🛑 सुट्ट्या लागल्या आता मज्जा
सुट्टी हा शब्द सगळ्यांनाच आवडणारा असेल. नुसता शब्द नाही तर त्याची प्रतिक्षा करण्यातही एक आगळा आनंद असतो. तशी प्रत्येकाला आठवड्यातून एक दिवसाची सुट्टी मिळत असेलच. आता काहीजण 24 गुणिले 7 काम करत असतील तर त्यांनाही सुट्टी घेणाऱ्यांचा हेवा वाटत असेल. अर्थात तशी सगळयांनाच कधीना कधी सुट्टी मिळतच असते , फक्त ते सांगत नसतात. किंवा त्यांना आपल्याला सुट्टी आहे हे जाणवत नसेल.
आयुष्यात अशा अनेक सुट्ट्या येत असतात. त्या येतात आणि जातातही. पण प्रत्येक सुट्टी आपलं एक वेगळेपण घेऊन येत असते. माणसाला विश्रांतीची गरज असते. ती विश्रांती सुट्टीमुळे त्याला मिळत असते. सुट्टी म्हणजे आपले स्वतःचे दिवस असतात. त्यावर आपला आणि आपलाच अधिकार असतो. ती आपली स्वतःची असते , म्हणून ती आपली लाडकी असते. ती आपल्याला नेहमीच हवीहवीशी वाटणारी असते. ती पुन्हा पुन्हा येत राहावी अशीही असू शकते. सुट्टी आली की आपल्या मनाचे करता येते हा आनंद असतो. तो आनंद कोणी हिरावून घेऊ नये असे प्रत्येकाला वाटत असते. आज मस्त सुट्टी आहे असे म्हणत जर तुम्ही तुमचा सुट्टीचा दिवस ' एक उनाड दिवस ' म्हणून साजरा करणार असाल तर त्यात जर कुणामुळे विघ्न आलंच तर आपण त्याच्यावर मनातून चरफडल्याशिवाय राहत नाही.
एक मे हा दिवस मुलांच्या सुट्टीचा सुरुवातीचा दिवस असावा. आता खूप लवकर परीक्षा होतात , त्यामुळे एप्रिलपासूनच मुले शाळेत यायची बंद होतात. परीक्षा झाल्या की शाळेत कशाला जायचे ? हा प्रश्न पडल्यामुळे मुलांना शाळेत पाठवले जात नाही. उलट याही दिवसात शाळांमध्ये शैक्षणिक कामकाज सुरू असते. निकाल , स्वाध्याय पूर्तता , तोंडी काम , तोंडी परीक्षा , प्रकल्प , शाळा पूर्व तयारी अभ्यासक्रम , अप्रगत मुलांसाठी उपचारात्मक अभ्यासक्रम इत्यादी कामकाज सुरुच असते. ते सुरुच असते , पण ते फक्त शिक्षकांना आणि शिक्षणाशी संबंधित घटकांना माहिती असते.
वर्षभर अभ्यास करुन करुन दमायला झालेले असते. थोडी विश्रांती म्हणून शाळेतील वाचनालयाच्या पुस्तकांचा वाचून फडशा पाडायला काय हरकत आहे. अनेक पुस्तके वाचल्यामुळे मुलांच्या ज्ञानात आणखी भरच पडणार असते. शिक्षकांनीही आपल्या शाळेतील डेडस्टॉक मध्ये बंदिस्त करुन ठेवलेली पुस्तके मुलांना वाचायला द्यावीत. पुस्तके वाचून फाटून गेली तर ती सार्थकी लागतील नाही का ? हल्ली मुलांच्या घरी पुस्तके असण्याची शक्यताच कमी असते. शहरात काही वाचनवेडे सोडले तर वाचनासाठी पुस्तके घरी आणणारे विरळेच आढळतील. शहरात जर ही अवस्था असेल तर खेड्यात वाचन अपेक्षा ठेवणे दूरच राहिले. दिवाणखान्यात किमती वस्तू दिसतील , पुस्तके दिसणार नाहीत. पुस्तके दाखवण्यासाठी नकोच , ती वाचनासाठी हवी.
आमच्या बालपणी आम्ही वाचनालयात बालवाचक म्हणून खाते उघडले होते. त्यावेळी महिन्याला पाच रुपयापेक्षा कमी वर्गणी होती. किती पुस्तके वाचायचो आम्ही. शनिवार रविवार कधी येतो आणि वाचनालय कधी गाठतो असे होईन जाई. आता वाचनालयात जाणे संपले आहे. आता घराचेच पुस्तकघर बनवून टाकले आहे. ज्यावेळी वाटेल त्यावेळी एखादे पुस्तक उघडावे आणि वाचत सुटावे. वेळ कसा निघून जातो समजतही नाही. आताच्या मुलांना वाचनाचा छंद कमीच दिसून येतो. त्यांना तुमचा आवडता छंद कोणता असे विचाराल तर खूप कमी मुलांचे उत्तर वाचन असे असेल.
या सुट्टीचा वापर मुलांनी वाचनासाठी करायला हवा. बालसाहित्य बाजारात उपलब्ध आहे. गोष्टींची पुस्तके आहेत. बालकथा , इसापनीती , अकबर बिरबल , नितीकथा , लोककथा , एकांकिका , बालनाट्ये , नाट्यछटा , किशोर , कुमार , ठकठक , चांदोबा , अमृत , कॉमिक्स , विक्रम वेताळ , आजोबांच्या गोष्टी , आजीच्या गोष्टी , सिंदबादच्या सफरी , गुलबकावली , लोटपोट , सिंहासन बत्तीशी , गोट्या , श्यामची आई , सानेगुरुजींच्या गोष्टी अशी अनेक पुस्तके आताच्या मुलांना माहीत असतील की नाही यांवर संशोधन करावे लागेल. या सर्व गोष्टी त्यांना यु ट्यूबवर उपलब्ध असतीलही. पण वाचण्यात जी वेगळी मज्जा असते , ती पाहण्यात नक्कीच असेल असे मला वाटत नाही. ते एक मनोरंजन होईल , पण ज्ञानार्जन कदाचित होईल. म्हणून आताच्या मुलांनी भरपूर वाचले पाहिजे. पुस्तकांचा फडशा पाडला पाहिजे. सकाळी उठून स्टेटस लावण्यापेक्षा एखाद्या पुस्तकातील चार ओळी वाचल्यास त्याचा आयुष्यभरासाठी नक्कीच फायदा होईल.
सध्या वर्तमानपत्रात देखील लहान मुलांसाठी विशिष्ट पान असते. ते लहानांपासून मोठ्यांनीही वाचले पाहिजे. घरातल्या मोठ्यांनाही हल्ली वाचनाचा विसर पडत चाललेला दिसून येतो आहे. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत मोबाईलने आपले जीवन ग्रस्त करून सोडले आहे. मध्यरात्री उठून बसलो तरी पहिल्यांदा मोबाईलकडे हात जाऊ लागला आहे. घराघरात क्रिकेट मॅच , सासूसुनांच्या मालिका सुरु आहेत. मुले , पालक हेच बघत आहेत. यातून वेळच मिळत नसल्यामुळे त्यांना पुस्तक वाचायला सवडच मिळताना दिसत नाही.
पूर्वीची मुले एवढी अभ्यासवेडी किंवा वाचनवेडी होती की त्यांच्या हातात नेहमी एखादे पुस्तक दिसे. आता मोबाईल दिसतो. त्या दिवशी वाचनालयात गेलो होतो. तिथे तरुण मंडळी दिसलीच नाहीत. खूप जुनी जाणती माणसेच पुस्तके वाचन करताना दिसली. या जुन्या माणसांनी आपला वाचनाचा छंद जोपासला आहे. व्यासंग जपला आहे. पूर्वीपेक्षा अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी कमी झालेली आहे , त्यामुळे मिळणारे गुण शंभर टक्क्यांपेक्षा जास्त असले तरी त्यांना अजिबात किंमत नाही. पूर्वीच्या साठ टक्क्यांच्या खालीच आहेत असेही बोलले जात आहे.
आता सुट्ट्या पडल्याचं आहेत , तर त्या सुट्टीचा वापर वाचनासाठी करायला हवा. मुलांनी वाचनवेडे बनायला हवे. आम्ही त्यावेळी जेवतानाही समोर पुस्तक उघडून बसत असू. तेव्हा आमचे बाबा आम्हाला ओरडत. आता जेवताना समोर टीव्ही चालू असतो , शेजारी मोबाईलच्या नोटिफिकेशन्सची रिंग वाजत असते. इकडे जेवत असतो , तिकडे हे सुरुच असते. त्यामुळे कधीकधी तोंडात घालायचा घास नाकात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकावेळी एकच काम करा. वाचताना वाचा आणि चावताना चावा. कारण काय चावतोय ते जसे समजायला हवे , तसे काय वाचतोय तेही समजायलाच हवे नाही का ?
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
No comments:
Post a Comment