Thursday, July 23, 2026

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

          "आपल्यामध्ये धर्म आचरणाचा गुण असायला हवा," असे माझी आजी नेहमी सांगायची. ती केवळ सांगायची नाही, तर स्वतः तसे जीवन जगत होती. ती सातत्याने दानधर्म करायची. परिस्थिती अत्यंत गरिबीची होती, तरीही तिचे मन मात्र एखाद्या राजासारखे दानशूर होते. रोज कोणाला ना कोणाला काही ना काही मदत केल्याशिवाय तिचा दिवस जात नसे.

          आमचे घर अगदी खेड्यातले... मातीचे ते छोटेसे घर! पण त्या घरात आमचे सगळे कुटुंब अत्यंत आनंदात आणि प्रेमात एकत्र राहायचे. माझी आजी जे असेल त्यात कायम समाधानी असायची. पोटी जन्माला आलेल्या आपल्या नवरत्नांना तिने अतिशय कष्टाने आणि प्रेमाने सांभाळले. हे करत असतानाच, घरावरून जाणारे-येणारे पांथस्थ (प्रवासी) तिच्या हातची उकडी पेज आणि मीठ-भाकरी खाऊन तृप्तीचा ढेकर देऊन जायचे. तिने केलेल्या याच पुण्याची गोड फळे आज आम्ही सगळे भोगत आहोत. आम्ही तिला मायेने 'म्हातारी आये' म्हणत असू.

          नुकतीच मी युट्यूबवर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यावर आधारित एक लघुपट (Short Film) पाहिली. त्यात एका खानावळ चालवणाऱ्या मुलाची गोष्ट होती. त्याचे वडील गोंदवलेकर महाराजांचे परमभक्त होते. ते सतत ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामाचा जप करत असत. त्यांची वही या जपाने पूर्ण भरून गेली होती. पण काही काळाने ते ब्रह्मलीन झाले. वडिलांनंतर मुलाने खानावळ चालवायला घेतली; परंतु वडिलांचे विचार आणि आचरण मुलाला अजिबात मान्य नव्हते. वडिलांनी हयातीत खानावळीच्या बाहेर एक पाटी लावली होती— ‘भुकेलेल्याला कधीही नाही म्हणायचे नाही.’ पण मुलाने वडिलांच्या पश्चात ती पाटी काढून टाकली आणि तिथे ‘आज रोख, उद्या उधार’ अशी पाटी लावली. एवढेच नाही, तर कालच्या उरलेल्या वरणाला पुन्हा फोडणी देऊन शिळे अन्न गिऱ्हाइकांना देण्याइतकी त्याची वृत्ती घसरली होती.

          एकदा त्याच्या खानावळीत एक वृद्ध बाबा आले. त्यावेळी मुलगा एकटाच तिथे होता. त्या वृद्धाने आपल्याला खूप भूक लागल्याचे सांगून जेवणाचा आग्रह धरला. मुलाने नाइलाजाने कालच्या शिळ्या वरणाला फोडणी देऊन त्यांना खायला दिले. त्या म्हाताऱ्या बाबांनी पहिल्याच घासात अन्नाची बदललेली चव ओळखली. त्यांनी त्या मुलाच्या वडिलांच्या हाताच्या चवीचे आणि त्यांच्या अन्नदान धर्माचे कौतुक केले. जेवून झाल्यावर बाबांनी पैसे काढले, पण मुलाने पैसे घेण्यास नकार दिला. म्हणून त्या वृद्धाने मुलाच्या हातात एक जपमाळ दिली आणि ते निघून गेले.

          ते वृद्ध बाबा गेल्यानंतर मुलाने सहज म्हणून वडिलांची ती नामावळीची वही उघडली. तो पाने चाळू लागला. वहीच्या शेवटच्या पानावर वडिलांनी लिहून ठेवले होते— ‘महाराज, तुम्ही माझ्या खानावळीत कधीतरी जेवायला या...’

         आणि आज प्रत्यक्ष श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजच त्या वृद्धाच्या रूपात त्याच्या खानावळीत जेवून गेले होते! हे लक्षात येताच तो मुलगा अवाक झाला, त्याचे डोळे उघडले. पश्चात्तापाने भरलेल्या मनाने त्याने पुन्हा आपल्या वडिलांचा तोच अन्नदानाचा वारसा आणि आचरण स्वतः सुरू केले.

          देव किंवा संत कुठे वेगळे नसतात; आपल्या रोजच्या आयुष्यात भेटणाऱ्या माणसांमध्येच ते वसलेले असतात. आपल्याला फक्त ते ओळखता आले पाहिजे!

         माझ्या आजीने हा भाव अगदी पक्का ओळखला होता. म्हणूनच, आजिबात अतिशयोक्ती नाही—आजही तुम्ही आमच्या गावाकडच्या घरी गेलात, तर जेवल्याशिवाय किंवा तृप्त झाल्याशिवाय बाहेर पडूच शकत नाही. आजीने पेरलेला हा अन्नदानाचा आणि अतिथीसत्काराचा वारसा आमच्या घरात आजही तितक्याच श्रद्धेने सुरू आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो.

🔹 लेखन : प्रवीण अशितोष कुबल, कणकवली




No comments:

Post a Comment

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म           "आपल्यामध्ये धर्म आचरणाचा गुण असायला हवा," असे माझी आजी नेहमी सांगायची. ती केवळ सांगायची...