Tuesday, September 10, 2024

🛑 शाळा करा रे प्रसन्न

🛑 शाळा करा रे प्रसन्न

          शाळा हे प्रत्येकाच्या जीवनात अनेक वर्षांसाठी आलेलं विद्येचे घर आहे. या शाळेला अनेकांनी जवळ केलं, ज्यांनी जवळ केलं ते शिकले. ज्यांना शाळेची भिती वाटली, त्यांनी शिकायचा कंटाळा केला, अर्थात शिक्षणच त्यांच्यापासून दूर गेलं. 

          पूर्वीच्या शाळा आणि आताची शाळा यात जमीन अस्मानाचा फरक पडला आहे. पूर्वीच्या शाळा मुलांनी भरभरून वाहणाऱ्या असत. गावाकडच्या आमच्या शाळांत मुलांना बसायला जागा नसे. शिक्षकांची संख्या भरपूर असे. एकूणच शाळेत जायला शिक्षकांची आपुलकी कारणीभूत असे. मारकुटे शिक्षक असले तर त्यांच्याबद्दल आधीच गावभर समजे. त्यामुळे मुले भीतीनेच शाळेची पायरी चढत नसत. आता मात्र मारकुटे गुरुजी राहिलेले नाहीत. असले तरी त्यांना मुलांना मारण्याची परवानगी शासनाने अजिबातच दिलेली नाही. त्यामुळे मुलांना मारणाऱ्या शाळा आज असू नयेत असे शासन वारंवार सांगते. अर्थात मुलांना न मारता अध्यापन करुन त्यांचे अध्ययन घडवणे तारेवरची कसरतच आहे. 

          आज सर्व शाळा प्रसन्न आहेत. शाळेत मुलांची संख्या कमी आहे. प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक शिकवता येण्यासारखी परिस्थिती आहे. शाळेत सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. शाळेतील शिक्षक पदव्युत्तर पर्यंत शिकलेले आहेत. ते स्वतः तंत्रस्नेही आहेत. मुलांना तंत्रस्नेही बनवत आहेत. 

          वर्गखोल्या मुलांशी बोलत आहेत. शिक्षक विविध उपक्रम राबवत आहेत. दप्तराविना शाळा, आनंददायी शनिवार असे उपक्रम मुलांसाठी उपयुक्त ठरत आहेत. मुले प्रसन्न होत आहेत. मुले प्रसन्न होण्यासाठी शिक्षक आपल्या जीवाचे रान करत आहेत. प्रसन्न शिक्षक असल्यामुळे मुले प्रसन्न होत आहेत. मुले आणि शिक्षक हेच शाळेचे प्राण आहेत. तेच शाळेत नसतील तर शाळा प्रसन्न आहे असे कसे म्हणता येईल ? कमी पटसंख्या असली तरी त्यांना शिकविण्यासाठी तेवढीच शैक्षणिक कामे करावी लागतात. सुट्टीच्या काळात शाळांच्या इमारती पाहाव्यात, मुले नसल्याने त्या गप्प गप्प असतात. या शाळांचा प्राण असणारी मुले आणि त्यांना हासून हसवून खेळून शिकवणारे शिक्षक नसतील तर नेहमीच प्रसन्न असणाऱ्या शाळा अप्रसन्न दिसल्याशिवाय राहणार नाहीत.

          शाळा, मुले, पालक, ग्रामस्थ, देणगीदार, अधिकारी, शासन आणि शाळेशी संबंधित यंत्रणा जेव्हा मुलांच्या गुणवत्तेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी निष्ठेने कार्य करत असतात, तेव्हा तिथल्या शाळा सदासर्वकाळ प्रसन्न राहतील यात कोणतीही शंका वाटत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

मुख्याध्यापक शिडवणे नं. १

No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...