Friday, March 25, 2022

🛑 सत्याचे सत्य

           आपल्या आयुष्यात अशी अनेक माणसे येतात. त्यांच्या भेटीनंतर त्यांची सत्यासत्यता पटते. कधीही आपण आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवावा , कानांवर नव्हे. डोळ्यांनी बघितलेले जास्त लक्षात राहते. या अनेक माणसांपैकी सत्यवान चव्हाण हे एक नाव आहे. जे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्यांची माझी देवगड तालुक्यापासूनची ओळख आहे. ते आमच्यासाठी कायमच आदर्श राहिलेले आहेत. ते त्यावेळी वानिवडे शाळेत होते. खाडीला लागून असलेली शाळा. त्यांच्या शाळेत जायचे असेल तर तरीवरुन जावे लागले. एकदा त्यांच्या त्या शाळेत जाण्याचा योग आला होता. ती भव्य दिव्य शाळा बघून मला त्यांची दिव्यता लक्षात आली. 

          शाळा आदर्शच होती. कारण त्या शाळेत शिकवणारे सत्यवान चव्हाण आदर्श व्यक्तिमत्त्व होते. त्यांची माझी तिथेच ओळख झाली. त्यानंतर अनेकदा पगाराच्या वेळी तालुका स्कुलला भेट झाली असेल. प्रशिक्षणांमध्ये सत्यवान सरांचे पेटीचे सूर ऐकले नाहीत असे कधी झाले नसेल. त्यांचा स्वभाव आमच्या स्वभावाशी जुळला आणि जिवलग मैत्री नसली तरी मित्रत्व निर्माण झाले. त्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचा सहवास लाभला. आता ते जास्त वेगळे दिसतात ,  त्यावेळी त्यांचा सडपातळ बांधा होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून माझ्यात काही सकारात्मक बदल झाले हे त्यांना माहितीही नसेल. 

          अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमीच पाहिले आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार हे त्याचीच देणं आहे. त्यांचे भजनवेड मला पूर्वीपासून माहिती आहे. भजनात सूर , ताल , लय यांचा सुरेख संगम असावा लागतो. आपल्या आयुष्यातही त्यांनी मैत्रीचे हे सूर जपले आहेत. त्यांचे कमी मित्र असतील ,  जे आहेत ते खास मित्रच असतील. ते मला ' पव्या ' म्हणतात. त्यांचं ' पव्या ' उच्चारणं हृदयाला भिडणारं असतं. 

          शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक म्हणून भूमिका बजावत असताना त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांचे लिखित स्वरुप त्यांच्याकडे नसेलही. त्यांच्या संकल्पना अफलातून असतात. वयोमानानुसार शिक्षकांमध्ये पठारावस्था येऊ शकते. सत्यवान सरांमध्ये ती दिसत नाही. कालपेक्षा आज काहीतरी नवीन देण्याच्या उद्देशाने त्यांचा शाळेत प्रवेश होत असतो. चेकपोस्टवर काम करताना त्यांच्याशी जवळून संपर्क आला. आम्ही देवगड मध्ये जास्त वर्षे नोकरी केल्यामुळे असेल, पण देवगडशी आमची नाळ जुळलेली आहे. तिथले क्षण अविस्मरणीय असेच होते. तो हापूस आंब्यांच्या मोहराचा वास अजूनही नाकातून जात नाही. कोणत्याही घरात गेल्यानंतर तीन चार हापूस आंब्याच्या फोडी समोर येत असत. त्या फोडींची चव आता येत नाही. ते दिवसच वेगळे होते. पेटीच्या पेटी मोफत आंबे देणारे पालकही तिकडेच भेटले. त्याच तालुक्यातील आमचे हे मित्र सत्यवान चव्हाण म्हणूनच आम्हाला हापूसच्या आंब्यासारखे मधाळ वाटत राहतात. त्यांच्या संगतीत राहणाऱ्या सर्वांना ते आपल्या सारखा मधुर बनवून टाकतील यात काय शंका नाही. ते मला पव्या म्हणतात , म्हणून मीही त्यांना गमतीने सत्या म्हणून लागलो आहे. ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत , त्यांच्यासारखा होण्यासाठी अजून काही पावसाळे बघावे लागतील. म्हणूनच सत्यासोबतच्या या माझ्या सत्य भावना आहेत असे मी गीतेवर हात ठेवूनही सांगू शकतो.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर (  9881471684 )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...