Monday, June 5, 2023

🛑 गोष्टींचा तास

🛑 गोष्टींचा तास

          माणसांना गोष्टी खूप आवडतात. गप्पा मारता मारता त्यातून कधी कधी गोष्टींची निर्मिती होते. जुन्या गोष्टी ऐकताना त्या ऐकत राहाव्यात असे वाटत राहते. गोष्टींचा कधी कंटाळा येत नाही. 

          गोष्टी सांगणारा म्हणजेच स्टोरीटेलर. त्याला गोष्ट कशी वाढवावी हे माहिती असते. गोष्टींमध्ये रंगत आणणे ही एक कला आहे. गोष्ट सांगणे आणि गोष्ट खुलवून सांगणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गोष्ट खुलवून सांगता यायला हवी. 

          आपल्या समोर असलेल्या मुलांचा वयोगट लक्षात घेऊन गोष्टींची निवड करावी लागते. त्यातील विविध उदाहरणे देताना ती त्यांच्या परिचयाची हवीत. तर ती मुलांच्या हृदयाचा ठाव घेतात. मुलांचं लक्ष एकाग्र करणं ही आजच्या काळातील अतिशय अवघड गोष्ट होऊन बसली आहे. त्यांना त्यांच्या बालविश्वात फिरवून आणण्याची कला स्टोरीटेलरमध्ये असावी लागते. 

          मुलांना बोलते करत , त्यांच्याशी त्यांच्या वयातील होऊन संवाद साधला तर मुले पटकन एकरुप होतात असा अनुभव आहे. त्यांना प्रेरणा देत गोष्ट पुढे घेऊन जायला लागते. त्यांच्या बालमनावर आघात करणारी गोष्ट सांगणे बरोबर नसते. डोळ्यांतून पाणी आणणारी गोष्ट सांगितली तरी हल्लीच्या मुलांच्या डोळ्यांतून पाणी आणताना स्टोरीटेलरच्या डोळ्यांतून पाणी येऊ शकते. मुलांच्या संवेदना कमी झाल्यात की काय असा प्रश्न पडतो. 

          विष्णु शर्माच्या पंचतंत्रातील नितीपर गोष्टी आम्हाला त्यावेळी खूपच आवडत. आम्ही त्या पुनःपुन्हा वाचत असू. इसापची इसापनीती आम्हाला नीती शिकवून गेली. त्यातील प्राणी , पक्षी आमचे मित्र झाले. 

          श्यामची आई हे सानेगुरुजींचं पुस्तक आमच्या नितांत आवडीचं होतं. ते कितीवेळा वाचलं असेल ते सांगता येत नाही. पुनःपुन्हा वाचण्याइतकी या पुस्तकाची स्टोरी आहे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी तर तिला ' आईचं महान आणि मंगल स्तोत्र '  म्हटले आहे. 

          मुलांची श्रवण क्षमता म्हणजेच ऐकण्याची क्षमता अधिक विकसित होण्यासाठी , शब्दसंग्रहात भर पडण्यासाठी सकस गोष्टींची खूप गरज असते. मुलांना पूर्वी आजोबा , आजी गोष्टी सांगत असत. आज या गोष्टींची मुलांना उणीव भासू लागली आहे. मग मुलांना युट्युबवर ' आजीच्या / आजोबांच्या गोष्टी ' शोधाव्या लागत आहेत. या संस्कारी गोष्टी शोधता शोधता दुसरेच काहीतरी निकृष्ट दर्जाचे सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संस्कारक्षम वयात मुलांनी काय बघावे आणि काय बघू नये हेही आता पालकांच्या हातात राहिलेले नाही. जे दिसेल ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा मोबाईलमधील डेटा संपेपर्यंत मुले नुसते पाहात आणि ऐकत आहेत. काय चांगले आणि काय वाईट ते समजून सांगताना पालकांनी माघार घ्यायला सुरुवात केलेली दिसते आहे. 

          जुन्या बालभारतीच्या पुस्तकांमध्ये खूप चांगले धडे होते. त्या गोष्टीच होत्या. त्यांचे आपण अजूनही वाचन करताना खूप आनंद होतो. ही पुस्तके बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यांचा वापर मुलांनी , पालकांनी आणि विशेषतः शिक्षकांनी करायला हवा. दिवसभरातील हा गोष्टींचा हा एक तास मुलांचा त्रास कुठल्या कुठे पळवून लावील हे नक्की. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , शिडवणे नं.१

No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...