तीचा वेळ देऊन हे सर्व उपक्रम राबवले जातात. शाळेचा एक ठराविक वेळ असला तरी अभ्यासक्रम पूर्ण करुनच या उपक्रमांची नियोजनपूर्वक अंमलबजावणी केली जाते हे विशेष आहे. 

          या कार्यशाळेत शाळेने केलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. मधुमक्षिका पालन प्रत्यक्ष दाखवण्यात आले. शाळेतील दोन मुलींनी मधमाश्यांना न घाबरता त्याचे सादरीकरण केले होते. त्यांना प्रशिक्षित करणाऱ्या चेंदवणकरसरांसारखी माणसं या क्षेत्रात कार्यरत असतील तर मुलांचं व्यावसायिक प्रशिक्षण खऱ्या अर्थाने होऊ शकतं. टाकाऊ पासून टिकाऊ हे ब्रीदवाक्य मानून केलेलं वेल्डिंगचं कामही तसंच. आय बी टी च्या माध्यमातून मुलांना प्रशिक्षित करताना शाळेतील अभ्यासात हुशार नसणाऱ्या पण व्यावसायिकतेकडे वळू शकणाऱ्या ऐशी टक्के पटसंख्येचा केलेला विचार अतिशय योग्य वाटतो. नोकरीसाठी शिक्षण घेण्यापेक्षा स्वतः व्यावसायिक होऊन दुसऱ्यांना नोकरी देणारं शिक्षण इथं दिलं जातं. 

          इथल्या स्वच्छता गृहातही भिंतींवर गणिताची महत्त्वाची सूत्रे प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारी अशीच. खाद्यपदार्थ विभागातील प्रत्येक पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवलेले. स्थानिक जत्रेतील त्यांचे स्टॉल्स शाळेचं आर्थिक उत्पन्न आणि विद्यार्थ्यांचं अर्थार्जनाचं ज्ञान वाढवणारे आहेत. एकदा का या मुलांचा व्यवसायातील आत्मविश्वास वाढला की ही मुले आयुष्यात कधीही कमी पडू शकणार नाहीत हा आत्मविश्वास देणारे शिक्षक या शाळेला लाभले आहेत हे नाकारुन चालणार नाही. गुरुने दिलेला ज्ञानरुपी वसा ही मुले पुढे पुढे नक्की चालवतील याचीही खात्री झाल्याशिवाय राहत नाही. 

          मुलांनी केलेली हस्तकला , आधुनिक शेतीतील केलेले विविध नवनवीन प्रयोग पाहून हे बघू की ते बघू असे होऊन गेले. हे सगळं एका दिवसांत पाहत असताना त्याचं ऑटोमॅटिक ट्रेनिंग आमच्या मेंदूत नोंद होत गेलं. 

          डॉ. प्रसाद देवधर यांनी केलेले भगीरथ प्रयत्न येथे अधोरेखित करणारे आहेत. प्रत्येक उपलब्ध वस्तूचा केलेला जाणीवपूर्वक वापर हे त्यांच्या यशाचं गमक आहे. आपणही असा विचार केला तर आपल्याला जमू शकतं हा विश्वास या प्रशिक्षणानं प्रत्येकाला दिला. 

          प्रत्येक शिक्षकाला यात बोलतं करताना त्यांच्याकडून अपेक्षित काढून घेण्याची कला डॉ. देवधर यांनाच जमू शकते. त्यांनी खूप कमी वेळेत ते दाखवून दिले आहे. ठरवलं तर शिक्षकच ही गोष्ट करु शकतात यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. या विश्वासाकडे त्यांनी जास्त लक्ष दिलेलं होतं. काही शिक्षकांनी आपल्या सादरीकरणात केलेलं विश्लेषण नवनवीन अनुभवांची भर घालणारं होतं. कमी निधीचा कसा छान वापर करता येतो हेही त्यांनी सांगत असताना त्यांचे प्रत्यक्ष अनुभव खूप शिकवून जाणारे होते. 

          यावर खूप लिहिण्यासारखे असले तरी हे प्रशिक्षण एका छोट्या लेखात बंदिस्त होणारे नक्कीच नाही. माननीय शिक्षणाधिकारी धोत्रे साहेबांनी दिलेली प्रेरणा प्रत्येक शिक्षकाला अनमोल असणार आहे. ' एक कौशल्यपूर्ण दिवस ' असंही  शीर्षक या दिवसाला शोभू शकतं. प्रशिक्षणात भेटलेले सर्वच घटक एकमेकांमध्ये तरतरी पेरण्याचं काम करुन गेले हे या प्रशिक्षणाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. 

          मी घरी आलो , तेव्हा टीव्हीवर एक मालिका सुरु होती. त्यात एका बाळाचा जन्म झाला होता. बाळ हलत नव्हतं. श्वास घेत नव्हतं. त्याची आई डोळ्यांत पाणी आणून आपलं बाळ रडण्याची वाट बघत होती. दवाखान्यातील त्या प्रसंगी घरातील सारं कुटुंब बाळाला निश्चेष्ट पाहून पार हबकून गेलं होतं. आणि प्रत्येकानं बाळाच्या पायांना हात लावून म्हणायला सुरुवात केली होती , " होईल समदं ठिक " . बाळ काही सेकंदात पाय हलवू लागलं होतं. तोंड उघडून चिमुकलं तोंड उघडू लागलं होतं. बाळ एक दीर्घ श्वास घेऊन मोठ्यांदा रडू लागलं तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहू लागले होते. 

          आमच्या समोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना असं जागं करण्याचं काम आपलं आहे , ते जागं करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते. आपण सर्व शिक्षकांनी आपल्या समोर असलेल्या मुलांसाठी असंच कौशल्यपूर्ण काम करण्याचं कौशल्य अंगी बाळगणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि ही गरज प्रत्येक शिक्षकाला वाटेल तेव्हा प्रत्येक शाळा माड्याची वाडी झाल्याशिवाय राहणार नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल , कणकवली 

( 9881471684 )
















































































🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म           "आपल्यामध्ये धर्म आचरणाचा गुण असायला हवा," असे माझी आजी नेहमी सांगायची. ती केवळ सांगायची...