Thursday, October 31, 2024

🛑 आली दिवाळी घरोघरी

 🛑 आली दिवाळी घरोघरी


          दिवाळी जवळ आली कि कधी एकदा दिवाळीची सुट्टी पडते असे होऊन जाते. मुलांना आणि मोठ्यांना दोघांनाही दिवाळीच्या सुट्टीची ओढ असते. शाळा आणि दिवाळीची सुट्टी हे दरवर्षीचं समीकरण आहे. मुलांना सुट्टी हवीसुद्धा असते आणि पालकांना ती कधी हवी किंवा नकोसुद्धा असते. 

          दिवाळीत खूप मौज करायची असते. मामाच्या घरी जायचे असते. ज्यांना मामा असतात, त्यांना होणारा आनंद वर्णनीय असतो. मुलांच्या मामाच्या घरी जायच्या ओढीने आईलासुद्धा आपल्या माहेरी जायची संधी मिळत असते. एखादी रात्र मामाच्या किंवा भावाच्या घरी राहण्यातली मज्जा तिथे आनंद उपभोगणाऱ्या माझ्यासारख्या भाच्याला नक्कीच सांगता येईल. 

          “ दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा ” हे जे म्हटलं गेलं आहे ते अगदी खरंच आहे. आमच्या मामांच्या घरच्या दिवाळीने आमच्या तनमनात दिवाळी साजरी केली आहे. बालपणापासूनच आम्हां सर्व भावंडांना आजोळीची आत्यंतिक ओढ होती. ती अजूनही आहे. मामांनी आम्हाला खूप दिले. धन, धान्य, संस्कार, प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा हे सर्व शब्द कमी पडतील. आम्हाला घडवणारे आमचे आजोळच होते. कारण प्रत्येक मामा म्हणजे आमच्यासाठी एकेक संस्कारयुक्त शिदोरीच असे. त्यांच्या सहवासात गेल्यावर आमच्या सहवासाला सुगंधी उठण्याचा वास येऊ लागला.

          मामांच्या घरचे संस्कारांचे मोती आम्हांला नेहमीच चकचकीत करीत होते. त्यांची वागणूक आम्ही प्रत्यक्ष पाहात होतो. दिवाळी सणाला माझ्या बाबांनी माझ्या आजोळी जाऊन ‘ नरक चतुर्दशीच्या ‘ चाव दिवशी एकत्र घेतलेला फराळ मला अजूनही आठवतो आहे. सर्व मुले, माणसे एकत्र येऊन त्यांचं ते आनंदाचं आदरातिथ्य फराळातल्या गोड पदार्थांपेक्षाही कित्येक पटीने गोड असे. मामांच्या या गोडपणाचा स्पर्श आम्हांला झाला आणि आम्हीही काही प्रमाणात गोड बनण्याचा प्रयत्न केला. मामा, मामी आणि त्यांची मुले आम्हांला आपल्या घरातील समजत. त्यांचं नारळाचं दुकान, सलून दुकान, काहींच्या खाजगी नोकऱ्या, काहींच्या सरकारी नोकऱ्या या सगळ्या गोष्टींचं मला अप्रूप असे. आपणही त्यांच्यासारखं व्हावं असं वाटायला लागावं असं प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व. आमच्या मामांनी आमच्या घराला नेहमीच आपलंसं मानलं त्यात माझ्या आई बाबांचा सिंहाचा वाटा आहे. आम्ही गरीब असलो तरी मामांनी आमच्या आईबाबांचा नेहमी सन्मानच केला आहे. 

          फराळ खाण्यात मजा नसते, तो एकत्र खाण्यात मजा असते. एकत्र गप्पा गोष्टी मारत मारत फराळाची गोडी अधिक वाढत जाते. आमच्या मामांनी भाऊबीजेला आमच्या घरी येणं, हा म्हणजे आमच्यासाठी खरा दिवाळीचा सण असे. मामांनी आणलेली प्रत्येक गोष्ट माझ्या आईसाठी सन्माननीय असे. आईने आपल्या मोठ्या भावांना कधी ‘ अरे ’ म्हटले नाही. भावांचा निरतिशय आदर करणारी आई आम्हांला लाभली होती. अशी प्रेमळ आई, प्रेमळ मावशी, प्रेमळ आत्या, प्रेमळ बायको आणि प्रेमळ आजी होणे कठीण आहे. आईने केलेले गोड पोहे, कांदेपोहे, रव्याचे लाडू, बेसनलाडू, करंज्या, चकल्या, शंकरपाळ्या अजूनही आठवतात. त्या करतानाच आम्ही जास्त खाल्ल्या असतील. पण तिने त्या आम्हांला खायला दिल्या. कधीही हे खाऊ नकोस म्हणाली नाही. 

          दिवाळीचा ‘ आकाश कंदील ’ बनवणे माझे आवडते काम. मी आणि माझा भाऊ चिव्याच्या काठ्यांचा आकाश कंदील बनवत असू. काहीवेळा तो आम्हांला नीटसा साधत नसे. तेव्हा मोठी ताई, आक्का यांची साथ मिळे. पताकाच्या कागदांना कापून त्याच्या करंज्या बनवून लावणे भारीच असे. आपण स्वतः केलेल्या ‘ कंद्याची ’ मज्जा काही औरच. आता तसे घडत नाही. घडले तरी तो आनंद अगदी तस्साच मिळत नाही. 

          आज ही माझी पहिली दिवाळी असेल, माझी दिवाळी आहे, पण ती बघायला बाबा फोटोत आहेत. ते नाहीत, आई नाही. माझ्या कुटुंबाने केलेली दिवाळी कायम लक्षात राहण्यासारखी असते. त्यात एखाद्या माणसाची उणीव म्हणजे फराळात लाडू नसल्यासारखेच. माणसांनी दिवाळी नक्की करावी, असलेल्या माणसांना सुखी ठेवत, त्यांच्या मनातले दिवे सतत जिव्हाळ्याने पेटते ठेवलात तर ती समाधानाची दिवाळी होईल यात अजिबात शंका नाही. 


लेखन : श्री. प्रवीण अशितोष कुबल ( मुख्याध्यापक, शिडवणे नं. १) 

दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२४ 

वेळ : सायंकाळी ७. १५ वाजता

No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...