Wednesday, March 23, 2022

🛑 मार्च एंडिंग : माय वर्क इज पेंडिंग

🛑 मार्च एंडिंग : माय वर्क इज पेंडिंग 

          मार्च महिना आला ' मार्च एंडिंग ' हे इंग्रजी शब्द आठवतात. आर्थिक वर्षाची कामे पूर्ण करण्यासाठी सर्वांचीच घाई होते. कारण कामे रखडलेली असतात. ती एकतीस मार्चच्या अगोदर पूर्ण करायची असतात. मग ' वर्क इज पेंडिंग ' राहते. 

          एकतीस मार्चपर्यंत शिल्लक राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी सगळे एकजुटीने कामाला लागतात. सर्व हिशेब जुळायला लागतात. पैशांचा प्रश्न असतो. इन्कम टॅक्स भरावा लागणार असतो. उपयोगिता प्रमाणपत्रे द्यावी लागणार असतात. 

          रजिस्टरे अपूर्ण असतात. ती परिपूर्ण करायची असतात. तासातासाने नवनवीन सुचनांचा भडिमार सुरु होतो. अंतर्गत तपासणी सुरु होते. पैशांचा हिशेब चुकायला नको असतो. पावत्या गोळा कराव्या लागतात. लेखाशीर्षात बसवाव्या लागतात. पावत्यांवर खाडाखोड करुन चालणार नसते. ऑडिट होताना दंड भरावा लागेल ही भीती असते. 

          अखर्चित रक्कम , व्याजाची रक्कम काढून दिलेल्या खात्यात तात्काळ भरणा करण्याचे आदेश मागे लागतात. तहानभूक विसरुन निर्जीव फाईलींना सजीव बनवण्याचा प्रयत्न होतो. फाईल सजीव बनवता बनवता आपण सजीव आहोत हेच विसरुन जायला होते. 

          पेटीकॅशबुक , लेजर , स्टॉकबुक , डेडस्टॉक , 32 नंबर , 33 नंबर ही सगळी रजिस्टरे एकामागून एक हाताखालून जात राहतात. त्यातील इंटऱ्या वाट पाहत असतात. या इंटऱ्या लिहून दमायला होते. कसेतरी लिहून पूर्ण होते. आकस्मिक खर्चाची देयके खायला येतात. ती भरता भरता नाकात नऊ येतात. व्हावचर बुक आधीच तयार असते. पैसे आधीच खर्च झालेले असतात. बँकेत पैसे जमा झाल्याबद्दलचा मेसेज येण्याची प्रतिक्षा सहन होत नाही. आणि ती प्रतिक्षा संपते... पैसे जमा झाल्याचे समजते. मग पैसे काढण्यासाठी गडबड घाई होते. बँकेत रांगाच रांगा लागतात. धनादेश रजिस्टर पूर्ण करावे लागते. चेक क्रॉस करता करता आपणही क्रॉस होऊन जातो. आढावा पूर्ण करण्याची शर्यत सुरु होते. उभ्या आडव्या बेरजांची तेरीज मारताना घामाघूम व्हायला होते. ज्यांची रजिस्टरे पूर्ण होत आलेली असतात ते आपला घाम पुसत असतात. ज्यांची अपूर्ण असतात , ते घाम काढत असतात. आधीच उन्हाळा मी म्हणत असतो. त्यात मार्च एंडिंगने उष्मांक वाढल्याचे जाणवते. 

          शाळांमध्ये ही परिस्थिती असेल तर इतर कार्यालयांमध्ये नुसती  तारांबळ उडालेली असेल असे वाटत राहते. कालच माझ्या मोठया बहिणीचा फोन आला होता. मंत्रालयात एका विभागात लिपिक म्हणून काम करणारी माझी ताई रेल्वेतून नुकतीच उतरली होती. कामावरुन घरी परतताना तिने फोन केला होता. ती चालता चालता बोलत होती आणि बोलता बोलता चालत होती. तिची दमछाक तिच्या आवाजात लक्षात येत होती. तिचेही मार्च एंडिंगचे दुखणे तिच्या बोलण्यातून व्यक्त होत होते. फाईलींची भली मोठी रास माझ्या डोळ्यासमोर येईल असे तिने वर्णन केले होते. पेंडिंग कामांची मोठी यादी ती सांगत राहिली होती. कार्यालयातील या अतिरिक्त कामांमुळे तिच्या मैत्रिणींनी व्हीआरएस घेतल्याचे ती सांगत होती. नवीन भरती होत नव्हती , रिक्त जागा रिक्तच राहत होत्या. दोन तीन टेबलांचा कार्यभार सांभाळताना कसे मेटाकुटीला यायला होते ते ऐकताना मीही मेटाकुटीला येत असल्याचे जाणवले होते. पेंडिंग वर्कचा ताण ती घरी घेऊन आली होती. फाईली ऑफिसात राहिल्या होत्या , तरीही त्या पूर्ण कशा होतील या कल्पनेने तिला येणाऱ्या तणावांची बेरीज किंवा गुणाकार होत असल्याचे माझ्या लक्षात आले. 

          मी तिला माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिच्या ते गळी उतरताना दिसत नव्हते. कदाचित मी तिच्या जागी असतो तर माझीही वेगळी अवस्था असली नसती हे मलाही पटत होते. पण कार्यालयातील हा अदृश्य ताण कसा घालवावा हे मी तिला फोनवरुन सांगणं मलाही कठीणच जात होतं. कितीही काम पूर्ण केलं तरी बॉस खुश होत नाही ही सगळ्यांचीच व्यथा आहे. बॉस म्हणजे माणूसच ना ? त्यालाही कोणीतरी वरुन ताण देत असणारच. तो आपल्या हाताखालच्या लोकांना ताणच देणार. कारण आपल्याला जे मिळतं तेच आपण परत करत असतो हा निसर्ग नियम आहे. हा ताण कधी कधी आवश्यक असला तरी तो प्रत्येकाला सुसह्य करता यायला पाहिजे. म्हणून कार्यालयात असताना कार्यालयाचा विचार करावा. कार्यालयाच्या बाहेर पडल्यानंतर आपलं वैयक्तिक आयुष्य जगण्यास सुरुवात केली पाहिजे. आता आपल्या कामात थोडा बदल झाला आहे म्हणजेच आपल्याला ती विश्रांती वाटायला हवी. हे सर्व आपण आपल्यालाच समजून देत राहायला हवं. घरी आल्यानंतर एखादं पुस्तक वाचावं , कविता म्हणावी , आवडत्या गायकाची गाणी ऐकावी , वपु काळेंची विनोदी कथा ऐकावी , टीव्ही लावावा , कॉमेडीच्या बुलेट ट्रेनमध्ये बसावं , आवडत्या नटनट्यांचे मराठी हिंदी सिनेमे पाहावेत , मस्त खळखळून हसावे. असं काहीतरी करावं की हा मनात भरुन ओसंडून वाहणारा तणाव विसरुन जायला होईल. 

          पण घरी येईपर्यंत घरचे वेगळे ताण आपली वाट बघत असतात. पुन्हा उद्याची तयारी लक्षात येते. उद्याचे जेवण , उद्याची भाजी सगळं डोळ्यासमोर येऊन नाचू लागतं. 

          हे सगळं असंच चालत राहणारं आहे. हे कधीही न संपणारं मारुतीचं शेपुटच आहे. आपलं आयुष्य किती मोलाचं आहे. ते असंच तणावात कशाला घालवायचं ? ताण नक्की घ्यायचा पण त्याचं स्वरुप नेहमी तात्पुरतं असायला हवं. ते अखंडपणे चालणारं नक्कीच असू नये. नाहीतर या जबरदस्त तणावांनी आपल्याला मानसिक आणि नंतर शारीरिक रोगांना सामोरं जाण्याची भीती नाकारता येत नाही. म्हणून मार्च एंडिंग एन्जॉय करा. " वर्क इज पेंडिंग " हे वाक्य तुमच्या मेमरीतून कायमचे डिलीट करुन टाका. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



2 comments:

  1. कार्यालयीन कामकाज परीर्थिती खुपचं टेशन वाली आहे परंतु त्या तून आपण सावरणे हाचं एक मार्ग मला तर वाटतो . धन्यवाद धन्यवाद सर

    ReplyDelete

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...