🛑 एप्रिलफुल बनाया
आज एक एप्रिल. दुसऱ्यांना फुल बनवण्याचा दिवस. आज आपण दुसऱ्यांना फुल बनवणार आहोत असे म्हणता म्हणता आपण स्वतः फुल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फुल म्हणजे फुलझाडाचे फुल नव्हे ? ते फुल असते तर बरे झाले असते. हे मूर्ख बनवणारे फुल आहे , ज्याला आपण ' एप्रिलफुल ' या नावाने सगळीकडे ओळखतो.
जुन्या काळी आजच्या दिवशी एक गाणे नेहमी लागायचे. " एप्रिलफुल बनाया , तो उनको गुस्सा आया , तो मेरा क्या कुसुर , जमाने का कुसुर जिसने दस्तुर बनाया " हे गाणे म्हणता म्हणता आम्हीही कोणाचीतरी खोड काढायचो. मजा वाटायची. तो फसला की म्हणायचो , " एप्रिलफुल , कानात डुल , खिशात फुल , हातात बांगडया " वगैरे ...... लहानपणी एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला एप्रिलफुल करण्यात जी मजा येई ती आता येत नाही. ती निष्पाप मजा निखळ असे. त्यात हेवेदावे नसत. तो एक खेळच असे. तो आम्ही कधीच जीवघेणा बनवला नाही.
" तुला गुरुजींनी बोलावलंय " असे सांगून कित्येकांना आम्ही गुरुजींकडे पाठवले आहे. " तुझ्या मागे बघ काय ? " असे म्हणत त्याला मागे बघायला लावले आहे. मित्रांना फसवले. त्यांनी फसून घेतले. मीही अनेकदा त्यांची शिकार होऊन गेलो आहे. घरात आणि शेजारी तर खूपच मज्जा केली आहे. भाड्याने राहत असताना अनेक खोल्या बदलल्या. प्रत्येक खोलीचा वेगवेगळा अनुभव असेल. पण या दिवशी ' राग ' मात्र कधीच येऊ दिला नाही. आमचे एप्रिलफुल हे समोरच्याला खजिल करुन सोडून दिलेले असे. जीवघेणे एप्रिलफुल आम्ही कधीच केले नाही आणि कदापि करणारही नाही.
अक्षयकुमारचा एक हिंदी पिक्चर बघितलेला आठवतोय. त्यात त्यांनी एक खोटाच खून केल्याचा अभिनय केला होता. मित्र मित्र मिळून असा खोटा खोटा एप्रिलफुलचा खेळ खेळत होते. आणि खरंच कोणीतरी कोणाचा तरी खून केला होता. त्यामुळे त्यांच्या मजेचे रूपांतर सजेत झाले होते. गुन्हा दुसऱ्यांनी केला होता , सजा त्यांना मिळाली होती. त्यांना फक्त मजा करायची होती , पण वेगळेच घडले होते.
हल्ली काही ठिकाणी एप्रिलफुलच्या निमित्ताने खोड्या काढल्या जात असतील तर त्या ठीक आहेत. त्यांचे स्वरुप जीवघेणे ठरु नये याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. एखाद्याने खोडी काढली तर आपणही ती समजून घेतली पाहिजे. त्याचा सूड न घेता त्याची मस्करी करता आली पाहिजे. अर्थात थट्टा मस्करी ही मस्करी पुरती मर्यादित असली पाहिजे , तिची कुस्करी होऊ नये म्हणजे झाले.
सध्या ' राडा ' हा नवीन शब्द सर्वांच्याच शब्दकोशातील शब्द झाला आहे. जावे तिथे ' राडा संस्कृतीने ' थैमान मांडले आहे. सुड वृत्तीने बेभानपणे वागणारी तरुण पिढी बघितली की मन विदीर्ण होऊन जातं. एप्रिलफुलचे काहीसे तसेच झाले आहे. त्याचा मिश्कीलपणा जाऊन त्याची जागा ' बदला ' या नवीन भावनेने घेतली आहे. हे चुकीचे आहे.
एप्रिलफुल हा दिवस ' एक गंमत दिवस ' म्हणून नक्कीच साजरा केला गेला पाहिजे. त्याला गालबोट न लावता त्याचा निखळ , निर्मळ आनंद घेता आला तर हा दिवस ' एक उनाड दिवसासारखा ' नक्कीच अविस्मरणीय होऊ शकतो यात शंका नाही.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 )
.jpeg)
.jpeg)










.jpeg)







