Thursday, June 30, 2022

🛑 दोन तपांची धाव

🛑 दोन तपांची धाव

          नोकरी मिळवणं म्हणजे एक अवघड गोष्ट असते. ती मिळाली कि ती टिकवणं हे आपलं कौशल्य असतं. आता नोकरी मिळवणं खूपच अवघड बनत चाललेली बाब आहे हे कुणीही सांगेल. सव्वीस वर्षांपूर्वी मलाही नोकरी मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागले होते. प्रत्येकवेळी यशस्वी होत गेलो होतो. कारण नोकरी मिळवणारच असा ध्यासच घेतला होता. ध्यास हाच श्वास बनला होता. प्रत्येकाचं असंच घडत असावं. 

          डिग्री हातात आली रे आली कि घरातल्यांना लगेच त्याची उपयोगिता हवी असते. मला योगायोगाने नोकरी मिळाली होती. हा योग कसा आला हे सांगणंही तितकंच महत्त्वाचं असतं. योगा शिकल्यामुळे माझ्या नोकरीचा योग जुळून आला होता. 

          इतर महत्त्वाच्या प्रमाणपत्रांना योगप्रवेश परीक्षा प्रमाणपत्राने प्रभावित केले होते. माझे पारडे जड झाले होते. कुणाचीही ओळख नसताना व एकही रुपया खर्च न करता मला मिळालेली नोकरी म्हणूनच बहुमोलाची होती. ती सोडताना मीच माझ्या पायावर भला मोठा दगड मारुन घेत होतो. डोक्यातही विचारांचे हातोडे बसत होते. रत्नागिरीतील खाजगी नोकरी सोडून जिल्हा परिषदेत रुजू झालो होतो. तिथेही चांगलाच जम बसत असताना पुन्हा सिंधुदुर्गात येण्याची ओढ लागली होती. आपल्या जिल्ह्यात नोकरी करण्याची कल्पना मनात जोर धरत होती. आई , बाबा , भावंडे सतत जवळ असावीशी वाटत होती. या सर्वांच्या मनासारखे झाले होते. पुन्हा एकदा कोकण निवड मंडळाच्या परीक्षेत पास झालो होतो. 

          मुलाखत झाल्यानंतर यादीत नाव आल्याचे पाहून जिंकल्याचे समाधान वाटले होते. शेवटी रत्नागिरी जिल्हा परिषदेला रितसर राम राम ठोकला होता. इकडे यावेसे वाटत होतेच. पण तिथूनही निघावेसे वाटत नव्हते. 

          प्रत्येक ठिकाणी आपण आपले अस्तित्व निर्माण करीत असतो. आता मला पुन्हा ते निर्माण करायचे होते. २९ जून १९९८ या दिवशी मी खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका विकासगटात हजर झालो. शाळेत दुसऱ्या दिवशी हजर झाल्यामुळे ३० जून हिच तारीख माझी अखंड नोकरीची सुरुवातीची तारीख ( अनोसुता ) ठरली होती. आज या दिवसाला चोवीस वर्षांचा प्रदिर्घ कालावधी उलटून गेला आहे. 

          आज मी नेहमीप्रमाणे शाळेत गेलो होतो. बदलीसंदर्भात माहिती भरत होतो. ती भरताना माझ्या लक्षात आले होते कि आज मला चोवीस वर्षे झाली होती. माझी मलाच कमाल वाटली होती. दोन तपे कधीच कापरासारखी उडून गेल्यासारखी वाटली होती. 

          मला मिळालेली दुर्गम भागातील पहिली शाळा आता सुगम क्षेत्रात आली होती. पती पत्नी मिळून एकत्र राहता यावे म्हणून दुसरी शाळा बदलीसाठी मागितली होती. तिथे असताना पत्नीचे आकस्मिक निधन झाल्यामुळे तिसरी शाळा जवळची म्हणून हजर झालो होतो. या शाळेत जाण्यासाठी मळ्यातून उंचसखल वाटा तुडवित जावे लागत होते. पावसात चिखलमय वाटेतून जाताना गुडघ्यापर्यंत पाय चिखलातून वर काढावे लागत होते. तिथूनही बदलीने निघालो होतो तो थेट साठ किलोमीटर अंतरावरच्या शाळेत. पदवीधर शिक्षक प्रमोशन स्विकारले होते ना ? वरच्या वर्गांना शिकवण्याची भारी हौस होती !!! सात वर्षे तीही हौस पूर्ण करुन घेतली होती. पटसंख्या कमी झाल्यामुळे एक चांगली शाळा सोडताना जीव रडवेला झाला होता. 

          आज आता सध्याच्या शाळेत काम करत असताना खूप उत्साहाने काम करण्याचा आनंद घेतो आहे. चोवीस वर्षांत कित्येक शिक्षक भेटले , कित्येक पालक भेटले , कित्येक विद्यार्थी भेटले , या सर्वांच्या आठवणी कधीतरी नक्कीच येतात तेव्हा खूप बरे वाटते. 

          सर्वच ठिकाणी मला जिवापाड प्रेम करणारी माणसे भेटली आहेत. पुढेही अशीच चांगली माणसं भेटत राहतील. पुढच्या शाळेत जातो तशा मागच्या शाळेच्या आठवणी थोड्याशा पुसट होत गेल्या असतीलही. तरीही मी काहीतरी निर्माण करण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे हा भावच मला पुढेही निरंतर कार्य करण्याची प्रेरणा देत राहतो आहे याचा आनंद बाहेर पडणाऱ्या मुसळधार पावसासारखा कोसळतो आहे.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 ) कणकवली.



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...