Showing posts with label असे होते माझे बाबा. Show all posts
Showing posts with label असे होते माझे बाबा. Show all posts

Wednesday, September 4, 2024

🛑 बाबांविण नाही दुजा आधार

 🛑 बाबांविण नाही दुजा आधार 

          बाबा मला नेहमीच गुरुच्या जागी आहेत. मी आयुष्यात अनेक गुरूंचे मार्गदर्शन घेतले आहे. त्या सर्वांचे शिक्षक दिनादिवशी ऋण व्यक्त करतो. बाबा माझे पहिले शिक्षक होते. त्यांच्याशिवाय मी अधुरा आहे. ते गेले आणि माझा भक्कम आधारच गेला. शरीरातील स्फूल्लिंगाइतके तरतरी पेरणारे माझे बाबा मला अधिक जवळचे होते. 

          ते गेल्यानंतर मी सगळ्या गोष्टी नियमित करतो आहे. पण त्यांची उणीव भरुन येत नाहीच. ते नाहीत म्हणजे काहीच नाही. ते आहेत म्हणजे सर्वकाही आहे. त्यांच्या सगळ्या गोष्टी मला आज आता अगदी जशाच्या तशा आठवत आहेत. मी त्या विसरता येणे अजिबात शक्यच नाही. 

          दोन दिवसांवर गणपती येत आहे. आज माझे बाबा असते तर गणपतीच्या आगमनाची त्यांनी जय्यत तयारी केली असती. मी सुद्धा करणार पण त्यांची सर मला अजिबातच येणार नाही. त्यांचा गणपतीवर भारीच जीव होता. त्यांच्या हातात गणपतीची माती जिवंत होत असे. त्यांनी माती वळवली ती त्यांना हवी तशी वळत असे. 

          बाबांनी आमच्या देहाच्या मातीला असेच वळवले. त्यांना हवे तसे वळवले आणि सुंदर संस्कारीत बनवले. त्यांनी केलेले संस्कार आजच्या पिढीसाठी आदर्श आहेत. ते शिक्षक नव्हते, पण शिक्षकांपेक्षा वरचढ होते. त्यांनी आमच्यापेक्षा जास्त पुस्तके आणि जास्त माणसे वाचली होती. त्यांच्या ज्ञानाची भूक कधीही न संपणारी होती. 

         त्यांनी सांगितलेल्या गोष्टी केल्या तर यश नक्की मिळे. नाही केल्या तर यशापर्यंत पोहोचताना त्यांच्या शब्दांची आठवण येत राही. आता बाबा नसले तरी ते सतत माझ्यासोबतच आहेत असा मला अनुभव येतो आहे. कोणतीही गोष्ट करताना बाबांना विचारून करण्याची माझी सवय होती. आता सुद्धा मी त्यांच्याशी हृदय संवाद साधू शकतो. ते अदृश्य रुपाने आमच्यात वास करतात. ते घरातील प्रत्येक गोष्टीत लपलेले दिसतात. त्यांची नजर कायमच आमच्यावर भिरभिरते आहे. माझ्यावर जरा जास्तच. का कोण जाणे, पण त्यांनी मला झिला म्हणावे असे मला सतत वाटत राही. त्यांची ती गोड हाक आज ऐकू येत नाही आणि मी कमालीचा कावराबावरा होतो. 

          त्यांचे अदृश्य अस्तित्व माझे चैतन्य बनले आहे. त्यांचा हा अदृश्य सहवास मला लाभतो आहे हे माझे भाग्यच. मी त्यांना कदापि विसरूच शकणार नाही. 

          माझी पत्नी गेल्यानंतर सुद्धा मी असाच झालो होतो. तिच्या आठवांनी मी सतत डोळ्यात पाणी आणत असे. ती गेल्याचे दुःख प्रचंड होते. ती गेल्यावर मी दुसऱ्या पत्नीमध्ये तिचे रुप पाहिले. त्यामुळे ती अजूनही माझ्याजवळच आहे असे मी स्वतःला समजावून समजावून आता ती तीच आली आहे या निर्णयापर्यंत आलो आहे. आपले जीवन पुनःश्च होते तसेच जगायचे असेल तर मी बाळगलेला दृष्टिकोन मला बरोबर वाटतो.

          बायकोची रिप्लेसमेंट करता आली हे चांगलेच झाले. पण बाबांची जागा भरुन कशी काढणार ? ते कुडीने माझ्यासोबत नाहीत, ते पवित्र आत्म्याच्या रूपाने सतत माझ्या पाठीशी आहेत हा दृष्टिकोन मला नियमित जागृत ठेवावा लागण्याशिवाय गत्यंतर नाही.

          काल रात्री झोपताना बाबांच्या आठवणी सांगत असताना माझी छोटी मुलगी उर्मी मला म्हणाली, " पप्पा, आता अजून बाबांना आठवू नका, मला रडू येते आहे. " तिच्या त्या शब्दांनी आमच्या सर्वांच्याच डोळ्यातून घळाघळा पाणी ओघळू लागले होते. 

©️ प्रवीण अशितोष कुबल 

मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १



Friday, August 16, 2024

🛑 शंभर नंबरी शुद्ध सज्जन

🛑 शंभर नंबरी शुद्ध सज्जन

          जो स्वतः चांगलं वागतो आणि दुसऱ्यांशी चांगलं वागतो तो खरा सज्जन. सज्जन माणसाला अशा अनेक व्याख्या जोडता येतील. ज्याच्या मनात दुसऱ्यांबद्दल अपार प्रेम भरलेले असते तो स्वतःवरही तितकाच प्रेम करत असला पाहिजे. अशी सज्जन माणसं आपल्याला भेटतात तेव्हा ती पुन्हापुन्हा भेटत राहावीत असे वाटत राहते. 

         सज्जन बनणं हे सर्वस्वी आपल्याच हातात असतं. सज्जनपणाचं नाटक अजिबात करायचं नसतं. ते करु लागलात तर ते कळायला वेळ लागत नाही. कधीही सज्जनपणाचा आव आणू नये. सज्जनपणाचा अभिनय करणाऱ्या माणसांचे बुरखे फाडले जातात तेव्हा खऱ्या सज्जनांवर अविश्वास दाखवले जातात. म्हणून आपल्याला सज्जन बनायचे नसेल तर बनू नका, पण खोटे सज्जन अजिबात बनू नका. 

         टीव्ही मालिकांमधील अशी माणसं पाहिली की त्यांच्या वागण्याची आपल्यालाही सवय होईल की काय अशी भिती वाटते. एकाच घरातील दोन सख्खी भावंडे सज्जन आणि दुर्जन दाखवली जातात तेव्हा आश्चर्य वाटते. एकाच सुसंस्कारातून जाणारी काही मुले  कुविचार कशी करु शकतात ? याचे नवल वाटते. 

         माझ्या घरातील माणसे ' शंभर नंबरी शुद्ध सज्जन ' बनायला माझ्या बाबांचे संस्कार कामी आले आहेत. माझे बाबा खऱ्या अर्थाने शंभर नंबरी सोनं होते. ते सज्जन होते आणि शुद्ध आचरण करणारे होते. त्यांच्याकडे बघत बघत आम्हीही त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यासारखे बनणं खूपच कठीण गोष्ट आहे. त्यांच्या जीवनाचा अखंड प्रवास खूपच गुंतागुंतीचा होता. अनेक अवघड अडचणींनी कायमच भरलेला होता. कितीही संकटे आली तरी त्यावर पाय ठेवून पुढे जाणारे माझे बाबा पाहिले कि आमच्या जिद्दीची दोरी बळकट का झाली मूळ कारण समजते.

         बाबा देवाघरी जाण्यापूर्वी सुद्धा बाबांची चौकशी करत राहणारे लोक आजही बाबांच्या जाण्यामुळं हळहळताना दिसतात तेव्हा बाबांच्या मोठेपणाचा नित्यनियमित अभिमान वाटत राहतो. बाबा गेल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक शोकाकुल व्यक्तीकडे बघून बाबांच्या गोष्टी सांगताना मी त्यांच्या डोळ्यातले पाणी बघितले आहे. सज्जन बाबांच्या सज्जन स्नेही मंडळींना माझा मानाचा मुजरा. त्यांच्या जाण्याने उणीवेचा मोठा खोल खड्डा पडला आहे. तो भरुन काढण्याचा प्रयत्न आम्ही भावंडे नक्कीच करणार आहोत. 

©️ मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १

Tuesday, August 6, 2024

🛑 बाराव्याला बाबा आले

🛑 बाराव्याला बाबा आले

          बाबांचा बारावा दिवस. सकाळपासून माणसांची गर्दी व्हायला सुरु झाली होती. बाबांसाठी हाक मारायला येणाऱ्या हजारो माणसांना शोकाकुल होताना पाहून बाबांचा मोठेपणा अधिक ठळकपणे दिसू लागला होता. मी त्यांच्यासमोर काहीच नाही. ते नेहमीच म्हणत, " मी जे नखाने करीन, ते तुम्हाला कुऱ्हाडीने जमणार नाही. " बाबांचे हे वाक्य अगदी खरे आहे. त्यांनी केलेल्या गोष्टी मला करता येणार नाहीत. त्यांच्या सानिध्यात इतकी वर्षे राहूनसुद्धा मला त्यांच्या नखाचीही सर येणार नाही इतके ते मोठे होते. 

         दहाव्या दिवशी बाबांच्या पिंडाला काकस्पर्श झाला नाही म्हणून बाबा माझ्यावर नाराज असतील असे मला वाटणे साहजिकच होते. माझे प्रेम खरे असेल तर बाबा माझ्यावर नाराज होऊच शकत नाहीत असा भाबडा विश्वास मी नेहमीच बाळगत आलो आहे. 

         त्यांच्याशी माझे मित्रत्वाचे नाते होते. बाबा रागावले तरी त्यांचा तो राग तात्पुरता असे. माझ्या प्रेमाने ते पुनःश्च मेणासारखे विरघळून जात.  मी अगदी त्यांच्यासारखाच झेरॉक्स कॉपी आहे. माझाही राग असाच विरघळून जात असतो. त्यांच्याकडूनच वारसा मिळालाय. प्रेमाने राग जिंकता येतो. 

         दिवसभर बाराव्या दिवसाचे विविध धार्मिक विधी संपन्न होत असताना दुपारनंतर ' सुत '  घालण्याचा विधी सुरु झाला. हा विधी बघवत नाही. तो करत असताना मी डोळे बंद करुन बाबांची आराधना करत होतो. परंपरेने चालत आलेल्या या विविध प्रथा करताना त्या बाबांसाठी करतो आहोत याची जाणीव होती. त्यामुळे बाबांसाठी काहीही करण्याची तयारी असणारा मी निमूटपणे सर्वकाही करत राहत होतो.

         ज्येष्ठ व्यक्तींनी मार्गदर्शन करायला सुरुवात केली होती. माझे लक्ष त्यांच्या शब्दांकडे होते. ते शब्द बाबांचेच आहेत असे मला वाटत होते. मला आलेल्या सर्वांचे हृदय आभार मानावेसे वाटले. मी स्वतःहून उभा राहून बोलू लागलो. मला सर्वांचे आभार मानायचे होते. मी सर्वांच्या ऋणात राहण्याचे ठरवले असल्याचे सांगितले. घरच्यांनी गेले काही दिवस माझ्यासोबत जो प्रेमळ व्यवहार केला होता त्यामुळे मी भावनाप्रधान झालो होतो. माझ्या अश्रुंचा बांध फुटू लागला होता. मी रडताना मलाच मी आवडत नव्हतो. पण रडू काहीकेल्या थांबवता येत नव्हते. मी माझ्या चुका मान्य करुन टाकल्या होत्या. बाबा मला जाताना काहीही सांगून गेले नव्हते. बाबा गेल्याचे दुःख सर्वांनाच झाले होते, पण मला झालेले दुःख मला क्षणाक्षणाला बाबांची माफी मागत राहायला लावणारे होते. बाबा नेहमीच क्षमाशील होते. ते मला क्षमा करणार ही काळ्या दगडावरची रेघ. पण तरीही मनातील भिती डोके वर काढत होती. जाता जाता त्यांनी मला काहीतरी सांगावे असे मला वाटत होते, जे त्यांच्या अचानक जाण्याने राहून गेले होते. 

         त्यांनी आमच्या संगोपनात कोणतीही कसूर सोडली नसताना आम्ही त्यांच्या सेवेत काहीतरी दिरंगाई केली की काय ? अशा प्रश्नांनी माझा मीच व्याकुळ होत होतो. 

        रात्री भजन सुरु झाले. भैरवीचे आर्त सूर आणि टाळांचा आवाज टिपेला पोचत असतानाच आमचे बाबा तेजस्विनीच्या ( वहिणी ) अंगात संचारू लागले होते. ते बाबाच आहेत का याची खात्री करण्यासाठी माझ्या बालाकाकांनी नेहमीप्रमाणे तीन फुले ठेवून त्यातले एक उचलण्याची विनंती केली. काकांच्या मनातील चाफ्याचे फुल त्यांनी न ओळखता पिवळे झेंडूचे फुल त्यांनी निवडले. मी मात्र पिवळे फुलच मनात धरले होते. ते बाबाच आहेत याची मला अगदी खात्री झाली होती. 

         तरीही मी धुपारतीचे भांडे घेऊनच होतो. त्यांनी मला स्वतःहून हाक मारावी अशी माझी इच्छा होती. माझी इच्छा त्यांना कशी समजली तेच जाणो. त्यांनी काहीवेळातच पहिली मलाच हाक मारली. मी आणि सगळेच अवाक झाले. मी धावतच त्यांच्यापाशी गेलो. त्यांनी मला गोंजारले. मी त्यांच्यापाशी काही दिवस सतत बसून होतो. माझी अपेक्षा त्यांनी पूर्ण केली होती. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मी आणि माझा भाऊ पेलू शकतो हे त्यांना जिवंतपणीच माहिती होते. तरीही त्यांनी दिलेली ही धुरा मी समर्थपणे सांभाळण्यासाठी त्यांचा भक्कम आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असणार याबाबत मी निशंक झालो आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १










Sunday, August 4, 2024

🛑 दूर देशी गेले बाबा

🛑 दूर देशी गेले बाबा

         सलील कुलकर्णी यांच्या अल्बम मधील ' दूर देशी गेला बाबा ' हे गाणे मला खूप आवडत असे. बाबा सोबत असताना हे गाणं ऐकताना त्यातल्या शब्दांकडे कमी लक्ष जाई. सलीलच्या आवाजातील आर्तता मला नेहमीच आवडते. पण आता बाबा नसताना हे गाणं ऐकणं मला तरी कठीण जाईल. 

         लहानपणापासून ज्या बाबांचे बोट पकडून कायमच सगळीकडे जाणारा मी आता या बोटाला पारखा झालो आहे. बाबांचे बोट पकडण्यात एक वेगळ्या प्रकारची आश्वासकता होती. कितीही मोठा झालो तरी बऱ्याच गोष्टी बाबांना विचारल्याशिवाय मी केल्या नाहीत. त्यांचा आदेश शिरसावंद्य मानूनच पुढे जाणे सावधगिरीचे असे याचा मी अनेकदा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. 

         त्यांची आणि माझी सोबत कधीही न संपणारी असेल असे मला वाटले होते. बाबा गेले आणि माझ्यातून एक अदृश्य चैतन्यशक्ती वेगळी होत असल्याची थरथर जाणवते आहे. बाबा म्हणजे काय अदभूत रसायन असतं ना ? 

         आज आई आणि बाबा दोघेही नाहीत. त्यांच्यासोबतच्या अनेक उत्तम आठवणी माझ्याभोवती नुसत्या रुंजी घालत आहेत. त्यातल्या अनेक माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. त्या जपून ठेवणे माझे कर्तव्य आहे. माझे बाबा माझ्यासोबत सतत सोबत्यासारखे पाठीशी राहिलेले आहेत. त्यांच्या केवळ असण्याने माझी अवघड कामेसुद्धा चुटकीसरशी मार्गी लागत असत. आता मात्र मला त्यांची तीव्र उणीव भासत राहणार आहे. 

         त्यांच्यासाठी काही दिवसांपूर्वीच नवा बेड घेतला होता. तो बघून त्यांना किती आनंद झाला होता. त्यावर बसून त्यांचे टीव्ही पाहणे, मोबाईल बघणे, पेपर वाचणे अशी दैनंदिन कार्यें पार पडत. आता तो बेड सुना सुना बघवणार नाही. त्यांनी वापरलेल्या सर्व वस्तूंमध्ये मला ते दिसत राहतील. पहिल्यांदा मला त्याचा त्रास होईल, पण मग त्यांच्या आठवणीच्या कोषात मी रमून जाईनही. हे माझे आताचे दिवास्वप्न आहे. 

         काल बाबा गेल्यानंतरचा दहावा दिवस होता. आम्ही नदीशेजारी स्मशानभूमीत धार्मिक विधीसाठी गेलो होतो. एकही कावळा कुठेही दिसत नव्हता. पिंडाला कावळा स्पर्श करायला येईल अशी सर्वांची इच्छा होती. मी पिंड हातात घेऊन इकडे तिकडे फिरत बाबांना हाका मारत होतो. काव काव, बाबा या हो..... पिंडाला स्पर्श करा ना..... मला एका क्षणाला मोठ्याने हंबरडा फोडावा असे वाटले होते. पण मी स्वतःला सावरलं. माझे बाबा माझे नक्कीच ऐकणारे होते. त्यांनी काकरूपाने येऊन माझ्या हातातील पिंडाला स्पर्श करावा असे वाटत असले तरी मला मुळीच वाईट वाटलेले नाही. त्यांचे माझ्यावर अपार प्रेम होते. त्यांचे पुत्रप्रेम असेच अबाधित राहणार आहे याबद्दल शंका बाळगण्याचे कारणच उरत नाही. 

         कारण स्वतः बाबांनी मला सांगितले होते. ते असेच कधीतरी वाढी ठेवत होते. लहानगा मी त्यांच्या सोबतच असे. ते ' आ आ ' करत होते. एकही कावळा वाढीला स्पर्श करायला आला नव्हता. मी न राहवून बाबांना विचारले होते, " बाबा, आज कावळा का आला नाही? " तेव्हा बाबा म्हणाले होते, " अरे झिला, हे कावळे असेच असतात, कधी येतील, कधी येणार नाहीत, पण आपण आपल्या पूर्वजांना अजिबात विसरायचे नाही. " बाबा आमचे प्रॅक्टिकल होते. ते आधी करत,मगच सांगत. त्यामुळे त्यांच्या सर्व गोष्टी मला पटत. 

         कणकवलीतील आमच्या रूमवर बाहेरच्या कटड्यावर बाबांनी बिस्किटे ठेवताक्षणी कुठूनतरी कावळे येत आणि बिस्किटे वरच्यावर उचलत. बाबांना आणि आमच्या घरातील सर्वांनाच मग दैनंदिन सवयच लागली आहे. देवाचे पूजन झाले की आपण काहीही खाण्यापूर्वी कावळ्यांना बिस्किटे, फरसाण असे खाऊ घालण्यात येते. 

         काल नदीशेजारी एकही कावळा फिरकताना दिसला नाही. कदाचित हे सगळे कावळे कणकवलीला आमच्या खोलीच्या बाहेर बाबांची वाट बघत नसतील ना? किती दिवस खोली बंद आहे. आमचा खाऊ घालणारा कुठे गेला असेल ? 

         आता तेराव्या दिवशी कणकवलीला गेलो कि मी पहिल्यांदा बाबांच्या ' काकमित्रांसाठी ' साद घालीन आणि त्यांना बिस्किटे, खाऊ दिल्याशिवाय मला स्वतःला स्वस्थता लाभणार नाही. माझे दूर देशी गेलेले बाबा सुद्धा त्यांच्याबरोबर यावेत अशी मी माझ्या बाबांच्या पवित्र आत्म्याकडे साश्रू नयनांनी प्रार्थना करतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १



Tuesday, July 30, 2024

🛑 बाबा आमचे शिल्पकार

🛑 बाबा आमचे शिल्पकार

        आमच्या बाबांना अनेक गोष्टींचे ज्ञान होते. ते अंतर्ज्ञानी होते. पुढे घडणाऱ्या घटना त्यांना आधीच समजत. त्यांनी आम्हांला एखादी गोष्ट करु नकोस म्हटले आणि आम्ही ती केली तर ती योग्य होणार नाही याचा मलातरी अनेकदा अनुभव आलेला आहे. 

         एखादी गोष्ट करायला सांगितली तर ती केलीच पाहिजे असा त्यांचा दंडक असे. ती परिपूर्ण होऊन सुद्धा जाई. त्यामुळे बऱ्याचदा मी त्यांच्या नकळत अनेक गोष्टी करत गेलो आहे. यशस्वी झाल्यानंतर मी त्यांना सांगत गेलो आहे. त्यावेळी त्यांना आनंद झालेला दिसे, पण मी त्यांना ती गोष्ट पश्चात सांगितली याचे दुःखही होई. 

         ते आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या यशाचे शिल्पकार आहेत. आमचे सुंदर आणि यशस्वी आयुष्य व्हावे यासाठी त्यांनी अनेक खस्ता खाल्ल्या आहेत. ते अष्टपैलू होते. ते अनेक कौशल्ये जाणत असत. 

         ते उत्तम केशकर्तनकार होते. त्यांनी कात्रीने कापलेले केस नुसते पाहत राहावेत असे असत. केस मिळविण्याची त्यांची पद्धत अप्रतिम होती. त्यामुळे कणकवलीतील अनेक श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब सर्व पातळीचे लोक त्यांचे कायमचे कस्टमर होते. त्यांचे कायमचे कस्टमर आमच्याकडे खूप क्वचित बसत. बाबांचा हात लागला नाही तर त्यांना केस कापल्यासारखे वाटत नसे. म्हणून मीदेखील त्यांचे कस्टमर करण्याचे धाडस करत नसे. बाबांनी अनेकांना आपल्या दुकानात सलून काम शिकवले आहे. मी त्यांचाच शिष्य. सुरुवातीला मला गालाला साबण लावण्याचे काम असे. हळूहळू बाबांची कला माझ्या हातात रूळली. शाळा, अभ्यास, दुकान एवढीच आमची दैनंदिनी असे. अनेक विनंत्या केल्यानंतर आम्हांला कधीतरी खेळायला किंवा सायकल चालवायला पाठवले तर. नाहीतर आम्ही नेहमी बाबांच्या आदेशांचे बांधलेले. 

         टेलरिंग हा त्यांच्या आवडीचा छंद होता. तोही त्यांनी व्यवसाय बनवला. आमच्या दुकानात एक शिलाई मशीन असे. ती खूप जुनी झाली होती. तरीही बाबांनी तिला दुरुस्त करुन करुन वापरले. तिच्यावर त्यांनी जिवंत व्यक्तीवर प्रेम करावे तसे प्रेम केले. बाबा ब्लाऊज, झबली, हाफ पॅन्ट, सदरे, लेंगे, फ्रॉक छान मापात शिवत असत. नाडीची चड्डी स्पेशालिस्ट म्हणून ते प्रसिद्ध होते. अजूनही बाबांचे नाडी चड्डीचे कस्टमर घरी येत. बाबा घरच्या घरी चड्डया शिवून देत किंवा त्यांच्या घरपोच करत. त्यांचे आवडीचे काम असल्याने मी त्यांना बोलत नसे. 

         बाबा कधीही स्वतःसाठी खर्च करत नसत. ते नेहमी कुटुंबासाठी खर्च करत राहीले. खिश्यातील पैसा संपल्यावर त्यांना आनंद होई. मी किंवा भावाने दिलेले पैसे ते परोपकारासाठी खर्च करत. पैसे संपेपर्यंत ते खर्च करीत राहत. 

         बाबा उत्तम मूर्तिकार होते. त्या काळात त्यांनी कणकवली, आंब्रड, गोठणे आणि किर्लोस अशा चार मूर्तिशाळा चालवल्या. त्यांचे हातीकाम बघतच राहावे. आता अनेक मूर्तिकार साच्यांचा आधार घेतात. आमची गणपतीची शाळा म्हणजे त्यांचा अभिमान होता. गणपतींचे डोळे उघडणे म्हणजे अतिशय अवघड काम असे. रात्र रात्र जागरणे करुन बाबा ते काम करीत. दोन्ही भुवया सारख्याच कशा येतात हा मला प्रश्न पडे. त्यांचे हात आणि ब्रश भराभर चालत. 

         ते कविमनाचे होते. चांगले वाचक होते. त्यांनी अनेक पुस्तके त्या काळात वाचून फडशा पाडला होता. त्यामुळे त्यांच्या मुखातून नेहमीच सरस्वती नांदत असे. फक्त जुनी सातवी शिकलेले माझे बाबा जेव्हा बोलत तेव्हा त्यांच्या गोष्टी आम्ही भान हरपून ऐकत असू. 

         आई आजारी असताना तिची सेवा करत असताना बाबांनी आपले आत्मचरित्र लिहायला घेतले. आई गेल्यानंतर बाबांची लेखणी थांबली. सलून मधील त्यांच्या गजाली ऐकायला कणकवली कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे व कणकवली नं. ३ चे उच्चश्रेणी मुख्याध्यापक मारुती पालवगुरुजी मुद्दाम येऊन दोन दोन तास सलग बसत असत. 

         असे आमचे बाबा ज्यांच्याबद्दल मी कधीही लिहायला घेतले की त्यांच्या अनुभवांच्या शाळेतील शिल्पे माझ्यासमोर अशीच नाचत राहतात. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १



Sunday, July 28, 2024

🛑 झिला, माका सोड

🛑 झिला, माका सोड 

         बाबांची तब्येत अचानक बिघडली. बिपी वाढण्याचे निमित्त झाले. वाढत असलेला बिपी आणि त्यांचे पूर्वीचे आजार थांबायचे नाव घेईनात. 

         अगदी काल परवा पर्यंत चांगले चालते फिरते बाबा विविध आजारांनी त्रस्त झाले होते. १० ते १२ दिवसांच्या कालावधीत ते कोमात गेले. 

         हात खांद्यात दुखणे, संडासातून रक्त पडणे, हर्निया हे त्यांचे खूप जुने आजार वयोमानानुसार पुन्हा पुन्हा उद्भवत होते. या आजारांची त्यांनी स्वतः कधीच पर्वा केली नव्हती. त्यांचा त्यांनी नेहमीच हसतमुखाने प्रतिकार केला होता. अचानक बिपी कसा वाढला हे अजूनही आमच्यासाठी असलेलं गूढच आहे. 

         आम्ही बाबांना नेहमीच खुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ते आमच्यावर लहान मुलासारखे प्रेम करीत. बारीकसारीक गोष्टी आम्ही लहान मुले असल्यासारखी समजावून सांगत. आम्ही त्यांच्यासाठी नेहमीच लहान होतो आणि असणार. त्यांच्याइतकं मोठं होणं कधीच शक्य नाही. त्यांनी हे जग सोडून जाणं आमच्यासाठी अपार दुःखाच्या नावेत सतत हेलकावे खात राहण्यासारखं आहे. 

         त्यांनी आम्हाला अनेकदा दुःखाचा वारा लागू दिलेला नाही. संकटात समर्थपणे पाठीशी ठाम उभे राहिले. स्वतः कधीही रडले नाहीत आणि अनेकदा आमचं रडणंही थांबवलं आहे. 

         गेले १० ते १२ दिवस मी सतत त्यांच्यासोबत होतो. त्यांची जितकी सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करत होतो. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना त्यांनी जणू असहकार पुकारला होता. त्यांना आपल्या शरीराला अनेकविध चाचण्या करुन घेतानाही अतिशय वेदना होत होत्या. जे त्यांनी आपल्या शरीराबरोबर कधीही करुन घेतले नव्हते तेच त्यांना करावे लागत होते. आम्हांलाही त्यांना होणाऱ्या यातना सहन होत नव्हत्या. एकदा डॉक्टरांच्या उपचारांच्या कचाट्यात सापडलो की ते सांगतील तसे करत बसण्याशिवाय पर्याय उरत नाही. आमच्या बाबांच्या बाबतीत तसेच घडले. 

         वेगवेगळ्या तीन डॉक्टरांच्या सहा दिवसांच्या उपचार मालिकेनंतर आता प्रेमाच्या सेवेचा उपचार करण्याचे सर्वानुमते ठरले. कोमासदृश्य परिस्थितीत असलेले माझे बाबा अजिबात हालचाल करु शकत नसताना आम्ही घरी आणण्याचा योग्य निर्णय घेतला होता. 

         घरी आणताना रुग्णवाहिकेत बाबांनी डोळे उघडले. अर्थात त्यांना घरीच जायचे होते म्हणून त्यांनी डोळे उघडले असावेत. घरी जाईपर्यंत मी त्यांच्याशी बोलतच होतो. वाटेतील सर्व देवदेवता त्यांना आठवून देण्याचा माझा प्रयत्न मलाच केविलवाणा वाटत होता. माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले होते. 

         अखेर आम्ही बाबांना घेऊन घरी ( घर मठी ) आलो होतो. त्यांच्या स्वतःच्या रूममध्ये त्यांना झोपवले. सर्वांनी त्यांना हाका मारायला सुरुवात केली. पाण्याचे दोन चमचे जिभेवर पडताच बाबांनी पुन्हा डोळे मिटले. श्वास सुरु, हातापायांची गती मंद झालेली, डायपर बदलताना तो स्वच्छ अशी परिस्थिती होती. नाकात घातलेल्या नळीवाटे पेज, पाणी आणि शहाळ्याचे पाणी असेच भरवणे सुरु होते. 

         नेहमीप्रमाणे सकाळ झाली होती. बाबा निश्चलच होते. नातेवाईक, मित्र, गावकरी येऊन येऊन विचारपूस करुन जात होते. नळीत पेज भरवायला घेतली. पेज पोटात जात असताना ती पुन्हा मागे येत असलेली पाहून नाकातील नळी सुद्धा काढून टाकावी लागली. 

         आता बाबा नाकातून श्वास घेतील असे मला वाटले. पण नळी काढली तरी नाकातून श्वास घेणे सुरु नव्हते. बाबा तोंडाने जलद गतीने श्वास घेत होते. अचानक त्याचीही गती मंदावली. त्यांच्या मुखातून कधी काळा तर कधी तपकीरी रंगाचा फेस यायला लागला होता. मी त्यांच्या उशाशीच बसून होतो. रात्री १० वाजल्यानंतर त्यांनी आपली जीभ वळवली. मान दोन्ही दिशांना हलवली. माझ्या काकांनी मला बाबांचे डोके मांडीवर घ्यायला सांगितले. मी डोके मांडीवर घेऊन बाबांना दोन चमचे पाणी भरवताच बाबांनी माझ्या मांडीवरच आपला देह कायमचा ठेवला. 

         डॉक्टरांकडे असताना त्यांना ३५ पेक्षा जास्त सलाईन लावावी लागली. त्यांना ती सहन होईनात म्हणून ते हलू लागले, मोठ्याने हलवू लागले. त्यामुळे त्यांचे हात पाय बांधून ठेवण्याचा पर्याय डॉक्टरांनी निवडला. आम्ही उघड्या डोळ्यांनी बाबांचे होणारे हाल निमूटपणे पाहत होतो. 

         बाबा मला नुसते विनंती करत होते. " झिला, माका सोड, झिला,  माका सोड " मी त्यांना सोडू शकलो नाही. मला त्यांना बरे झालेले बघायचे होते. त्यांना सोडत नव्हतो म्हणून त्यावेळी त्यांना माझा खूप राग आलेला होता. बाबा डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्यामुळे मी त्यांना सोडले नाही. पण घरी आणल्यानंतर ते चारच दिवसात आम्हाला कायमचे सोडून गेले. त्यांचे आम्हा सगळ्यांवर निरतिशय प्रेम होते. त्यांची जगण्याची तीव्र इच्छा होती. सगळी मुले, माणसे प्रत्यक्ष येऊन गेल्यानंतरच त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला आम्हाला पोरके करुन. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १



Saturday, June 15, 2024

🛑 बाबापण भारी देवा

🛑 बाबापण भारी देवा


          माझे बाबा आज अठ्ठयाहत्तर वर्षांचे आहेत. गेली  अठठेचाळीस वर्षे मी त्यांच्यासोबत आहे. आमचे बाबा खूप भारी आहेत. हे फक्त मीच नाही सांगत. आमचे अनेक मित्र आणि नातेवाईक यांनीही त्यांना भारी म्हटलेले आहे. 

          आज फादर्स डे आहे. पूर्वी आम्हांला हे असं काही असतं ते माहित नव्हतं. आमच्यासाठी रोजच फादर्स डे. बाबांनी नेहमीच आम्हांला नवीन काहीतरी सांगितलेलं असतं. ते असं काही शिकवून जातात कि ते कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही. पुस्तकाबाहेरची शाळाच आहेत आमचे बाबा. 

          माझं आणि त्यांचं अनेकदा चांगलंच जमतं. कधीतरी वाद होणं हेही पुढे चांगलं काही घडण्याची नांदी असतात असं मी नेहमीच समजत आलोय. आम्ही बाबांचं नेहमीच ऐकत आलोय म्हणून आज असे आहोत. ऐकलं नसतं तर कुठेही असलो असतो. प्रत्येक वेळी ते आमच्या सोबत असतात. सुखात कमी आहेत असे वाटेल, ते जास्त जाणवू देत नाहीत. पण दुःखात ते अधिक सोबत करतात. 

          ते सतत सत्य बोलतात. खोटे त्यांना आवडतच नाही. आम्ही आजची मुलं सत्य तोंडातच ठेवतो. दुसऱ्यांना चांगलं वाटावं असंच बोलत राहिल्यामुळे सत्य बाहेर पडत नाही हा आमचा दोषच म्हणायला हवा. बाबांचं सत्य बोलणं सर्वांनाच कितपत आवडेल असं आम्हांला वाटत राहतं आणि वाद सुरु होण्यास सुरुवात होते. हे असले वाद तकलादू असतात. ते मजबूत नसतात. त्यामुळे काही मिनिटांत आम्ही पुन्हा होते तसे होऊन जातो. शब्दांचा महापूर कधीच वाहून दूरदूर गेलेला असतो. या शब्दपुराने केलेली पडझड बोलून गेल्यानंतर सतत पिच्छा पुरवत राहते. जन्मदात्या वडिलांना वाईट वाटेल असे बोलणे खरंच समर्थनीय नाहीच. अशा मुलांना शिक्षा भोगावी लागणारच. तरीही आई बाळाला आपले काळीज देत असते, तसे बाबा आपले हृदय द्यायला नेहमीच तयार असतात. 

          मी त्यांची काळजी कितीवेळा घेतली आहे ते मोजत बसलेलो नाही. पण त्यांनी माझी नेहमीच काळजी घेतलेली आहे. मी कधी, कुठे गेलो आहे, काय काय करतो आहे, हे सर्व त्यांना माहित असावंच लागतं. ते माझ्याकडे असतात तेव्हा त्यांना ते माहिती असतंच. पण ते दुसरीकडे कुठे गेले असतील तर माझ्या पत्नीला फोन करुन रोजची खुशाली घेतल्याशिवाय राहणार नाहीतच. 

          हल्लीच माझे डोळ्याचे ऑपरेशन झाले. मला सुट्टी असल्यामुळे मी घरातच होतो. ऑपरेशन करणं सोपं असतं. पण त्यानंतर तीन महिने सतत ड्रॉप घालत राहणं अवघड असतं. बाबांनी ते काम नेहमी लक्षात ठेवून केलेलं आहे. माझ्या लक्षात नसेल त्यावेळी त्यांनी आठवण करुन ड्रॉप घातला आहे. बाहेर जाता येताना काय काळजी घ्यायची हे डॉक्टरांपेक्षा त्यांनी मला जास्त समजावून सांगितले आहे. 

          मीही आता एक पालक आहे. तरीही त्यांच्यासारखा पालक होणे आम्हांला जमेल असे अजिबात वाटत नाही. नोकरी असल्यामुळे आम्ही आज जे करु शकत आहोत, ते त्यांनी नोकरी नसताना करुन दाखवलं आहे. त्यांचे अनेक मित्र त्यांची आठवण काढत असतात. अजूनही माझे बाबा आपल्या जिवलग मित्रांना भेटायला जातात. फोन करतात. आम्हांला एवढे जमत नाही म्हणून आम्ही त्यांच्यावर त्रागा करतो. 

          आज सीसीटीव्ही कॅमेरे असतात. बाबांचं आमच्या वर्तनावर त्यापेक्षा जास्त पटीने लक्ष असतं. आमच्याकडून काहीही चुकीचं घडू नये यासाठी त्यांचा आटापिटा असतो हे आमच्या लक्षात येत नाही. दोन पिढ्यामधील हे अंतर आम्हांलाही पुढे त्रास देणार आहे हे आम्हांलाही आता कळू लागलं आहे. 

          बाबांचा धाक आणि आईचं निष्पाप प्रेम आम्हांला सुसंस्कारीत करुन जाण्यासाठी महत्वाचं ठरलं आहे. लहान असताना माझ्या डोळ्यात नीज दाटून आल्यानंतर त्यांच्या छातीत घुसून झोपणारा मी अजूनही त्यांच्यासाठी तेवढाच लहान आहे हे सांगताना माझे दोन्ही डोळे पाण्याने भरुन आले आहेत हे अगदी सत्य आहे. 


©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. 1

Tuesday, August 2, 2022

🛑 गणपतीची शाळा

🛑 गणपतीची शाळा

          दर नागपंचमीला आम्ही घरी किर्लोसला जातो. आज नागपंचमीला मी माझ्या कुटुंबासह घरी आलो. जुन्या सर्व आठवणी प्रत्येक पावलाला येत होत्या. छोट्या उर्मीला गृहपाठ म्हणून नागोबाचे चित्र रेखाटून दिले. तिनेच सांगितले , " पप्पा , मला आमच्या घरातल्या भिंतीवरचा नागोबा काढून द्या. " पूर्वीच्या घरी भिंतीवर दरवर्षी नागोबा काढला जात असे. जमिनीवर चुन्याची रांगोळी काढली जाई. माझी मोठी आत्या छान रांगोळी काढत असे. गावाकडे या रांगोळीला ' कणे ' असा शब्द वापरत. मालवणीत त्याला ' कनो ' असेही म्हणत. सुंदर रांगोळी बघत राहावीशी वाटे. स्वच्छ आणि पांढरीशुभ्र रांगोळी हिरव्यागार शेणाने सारवलेल्या जमिनीवर उठून दिसत असे. चुन्यात तीन बोटे बुडवून त्यातून तयार झालेली ती कलाकृती असे. याच चुन्याच्या रांगोळीपासून भिंतीवर ' नागोबा ' काढला जाई. आता असे चुन्याचे नागोबा क्वचित पाहायला मिळत असावेत.

          सिमेंटच्या घरांमुळे टाईल्सचे रेडिमेड नागोबा भिंतीवर चिकटले आहेत. ते तसेच दरवर्षी दिसत राहतात. त्यात कोणताही जिवंतपणा दिसत नाही. 

          आम्ही लहानपणी आमच्याच गणपतीच्या शाळेत नागोबा बनवत असताना जी मज्जा केली आहे ती आताच्या मुलांना अनुभवायला मिळते आहे. आमचा मयुरेश आणि उर्मी दोघेही मातीचे नागोबा करण्यात दंग होऊन गेले आहेत. बाबा , काका आणि माझा भाऊ गणपतीच्या मूर्तींवर शेवटचे हात फिरवत आहेत. यंदा आमच्या शाळेत पस्तीस गणपती तयार करुन झाले आहेत. दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी गणपतीचे पाट आणून ऑर्डर देण्याची जुनी पद्धत आहे. ती अजूनही तशीच सुरु राहिली आहे. आमच्या सर्व मूर्ती शाडूच्या मातीच्या असतात. मातीची किंमत महाग झाल्याने मूर्ती स्वस्त देता येणे शक्य नाही. ज्यांना परवडत नाही ते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या हलक्या मूर्ती असलेल्या शाळांची वाट चोखाळतात. पण या मूर्ती पर्यावरण पूरक नसतात हे त्यांना कुणी सांगायचे ? 

          गणपतीची शाळा चतुर्थीपर्यंत कायमस्वरूपी उघडलेली असते. आपला तयार होत असलेला गणपती पाहायला लोक येत राहतात. त्यात काही बदल करावयाचा असल्यास सुचना करत राहतात. बिचारे आमचे मूर्तीकार काका त्यांचे ऐकून त्याप्रमाणे करायला नाईलाजाने तयार होतात. आम्हाला प्रत्येकाला सुबक मूर्ती द्यायची असते. गेली पन्नास साठ वर्षे ही मूर्तीकला जोपासणारे माझे कुटुंब आमच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. गणपती रंगवताना तर रोजची गर्दी असते. दुसऱ्या गणपतीपेक्षा आपला गणपती सरस दिसावा असे प्रत्येकाला वाटत असते.

          पूर्वी पार्वती गणपती , शंकर पार्वती गणपती , गाय गणपती , राधाकृष्ण,  वाघावर , सिंहावर , उंदरावर , गरुडावर बसलेला गणपती , सिंहाचा जबडा उघडणारा गणपती , शिवाजी , राक्षसाला मारत असलेला गणपती , राम लक्ष्मण सीता , दत्ताचा अवतार , कंसवध , शेष गणपती , मयुरेश आणि असे अनेक प्रकारचे गणपती असत. आता हे प्रमाण कमी झाले आहे. साईबाबा , बालगणेश , कमळातील , फुलातील गणपती , सिंहासनाधिश्वर , फेटेवाला , उभा गणपती , लालबागचा गणपती , टिटवाळा गणपती , दगडूशेठ , चिंतामणी , बाहुबली , मंगलमूर्ती असे अनेक प्रकार सध्या बघायला मिळतात. ग्राहकांना स्वस्त आणि मस्त गणपती हवा असतो. काही हौशी ग्राहक किमतीकडे बघत नाहीत. तुम्ही सांगाल ती रक्कम न बोलता निमूटपणे देतात. नारळ , विडा ठेवून नेहमीची रक्कम ठेवली जाते. वाढलेली जादा रक्कम मूर्तिकाराच्या हातात दिली जाते. काही गरीब हौशी ग्राहकांच्या मनात असूनही चतुर्थीला गणपतीचे पूर्ण पैसे देणे त्यांना जमत नाही. त्यांचा गणपती पाण्यात गेला तरी पैसे जमा व्हायचे बाकीच असतात. मूर्तीकारांना हा आर्थिक फटका बसत असला तरी गणपती त्यांना सुखात ठेवतो हे अगदी खरे आहे. त्याचे अकरा दिवस तरी मजेत जातात. 

          श्रावण महिना पाळणारे लोक केस दाढी करत नाहीत. त्यामुळे आमच्या सलूनमध्ये कमी काम असे. त्यामुळे गणपतीची शाळा सुरु ठेवणे हे बाबांना अतिशय गरजेचे बनले होते. एका वर्षी तर आमच्या पाच ठिकाणी ' गणपतीच्या शाळा ' होत्या.  त्यावेळी बाबांची आणि काकांची जी धावपळ चाले ती मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. 

          आमचा ' घरचा गणपती ' आमच्याच शाळेतला असे. तो नेहमीच मोठा असे. सोबत देखाव्याची चित्रे बाबा बनवत. ट्रिक सिन नसला तरी शेजारच्या गावातील शेकडो गणपतीप्रेमी आमचा गणपती मुद्दाम पाहण्यास येत. कधी अकरा दिवस , कधी एकवीस दिवस आमच्या घरातील जल्लोष संपता संपूच नये असे वाटत राही. 

          इंग्रजी शाळांमुळे जशी जिल्हा परिषद शाळांमधील मुलांची पटसंख्या कमी झाली आहे , तशीच पिओपीच्या मूर्तीशाळांमुळे आमच्यासारख्या पर्यावरणपूरक गणपतीच्या शाळांमधील गणपतींची पटसंख्या कमी कमी होत चालली आहे ही प्राथमिक शाळांसारखी गणपती शाळांचीही शोकांतिका आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली.









Saturday, June 11, 2022

🛑 ताटारो

🛑 ताटारो

          माणसं जशी माणसांवर प्रेम करतात , तशी वस्तूंवर प्रेम करतात. सतत वापरावयाच्या वस्तू आपल्या प्रिय होऊन जातात. त्यावर आपला जणू जीवच जडत असावा. ती वस्तू दिसली नाही तर त्यांच्या जीवाचा आटापिटा होईल. एवढे प्रेम कुठून येते ? निर्जीव वस्तूत जीव अडकवून आपण आपलं समाधान करुन घेत असतो का ? 

          गृहिणीचा जीव स्वयंपाकघरात असलेल्या भांड्यांवर असतो. कारभाऱ्याचा जीव घरातल्या इतर निर्जीव वस्तूंवर असतो. मग हळूहळू त्यांचा जीव जमिनीवर , घरावर आणि घरातल्या डेडस्टॉकवर कधी जडू लागतो ते त्यांनाच कळत नाही. 

          आमच्या लहानपणी शाळेत जाणारी आम्ही पाचजणं होतो. त्यामुळे आम्हाला प्रत्येकाला छत्री हवी असे. पावसाळा आला की छत्री किंवा रेनकोटसाठी आमच्या मागण्या वाढत असत. एका छत्रीत दोन दोन भावंडे शाळेत जाताना मजा येई. दोघांच्याही एक एक बाह्या भिजून जात. शाळेपासून जवळ खोली असली तर एवढा त्रास होत नसे. त्यावेळी आम्हांला तो त्रासच वाटत नसे. आता बारीकसारीक गोष्टीत त्रास का जाणवतो हा सुद्धा सतत भेडसावणारा प्रश्नच आहे. त्यावेळीच्या त्रासाचा बाऊ होत नसे. आता मात्र जरा त्रास झाला की आकांडतांडव होऊ लागते. 

          छत्र्यांवर नावे लिहिण्याचे काम मी करायचो. शाळेतून आलो की कोणाच्या छत्र्या आल्यात का बघायचो. त्यावेळी छत्रीवर नाव लिहून दिले की एक किंवा दोन किंवा जास्तीत जास्त पाच रुपये मिळत. हे पैसे आम्हाला वह्या घेण्यासाठी उपयोगी पडत. आमच्या सलूनमध्ये येणारी आमची गिऱ्हाईके चांगली होती. मला पैसे मिळावेत म्हणून ती आपल्या जुन्या छत्र्यांवरदेखील नावे लिहून घेत. मला दिवसाला शाळा करुन चौदा पंधरा रुपये मिळत. 

          माझे अक्षर पाहून लोक मला शाबासकी देत. त्यांचा प्रेमाचा दृष्टीक्षेप आम्हाला प्रेरणा देत राही. आम्ही त्यांच्यामुळे घडलो हे सांगताना मला आणखीच अभिमान वाटत आहे.

          दरवर्षी आम्हांला नव्या छत्र्या मिळण्याची शक्यता असे. एखादी चांगली छत्री दोन वर्षे वापरुनही बाद होत नसे. कदाचित त्यावेळच्या छत्र्या मजबूत असाव्यात. मला रंगीबेरंगी छत्री आवडे. पण ती लेडीजने वापरायची असते असे सांगण्यात येई. त्यामुळे आमची छत्री नेहमी काळी आणि काळीच असे. 

          पूर्वी इंग्रजी जे आकाराच्या दांड्याच्या छत्र्या टिकाऊ असत. त्या सुद्धा आम्ही वापरत असू. एकावेळी तीन व्यक्तीसुद्धा त्यात सहज मावत. धोतरवाल्या आजोबांच्या हातात ही छत्री कायमची असे. अजूनही बाजारात अशा छत्र्या मिळतात. सध्या अशा छत्र्या वापरणाऱ्यांचे प्रमाण बरेच कमी झालेले आहे. 

          आमच्या घरात त्यावेळी अशा दोन छत्र्या होत्या. एक आईसाठी आणि एक बाबांसाठी. आईची छत्री जास्त वापरली जात नसे. त्यामुळे तिचे आयुष्य वाढत राही. पाच पेक्षा जास्त वर्षे एकच एक छत्री आईने वापरली असेल. 

          बाबांना त्यांची छत्री परमप्रिय होती. ते ती कोणालाही देत नसत. त्या छत्रीचा खूपच वापर होत असे. त्यामुळे ती वापरुन वापरुन जीर्ण झाली होती. डॉक्टर उपचार करुन किंवा प्रथमोपचार करुन बाबा ती नेहमी ठिकठाक करुन वापरत असत. कितीही काहीही केले तरी ती जुनी ती जुनीच असे. तिच्यावर बाबांचे निरतिशय प्रेम होते. तिला त्यांनी एक नाव ठेवले होते. त्या छत्रीला ते ' ताटारो ' असे म्हणत. या ताटाऱ्याने बाबांना नेहमी इमानेइतबारे सुके ठेवले. आता बाबांकडे बटन असलेली छत्री आहे. पण त्यांचे त्या ताटाऱ्यावरील प्रेम काही अजूनही कमी झालेले नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



Wednesday, January 19, 2022

🛑 खांडुक

 🛑 खांडुक

          सायकल ही आमची त्यावेळची सफारी होती. सायकल चालवायला शिकताना खूप गमती जमती घडल्या. बाबांची मोठी सायकल होती. ती चालवणे सोडाच , पण ती आमच्या जीवनीला झेपलीही नसती इतकी जड होती. कधीतरी दोन्ही हातांनी हँडल धरुन गोल गोल फिरवणे व्हायचे. त्याच्यापुढे जाता येत नव्हते. 

          तेली आळीत नेरकरांचे सायकलचे दुकान होते. तिथे तासाच्या भाड्याने छोट्या सायकली चालवण्यासाठी मिळत असत. एक तासाचे एक रुपया भाडे असे. आम्हाला एक रुपया मिळाला कि मी आणि माझा भाऊ दोघे सायकल सवारीसाठी निघत असू. " नीट सायकल चालवा रे बाबांनो " हे बाबांचे व आईचे वाक्य दहा वेळा ऐकून आम्हाला बाहेर पडावे लागे. आम्ही एकमेकांची जबाबदारी घेत असू. छोटी सायकल असल्यामुळे दोन्ही बाजूंना पाय पोहोचत असत. छोटा भाऊ मागून धावत धावत येत असे. मी पडत असताना त्याने अनेकदा मला पकडले आहे. आता मोठेपणीही तो माझ्या कायम पाठीशी असतो. आता जीवनरुपी सायकल चालवतानाही माझा भाऊ मी कुठे कमी पडणार नाही किंवा तोंडघशी पडणार नाही याची काळजी घेतो. खरंच, हा आधार खूप काही देऊन जातो. 

          विद्यामंदिर कणकवलीचे मैदान मोठे होते. त्यावर आम्ही सायकलचे राऊंड मारत असू. एक तास सायकल फिरवतानाचा आनंद इतका असायचा कि आता विमान चालवतानाही तो येणार नाही. पण तास संपत आला की वाईट वाटायचे. सायकल परत नेऊन द्यावी लागे. पुन्हा कधी एक रुपया सायकलीसाठी मिळणार तेव्हाच सायकल चालवायला मिळे. तोपर्यंतची प्रतिक्षा करणे फार अवघड असे. 

          सायकल चालवता येऊ लागल्यानंतर आत्मविश्वास वाढतच गेला. कोणाचीही सायकल दिसली की त्यावर बसून एखादातरी फेरफटका मारावा असे वाटत राही. पण सायकल पोटावर पाडून घेऊ ,  या भीतीने कोणीही आम्हाला सायकल चालवायला देण्याचे धाडस करत नसत. 

          एकदा बाबांची मोठी सायकल  घेऊन मी एकटाच विद्यामंदिरच्या दिशेने निघालो. तरी बाबा नको म्हणत होते. येतो पटकन , असं म्हणत मी निघालो तो क्षणात दिसेनासा झालो. 

          विद्यामंदिरच्या प्रवेशद्वारापाशी महाराजा नावाचे हॉटेल आहे. तिथे मी आलो असेन. माझा अचानक तोल गेला. सायकल माझ्या पोटावर पडली होती. मी सायकलला बाजूला घेण्याचा प्रयत्न करत असताना कोणीतरी मला उचलले होते. सायकल मात्र बाजूला माझी फजिती बघत उभी होती. मला उचलताना कोणीतरी सायकलला व्यवस्थित स्टँडवर लावून ठेवले होते. मला त्यावेळी त्या सायकलचा वैतागथोर राग आला होता. 

          डाव्या पायाचे ढोपर चांगलेच खरचटले होते. त्यातून रक्त ओघळत होते. एक रुपयाच्या नाण्याएवढी त्वचेची साल निघाली होती. मला रडायला येत होतं , पण रडूही शकत नव्हतो. हॉटेलच्या मालकांनी मला ओळखले होते. ते आता बाबांना माझा हा पराक्रम सांगणार त्यामुळे तर मला जास्तच रडू फुटत होते. पण मी ते आवरले आणि सायकल घेऊन तडक निघालो. वाटेत एका ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले दिसले. त्या पाण्याने खरचटलेला पाय चांगला धुवून घेतला. ते पाणी चांगले नव्हते , पण माझे काहीच झाले नाही असे मला बाबांना दाखवायचे होते. म्हणून मी तशी आयडियाची कल्पना लढवली होती. 

          आता मी दुकानात गेलो आणि गप्प बसलो. पण मी गप्प बसलेला पाहून तर बाबांनी मला लगेच ओळखले. त्यांना झालेला प्रकार अखेर सांगावाच लागला. त्यांनी मला त्यावेळी केलेले फायरिंग मला हुमसून हुमसून रडू आणणारे होते. त्यांनी मला डॉक्टरकडे अजिबात नेणार असे सांगितले. मी रात्रभर झोपलो नव्हतो. दुसऱ्या दिवशी बाबा मला चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. मी आपला लंगडत लंगडत चालत होतो.

          काही दिवसांनी ती जखम बरी झाली असे वाटले. शाळेत परिपाठाच्या अगोदर मुले धावत असताना एक आडदांड मुलगा मला येऊन मोठ्यांदा आदळला. ती जखम पुन्हा फुटली. त्याचे मोठे खांडुक झाले. ते बरे होता होत नव्हते. मी त्याची खूपच काळजी घेत होतो. त्यामुळे ते बरे व्हायचे विसरुन अधिक चिघळत चालले होते. त्या खांडकाने माझी झोपच उडवून टाकली होती. त्यांच्यावरचे मांस वाढत चाललेले दिसत होते. शेवटी तेवढ्या भागाला भूल देऊन शस्त्रक्रियेने वाढलेली जखम कापून टाकावी लागली. दररोज ड्रेसिंग करायला जावे लागे. पट्टी काढताना जीव जाई. त्यावेळी मला खूप पथ्य पाळावे लागले होते. पिवळं दूध आणि चपाती एवढाच माझा आहार होता. डॉक्टरांना दरवेळी द्यायच्या पैशांचा हिशेब करत माझे काका मला चिडवायचे. तीनशे रुपये आणि दूध असे ते मला चिडवत त्यावेळी मला त्यांचा राग येई. 

          असे हे माझे सुप्रसिद्ध खांडुक लवकरच पूर्ण बरे झाले तरीही आपली खुणा काही त्याने सोडली नाही. अजूनही माझ्या ढोपरावर ते मला वाकुल्या दाखवत आहे असे वाटत राहते. 

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )



Friday, December 31, 2021

🔴 सुपारी

          🔴 सुपारी

         लहानपण खरंच निरागस असतं. हट्ट करायला मिळतो. हट्ट पुरवले जातात. लगेच नाही पुरवले गेले तरी कधीतरी पूर्ण होण्याची शक्यता असते. तेव्हा कसं केव्हाही हट्ट करता येत असतो. पण जसे मोठे आणि समंजस होत जातो , तसे हट्टीपणा सोडण्याचे सल्ले दिले जातात. मीही हट्टीच होतो. आमचे अनेक हट्ट बाबांनी आणि आईने पुरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केलेला होता. आम्ही पाच भावंडे असल्याने आमच्या पालकांचीही आमचे लाड पुरे करताना दमछाक होत असे. ऐपतीप्रमाणे आमचे लाड केले गेले. मागणीप्रमाणे सर्व मिळाले नाही तरी निदान आम्ही मागणी तरी करु शकत होतो. आमची शैक्षणिक वस्तुंची मागणी आधी पूर्ण केली जात असे. इतर मुलांच्या सुविधा बघून आम्ही केलेली मागणी तात्काळ धुडकावून लावली जात असे. आम्ही आमच्या रास्त मागण्या आईमार्फत बाबांपर्यंत पोहचण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहू. तेव्हा कुठे महिन्यातून एखादी मागणी पूर्ण होण्याची चिन्हे दिसू लागत. 

          त्यावेळी स्वस्ताई होती. आजसारखी महागाई नव्हती. ५ पैशाची लिमलेटची गोळीही आम्हाला आनंदी ठेवत असे. बाबांनी बाजार आणायला सांगितला कि आम्हाला ५ किंवा १० पैसे हमखास मिळत. फक्त त्याचे चांगले खाऊ आणावे लागे. काहीतरी आणून खात असलेले दिसलो की मार पडलाच म्हणून समजा. 

          एकदा मला खाऊसाठी २० पैसे मिळाले. बाबांनी मला खाऊ आणण्यासाठी पाठवले. मी धावतच कांबळी गल्लीच्या शेजारी असलेल्या छोट्या पानपट्टीच्या दुकानात गेलो. तिथे मिलन नावाची सुपारी मिळत असे. आमच्या शाळेतली बरीच मुले ती मधल्या सुट्टीत खाताना मी बघायचो. पण प्रत्यक्ष खाण्याची संधी मला मिळाली नव्हती. आता ती संधी मिळाली होती. मी २० पैशाच्या २ मिलन सुपारी घेतल्या. एक खिश्यात ठेवली. दुसरी फोडली आणि खात खात किंवा चघळत चघळत आमच्या दुकानात आलो. आमच्या सलूनात तेव्हा दोन तीन गिऱ्हाईके बसली होती.  ती माझ्या चांगली ओळखीची होती. मी सुपारी खात आलो होतो , हे त्यांनीही बघितले आणि बाबांनीही. सुपारी लाल रंगाची असल्यामुळे माझे तोंड पोपटाच्या चोचीसारखे लालभडक झाले होते. 

          बाबांनी माझ्या तोंडाकडे पाहिले. मी सुपारी खाऊन आल्याचे पाहून बाबांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी मला तिथेच कानफटात लगावून दिली. अचानक झालेल्या हल्ल्याने मला रडताही येईना. पण ओळखीच्या माणसांसमोर रडणार तरी कसे ? कायम मारल्यानंतर भोकाड पसरुन रडणारा मी अगदी शांत कसा राहिलो हेच मलाही समजेना. 

          माझी मलाच लाज वाटू लागली होती. पुन्हा सुपारी घ्यायची नाही अशी मला सक्त ताकीद देण्यात आली. मीही ती पुढे पाळली. त्या बालवयात मला वेळीच शिक्षा मिळाल्याने मी पुन्हा मिलन सुपारी घेण्याच्या फंदात कधीच पडलो नाही.

          आमच्या दुकानात पानाची तबकडी होती. आजोबा , बाबा , काका पान खात असत. हे आमच्या गिऱ्हाईकांनाही माहीत होते. काही गिऱ्हाईके केवळ पान खात आणि निघून जात. पण आमच्या बाबांनी त्यांना लोभ लावला , त्यामुळे अशी ही गिऱ्हाईके आमची कायमची बनून गेली. आम्हां पाचही भावंडांना नावासह ओळखू लागली. 

          सतत पानाचे तबक , तबकडी समोर असूनही आम्हाला कोणालाही पानाचे किंवा कसलेही व्यसन लागले नाही. 

          गावच्या घरी गेल्यावर आमची आजी खूप प्रेमाने सुपारीचा छोटा तुकडा पुढे करत असे. तिच्या प्रेमापोटी आम्ही तो तुकडा थोडासा चघळून फेकून देऊ. पण व्यसन लागू दिले नाही. आम्ही आता मोठे झालो तरीही पानाचा डबा अजून आमच्या घरी सुरुच आहे. 

          बाबांनी दातांमुळे पान , तंबाखू सोडून दिली आहे. लहर आली तर कधीतरी सुपारी खातात. तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम सांगितले तरी आमची गावाकडील घरची पान खाणारी माणसे पान सोडू शकत नाहीत या गोष्टीचे दुःख वाटते. मी स्वतः तंबाखूमुक्त शाळा अभियानात सहभागी झालो. प्रदर्शनात तालुक्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले तरी घरातील माणसांच्या बाबतीत कोरा तो कोराच राहिलो आहे.

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )



🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म           "आपल्यामध्ये धर्म आचरणाचा गुण असायला हवा," असे माझी आजी नेहमी सांगायची. ती केवळ सांगायची...