Sunday, July 30, 2023

🛑 एक घास पप्पांचा

🛑 एक घास पप्पांचा

          बालपणी बालभारतीच्या पुस्तकात ' पेरुची फोड ' असा एक धडा होता. त्यात " पेरुची फोड , लागते गोड "  असे म्हटले होते. त्यापुढे असेही म्हटले होते , " आईची फोड , फारच गोड ". खरंच या दोन्हींमधील पुढची ओळ जास्त लक्षात राहते. कारण ती आईने दिलेली फोड आहे. 

          प्रत्येक मुलांचे आपल्या आई बाबांवर निरतिशय प्रेम असते. आईला भेटण्यासाठी मुले आतुर झालेली असतात. शाळेतून घरी येताच आम्ही पहिल्यांदा आईला कडकडून मिठी मारत असू.  ही मिठी आता मिळत नाही , कारण आईच नाही. 

          आई जशी महत्त्वाची असते , तसे बाबाही महत्त्वाचे असतात. आई प्रेमळ असते. बाबा शिस्तीचे असतात. कधीकधी याउलट असू शकते. काहीवेळा दोन्ही पालक प्रेमळ आणि शिस्तप्रिय असू शकतात. त्यांनी तसेच असायला हवे असते. मुलांसाठी आणि मुलांच्या संगोपनासाठी हे सर्वच आवश्यक असते. 

          आई मुलांना भरवते. मुले कितीही मोठी झाली तरी आईबाबांसाठी लहानच असतात. बाबा मुलांना मारतात , तेव्हा आई रडणाऱ्या मुलांना जवळ घेते. हे जवळ घेणे त्यावेळी दिलासा देणारे असते. मला आईने क्वचितच मारले असेल. बाबांचा मार अनेकदा खाल्ला आहे. अजूनही त्यांच्या शब्दांचा मार मिळत असतो. बाबांनी मारल्यानंतर आम्हाला आईचा आधार असे. तिच्या पदरात लपताना जी प्रेमाची ऊब मिळे ती कुठेच मिळणार नाही. 

          माझे आजोबा भरपूर जेवत असत. त्यांच्या जेवणातील एखादा घास मिळण्यासाठी माझे बाबा आसुसलेले असत असं ते सांगतात. माझी आजी तर खूपच प्रेमळ आणि धार्मिक होती. तिने कुठूनही आणलेला खाऊ सर्वांना समान मिळण्यासाठी तिची धडपड असे. लग्न होऊन मुले बाळे झालेल्या मुलांनाही ती लक्षात ठेवून खाऊचा वाटा देत असे. तिच्या निस्सीम मायेची तुलना करणे चुकीचे ठरेल. तिने आम्हाला घास भरवले आहेत. कालवलेला घास तिच्या हाताने खात असताना ती स्वतः सुद्धा आपल्या तोंडाचा ओ करत असे. त्यावेळी तिच्या सुरकुत्या आलेल्या हातांची सैल झालेली कातडी एकत्र करुन तिच्याशी मी खेळत बसलो तरी ती काहीही म्हणत नसे.

          आईने आणि बाबांनीही मला भरवले आहे. मी रात्री , मध्यरात्री अचानक घायाळ पडत असे. मी घामाघूम होई. तेव्हा आईबाबा दोघेही माझ्या जवळ बसून भरवू लागत. त्यावेळी मिळत असलेल्या प्रेमाने मी आणखीच घायाळ होऊन जाई. 

          आता मीही तीन मुलींचा बाबा झालो आहे. मला त्या पप्पा म्हणतात. तिन्ही मुली पप्पांच्या एखाद्या घासासाठी टपलेल्या असतात. मुले कितीही मोठी होत असली तरी आईबाबांसाठी लहानच असतात. त्यादिवशी माझी दोन नंबर मुलगी हट्टच धरुन बसली. मी जेवत होतो. तिला माझ्या जेवणातला एक घास हवा होता. माझे बाबा जवळच होते. मी जेवत असताना त्यांचे माझ्या जेवण्याकडे लक्ष असते. ताटातील भाजी , भाकरी संपत असली तर ते आपल्या सुनेला सांगत असतात. मी मागण्यापूर्वी माझ्या ताटात संपलेला पदार्थ यायला हवा यासाठी त्यांचा हा अट्टाहास असतो. त्यांना मी कितीही सांगितले तरी त्यांनी त्यांची ही सवय अजिबात सोडलेली नाही. 

          मी माझ्या तिन्ही मुलींना एक एक घास भरवू लागलो. मी भुकेलेला असलो तरी त्यांच्या मुखात जसा घास जाई , तशी माझे पोट भरत असल्याचा अनुभव येत जाई. पप्पांनी भरवलेला घास छोटा असला तरी तो त्यांच्यासाठी नेहमीच भारावलेला असतो अगदी आमच्या आईबाबांसारखा. 

©️ प्रवीण कुबलसर



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...