Thursday, June 2, 2022

🛑 हायकोटायो

 🛑 हायकोटायो


          आपल्याला किती माणसं भेटत राहतात आयुष्यात ? त्यांचं जगणं बघत असताना त्यांचे कित्येक गुण आपणही नकळत आत्मसात करत असतो हे आपल्याला माहिती नसते. ह्या माणसांमध्ये एक वेगळंच चैतन्य भरुन राहिलेलं असतं. ते त्यांच्या नेहमीच्या वागण्या बोलण्यातून लक्षात येत राहतं. त्यांच्या भारदस्तपणाचं दडपण देखील आपल्यावर येत राहतं. दडपण म्हणजे अधिकची आदरयुक्त भीती असते. या माणसांशी बोलतानाही सतत भीती वाटत राहते. त्यांच्या बरोबर बोलताना कोणते शब्द वापरावेत याचाही खूपच विचार करावा लागतो. असंच एक धीरगंभीर अभिनयाची कार्यशाळा असलेलं व्यक्तिमत्त्व खूप जवळून पाहता आलं याचाही मला आनंद वाटतो. 

          उत्कृष्ट नाटकं करणं ही त्यांची खासियत म्हणायला हवी. त्यांची आवाजाची फेक मी खूप पूर्वीपासून अनुभवली आहे. त्यांच्या शब्द उच्चारांमुळे निर्जीव शब्दांना सजीवपणा प्राप्त होतो. हे सगळं वर्णन एखादया कसलेल्या अभिनेत्याचे असू शकते हे कोणीही मान्य करेल. हो , मी एका अभिनेत्याबद्दलच सांगतोय. त्यांचं नाव आहे सुहास वरूणकर. 

          एसटीत लिपिक म्हणून काम करताना त्यांच्यातील नाटककार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी प्रत्येक गॅदरिंगमध्ये प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवलं होतं. यांचे कार्यक्रम शेवटी ठेवले जात. त्यांचा परफॉर्मन्स बघितल्याशिवाय कॉलेज कुमार आणि कुमारीही जागा सोडत नसत. 

          मी त्यावेळी आठवी , नववीत शिकत असेन. माझी मोठी ताई कणकवली कॉलेजमध्ये शिकत होती. मी तिच्याबरोबर गॅदरिंग बघायला गेलो होतो. त्यावेळच्या कॉलेज जीवनातील विविध गमतीजमती मला बघायला मिळत होत्या. सुहास वरुणकर यांचा रंगमंचावर प्रवेश झाला होता. सगळी मुले त्यांच्या प्रवेशालाच टाळ्या आणि शिट्ट्या देऊ लागली होती. मी फक्त टाळ्या वाजवत होतो. मी शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न केला होता. पण फक्त हवाच बाहेर पडली होती , आवाज आलाच नव्हता. अजूनही माझे तसेच होते , त्यामुळे मी कधी शिट्टी वाजवण्याच्या फंदात पडत नाही. 

          वरुणकरांच्या दोन्ही हातात एक काठी होती. ती त्यांनी आडवी पकडली होती. पोटावर धरुन ते चालत होते. चालता चालता ते कोणते तरी गाणे म्हणत होते. ते जे म्हणत होते त्याचा मला त्यावेळीही अर्थ लागलेला नव्हता आणि आताही लागलेला नाही.  ते म्हणत होते , " हायकोटायो नादे खोटा , हायकोटायो नादे खोटा ". याचा अर्थ त्यांना लक्षात असू शकतो. 

          हे सुहास वरुणकर आमचे सलूनचे कस्टमर. मीही त्यांचे एकदोनदा केस कापले आणि रंगवलेही आहेत. त्यांचे केस कापणे ही सोपी गोष्ट नसते. ते सांगतील तेवढेच केस आपल्याला कापायचे असतात. त्यात जरा जरी कसूर झाली , तर कापणाऱ्याचे काही खरे नसते. बाबांना त्यांच्या केसाचे तंत्र माहिती होतं. त्यांनी कापलेल्या केसात सुहासजी खूप कमीवेळा त्रुटी काढत. एक मोठा अभिनेता आमच्या दुकानात येऊन केस कापून जातोय याचा आम्हाला अभिमान वाटे. ते कायम घाईत प्रवेश करत आणि आपले केस कापून निघून जात. जणू ते रंगमंचावर इन्ट्री करुन गेल्यासारखे वाटत. 

          एकदा मी त्यांच्या जुन्या घरी सहजच गेलो होतो. त्यावेळी ते कोणाचीतरी रिक्षाची सीट बनवून देण्यात मग्न होते. फावल्या वेळेत ते हे काम करीत. 

          नाथ पै एकांकिका , यंगस्टार मित्रमंडळ , अक्षरसिंधु कलामंच , कामगार कल्याण केंद्र , बागेश्री थिएटर आणि एसटीकडून होणाऱ्या अनेक एकांकिका स्पर्धा त्यांनी गाजवल्या. त्यांच्या अभिनयाची एक वेगळीच क्रेझ असते. ' तन माजोरी ' या नाटकात त्यांनी केलेले काम सहकलाकारांसाठी कायमच लक्षात राहणारे असेल. ' किरवंत , आमुषा ' अशा अनेक वेगळा संदेश देणाऱ्या नाटकांचं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे. अभिनय करता करता त्यांनी दिग्दर्शनाला सुरुवात केली. त्यांनी कित्येक नाटके , एकांकिका बसवल्या असतील. त्यांनी सादर केलेल्या नाटकांना नेहमीच राज्यस्तरावर गौरविण्यात आलेले आहे. 

          आता तर ते यु ट्यूबवर अनेक विनोदी प्रहसनांसाठी प्रसिद्ध झालेले आहेत. कणकवलीत नाट्यक्षेत्राशी निगडित असलेल्या अभिनेत्यांमध्ये त्यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. 

          नाटकासाठी एकदा त्यांना मिशी आणि केस पूर्ण काढावे लागले होते. त्यांची परमप्रिय मिशी त्यांनी काढली होती. त्यांना तसे ओळखताही येत नव्हते. नाट्यप्रकारासाठी वाहून घेतलेल्या या कलावंतांबरोबर मलाही काही क्षण जगता आले हेही माझे नाट्यमय भाग्यच. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )

No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...