Wednesday, June 8, 2022

🛑 अभिनंदन बारावी !!!!

🛑 अभिनंदन बारावी !!!!


          ४ थी पासून १२ वी पर्यंत अनेकविध स्पर्धा , शिष्यवृत्ती परीक्षा आणि बोर्डाच्या दोन परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांना पार करावयाची उंच उंच शिखरेच आहेत. ही चढताना त्रास होतो. दमायला , थकायला होते. 

          गेल्या दोन वर्षात ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन परीक्षांची नव्याने ओळख झाली. मार्कांची टक्केवारी सतत वाढत जाणारी पाहायला मिळाली. काहींना शंभर टक्केच्या वर गुण मिळाले. एवढे गुण आम्ही आमच्या काळात बघितले नव्हते आणि मिळवलेही नव्हते. तेव्हाचा अभ्यासक्रम अवघड होता. काठिण्यपातळी उच्चस्तरीय होती. आता अभ्यासक्रम बराच सोपा असावा. एवढे टक्के गुण मिळतात म्हणून असे वाटून जाते. नाहीतर आजची मुले खूपच हुशार झालेली असावीत. एक काहीतरी नक्कीच असेल. विचार करुन बघा. 

          मराठीत आम्हाला कधीच पैकीच्या पैकी गुण मिळाले नव्हते. बारावीत असताना माझे सगळे विषय इंग्रजीतून होते. मराठी आणि जीवशास्त्र या दोन विषयांबद्दल मी इलेक्ट्रॉनिक्स हा दोनशे गुणांचा विषय घेतला होता. तरीही मी बरेचदा जी.ए.सावंत सरांच्या मराठीच्या लेक्चरला थांबत असे. धडससरांच्या बायोलॉजीच्या लेक्चरला थांबण्याचे मी कधीही धाडस केले नाही. हत्तीसर , पारकरसर , नलावडेसर , प्रभुसर यांनी इलेक्ट्रॉनिक्स समजेल असे शिकवले. घोकंपट्टी करत गुण मिळवले. आता मला त्यातले काहीही आठवत नाही. 

          Maths हा माझा सगळ्यात आवडता विषय.महाजन सरांमुळे भरपूर सराव केला. डेरिव्हेटिव्हज , इंटिग्रेशन आणि इलिप्स , हायपरबोला , पॅराबोला यांचे अक्षरशः पीठ पाडले. आता त्यांचा मला काहीच उपयोग होत नाही. साध्या गणिताने माझ्या जीवनाचे गणित पक्के होत गेले.

          इंग्रजीच्या शिंदेसरांनी शेक्सपिअरच्या अनेक गोष्टी सांगितल्या. त्याही विसरलो आहे. 

          फिजिक्सची खूपच आबाळ झाली. येणारे नवे शिक्षक आम्हांला पाहून घाबरुन निघून गेलेले असत. त्या विषयाचा धसका घेतल्यामुळे त्याचाच अभ्यास जास्त झाला. हे शास्त्र बरेचसे लक्षात राहिले आहे. 

          केमिस्ट्रीचे बाक्रेसर म्हणजे अतिशय कडक. प्रॅक्टिकल व्यवस्थित केले नाही तर पायावर काठी बसलीच म्हणून समजा. अतिशय प्रेमाने समजावून सांगणारे सर. त्यामुळे आमची जीवनाची केमिस्ट्री स्ट्राँग झाली. 

          अजिबात क्लास न करता सतत एका ठिकाणी घरात बसून जो अभ्यास केला तसा पुढे कधी केला असेल असे वाटत नाही. त्यामुळे बारावीत चांगले यश मिळाले. त्यावेळी सायन्समध्ये एकूण 74 टक्के गुण मिळणे ही साधी गोष्ट नव्हती. आय आय टी चे स्वप्न बघितले. आय आय टी करता आले नाही. डीएड केले. बीए केले. एम.ए. केले. बीएड केले. प्राथमिक शिक्षक झालो. आता मुलांच्यात माझे स्वप्न पेरण्याचा प्रयत्न करत आहे. कोण कोठे जाईल हे आताच्या गुणांवर अजिबात सांगता येणार नाही. 10 वीत बोर्डात उच्च गुण मिळवणारा झोपडपट्टीत राहणारा मंगेश म्हसकर नावाचा विद्यार्थी आता कुठे असेल माहीत नाही. 

          सातत्याने प्रयत्न करत राहा. अपयश आले तरी खचून जाऊ नका. बारावीत भरपूर गुण मिळवलात त्याबद्दल अभिनंदन तुमचं. पण आता तुमची जबाबदारी जास्त वाढली आहे. चिकाटी सोडू नका. नोकरी मिळेल हा अट्टाहास सोडा , स्वतःच नोकरी देणारं एखादं व्यक्तिमत्त्व बना. शुभेच्छा.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 ) कणकवली



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...