🛑 ' कारटो ' ची कल्पना
कल्पना धाकू मलये नावाची माझी डीएडची मैत्रीण. तिने ' कारटो ' नावाची एक बालकादंबरी लिहिली आहे. ती खूप छान लेखन करते. तिने केलेलं लेखन वाचकाला भावणारं आहे. लहानपणी घडणाऱ्या कित्येक गोष्टी कल्पनाने लक्षात ठेवल्या आहेत. गोष्टी नुसत्या लक्षात ठेवून चालत नसतात , त्या काळजीपूर्वक आणि क्रमबद्ध मांडाव्या लागतात. कल्पनाने अगदी तसंच केलंय.
बालमनाला दांडगा अभ्यास असणारी व्यक्तीच असं करु शकते. प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा बारकाईने विचार केल्याने कादंबरी वाचनीय झाली आहे. कादंबरीच्या नावामुळे तर ती हातात घेऊन बघण्याचा आणि वाचण्याचा मोह व्हावा. कल्पना चांगलं लिहिते एवढं मला माहिती होतं. पण ती अतिशय कसदार आणि दर्जेदार लिहू शकते हे ' कारटो ' वाचल्यानंतर कोणीही सांगू शकेल. लेखिका म्हणून कल्पना जिंकली आहे. तिने कारटो मध्ये अनेकानेक परखड मतं व्यक्त केली आहेत. एक महिला असं लिहिते आहे म्हणून आणखी अभिमानास्पद आहे.
मालवणी बोलणारी अनेक प्रसिद्ध माणसे मी बघितली आहेत. नटवर्य कै. मच्छिंद्र कांबळी यांना मी लहानपणापासून ऐकत आलोय. मी ज्याठिकाणी राहायला होतो , तिथे शेजारी गॅरेज होते. त्या गॅरेजमध्ये ते एकदा आले होते. मी धावत जाऊन त्यांची सही घेतल्याचे मला चांगलेच आठवते आहे. त्यावेळीसुद्धा ते माझ्याशी शुद्ध मालवणीत बोलले होते. त्यांची बरीच नाटके प्रत्यक्ष पाहिली , तेव्हा त्यांचं मालवणी भाषेवरील प्रभुत्व लक्षात येतं. कल्पनाची मालवणी भाषेवरील तशीच पकड असल्याचे दिसून येते. शक्यतो तिची मालवणी भाषा शुद्ध आणि जिव्हाळ्याची वाटते. मालवणी शब्दांना तिने लहानपणापासून अधिक आपलेसे केले असावे. आम्हां लोकांना प्रमाणभाषेचं कोडकौतुक वाटत असतं. ती बोलताना आम्ही मालवणी भाषेचं टोनिंग वापरताना अनेकदा चुकत असतो. हे चुकलेलं पुण्यातील लोकांना लगेच समजतं. कारण आमची प्रिय मालवणी भाषा हेल काढणारी आहे. ती हेल वगैरे काढणारी असली तरी ती आम्हाला प्रिय आहे.
कल्पना मलये हिने लहान असतानाच्या तिला शंका वाटणाऱ्या गोष्टी जशास तशा मालवणीत शब्दबद्ध केल्या आहेत. तिची मराठी भाषाही स्वच्छ आणि शुद्ध असते. तिला दोन्ही भाषेतून बोलताना आणि तिने दोन्ही भाषेतून लिहिलेले वाचताना तिची साहित्यविषयक उंची लक्षात येते. मीसुद्धा थोडेफार लेखन करतो. तरीही तिची उंची गाठू शकण्यासाठी मला भरपूर अभ्यास करावा लागेल.
तिच्या पुस्तकाला वाचल्याशिवाय बोलणे हे कधीही मूर्खपणाचे ठरेल. तिच्या पुस्तकाच्या चार आवृत्त्या निघू शकतात म्हणजे तिचे पुस्तक वाचायलाच पाहिजे असा अर्थ होतो. कोणत्याही लेखकाचे किंवा लेखिकेचे पुस्तक न वाचता आपल्याला कोणतेही भाष्य करता येणार नाही. ते पुस्तक वाचल्याशिवाय त्यात काय वेगळं आहे ते समजणारही नाही. त्यासाठी ते स्वतः विकत घेऊन वाचले पाहिजे. विकत घेऊन पुस्तक वाचण्यात नक्कीच मजा असते. पुस्तक संग्रही राहतं हा आणखी एक फायदा.
पुस्तकाचं शीर्षक खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतं. ' कारटो ' हे नाव म्हणजे एका आपल्यासारख्याच प्रश्न विचारणाऱ्या मुलाच्या नावाचं संक्षिप्त रुप आहे. हा मुलगा चोखंदळ आहे , विज्ञानावर प्रेम करणारा आहे. शंकांची उत्तरं शोधून काढणारा आहे. म्हणून हा कल्पना मलये यांचा ' कारटो ' सर्वांनाच सतत भुरळ घालत राहणार आहे. यांवर आधारित एखादा चित्रपट किंवा बालनाट्य बनायला हरकत नाही. कल्पनाने केलेल्या कल्पना जर समजून घ्यायच्या असतील तर प्रत्येकाने हे पुस्तक नक्की घ्या आणि नुसतं घेऊन उपयोग नाही , ते शेवटपर्यंत वाचून काढा. मग समजेल ' कारटो ' म्हणजे काय रसायन आहे ते !!!
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 )

No comments:
Post a Comment