🛑 गुरुंचे गुरु सद्गुरु
गुरुकुल पद्धतीमध्ये गुरूंच्या गृही राहून अध्ययन केले जात असे. गुरुंनी दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करणे हे छात्राचे आद्यकर्तव्य असे.
" गुरु ईश्वर तात माय , गुरु विन जगी थोर काय " यात गुरुला सर्व उपमा दिल्या आहेत. पण हे गुरु घडतात कसे ? त्यालाही काही प्रक्रिया आहेत. गुरु होणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. ती एक निरंतर प्रक्रिया आहे. या गुरुंना विद्या देणारे उच्च विद्याविभूषित असतात. अध्यात्मिक क्षेत्रात गुरुंच्या गुरुंना सद्गुरु म्हटले जाते. हल्ली असे अनेक सद्गुरु आपल्याला दिसून येतात.
शैक्षणिक क्षेत्रात गुरुजी या नावाने ओळखले जाणारे शिक्षक आता सर या नावाने ओळखले जातात. इंग्रजी शाळांमध्ये किंवा हायस्कूल , कॉलेजमध्ये पूर्वी शिक्षकांना ' सर ' असे म्हणू लागले. ते अजूनही तसेच सुरु आहे. मराठी शाळांमध्ये शिक्षकांना ' गुरुजी ' किंवा ' बाई ' असे संबोधले जाई. त्यात खूप आदर वाटे. आता सर आणि मॅडम या शब्दांमध्ये मोठेपणा वाटू लागला आहे. पण गुरुजी या शब्दाला जो सन्मान आहे तो इतर शब्दांना नक्कीच नाही. आपण इंग्रजाळलेले झाल्याने ' सर ' या शब्दाचा अभिमान बाळगत आहोत , पण गुरुजी या शब्दांमध्ये विनम्रता येते ती सर मध्ये येत नसल्याचे जाणवते.
मी शिक्षक झालो. मला अजूनही गुरुजी हा शब्द नितांत आवडतो. जिल्हा परिषद रत्नागिरी येथे नोकरी करत असताना मी ' गुर्जी ' होतो. सिंधुदुर्गात गुरुजींचा सर झालो. मग सर या उपाधीची सवयच लागली. पण अजूनही खेड्यापाड्यात गुरुजी म्हणणारी मंडळी आढळतात. त्यांना शिक्षकांबद्दल कमालीचा आदर दिसून येतो.
या गुरुजींनाही कधीतरी मार्गदर्शनाची गरज असते. त्यासाठी प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक ही भूमिका पार पाडताना दिसतात. त्यांनाही मार्गदर्शन करणारे गुरु असतात.
मी शेर्पे केंद्रात येऊन तीन वर्षे होतील. आम्हाला जे केंद्रप्रमुख लाभले आहेत , त्यांचे नावच सद्गुरु आहे. आल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शैक्षणिक वाटचाल करत असताना आम्हाला ते आमचे शैक्षणिक सद्गुरुच वाटत आले आहेत. ही त्यांची स्तुती नसून वस्तुस्थिती आहे.
प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. पण माझा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमीच ' माझे सद्गुरु ' असाच राहिला आहे. त्यांचे आणि माझे आडनाव समान आहे , " कुबल " . पण म्हणून काही मी या गोष्टीचा फायदा करुन घेत नाही. मी त्यांना पूर्वी ओळखतही नव्हतो. पण आता त्यांच्यासोबत काम करताना त्यांना ' सद्गुरुंच्या ' प्रमाणेच ओळखू लागलो आहे.
आपल्या हाताखाली काम करणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा देण्याचे काम ते प्राधान्याने करताना दिसतात. त्यामुळे ते आमचे केंद्रप्रमुख आहेत असे वाटत नाही , ते आमच्या मार्गदर्शक गुरूंसारखे वाटत राहतात. कधी ते आमचा मित्र बनतात. आमच्याशी कौटुंबिक गप्पा मारताना ते स्वतः केंद्रप्रमुख आहेत हेही विसरुन गेलेले दिसतात.
यापूर्वी शाळेत केंद्रप्रमुख येत असले तर खूप भिती वाटे , पण कुबलसरांची भिती अजिबात वाटत नाही. ते दररोज यावेत आणि आम्हाला एखादी शिकवण देऊन जावे असे वाटते. त्यांच्याकडे गेली अनेक वर्षे दोन दोन केंद्रांचा भार आहे. या केंद्रामधील सर्व उपक्रम राबवत असताना , शाळांना भेटी देत असताना त्यांची दमछाक होत असेल. पण त्यांचा प्रत्येक शाळेतील प्रवेश नेहमी हसतमुखाने असतो. त्यामुळे कोणत्याही शिक्षकांना दडपण येत नाही ही जमेची गोष्ट आहे.
कोणाकडून कोणते काम करुन घेता येईल याचाही त्यांचा अभ्यास दांडगा आहे. ते कोणावर पूर्णपणे अवलंबून नसतात हे विशेष. जी कामे त्यांनी स्वतः करायची असतात , त्यांचा भार ते शिक्षकांवर अवाजवी लादत नाहीत. कामाचा व्याप वाढला तर समान विभागणी करुन व्यक्तिपरत्वे काम देण्याची त्यांची पद्धत मला खूप आवडते.
मी पत्रकारिता परीक्षा पास झालो हे समजताच त्यांनी माझे हार्दिक अभिनंदन केलेच. पण त्यांनी मला पत्रकारिता करण्यासाठी अचूक दिशा दाखवली. प्रत्येकवेळी प्रोत्साहन दिले. आज मी जे काही बरेवाईट लेखन करीत आहे त्यालाही त्यांची शाबासकीची थाप कारणीभूत आहे. त्यांच्यामुळे माझा या क्षेत्रातील आत्मविश्वास वाढला आहे.
संपूर्ण केंद्रातच नव्हे तर तळेरे प्रभागात एक पत्रकार म्हणून माझी झालेली ओळख त्यांच्यामुळेच आहे. कोणत्याही कार्यक्रमात त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला नाही असे झाले नसेल. त्यामुळे त्यांनी माझा उत्साह वाढवत नेला तरी जबाबदारी सुद्धा वाढवत नेली आहे. तळेरे पत्रकार संघाच्या संपर्कात येण्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला होता.
खरंतर पत्रकाराने आपली प्रसिद्धी करायची नसते. मी शैक्षणिक उपक्रमांची प्रसिद्धी देता देता कुबलसरांनी आणि आता सर्व तळेरे प्रभागाने माझी जी पत्रकार म्हणून प्रसिद्धी दिली आहे त्याबद्दल मी कायमच सर्वांचा ऋणी राहीन. मला मुळात प्रसिद्धीची आवड नाही , पण जे चांगले ते मी प्रसिद्ध करत गेलो आहे. त्यामुळे माझी प्रसिद्धी होणे साहजिक होते. पण त्याचे श्रेय कुबलसर आणि तळेरे पत्रकार संघ यांना जातं असे मी मानतो. कारण त्यांच्याशिवाय हे शक्यही झाले नसते.
शिक्षकांना असे सकारात्मक प्रेरणा देणारे शैक्षणिक सद्गुरू भेटणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. म्हणूनच मला किंवा आम्हांला लाभलेले केंद्रप्रमुख सद्गुरू कुबलसर म्हणूनच श्रेष्ठ ठरतात. अशा व्यक्तिमत्त्वांचा ज्यावेळी त्यांच्या अपरोक्ष आदर केला जातो त्यावेळी त्यांचा तो पुरस्कारच ठरतो. त्यांना त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत अनेक उत्तम पुरस्कार लाभले आहेत ते मिळण्याचे कारणही तेच आहे. आमच्यासाठी ते आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. अशा व्यक्तिमत्त्वांचा गौरव झाला की आमची छाती अभिमानाने अधिक फुलून येते आणि आनंद गगनात मावेनासा होतो. आमच्या सद्गुरुंना उत्तरोत्तर अनेक उदंड पुरस्कार मिळोत , त्यांच्याकडून उत्तमोत्तम शैक्षणिक , सामाजिक कार्य घडो अशी मी ईश्वरचरणी सदैव प्रार्थना करत राहणे हे माझे आता कर्तव्यच झाले आहे.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

No comments:
Post a Comment