Thursday, May 25, 2023

🛑 अभिनंदन तुमच्या मुलांचं आणि तुमचंही

🛑 अभिनंदन तुमच्या मुलांचं आणि तुमचंही

          दहावी , बारावीचा रिझल्ट लागला. म्हणजे मराठीत निकाल लागला असे म्हणायचे ना ? 

          अनेक मुलांनी टॉप केलेले आहे. अनेकांनी मेडियम यश प्राप्त केलं आहे. स्वतःची सर्वसामान्य बुद्धिमत्ता आहे असे वाटणाऱ्या मुलांनीही काठापेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत. सर्व मुलांचं खरंच मनापासून अभिनंदन. त्यांच्या पालकांचं त्याहीपेक्षा जास्त अभिनंदन. 

          मुलांच्या आणि पालकांच्या दोहोंच्या परीक्षेचा आनंददायी निकाल लागल्यासारखे वाटते आहे. सर्वांनी आपल्या मुलांची गुणपत्रके स्टेटसवर ठेवून अधिक आनंद व्यक्त केलेला आहे यातच सगळे आले. सर्वांचे स्टेटस मुलांचे अभिनंदन करताना दिसत आहेत. हे अभिनंदन होत असताना मार्क्स मिळवणाऱ्या मुलांना कित्ती आनंद होत असेल नाही ? आजचे स्टेटस उद्या किंवा परवा असणार नाही. परंतु हे जबरदस्त स्टेटस कायम ठेवण्याची मुलांची आणि पालकांची जबाबदारीही वाढली आहे हे नक्की. त्यामुळे पुढील आयुष्याची शिखरं पादाक्रांत करताना दहावी , बारावीचे गुण महत्त्वाचे ठरणार आहेत. कोणत्या शाखेत ? किती गुण ? ग्रुपमध्ये किती ? आता पुढे काय ? अजून थोडे अधिक गुण मिळाले असते तर ? तू डॉक्टरच हो , नको नको इंजिनिअरिंग कर. त्यापेक्षा स्पर्धा परीक्षा दे. हे आणि अशा अनेक प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यावं लागणार आहे. यांची उत्तरे देतानाही नाकीनऊ येणार आहेत असे दिसते आहे. 

          शिक्षकांनी केलेले प्रयत्न , शाळेने केलेले प्रयत्न , संस्थेने केलेले प्रयत्न यांचा सर्वांचा कस लागलेला आहे. यांना यशाची आणि अपयशाची मोजणी करावी लागणार आहे. यापुढे अजून यश मिळवण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे. स्पर्धेत ' पळा पळा , कोण पुढे पळे तो ' असं सगळीकडेच बघायला मिळते आहे. 

          अभिनंदन आणि सत्कार यांचीही स्पर्धा सुरुच राहणार आहे. जास्त टक्के मिळवणारे आणि शिक्षणासाठी जास्त पैसे मोजू शकणारे मोठे कोणीतरी होतील यांत शंकाच नाही. परंतु जास्त गुण मिळवूनही केवळ पैशाची कमतरता असल्यामुळे , आर्थिक परिस्थितीमुळे सोपा कोर्स निवडताना दिसणार आहेत. कृपया त्यांनीही आपल्या मार्कांच्या जोरावर  चांगल्या व्यावसायिक प्रशिक्षणाला प्रवेश घ्यायला हवा. जे आपल्याला जमू शकतं , जे आपल्याला आवडतं , ते करण्याचा प्राधान्याने विचार करावा. उगीच दुसरे सांगतात , म्हणून कोणताही कोर्स जॉईन करणे आवश्यकच आहे असे नाही. तो कोर्स तुमच्यासाठी आवश्यक असेल , तर त्याचा थोडाबहुत अभ्यास करुन तो करावा की नाही ते जरुर ठरवावे. उगीच भावनिक होऊन एखादा अभ्यासक्रम सुरु करायचा आणि कंटाळा आला , जमत नाही असे म्हणून सोडून देण्यापेक्षा आधीच सारासार विचार करावा. 

          प्रत्येकवेळी मोठ्या पॅकेजचा विचार करणेही चुकीचे आहे. आपल्याला ज्या पॅकेजमध्ये मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही समाधान मिळू शकेल असे पॅकेज जरुर निवडावे. 

          काही मुले दहावी किंवा बारावी नंतर जॉबचा पर्याय निवडताना दिसतात. घरातील आर्थिक परिस्थितीनुसार त्यांना ते करावे लागू शकते. पण जॉब करता करता मुक्त विद्यापीठ जॉईन करता येते. आपल्याला हवे असेल ते शिक्षण घेण्याचा पर्याय शिल्लक आहे हे विसरू नये. नोकरी मिळाली तरी शिकतच राहावे. उच्चशिक्षण घेतले तर ते कधीही फुकट जात नसते. उलट तुमच्या पुढील वैभवशाली जीवनाला त्याने सुडौल आकारच मिळणार असतो. 

          सध्या मुली मुलांपेक्षा अधिक बाजी मारताना बघून सावित्रीबाई फुले यांची जास्त प्रकर्षाने आठवण होते आहे. फेसबुक , व्हाट्सएपच्या जगात आपल्याला मिळालेल्या लाईक्सना , कमेंट्सना महत्त्व नसून आपण एक महत्त्वाची परीक्षा पास झालो हे जास्त महत्त्वाचे आहे नाही का ? आता तुम्ही सोळा किंवा अठरा वर्षांचे झाला आहात , तुम्ही या भारताचे एक जागरुक नागरिक बनत चालला आहात हेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी खूपच वाढली आहे. तुम्ही आता लहान नाहीत. तुम्ही आता खऱ्या अर्थाने मोठे झाला आहात. तुम्ही वयाने मोठे झालात , ज्ञानाने मोठे झालात , आता मनानेही मोठे व्हा. समंजस , जिद्दी आणि सकारात्मक विचारसरणी अंगीकारा. तडजोड करायला शिका. आभासी दुनियेतून बाहेर पडा. उघडे असलेले डोळे अधिक व्यवस्थित उघडा आणि जगाकडे जाणीवपूर्वक सजगपणे बघा. तुम्ही मोठे आणि अधिकाधिक मोठे होणार हे फक्त तुमच्यावरच अवलंबून असतं. शुभेच्छा तुम्हाला या सर्वांसाठी. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , मुख्याध्यापक , शाळा शिडवणे नं.१



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...