Sunday, June 4, 2023

🌏 शिक्षक झालो म्हणून

  🌏 शिक्षक झालो म्हणून

लहानपणापासून प्रत्येकाला कोणीतरी होण्यासाठी प्रयत्न केले जातात. प्रत्येकजण काहीतरी करणारच असतो. काय होणार ? कोण होणार ? हे कोणाला माहिती नसते. " तुझे बाबा डॉक्टर आहेत , म्हणून तुला डॉक्टर व्हायला लागेल. नाहीतर हा एवढा मोठा डोलारा कोण सांभाळणार ? " अशी वाक्यं ऐकायला मिळतात. मग त्या मुलाला डॉक्टर होण्याशिवाय पर्याय उरत नाही. शेवटी उपजीविकेचे साधन म्हणून डॉक्टरी पेशा त्याला स्विकारणे भाग पडते. असेच इतर सर्व बाबतीत घडत असावे.
शिक्षक शिक्षिका असलेल्या आईबाबांना आपली मुलं शिक्षण क्षेत्रात किंबहुना शिक्षकी पेशात पाठवायला कितपत आवडतील हा सुद्धा एक प्रश्नच आहे. त्यांचा पाल्य आपल्या आईबाबांची वाटचाल बघत असतो. त्यामुळे की काय त्याला तो व्यवसाय स्वतःहून स्वीकारावासा वाटत नाही. ते म्हणतात , " शिक्षकी व्यवसाय सोडून मी दुसरे काहीही करेन. " आईबाबा सुद्धा त्याला दुजोरा देत असतील. कारण त्यांनी भोगलेले त्यांच्या मुलांनीही भोगावे असे त्यांनाही वाटत नाही. त्यांचा हाच उद्देश असेल , इतर कोणता उद्देश असेल असे वाटत नाही.
शिक्षकी पेशा हा पेशा आहे. तो धंदा नाही. ते एक समाजव्रत आहे. ते स्वीकारणे सोपे असू शकते , पण जोपासणे कठीण असू शकते. आपण या शिक्षकी पेशाला योग्य न्याय देऊ शकलो नाही तर त्याचा आपल्यालाच त्रास होऊ शकतो.
' थ्री ईडीएट्स ' चित्रपटात एका मुलाला फोटोग्राफीची आवड असूनही वडिलोपार्जित व्यवसाय करण्यासाठी आग्रह धरला गेला. त्याला वडिलांच्या व्यवसायात अजिबात रस नव्हता. ज्यावेळी त्याचे वडीलच त्याला फोटोग्राफी करण्याची परवानगी देतात तेव्हा तो आपल्या करारी वडिलांना घट्ट मिठी मारुन आपला आनंद व्यक्त करतो.
मला लहानपणी जेव्हा प्रश्न विचारला जाई , " तू मोठेपणी कोण होणार ? " तेव्हा माझे उत्तर ठरलेले असे. " मी इंजिनिअर होणार ... " इंजिनिअर म्हणजे कोण ? हे मला त्यावेळी माहितीही नव्हते. कोणीतरी सांगितले होते म्हणून मला तसे बनायचे होते. माझे स्वतःचे त्यावेळी नक्की कोणते मत होते ते सांगणे कठीण आहे.
मी शिक्षक झालो आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न हवेत विरुन गेले. मी इंजिनिअर झालो नाही ते एका अर्थाने बरेच झाले. कारण शिक्षक झाल्यामुळे माझ्या हाताखालून अनेक इंजिनिअर बनू शकले आहेत.
मी शिक्षक झालो म्हणून मला आज आदर मिळतो आहे. शिक्षक नसतो तर हा आदर नक्कीच मिळाला नसता. हल्ली या आदराचे प्रमाण खूप कमी झाले आहे. शिक्षकाला अध्यापनाव्यतिरिक्त कामे करावी लागत असल्याने त्याचे हे असे झाले असावे. कोणीही शिक्षकांबद्दल काहीबाही बोलू लागले आहेत. त्यात चांगलं कमी आणि बोचेल असे जास्तीचे आहे. त्यामुळे आपली अशी समाजात होणारी अवहेलना पाहून तो ' दीन ' होत चालला आहे.
कितीही चांगले काम केले तरी शाबासकीची थाप मिळणे दुर्मिळ झाले आहे. अर्थात अपवादात्मक असू शकेल , पण हे प्रमाण कमी झाले आहे असे राहून राहून वाटते.
आजही शिक्षक दिनानिमित्त अनेकांचे शुभेच्छा संदेश येतात. फोन येतात. हे लिहीत असतानाच मला एक फोन आला. त्यांनी मला शिक्षक दिनाच्या मनस्वी शुभेच्छा दिल्या. मी भरुन पावलो. मी त्यांना शिकवलेच नव्हते , तरीही त्यांनी मला फोन केला होता. त्यांनी मला वैयक्तिक फोन केला असला तरी मी तो सर्व शिक्षकी पेशालाच फोन आला होता असे समजतो. अजूनही कुठेतरी शिक्षकांबद्दल आदर जिवंत असल्याचे ते एक उदाहरण आहे. प्रत्येकाने असाच शिक्षकांबद्दलचा आदर दाखवण्याची गरज आहे. शिक्षकांच्या पाठीशी राहण्याची गरज आहे.
आपल्या शिक्षकांनी जर आपल्या लेकरांना शिकवायचे असेल तर जनमानसातून शिक्षकांना पाठिंबा मिळायला हवा. शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या विरोधात शिक्षकांनीच उभे राहण्यापेक्षा शिक्षकेतर सर्वांनीच ठाम उभे राहिल्यास शिक्षक पूर्णवेळ वर्गात शिकवू शकेल. पुन्हा एकदा अशी क्रांती घडेल याची वाट बघण्याशिवाय माझ्यासारख्या शिक्षकाला दुसरे काहीही करता येत नाही.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 )

No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...