Showing posts with label या लाडक्या मुलांनो. Show all posts
Showing posts with label या लाडक्या मुलांनो. Show all posts

Sunday, September 8, 2024

🛑 पाहिला गजानन

🛑 पाहिला गजानन

         आपला गणपती पाहिला कि आपलं मन भरुन येतं. गणपती चित्रशाळेत ऑर्डर दिल्यापासून आपलं गणपतीवर लक्ष असतं. आपला गजानन सुस्वरूप दिसावा ही आपल्या घरातील सर्वांचीच तीव्र इच्छा असते. 

          चित्रशाळेत सर्वांचे गणपती असतात. पण आपला गणेश सर्वांचे लक्ष वेधून घेणारा असायला हवा असं प्रत्येकाला वाटतं. आपला गणपती आपल्याला खूप खूप आवडतो. अर्थात सर्वांचेच गणपती सुंदरच असतात, पण आपला गणपती आपल्या मनात भरलेला असतो. 

          माझे बाबा गणपती सुंदर बनवत. असे हे सुंदर गणपती पाहण्यासाठी दररोज आमच्या चित्रशाळेत झालेली गर्दी मी प्रत्यक्ष पाहिली आहे. सुबक गणपती होईपर्यंत बाबा गणपती बाजूला करत नसत. बाबांच्या समोर प्रत्येक गणपती येणारच असे. तो अधिक सुंदर होऊन जाताना बाबांनी त्यात आपला जीव ओतलेला असे. त्यांचे निरीक्षण अफलातून होते. एकही चूक कधीही त्यांच्या नजरेतून सुटत नसे. त्यामुळे गणपती घेऊन जाणारे लोक खुश होऊन जात. पाच पन्नास रुपये जास्त देऊ शकणाऱ्यांपेक्षा खुश होऊन जाणारे लोक बाबांना आणि आम्हांलाही जास्त आवडत. 

          बाबांची गणपतीची शाळा पुढे चालू राहावी ही सर्वांचीच इच्छा आहे. बाबा गेल्यानंतर चित्रशाळेतील त्यांची उणीव कधीही भरुन न येणारी. त्यांची जागा काका, बाला आणि भाऊ यांनी घेतली आहे. हे तिघेही दिलेली जबाबदारी अधिक गंभीरपणे पेलत आहेत ही विशेष नमूद करण्यासाठी गोष्ट आहे. मी त्यांच्यात कोणत्याही प्रकारे इंटरफियर करीत नाही. 

          गणेश चतुर्थीचा दिवस आमच्यासाठी ' गाजावाजा ' असणारा दिवस असतो. गणपती न्यायला येणारे लोक आपल्या सोबत संपूर्ण कुटुंबाला घेऊन येत असतात. गणपती वाहून नेण्यासाठी ते गाड्या घेऊन येतात. काही वेळा वाजंत्री मंडळेही घेऊन येतात. अशी मज्जा असणारा हा दिवस पुन्हा येण्यासाठी एक वर्षभर वाट पाहावी लागते. आम्ही गणपतीच्या शाळेचे मालक आहोत हा आमचा अभिमान असतो. हा अभिमान आमच्या कुटुंबातील महिलांना सुद्धा द्यायला हवा. आमच्या घरातील माझ्या बहिणी गायत्री, तृप्ती यांनी गणपतींना अधिक उत्तम दिसण्यासाठी केलेले सजावट काम बघत राहावे असेच असते. 

          गणपतींच्या यादीत आमच्या गणपतीचे नाव ' घरचा गणपती ' असे लिहिलेले असते. सगळ्यांचे गणपती घरपोच गेले कि आमच्या घरच्या गणपतीचे आगमन होण्याची वेळ येते. घरातील मुले माणसे यासाठी आतुर झालेली असतात. शेवटी गणरायाचे आगमन होते. सुस्वरूप तेजस्वी दृष्टीने आमच्याकडे पाहणारा आमचा गणराय आमच्याकडे पाहू लागतो. त्याने प्रत्येकाकडे पाहत राहावे असे आमच्या सतत मनात असते. आम्ही समोर जिथे उभे राहू, तिथून तो आमच्याकडेच बघतोय असा आमचा गणपती असतो. 

          आरती सुरु झाली. आरती म्हणजे बाबांचा आवडता विषय. दुपारी आणि रात्री जोशात आरती झालेली बाबांना हवी असे. आज बाबा नाहीत म्हणून मला आरती घ्यावी लागली. आरती घेण्याचा बाबांचा पहिला मान. यंदा ही पहिली चतुर्थी असेल ज्या दिवशी बाबा नाहीत. बाबा आरतीत दंग होऊन जात. आरतीचे स्वर बाबांनी ऐकले आणि बाबा पहिल्या आरतीला आले. आले म्हणजे माझ्या वहिणीच्या अंगात आले. माझ्या हातातील आरती गरम झाली होती, चटके बसू लागले होते. तरीही मला तशीच गरम आरती त्यांच्या हातात द्यावी लागली. बाबांनी थरथरत्या हातांनी आपल्या गणपतीला ' आरती ' ओवाळली आणि आपला सुंदर गजानन पाहिला. आम्ही आमचा गजानन पाहिलाच, पण बाबांनीही तो पाहिला याचा आनंद सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणून गेला. 

 ©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शिडवणे नं. १

🛑 तू बुद्धी दे या बालका

🛑 तू बुद्धी दे या बालका

          चतुर्थीला शाळेला सुट्टी असते. गणपतीच्या येण्याची सर्वांना आतुरता असते. शाळेतील मुलांना तर ती खूपच असते. ती तर गणपती सुट्टीची वाटच बघत असतात. सुट्टी पडते एकदाची. मुलांचा आनंद गगनात मावेनासा झालेला त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. हा मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तर गणेशाचे आगमन झालेले असते. 

          शाळेत शिक्षकांनी अभ्यास दिलेला असतो. मुलांना अभ्यास हवा सुद्धा असतो आणि नको सुद्धा असतो. शाळेत असताना अभ्यास हवा असतो , पण एकदा घरी गणपती आला की या दिलेल्या अभ्यासाचे त्यांना ओझे वाटू लागते. हल्ली दप्तराचे ओझे होते म्हणून तोलून मापून भरलेले दप्तर शाळेत आणावे लागते. ते ओझेच नको म्हणून दहा दिवस शनिवारी ' दप्तराविना ' शाळा उपक्रम सुरु केला आहे. मुलांना ' आनंददायी शनिवार ' च्या रुपाने अधिक ज्ञान मिळवण्याची संधी मिळालेली आहे. मुलांनी या संधीचे सोने करायला हवे. 

          काही शाळांमध्ये दर व्हेकेशनला प्रिंटिंग अभ्यास दिलेला असतो. मुलांनी घरी काहीतरी वाचन करावे, लेखन करावे, उदाहरणे सोडवावीत अशी माफक अपेक्षा असते. या सरावामुळे मुले नियमित वाचत लिहत रहावीत हा उद्देश असतो. हा उद्देश काही मुले संपूर्णपणे अभ्यास करुन पूर्ण करतात. काही मुले त्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. त्यांना या उपक्रमशील अभ्यासाचे ओझे वाटते. 

          गणपती ही बुद्धीची देवता आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना गणपतीची आराधना केली जाते. या गणनायकाची मुले जितकी भक्ती करतील तितकी अभ्यासावरची त्यांची पकड घट्ट होत जायला हवी आहे. केवळ भक्ती करुन उपयोगाची नाही. शाळेत दिलेला अभ्यास करणारी मुले गणपतीला जास्त आवडतील. पाठांतर तर आजकाल लुप्त होत चालले आहे. मुलांनी विविध गोष्टी, कथा, कविता, गाणी पाठ कराव्यात. आरत्या पाठ करुन न बघता म्हणाव्यात. या पाठांतराचा उपयोग पुढे भाषण करताना नक्की होणार आहे. निबंध लिहिताना , स्वतःचे मनोगत व्यक्त करताना नक्की होणार आहे. 

          मुलांनो, म्हणूनच मी तुम्हाला प्रेमाची विनंती करतो की कोणत्याही सुट्टीत दिलेला अभ्यास हा सरावासाठी दिलेला असतो. तो केल्याने तुम्ही अभ्यासाच्या प्रक्रियेत राहता. तुम्ही शाळेत नुकताच शिकलेला अभ्यास अधिक लक्षात ठेवू शकता. तुमची स्मरणशक्ती वाढते. तुमचे सर्व पाढे पाठ असतात, त्यामुळे गुणाकार, भागाकार या मूलभूत क्रिया करताना तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही. 

          माझ्या लाडक्या मुलांनो, सुट्टी ही तुमच्यासाठी मौजेची असली तरी तिचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी नक्की करा. वाईट गोष्टी सतत खुणावत राहतात. त्या तुम्हाला कराव्याशा वाटतात, पण त्यांना तुम्ही बाय बाय म्हणा. चांगल्या गोष्टी शिका, नवीन गोष्टी आत्मसात करा. हे गणपतीदेवा, माझ्या मुलांना चांगली बुद्धी दे अशी मी तुझ्याकडे प्रेमळ मागणी करीत आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

 मुख्याध्यापक , शाळा शिडवणे नं.१

Tuesday, April 23, 2024

परीक्षा संपल्या , आत्ता मज्जा

     नुकत्याच परीक्षा संपल्या आहेत आणि सुट्ट्या सुरु होण्याचा हंगाम सुरु झाला आहे. मार्च , एप्रिल हे दोन महिने परीक्षांचे महिने म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या दोन महिन्यांची संपण्याची वाट सर्वच परीक्षार्थी करत असावेत. 

    आम्ही त्यावेळी परीक्षांच्या दिवसांत खूप अभ्यास करत असू. नेहमी पुस्तकांच्या सानिध्यात राहत असू. पुस्तके म्हणजे पाठ्यपुस्तके. ही पाठ्यपुस्तकेच आमचे मित्र झालेले होते. त्यांचा सहवास सतत लाभण्याचे ते दिवस आठवले की मस्त वाटते. 

    आता मुले अभ्यासाचा कंटाळा करताना दिसतात. पुस्तकांचा सहवास तर त्यांना नकोच असतो. काही अपवाद सोडले तर अनेकांना परीक्षेपुरता अभ्यास करताना पाहून खूपच वाईट वाटते. आजची मुले फक्त परीक्षार्थी झाली आहेत की काय ? परीक्षा आल्या कि अभ्यास करायचा एवढेच त्यांचे म्हणणे असते. वाचन करायला सांगितले तर त्यांना झोपा येतात. अभ्यासाची पुस्तके वाचणे तर त्यांच्या जीवावरच येते. 

    आज प्रसार माध्यमे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यावर अनेक प्रकारचे लिखाण उपलब्ध असते. मुलांना हे सर्व प्रकारचे वाचन करण्याची अनमोल संधी असते. 

Sunday, July 30, 2023

🛑 एक घास पप्पांचा

🛑 एक घास पप्पांचा

          बालपणी बालभारतीच्या पुस्तकात ' पेरुची फोड ' असा एक धडा होता. त्यात " पेरुची फोड , लागते गोड "  असे म्हटले होते. त्यापुढे असेही म्हटले होते , " आईची फोड , फारच गोड ". खरंच या दोन्हींमधील पुढची ओळ जास्त लक्षात राहते. कारण ती आईने दिलेली फोड आहे. 

          प्रत्येक मुलांचे आपल्या आई बाबांवर निरतिशय प्रेम असते. आईला भेटण्यासाठी मुले आतुर झालेली असतात. शाळेतून घरी येताच आम्ही पहिल्यांदा आईला कडकडून मिठी मारत असू.  ही मिठी आता मिळत नाही , कारण आईच नाही. 

          आई जशी महत्त्वाची असते , तसे बाबाही महत्त्वाचे असतात. आई प्रेमळ असते. बाबा शिस्तीचे असतात. कधीकधी याउलट असू शकते. काहीवेळा दोन्ही पालक प्रेमळ आणि शिस्तप्रिय असू शकतात. त्यांनी तसेच असायला हवे असते. मुलांसाठी आणि मुलांच्या संगोपनासाठी हे सर्वच आवश्यक असते. 

          आई मुलांना भरवते. मुले कितीही मोठी झाली तरी आईबाबांसाठी लहानच असतात. बाबा मुलांना मारतात , तेव्हा आई रडणाऱ्या मुलांना जवळ घेते. हे जवळ घेणे त्यावेळी दिलासा देणारे असते. मला आईने क्वचितच मारले असेल. बाबांचा मार अनेकदा खाल्ला आहे. अजूनही त्यांच्या शब्दांचा मार मिळत असतो. बाबांनी मारल्यानंतर आम्हाला आईचा आधार असे. तिच्या पदरात लपताना जी प्रेमाची ऊब मिळे ती कुठेच मिळणार नाही. 

          माझे आजोबा भरपूर जेवत असत. त्यांच्या जेवणातील एखादा घास मिळण्यासाठी माझे बाबा आसुसलेले असत असं ते सांगतात. माझी आजी तर खूपच प्रेमळ आणि धार्मिक होती. तिने कुठूनही आणलेला खाऊ सर्वांना समान मिळण्यासाठी तिची धडपड असे. लग्न होऊन मुले बाळे झालेल्या मुलांनाही ती लक्षात ठेवून खाऊचा वाटा देत असे. तिच्या निस्सीम मायेची तुलना करणे चुकीचे ठरेल. तिने आम्हाला घास भरवले आहेत. कालवलेला घास तिच्या हाताने खात असताना ती स्वतः सुद्धा आपल्या तोंडाचा ओ करत असे. त्यावेळी तिच्या सुरकुत्या आलेल्या हातांची सैल झालेली कातडी एकत्र करुन तिच्याशी मी खेळत बसलो तरी ती काहीही म्हणत नसे.

          आईने आणि बाबांनीही मला भरवले आहे. मी रात्री , मध्यरात्री अचानक घायाळ पडत असे. मी घामाघूम होई. तेव्हा आईबाबा दोघेही माझ्या जवळ बसून भरवू लागत. त्यावेळी मिळत असलेल्या प्रेमाने मी आणखीच घायाळ होऊन जाई. 

          आता मीही तीन मुलींचा बाबा झालो आहे. मला त्या पप्पा म्हणतात. तिन्ही मुली पप्पांच्या एखाद्या घासासाठी टपलेल्या असतात. मुले कितीही मोठी होत असली तरी आईबाबांसाठी लहानच असतात. त्यादिवशी माझी दोन नंबर मुलगी हट्टच धरुन बसली. मी जेवत होतो. तिला माझ्या जेवणातला एक घास हवा होता. माझे बाबा जवळच होते. मी जेवत असताना त्यांचे माझ्या जेवण्याकडे लक्ष असते. ताटातील भाजी , भाकरी संपत असली तर ते आपल्या सुनेला सांगत असतात. मी मागण्यापूर्वी माझ्या ताटात संपलेला पदार्थ यायला हवा यासाठी त्यांचा हा अट्टाहास असतो. त्यांना मी कितीही सांगितले तरी त्यांनी त्यांची ही सवय अजिबात सोडलेली नाही. 

          मी माझ्या तिन्ही मुलींना एक एक घास भरवू लागलो. मी भुकेलेला असलो तरी त्यांच्या मुखात जसा घास जाई , तशी माझे पोट भरत असल्याचा अनुभव येत जाई. पप्पांनी भरवलेला घास छोटा असला तरी तो त्यांच्यासाठी नेहमीच भारावलेला असतो अगदी आमच्या आईबाबांसारखा. 

©️ प्रवीण कुबलसर



Wednesday, July 12, 2023

🛑 रमला वाचनमेळा

🛑 रमला वाचनमेळा

          वाचन करणे ही आपली संस्कृती बनली पाहिजे. वाचनाची चळवळ जोपासणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. मुले आणि काही मोठी माणसेही मोबाईल वाचतात. हा मोबाईल वाचणे म्हणजे अनेक मानसिक रोगांना आमंत्रण देणे आहे. त्यापेक्षा पुस्तके वाचणे कधीही चांगले. त्यात मध्येच काहीतरी अनाहूत येत नाही. आपल्या वाचनाचा लक्ष दुसरीकडे वळत नाही. 

          मुलांना वाचनासाठी उद्युक्त करणं हे तसं सोपं काम नसलं तरी अवघड मुळीच नाही. पुस्तकं त्यांच्या आजूबाजूला दिसायला हवीत. ही आकर्षक पुस्तकेच त्यांना आकर्षित करु शकतात. फक्त ही पुस्तके त्यांच्या नजरेच्या कक्षेत ठेवायला हवीत. 

          दुपारी शाळेचे माध्यान्ह भोजन संपन्न झाले. मुले जेवल्यानंतर या वर्गातून त्या वर्गात उगीचच फिरताना दिसत होती. कोणी कोणाची पाठ धरत होतं. कोणी काहीबाही करताना दिसत होती. दप्तरातील पुस्तके त्यांची वाट पाहत होती. ती दप्तरात किंवा कपाटात बंद होती. बिचारी हिरमुसली होती. आपल्याला कोणी वाचत नाही म्हणून त्यांचे नाराज होणे साहजिकच होते. 

          मी हळूच कपाट उघडले. त्यातली कदाचित नाराज झालेली पुस्तके मी बाहेर काढली. मुलांना व्हरांड्यात बोलवून घेतले. एकेका मुलाला आकर्षक मुखपृष्ठ असलेले पुस्तक देताना मला खूपच आनंद होत होता. मी काहीतरी वाटतोय हे बघून हळूहळू सगळी मुले माझ्याकडे पुस्तके मागायला आली. मी आपला पुस्तके काढून काढून वाटतच राहिलो. 

          मुलांनी जागा मिळेल तिथे फतकल मारुन बसणे पसंत केले. पुस्तकातील चित्रे बघताना त्यांचे चेहरे मी बघत होतो. पुस्तकं वाचनाचा हा आगळा वेगळा वाचनमेळा पाहून मलाही माझ्या बालपणीची आठवण येऊन गेली. आम्ही त्यावेळी खूप वाचन करीत असू. शालेय पुस्तकांव्यतिरिक्त अवांतर वाचनाची आवड आम्हांला या पुस्तकांनीच लावली होती. हल्लीच्या मुलांना मोबाईलचे आकर्षण असल्यामुळे त्यांना पुस्तकांविषयीचे आकर्षण वाटत नसावे. 

          नुकताच पहिलीत प्रवेश घेतलेला सार्थक माझ्याकडे आला. तो म्हणाला , " सर , मला पुस्तक द्या. " मी त्याला चित्रांचे छान पुस्तक दिले. त्याने त्यातली सर्व चित्रे भराभर बघून घेतली. थोड्याच वेळात तो धावतच माझ्याकडे आला. म्हणाला , " सर , आता दुसरं पुस्तक द्या. " मी त्याला म्हटलं , " अरे सार्थक , हेच पुस्तक पुन्हा पुन्हा वाच. नंतर आणून दे. " तो तयार नव्हता. ते पुस्तक माझ्या हातात कोंबत तो म्हणाला , " सर , मी पहिलीत आहे. मला हे पुस्तक वाचता कुठे येतंय ? " त्याचे अगदी बरोबर होते. मी त्याला दुसरे पुस्तक दिले. तो ते नवे पुस्तक घेऊन धूम पळाला आणि परत आपल्या जागेवर जाऊन त्यातील चित्रे डोळे फाडून कुतूहलाने वाचताना दिसला. 

          इतर मुलेही असेच काहीसे करत होती. माझा वेळ मात्र सार्थकी लागला होता. नाराज झालेली पुस्तकं पुन्हा हसताना दिसत होती. असा हा वाचनमेळा मुलांसाठी पर्वणीच ठरला होता. मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून असे अनेक उपक्रम अनेक शाळांमध्ये सुरुच असतात. हा उपक्रम त्यांच्यासाठी किंवा माझ्यासाठी नवा नाही , पण मुलांसाठी मात्र नक्कीच वाचनवेडा आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर
















Monday, June 5, 2023

🛑 गोष्टींचा तास

🛑 गोष्टींचा तास

          माणसांना गोष्टी खूप आवडतात. गप्पा मारता मारता त्यातून कधी कधी गोष्टींची निर्मिती होते. जुन्या गोष्टी ऐकताना त्या ऐकत राहाव्यात असे वाटत राहते. गोष्टींचा कधी कंटाळा येत नाही. 

          गोष्टी सांगणारा म्हणजेच स्टोरीटेलर. त्याला गोष्ट कशी वाढवावी हे माहिती असते. गोष्टींमध्ये रंगत आणणे ही एक कला आहे. गोष्ट सांगणे आणि गोष्ट खुलवून सांगणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गोष्ट खुलवून सांगता यायला हवी. 

          आपल्या समोर असलेल्या मुलांचा वयोगट लक्षात घेऊन गोष्टींची निवड करावी लागते. त्यातील विविध उदाहरणे देताना ती त्यांच्या परिचयाची हवीत. तर ती मुलांच्या हृदयाचा ठाव घेतात. मुलांचं लक्ष एकाग्र करणं ही आजच्या काळातील अतिशय अवघड गोष्ट होऊन बसली आहे. त्यांना त्यांच्या बालविश्वात फिरवून आणण्याची कला स्टोरीटेलरमध्ये असावी लागते. 

          मुलांना बोलते करत , त्यांच्याशी त्यांच्या वयातील होऊन संवाद साधला तर मुले पटकन एकरुप होतात असा अनुभव आहे. त्यांना प्रेरणा देत गोष्ट पुढे घेऊन जायला लागते. त्यांच्या बालमनावर आघात करणारी गोष्ट सांगणे बरोबर नसते. डोळ्यांतून पाणी आणणारी गोष्ट सांगितली तरी हल्लीच्या मुलांच्या डोळ्यांतून पाणी आणताना स्टोरीटेलरच्या डोळ्यांतून पाणी येऊ शकते. मुलांच्या संवेदना कमी झाल्यात की काय असा प्रश्न पडतो. 

          विष्णु शर्माच्या पंचतंत्रातील नितीपर गोष्टी आम्हाला त्यावेळी खूपच आवडत. आम्ही त्या पुनःपुन्हा वाचत असू. इसापची इसापनीती आम्हाला नीती शिकवून गेली. त्यातील प्राणी , पक्षी आमचे मित्र झाले. 

          श्यामची आई हे सानेगुरुजींचं पुस्तक आमच्या नितांत आवडीचं होतं. ते कितीवेळा वाचलं असेल ते सांगता येत नाही. पुनःपुन्हा वाचण्याइतकी या पुस्तकाची स्टोरी आहे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी तर तिला ' आईचं महान आणि मंगल स्तोत्र '  म्हटले आहे. 

          मुलांची श्रवण क्षमता म्हणजेच ऐकण्याची क्षमता अधिक विकसित होण्यासाठी , शब्दसंग्रहात भर पडण्यासाठी सकस गोष्टींची खूप गरज असते. मुलांना पूर्वी आजोबा , आजी गोष्टी सांगत असत. आज या गोष्टींची मुलांना उणीव भासू लागली आहे. मग मुलांना युट्युबवर ' आजीच्या / आजोबांच्या गोष्टी ' शोधाव्या लागत आहेत. या संस्कारी गोष्टी शोधता शोधता दुसरेच काहीतरी निकृष्ट दर्जाचे सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संस्कारक्षम वयात मुलांनी काय बघावे आणि काय बघू नये हेही आता पालकांच्या हातात राहिलेले नाही. जे दिसेल ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा मोबाईलमधील डेटा संपेपर्यंत मुले नुसते पाहात आणि ऐकत आहेत. काय चांगले आणि काय वाईट ते समजून सांगताना पालकांनी माघार घ्यायला सुरुवात केलेली दिसते आहे. 

          जुन्या बालभारतीच्या पुस्तकांमध्ये खूप चांगले धडे होते. त्या गोष्टीच होत्या. त्यांचे आपण अजूनही वाचन करताना खूप आनंद होतो. ही पुस्तके बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यांचा वापर मुलांनी , पालकांनी आणि विशेषतः शिक्षकांनी करायला हवा. दिवसभरातील हा गोष्टींचा हा एक तास मुलांचा त्रास कुठल्या कुठे पळवून लावील हे नक्की. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , शिडवणे नं.१

Thursday, May 25, 2023

🛑 मोटू और पतलु की जोडी

🛑 मोटू और पतलु की जोडी

          बालपणी साधारण हिंदी भाषा समजू लागल्यानंतर ' लोटपोट ' हे हिंदी बाल मासिक हाती आले. कणकवली एस.टी. स्टँडवर असलेल्या पेपर स्टॉलवर हे मासिक मला पाहायला मिळाले. मी ते एकदा घेतले. त्यातील चित्रे आणि हिंदी भाषा जवळची वाटत गेली. 

          मुखपृष्ठावरील मोटू आणि पतलु या दोन कार्टून्सची चित्रे मला आकर्षित करु लागली होती. हळूहळू ही दोन्ही पात्रे माझे मित्र कधी झाली मला समजलेही नाही. मी वाचत गेलो आणि पुनःपुन्हा वाचतच राहिलो. एखाद्या महिन्यात ' लोटपोट ' आले नाही तर मी खट्टू होऊन परत येत असे.  मासिक वाचताना खरंच मी लोटपोट होऊन जात असे. आता हे मासिक जिओ मॅगझीन यावर ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध आहे. त्याचे वाचन करत गेलात तर तुमची हिंदी नक्कीच सुधारु शकते. 

          लहान मुलांनी अवांतर वाचन करणे ही आजची गरज आहे. आम्ही आमच्या लहानपणापासून ही वाचनाची आवड जोपासली आहे. मिळतील ती पुस्तके वाचून संपवली आहेत. सर्वच पुस्तके आता लक्षातही राहिली नाहीत. मराठीप्रमाणेच हिंदी वाचन करणेही गरजेचे आहे. कारण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. इंग्रजीकडे जास्त लक्ष देण्याच्या हव्यासापोटी हिंदीकडे होत असलेला दुर्लक्ष नाकारुन चालणार नाही. 

          लोटपोट सारखी बालमासिके वाचून आपण आपलं हिंदी भाषेतील ज्ञान वाढवत जाण्याची हिच वेळ आहे. आता सर्वकाही इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे इंटरनेटचा असा फायदा करुन घ्यायला हवा. उगीचच निरर्थक सर्फिंग करणे थांबवायला हवे. सर्वच गोष्टी गुगल करण्याची वाईट सवयसुद्धा सोडून द्यायला हवी. 

          एलईडी टिव्ही नावाच्या आयताकृती वस्तूसमोर बसून संपूर्ण दिवसभर कार्टून्स बघणारी मुले बघितली तर पुढील भावी पिढीची चिंता सतावते आहे. काय करायचं या मुलांचं ? कसं होणार या मुलांचं ? हे आणि असे अनेक प्रश्न प्रत्येक पालकाला पडत असावेत. टिव्ही बंद केला तर , मोबाईल आहेतच. मोबाईलच्या छोट्या स्क्रिनवर डोळे मिचिक मिचिक करत का होईना कार्टून्स आणि रिल्स बघणे सुरुच राहते आहे हा खरा घोळ आहे. 

          एका गोष्टीवर निर्बंध घातले तर दुसरी चुकीची गोष्टच करण्याकडेच मुलांचा कल असतो. त्यांना एखादी गोष्ट करु नका म्हटले तर तीच गोष्ट ती पुनःपुन्हा करत राहतात. मग आपणच कंटाळतो. विषयच सोडून देतो. काय करायचं ते करा असे म्हणत वैतागत आणि चरफडत राहतो. 

          आमच्याकडे बऱ्याचदा ही ' मोटू पतलु' मालिका सुरु असते. त्यातली पात्रं कमालीची आकर्षक आहेत. स्वतः मोटू हा धाडसी आहे. आपल्या ताकदीच्या जोरावर तो कितीही मोठ्या संकटांचा सामना करण्यास पुढे सरसावतो. समोसे खाल्ल्याशिवाय त्याला ताकद येत नाही. तो समोसे कधी चावताना दिसत नाही. तो समोसे गिळतो. आपल्याला असं समोसे गिळंकृत करणं या जन्मात तरी शक्य नाही. 

          पतलु हा त्याच्या नावाप्रमाणे बारीक आहे. तो अतिशय हुशार आहे. त्याने सुचविलेल्या युक्त्या भन्नाट असतात. या दोघांची जोडी म्हणूनच बालांच्याच नव्हे मोठ्यांच्याही मनावर अधिराज्य गाजवत आहे. तुम्ही अगदी कंटाळून घरी आलेले असाल तर ' मोटू पतलु' ही मालिका बघा. तुमचा सगळा शीण कुठल्या कुठे निघून जाईल. 

          त्यांच्यासोबत कायम ' चिंगम ' नावाचा पोलीस अधिकारी असतो. तोही अफलातून कॉमेडी दाखवला आहे. मोटू पतलु या द्वयींच्या मदतीने तो अनेकदा दुष्टांना पकडताना दिसतो. त्याने आपल्या बंदुकीने झाडलेली प्रत्येक गोळी नारळ पाडल्याशिवाय राहत नाही. नारळाचे झाड जवळपास नसले तरी नारळ पडतात त्यामुळे गंमत वाटत राहते. 

          डॉ. झटका यांची संशोधने हटके असतात. प्रयोग करताना होणाऱ्या गमतीजमती पाहताना हसू अजिबात आवरत नाही. ' यार ' हा त्यांच्या तोंडी दिलेला नेहमीचा शब्द तुमच्याही तोंडात कधी येईल ते सांगताही येणार नाही. सोबत घसीटाराम असतो. हे पात्र सुद्धा अवलीच आहे. 

          जॉन आणि त्याच्यासोबत असलेले दोन सहकारी काहीतरी कुरघोडी करण्यात पटाईत असतात. ' जॉन बनेगा डॉन ' असं म्हणत तो मोटू पतलु यांना नामोहरण करण्याचा सदैव प्रयत्न करतात. पण त्यांचे फंडे त्यांच्यावरच उलटतात. त्यामुळे गंमत वाढत राहते. 

          या पात्रांच्या हालचाली मजेशीर असतात. ते आकाशात स्वैरपणे संचार करतात. गाडीखाली सापडले तर त्यांची चपाती होते. पण ते कदापि मरत नाहीत. अशी ही सुखांतिका असलेली बालमालिका अतिशय मनोरंजक आणि हिंदी भाषा बोलण्यास प्रवृत्त करणारी आहे. आपणांस वेळ असेल तर आपणही ही ' मोटू और पतलु की जोडी ' जरुर पाहा आणि हास्याचे फवारे उडवून आपलं रक्त शुद्ध करा. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



🛑 अभिनंदन तुमच्या मुलांचं आणि तुमचंही

🛑 अभिनंदन तुमच्या मुलांचं आणि तुमचंही

          दहावी , बारावीचा रिझल्ट लागला. म्हणजे मराठीत निकाल लागला असे म्हणायचे ना ? 

          अनेक मुलांनी टॉप केलेले आहे. अनेकांनी मेडियम यश प्राप्त केलं आहे. स्वतःची सर्वसामान्य बुद्धिमत्ता आहे असे वाटणाऱ्या मुलांनीही काठापेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत. सर्व मुलांचं खरंच मनापासून अभिनंदन. त्यांच्या पालकांचं त्याहीपेक्षा जास्त अभिनंदन. 

          मुलांच्या आणि पालकांच्या दोहोंच्या परीक्षेचा आनंददायी निकाल लागल्यासारखे वाटते आहे. सर्वांनी आपल्या मुलांची गुणपत्रके स्टेटसवर ठेवून अधिक आनंद व्यक्त केलेला आहे यातच सगळे आले. सर्वांचे स्टेटस मुलांचे अभिनंदन करताना दिसत आहेत. हे अभिनंदन होत असताना मार्क्स मिळवणाऱ्या मुलांना कित्ती आनंद होत असेल नाही ? आजचे स्टेटस उद्या किंवा परवा असणार नाही. परंतु हे जबरदस्त स्टेटस कायम ठेवण्याची मुलांची आणि पालकांची जबाबदारीही वाढली आहे हे नक्की. त्यामुळे पुढील आयुष्याची शिखरं पादाक्रांत करताना दहावी , बारावीचे गुण महत्त्वाचे ठरणार आहेत. कोणत्या शाखेत ? किती गुण ? ग्रुपमध्ये किती ? आता पुढे काय ? अजून थोडे अधिक गुण मिळाले असते तर ? तू डॉक्टरच हो , नको नको इंजिनिअरिंग कर. त्यापेक्षा स्पर्धा परीक्षा दे. हे आणि अशा अनेक प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यावं लागणार आहे. यांची उत्तरे देतानाही नाकीनऊ येणार आहेत असे दिसते आहे. 

          शिक्षकांनी केलेले प्रयत्न , शाळेने केलेले प्रयत्न , संस्थेने केलेले प्रयत्न यांचा सर्वांचा कस लागलेला आहे. यांना यशाची आणि अपयशाची मोजणी करावी लागणार आहे. यापुढे अजून यश मिळवण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे. स्पर्धेत ' पळा पळा , कोण पुढे पळे तो ' असं सगळीकडेच बघायला मिळते आहे. 

          अभिनंदन आणि सत्कार यांचीही स्पर्धा सुरुच राहणार आहे. जास्त टक्के मिळवणारे आणि शिक्षणासाठी जास्त पैसे मोजू शकणारे मोठे कोणीतरी होतील यांत शंकाच नाही. परंतु जास्त गुण मिळवूनही केवळ पैशाची कमतरता असल्यामुळे , आर्थिक परिस्थितीमुळे सोपा कोर्स निवडताना दिसणार आहेत. कृपया त्यांनीही आपल्या मार्कांच्या जोरावर  चांगल्या व्यावसायिक प्रशिक्षणाला प्रवेश घ्यायला हवा. जे आपल्याला जमू शकतं , जे आपल्याला आवडतं , ते करण्याचा प्राधान्याने विचार करावा. उगीच दुसरे सांगतात , म्हणून कोणताही कोर्स जॉईन करणे आवश्यकच आहे असे नाही. तो कोर्स तुमच्यासाठी आवश्यक असेल , तर त्याचा थोडाबहुत अभ्यास करुन तो करावा की नाही ते जरुर ठरवावे. उगीच भावनिक होऊन एखादा अभ्यासक्रम सुरु करायचा आणि कंटाळा आला , जमत नाही असे म्हणून सोडून देण्यापेक्षा आधीच सारासार विचार करावा. 

          प्रत्येकवेळी मोठ्या पॅकेजचा विचार करणेही चुकीचे आहे. आपल्याला ज्या पॅकेजमध्ये मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही समाधान मिळू शकेल असे पॅकेज जरुर निवडावे. 

          काही मुले दहावी किंवा बारावी नंतर जॉबचा पर्याय निवडताना दिसतात. घरातील आर्थिक परिस्थितीनुसार त्यांना ते करावे लागू शकते. पण जॉब करता करता मुक्त विद्यापीठ जॉईन करता येते. आपल्याला हवे असेल ते शिक्षण घेण्याचा पर्याय शिल्लक आहे हे विसरू नये. नोकरी मिळाली तरी शिकतच राहावे. उच्चशिक्षण घेतले तर ते कधीही फुकट जात नसते. उलट तुमच्या पुढील वैभवशाली जीवनाला त्याने सुडौल आकारच मिळणार असतो. 

          सध्या मुली मुलांपेक्षा अधिक बाजी मारताना बघून सावित्रीबाई फुले यांची जास्त प्रकर्षाने आठवण होते आहे. फेसबुक , व्हाट्सएपच्या जगात आपल्याला मिळालेल्या लाईक्सना , कमेंट्सना महत्त्व नसून आपण एक महत्त्वाची परीक्षा पास झालो हे जास्त महत्त्वाचे आहे नाही का ? आता तुम्ही सोळा किंवा अठरा वर्षांचे झाला आहात , तुम्ही या भारताचे एक जागरुक नागरिक बनत चालला आहात हेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी खूपच वाढली आहे. तुम्ही आता लहान नाहीत. तुम्ही आता खऱ्या अर्थाने मोठे झाला आहात. तुम्ही वयाने मोठे झालात , ज्ञानाने मोठे झालात , आता मनानेही मोठे व्हा. समंजस , जिद्दी आणि सकारात्मक विचारसरणी अंगीकारा. तडजोड करायला शिका. आभासी दुनियेतून बाहेर पडा. उघडे असलेले डोळे अधिक व्यवस्थित उघडा आणि जगाकडे जाणीवपूर्वक सजगपणे बघा. तुम्ही मोठे आणि अधिकाधिक मोठे होणार हे फक्त तुमच्यावरच अवलंबून असतं. शुभेच्छा तुम्हाला या सर्वांसाठी. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , मुख्याध्यापक , शाळा शिडवणे नं.१



Monday, October 17, 2022

🛑 आदिती , तू कुठे आहेस ?

 🛑 आदिती , तू कुठे आहेस ?

          शिक्षकांना अशी किती मुलं भेटत असतील नाही का ? पेशा स्वीकारल्यापासून कित्येक मुलांचा सहवास लाभला आहे. छोट्या शाळेत काम करताना त्या दहा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या बाललीला पाहताना भान हरपून जाते. ती मग त्या विशिष्ट पालकांची मुलं राहत नाहीत , ती आपलीच मुलं होऊन जातात. 

           शिरवल रतांबेवाडी शाळेत असतानाचे दिवस आठवतात. तिथला निसर्गरम्य परिसर आठवतो. तिथल्या सगळ्या आठवणी कधीही शिळ्या न होणाऱ्या आहेत. खरंतर माणसाच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडत असतात , त्या लक्षात ठेवण्याची गरजही नसते. पण काही अशा आठवणी चिरकाल स्मरणात राहतात. 

           दोन शिक्षकी शाळा. सात ते आठ मुलांचा पट. प्रत्येक मुलाशी आपुलकीचं नातं जडलेलं.  प्रत्येक मुलाने शिक्षकांशी तसंच जिव्हाळ्याचं नातं जपलेलं. नातं जडणं तसं सोपं , पण ते अखंड जपणं कठीणच. मुलांनी ते नातं कायमचं जपत राहण्यासाठी माझ्यासारखे शिक्षक नक्कीच देवाकडे प्रार्थना करतील.

          शाळेत जाण्यासाठी अडचणीची वाट होती. उतरत्या रस्त्याने जाताना जीव मुठीत ठेवून जावे लागे. तरीही पाच वर्षे त्या रस्त्याची सवय झाली. गाडी रस्त्याच्या कडेला लावायची आणि दहा मिनिटे चालत जायचे. रतांब्यांची झाडे दिसू लागली की त्यापुढे शाळा दिसे. मी धावतच शाळेत जाई. शेतीच्या मळ्यांच्या मेरेवरुन जाताना भीती वाटे. कधी भेकरे वाटेत आडवी येत. दाट झाडीतून शाळेपर्यंत पोहोचताना वाघाचीही भीती चटका लावून जाई. पण एवढ्या वर्षात वाघ काही भेटला नाही. डुकरांची झुंडच्या झुंड एकदा पाहिली. तशी झुंड नंतर पाहायला मिळाली नाही. 

          या रस्त्याने जाताना बऱ्याचदा माझे विद्यार्थी माझ्यासोबत असत. त्यांच्या साथीमुळे माझी भिती कुठल्या कुठे पळून जाई. कुडतरकरांची आदिती नुकतीच पहिलीत आली होती. तिला शिकवायला मडवबाई होत्या. आदिती मला घाबरत असे. ती माझ्याकडे अजिबात पाहत नसे. तिसरी चौथीच्या मुलांना ओरडताना तिने मला पाहिले होते. त्यामुळे तिच्या मनात माझ्याबद्दल भीती निर्माण झाली असावी. 

          पण एक दोन महिन्यांत ती माझ्याशी बोलू लागली. गाडीवर बसून निघताना मी दिसेनासा होईपर्यंत टाटा करणारी आदिती आजही मला जशीच्या तशी दिसते आहे. हळूहळू तिची आणि माझी छान गट्टी जमली. ती माझ्याशी न घाबरता बोलू लागली. ती माझ्या एकदम जवळ येऊन काहीतरी सांगू लागली. तिचं ते निरागस हसणं मलाही खूप आवडू लागलं. ती एखाद्या दिवशी शाळेत आली नाही तर सगळ्या मुलांना शाळा खायला येऊ लागली. तिचे बोल बोबडे होते. त्या बोलांमध्ये अनोखी जादू होती. 

          आणि तिच्या साठी तो सुट्टीचा काळा दिवस उगवला. मकर संक्रांत होती. दुपारची भोजनाची वेळ असेल. घराबाहेरच्या अंगणातील तुळशीसमोर निरांजन तेवत होते. वाऱ्याने तिची ज्योत आज जरा जास्तच वेगाने फडफडत होती. सुंदर ड्रेस परिधान केलेली खेळकर आदिती तिथेच खेळत , बागडत होती. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ती दुडूदुडू धावत होती नुसती. तिचे कुठेच लक्ष नव्हते. तिचा फ्रॉक पायापर्यंत होता. तोही तिच्या गिरकीबरोबर गोल गिरक्या घेत होता. अचानक ती गिरक्या घेत घेत कधी त्या निरंजनापाशी आली ते तिचे तिलाच समजले नाही. 

          जोराने पेटणाऱ्या त्या निरांजनाच्या ज्योतीने आदितीच्या फ्रॉकला अलगद स्पर्श केला होता. तिच्या फ्रॉकने घेतलेला पेट तिला समजला. तिचे शरीर भाजू लागले. ती जिवाच्या आकांताने किंचाळू लागली. तिच्या भयानक ओरड्याने घरातले सगळे बाहेर धावले. सर्वांनी तिला वाचवण्यासाठी जीवावर उदार होऊन प्रयत्न केले. ती साठ टक्केपेक्षा जास्त भाजली होती. नॉयलॉनच्या फ्रॉकने आग भडकवली होती. तिला डॉक्टरांकडे तातडीने हलवले होते. 

          मला ही बातमी समजली तसा मीही लगेच निघालो. तिच्या चेहऱ्याला काहीही झाले नव्हते. तिचे मानेखालील शरीर भाजले होते. तिच्या संपूर्ण शरीराला बँडेज लावलेले दिसत होते. मी तिच्या निरागस चेहऱ्याकडे अतिशय प्रेमाने पाहिले. तिनेही माझ्याकडे नेहमीप्रमाणे पाहिले होते. तिला असह्य वेदना होत होत्या. तिचे पालक हतबल झाले होते. ती बरी होईल असे त्यांना वाटत होते. डॉक्टरांनी तिला मुंबईला हलवायला सांगितले होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिला मुंबईला नेण्याची तयारीही करण्यात आली होती. 

          अरेरे !!! संध्याकाळी तिला मुंबईला नेण्याअगोदरच तिच्याविषयीची दुःखद बातमी कानावर येऊन धडकली. आदितीचे ते बोबडे बोल आता कधीच ऐकू येणार नव्हते. 

          त्यानंतर दोन तीन महिन्यांत माझं शाळेत जाणं येणं यंत्रवत झालं होतं. मला हसतमुखाने टाटा करणारी माझी विद्यार्थिनी आदिती आता कधीच दिसणार नव्हती. आता ती शाळा बंद झाली आहे. मुलांच्या आठवणी काहीकेल्या बंद होऊ शकत नाहीत. आदिती बाळा , तू आता कुठे असशील ? ये ना परत , स्वप्नात तरी !!!

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )



Saturday, July 30, 2022

🛑 शिष्यवृत्तीची वृत्ती

 🛑 शिष्यवृत्तीची वृत्ती

          हल्ली स्पर्धा परीक्षांचे अनेक वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक इयत्तेसाठी स्पर्धा परीक्षांची ही कवाडं उघडलेली पाहायला मिळत आहेत. सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे असं मान्य केलं तरी मुलाच्या जन्मापासूनच्या या स्पर्धा जीवघेण्या तर ठरणार नाहीत ना ? याचीही कधी कधी भीती वाटते. मुलांना या परीक्षांना बसवलं जातं. मुलांना या परिक्षांबद्दल माहिती दिली जाते. खरंतर अशा परीक्षा ह्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी असतात. परंतु सरसकट सर्व विद्यार्थ्यांना बसवण्यात येतं. 

          प्रत्येक वर्गात तीन प्रकारची मुले असतात. प्रज्ञावान , मध्यम आणि सर्वसाधारण. यांत मध्यम मुलांना प्रज्ञावंत करण्याचा शिक्षकांकडून आणि बऱ्याचदा पालकांकडूनही प्रयत्न केला जातो. सर्वसाधारण मुलं बिचारी नाईलाजाने या परीक्षांना बसत असावीत. शाळेचा अभ्यासक्रम शिकताना त्यांच्या नाकात नऊ आलेले दिसतात. हा आणखीचा अभ्यास त्यांच्या नाकात आणखी काही आकडे आणत असतील की काय असा नेहमी प्रश्न पडतो.

          शिष्यवृत्ती परीक्षा ही खऱ्या अर्थाने शिष्य वृत्ती जोपासण्यासाठी असते. शिष्यवृत्ती म्हणजे विद्यार्थी वृत्ती. विद्यार्थ्याने नित्य नियमाने विद्या घेत राहण्याची सवय अंगी बाणवायला हवी. स्वयंअध्ययन करत राहायला हवे. नवनवीन घटकांचं आकलन स्वतः करुन घ्यायला हवं. शालेय पुस्तकांच्या बरोबरीने इतर स्पर्धा पुस्तकांचं वाचन करत मनन , चिंतन आणि प्रात्यक्षिक करत राहिल्याशिवाय ही शिष्यवृत्ती येणार कशी ? 

          आमच्या बालपणी ४ थी , ७ वी या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाई. आता एक वर्ग वाढवून तो ५ वी आणि ८ वी करण्यात आला आहे. अभ्यासक्रम तोच आहे , परीक्षा पद्धतीत थोडा फरक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आम्ही त्यावेळी 1 , 2 ,3 किंवा 4 यापैकी एक अचूक पर्याय चौकटीत लिहीत असू. त्यावेळी मोबाईल , टीव्ही आणि कॉम्प्युटर अशी ज्ञानाची साधने नव्हती. आतासारखे उदंड खाजगी क्लास नव्हते. आमच्या शाळेत शिकवणारे शिक्षकच आमचे कोचिंग घेत. शनिवार , रविवार अधिकचे मार्गदर्शन घेण्यासाठी शिक्षकांच्या घरी वर्ग भरत. त्यांच्या घरी चालत जावे यावे लागे. दुपार तिपार कधीही जादा वर्ग घेतले तरी आम्ही वर्गाला जात असू. त्यांच्याच घरी खाऊ खाणे होई. अभ्यासाचे आणि पोटाचे दोन्ही प्रकारचे खाऊ खाऊन शिष्यवृत्ती जोपासली आहे याचा आजही अभिमान वाटतो. 

          पाढे पाठांतर , म्हणी , वाक्प्रचार , गणिताची सूत्रे इत्यादी जय्यत तयारी करुन सराव घेतला जाई. भूमिती हा शब्द सातवीपर्यंत आम्हाला माहीतही नव्हता. पाचवी पासून तासवारी चाले. आता तासवारी क्वचित पाहायला मिळते. एका शिक्षकाकडे दोन , तीन किंवा चार वर्गही असतात. मुलांची पटसंख्या रोडावली आणि त्याचा फटका शिक्षकसंख्येवर झालेला दिसतो आहे. दररोजच्या विविध उपक्रमांच्या गर्दीमुळे शिकवायचे कधी तेही समजेनासे झाले आहे. आमच्या लहानपणी समारंभपूर्वक उपक्रमांचा इतका सुकाळ नक्कीच नव्हता. त्यामुळे शिक्षकांच्या वाट्याला शिकवणे येई आणि विद्यार्थ्यांच्या पदरात ज्ञानकण हमखास पडत. 

          कितीही नियोजन केले असले तरी ते शाळेत जाऊन शिकवता येईल का ?  की त्याऐवजी एखादा कार्यक्रम घेण्याची ऑर्डर येईल हे नित्याचेच बनले आहे की काय ? असे वाटू लागले आहे. त्यामुळे शिक्षकाच्या मनात शिकवायचे असले किंवा विद्यार्थ्यांच्या मनात मनापासून शिकायचे असले तरी वेळापत्रकाप्रमाणे जर घडलेच तर तो भाग्ययोग म्हणण्याची पाळी आल्यासारखे वाटायला लागले आहे.  खरंच परिस्थिती बदलण्याची गरज माझ्यासारखी सर्वांनाच वाटत असावी.

          प्रशिक्षणे घेऊन आम्ही शिक्षक तयार होत आहोत. त्या प्रशिक्षणाचे शाळेत उपयोजन करेपर्यंत दुसरे एखादे प्रशिक्षण येते आणि पहिले विसरले जाते आहे. एकावेळी अनेक गोष्टी करताना शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचीही जी तारांबळ उडते आहे ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळते आहे. हे करु की ते करु ? सगळेच करावेसे वाटते , पण वेळच पुरत नाही. ' एक ना धड भाराभर चिंध्या ' ही म्हण शिष्यवृत्तीचा अभ्यास करताना शिकलो होतो. आता त्याचा प्रत्यय प्रत्येक शिक्षकाला येत असेल तर मी त्यांच्या मताशी सहमत आहे.
          मी स्वतः आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवण्याचा कधी प्रयत्नही केला नाही. मात्र माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याने शिष्य वृत्ती जोपासण्यासाठी मी आजन्म प्रयत्न करीन. ही सगळी माझी स्वतःची ठाम मते असली तरी त्याच्याशी वाचकांनी सहमत असलेच पाहिजे असा माझा अजिबात आग्रह नाही असे नम्रपणे नमूद करावेसे वाटते.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 ) कणकवली




Friday, July 15, 2022

आई , मला भिती वाटते

🛑 आई , मला भिती वाटते

          भिती ही प्रत्येकाला जन्मापासून मिळालेली नकारात्मक गोष्ट आहे. ती हळूहळू जाताना आपल्या लक्षात येते. लहान मुले आपली भिती आईजवळ सांगतात. आईच्या पदरात जाताच त्यांची भिती कुठल्या कुठे पळून जाते. काही मुलांना बाबांचा आधार वाटतो. बाबांनी दिलेला धीर मुलांची भितीची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो. 

          आपण सगळे या भितीचा बागुलबुवा सोबत घेऊनच मोठे मोठे होत गेलो आहोत. मोठे झालो तरीही ही भिती डोके वर काढते , तेव्हा आश्चर्य वाटते. याचा अर्थ सर्वांनाच सर्वकाळ ' भिती ' नावाची भावना निसर्गाने बहाल करुन ठेवली आहे. कधी ही भिती आवश्यक ठरते. त्यामुळे आपण सुरक्षित राहतो. मोठया संकटांचा सामना करताना सदसद्विवेकबुद्धी वापरतो. अजिबात भिती नसती तर काहीही करुन टाकण्याचा अतिआत्मविश्वास आला असता. 

          भिती आली की अंग थरथरायला लागतं. कान लाल होतात. हात थरथरत आहेत हे लक्षात येतं. आत्मविश्वास वाढताना दिसत नाही. तेच तेच भितीचं सावट पाठलाग करत राहतं. त्यावर मात करण्यासाठी त्याचक्षणी कोणाचा तरी मायेचा हात पाठीवरुन फिरायला हवा असतो. तो फिरताना भिती दुर पळत असल्याचे लक्षात येते. 

          कालचीच परिपाठ सुरु असतानाची गोष्ट. शाळेत पन्नास टक्के शिक्षक उपस्थित असल्याने सर्व मुलांची जबाबदारी सांभाळताना सर्वच वर्ग एकत्र घेऊन सुचना देणे सुरु होते. म्हटलं , आज सर्वांच्या कविता घेऊया. प्रत्येक वर्गाच्या मुलांना पुढे येऊन कविता सादरीकरण करायला सांगितले. त्यातील काही मुले लगेच उठून पुढे आली , काही घाबरत घाबरत पुढे आली , काही उठतच नव्हती. न उठणाऱ्या मुलांना हात पुढे करुन उठवावे लागले. सुचनेनुसार मुलांनी रांग केली. ऑर्डर मिळताच कविता गायन सुरु झाले. सुरुवातीला अजिबात आवाज फुटत नव्हता. जवळ जाऊन त्यांच्या पाठीवर हलकेच हात ठेवताच त्यांचा आवाज वाढलेला दिसला. त्यांना प्रबलन दिल्यावर त्यांनी अभिनय करायलाही सुरुवात केली. कवितेचे सादरीकरण संपल्यावर त्यांना ' चांगला रे चांगला , लई लई चांगला ' अशी सामुहिक आरोळी दिली तेव्हा सर्वजण खुश झालेले दिसले. जेव्हा मुले समोर आली होती तेव्हा भितीने ग्रासली होती. प्रोत्साहन मिळताच त्यांची काही भिती आत्मविश्वासाने काढून घेतली होती. सर्व मुलांनी आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि आरोळ्या दिल्या , याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर विलसत असलेला दिसला. 

          एकेकाची सादरीकरणे बघून पुढच्या मुलांमधील आत्मविश्वास वाढताना दिसला. आम्हालाही आरोळ्या आणि टाळ्या मिळाव्यात हिच अपेक्षा प्रत्येकाची दिसत होती. 

          तिसरीमध्ये शिकणारी एक मुलगी तशी अबोलच. ती घाबरली होती. तिचा आवाजच फुटत नव्हता. ती घरी गेली. तिने आईला सांगितले. " आई , मला सर्वांसमोर कविता म्हणता आली नाही. माझे हात पाय थरथरत होते. माझी कविता पाठ होती. पण त्यावेळी मला एकही कडवे आठवेना. " 

          संध्याकाळी मला त्याच पालकांचा फोन आला तेव्हा ही गोष्ट माझ्याही अधिक लक्षात आली. मी लहान असताना अगदी या मुलीसारखाच अबोल आणि भित्रा होतो. परंतु हळूहळू माझ्या गुरुजनांनी माझी भिती घालवली. आता मी शिक्षक असलो तरी शाळेत अचानक साहेब आले की घाबरतोच ना ? भिती ही प्रसंगानुरूप येते आणि जातेही. 

          वर्गात शिकवताना आम्ही शिक्षक राजा असतो. वार्षिक तपासणीच्या वेळी एखादे अधिकारी वर्गावर येऊन पाठ निरीक्षण करु लागले की कशी भंबेरी उडते !!! तशीच भंबेरी मुलांचीही दररोज उडत असेल हे माझ्यासारख्या प्रत्येक शिक्षकाने लक्षात घ्यायला हवे. आज मुलांना वाटणारी ही भिती कमी करण्यासाठी आपणच जाणीवपूर्वक कार्य करु शकतो. मलाही या गोष्टीकडे अधिक जाणीवेने लक्ष देण्यासाठी अशा पालकांच्या फोनसंपर्काचा सदुपयोग झाला याचा उल्लेख करणेही मला अत्यावश्यकच वाटते.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



गुरुजी , तुम चंदन हम पानी

🛑 गुरुजी , तुम चंदन हम पानी

          आज गुरुपौर्णिमा. गुरु शिष्यांचा दिवस. आपल्या गुरुंसाठी आदर व्यक्त करण्याचा विशेष दिवस. 

          मी आज गुरुजी आहे तो माझ्या अनेक गुरुजींनी शिकवलेल्या ज्ञानामुळेच. हे सर्व गुरुजी कदाचित पेशाने गुरुजी नसतीलही. तरीही त्यांनी केलेले विविध संस्कार आम्हाला घडविण्यास उपयुक्त ठरले आहेत. सर्वांची नावे घेणे शक्य होणार नाही. त्यांना केलेले मनस्वी वंदन त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल अशी माझी निर्मळ भावना आहे. 

          जन्मापासून आपण शिकत असतो. विविध नवनवे अनुभव गाठीशी बांधत असतो. हे अनुभव चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे असतात. दोन्ही अनुभव आपणांस शिकवित असतात. त्यामुळे आपलं रुपांतर कोषावस्थेतून सुरेख अशा फुलपाखरात होत असते. 

          गुरु ईश्वर असतो. तात आणि माय असतो. गुरु आपल्याला वाट दाखवत असतो. भरकटत गेलेल्याला पुन्हा योग्य मार्गावर आणण्याचे महत्त्वाचे कार्य गुरु करत असतो. गुरु परमात्मा परेशु असतो. गुरुंना आपण आचार्य म्हणतो. ' आचार्य देवो भव ' असे म्हटले जाते. आपले गुरु हे देवांपेक्षाही श्रेष्ठ आहेत असे प्रत्येक शिष्याने मानायला हवे. त्यांचा यथोचित सन्मान करायला हवा. अर्थात गुरुंनीही शिष्यांच्या सन्मानास पात्र होण्यासारखे कार्य करत राहायला हवे. ' गुरु ' बद्दल कोणी वावडे बोल बोलले तर खूप वाईट वाटते. सगळेच गुरु ज्ञानदान करत असतात , प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. भावना मात्र साऱ्यांची एक आणि एकच असते असे माझे मत आहे. आपला शिष्य आपल्या पेक्षा सरस व्हावा असे प्रत्येक गुरुला वाटते. ' गुरुची विद्या गुरुलाच फळली ' अशी एक म्हण आहे. शिष्याने गुरुपेक्षा वरचढ जरुर व्हावे , पण आपल्या गुरुंचा आदर नेहमीच करत राहावा. 

          आज अनेक गुरुंचा सन्मान केला जाईल. गुरुंबद्दल ' गुरुवंदना ' गायिली जाईल. ही एक आवश्यक मानसिक गोष्ट आहे. त्यामुळे एक दिवस माझा आहे असे गुरुला वाटते. माझ्यावर प्रेम करणारे माझे विद्यार्थी बघून माझ्यासारख्या गुरुला होणारा आनंद आदर्श पुरस्कारपेक्षाही अधिक असतो. तो असा कमी शब्दांत व्यक्त करता येत नाही. 

          घरातील सर्व मुले माणसे आपले गुरुच असतात. त्यांच्याकडून आपणांस संसाराचे धडे मिळत असतात. आईने मला बोलायला शिकवले. बाबांनी चांगले वागायला शिकवले. भावंडांनी प्रेम करायला शिकवले. निसर्गाने जगायला शिकवले. शाळेतील शिक्षकांनी सुसंस्कार केले , सुसंस्कृत बनवले. त्यांच्या छडीचा मार खाल्ला. शब्दांचा मार पेलला. तापलो. थंड झालो. मातीचा गोळा चांगल्या भांड्यात रुपांतरीत होताना बघत आलोय. 

          प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे सात वर्षातील महत्त्वपूर्ण शिक्षण मी कधीही विसरु शकत नाही. त्यांनी मला समंजस बनवले म्हणून पुढे शिक्षण प्रक्रियेत टिकत गेलो. स्वतः च कधी शिक्षक झालो तेही समजले नाही. हा शिक्षण प्रवास करताना अनेक गुरु भेटत गेले. आपापला सुगंधी संस्कार मला देत गेले. मी त्यामुळे अधिकाधिक सुगंधित होत गेलो हे सर्व माझ्या गुरुजनांचे देणे आहे. त्यांच्याशिवाय मी कायम अपूर्णच आहे. माझ्या शिक्षकी पेशात मला अनेक शिक्षक लाभले. या सर्वांनी मला एका आगळ्यावेगळ्या वळणावर आणून ठेवण्याचे कार्य केले आहे. या सर्वांचा मी कृतज्ञ आहे. आज मी रात्री झोपण्यापूर्वी या सर्वांना आठवल्याशिवाय राहणार नाही. 

          माझे अनेक विद्यार्थी आज आदरपूर्वक संदेश पाठवतात. नमस्कार करतात. आठवणी ताज्या करतात. मी शिक्षक झालो ही माझी जमेची बाजू आहे , मला या सर्वांचा अविस्मरणीय सहवास लाभत आहे त्याबद्दल त्यांच्या सदैव ऋणात राहणेच मी पसंत करीन. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



Sunday, July 3, 2022

🛑 कब बाळ : आपला शैक्षणिक भविष्यकाळ

🛑 कब बाळ : आपला शैक्षणिक भविष्यकाळ

          स्काऊटिंगमध्ये 6 ते 10 वर्षे वयोगटातील बालकांना ' कब ' म्हटले जाते. बालक म्हणजे येथे फक्त मुलगे असा अर्थ अपेक्षित आहे. मुलींसाठी ' बुलबुल ' असा शब्द संबोधला जातो. 

          लहान मुलांना प्राण्यांच्या , पक्ष्यांच्या गोष्टी खूप आवडतात. आमच्या लहानपणी ' चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ' ही सर्वांना आवडणारी गोष्ट होती. त्यात वाघ , लांडगा हे प्राणी दाखवलेले होते. त्यातील वाघ आता मोगलीच्या गोष्टीत ' शेरखान ' बनून आला आहे असे वाटते. लांडगा ' अकेला ' बनला आहे. यात म्हातारी कुठेही नाही तर तिची जागा कदाचित ' मोगली ' ने घेतली असावी. 

          आम्ही टीव्ही बघितला तेव्हा त्यावर कार्टून लागतं हे समजल्यावर टीव्हीवर प्रेम जडले. त्या कार्टुनमध्ये ' टप टप टोपी टोपी ' हे गाणं लागलं की आमची आवडती मालिका लागली म्हणून बघण्यासाठी आम्हां मुलांची फौज टीव्ही असणाऱ्या घराचा ताबा घ्यायची. छोटा मोगली करत असलेल्या करामती बघून आमच्यातही तो संचारु लागे. 

          हाच धागा पकडून आपल्याला आपला आजचा ' कब ' घडवायचा आहे. आपला विद्यार्थी संस्कारित करायचा आहे. त्याच्या बाललीला योग्य दिशेने कशा जातील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे आहेत. त्यांच्या सुप्तगुणांना योग्य दिशा द्यायची आहे. स्काऊटची संकल्पना असणारे हे ' कबिंग ' त्याचाच एक भाग आहे हे आपल्या लक्षात यायला हवे. 

          गाणी , गोष्टी , खेळ आणि संघ पद्धतीच्या माध्यमातून मुलांना योग्य आकार देण्यासाठी आपल्याला ' कबिंग ' चा नक्कीच वापर करता येईल. मुलांना खेळ , गाणी , गोष्टी जात्याच खूप आवडतात. त्यांच्या या आवडीचा वापर करत करत त्यांना सहज शिक्षण दिल्यास ते शिक्षण त्यांना दीर्घकाळ लक्षात राहणारे व चिरकाल टिकणारे असेल असे वाटते. 

          म्हणून प्रत्येक शाळेमध्ये बनी , कब , बुलबुल , स्काऊट , गाईड , रोव्हर , रेंजरची पथकं असणं ही काळाची गरज होऊ पाहते आहे. मुलांना मोबाईल स्क्रिनपासून दूर नेण्यासाठीही याचा अभिनव उपयोग होऊ शकतो. घरात ढिम्म बसून राहणारी मुले याद्वारे काही हालचाली करतील. बेडन पॉवेल यांनी दिलेले ' बीपी सिक्स ' व्यायाम प्रकार करतील. आभासी दुनियेत राहणारी मुले ' मोगली ' प्रमाणे धैर्याने संकटांचा सामना करण्याची क्षमता प्राप्त करु शकतील. 

          ' मोगलीची गोष्ट ' समजून घेताना निसर्गाच्या सानिध्यात राहण्यास शिकतील. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जर एकत्र राहू शकतात , तर आपण का नाही ? हा दृष्टिकोन वृद्धिंगत होण्यासाठी ' कबिंग ' ही उत्तम संकल्पना आहे. हिंस्त्र प्राणी देखील माणसासारख्या भावना बाळगतात हे शिकू शकतील. नुकत्याच जन्माला आलेल्या लांडगीच्या पिल्लांसोबत ' माणसाचं ' मूल मोठं होत होतं ही कल्पना मुलांसाठी भूतदया शिकवणारी ठरु शकते.

          मोगलीला भालू आणि भगिरा सारखे सल्लागार भेटतात. त्यांचं मोगलीसाठी प्राणपणानं लढणं , झगडणं हेही मुलांनी लक्षात घेण्यासारखं आहे. "  कब बाळ , वडील माणसांचं ऐकतो , कब बाळ , स्वच्छ आणि नम्र असतो " या दोन नियमांवर आधारित केलेली कबिंगची निर्मिती म्हणूनच संस्कारक्षम वाटते. 

          सध्या हा बाळ ' कब ' बाळ नसल्यामुळे कदाचित वडील माणसांचं ऐकताना दिसत नाही. या ' कबिंग ' मुळे हा आजचा बाळ ' कब ' होऊन जाईल आणि वडीलधाऱ्यांचे ऐकेल , नम्र आणि स्वच्छ बनेल असेही वाटते. 

          या जगात शेरखानसारखी माणसं त्याला ज्या ज्या वेळी भेटतील तेव्हा त्यांच्याशी सामना करण्यासाठी तो एकट्याने लढणार नाही तर ' सांघिक ' शक्तीचा वापर करेल. शक्तीच्या वापरापेक्षा युक्तीचा वापर करेल. 

         तो विश्वसनीय , निष्ठावान , शिस्तप्रिय , विनयशील , प्राणीमित्र , मित्र , निसर्गमित्र, सार्वजनिक मालमत्तेचा रक्षक , धैर्यवान , काटकसरी , पवित्र विचारांचा , पवित्र उच्चारांचा , पवित्र आचारांचा बनण्यासाठी ' कबिंग - स्काऊटिंग ' चे माध्यम नक्कीच उपयोगी पडेल यात शंका नाही. 

          आपल्या शाळेतील प्रत्येक मूल असं घडू शकतं , त्यासाठी प्रत्येक शाळेत ' कबिंग ' ची चळवळ प्रत्यक्ष सुरु राहिली तर आपल्या कब बाळाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 ) कणकवली.



Saturday, June 18, 2022

🛑 कबचे शंकर : यादवसर

🛑 कबचे शंकर : यादवसर

          काही माणसं एखाद्या क्षेत्रात जातात , तेव्हा त्या क्षेत्राचे सोने करतात. किंबहुना ते क्षेत्रच त्यांची वाट पाहत असावं. ते समोर आले की चैतन्याचा झरा वाहू लागतो. नाराजांवर राज करण्याचं सामर्थ्य अशा थोड्याच निवडक माणसांमध्ये असतं. त्या निवडक माणसांची याद आल्याशिवाय राहत नाही. हे शैक्षणिक दव सतत ओलं ठेवण्याचं महत्कार्य करणारे म्हणूनच दीर्घकाळ लक्षात राहतात. त्यांनी समोर यावं आणि तरतरी पेरावी असंच त्यांचं दुर्मिळ व्यक्तिमत्त्व म्हणूनच हवंहवंसं वाटत राहतं. 

          हिमालयाच्या निर्जन ठिकाणी  असे शंकर नेहमीच साधना करुन येतात आणि त्यांच्या जटेतून अव्याहत शैक्षणिक गंगा वाहती ठेवतात. म्हणून ते नुसते शंकर नसतात तर ते सर्वांचे शंकरराव असतात. 

          आम्हाला सलग सात दिवस अहोरात्र ज्यांचं मार्गदर्शन लाभलं त्या शंकरराव यादव सरांविषयी मला रास्त अभिमान वाटतो. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमच्या सात दिवसांचं प्रशिक्षण अफलातून केलं होतं. 

          माझी आतापर्यंत अनेक प्रशिक्षणे झाली आहेत. प्रशिक्षणे घ्यायची असतात. ती कोणी देत नसतात. तुम्ही त्यात हिरिरीने भाग घेतलात तरच त्या प्रशिक्षणाचा तुम्ही एक भागच होऊन जाता. सात दिवस यादवसरांनी आम्हांला आमच्या घराचा विसर पडेल अशी वागणूक दिली. सर्व क्षण सुवर्णक्षण बनवले. त्यांच्या सानिध्यात राहताना भीतीही वाटली , पण त्यांच्याबद्दलचा आदर दिवसागणिक अधिकाधिक वाढत जाताना दिसला. ते म्हणजे एक चालतं बोलतं स्काऊटिंग आहेत. 

          यादवसर नेहमीच हसतमुख दिसत होते. नेहमी ' तैयार ' दिसत होते. त्यांनी आपल्या गुणांचा परिचय आपल्या आचरणातून आम्हाला दिला. त्यांनी आमच्यात दुसऱ्यांच्यात स्फूर्ती कशी पेरावी ते शिकवलं. त्यांची बॉडी लँग्वेज भारीच. यादव सरांसारखं एक भारदस्त व्यक्तिमत्त्व आम्हाला लाभलं हे आमचंच भाग्य म्हणायला हवं. एवढया कमी दिवसांत त्यांनी भरपूर शिकवलं. एकही गोष्ट रिपीट केली नाही. जुन्या गोष्टी नवीन करुन सांगितल्या. त्यांचे भाषेवरील प्रभुत्व आम्हांला भारावून टाकत असे. त्यांनी बोलायला सुरुवात करावी आणि आम्ही फक्त आ वासून ऐकत राहावं असंच नेहमी घडे. 

          अनेक प्रशिक्षणांचा अनुभव त्यांच्या गाठीशी असला तरी प्रत्येक प्रशिक्षण ते नवीन उर्मीने घेतात हे कमाल करण्यासारखं आहे. त्यांना कधी कंटाळा आल्याचे दिसले नाही. त्यांनी नाचून गायलेली आणि आमच्याकडून करुन घेतलेली कृतीगीते कायमच लक्षात राहतील. रंकाळा तलावावर बाहेरील निसर्गात गाणी नाचताना त्यांना त्यांच्या वयाचा विसर पडलेला पाहून आम्हालाही लाजायला व्हायचं. त्यांचं हसणं , लटक्या रागानं बघणं जसंच्या तसं लक्षात राहिलं आहे. त्यांच्या हाताखाली कित्येक कबमास्टर शिक्षक घडले आहेत. त्यांच्या हाताखाली शिकणं ही माझ्यासारख्या शिक्षकासाठी पर्वणीच असते. 

          मी शेवटच्या निरोप समारंभात बोलत होतो. मला यादव सरांची भीती वाटत होती. तरीही त्यांच्याकडे बघून उलट माझा आत्मविश्वास वाढला होता. त्यांचा तो चेहरा आताही मला दिसतोय. त्यांच्या आयुष्यात कोरोना काळात अत्यंत वाईट घटना घडली होती याचा त्यांनी शेवटपर्यंत उच्चारही केला नव्हता. त्यांच्या परमपत्नीचे कोरोना काळात स्वर्गवासी झाल्याचे ऐकले तेव्हा तर आम्हाला सगळ्यांनाच जबरदस्त धक्का बसला होता. स्वतः दुःखात असणारा हा माणूस दुसऱ्यांना हसवत होता. जीवनात अशी कर्तव्यदक्ष माणसं आहेत म्हणून हे जग उभं आहे. त्यांनी यापुढेही आमच्यासारख्या काहीतरी करु पाहणाऱ्या शिक्षकांना सदैव ज्ञानाचा हा अखंड झरा अव्याहत ठेवावा. त्यांच्या अफाट व्यक्तित्वापुढे माझी ही लेखरुपी गुरुदक्षिणा सागरातील छोट्या थेंबासारखी आहे याची मला जाणीव आहे. तरीही या छोट्या थेंबाने माझ्या आयुष्यात मोठ्या सागराएवढी साहित्यसंपदा निर्माण करु दिली हेही नसे थोडके.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली





Friday, June 17, 2022

🛑 अभिनंदन दहावी !!!! 🟢

 🛑 अभिनंदन दहावी !!!! 🟢

          निकालाचा दिवस हा आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. कारण या दिवसाची प्रतिक्षा संपून गेलेली असते. हा निकाल धक्कादायक असू शकतो. तो आपलं जीवन कायमचं बदलवून टाकणाराही असू शकतो. अपेक्षित निकाल लागला नाही तर काहीही विचित्र घटना घडवणारी मुले पाहिली की सुन्न व्हायला होते. 

          निकाल ही फक्त टक्केवारी असते. कमी टक्के गुण मिळवणारे नाराज होण्याची शक्यता असते. त्यांना अपयश मिळाले आहे असे वाटत राहते. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अपयशाने खचून जायचे नसते , उलट अधिक जोमाने प्रयत्नाला लागायचे असते. दहावीच्या पुढे अजून बऱ्याच परीक्षा बाकी असतात हेही लक्षात ठेवले पाहिजे. हे स्पर्धात्मक युग असले तरी आपण दुसऱ्याशी तुलना करण्याचं सोडून द्या. तुमच्या स्वतःच्या पूर्वीच्या गुणांपेक्षा तुम्ही वरचढ ठरत आहात ना ? मग आणखी काय हवे ? सगळी मुलं ही वेगवेगळ्या क्षमता घेऊन जन्माला आलेली असतात. त्यांना सर्वांना एकाच तराजूत तोलणं कितपत शहाणपणाचं आहे ? ह्या तुलनेमुळेच मुलांचा आत्मविश्वास डळमळीत होत चाललेला आहे. 

          आपल्या मुलांना अजून खूप जग बघायचे आहे. त्याला ज्याची आवड आहे , तेच त्याला करु द्या. त्याला ज्या ज्ञानाची भूक आहे , ते त्याला खाऊ घाला. तो नक्की पोटभर जेवेल. अर्थात करियर करण्यासाठी त्याला सगळ्या गोष्टींची माहिती करुन देणं हीसुद्धा पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. ती पार पाडण्यास आपण कमी पडणार नाही हेही पाहिले पाहिजे. 

          आम्हीही दहावी शिकलो. भरपूर अभ्यास केला. खूप लेखन केले. पाठांतर केले. उपक्रमात भाग घेतला. नेहमी पुढे पुढे राहण्यासाठी कंबर कसून करत राहिलो. त्यात कधीही खंड पडू दिला नाही. हुशार मुलांकडे बघत बघत त्यांचे चांगले गुण आत्मसात केले. त्यांच्यातल्या वाईट गुणांकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या रॅगिंगला बळी पडलो नाही. आम्ही यशस्वी होण्यासाठी अभ्यास केला होता. 

          अत्युच्च शिखराचे ध्येय सतत खुणावत होते. ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. जागेपणीही स्वप्न पाहात होतो. झोपेत तर स्वप्नांची शृंखलाच असे. सकाळी उठल्यावर पुन्हा अभ्यासाला लागत असू.

          रात्री उशिरापर्यंत झोप आली तरी अभ्यास केला होता. तेव्हा आतासारखे मोबाईल नव्हते. इंटरनेट नव्हते. गुगल सर्च नव्हते. पुस्तके वाचूनच उत्तरे शोधण्यासाठी रात्रीचा दिवस केला होता. क्लास लावले नव्हते. गाईड्स नव्हती. तरीही चांगले गुण प्राप्त करुन पहिल्या तीन नंबरात येण्याचा प्रयत्न असे. केलेले प्रयत्न बऱ्याचदा सफल होत गेले होते. त्यामुळे प्रयत्नांची कास कधीच सोडली नाही. 

          दहावीचे आठ वर्ग होते. प्रत्येक वर्गात हुशार मुले होती. माझ्या वर्गात मी ' वासरात लंगडी गाय ' होतो. माझा अभ्यास बघून माझ्या वर्गाने अभ्यास करायला सुरुवात केली होती. मला माझ्या मित्रमैत्रिणींचा अभिमान आहे. त्यांनी मला कधीही त्रास दिला नाही. त्यांनी मला केलेले सहकार्य मोलाचे होते. त्यांनी मला अभ्यास करायला दिला होता. नंबर आला की त्यांनी माझे पुढे येऊन अभिनंदन केले होते. त्यामुळे माझी जबाबदारी ते अधिकाधिक वाढवत नेत होते. त्यांना एखादे उदाहरण पुन्हा समजावून सांगताना माझे ते अधिक लक्षात राहत होते. त्यांनी मला दिलेला आदर मी कायमच लक्षात ठेवला आहे. 

          कधीतरी ते जुने वर्गमित्र भेटतात. जुन्या आठवणी जाग्या होतात. आता त्यांना ओळखणे शक्य नसते. प्रत्येकाची शरीराची ठेवण पुरती बदललेली दिसते आणि खुदकन हसूच येते. मी शिक्षक झालो आहे हे पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वाढताना पाहतो तेव्हा मलाही अत्यानंद होतो. 

          दहावीत भरपूर गुण मिळालेले असतात. तेवढे गुण बारावीत मिळवणे कठीण जाते. पुढे पुढे शिकत जावे तशी गुणांची टक्केवारी खालावत जाते. अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढलेली असते. ती पेलताना ताकद पणाला लावावी लागते. 

          वेळ निघून गेली की ती पुन्हा येत नाही. वय निघून गेले की तेही तसेच जाते. मग पश्चात्ताप करण्याची वेळ येते. पण मग उशीर झालेला असतो. त्यामुळे वाईट विचार मनात डोकावू लागतात. 

          आपण आपल्या मनाला नियंत्रणात ठेवायला हवे. ते सांगेल तसे करु नये. आपण सांगू तसे मनाने आणि देहाने करावे. हे घडेल तेव्हा आपले उत्तीर्ण झालेले आणि अत्युत्तम गुण मिळवलेले विद्यार्थी खऱ्या अर्थाने उत्तीर्ण झाले असे म्हणता येईल. सर्वांना त्यांच्या पुढील दैदिप्यमान यशासाठी अनंत उदंड शुभेच्छा.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



Thursday, June 2, 2022

🛑 स्काऊटिंग : एक अनुभवसंपन्न आऊटिंग

 🛑 स्काऊटिंग : एक अनुभवसंपन्न आऊटिंग


          शिक्षकी पेशामध्ये अनेक प्रशिक्षणे पूर्ण करावी लागतात. प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज असते. शिक्षणातील नवनवीन प्रवाह आणि बदल समजून घेतल्याने नव्या दृष्टीकोनाने शिकवता येते. रोज काहीतरी नवीन शिकता आलं पाहिजे. रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते , " शिक्षक निरंतर अध्ययनशील असल्याशिवाय तो विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाही. " 

          मला स्काऊटचे प्रगत प्रशिक्षण घ्यायचे होते. मी स्वतःहून प्रशिक्षणाची मागणी केली होती. ऑर्डर आली होती. पुण्यातील भोर आणि कोल्हापूरातील सोनतळी अशी दोन प्रशिक्षण स्थळे होती. मी सोनतळी येथे जाणे पसंत केले होते. 

          ४ मे ते १० मे असे सात दिवसांचे निवासी शिबीर होते. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण असल्यामुळे मुलांचे नुकसान होणार नव्हते ही माझ्या दृष्टीने चांगलीच गोष्ट होती. 

          ४ मे हा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत वाईट दिवस होता. त्या दिवशी पंधरा वर्षापूर्वी माझी पत्नी मला कायमची सोडून गेली होती. गेल्या पंधरा वर्षात मला कायमच हा दिवस असह्य होणारा असतो , तसा तो मला आजही अस्वस्थ करत होता. तरीही मी माझ्या अस्वस्थतेकडे काहीसे दुर्लक्ष करीत होतो. 

          राधानगरीमार्गे गाडीत बसून निघालो होतो. सोबत एक मोठी आणि एक छोटी अशा दोन बॅगा होत्या. रंकाळा येथे उतरलो होतो. मस्त गरमागरम चहा घेतला होता. तिथूनच चक्क दोनशे रुपये देऊन रिक्षानेच सोनतळी येथे पोहोचलो होतो. 

          प्रशिक्षण स्थळ म्हणजे " राजर्षी छत्रपती शाहू महाराज " यांचे वास्तव्य असलेला बंगलाच होता. तेथील निसर्गरम्य वातावरण पाहून येणारे प्रत्येक नवखे चेहरे भारावून जाताना दिसत होते. 

          मी स्काऊट प्रगत प्रशिक्षण घ्यायला गेलो असलो तरी ते तिथे उपलब्ध नव्हते. त्यामुळे मला कबमास्टरचे प्रगत प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पर्याय सुचविण्यात आला होता. मी तो मान्य केला होता. नोंदणी करुन झाली होती. 

          मी पत्नीने दिलेला भोजन डबा उघडून खाऊन घेतला होता. भूक लागली होती. आता जरा बरे वाटत होते. हळूहळू सूचना मिळू लागल्या होत्या. प्रशिक्षण प्रमुख आणि संचालक यांनी सात दिवसांचे वेळापत्रक नीट समजावून सांगितले होते. 

          पहाटे ४ वाजता उठून दिवसाची सुरुवात होत होती. इतक्या लवकर उठल्यावर आंघोळीसाठी नंबर लागत असे. फ्रेश होईपर्यंत कर्णमधुर भक्तिसंगीत ऐकायला मिळे. ५.२५ वा. रामधून सुरु होई. टाळ्यांचा ठेका धरत मंत्रमुग्ध होत प्रत्येकाच्या मुखातून अभंगवाणी बाहेर पडे. वातावरण प्रसन्न होऊन जाई. 

          त्यानंतर आपल्या तंबूची सजावट करण्याचे टास्क दिलेले असे. ते करताना आपल्या संकल्पना प्रत्यक्षात उतरताना दिसत. टोटम पोल , षटकाचे नाव , प्रशिक्षणार्थी , किल्ला , सुका कचरा , ओला कचरा , शोषखड्डा , तंबूची स्वछता , परिपूर्ण गणवेश , तंबूसाठी प्रवेशद्वार , मोगलीची गोष्ट , चप्पल स्टँड , वस्तू ठेवण्यासाठी मांडणी , गाठींचे प्रकार , रांगोळी , पताका , ले आऊट , तंबूची ओढणी इत्यादी अनेक गोष्टींची मुद्देसूद व काटेकोर पाहणी केली जात होती. अर्थात त्यासाठी लवकर उठण्याशिवाय पर्यायच नसे. 

          बी पी सिक्स चे सहा व्यायाम प्रकार शिकवण्यात आले. प्राणायाम , अनुलोम विलोम आणि योगासने शिकविण्यात आली होती. प्रत्येक बाबींवर पुरेसा वेळ देऊन सराव घेण्यात आला होता. वैयक्तिक लक्ष देऊन सुधारणा करण्यात आली होती. 

          चहा , नाश्ता रांगेत घ्यावा लागत होता. स्वतःची भांडी स्वतः घासावी लागत होती. हे सगळे निसर्गाच्या सानिध्यात घडवले जात होते. प्रत्येक सेशन वेगवेगळ्या ठिकाणी घेतले जात होते. वहीवर लिहिण्यासाठी घटक देण्यात आले होते. कोणत्या पानावर काय लिहावे हेही सांगण्यात आले होते. 

          कब मास्टर यांचे वय ६ ते १० करण्यासाठी अभिनवपणे उपक्रम घेण्यात आला होता. आमच्याकडे त्यांनी कबचे वय फेकले होते आणि आम्ही ते सर्वांनी अलगद पकडले होते. सगळेच उपक्रम वक्तशीरपणे घेण्यात आले होते. कामात नेहमीच बदल करण्यात येत होता.

          रिकामपणाची कामगिरी करणे म्हणजे तसे अवघड काम होते. प्रशिक्षकांनी दिलेल्या गोष्टी प्रत्यक्ष वैयक्तिक करुन दाखवायच्या होत्या. त्या करताना ब्लॅंक व्हायला होत होते. त्यामुळे त्या पुन्हा पुन्हा करुन दाखवाव्या लागत होत्या. कितीही तयारी केली असली तरी ट्रेनरसमोर सर्वांचीच तंतरली होती. अगदी पहिल्या झटक्यात बरोबर असणारी मंडळी हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकी कमी होती. शेवटी एकदा टास्क पूर्ण झाल्यानंतर ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद मोजता न येण्यासारखा होता. 

          ध्वजारोहण करताना क्रम चुकत होता. पुन्हा पुन्हा करुन घेतले जात होते. आपणच आपल्या चुका ओळखायच्या होत्या. ध्वजनेता , कबमास्टर , कब सहाय्यक यांच्या भूमिका करायच्या होत्या. या सर्व भूमिका प्रशिक्षकांनी प्रत्येकाकडून अचूक येइपर्यंत करुन घेतल्या होत्या. 

          राज्य पुरस्कार , राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत मुलांना कसे घेऊन जाता येईल तेही सांगण्यात आले होते. आपली मुलेही तिथपर्यंत पोहोचल्याची स्वप्नं पडायला लागली होती. 

          कृतियुक्त गाणी नाचून म्हटली जात होती. आरोळ्या देण्यात येत होत्या. वेगवेगळ्या प्रकारच्या टाळ्या वाजवायला शिकवल्या जात होत्या. वेळ भराभर निघून जात होता. कधीच भोजनाची घंटा होत होती. रांगेत भोजन वाढले आणि घेतले जात होते. ड्युटीप्रमाणे प्रत्येकजण आपली कामगिरी पार पाडताना दिसत होते. कोणीही त्यात कसूर करण्याचा प्रश्नच नव्हता. सूचनाच देण्याची पद्धत अशी होती की कुणीही दिलेली कामे करायला टंगळमंगळ करु शकत नव्हते. ज्यांनी आपल्या घरी काहीही काम केलेले नसेल त्यांना काम करताना पाहून आनंद आणि आश्चर्य अशा दोन्ही गोष्टी होत होत्या. 

          प्रशिक्षक स्वतः राब राब राबत होते. प्रशिक्षणार्थींना प्रत्येक गोष्ट गांभिर्याने करण्यास सांगत होते. ताण तणाव येत असला तरी सगळे उपक्रम पार पाडावेच लागत होते. कोणालाही त्यात सूट दिली जात नव्हती. त्यामुळे कित्येकांचे वजन आणि पोट दोन्हीही कमी कमी होत गेलेले दिसत होते. 

          निसर्ग निवासाची सवय किती आरोग्यदायी असते हेच जणू या प्रशिक्षणाच्या निमित्ताने सिद्ध केले जात होते. तंबूत झोपताना डासांची गाणी ऐकत झोपावे लागत होते. 

          पहिल्या दिवशी तर माझी हालतच झाली होती. पहिल्यांदा तंबूत झोपण्याचा प्रयत्न केला होता. एक तास तरी झोपच येईना. मग स्काऊट बंगल्यात फॅनच्या खाली असलेल्या बाकड्यावर झोपलो होतो. पण झोप आलीच नव्हती. झोपेत बाकड्यावरून पडेन ही भीती झोपू देत नव्हती. मग पुन्हा तीही जागा सोडली होती. आकाशाचे पांघरुण घेऊन बाहेर अंगणात गाढ झोपून गेलो होतो. माझ्याबरोबर अनेक मित्र घोरत पडलेले होते. त्या सूरसंगीतात मलाही सामील होण्याची अनमोल संधी मिळाली होती. 

          मोगलीची गोष्ट प्रत्यक्ष अनुभवता येत होती. भालू , भगिरा , का , मोगली यांचा डान्स करताना कितीतरी मजा आली होती. स्पर्श , चव , स्मरणशक्ती , डोळे इत्यादींवर आधारित किम गेम्स खेळले गेले होते. विविध गेम्स खेळताना लहान मुलांसारखी गंमत वाटत होती. सगळेजण आपलं वय खरंच विसरुन गेलेले दिसत होते. 

          रात्रीच्या शेकोटी कार्यक्रमात सर्वांनीच अक्षरशः धमालच केली होती. जे कधीही नाचले नसतील त्यांचे नृत्य हसायला लावत होते. सर्वांनी दिलेल्या थीमनुसार कार्यक्रमांचे सादरीकरण केले होते. तयारीसाठी पुरेसा वेळ न मिळाला तरी कार्यक्रम झक्कास होत होता. 

          सन्मान सभेमध्ये अध्यक्ष , सचिव यांची निवड करुन दिवसभराच्या कार्यक्रमांचा आढावा घेण्यात येत होता. दुसऱ्या दिवसाचे नियोजन आधीच सांगण्यात येत होते. वहीचे लेखन करण्यासाठी जागरण केले जात होते. आपल्या तंबूचा नंबर यावा , लाल रंगाचा फ्लॅग मिळावा म्हणून चढाओढ लागत होती. 

          गाठींचे प्रकार शिकवले गेले होते. प्रत्यक्ष जीवनात त्यांचा कसा वापर केला जातो हेही सांगितले गेले होते. कित्येकांनी बांबूंचा वापर करुन अभिनव गॅझेट्स बनवली होती. 

          प्रशिक्षण संपण्याच्या आदल्या दिवशी सहल नेण्यात आली होती. ज्योतिबा , महालक्ष्मी आणि रंकाळा अशा ठिकाणी ऐतिहासिक अनुभव घेतले जात होते. प्रवास करताना गाणे म्हणण्याचा मोह कोणालाही आवरता येत नव्हता. राज्यभरातून आलेले शिक्षक , शिक्षिका एकाच कुटुंबाचा भाग बनून गेलेले होते. रंकाळा हिरवळीवर अभिनय गीते नाचताना सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. 

          शेवटच्या शेकोटी कार्यक्रमात प्रत्येक गटातील प्रशिक्षणार्थीनी आपली हृदय मनोगते व्यक्त करताना अक्षरशः रडायला लावले होते. 

          क्लोझिंग कार्यक्रमात सर्वांनी एकमेकांना सलाम केला होता. प्रत्येकाला समारंभपूर्वक प्रमाणपत्रे मिळाली होती. जाताना प्रत्येकजण प्रत्येकाला निरोप देण्याच्या घाईत होता. या प्रशिक्षणात प्रत्येकाला एकसष्ठ मित्र मिळाले होते. प्रत्येकाला  सात ते आठ गुरु मिळाले होते. त्यांचा सर्वांचा निरोप घेताना सर्वांचेच डोळे आतून किंवा बाहेरुन पाणावलेले दिसत होते. स्काऊटिंग नावाचे हे प्रशिक्षण खरंच एक अनुभवसंपन्न आऊटिंग असल्याचे सिद्ध होत होते.


©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 ) ( कणकवली )

( सिंधुदुर्ग )


🛑 सुट्ट्या लागल्या आता मज्जा

 🛑 सुट्ट्या लागल्या आता मज्जा


          सुट्टी हा शब्द सगळ्यांनाच आवडणारा असेल. नुसता शब्द नाही तर त्याची प्रतिक्षा करण्यातही एक आगळा आनंद असतो. तशी प्रत्येकाला आठवड्यातून एक दिवसाची सुट्टी मिळत असेलच. आता काहीजण 24 गुणिले 7 काम करत असतील तर त्यांनाही सुट्टी घेणाऱ्यांचा हेवा वाटत असेल. अर्थात तशी सगळयांनाच कधीना कधी सुट्टी मिळतच असते , फक्त ते सांगत नसतात. किंवा त्यांना आपल्याला सुट्टी आहे हे जाणवत नसेल. 

          आयुष्यात अशा अनेक सुट्ट्या येत असतात. त्या येतात आणि जातातही. पण प्रत्येक सुट्टी आपलं एक वेगळेपण घेऊन येत असते. माणसाला विश्रांतीची गरज असते. ती विश्रांती सुट्टीमुळे त्याला मिळत असते. सुट्टी म्हणजे आपले स्वतःचे दिवस असतात. त्यावर आपला आणि आपलाच अधिकार असतो. ती आपली स्वतःची असते , म्हणून ती आपली लाडकी असते. ती आपल्याला नेहमीच हवीहवीशी वाटणारी असते. ती पुन्हा पुन्हा येत राहावी अशीही असू शकते. सुट्टी आली की आपल्या मनाचे करता येते हा आनंद असतो. तो आनंद कोणी हिरावून घेऊ नये असे प्रत्येकाला वाटत असते. आज मस्त सुट्टी आहे असे म्हणत जर तुम्ही तुमचा सुट्टीचा दिवस ' एक उनाड दिवस ' म्हणून साजरा करणार असाल तर त्यात जर कुणामुळे विघ्न आलंच तर आपण त्याच्यावर मनातून चरफडल्याशिवाय राहत नाही. 

          एक मे हा दिवस मुलांच्या सुट्टीचा सुरुवातीचा दिवस असावा. आता खूप लवकर परीक्षा होतात , त्यामुळे एप्रिलपासूनच मुले शाळेत यायची बंद होतात. परीक्षा झाल्या की शाळेत कशाला जायचे ? हा प्रश्न पडल्यामुळे मुलांना शाळेत पाठवले जात नाही. उलट याही दिवसात शाळांमध्ये शैक्षणिक कामकाज सुरू असते. निकाल , स्वाध्याय पूर्तता , तोंडी काम , तोंडी परीक्षा , प्रकल्प , शाळा पूर्व तयारी अभ्यासक्रम , अप्रगत मुलांसाठी उपचारात्मक अभ्यासक्रम इत्यादी कामकाज सुरुच असते. ते सुरुच असते , पण ते फक्त शिक्षकांना आणि शिक्षणाशी संबंधित घटकांना माहिती असते. 

          वर्षभर अभ्यास करुन करुन दमायला झालेले असते. थोडी विश्रांती म्हणून शाळेतील वाचनालयाच्या पुस्तकांचा वाचून फडशा पाडायला काय हरकत आहे. अनेक पुस्तके वाचल्यामुळे मुलांच्या ज्ञानात आणखी भरच पडणार असते. शिक्षकांनीही आपल्या शाळेतील डेडस्टॉक मध्ये बंदिस्त करुन ठेवलेली पुस्तके मुलांना वाचायला द्यावीत. पुस्तके वाचून फाटून गेली तर ती सार्थकी लागतील नाही का ? हल्ली मुलांच्या घरी पुस्तके असण्याची शक्यताच कमी असते. शहरात काही वाचनवेडे सोडले तर वाचनासाठी पुस्तके घरी आणणारे विरळेच आढळतील. शहरात जर ही अवस्था असेल तर खेड्यात वाचन अपेक्षा ठेवणे दूरच राहिले. दिवाणखान्यात किमती वस्तू दिसतील , पुस्तके दिसणार नाहीत. पुस्तके दाखवण्यासाठी नकोच , ती वाचनासाठी हवी. 

          आमच्या बालपणी आम्ही वाचनालयात बालवाचक म्हणून खाते उघडले होते. त्यावेळी महिन्याला पाच रुपयापेक्षा कमी वर्गणी होती. किती पुस्तके वाचायचो आम्ही. शनिवार रविवार कधी येतो आणि वाचनालय कधी गाठतो असे होईन जाई. आता वाचनालयात जाणे संपले आहे. आता घराचेच पुस्तकघर बनवून टाकले आहे. ज्यावेळी वाटेल त्यावेळी एखादे पुस्तक उघडावे आणि वाचत सुटावे. वेळ कसा निघून जातो समजतही नाही. आताच्या मुलांना वाचनाचा छंद कमीच दिसून येतो. त्यांना तुमचा आवडता छंद कोणता असे विचाराल तर खूप कमी मुलांचे उत्तर वाचन असे असेल. 

          या सुट्टीचा वापर मुलांनी वाचनासाठी करायला हवा. बालसाहित्य बाजारात उपलब्ध आहे. गोष्टींची पुस्तके आहेत. बालकथा , इसापनीती , अकबर बिरबल , नितीकथा , लोककथा , एकांकिका , बालनाट्ये , नाट्यछटा , किशोर , कुमार , ठकठक , चांदोबा , अमृत , कॉमिक्स , विक्रम वेताळ , आजोबांच्या गोष्टी , आजीच्या गोष्टी , सिंदबादच्या सफरी , गुलबकावली , लोटपोट , सिंहासन बत्तीशी , गोट्या , श्यामची आई , सानेगुरुजींच्या गोष्टी अशी अनेक पुस्तके आताच्या मुलांना माहीत असतील की नाही यांवर संशोधन करावे लागेल. या सर्व गोष्टी त्यांना यु ट्यूबवर उपलब्ध असतीलही. पण वाचण्यात जी वेगळी मज्जा असते , ती पाहण्यात नक्कीच असेल असे मला वाटत नाही. ते एक मनोरंजन होईल , पण ज्ञानार्जन कदाचित होईल. म्हणून आताच्या मुलांनी भरपूर वाचले पाहिजे. पुस्तकांचा फडशा पाडला पाहिजे. सकाळी उठून स्टेटस लावण्यापेक्षा एखाद्या पुस्तकातील चार ओळी वाचल्यास त्याचा आयुष्यभरासाठी नक्कीच फायदा होईल. 

          सध्या वर्तमानपत्रात देखील लहान मुलांसाठी विशिष्ट पान असते. ते लहानांपासून मोठ्यांनीही वाचले पाहिजे. घरातल्या मोठ्यांनाही हल्ली वाचनाचा विसर पडत चाललेला दिसून येतो आहे. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत मोबाईलने आपले जीवन ग्रस्त करून सोडले आहे. मध्यरात्री उठून बसलो तरी पहिल्यांदा मोबाईलकडे हात जाऊ लागला आहे. घराघरात क्रिकेट मॅच , सासूसुनांच्या मालिका सुरु आहेत. मुले , पालक हेच बघत आहेत. यातून वेळच मिळत नसल्यामुळे त्यांना पुस्तक वाचायला सवडच मिळताना दिसत नाही. 

          पूर्वीची मुले एवढी अभ्यासवेडी किंवा वाचनवेडी होती की त्यांच्या हातात नेहमी एखादे पुस्तक दिसे. आता मोबाईल दिसतो. त्या दिवशी वाचनालयात गेलो होतो. तिथे तरुण मंडळी दिसलीच नाहीत. खूप जुनी जाणती माणसेच पुस्तके वाचन करताना दिसली. या जुन्या माणसांनी आपला वाचनाचा छंद जोपासला आहे. व्यासंग जपला आहे. पूर्वीपेक्षा अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी कमी झालेली आहे , त्यामुळे मिळणारे गुण शंभर टक्क्यांपेक्षा जास्त असले तरी त्यांना अजिबात किंमत नाही. पूर्वीच्या साठ टक्क्यांच्या खालीच आहेत असेही बोलले जात आहे. 

          आता सुट्ट्या पडल्याचं आहेत , तर त्या सुट्टीचा वापर वाचनासाठी करायला हवा. मुलांनी वाचनवेडे बनायला हवे. आम्ही त्यावेळी जेवतानाही समोर पुस्तक उघडून बसत असू. तेव्हा आमचे बाबा आम्हाला ओरडत. आता जेवताना समोर टीव्ही चालू असतो , शेजारी मोबाईलच्या नोटिफिकेशन्सची रिंग वाजत असते. इकडे जेवत असतो , तिकडे हे सुरुच असते. त्यामुळे कधीकधी तोंडात घालायचा घास नाकात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकावेळी एकच काम करा. वाचताना वाचा आणि चावताना चावा. कारण काय चावतोय ते जसे समजायला हवे , तसे काय वाचतोय तेही समजायलाच हवे नाही का ? 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Wednesday, January 12, 2022

🟢 छंद लेखनाचा

          🟢 छंद लेखनाचा

        समर्थ रामदासांनी म्हटले आहे , " दिसामाजी नित्य काहीतरी ते लिहावे , प्रसंगी अखंडित वाचित जावे ". वाचनाचं वेड प्रत्येकाला असायला हवं , तसंच लेखनाचं वेड असणंही गरजेचं आहे. वाचन आणि लेखन या दोन्ही कौशल्यांचे फायदेच फायदे आहेत. वाचन केल्यामुळे तुम्हाला लिहिण्यासाठी प्रेरणा मिळते. लेखक कसे लिहितात ? त्यांनाच कसं सुचतं ? असे अनेक प्रश्न वाचकाला पडतात. मग तोही काहीतरी लिहावे असे ठरवतो आणि हळूहळू लिहिता लिहिता लेखक बनून जातो. 

          माझेही तसेच झाले. मला वाचता वाचता लिहिण्याची गोडी निर्माण झाली. ही गोडी वाढता वाढता वाढत चालली आहे. हा छंद म्हणावा कि व्यसन म्हणावं ? माणसाला एखादी चांगली गोष्ट करण्यात परमानंद मिळत असेल तर ती गोष्ट त्याने जरुर करावी. हा लेखनाचा स्वानंद मिळत राहणेही आपल्या निकोप आरोग्यासाठी हितकारक असते. तुम्ही चांगले विचार करण्यात गढून जाता. वाईट विचारांना फाटा मिळतो. तुमची सर्जनशीलता विकसित होत जाते. तुमची प्रसिद्धी आपसूकच होत जाते. अर्थात प्रसिद्धीसाठी लेखन करायचे नसते , तुमची लेखन कलाच तुम्हाला प्रसिद्धी मिळवून देते. 

          नाटकात काम करणाऱ्या नटाला प्रत्यक्ष प्रतिसाद मिळतो तेव्हा त्याला होणारा आनंद प्रत्येकवेळी वेगळा असतो. तसाच आनंद लेखकालाही मिळाला की त्याला स्वर्ग दोन बोटे उरत असेल. उत्स्फूर्तपणे लिहावे , ते एकदा दोनदा वाचून पाहावे असे करत असताना आपणच आपल्याला अधिक विकसित करत असल्याचा आनंद विरळाच असतो. 

          मला सुचले कि मी माझा राहात नाही. ते कधी एकदा लिहून काढतो असे होऊन जाते. सुचले कि मग त्याला वेळ, काळ लागत नाही. जिथे असेन तिथे लिहायला सुरुवात करतो. मध्यरात्री सुदधा लिहायला बसावे लागते. एकदा सुचले कि ते लिहिल्याशिवाय स्वस्थता येत नाही. तुमचा ताण कुठल्या कुठे निघून जातो. तुम्ही एक कात टाकलेली असता. तुम्ही कालपेक्षा आज अधिक ताजेतवाने आणि टवटवीत झालेले असता. माणसाला असे ताजेतवाने राहण्यासाठी नित्य लेखनाची नितांत गरज आहे. 

          पूर्वी अनेक लेखक स्वतःला बंद खोलीत कोंडून घेत आणि आपला लेखनप्रपंच करत. स्वातंत्र्यपूर्व काळात कारागृहातून अनेक क्रांतिकारकांनी लेखन करुन अनेक देशभक्तीपर कवने लिहिली. त्यांच्यासाठी कारागृह ही शिक्षा नव्हती. या शिक्षेच्या काळात त्यांच्याकडून विविध साहित्यकृती प्रसवल्या. त्यांचं दैदिप्यमान लेखन वाचताना आजही भारावून जायला होतं. त्यातलं साहित्यमूल्य अजोड होतं. 

          आपल्या जीवनात घडलेल्या घटना लिहिता लिहिता आपणच आपल्याला रिते करीत असतो. आपण मोकळे झालो की बरे वाटते. मला एखाद्याला जे सांगायचं असतं ते लिहिलं की माझ्या भावनांचा योग्य निचरा होतो. भावना आल्या कि त्या प्रकट झाल्याचं पाहिजेत. त्या प्रकट करण्यासाठी लेखनाइतकं दुसरं साधन नाही. 

          लेखन केल्यानंतर ते वाचकांपर्यंत पोहोचवणं ही देखील एक कला आहे. आता प्रसारमाध्यमे वाढल्यामुळे ते सहज शक्य झाले आहे. तुमच्यामुळे काही न वाचणारे लोकही वाचू लागतात हा तुमच्या लेखनात मोठा फायदा असतो. तुम्ही तुमच्या लेखनाने एखादा सकारात्मक विचार देता आणि वाचकाचे जीवन बदलून जाऊ शकते. वाचकाला माहित नसलेली गोष्ट तुम्ही नीट समजावून सांगत असता त्यामुळे वाचकांमध्ये आमूलाग्र बदल घडत असतो हे तुम्हाला लक्षातही येत नाही.

          तुम्हाला भावणारी गोष्ट तुम्ही लिहिता त्यावेळी ती दोनदा जन्माला आलेली असते. एकदा ती प्रत्यक्ष घडलेली असते आणि दुसरी तुम्ही ती शब्दरूपाने घडवून आणत असता. 

          मला एकदा एका सलूनमधून फोन आला. समोरुन आवाज आला , " सर , तुम्ही ' सामंतांचे वडे ' नावाचा लेख लिहिलात तो खुद्द सामंतांच्या पत्नीने वाचला. ती तुम्हाला तुमच्या घरी बटाटे वडे पाठवून देत आहे. " अर्ध्या तासात खरंच गरमागरम बटाटेवडे माझ्यासमोर हजर होते. मला माझ्या लेखनाचा असाही उपयोग होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. 

          हल्लीच माझ्या शाळेत बालिका दिन साजरा झाला. त्याचंही थोडं असंच झालं. एका संस्थेच्या प्रकल्प संचालकांपर्यंत माझे लेख पोहोचले असावेत. त्यांनी त्यांच्या संस्थेचा निबंध स्पर्धेचा कार्यक्रम आमच्या शाळेत घेतला. त्यामुळे आमच्या मुलांना निबंध लेखनाची संधी मिळाली. बक्षिसे मिळाली. बक्षिसे घेत असताना मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस उत्स्फूर्त आनंद बघता आला. 

          त्या दिवशी एका सहावीतल्या मुलाशी फोन संभाषण झाले. तो माझ्या ओळखीचा नव्हता. पण तो मला चांगला ओळखत होता. त्याने माझे लेख वाचले होते. त्याने मला पहिला प्रश्न असा विचारला , " सर , तुम्ही जे लेख लिहिता ते सर्व लेख मी वाचतो. पण तुम्हाला ते लिहायला सुचतात कसे ? " त्या मुलाचा प्रश्न मला आवडला. मी शाळेच्या कामात होतो. पण मला त्या मुलाशी बोलून त्याला उत्तर द्यावेच लागले. मी त्याला सांगितले , " मी असं काही वेगळं लिहीत नाही. मी जात येत असताना मला जे दिसतं ते मी लिहितो. मी प्रत्येक गोष्टीकडे जाणीवपूर्वक बघण्याचा प्रयत्न करतो. त्यातली जी गोष्ट मला अधिक भावते , ती गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात राहते. मग त्या घटनेला मी शब्दरूप देतो. " त्यावेळी मी त्या मुलाशी पाच मिनिटे बोललो असेन. लेखन कसे करता ? असे विचारणारा हा लहान मुलगा पुढे नक्कीच कोणीतरी मोठा आदर्श नागरिक घडेल यात मला मुळीच शंका वाटत नाही. या मुलासारखी अनेक मुले, माणसे या जगात चांगल्याचा शोध घेत असतील तर त्यांना चांगले नक्कीच सापडेल. फक्त हा शोध सुरु ठेवणं हे सातत्याने सुरु राहायला हवं. 

          असा हा लेखनाचा छंद व्रतासारखा जोपासत पुढे जाणं हे माझ्यासाठी सुद्धा एक रोजचं आव्हान असणार आहे. ते पेलता यायला हवं असंच मला वाटत राहतं. 

          माझ्या एका मित्राने हल्लीच माझा एक लेख वाचला आणि त्याला वाचनाची गोडी निर्माण झाली. तो स्वतः हुशारच आहे , सध्या कामाच्या व्यापात वाचनाकडे दुर्लक्ष झाल्याचं त्याने मान्य केलं. पुन्हा एकदा वाचनाकडे आणि लेखनाकडे जाता येण्यासारखा आपल्यातील बदल हा मला वाटतं मोठा बदल असावा , जो आपलं पूर्ण जीवनच बदलून टाकतो.

©️ प्रवीण अशितोष कुबल

( 9881471684 )



🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म           "आपल्यामध्ये धर्म आचरणाचा गुण असायला हवा," असे माझी आजी नेहमी सांगायची. ती केवळ सांगायची...