Wednesday, June 29, 2022

🛑 दातृत्व माऊलीचे

 🛑 दातृत्व माऊलीचे

          देणे हा देवाचा गुण आहे असे म्हटले जाते. राखून ठेवतो तो राक्षस. लहानपणी पुस्तकात एक धडा होता. देतो तो देव. आपल्याकडे जे चांगलं आहे ते देत राहता आलं पाहिजे. ज्ञानसुद्धा दिल्यानेच वाढत राहते. ते दिल्यामुळे अजिबात कमी होत नाही. 

          इतर गोष्टींना सुद्धा हा नियम लागू पडतो. कविवर्य विंदा करंदीकर म्हणतात , " देणाऱ्याने देत जावे , घेणाऱ्याने घेत जावे , घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे " याचा अन्वयार्थ आपण समजून घेतला पाहिजे. प्रत्येकाने कायम देत राहण्यासाठी तत्पर असायला हवे. 

          आपण जे देत असतो तेच आपल्याला बुमरँग होऊन परत मिळत असते. म्हणून कायम चांगले देण्याचा प्रयत्न असावा. त्यात स्वार्थाची भावना असू नये. मला यातून काहीतरी मिळणार आहे असा स्वार्थ बाळगणे चुकीचे आहे. समाधानाचा निर्मळ स्वार्थ जरुर असावा. देताना घेणाऱ्याच्या चेहऱ्यावर येणारे कृतज्ञतेचे भावच आपल्याला परमसुख मिळवून देतात. 

          दानत असली पाहिजे. दातृत्वातून सेवाभाव फुलत जातो. गरजूंना दान करण्याची इच्छा निर्माण झाली की आपल्या हाताने दान करत राहावे. काही लोक असंही दान करतात की त्यांचं दान या हाताचं त्या हाताला समजत नाही. 

          गाडगेबाबांना स्वच्छतेची आवड होती. त्यांना लोक भेटवस्तू आणून देत. या भेटवस्तू गरजूंना देऊन ते आपल्या घराची स्वच्छता करत. आपले घर स्वच्छ झाल्यानंतर ते म्हणत , " आता कसे मस्त स्वच्छ झाले घर !! " सध्या आपण आपल्या घरात अनेक वस्तू भरभरून आणून ठेवतो आणि जणू त्याचे प्रदर्शनच घडवत असतो. खरंच या एवढया महागड्या वस्तूंची गरज असते का ? आता घराला पुन्हा एकदा जुना टच देण्याची गरज निर्माण होऊ पाहते आहे. कारण जुने ते सोने होते. जुने तेच आरोग्यदायक होते. चुलीवरच्या जेवणाची चव फाईव्ह स्टारला येत नाही हेच खरे.

          शिडवणे माऊली वारकरी संप्रदाय मंडळाने वंचित राहिलेल्या प्राथमिक शाळेतील मुलांना मोफत गणवेशांचे वाटप केले याचे म्हणूनच कौतुक करावेसे वाटते. मंडळाने या छोट्या विद्यार्थ्यांमध्ये ' विठू माऊली ' पाहिली असावी. माऊलीच्या तीन अक्षरांची फोड केली तर तीन शब्द बनतात. माता , उमाळा आणि लीनता. या तिन्ही गुणांना आपलेसे करत मंडळानं आपलं सेवाव्रत पुढे अव्याहत सुरु ठेवावे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागायला शिकवणारी संस्कृती जोपासताना त्यांनी आमच्या बालचमुला दिलेली ही भेट उबदार शालीपेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे. हा गणवेश घालून रुबाबात आपल्या शाळेची वाट चालताना मुलांनीही माऊलीचा सतत आदर करत राहायला हवा. देण्याचे व्रत स्वीकारायला हवे. आज आपल्याला मिळाले आहे , उद्या आपण मोठे झाल्यावर अशीच दानशूरता दाखवणार आहोत. तळागाळातील गरजू आणि होतकरुंना ऐन गरज असताना दिलेली अशी वस्तूरुप भेट म्हणूनच नक्कीच अविस्मरणीय ठरेल यात अजिबात शंका वाटण्याचे कारण नाही.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली






No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...