Thursday, March 10, 2022

🛑 नाभिक महिलांचा जल्लोष

           कित्येक दिवस कणकवली तालुक्यातील नाभिक महिलांच्या मनात होतं. जागतिक महिला दिन साजरा करण्याची संकल्पना त्यांचीच. एके दिवशी सायंकाळी ही संकल्पना घेऊन काही महिला भगिनी माझ्या घरी मला भेटायला व त्याचे नियोजन करण्यासाठी आल्या. मी सांगण्यापूर्वीच त्यांच्याकडे नियोजन तयार होतं. मी त्यांच्या नियोजनाला शब्दरूप दिलं इतकंच. त्या सर्वांच्या मनातला उपक्रम कागदावर मांडला गेला. माझ्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर कार्यक्रमाचे मूर्त रुप पाहून स्मित हास्य विलसताना दिसले. 

          ८ मार्च कार्यक्रमाची तारीख जवळ येऊ लागली होती. महिलांच्या हालचाली आणि भेटी वाढत गेल्या. त्यांच्या ग्रुपवर धडाधड मेसेज येऊन चर्चा घडू लागल्या होत्या. मीही त्यांना कार्यक्रमातील बारकावे समजावत होतो. जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण महिलांच्या या धडपडींना पाहत होते. त्यांना प्रोत्साहन देताना दिसत होते. या प्रोत्साहनाची महिलांना जास्त गरज दिसून येत होती. महिलांनी खूप तयारी केलेली दिसत होती. सर्वांना फोनद्वारे , संदेशांद्वारे आमंत्रणे कळवली होती. नेहमीच्या महिलांव्यतिरिक्त त्यांना आणखी अधिक महिलांची उपस्थिती हवी होती. 

          शेवटी तो दिवस उजाडला. कार्यक्रम दुपारनंतर होता. पण सगळ्या महिलांनी सकाळपासून घरातली आवराआवर करायला सुरुवात केली होती. मी मला सोपवलेल्या गोष्टींची यादी करण्यात दंग होतो. सगळं घेऊन मी कार्यक्रमस्थळी पोहोचलो. मलासुद्धा तयारीसाठी दोन दिवस लागले. मी हे आनंदाने केले होते. मी त्यांना तसा शब्द दिला होता. त्यांचा माझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता. म्हणून त्यांनी माझ्यावर काही जबाबदाऱ्या दिल्या होत्या. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन त्यांनी माझ्याकडेच दिले होते. त्याचा क्रम आम्ही सर्वांनी मिळून ठरवला होता. 

          कायम घरी चूल आणि मूल यात रमणाऱ्या या महिलांनी उत्तम प्रकारचं नियोजन करुन कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येकाला तोंडात बोट घालण्यास भाग पाडलं होतं. 

          सुरुवातीला शाब्दिक स्वागत झालं. मान्यवर पदाधिकारी व नाभिक महिलांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करुन जल्लोषात उदघाटन संपन्न झाले. संत शिरोमणी सेना महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करुन त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

          चार पाच निवडक महिलांच्या गटाने सुस्वर ईश्वस्तवन व स्वागतपद्य गाऊन उपस्थितांची मने जिंकली. कमी कालावधीत त्यांनी चांगली तयारी केलेली दिसली. पन्नास साठ जणांसमोर सामुदायिक सादरीकरण करणं तितकंसं सोपं नसतं. पण त्यांनी ते सहजपणे केलेलं दिसलं. हे सगळं करताना त्यांच्यावर कोणताही ताण आलेला दिसत नव्हता ही विशेष गोष्ट होती. रंगीत तालीम करुनही इतकं चांगलं सादरीकरण झालं नसतं. त्यानंतर मीच प्रास्ताविक केलं.

          वेशभूषेने कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. अनेक मुली , महिला सावित्रीबाई फुले बनून आल्या होत्या. महिलांनी विविध भूमिका सादर केल्या. जिजाबाई , शिक्षिका , बंगाली बाई , डॉक्टर , परिचारिका , साऊथ इंडियन , पारंपारिक वेशभूषा , मासेवाली , झाशीची राणी , नृत्यांगना इत्यादी विविधांगी वेशभूषा साकारताना महिला अधिक उत्साहाने समोर येताना दिसत होत्या. याचा अर्थ महिलांचा आत्मविश्वास वाढत चाललेला दिसून येत आहे ही आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. 

          हल्ली रेकॉर्डडान्सची सर्वांना सवय झाली आहे. त्यात देखील वैयक्तिक गीत गायन करुन काही महिलांनी वाहवा मिळवली हे विशेष. या महिलांचा अभिनय आम्ही घरात प्रत्यक्ष बघितला आहे , पण चारचौघातसुद्धा त्या त्याहीपेक्षा जास्त चांगला अभिनय करु शकतात हे त्यांचे त्यांनीच सिद्ध करुन दाखवले असे म्हणायला काहीच हरकत नाही. छोट्या मुलींनीही बाजी मारली. ठुमकत , मुरडत विविध पदविन्यास दाखवत त्यांनीही प्रेक्षकांकडून पुरेपूर टाळ्या वसूल केल्या. हा कार्यक्रम संपू नये असेच वाटत असताना महिलांचे गमतीदार खेळ सुरु झाले. 

          संगीत खुर्ची खेळात सर्व महिला सहभागी झाल्या. संगीत थांबल्यावर खुर्चीवर बसतानाची त्यांची तारांबळ बघणाऱ्यांना अधिक आनंद देऊन जात होती. सर्व महिला आनंदात होत्या. हरल्या तरी आनंदातच होत्या हे नमूद करायलाच हवे. प्रत्येकाने अक्षरशः जल्लोष साजरा केला होता. 

          मेणबत्या पेटवणे , बादलीतील वाटीत नाणे टाकणे , डोक्यावर वही घेऊन चालणे , सुईत दोरा ओवणे , लिंबू चमचा शर्यत अशा प्रकारच्या खेळात सर्व महिलांनी सहभाग घेऊन प्रथम , द्वितीय , तृतीय क्रमांक प्राप्त केला. 

          लकी ड्रॉ हा या कार्यक्रमाचा आकर्षण बिंदू ठरला होता. उपस्थितीशिवाय बक्षिस मिळणार नव्हते. त्यामुळे सर्व महिला शेवटपर्यंत थांबून कार्यक्रम यशस्वी करत होत्या. शेवटी चिठ्ठी उचलून लकी विजेते जाहीर करण्यात आले. त्यावेळी ज्यांचा लकी नंबर येत होता , त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता त्या कॅमेऱ्यात टिपणेही शक्य झाले नसते. महिला सचिव हेमांगी अणावकर यांना हिरकणी पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे संपदा चव्हाण यांनाही हिरकणी पुरस्कार देण्यात आला. अल्पोपहार व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची गोड सांगता झाली. कणकवलीत विविध ठिकाणी जंगी महिला दिनाचे आयोजन केलेले असूनही आमच्या मेळाव्याला पन्नासपेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या ही आमच्यासाठी नेहमीच गर्वाने सांगण्यासारखी गोष्ट असणार आहे. सर्व महिलांनी आपल्यातील सुप्तगुण विकसित करण्यासाठी असे व्यासपीठ निर्माण केले ही आमच्या नाभिक संघटनेलाही मानाचा तुरा असल्यासारखे आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर। ( 9881471684 )
























No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...