Sunday, September 8, 2024

🛑 तू बुद्धी दे या बालका

🛑 तू बुद्धी दे या बालका

          चतुर्थीला शाळेला सुट्टी असते. गणपतीच्या येण्याची सर्वांना आतुरता असते. शाळेतील मुलांना तर ती खूपच असते. ती तर गणपती सुट्टीची वाटच बघत असतात. सुट्टी पडते एकदाची. मुलांचा आनंद गगनात मावेनासा झालेला त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. हा मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तर गणेशाचे आगमन झालेले असते. 

          शाळेत शिक्षकांनी अभ्यास दिलेला असतो. मुलांना अभ्यास हवा सुद्धा असतो आणि नको सुद्धा असतो. शाळेत असताना अभ्यास हवा असतो , पण एकदा घरी गणपती आला की या दिलेल्या अभ्यासाचे त्यांना ओझे वाटू लागते. हल्ली दप्तराचे ओझे होते म्हणून तोलून मापून भरलेले दप्तर शाळेत आणावे लागते. ते ओझेच नको म्हणून दहा दिवस शनिवारी ' दप्तराविना ' शाळा उपक्रम सुरु केला आहे. मुलांना ' आनंददायी शनिवार ' च्या रुपाने अधिक ज्ञान मिळवण्याची संधी मिळालेली आहे. मुलांनी या संधीचे सोने करायला हवे. 

          काही शाळांमध्ये दर व्हेकेशनला प्रिंटिंग अभ्यास दिलेला असतो. मुलांनी घरी काहीतरी वाचन करावे, लेखन करावे, उदाहरणे सोडवावीत अशी माफक अपेक्षा असते. या सरावामुळे मुले नियमित वाचत लिहत रहावीत हा उद्देश असतो. हा उद्देश काही मुले संपूर्णपणे अभ्यास करुन पूर्ण करतात. काही मुले त्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. त्यांना या उपक्रमशील अभ्यासाचे ओझे वाटते. 

          गणपती ही बुद्धीची देवता आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना गणपतीची आराधना केली जाते. या गणनायकाची मुले जितकी भक्ती करतील तितकी अभ्यासावरची त्यांची पकड घट्ट होत जायला हवी आहे. केवळ भक्ती करुन उपयोगाची नाही. शाळेत दिलेला अभ्यास करणारी मुले गणपतीला जास्त आवडतील. पाठांतर तर आजकाल लुप्त होत चालले आहे. मुलांनी विविध गोष्टी, कथा, कविता, गाणी पाठ कराव्यात. आरत्या पाठ करुन न बघता म्हणाव्यात. या पाठांतराचा उपयोग पुढे भाषण करताना नक्की होणार आहे. निबंध लिहिताना , स्वतःचे मनोगत व्यक्त करताना नक्की होणार आहे. 

          मुलांनो, म्हणूनच मी तुम्हाला प्रेमाची विनंती करतो की कोणत्याही सुट्टीत दिलेला अभ्यास हा सरावासाठी दिलेला असतो. तो केल्याने तुम्ही अभ्यासाच्या प्रक्रियेत राहता. तुम्ही शाळेत नुकताच शिकलेला अभ्यास अधिक लक्षात ठेवू शकता. तुमची स्मरणशक्ती वाढते. तुमचे सर्व पाढे पाठ असतात, त्यामुळे गुणाकार, भागाकार या मूलभूत क्रिया करताना तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही. 

          माझ्या लाडक्या मुलांनो, सुट्टी ही तुमच्यासाठी मौजेची असली तरी तिचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी नक्की करा. वाईट गोष्टी सतत खुणावत राहतात. त्या तुम्हाला कराव्याशा वाटतात, पण त्यांना तुम्ही बाय बाय म्हणा. चांगल्या गोष्टी शिका, नवीन गोष्टी आत्मसात करा. हे गणपतीदेवा, माझ्या मुलांना चांगली बुद्धी दे अशी मी तुझ्याकडे प्रेमळ मागणी करीत आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

 मुख्याध्यापक , शाळा शिडवणे नं.१

No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...