Saturday, March 12, 2022

🛑 पावनखिंड : एक ऐतिहासिक बाजी

         " काळाच्या जबड्यात घालूनी हात , जात ही आमुची , पाहा चाळूनी पाने आमच्या इतिहासाची " हे गाणे मी महाविद्यालयात शिकताना कधी काळी म्हटल्याचे आठवते. खरंच या ओळीतील शेवटची ओळ खूप महत्त्वाची आहे. आपल्याला आपला इतिहास चाळून पाहता यायला हवा. 

          आज दुसऱ्यांदा शाळेतील मुलांसोबत ' पावनखिंड ' हा चित्रपट पाहण्याचा सुवर्णयोग आला. मी एक शिक्षक आहे , म्हणून मला हा सुवर्णयोग वाटतो. कारण कुटुंबासोबत चित्रपट पाहणं आणि आपल्या विद्यार्थ्यांसोबत चित्रपट पाहणं हे वेगवेगळे अनुभव आहेत. मी हे दोन्ही अनुभव घेतले आहेत. दोन्ही वेळेला माझ्या भूमिका बदलल्या होत्या. मनोरंजन आणि ज्ञानार्जन अशा त्या दोन गोष्टी असाव्यात. 

          मुलांना चित्रपटाविषयी सांगितल्यापासून ती बघण्यास अधीर झालेली दिसत होती. दररोज मुलांचे आकडे वाढताना दिसत होते. चित्रपटात मोठया पडद्यावर दिसणारा थरार मुलांना अनुभवायचा होता. 

          शनिवारी सर्रास उशिरा शाळेत येणारी मुले माझ्याअगोदरच शाळेत येऊन वाट बघताना दिसली. गाडीने जायचे तर प्रवासी गोळ्यांपासून तयारी ठेवली होती. सर्वांना शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले बॅज लावले. मुले आनंदाने निघाली होती. 

          शाळेतील आम्ही शिक्षक त्यांच्याबरोबर होतो. आज आम्हांला त्यांना अधिक जाणीवपूर्वक सांभाळण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी होती. बोलता बोलता सिनेमागृह कधी आले ते मुलांनाही समजले नाही. आमच्या आधीच बरीच मुले येऊन रांगेत राहिलेली दिसली. आम्ही मुलांना महत्त्वाच्या सूचना द्यायला सुरुवात केली होती. आमचा नंबर यायला उशीर होत होता. मुले नुसती " सर , कधी जाणार आपण ? " असे प्रश्न विचारत राहिली होती. त्यांना कंटाळा येऊ नये म्हणून मी त्यांचे छान छान फोटो काढत राहिलो होतो. शेवटी एकदाचा नंबर लागला. मुले भराभर आत जात होती. त्यांच्या नजरा चौफेर दौडत होत्या. त्यांनी जे बघितले नव्हते , ते त्यांना बघायला मिळत होते. ते सर्व क्षण मुले आपल्या मेंदूत टिपून घेताना दिसत होती. बॅज लावल्यामुळे आम्ही आमची मुले ओळखु शकत होतो. 

          मुलांनी खुर्च्यांचा ताबा घेतला. चित्रपट सुरु होण्याआधीच त्यांनी आपल्याकडील आणलेले खाऊ खायला सुरुवात केली. कदाचित त्यांना भूक लागली असावी !!! चित्रपट सुरु झाला होता. आता मात्र त्यांचे खाऊ खाणे थांबले होते. ती चित्रपटात दंग झाली. 

          शिवाजी महाराजांचा इतिहास बघताना त्यांचे डोळे विलक्षण चमकताना दिसत होते. पहिल्याच दृश्यात शिवाजी महाराज आपल्या शंभुबाळाला पावनखिंडीचा पराक्रम सांगत असताना आमची मुले जणू शंभुबाळ झालेली दिसली. 

          चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात नसलेले मावळे पाहून त्यांच्या ज्ञानात अधिक भरच पडत होती. जे वर्षभरात पुस्तकातून शिकवले जाणार नव्हते , ते दोन तीन तासांत बघण्याची संधी मुलांना प्राप्त झाली होती. 

          हरप्या , अगिन्या , रायाजी , कोयाजी , दिपाई , शिवा काशीद , बहिर्जी नाईक , बांदल , बाजीप्रभू आणि सगळी मावळे मंडळी पाहून मुले भारावून गेली होती. आपल्या प्राणांची पर्वा न करणारी कितीही उदाहरणे दिली तरी ती समजली नसती , पण चित्रपट पाहिल्याने त्यांचा देशाभिमान , स्वराज्याभिमान अधिकाधिक वृद्धिंगत होताना पाहायला मिळाला ही विशेष नोंद करण्यासारखी गोष्ट आहे. त्यावेळी शिवाजी महाराजांनी उच्चारलेले हे वाक्य मनात अधिक खोलवर रुजले जायला हवे असे वाटते. राजे म्हणाले , " ज्या सत्ता स्वार्थासाठी असतात , त्यांना त्याग आणि स्वामीनिष्ठा माहिती नसते. " आपण आपल्या कर्तव्याशीही असेच कर्तव्यनिष्ठ असायला पाहिजे असाही एक अर्थ मी काढला होता. 

          " वज्र वलय " हा युद्धाचा प्रकार पहावयास मिळाला. शिवा काशिद जेव्हा शिवाजीराजे बनून सिद्धी जोहरला भेटण्यास गेला तेव्हाची त्याची स्वामीभक्ती पाहिली. डोक्यावरचा शिवरायांचा जिरेटोप उतरवून त्याला त्याने मुजरा केला आणि तो जे वाक्य बोलला त्याने अंगावर शहारे आले. शिवा म्हणाला , " राजं , शेवटचा मुजरा " … 

          रायाजीने पावनखिंड लढवताना आपला देह ठेवला , तेव्हा इकडे त्यांची पत्नी शौर्याचा दीप विझु नये म्हणून आटापिटा करताना दिवा विझतानाचा क्षण हृदय भेदून टाकणाराच होता. 

          बाजीप्रभूंनी आपल्या अखेरच्या क्षणापर्यंत शत्रुसैन्याला रोखून ठेवतानाचे दृश्य पाहताना त्या काळी प्रत्यक्षात काय घडले असेल याची जाणीव होऊन त्यांना नतमस्तक व्हावेसे वाटले. विशाळगडावर पोहोचल्यानंतर शिवाजीराजे म्हणाले , " आमचे बाजी वाट पाहत असतील , तोफा वाजवा. " त्यावेळी ते स्वतः ही गर्भगळीत झाल्याचे दिसले. तेव्हा ते म्हणाले , " बाजी लवकर या " बाजी काही परत आले नाहीत. पण आपले बाजी कायमचे सर्वांच्या मनामनात अमर झाले आहेत. 

          चित्रपट संपला , तरी मुलांना घरी जाईपर्यंत पावनखिंड डोळ्यासमोरुन हलता हलत नव्हती. धन्य ते शिवराय , धन्य तो बाजी.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर (9881471684 )




















No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...