Thursday, June 2, 2022

🛑 पाण्याचा थेंब

🛑 पाण्याचा थेंब

          एक पुरातन काळातील कावळ्याची कथा सर्वांनाच माहिती आहे. त्या गोष्टीला किती वर्षे झाली असतील माहिती नाही. पण अजूनही शाळांमध्ये या कावळ्याची गोष्ट तशीच सांगितली जाते. एक तहानलेला कावळा असतो. तो पाण्याचा शोध घेत असतो. त्याला खूप लांबवर पाण्याचा हंडा दिसतो. त्यातील पाणी खूपच तळाशी असतं. कावळा खूप हुशार असतो. त्याला एक युक्ती सुचते. तो इकडे तिकडे पाहतो. त्याला दगडाचे खडे दिसतात. तो आपल्या चोचीने ते दगडाचे खडे एक एक करुन हंड्यात टाकतो. हंड्यातील तळाला असलेले पाणी वर येते. तो पोट भरुन पाणी पितो आणि आनंदाने उडून जातो. 

          पाण्याचे काही थेंब मिळून पाण्याचा हा साठा तयार होतो. पाणवठा होण्यासाठी पाण्याचे थेंब एकत्र यावे लागतात. थेंबे थेंबे तळे साचे. तळे साचण्यासाठी थेंबांची जरुरी असते हे या म्हणीतूनही स्पष्ट होते. याचा अर्थ पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. कावळ्याला तहान लागली होती , त्यावेळी त्याला कधी एकदा पाणी पितो असे झाले होते. त्याने विज्ञानातील आर्किमिडीजचे तत्त्व न शिकताही ते वापरले होते. दगडाचे खडे टाकून टाकून त्याने पाणी वर आणले होते. गरज ही शोधाची जननी आहे हे त्या कावळ्यानेही सिद्ध केले होते. आपण तर माणूस आहोत. आपणही तहान लागली की विहीर खणायला लागतो तसे. 

          लहानपणी आकाशवाणी पुणे नेहमी ऐकायचो. तेव्हा त्यातील उद्घोषक नेहमी काहीतरी चांगले सुविचार सांगत. त्यातील पाण्यासंबंधात एक सुविचार माझ्या चांगलाच लक्षात राहिला आहे. " आभाळातून पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब जपायला हवा , उद्याच्या अंकुरणाऱ्या कोंबासाठी. " खरंच पाण्याचा प्रत्येक थेंब जपायलाच हवा. 

          सध्या आपल्याला सगळ्यांनाच खूप तहान लागत असेल. तहान लागली की आपण आपली पाण्याची बाटली शोधतो. पाणी पितो तेव्हाच शांत होतो. पाणी पिऊन पिऊन संपून जाते. पाणी हवे असते , पण ते मिळत नसते. आता पाण्याची किंमत समजू लागते. जवळपास पाण्याची बाटली किंवा पाणी मिळते का बघतो. पाणी मिळाल्याशिवाय तृष्णा शांत होत नाही. पाणी मिळाले की ते घटाघटा पिण्यात जो आनंद असतो तो कशातही नसेल. जेवढे पाहिजे तेवढे पाणी पिल्याशिवाय आपण पाणी पिणे थांबवत नाही. आपल्या शरीराला पाण्याची इतकी गरज असते , की पाणी हे आपल्या जीवनाचे जीवन झालेले आहे. म्हणूनच पाण्याला जीवन म्हणत असावेत. हेच पाणी पिण्यासाठी महत्त्वाचे असते , तसे इतर अनेक सुविधांसाठी उपयोगी असते. 

          त्यादिवशी काही मुले नदीत पोहोण्यासाठी गेली होती. उन्हाळ्यात सर्वांनाच पाण्यात डुंबायला जायला खूप आवडते. त्यांनाही तो मोह आवरला नाही. पाण्याच्या खोल डोहात उतरल्यामुळे त्यातील एका मुलाला बुडून प्राण गमवावे लागले. जे पाणी तहान भागवते , ते अतिरिक्त घेतल्याने मृत्यूही ओढवतो. पाण्याने त्या मुलाचा प्राण घेतला होता. त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं होतं. तो बराच वेळ पाण्यात बुडून राहिल्यामुळे त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले होते. पोहता येणारे सुद्धा बुडतात. त्यात आमच्यासारख्यांचे काय ? 

          उन्हाळा संपता संपता पाण्याची टंचाई जाणवू लागते. सगळ्या विहिरींमधील पाणी संपू लागते. तळ दिसू लागतो. एकाच विहिरीवर चार पाच पंप लावलेले असतात. विहिरीत पाणी आहे का नाही बघितलेही जात नाही. बटन चालू करतात. पाणी भरुन घेतात. विहिरीमधले पाणी संपले तरी पाहिले जात नाही. कोणीतरी पंपाचा आवाज येतो आहे म्हणून बघायला जातो. तेव्हा लक्षात येते की विहिरीत पाणी नसल्यामुळे ' घरघर ' आवाज येत आहे. टाकीतील पाणी संपून जाते. घरखर्चासाठी पाणी मिळत नाही तेव्हा पाण्याचा वापर जपून करण्याचे लक्षात येते. रात्रभर पंप बंद राहतो. सकाळपर्यंत झऱ्यातून पाणी येत राहते. पुन्हा पाण्याच्या थेंबा थेंबानी विहिरीचा तळ भरुन जातो. तो पाहून पुन्हा हायसे वाटते. पंप पुनश्च सुरु केले जातात. पुन्हा तसेच घडत राहते. 

          उन्हाळ्याची सुट्टी लागते. मुंबईची चाकरमानी मंडळी गावात गर्दी करतात. पाण्याचा बेसुमार वापर सुरु होतो. माठातले थंडगार पाणी पिताना पिणाऱ्याचा तृप्त चेहरा बघत राहावासा वाटतो. गावात नदी असतेच. त्यात एखादी कोंडही असतेच असते. मुले दरवर्षी पोहोण्याची मजा लुटत असतात. एखादा बुडून जाणार असतो हे कोणाच्या गावीही नसतं. पुन्हा तशी नको असलेली घटना घडते. सन्नाटा पसरतो. दोन तीन दिवसांत सन्नाटा संपतो. 

          पावसाचे ढग आकाशात जमू लागतात. अमृतासारखे पाण्याचे थेंब धरतीला येऊन मिळतात. धरतीवर जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन जाते. शाळा सुरु होते. मी सातवीच्या वर्गाला शिकवित असतो. अचानक एक कविता समोर येते. " थेंब आज हा पाण्याचा " ही कविता शिकवताना मी शब्द साहित्य आणि व्याकरण शिकवत राहतो. त्यातील समानार्थी शब्द , यमक असणारे शब्द , विरुद्धार्थी शब्द , शब्दार्थ आणि साहित्यिक मूल्य शिकवत राहतो. हे शिकवताना मुलं ते कदाचित लक्षात ठेवतात. पाणी वाचवण्याचे विसरुनच जातात. मुलांना प्रश्नांची उत्तरे देता येतात. व्यवहारात वापरता येत नाही. हे असं चित्र पाहिलं की तो कावळा बरा वाटतो. नळ चालू असताना वाया जाणारे पाणी पाहून काहीच न करणारी माणसे बघून डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



1 comment:

  1. एक थेंब पाण्याचा खरेच मौल्यवान. छान मांडणी.

    ReplyDelete

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...