Friday, June 17, 2022

🛑 अभिनंदन दहावी !!!! 🟢

 🛑 अभिनंदन दहावी !!!! 🟢

          निकालाचा दिवस हा आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. कारण या दिवसाची प्रतिक्षा संपून गेलेली असते. हा निकाल धक्कादायक असू शकतो. तो आपलं जीवन कायमचं बदलवून टाकणाराही असू शकतो. अपेक्षित निकाल लागला नाही तर काहीही विचित्र घटना घडवणारी मुले पाहिली की सुन्न व्हायला होते. 

          निकाल ही फक्त टक्केवारी असते. कमी टक्के गुण मिळवणारे नाराज होण्याची शक्यता असते. त्यांना अपयश मिळाले आहे असे वाटत राहते. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अपयशाने खचून जायचे नसते , उलट अधिक जोमाने प्रयत्नाला लागायचे असते. दहावीच्या पुढे अजून बऱ्याच परीक्षा बाकी असतात हेही लक्षात ठेवले पाहिजे. हे स्पर्धात्मक युग असले तरी आपण दुसऱ्याशी तुलना करण्याचं सोडून द्या. तुमच्या स्वतःच्या पूर्वीच्या गुणांपेक्षा तुम्ही वरचढ ठरत आहात ना ? मग आणखी काय हवे ? सगळी मुलं ही वेगवेगळ्या क्षमता घेऊन जन्माला आलेली असतात. त्यांना सर्वांना एकाच तराजूत तोलणं कितपत शहाणपणाचं आहे ? ह्या तुलनेमुळेच मुलांचा आत्मविश्वास डळमळीत होत चाललेला आहे. 

          आपल्या मुलांना अजून खूप जग बघायचे आहे. त्याला ज्याची आवड आहे , तेच त्याला करु द्या. त्याला ज्या ज्ञानाची भूक आहे , ते त्याला खाऊ घाला. तो नक्की पोटभर जेवेल. अर्थात करियर करण्यासाठी त्याला सगळ्या गोष्टींची माहिती करुन देणं हीसुद्धा पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. ती पार पाडण्यास आपण कमी पडणार नाही हेही पाहिले पाहिजे. 

          आम्हीही दहावी शिकलो. भरपूर अभ्यास केला. खूप लेखन केले. पाठांतर केले. उपक्रमात भाग घेतला. नेहमी पुढे पुढे राहण्यासाठी कंबर कसून करत राहिलो. त्यात कधीही खंड पडू दिला नाही. हुशार मुलांकडे बघत बघत त्यांचे चांगले गुण आत्मसात केले. त्यांच्यातल्या वाईट गुणांकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या रॅगिंगला बळी पडलो नाही. आम्ही यशस्वी होण्यासाठी अभ्यास केला होता. 

          अत्युच्च शिखराचे ध्येय सतत खुणावत होते. ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. जागेपणीही स्वप्न पाहात होतो. झोपेत तर स्वप्नांची शृंखलाच असे. सकाळी उठल्यावर पुन्हा अभ्यासाला लागत असू.

          रात्री उशिरापर्यंत झोप आली तरी अभ्यास केला होता. तेव्हा आतासारखे मोबाईल नव्हते. इंटरनेट नव्हते. गुगल सर्च नव्हते. पुस्तके वाचूनच उत्तरे शोधण्यासाठी रात्रीचा दिवस केला होता. क्लास लावले नव्हते. गाईड्स नव्हती. तरीही चांगले गुण प्राप्त करुन पहिल्या तीन नंबरात येण्याचा प्रयत्न असे. केलेले प्रयत्न बऱ्याचदा सफल होत गेले होते. त्यामुळे प्रयत्नांची कास कधीच सोडली नाही. 

          दहावीचे आठ वर्ग होते. प्रत्येक वर्गात हुशार मुले होती. माझ्या वर्गात मी ' वासरात लंगडी गाय ' होतो. माझा अभ्यास बघून माझ्या वर्गाने अभ्यास करायला सुरुवात केली होती. मला माझ्या मित्रमैत्रिणींचा अभिमान आहे. त्यांनी मला कधीही त्रास दिला नाही. त्यांनी मला केलेले सहकार्य मोलाचे होते. त्यांनी मला अभ्यास करायला दिला होता. नंबर आला की त्यांनी माझे पुढे येऊन अभिनंदन केले होते. त्यामुळे माझी जबाबदारी ते अधिकाधिक वाढवत नेत होते. त्यांना एखादे उदाहरण पुन्हा समजावून सांगताना माझे ते अधिक लक्षात राहत होते. त्यांनी मला दिलेला आदर मी कायमच लक्षात ठेवला आहे. 

          कधीतरी ते जुने वर्गमित्र भेटतात. जुन्या आठवणी जाग्या होतात. आता त्यांना ओळखणे शक्य नसते. प्रत्येकाची शरीराची ठेवण पुरती बदललेली दिसते आणि खुदकन हसूच येते. मी शिक्षक झालो आहे हे पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वाढताना पाहतो तेव्हा मलाही अत्यानंद होतो. 

          दहावीत भरपूर गुण मिळालेले असतात. तेवढे गुण बारावीत मिळवणे कठीण जाते. पुढे पुढे शिकत जावे तशी गुणांची टक्केवारी खालावत जाते. अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढलेली असते. ती पेलताना ताकद पणाला लावावी लागते. 

          वेळ निघून गेली की ती पुन्हा येत नाही. वय निघून गेले की तेही तसेच जाते. मग पश्चात्ताप करण्याची वेळ येते. पण मग उशीर झालेला असतो. त्यामुळे वाईट विचार मनात डोकावू लागतात. 

          आपण आपल्या मनाला नियंत्रणात ठेवायला हवे. ते सांगेल तसे करु नये. आपण सांगू तसे मनाने आणि देहाने करावे. हे घडेल तेव्हा आपले उत्तीर्ण झालेले आणि अत्युत्तम गुण मिळवलेले विद्यार्थी खऱ्या अर्थाने उत्तीर्ण झाले असे म्हणता येईल. सर्वांना त्यांच्या पुढील दैदिप्यमान यशासाठी अनंत उदंड शुभेच्छा.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...