Thursday, June 30, 2022

🛑 दोन तपांची धाव

🛑 दोन तपांची धाव

          नोकरी मिळवणं म्हणजे एक अवघड गोष्ट असते. ती मिळाली कि ती टिकवणं हे आपलं कौशल्य असतं. आता नोकरी मिळवणं खूपच अवघड बनत चाललेली बाब आहे हे कुणीही सांगेल. सव्वीस वर्षांपूर्वी मलाही नोकरी मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागले होते. प्रत्येकवेळी यशस्वी होत गेलो होतो. कारण नोकरी मिळवणारच असा ध्यासच घेतला होता. ध्यास हाच श्वास बनला होता. प्रत्येकाचं असंच घडत असावं. 

          डिग्री हातात आली रे आली कि घरातल्यांना लगेच त्याची उपयोगिता हवी असते. मला योगायोगाने नोकरी मिळाली होती. हा योग कसा आला हे सांगणंही तितकंच महत्त्वाचं असतं. योगा शिकल्यामुळे माझ्या नोकरीचा योग जुळून आला होता. 

          इतर महत्त्वाच्या प्रमाणपत्रांना योगप्रवेश परीक्षा प्रमाणपत्राने प्रभावित केले होते. माझे पारडे जड झाले होते. कुणाचीही ओळख नसताना व एकही रुपया खर्च न करता मला मिळालेली नोकरी म्हणूनच बहुमोलाची होती. ती सोडताना मीच माझ्या पायावर भला मोठा दगड मारुन घेत होतो. डोक्यातही विचारांचे हातोडे बसत होते. रत्नागिरीतील खाजगी नोकरी सोडून जिल्हा परिषदेत रुजू झालो होतो. तिथेही चांगलाच जम बसत असताना पुन्हा सिंधुदुर्गात येण्याची ओढ लागली होती. आपल्या जिल्ह्यात नोकरी करण्याची कल्पना मनात जोर धरत होती. आई , बाबा , भावंडे सतत जवळ असावीशी वाटत होती. या सर्वांच्या मनासारखे झाले होते. पुन्हा एकदा कोकण निवड मंडळाच्या परीक्षेत पास झालो होतो. 

          मुलाखत झाल्यानंतर यादीत नाव आल्याचे पाहून जिंकल्याचे समाधान वाटले होते. शेवटी रत्नागिरी जिल्हा परिषदेला रितसर राम राम ठोकला होता. इकडे यावेसे वाटत होतेच. पण तिथूनही निघावेसे वाटत नव्हते. 

          प्रत्येक ठिकाणी आपण आपले अस्तित्व निर्माण करीत असतो. आता मला पुन्हा ते निर्माण करायचे होते. २९ जून १९९८ या दिवशी मी खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका विकासगटात हजर झालो. शाळेत दुसऱ्या दिवशी हजर झाल्यामुळे ३० जून हिच तारीख माझी अखंड नोकरीची सुरुवातीची तारीख ( अनोसुता ) ठरली होती. आज या दिवसाला चोवीस वर्षांचा प्रदिर्घ कालावधी उलटून गेला आहे. 

          आज मी नेहमीप्रमाणे शाळेत गेलो होतो. बदलीसंदर्भात माहिती भरत होतो. ती भरताना माझ्या लक्षात आले होते कि आज मला चोवीस वर्षे झाली होती. माझी मलाच कमाल वाटली होती. दोन तपे कधीच कापरासारखी उडून गेल्यासारखी वाटली होती. 

          मला मिळालेली दुर्गम भागातील पहिली शाळा आता सुगम क्षेत्रात आली होती. पती पत्नी मिळून एकत्र राहता यावे म्हणून दुसरी शाळा बदलीसाठी मागितली होती. तिथे असताना पत्नीचे आकस्मिक निधन झाल्यामुळे तिसरी शाळा जवळची म्हणून हजर झालो होतो. या शाळेत जाण्यासाठी मळ्यातून उंचसखल वाटा तुडवित जावे लागत होते. पावसात चिखलमय वाटेतून जाताना गुडघ्यापर्यंत पाय चिखलातून वर काढावे लागत होते. तिथूनही बदलीने निघालो होतो तो थेट साठ किलोमीटर अंतरावरच्या शाळेत. पदवीधर शिक्षक प्रमोशन स्विकारले होते ना ? वरच्या वर्गांना शिकवण्याची भारी हौस होती !!! सात वर्षे तीही हौस पूर्ण करुन घेतली होती. पटसंख्या कमी झाल्यामुळे एक चांगली शाळा सोडताना जीव रडवेला झाला होता. 

          आज आता सध्याच्या शाळेत काम करत असताना खूप उत्साहाने काम करण्याचा आनंद घेतो आहे. चोवीस वर्षांत कित्येक शिक्षक भेटले , कित्येक पालक भेटले , कित्येक विद्यार्थी भेटले , या सर्वांच्या आठवणी कधीतरी नक्कीच येतात तेव्हा खूप बरे वाटते. 

          सर्वच ठिकाणी मला जिवापाड प्रेम करणारी माणसे भेटली आहेत. पुढेही अशीच चांगली माणसं भेटत राहतील. पुढच्या शाळेत जातो तशा मागच्या शाळेच्या आठवणी थोड्याशा पुसट होत गेल्या असतीलही. तरीही मी काहीतरी निर्माण करण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे हा भावच मला पुढेही निरंतर कार्य करण्याची प्रेरणा देत राहतो आहे याचा आनंद बाहेर पडणाऱ्या मुसळधार पावसासारखा कोसळतो आहे.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 ) कणकवली.



Wednesday, June 29, 2022

🛑 दातृत्व माऊलीचे

 🛑 दातृत्व माऊलीचे

          देणे हा देवाचा गुण आहे असे म्हटले जाते. राखून ठेवतो तो राक्षस. लहानपणी पुस्तकात एक धडा होता. देतो तो देव. आपल्याकडे जे चांगलं आहे ते देत राहता आलं पाहिजे. ज्ञानसुद्धा दिल्यानेच वाढत राहते. ते दिल्यामुळे अजिबात कमी होत नाही. 

          इतर गोष्टींना सुद्धा हा नियम लागू पडतो. कविवर्य विंदा करंदीकर म्हणतात , " देणाऱ्याने देत जावे , घेणाऱ्याने घेत जावे , घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे " याचा अन्वयार्थ आपण समजून घेतला पाहिजे. प्रत्येकाने कायम देत राहण्यासाठी तत्पर असायला हवे. 

          आपण जे देत असतो तेच आपल्याला बुमरँग होऊन परत मिळत असते. म्हणून कायम चांगले देण्याचा प्रयत्न असावा. त्यात स्वार्थाची भावना असू नये. मला यातून काहीतरी मिळणार आहे असा स्वार्थ बाळगणे चुकीचे आहे. समाधानाचा निर्मळ स्वार्थ जरुर असावा. देताना घेणाऱ्याच्या चेहऱ्यावर येणारे कृतज्ञतेचे भावच आपल्याला परमसुख मिळवून देतात. 

          दानत असली पाहिजे. दातृत्वातून सेवाभाव फुलत जातो. गरजूंना दान करण्याची इच्छा निर्माण झाली की आपल्या हाताने दान करत राहावे. काही लोक असंही दान करतात की त्यांचं दान या हाताचं त्या हाताला समजत नाही. 

          गाडगेबाबांना स्वच्छतेची आवड होती. त्यांना लोक भेटवस्तू आणून देत. या भेटवस्तू गरजूंना देऊन ते आपल्या घराची स्वच्छता करत. आपले घर स्वच्छ झाल्यानंतर ते म्हणत , " आता कसे मस्त स्वच्छ झाले घर !! " सध्या आपण आपल्या घरात अनेक वस्तू भरभरून आणून ठेवतो आणि जणू त्याचे प्रदर्शनच घडवत असतो. खरंच या एवढया महागड्या वस्तूंची गरज असते का ? आता घराला पुन्हा एकदा जुना टच देण्याची गरज निर्माण होऊ पाहते आहे. कारण जुने ते सोने होते. जुने तेच आरोग्यदायक होते. चुलीवरच्या जेवणाची चव फाईव्ह स्टारला येत नाही हेच खरे.

          शिडवणे माऊली वारकरी संप्रदाय मंडळाने वंचित राहिलेल्या प्राथमिक शाळेतील मुलांना मोफत गणवेशांचे वाटप केले याचे म्हणूनच कौतुक करावेसे वाटते. मंडळाने या छोट्या विद्यार्थ्यांमध्ये ' विठू माऊली ' पाहिली असावी. माऊलीच्या तीन अक्षरांची फोड केली तर तीन शब्द बनतात. माता , उमाळा आणि लीनता. या तिन्ही गुणांना आपलेसे करत मंडळानं आपलं सेवाव्रत पुढे अव्याहत सुरु ठेवावे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागायला शिकवणारी संस्कृती जोपासताना त्यांनी आमच्या बालचमुला दिलेली ही भेट उबदार शालीपेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे. हा गणवेश घालून रुबाबात आपल्या शाळेची वाट चालताना मुलांनीही माऊलीचा सतत आदर करत राहायला हवा. देण्याचे व्रत स्वीकारायला हवे. आज आपल्याला मिळाले आहे , उद्या आपण मोठे झाल्यावर अशीच दानशूरता दाखवणार आहोत. तळागाळातील गरजू आणि होतकरुंना ऐन गरज असताना दिलेली अशी वस्तूरुप भेट म्हणूनच नक्कीच अविस्मरणीय ठरेल यात अजिबात शंका वाटण्याचे कारण नाही.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली






Tuesday, June 28, 2022

🛑 भेटला विठ्ठल माझा

 🛑 भेटला विठ्ठल माझा

          हल्लीच एक चित्रपट बघितला होता. त्यातलं एक गाणं माझ्या ओठी आलं होतं. एखादा चित्रपट बघितल्यानंतर माझं असंच होतं.त्यातलं एखादं भावलेलं आणि आवडलेलं गाणं आपसूक माझ्या मुखातून बाहेर पडायला लागतं. गाणं म्हणणं आणि ऐकणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. तुम्ही तुमचा सगळा ताण कुठल्या कुठे विसरुन जाता. 

          मी अर्जित रजेवर होतो. मला थोडे बरे वाटत नव्हते. प्रत्येकाला काहीतरी हायदुख पायदुख असतेच. शाळा सुरु झाली होती.मला नाईलाजाने रजा घ्यावी लागली होती. मला बरे नाही म्हणून मी माझ्यावरच चिडत होतो. अर्थात असं स्वतःवर चिडणं ही चांगली गोष्ट नव्हतीच. गाण्यामुळे या चिडण्याची तीव्रता थोडी कमी झाली होती. 

          माझे बरे नाही असे समजल्याने अनेकांनी प्रत्यक्ष भेटून , फोन करुन तब्येतीची चौकशी केली होती. पुन्हा पुन्हा तेच तेच सांगून मीही कंटाळलो होतो. व्हाट्सएपच्या भरलेल्या संदेशांना बघून त्यांना रिप्लाय द्यायचाही वैतागच वाटत होता. बिचाऱ्या आपल्या माणसांनी आपली चौकशी केली ही माझ्यासाठी नवी गोष्ट नव्हती. ही सगळी माणसे मला सतत फोन करुन , प्रत्यक्ष भेटून दिलासा देतात त्यामुळेही मी लवकर बरा होण्याची जास्त शक्यता असते. सर्वांचे आशिर्वाद पाठीशी असले की देवच पाठीशी असल्यासारखे असते. 

          माझे विद्यार्थी माझी वाट बघत असतील ही कल्पनाच मला जास्त त्रास देत होती. नुकतीच शाळा सुरु झाली आहे आणि मी रजेवर आहे ही मला न पटणारी गोष्ट होती. त्यात शिक्षणाचा सेतू बांधायचे काम सुरु होते. माझा सेतू माझ्या शिक्षक बांधवांना बांधावा लागत होता. कधी एकदा मी बरा होतो आणि शाळेत जातो असे मला झाले होते. बाबा , पत्नी आणि भावाचं कुटुंब माझी अतिशय काळजी घेताना दिसत होतं. त्यांच्या या प्रेमामुळे मीही अधिक भावनाशील बनत चाललो होतो. पण काही केल्या शाळा काही डोळ्यासमोरुन हटत नव्हती. एवढी मी शाळेची आणि माझ्या विद्यार्थ्यांची का काळजी करतोय तेच मला समजत नव्हते. त्यामुळे माझा बीपी थोडा इकडे तिकडे होत होता. 

          डॉक्टर उपचार करत असताना त्या भल्यामोठ्या गोळ्या घशाखाली उतरताना दिसत नव्हत्या. ते पथ्याचं खाणं मला चिडवून दाखवताना दिसत होतं. मी बरा होण्यासाठी आटापिटा करत होतो. थोडा फरक पडला तेव्हा कुठे मी मोकळा श्वास घेतला होता. 

          न राहवून शेवटी रजा पूर्ण न भोगताच शाळेत जायला निघालो होतो. आज मला जो आनंद होत होता , त्याचं वर्णन करायला माझ्याकडे खरंच शब्द सापडत नव्हते. वारकरी जसा विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरला जायला निघतो , तसाच काहीसा मी निघालो होतो. 

          गेल्या काही वर्षांपूर्वी शिक्षणाच्या वारीत सहभागी होण्यासाठी मी पुण्याला गेलो होतो. तेव्हा मला खूप आनंद झाला होता. त्याच्याहीपेक्षा जास्त आनंद मला आज होत होता.  

          माझे अनेक विठ्ठल शाळेत माझी वाट बघत असतील या कल्पनेने मी भारावून गेलो होतो. मी माझं दुखणं खुपणं पार विसरुन जात चाललो होतो. त्यात पुन्हा एक गाणं मुखातून बाहेर पडत होतं. " कुणी पाहिला , पाहिला , पाहिला हो , माझा देव कुणी पाहिला ? " गाणं म्हणताना निसर्गात मला सगळीकडेच देवांचा सूक्ष्म भास होऊ लागला होता. माझा मोबाईल खणखणला होता , त्याकडेही मी मुद्दाम दुर्लक्ष करत रस्ता कापत निघालो होतो. शाळेच्या कक्षेत आलो होतो.

          मुले वाट बघतच होती. चार पाच मुले धावतच गाडीकडे आली होती. त्यांनी शाळेची चावी माझ्याकडून घेतली होती. मी त्यांचा चार्ज घेण्याऐवजी त्यांनीच माझा चार्ज घेतला होता. त्यांना बघून माझेही चार्जिंग झाले होते. माझे विठ्ठल मला साक्षात पाहायला मिळाले होते. काही क्षणातच मी आजारी होतो हे पूर्णपणे विसरुन गेलो होतो आणि शिक्षणाच्या वारीत विद्यार्थीरुपी विठ्ठलासंगे हरवून गेलो होतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



Saturday, June 18, 2022

🛑 कबचे शंकर : यादवसर

🛑 कबचे शंकर : यादवसर

          काही माणसं एखाद्या क्षेत्रात जातात , तेव्हा त्या क्षेत्राचे सोने करतात. किंबहुना ते क्षेत्रच त्यांची वाट पाहत असावं. ते समोर आले की चैतन्याचा झरा वाहू लागतो. नाराजांवर राज करण्याचं सामर्थ्य अशा थोड्याच निवडक माणसांमध्ये असतं. त्या निवडक माणसांची याद आल्याशिवाय राहत नाही. हे शैक्षणिक दव सतत ओलं ठेवण्याचं महत्कार्य करणारे म्हणूनच दीर्घकाळ लक्षात राहतात. त्यांनी समोर यावं आणि तरतरी पेरावी असंच त्यांचं दुर्मिळ व्यक्तिमत्त्व म्हणूनच हवंहवंसं वाटत राहतं. 

          हिमालयाच्या निर्जन ठिकाणी  असे शंकर नेहमीच साधना करुन येतात आणि त्यांच्या जटेतून अव्याहत शैक्षणिक गंगा वाहती ठेवतात. म्हणून ते नुसते शंकर नसतात तर ते सर्वांचे शंकरराव असतात. 

          आम्हाला सलग सात दिवस अहोरात्र ज्यांचं मार्गदर्शन लाभलं त्या शंकरराव यादव सरांविषयी मला रास्त अभिमान वाटतो. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमच्या सात दिवसांचं प्रशिक्षण अफलातून केलं होतं. 

          माझी आतापर्यंत अनेक प्रशिक्षणे झाली आहेत. प्रशिक्षणे घ्यायची असतात. ती कोणी देत नसतात. तुम्ही त्यात हिरिरीने भाग घेतलात तरच त्या प्रशिक्षणाचा तुम्ही एक भागच होऊन जाता. सात दिवस यादवसरांनी आम्हांला आमच्या घराचा विसर पडेल अशी वागणूक दिली. सर्व क्षण सुवर्णक्षण बनवले. त्यांच्या सानिध्यात राहताना भीतीही वाटली , पण त्यांच्याबद्दलचा आदर दिवसागणिक अधिकाधिक वाढत जाताना दिसला. ते म्हणजे एक चालतं बोलतं स्काऊटिंग आहेत. 

          यादवसर नेहमीच हसतमुख दिसत होते. नेहमी ' तैयार ' दिसत होते. त्यांनी आपल्या गुणांचा परिचय आपल्या आचरणातून आम्हाला दिला. त्यांनी आमच्यात दुसऱ्यांच्यात स्फूर्ती कशी पेरावी ते शिकवलं. त्यांची बॉडी लँग्वेज भारीच. यादव सरांसारखं एक भारदस्त व्यक्तिमत्त्व आम्हाला लाभलं हे आमचंच भाग्य म्हणायला हवं. एवढया कमी दिवसांत त्यांनी भरपूर शिकवलं. एकही गोष्ट रिपीट केली नाही. जुन्या गोष्टी नवीन करुन सांगितल्या. त्यांचे भाषेवरील प्रभुत्व आम्हांला भारावून टाकत असे. त्यांनी बोलायला सुरुवात करावी आणि आम्ही फक्त आ वासून ऐकत राहावं असंच नेहमी घडे. 

          अनेक प्रशिक्षणांचा अनुभव त्यांच्या गाठीशी असला तरी प्रत्येक प्रशिक्षण ते नवीन उर्मीने घेतात हे कमाल करण्यासारखं आहे. त्यांना कधी कंटाळा आल्याचे दिसले नाही. त्यांनी नाचून गायलेली आणि आमच्याकडून करुन घेतलेली कृतीगीते कायमच लक्षात राहतील. रंकाळा तलावावर बाहेरील निसर्गात गाणी नाचताना त्यांना त्यांच्या वयाचा विसर पडलेला पाहून आम्हालाही लाजायला व्हायचं. त्यांचं हसणं , लटक्या रागानं बघणं जसंच्या तसं लक्षात राहिलं आहे. त्यांच्या हाताखाली कित्येक कबमास्टर शिक्षक घडले आहेत. त्यांच्या हाताखाली शिकणं ही माझ्यासारख्या शिक्षकासाठी पर्वणीच असते. 

          मी शेवटच्या निरोप समारंभात बोलत होतो. मला यादव सरांची भीती वाटत होती. तरीही त्यांच्याकडे बघून उलट माझा आत्मविश्वास वाढला होता. त्यांचा तो चेहरा आताही मला दिसतोय. त्यांच्या आयुष्यात कोरोना काळात अत्यंत वाईट घटना घडली होती याचा त्यांनी शेवटपर्यंत उच्चारही केला नव्हता. त्यांच्या परमपत्नीचे कोरोना काळात स्वर्गवासी झाल्याचे ऐकले तेव्हा तर आम्हाला सगळ्यांनाच जबरदस्त धक्का बसला होता. स्वतः दुःखात असणारा हा माणूस दुसऱ्यांना हसवत होता. जीवनात अशी कर्तव्यदक्ष माणसं आहेत म्हणून हे जग उभं आहे. त्यांनी यापुढेही आमच्यासारख्या काहीतरी करु पाहणाऱ्या शिक्षकांना सदैव ज्ञानाचा हा अखंड झरा अव्याहत ठेवावा. त्यांच्या अफाट व्यक्तित्वापुढे माझी ही लेखरुपी गुरुदक्षिणा सागरातील छोट्या थेंबासारखी आहे याची मला जाणीव आहे. तरीही या छोट्या थेंबाने माझ्या आयुष्यात मोठ्या सागराएवढी साहित्यसंपदा निर्माण करु दिली हेही नसे थोडके.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली





Friday, June 17, 2022

🛑 अभिनंदन दहावी !!!! 🟢

 🛑 अभिनंदन दहावी !!!! 🟢

          निकालाचा दिवस हा आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. कारण या दिवसाची प्रतिक्षा संपून गेलेली असते. हा निकाल धक्कादायक असू शकतो. तो आपलं जीवन कायमचं बदलवून टाकणाराही असू शकतो. अपेक्षित निकाल लागला नाही तर काहीही विचित्र घटना घडवणारी मुले पाहिली की सुन्न व्हायला होते. 

          निकाल ही फक्त टक्केवारी असते. कमी टक्के गुण मिळवणारे नाराज होण्याची शक्यता असते. त्यांना अपयश मिळाले आहे असे वाटत राहते. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अपयशाने खचून जायचे नसते , उलट अधिक जोमाने प्रयत्नाला लागायचे असते. दहावीच्या पुढे अजून बऱ्याच परीक्षा बाकी असतात हेही लक्षात ठेवले पाहिजे. हे स्पर्धात्मक युग असले तरी आपण दुसऱ्याशी तुलना करण्याचं सोडून द्या. तुमच्या स्वतःच्या पूर्वीच्या गुणांपेक्षा तुम्ही वरचढ ठरत आहात ना ? मग आणखी काय हवे ? सगळी मुलं ही वेगवेगळ्या क्षमता घेऊन जन्माला आलेली असतात. त्यांना सर्वांना एकाच तराजूत तोलणं कितपत शहाणपणाचं आहे ? ह्या तुलनेमुळेच मुलांचा आत्मविश्वास डळमळीत होत चाललेला आहे. 

          आपल्या मुलांना अजून खूप जग बघायचे आहे. त्याला ज्याची आवड आहे , तेच त्याला करु द्या. त्याला ज्या ज्ञानाची भूक आहे , ते त्याला खाऊ घाला. तो नक्की पोटभर जेवेल. अर्थात करियर करण्यासाठी त्याला सगळ्या गोष्टींची माहिती करुन देणं हीसुद्धा पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. ती पार पाडण्यास आपण कमी पडणार नाही हेही पाहिले पाहिजे. 

          आम्हीही दहावी शिकलो. भरपूर अभ्यास केला. खूप लेखन केले. पाठांतर केले. उपक्रमात भाग घेतला. नेहमी पुढे पुढे राहण्यासाठी कंबर कसून करत राहिलो. त्यात कधीही खंड पडू दिला नाही. हुशार मुलांकडे बघत बघत त्यांचे चांगले गुण आत्मसात केले. त्यांच्यातल्या वाईट गुणांकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या रॅगिंगला बळी पडलो नाही. आम्ही यशस्वी होण्यासाठी अभ्यास केला होता. 

          अत्युच्च शिखराचे ध्येय सतत खुणावत होते. ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. जागेपणीही स्वप्न पाहात होतो. झोपेत तर स्वप्नांची शृंखलाच असे. सकाळी उठल्यावर पुन्हा अभ्यासाला लागत असू.

          रात्री उशिरापर्यंत झोप आली तरी अभ्यास केला होता. तेव्हा आतासारखे मोबाईल नव्हते. इंटरनेट नव्हते. गुगल सर्च नव्हते. पुस्तके वाचूनच उत्तरे शोधण्यासाठी रात्रीचा दिवस केला होता. क्लास लावले नव्हते. गाईड्स नव्हती. तरीही चांगले गुण प्राप्त करुन पहिल्या तीन नंबरात येण्याचा प्रयत्न असे. केलेले प्रयत्न बऱ्याचदा सफल होत गेले होते. त्यामुळे प्रयत्नांची कास कधीच सोडली नाही. 

          दहावीचे आठ वर्ग होते. प्रत्येक वर्गात हुशार मुले होती. माझ्या वर्गात मी ' वासरात लंगडी गाय ' होतो. माझा अभ्यास बघून माझ्या वर्गाने अभ्यास करायला सुरुवात केली होती. मला माझ्या मित्रमैत्रिणींचा अभिमान आहे. त्यांनी मला कधीही त्रास दिला नाही. त्यांनी मला केलेले सहकार्य मोलाचे होते. त्यांनी मला अभ्यास करायला दिला होता. नंबर आला की त्यांनी माझे पुढे येऊन अभिनंदन केले होते. त्यामुळे माझी जबाबदारी ते अधिकाधिक वाढवत नेत होते. त्यांना एखादे उदाहरण पुन्हा समजावून सांगताना माझे ते अधिक लक्षात राहत होते. त्यांनी मला दिलेला आदर मी कायमच लक्षात ठेवला आहे. 

          कधीतरी ते जुने वर्गमित्र भेटतात. जुन्या आठवणी जाग्या होतात. आता त्यांना ओळखणे शक्य नसते. प्रत्येकाची शरीराची ठेवण पुरती बदललेली दिसते आणि खुदकन हसूच येते. मी शिक्षक झालो आहे हे पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वाढताना पाहतो तेव्हा मलाही अत्यानंद होतो. 

          दहावीत भरपूर गुण मिळालेले असतात. तेवढे गुण बारावीत मिळवणे कठीण जाते. पुढे पुढे शिकत जावे तशी गुणांची टक्केवारी खालावत जाते. अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढलेली असते. ती पेलताना ताकद पणाला लावावी लागते. 

          वेळ निघून गेली की ती पुन्हा येत नाही. वय निघून गेले की तेही तसेच जाते. मग पश्चात्ताप करण्याची वेळ येते. पण मग उशीर झालेला असतो. त्यामुळे वाईट विचार मनात डोकावू लागतात. 

          आपण आपल्या मनाला नियंत्रणात ठेवायला हवे. ते सांगेल तसे करु नये. आपण सांगू तसे मनाने आणि देहाने करावे. हे घडेल तेव्हा आपले उत्तीर्ण झालेले आणि अत्युत्तम गुण मिळवलेले विद्यार्थी खऱ्या अर्थाने उत्तीर्ण झाले असे म्हणता येईल. सर्वांना त्यांच्या पुढील दैदिप्यमान यशासाठी अनंत उदंड शुभेच्छा.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



Tuesday, June 14, 2022

🛑 लेडी कंडक्टर

🛑 लेडी कंडक्टर

          माणसाने कोणता व्यवसाय करावा हे कधी कधी ठरवूनही होत नाही. अपवादात्मक ते बरोबर येऊ शकेल. आर्थिक परिस्थिती चांगली असली तर हे घडण्याची शक्यता अधिक असते. 

          हल्ली मुली सर्वात पुढे आहेत. पुरुषांच्या बरोबरीने काम करता करता त्या कधी पुरुषांच्या पुढे निघून गेल्या हे पुरुषांना समजलेही नसेल. त्यावेळी महिलांची पोलीस भरती सुरु झाली होती. फौजदार बाईसाहेब येणार याचे आम्हालाही आश्चर्य वाटत होते.

          आम्ही डीएडला असताना एका समुहनृत्य स्पर्धेत " आल्या फौजदार बाईसाहेब आल्या " हा पोवाडा नाचून सादर केला होता. त्यात फौजदार बाईसाहेबांची भूमिका गणेश राणे याने केली होती. तो एक जातिवंत कलाकार होता. तो बोलायला उभा राहिला कि त्याचे सर्व अंग बोलते आहे असे वाटे. तो दिसायला सुंदर होता. त्याने मिशी काढली होती. मेकअप केला होता. तो फौजदार बाईंसारखा हुबेहूब दिसू लागला होता. 

          त्यात शाहिराची भूमिका मी केली होती. माझा आवाज बरा लागला होता. आमचा नंबर येईल असे वाटले नव्हते. गाणे आणि नृत्य दोन्ही बाजू चांगल्या झाल्या होत्या. समूहातील सर्वांनी उत्तम सादरीकरण केले होते. टाळ्यांचा कडकडाट झाला तेव्हा झालेला आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीणच.

          त्या फौजदार बाईंनी केलेला अभिनय अफलातून झाला होता. गणेश खुश झाला होता. कारण तो रंगमंचावर आल्यापासून चैतन्यच घेऊन आला होता. आमच्या गाण्याने आणि नृत्याने अधिक रंगत चढली होती. तो मिशीतल्या मिशीत हसण्यासाठी त्याची मिशीच नव्हती. त्याची परमप्रिय मिशी त्याने त्या सादरीकरणासाठी काढून टाकली होती म्हणजे बघा. त्याला सगळे ' गण्या ' म्हणत. त्याच्या तोंडी ' झामू ' हे नाव सतत येई. त्यामुळे नंतर नंतर त्यालाच सगळे ' झामू ' म्हणू लागले. तो ज्वाली होता. तो अभ्यासात हुशार होता. एकपाठी होता. एकदा ऐकले , वाचले की ते त्याच्या डोक्यात कायमचे राहत असे. त्याचे बोलणे मुलांनाच नव्हे तर मुलींनाही आकर्षित करत असे. तो त्यांच्या नातेवाईकांकडे पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. तो आता मुंबईतील एका मोठया शाळेत शिक्षक आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. समुहनृत्य स्पर्धेत आमचा प्रथम क्रमांक आला होता , तेव्हा तो पडद्यामागे जबरदस्त नाचला होता. 

          तेव्हापासून आमचा महिला अधिकारी , कर्मचारी यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत गेला. महिला वर्ग आपली जबाबदारी पार पाडताना त्यांची किती गडबड होत असेल याची कल्पना केलेलीच बरी. कारण घरी गेल्यानंतर त्यांना परत गृहिणी ही भूमिका पार पाडायची असते. 

          रेड बसने प्रवास करत होतो. रेड बस म्हणजे आपली लालपरी. लालपरी म्हणजे आपली एसटी हो. त्यात दोन लेडी कंडक्टर बसल्या होत्या. त्यांचा काम करण्याचा उत्साह पुरुषांना लाजवणारा होता. प्रत्येक नवीन पॅसेंजरच्या जवळ जाऊन तिकीट काढताना , त्यांना उरलेले पैसे परत देताना त्यांचे वागणे बोलणे कोणालाही आवडेल असेच होते. 

          महिलांनी या क्षेत्रात ठेवलेले हे पाऊल थक्क करणारे आहे. त्या लेडी कंडक्टर आहेत म्हणून त्यांनी कोणत्याही गोष्टीत कमतरता दाखवलेली नव्हती. माझ्या कणकवली ते रत्नागिरीपर्यंतच्या तीन तासांच्या प्रवासात त्या कोणावरही चिडलेल्या दिसल्या नाहीत कि नाराज दिसल्या नाहीत. त्यांनी हसतमुखाने केलेले काम रेड बसला प्रफुल्लित करुन टाकीत होते.

          त्यांनी ' लेडी कंडक्टर ' चा व्यवसाय स्वीकारला आहे ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आजच्या या महिला सावित्रीचा आणि सावित्रीबाईंचा हा वसा असाच पुढे चालू ठेवतील यांत अजिबात शंका वाटत नाही.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 ) कणकवली



Monday, June 13, 2022

🛑 तेरा जून मेरा

🛑 तेरा जून मेरा

          तारखा खूप महत्त्वाच्या असतात. त्या लक्षात राहतात. आपल्या आयुष्यात काही तारखांना अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्या काही केल्या विसरता येत नाहीत. कधी ते दिन होऊन येतात , कधी दीन ? कधी सुखमय आठवणींचा पुष्पगुच्छ घेऊन येतात , कधी दुःखमय काटेरी निवडुंग. या तारखा दररोज नवीन होऊन येत राहतात , त्या आपली पाठ सोडत नाहीत. 

          तेरा जून दोन हजार. माझ्या लग्नाची तारीख मी विसरणे कठीण आहे. माझ्या आनंदाचा बहरलेला गुलमोहर म्हणजे ही तारीख. आज माझ्या आयुष्यात मला एक मैत्रिण मिळाली होती. आयुष्यभरासाठी साथ देणारी. 

          लग्नाचा दिवस उजाडला होता. माझी आणि तिची ओळख नव्हतीच. जुन्या पद्धतीने पसंतीने लग्न ठरवले होते. लग्न ठरल्यानंतर लग्न होईपर्यंत एकदाही संवाद झाला नव्हता. त्यावेळी साधे फोन होते. माझ्या आणि तिच्या घरी फोन नावाचं यंत्र नव्हतं. शेजाऱ्यांकडे फोन करावा लागे. 

          एकदा मी तिथे फोन केला होता. तिकडून फोनवर ती आली. मला काय बोलायचे ते सुचेना. मी आणि तीही तशीच. शेवटी नंतर फोन करतो असे म्हणून मीच फोन ठेवला. पुन्हा एकदा असाच फोन केला तेव्हाही तसेच काहीसे झाले होते. मग तीच म्हणाली होती , " तुम्हाला काय बोलायचे असेल ते लग्नानंतरच बोला. आता फोन ठेवा. " असे म्हणत ती अशी खळखळून हसली होती कि तो आवाज माझ्या कानात अजूनही घुमतो आहे. 

          मी काळा आणि ती गोरी गोरी पान होती. त्यामुळे अनेकांना आमचे जोडे विजोड वाटल्यास तो त्यांचा दोष नव्हताच मुळी. माझे अनेक मित्र लग्नाला आले होते. ते अधूनमधून माझ्याकडे बघून हसत होते. मला त्यांच्या हसण्याचे कारण समजत नव्हते. मी आपला घामाघूम झालो होतो. ती माझ्या अगदी जवळ बसली होती. मला तशी सवय नव्हती. मी पुरता गांगरून गेलो होतो. आताच्या नवऱ्यामुलांकडे पाहतो , त्यावेळी मला माझेच हसू येते. आताचे वर वधू खूप सराईत झाले आहेत. त्यांच्या व्हाट्सअँपच्या मैत्रीचे रूपांतर कधीही लग्नात होऊ शकेल याची गॅरंटी देता येते. पण त्यांचे हे आकर्षण लवकरच संपून त्यांचे ब्रेकअप किंवा डिव्होर्स होताना पाहून या तकलादू प्रेमाविषयी राग करावासा वाटतो. प्रेम म्हणजे एक पवित्र गोष्ट आहे. प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण नसते , ते आयुष्यभराची साथ असते. 

          माझ्या डोक्यावर तेव्हा थोडेसे केस होते. आता ते शोधावे लागतात. माझ्या अशा डोक्यावर फेटा टोपी घातली होती. ती थोडी सैल बसत होती. त्या टोपीमुळे माझा एक कान दुमडला गेला होता. त्यामुळे मी विचित्र दिसत होतो. माझे मित्र का हसत होते ते मला माझे फोटो बघितल्यावर कळले. पण आता नाईलाज होता. मी फोटो इडिट करु शकत नव्हतो. बायकोचे सगळे फोटो मस्तच आले होते. 

          आज मी ते फोटो पाहतो तेव्हा माझे मलाच हसू येते. माझ्या अनेक मित्रांचे , नातेवाईकांचे फोटो मी जपून ठेवले आहेत. त्यातली अनेक माणसे आता हयात नाहीत. माझे सासरे गेले , आई गेली , आजी गेली , आत्ये गेली , काका गेले आणि माझी बायकोही गेली. त्यांच्या अनेक वर्षांपूर्वीच्या प्रतिमा आठवणी कधीतरी बघून डोळ्यांत पाणी येईपर्यंत पाहत राहण्याची माझी सवय काहीकेल्या जात नाही त्याला मी तरी काय करणार ? 

          कोणतीही माणसं आपल्याला जन्माला पुरत नाहीत , त्या पुरवाव्या लागण्यासाठी अशा सवयी लावून घ्याव्या लागतात. माझ्यावर झालेले संस्कार मला तसं करायला भाग पाडतात. मी तसाच आहे , जसा असायला हवा. 

          आज मी ऐश्वर्या गेली असे मानत नाही , ती ईश्वरीच्या नव्या रुपाने माझ्या जीवनात पुन्हा आली आहे असे मानतो. आज मी तिला गजरा आणून दिला आठवणीने. तिला तो तिच्याइतकाच खूप आवडला. 

          बायकांना बाकी काही नको असते. त्यांना आपल्या नवऱ्याचे निर्मळ प्रेम हवे असते. त्यात कुणीही भागीदार असल्याचे त्यांना अजिबात आवडत नाही. आपला नवरा ही आपलीच सुंदर भेट आहे अशी त्यांची भावना असते आणि ती असायलाच हवी. असे निरागस प्रेम करणाऱ्या पत्नी मग सावित्री ठरतात. आपल्या सत्यवानाचे गेलेले प्राण आणणाऱ्या सावित्रीला म्हणूनच श्रेष्ठ मानले जाते. माझ्यासाठी ऐश्वर्या आणि ईश्वरी दोन्ही सावित्रीच आहेत.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 ) कणकवली



Sunday, June 12, 2022

🛑 रस्त्यातले देव

🛑 रस्त्यातले देव

          हल्ली देवांची संख्या बरीच वाढली आहे. कारण माणसांची संख्या वाढली आहे. एवढ्या सगळ्या माणसांना देव पुरायला हवेत म्हणून की काय देवांची संख्या माणसांनी वाढवली असावी. 

          संत गाडगेबाबा म्हणतात , " माणसांत देव पाहा. " आपण जर माणसा माणसात देव शोधत राहिलो तर देवांची संख्या दर चार सेकंदाला वाढत जाईल. 

          आपण जेव्हा प्रवासाला निघतो , तेव्हा रस्त्यावर पाच पाच मिनिटांच्या अंतरावर देव सापडतात. आपण त्यांना गाडीतूनच नमस्कार करतो. हे देव म्हणजे जणू गतिरोधक आहेत. कारण त्यामुळे आपण आपल्या गाडीचा वेग कमी करतो. थोडा वेळ थांबून नमस्कार करतो. देवाशी एकाग्र होतो. पुन्हा निघतो. काही वेळानंतर आपण जातोय त्याच रस्त्यात एखादा मोठा अपघात झाल्याचे पाहायला मिळते. आपण त्यात सापडणार असतो , पण रस्त्यातील देवाला नमस्कार करण्यासाठी थांबल्यामुळे आपण अपघातात सापडलो नाही याबद्दल देवाचे आभार मानत राहतो. काळ आलेला असतो , पण वेळ आलेली नसते. 

          रस्त्यातले देव म्हणूनच आवश्यक वाटतात. मी काही क्षणांसाठी थांबतो आणि नमस्कार करुनच पुढे निघतो. 

          शाळेत जाताना मला असे अनेक देव सतत भेटले आहेत. ते मला भेटले. मी त्यांना भेटलो. त्यांच्याशी मनोमन संवाद साधून पुढे निघणे एवढेच मला जमले. तिथल्या कुणीतरी दिलेला खोबऱ्याचा प्रसाद चावत पुढे निघेपर्यंत पुढचा देव भेटतोच. धडधाकट असलेले दोन हात फक्त जोडायचे असतात. बाकी काहीच करायचे नसते. हे देव आपल्या पाठीशी आहेत एवढी भावनाच तुम्हाला सुखरुप ठेवत असते. माझा तसा अनुभव आहे. 

          फोंडा रस्त्याला ' पाचोबा ' देव भेटतो. मग माझा जप सुरु होतो. " पाचोबा , पाचोबा , पाचोबा , माझा देव आहे पाचोबा " हाच जप मनापासून करत पुढचा प्रवास सुखरुप करत आलो आहे. तळेरे रस्त्याला ' कोळंबा ' देव भेटतो. त्याचाही जप असाच करत पुढे पुढे जायचे असते. वाटेत मंदिरे उभी असतात. गाडी सुरु असतानाच आपला एक हात मुजऱ्यासारखा नतमस्तक होतो. ती एक सवयच जडली आहे. 

          शाळेत चालत जायचो तेव्हा वाटेत गढिताम्हाण्याचा गणेश वड भेटत असे. " गणेश स्तोत्र ' म्हणत वंदन करुनच पुढे पाय वळत असत.  पायातल्या वहाणा आपोआप पायातून निघतात. नमस्कार केलाच जातो. 

          आमच्या गावी जाताना वाटेत परदेशी गांगो , एडदोबा , पावणादेवी , टोकयोदेव , कोसंबी महापुरुष यांचे दर्शन घडते.  निसर्गातील प्रत्येक ठिकाणी असे माणसाने बसवलेले देव , देवी थांबवतात. त्यामुळे आपल्या जीवनातील काही क्षण भक्तिमय बनतात. त्यामुळे मानसिक दृष्टीने आपण शक्तिमान बनत राहतो. 

          आपला एखादा अपघात घडतो. तेव्हा काही माणसे आपणांस मदत करायला धावून येतात. हे सुद्धा रस्त्यातले देवच आहेत. मी अनेकदा गाडीवरुन पडलो असेन. प्रत्येकवेळी माणसाचे रुप घेऊन हे रस्त्यातले देव मला मदत करायला , उचलायला धावून आलेले आहेत. 

          माझ्या गाडीचा वेग जास्त असतो असे सगळ्यांचेच म्हणणे आहे. हे सगळेजण मला ' गाडी सावकाश चालवा ' असे सांगत असतात. मी काळजीपूर्वक गाडी चालवत असतो. समोरचा नीट आला नाही तर मला त्यांच्याकडेही लक्ष द्यायचे असते. सध्या पावसाचे दिवस सुरु झाले आहेत. आता तर मला जास्तच काळजी घ्यावी लागणार आहे. पण माझे हे ' रस्त्यातले देव '  आहेत म्हणून मी निर्धास्त आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 ) कणकवली



Saturday, June 11, 2022

🛑 ताटारो

🛑 ताटारो

          माणसं जशी माणसांवर प्रेम करतात , तशी वस्तूंवर प्रेम करतात. सतत वापरावयाच्या वस्तू आपल्या प्रिय होऊन जातात. त्यावर आपला जणू जीवच जडत असावा. ती वस्तू दिसली नाही तर त्यांच्या जीवाचा आटापिटा होईल. एवढे प्रेम कुठून येते ? निर्जीव वस्तूत जीव अडकवून आपण आपलं समाधान करुन घेत असतो का ? 

          गृहिणीचा जीव स्वयंपाकघरात असलेल्या भांड्यांवर असतो. कारभाऱ्याचा जीव घरातल्या इतर निर्जीव वस्तूंवर असतो. मग हळूहळू त्यांचा जीव जमिनीवर , घरावर आणि घरातल्या डेडस्टॉकवर कधी जडू लागतो ते त्यांनाच कळत नाही. 

          आमच्या लहानपणी शाळेत जाणारी आम्ही पाचजणं होतो. त्यामुळे आम्हाला प्रत्येकाला छत्री हवी असे. पावसाळा आला की छत्री किंवा रेनकोटसाठी आमच्या मागण्या वाढत असत. एका छत्रीत दोन दोन भावंडे शाळेत जाताना मजा येई. दोघांच्याही एक एक बाह्या भिजून जात. शाळेपासून जवळ खोली असली तर एवढा त्रास होत नसे. त्यावेळी आम्हांला तो त्रासच वाटत नसे. आता बारीकसारीक गोष्टीत त्रास का जाणवतो हा सुद्धा सतत भेडसावणारा प्रश्नच आहे. त्यावेळीच्या त्रासाचा बाऊ होत नसे. आता मात्र जरा त्रास झाला की आकांडतांडव होऊ लागते. 

          छत्र्यांवर नावे लिहिण्याचे काम मी करायचो. शाळेतून आलो की कोणाच्या छत्र्या आल्यात का बघायचो. त्यावेळी छत्रीवर नाव लिहून दिले की एक किंवा दोन किंवा जास्तीत जास्त पाच रुपये मिळत. हे पैसे आम्हाला वह्या घेण्यासाठी उपयोगी पडत. आमच्या सलूनमध्ये येणारी आमची गिऱ्हाईके चांगली होती. मला पैसे मिळावेत म्हणून ती आपल्या जुन्या छत्र्यांवरदेखील नावे लिहून घेत. मला दिवसाला शाळा करुन चौदा पंधरा रुपये मिळत. 

          माझे अक्षर पाहून लोक मला शाबासकी देत. त्यांचा प्रेमाचा दृष्टीक्षेप आम्हाला प्रेरणा देत राही. आम्ही त्यांच्यामुळे घडलो हे सांगताना मला आणखीच अभिमान वाटत आहे.

          दरवर्षी आम्हांला नव्या छत्र्या मिळण्याची शक्यता असे. एखादी चांगली छत्री दोन वर्षे वापरुनही बाद होत नसे. कदाचित त्यावेळच्या छत्र्या मजबूत असाव्यात. मला रंगीबेरंगी छत्री आवडे. पण ती लेडीजने वापरायची असते असे सांगण्यात येई. त्यामुळे आमची छत्री नेहमी काळी आणि काळीच असे. 

          पूर्वी इंग्रजी जे आकाराच्या दांड्याच्या छत्र्या टिकाऊ असत. त्या सुद्धा आम्ही वापरत असू. एकावेळी तीन व्यक्तीसुद्धा त्यात सहज मावत. धोतरवाल्या आजोबांच्या हातात ही छत्री कायमची असे. अजूनही बाजारात अशा छत्र्या मिळतात. सध्या अशा छत्र्या वापरणाऱ्यांचे प्रमाण बरेच कमी झालेले आहे. 

          आमच्या घरात त्यावेळी अशा दोन छत्र्या होत्या. एक आईसाठी आणि एक बाबांसाठी. आईची छत्री जास्त वापरली जात नसे. त्यामुळे तिचे आयुष्य वाढत राही. पाच पेक्षा जास्त वर्षे एकच एक छत्री आईने वापरली असेल. 

          बाबांना त्यांची छत्री परमप्रिय होती. ते ती कोणालाही देत नसत. त्या छत्रीचा खूपच वापर होत असे. त्यामुळे ती वापरुन वापरुन जीर्ण झाली होती. डॉक्टर उपचार करुन किंवा प्रथमोपचार करुन बाबा ती नेहमी ठिकठाक करुन वापरत असत. कितीही काहीही केले तरी ती जुनी ती जुनीच असे. तिच्यावर बाबांचे निरतिशय प्रेम होते. तिला त्यांनी एक नाव ठेवले होते. त्या छत्रीला ते ' ताटारो ' असे म्हणत. या ताटाऱ्याने बाबांना नेहमी इमानेइतबारे सुके ठेवले. आता बाबांकडे बटन असलेली छत्री आहे. पण त्यांचे त्या ताटाऱ्यावरील प्रेम काही अजूनही कमी झालेले नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



🛑 ती बोलते

🛑 ती बोलते

          माणसं कसली कसली व्यसनं करतात याची मोठी यादी होऊ शकते. चांगल्या गोष्टींची व्यसनं असणं नक्कीच चांगलं. सतत एखादी गोष्ट करण्याची आवड सवयीत बदलून जाते. काही माणसं ह्या सवयी मुद्दाम लावून घेतात. चांगल्या सवयी लागणं ही गरजेची गोष्ट आहे. त्यांचं संस्कारात रुपांतर होत असतं. ह्या सवयी सतत कराव्याशा वाटत राहतात. 

          आधी सवय आकर्षित करते. ती सवय होऊ लागते. मग आपण त्या सवयीचे गुलाम होत जातो. सवय लागणं ही दैनंदिन गोष्ट आहे , पण त्या सवयीचा गुलाम होणं ही हानिकारक गोष्ट आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. त्याचे परिणाम भोगावेच लागतात. 

          त्या दिवशी मी रत्नागिरीला जाण्यासाठी निघालो होतो. सकाळी लवकरची बस होती. मी अर्धा तास आधीच स्थानकात पोहोचलो. स्थानकात पंचवीस तीसपेक्षा जास्त प्रवासी गाडीची वाट पाहत असावेत. मीही त्या प्रतिक्षेत सामील झालो. मी बाकड्यावर बसलो. मागून मोबाईलवर बोलल्यासारखा आवाज आला. मी हळूच मागे वळून पाहिले. एक माणूस बोलत होता. मी त्याला अधिक निरखून पाहिले. तो मोबाईलवर बोलत नव्हता. तो एकटाच बोलत होता. माझे त्याच्या बोलण्याकडे जास्तच लक्ष जाऊ लागले. त्याने थोडी घेतली असावी असा मला संशय आला. तो सलग बोलत होता. तो बोलता बोलता सतत जागा बदलत होता. त्याचे कुणाशीतरी भांडण चालू होते. तो समोर नसलेल्या माणसावर चरफडत होता. तो बरळत होता. त्याच्या मनाचा ताबा सुटला असावा. शेजारी इतकी माणसं असताना त्याचे त्याला अजिबात भान नव्हते. त्याने जे पेय घेतले होते , त्याचा तीव्र असर त्याच्यावर झालेला कोणाच्याही लक्षात आला असता. मला त्याची कीव येत होती. तो एक चांगला माणूस दिसत होता. पण त्याला लागलेले व्यसन वाईट होते. त्या व्यसनाचा तो गुलाम झाला होता. त्या एकच प्याल्याने त्यालाच पुरते पिऊन टाकले होते. त्याचे बरळणे अजिबात थांबता थांबत नव्हते. 

          तो दोन तीन माणसांची नावे सतत घेत होता. ती माणसे त्याला त्रास देणारी असावीत. तो आता मानसिक झाला होता. त्याला जे बोलायचे होते , ते तो ओकल्यासारखा बोलतच होता. त्यामुळे त्याला शांत वाटत होते का ? मला समजत नव्हते. मला वाटतं तो बोलतच नव्हता , त्याने घेतलेली ' ती ' मदिरा बोलत होती. त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त झालेलं दिसत होतं. त्या मदिरेने त्याच्या जीवनाचे तीन तेरा वाजवले होते. 

          तेवढ्यात रत्नागिरी गाडी लागली होती. मी गाडीत जाऊन बसलो होतो आणि विचार करत राहिलो होतो. अधूनमधून मोबाईलची नोटिफिकेशन्स माझ्या विचारांची शृंखला तोडू पाहात होती. अनेक विचार एकमेकांत मिसळून जात होते. 

          पुढे मी प्रवासात रमून गेलो होतो. फोन येत होते , मेसेज सुरु होते. त्या ' मदिराप्रेमी ' ला कधीच विसरुन गेलो होतो. 

          अचानक एक फोन आला. त्यावर एक लहान मुलगी बोलत होती. तिने आपले नाव परी सांगितले. मी ऐकतच राहिलो. ती बोलत होती , " मामा , मी परी बोलतेय , माझे पप्पा माझ्या मम्मीकडे पिण्यासाठी पैसे मागताहेत.  " मी उडालोच. मी तिला सांगितले , " बाळा , तुझ्या पप्पांना मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला , पण मी काहीही करु शकत नाही याचे मला वाईट वाटते. " 

          एका छोट्या मुलीने आपल्या वडिलांच्या व्यसनाबद्दल मामाला फोन करावा आणि मामाला काहीही करता येऊ नये याचे दुःख मला सतत राहणार होते. मी फोन ठेवला आणि तिच्या पप्पांशी बोललेला संवाद आठवण्याचा प्रयत्न केला. हा माणूस " मला एकदा संधी द्या , माझी चूक झाली , मी आता नक्की सुधारणार " असं बोलून गेला होता. पण प्रत्यक्षात असे घडताना दिसत नव्हते. 

          अशा पिणाऱ्या माणसांच्या घरात मुले कशी जगत असतील ? वडिलांचे असले अवतार बघून त्यांच्या बालमनावर किती दुष्परिणाम होत असतील याची कल्पनाच मला सहन होत नव्हती. यांच्या बायकांवर होत असलेले अन्याय त्या कशा सहन करत असतील ? हे बळ त्यांच्याकडे कुठून येते ? प्यायलेली उतरली की या माणसांना पश्चात्ताप होतो. पण पुन्हा दुसऱ्या दिवशी असाच अनुभव भोगावा लागतो. 

          घर हे मंदिर असते. पण या मदिरेने घरमंदिराला उद्ध्वस्त केलेले असते. अशी कित्येक घरे या मदिरेपायी दररोज यमयातना सोसत जगत असतील देव जाणे. 

          मी परत यायला निघालो होतो. विचारांचं काहूर सुरुच होतं. या माणसाचं काय करावं याचाही विचार येतच होता. तेवढ्यात बाहेर मुसळधार पाऊस सुरु झाला होता. पावसाच्या पाण्याचे तुषार मस्त वाटत होते. मी खुश झालो होतो. आता मस्त प्रवास होणार असे वाटत होते. 

          खूप मोठा पाऊस मला भिजवू पाहत होता. सर्वांनी खिडक्या बंद करुन घेतल्या होत्या. आता आतले कोंदटलेले वास यायला लागले होते. माझ्या मागच्या सीटवर कोणीतरी ' मदिराधीन ' बसला होता. त्याने आपले पिण्याचे काम सुरु केले होते. माझ्या नाकात तो दर्प जात होता. मला आता ओकारी येईल असे वाटत होते. अधूनमधून खिडकी उघडून मी तो घाणेरडा वास बाहेर घालवण्याचा प्रयत्न सुरु केला होता. बाहेरचा वारा आला की मला हायसे वाटत होते. पण बाहेरच्या पावसाने उधाण मांडले होते. तो मला जास्त भिजवू लागला होता. मला आता या प्रवासाचा वैताग आला होता. माझ्या सोबत इतरांना याचा त्रास होतच असेल ना ? पण  कोणीही काहीही करु शकत नव्हते , अगदी मी सुद्धा. तो माणूस अगदी सकाळी भेटलेल्या माणसासारखा बोलत होता. तो फोनवरच बोलत होता. तो प्यायला असला तरी शुद्धीत  असल्याप्रमाणे बोलत होता. मी प्यायलो नसलो तरी लवकरच बेशुद्ध पडेन अशी शक्यता दिसत होती. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



Wednesday, June 8, 2022

🛑 अभिनंदन बारावी !!!!

🛑 अभिनंदन बारावी !!!!


          ४ थी पासून १२ वी पर्यंत अनेकविध स्पर्धा , शिष्यवृत्ती परीक्षा आणि बोर्डाच्या दोन परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांना पार करावयाची उंच उंच शिखरेच आहेत. ही चढताना त्रास होतो. दमायला , थकायला होते. 

          गेल्या दोन वर्षात ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन परीक्षांची नव्याने ओळख झाली. मार्कांची टक्केवारी सतत वाढत जाणारी पाहायला मिळाली. काहींना शंभर टक्केच्या वर गुण मिळाले. एवढे गुण आम्ही आमच्या काळात बघितले नव्हते आणि मिळवलेही नव्हते. तेव्हाचा अभ्यासक्रम अवघड होता. काठिण्यपातळी उच्चस्तरीय होती. आता अभ्यासक्रम बराच सोपा असावा. एवढे टक्के गुण मिळतात म्हणून असे वाटून जाते. नाहीतर आजची मुले खूपच हुशार झालेली असावीत. एक काहीतरी नक्कीच असेल. विचार करुन बघा. 

          मराठीत आम्हाला कधीच पैकीच्या पैकी गुण मिळाले नव्हते. बारावीत असताना माझे सगळे विषय इंग्रजीतून होते. मराठी आणि जीवशास्त्र या दोन विषयांबद्दल मी इलेक्ट्रॉनिक्स हा दोनशे गुणांचा विषय घेतला होता. तरीही मी बरेचदा जी.ए.सावंत सरांच्या मराठीच्या लेक्चरला थांबत असे. धडससरांच्या बायोलॉजीच्या लेक्चरला थांबण्याचे मी कधीही धाडस केले नाही. हत्तीसर , पारकरसर , नलावडेसर , प्रभुसर यांनी इलेक्ट्रॉनिक्स समजेल असे शिकवले. घोकंपट्टी करत गुण मिळवले. आता मला त्यातले काहीही आठवत नाही. 

          Maths हा माझा सगळ्यात आवडता विषय.महाजन सरांमुळे भरपूर सराव केला. डेरिव्हेटिव्हज , इंटिग्रेशन आणि इलिप्स , हायपरबोला , पॅराबोला यांचे अक्षरशः पीठ पाडले. आता त्यांचा मला काहीच उपयोग होत नाही. साध्या गणिताने माझ्या जीवनाचे गणित पक्के होत गेले.

          इंग्रजीच्या शिंदेसरांनी शेक्सपिअरच्या अनेक गोष्टी सांगितल्या. त्याही विसरलो आहे. 

          फिजिक्सची खूपच आबाळ झाली. येणारे नवे शिक्षक आम्हांला पाहून घाबरुन निघून गेलेले असत. त्या विषयाचा धसका घेतल्यामुळे त्याचाच अभ्यास जास्त झाला. हे शास्त्र बरेचसे लक्षात राहिले आहे. 

          केमिस्ट्रीचे बाक्रेसर म्हणजे अतिशय कडक. प्रॅक्टिकल व्यवस्थित केले नाही तर पायावर काठी बसलीच म्हणून समजा. अतिशय प्रेमाने समजावून सांगणारे सर. त्यामुळे आमची जीवनाची केमिस्ट्री स्ट्राँग झाली. 

          अजिबात क्लास न करता सतत एका ठिकाणी घरात बसून जो अभ्यास केला तसा पुढे कधी केला असेल असे वाटत नाही. त्यामुळे बारावीत चांगले यश मिळाले. त्यावेळी सायन्समध्ये एकूण 74 टक्के गुण मिळणे ही साधी गोष्ट नव्हती. आय आय टी चे स्वप्न बघितले. आय आय टी करता आले नाही. डीएड केले. बीए केले. एम.ए. केले. बीएड केले. प्राथमिक शिक्षक झालो. आता मुलांच्यात माझे स्वप्न पेरण्याचा प्रयत्न करत आहे. कोण कोठे जाईल हे आताच्या गुणांवर अजिबात सांगता येणार नाही. 10 वीत बोर्डात उच्च गुण मिळवणारा झोपडपट्टीत राहणारा मंगेश म्हसकर नावाचा विद्यार्थी आता कुठे असेल माहीत नाही. 

          सातत्याने प्रयत्न करत राहा. अपयश आले तरी खचून जाऊ नका. बारावीत भरपूर गुण मिळवलात त्याबद्दल अभिनंदन तुमचं. पण आता तुमची जबाबदारी जास्त वाढली आहे. चिकाटी सोडू नका. नोकरी मिळेल हा अट्टाहास सोडा , स्वतःच नोकरी देणारं एखादं व्यक्तिमत्त्व बना. शुभेच्छा.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 ) कणकवली



🛑 शाळेचा पहिला दिवस

🛑 शाळेचा पहिला दिवस 


          शाळा सर्वांचीच आवडती असावी बहुतेक. कारण सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपण पहिल्यांदा शाळेची पायरी चढतो. शाळा कधी एकदा सुरु होतेय याची आम्ही अजूनही चातकासारखी वाट पाहतो. चातक पक्षी पहिल्या पावसाचे पाणी प्यायला आतुर झालेला असतो. आम्हीही तसेच शाळेतील ज्ञान प्यायला आतुरच झालेले असतो.

          शाळा सुरु होण्यापूर्वी पंधरा दिवस शाळेत जाण्याच्या तयारीची लगबग सुरु होते. हे प्रत्येकाच्या घरी घडत असेल. आम्ही लहान असताना यापेक्षा मजा यायची. शिक्षक झाल्यामुळे ती मजा तशीच सतत घेता येते आहे याचा आनंद होतो. ही मजा इतरांना अनुभवता येणे शक्य असेल असे मला वाटत नाही. 

          दरवर्षी नवा वर्ग , नवीन इयत्ता , नवी मुले , नवे शिक्षक , नवी पुस्तके , नव्या वह्या , नवी छत्री , नवा रेनकोट , नवी कंपासपेटी , नवे मित्र , नवी पट्टी आणि बरेच नवनवे अनुभवण्याचे क्षण येतच राहतात. त्यांच्याकडे दरवर्षी नवा दृष्टिकोन ठेवून पाहिल्याने नव्या शैक्षणिक वर्षाची लज्जत अधिकाधिक वाढतच राहते. 

          आज जगन भेटेल. मगन भेटेल. नवे अनुभव घेत यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी प्रेरणा मिळत जाईल. हे सगळे घरी सुदधा मिळेल , पण त्यात मजा ती कसली ?  वर्गातील प्रत्यक्ष अनुभवांची चवच न्यारी असते. ती कधीच कुठे येऊ शकणार नाही. 

          काही मुले पहिल्या दिवशी शाळेत जात नसतील , तर ती एका मोठ्या आनंदाला मुकत असतील. सफाई करावी लागेल या भीतीने काही पालक आपल्या मुलांना घरी ठेवतील तर मुलांना पहिला दिवसच अनुभवता येणार नाही. त्यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्यक्ष तनाने आणि मनाने उपस्थित राहायलाच हवे.

          मुले मैदान साफ करतात. वर्ग झाडू मारुन लख्ख करतात. घरात कधी एखाद्याने झाडू घेतली नसेल , पण शाळेत मुले एकोप्याने सगळी कामे करतात. येथे समानतेचे धडे मिळतात. घरी नेहमी भरवून घेऊन जेवणारी मुले शाळेत मात्र स्वतःच्या हाताने जेवतात. जे पानात वाढले असेल ते चवीने खातात. त्यांना भूक लागते. हे सर्व शाळेत घडते. 

          स्वच्छतागृहे साफ करणारी मुले पाहिली की त्यांच्या अंगी येत असलेली श्रमप्रतिष्ठा पाहून थक्क व्हायला होते. हे सगळे शिक्षणच आहे. हे करत असताना त्यांना एकात्मतेची जाणीव होत असते.

          पुस्तकात नाक घालून त्याचा वास घेत राहणे , पानफुटीची पाने ठेवणे , जुन्या वह्यांपासून नव्या वह्या बनवणे यांतही अनोखा आनंद असतो. आता तसे होताना दिसत नाही. पूर्वी नवी पुस्तके मिळत नसत आता मिळतात तशी. जुनी पुस्तके वापरत वापरत आम्ही पुढच्या वर्गात गेलो आहोत. ताई आणि आका यांची पुस्तके आम्हांला मिळत. त्यांना वर्तमानपत्रांची कव्हरे घालून आम्ही त्यांना नवी करुन टाकत असू. त्या जुन्या पुस्तकांवर आम्ही नव्यापेक्षाही जास्त प्रेम करीत असू. शेजारपाजारी राहणाऱ्या काकांच्या मुलांची जुनी पुस्तके अर्ध्या किमतीत घेऊन आम्ही चांगले शिक्षण घेतले आहे. तीच पुस्तके आम्ही चार ते पाच वर्षे हस्तांतरित करत वापरत असू. आताच्या मुलांची सोयच सोय आहे. 

          दरवर्षी नवीन पुस्तकांचा संच मुलांना मिळतो. मोफत गणवेश मिळतात. शालेय पोषण आहार मिळतो. एवढं सगळं मिळतं , तरी शिक्षण घेताना आजच्या मुलांना जड का जातं देव जाणे ? सगळं आयतं मिळतं म्हणून त्याची किंमत राहिलेली नाही की काय ? 

          पालक स्वतः कमी शिकलेले असले तरी ते आपल्या मुलांना सगळ्या सोयी देऊ करतात. फक्त मुलांना अभ्यासच करायचा असतो. तोही करताना पालक मदत करतात. क्लास लावतात. आम्हांला कुठे पालकांची अभ्यासात मदत होती ? क्लास तर माहितच नव्हता. तरीही आम्ही अभ्यास केलाच ना ? आजच्या मुलांमध्ये चिकाटी दिसत नाही. ती चंचल होत चालली आहेत. त्यांचे लक्ष विचलित होत राहिल्याने अभ्यासात एकाग्रता दिसत नाही. पाढे पाठ नसतात. कविता पाठ नसतात. त्यापेक्षा त्यांना whats app , यु ट्यूब , स्टेटस , इंस्टाग्राम , फेसबुक हे सगळे माहिती असते. प्रत्येक गोष्टीचे फोटोसेशन करणे त्यांना आवडते. 

          त्यावेळी एका वर्गात तीस चाळीस मुले असत , आता ती एका शाळेत असतात. ग्रामीण भागात उच्चशिक्षित शिक्षकवर्ग आहे. तरीही ग्रामीण भागातील मुले जवळपासच्या शहरी भागातील शाळेत शिकायला जातात. त्यामुळे पटसंख्या रोडावत चालली आहे. शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तुडुंब गर्दी बघायला मिळते. ही तुडुंब गर्दी ज्यावेळी ग्रामीण भागात बघायला मिळेल तेव्हाच शाळेचा पहिला दिवस अधिक उत्साहवर्धक असेल. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 ) कणकवली



Saturday, June 4, 2022

🛑 उर्मीची ' चंद्रा '

 🛑 उर्मीची ' चंद्रा '

          काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एखादया ठिकाणी जातो. जाताना कुटुंबातील व्यक्ती सोबत असतात. ते एखादे ठिकाण माहेर असले तर बायकोला जो आनंद होतो तो शब्दांत व्यक्त करणे अवघड आहे. त्या दिवसांत तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसतो. त्यांना एखादी रात्र राहायला मिळाले तरी चालते. पण मुक्काम हवाच असतो. बाहेर पडताना नवऱ्यावरचे त्यांचे प्रेम उतू जाते हे मी अनुभवलेले आहे म्हणून सांगू शकतो. इतरांचा अनुभव असाच असेल याची मी खात्री कशी देऊ ? प्रत्येकाचा अनुभव जर असाच असेल तर मात्र ते माझ्या मताशी नक्कीच सहमत होतील. 

          माझ्या सासरी पडळी राधानगरीला कालिकादेवीचे एक सुंदर मंदिर बांधले आहे. आम्ही गेलो कि तिचे दर्शन घेतो. यावर्षी कालिका मंदिरात वर्धापन दिन महोत्सव संपन्न होणार होता. हिला तिकडे जायचे मनात होते. हिला म्हणजे बायकोला. तिने माझ्याशी प्रेमाने बोलायला सुरुवात केली होती. मी अवाक झालो होतो. आज काहीतरी मागणी असावी असा मला प्रश्न पडला होता. ती म्हणाली , " कारभारी , रागावणार नसाल तर सांगते , एक सांगू काय ? " मी म्हटले , " एक सांग , दोन सांग , काय ते सांग , आता सांगणारच आहेस तर मला ऐकण्याशिवाय पर्यायच नाही. " ती पुढे म्हणालीच , " अहो , मी काय म्हणते , आमच्या तिकडे मंदिरात उत्सव साजरा होणार आहे , आपण जाऊया ना !!! " ती एवढी काकुळतीला आली होती की मला होकार द्यावाच लागला. तिकडे जाईपर्यंत तिचे अपार प्रेम वाढत चाललेले दिसत होते. मी मनातल्या मनात हसत होतो. तिला माझे हसणे समजत असले तरी तिने तिकडे दुर्लक्ष केले होते. ती खूप खुश होती. ती दररोज अशीच खुशीत राहावी असे मला वाटत होते. पण ही खुशी फार काळ टिकली नाही तर त्रास होतो. 

          नुकताच आम्ही कुटुंबासह ' चंद्रमुखी ' हा मराठी चित्रपट पाहिला होता. त्यातील लावणी नृत्ये माझ्या लहानग्या ' उर्मी ' ला अतिशय आवडली होती. घरी येऊन तिने तसेच नृत्य करण्याचा स्वतःहून सराव करत राहिली होती. पाच सहा वर्षांची मुलगी नाचून काय नाचणार असे कोणालाही वाटू शकते. पण उर्मी याला अपवाद होती. तिने दोनच दिवसांत ते गाणे नाचून , गाऊन पाठ करुन टाकले. तिला नाचाची आवड असल्यामुळे आम्ही तिची ही उर्मी थांबवू शकणार नव्हतो. नृत्य दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाशिवाय तिने नृत्यात केलेली प्रगती उल्लेखनीय अशीच होती.

          बायकोने बॅगा भरल्या. आम्ही राधानगरीला निघालो. सोबत मेहुणा आणि त्याची पत्नी होती. प्रवास सुखाचा झाला. सासू सासऱ्यांनी जावयांचे स्वागत केले. बायको खुश होती. तिला खूपच बरे वाटत होते. एवढा प्रवास करुनही ती दमली नव्हती. तिथे गेल्यानंतर तिने भराभर जेवणाची तयारी केली. जेवल्यानंतर कालिकादेवीच्या मंदिरात कार्यक्रम बघायला जायचे होते. 

          कार्यक्रमांना सुरुवात झाली. वाडीतील सर्व कलाकारांनी आधीच आपली सादरीकरणे आयोजकांकडे दिली होती. स्टेजवरील कार्यक्रम पाहून छोट्या ' उर्मी ' ला नाचावेसे वाटले नसेल तरच नवल !! तिने आपल्या मामाला सांगून आपला डान्स सांगितला. रात्रीचे साडे बारा होत आले होते. उर्मीला झोप अनावर झाली होती. आता ती झोपणार म्हणून माझ्या बायकोनेच तिच्या ओळखीने उर्मीचा लवकर नंबर लावला होता. ' स्वानंदी प्रवीण कुबल ' असे नाव मोठ्यांदा पुकारले गेले. उर्मीची आता झोप उडून गेली होती. तिच्या अंगात ' चंद्रा ' संचारली होती. ती धावतच स्टेजवर गेली होती. गाणे सुरु झाले होते. वाद्याच्या तालावर पदविन्यास दाखवत तिने नाचायला सुरुवात केली आणि सर्वांचे डोळे तिच्यावर खिळले होते. ओठांचा अभिनय जसाच्या तसा करत असल्यामुळे जणू तीच गाणं म्हणून नाचत आहे असा भास होत होता. तिने फ्रॉक घातला होता. पदर म्हणून ओढणी घेतली होती. साडी परिधान केली नसली तरी डोक्यावरच्या ओढणीने पदराचे काम केले होते. ओढणीला तिने असे काही बाजूला करत जी अदाकारी दाखवली होती , तिला टाळ्यांचा आणि शिट्यांचा कडकडाट झाला होता. 

          कार्यक्रम झाल्यानंतर कित्येकांनी दुसऱ्या दिवसापर्यंत तिचे अभिनंदन करणे सुरुच ठेवले होते. कोणीतरी तिला सांगितले की तुझा नंबर आला आहे , तुला ट्रॉफी मिळणार आहे. दुसऱ्या दिवशी ट्रॉफी मिळणार या एकाच आशेने ती रात्रीच्या सन्मान सोहळ्याला गेली होती. सगळ्यांचे सन्मान झाले होते. आपले नाव आता येईल , मग येईल असे म्हणत असताना ती माझ्या मांडीवर गाढ झोपेच्या अधीन झाली होती. तिला खूप उशिरा जाग आली होती. तिने झोपेतच मला विचारले होते , " पप्पा , माझी ट्रॉफी मिळाली काय ? " मी तिला एवढेच बोललो , " तुझी ट्रॉफी त्यांच्याकडून हरवली आहे , ती सापडली की नक्की मिळेल. " उर्मी तरीही खुश झाली. ती मला म्हणाली , " पप्पा , माझीच ट्रॉफी यांनी हरवली कशी ? " मी आपला मनातल्या मनात हसत तिला थोपटवत गाढ झोपवलं. मी आपला तिच्या मम्मीच्या आणि माझ्या मुलींच्या चेहऱ्यावर असा स्वानंद सतत येत राहावा हे माझे जागेपणीच स्वप्न शांतपणे बघत राहिलो होतो.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 ) कणकवली



🛑 मॉर्निंग वॉक : एक आल्हाददायक अनुभव

🛑 मॉर्निंग वॉक : एक आल्हाददायक अनुभव


          हल्ली ' मॉर्निंग वॉक ' ला जाण्याचे प्रमाण पुन्हा सुरु झाले आहे. ती एक काळाची गरज आहे. चालणे हा सर्वांत चांगला व्यायाम प्रकार आहे. चालल्यामुळे तुमचे अनेक ताणतणाव कमी होऊ शकतात. 

          अनेकजण कित्येक वर्षे ' पहाट चालणं '  करण्यासाठी बाहेर पडलेली मी प्रत्यक्ष बघितली आहेत. पूर्वी सकाळी शाळा असे , त्यावेळी आपोआप सकाळचे चालणे होऊन जाई. आता काही शाळांच्या वेळा बदलल्या आहेत , त्यामुळे ' प्रातःकालची चाल ' बंद पडली आहे. लोकांनी उशिरापर्यंत झोपण्याच्या सवयी बदलायला हव्यात. तर सकाळी चालायला जाण्यासाठी लवकर जाग येईल. रात्री उशिरापर्यंत हॉरर सिरीयल बघत बसतात. त्याचा प्रभाव झोपेतही राहतो. झोप झाल्यासारखे वाटत नाही. मग सकाळी उशिराच गाढ झोप लागते. अर्थात आज नको उठुया , उद्या उठून ' प्रातःकाल चाल ' सुरु करण्याचा संकल्प करत राहतील आणि तो पूर्णही होणार नाही कधीच.

          ' लवकर निजे , लवकर उठे

    ' तया आरोग्य , संपत्ती , ज्ञान भेटे '

हे सुवचन म्हणूनच अगदी योग्य आहे. लवकर उठावे , मस्त प्रफुल्लोत्तेजन करावे. ताण कुठल्या कुठे निघून जाईल पहा. आज , उद्या , परवा करण्याच्या भानगडीत पडू नका. आज आता ताबडतोब सुरुवात करणं कधीही उत्तमच. मीही या सुट्टीत अनेकदा मॉर्निंग वॉकचा अनुभव घेतला आहे. हा अनुभव खरंच घेतल्याशिवाय समजणार नाही. त्यासाठी दररोज थोडं चालण्यासाठी घराबाहेर पडाच. 

          दिवसाची चांगली सुरुवात अशी करुन पहा. कित्ती मस्त वाटेल तुम्हाला. दिवस आनंदात जाईल. शरीर आणि मन दोन्ही प्रफुल्लित होऊन जातील. तुम्ही कायम तंदुरुस्त राहण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. 

          त्यासाठी कोणत्याही मोठया पूर्वतयारीची अजिबात गरज नाही. साधे सैल कपडे घालून निघा. हलके शूज असले तर आणखी उत्तम. चालताना तुम्हाला अवघड वाटता कामा नये. बाजाराला जाताना तुमच्या हातात एखादी पिशवी असते , इथे ती नसते. मोबाईल नसला तर तुमचे चालण्याकडे अधिक लक्ष राहू शकेल. नाहीतर प्रत्येक नोटिफिकेशन तुमची चाल मंदावत राहील. याला काय अर्थ आहे ? तुम्ही चालायला गेलात ना ? मग तेवढीच गोष्ट मनापासून करा. काही लोक कानात इअरफोन घालून एका हातात मोबाईल घेऊन चालताना मी बघितले आहेत. त्यामुळे त्यांचे चालणे हा एक उपचार ठरतो. त्याचे हवे तसे फिलिंग येत नाही. काही लोक बोलत बोलत चालत असतात. त्यांचे चालणे थांबेल , पण बोलणे थांबत नाही. काही लोक एखादा व्हिडीओ पाहत पाहत चालत असतात. भीती वाटते अश्यांची. चुकून खड्ड्यात पडले तर ? पडताना अशी माणसे आधी आपला मोबाईल वाचवतील , मग स्वतःला. 

          मॉर्निंग वॉकसाठी कमी वाहतुकीचा रस्ता निवडावा. असा रस्ता आता दुर्मिळ झाला आहे. दोन्ही बाजूंना झाडे असल्यास चालताना मजा येते. जाताना खूप काही पाहायला आणि ऐकायला मिळते. पक्ष्यांचे आवाज ऐकत जावे. निसर्गाच्या सहवास घेत घेत पुढे पुढे चालत राहावे. थोडे ट्रेकिंग करावे. घामाघूम होऊन जावे. घाम हलकेच पुसून टाकावा. एखाद्या शांत ठिकाणी शांत बसून निसर्गातील विविध आवाज ऐकावेत. डोळे बंद करुन जगापासून वेगळे होण्याचा प्रयत्न करावा. 

          वाटेतील झाडांशी ओळख करावी. त्यांच्याकडे प्रेमाने पाहावे. दुसऱ्या दिवशी ती तुमची वाट पाहताना दिसतील. तुम्ही जवळ जाताच तुमच्यासाठी ती डोलताना दिसतील. ती झाडे सजीव आहेत , ती तुम्हाला नक्कीच प्रतिसाद देतात. फक्त ते निरीक्षण करता आले पाहिजे. 

          रानकोंबडी अगदी तुमच्या जवळून जातील. पळसाची फुले , प्राजक्ताची फुले थेट तुमच्या पायावर पडतील. निसर्ग तुमचे स्वागत करायला सुरुवात करेल. कुठूनतरी एखादी कोकिळा तुमच्यासाठी गाणे गात असेल. गोठ्यातील गाई , गुरे हंबरत असतात. दूध काढताना चरवीचा येणारा आवाज , शेणामुताचा आरोग्यदायक वास , पिकलेल्या आंब्यांचा सडा हे सगळं एका मॉर्निंग वॉक मध्ये अनुभवायला मिळतं. वाटेत मित्र भेटतात. ते गुड मॉर्निंग करतात. मोकळी स्वच्छ जागा दिसली की तिथेच बसून राहावेसे वाटते. आपण मध्येच आणि आपल्या चारी बाजूंना निसर्ग. किती मस्त वाटतं !! मग तिथे बसून थोडी योगासने करावीत. शरीराबरोबर मनाचाही भार हलका करावा. शरीरातील दुखणाऱ्या इंद्रियांकडे पहावे. त्यांच्यावर आलेला ताण शिथिल करावा. 

          हे करुन आल्यावर मस्त थंड पाण्याची आंघोळ करावी. मंत्र म्हणत देवाला  नमस्कार करावा. हे सगळे दररोज करता आले तर छानच.  नाहीतर एकदिवसाआड जमते काय बघा. मलाही हे नित्य करता येते का बघतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



Thursday, June 2, 2022

🛑 तातू

🛑 तातू

          काही असे मित्र लाभणे म्हणजे भाग्यच म्हणायला हवे. त्यांनी दिलेली प्रेमळ साथ नेहमीच स्मरणात राहणारी असते. त्यांच्यासोबत काही क्षण अनुभवताना त्या क्षणांचे सोनेरी क्षण कधी झाले समजलेच नाही. 

          त्याची आणि माझी भेट एका परीक्षेच्या वेळी रत्नागिरीत झाली. त्याचे नाव रामचंद्र कुबल. त्याचे आणि माझे आडनाव सारखे असल्याने मागच्या बेंचवर त्याचा नंबर आला. तो पेपर कोकण निवड मंडळाचा होता. मी गणितचा बराच अभ्यास केला होता. मी भराभर पेपर सोडवत चाललो होतो. त्याच्याकडे माझे लक्षच नव्हते. त्याने मात्र माझी खास ओळख करुन घेतली होती. तो गोष्टीवेल्हाळ स्वभावाचा असल्याने माझेही त्याच्याशी काहीसे जमले. 

          पेपर सुटल्यानंतरही तो मला मुद्दाम हाक मारुन ' ओळख ठेव रे प्रवीण ' असे बोलून निघून गेला होता. मी त्यावेळी रत्नागिरी प्राथमिक शाळेत नोकरी करत होतो. मला चांगली नोकरी मिळाली होती , तरी मी खुश नव्हतो. मला जिल्हा परिषदेत काम करायचे होते. शेवटी रत्नागिरी जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक नेमणुकीची ऑर्डर आलीच. एक नोकरी सोडून दुसरी पकडायला जाताना त्रास होत होता. 

          वाटेत भेटलेल्या मित्रांनी हा त्रास कमी केला होता. माझ्याबरोबर माझे अनेक मित्र आणि मैत्रिणी रत्नागिरीत नोकरीला लागले होते. पुन्हा मला गाडीत येता जाता अनेकदा रामचंद्र कुबल भेटला. त्याचं बोलणं विलक्षण आकर्षित करणारे होते. त्याच्याभोवती मित्र मैत्रिणींचा गराडा असे. तो सर्वांशी हसतखेळत बोलत असताना पाहून मला त्याचा खरंच हेवा वाटे. त्याने मलाही त्याच्या मित्रांशी आणि मैत्रिणींशी ओळख करुन दिली होती. त्याचे मित्रमैत्रिणी मला ओळखतात हे माझ्यासाठी नवीन होते. मी फारसा बोलका नव्हतोच. रामचंद्राला सगळे ' तातू ' या नावाने हाक मारत. मीही कधीतरी त्याला ' तातू ' या नावाने हाक मारत असतो. तातू या शब्दाचा फुलफॉर्म ' तारक तुमचा ' असा असावा. कारण तातू हे नाव त्याच्यासाठी या अर्थाने सार्थ ठरते. 

          दर शनिवारी किंवा रविवारी त्याची नियमित भेट होत राहिली. खेड या एकाच तालुक्यात नोकरीला असल्याने त्याची सुसंगती सदा घडत गेली. त्याची सुजन वाक्ये कानी पडत होती. तो जेवण उत्तम बनवतो हे समजले होते. त्याच्याकडे एकदा किंवा दोनदा जाण्याचे भाग्य लाभले. त्याने केलेले कांदेपोहे चटकदार होते. तो ते करत असताना पाककृती सांगत राहिला होता. त्यामुळे मीही एकदा तसे करण्याचा प्रयत्न करुन बघितला होता. पण त्याच्या पोह्यांची चव त्यांना आली नव्हती. दुपारच्या भोजनात त्याने केलेले चिकन अप्रतिम चविष्ट होते. तो कवी , लेखक , नर्तक , कथाकार , दिग्दर्शक , आदर्श शिक्षक आणि एक आदर्श मित्र म्हणून मला जास्त भावत गेला होता. तो कधी कोणावर रागावत असेल असे सहसा वाटत नाही. त्याच्या दिसत असणाऱ्या व्यक्तिमत्वापेक्षा त्याच्यातील सुप्त गुण अधिक दिसून येतात. तो नेहमीच ध्येयवादी राहिला आहे. त्याने एकदा ठरवले की ते तो तडीस नेल्याशिवाय राहत नाही. त्याचे सूत्रसंचालन श्रवणीय असते. 

          माझे लग्न ठरले. तातू लग्नाला आला होता. माझी पत्नी त्याची वर्गमैत्रिण होती. ती त्याला मित्रापेक्षा भाऊच जास्त मानत होती. तो आपल्या सर्व माणसांची जिवापाड काळजी घेत असतो. आता तो मला अनेकदा रस्त्यात भेटतो. तोही घाईत आणि मीही घाईत. एखादया मिनिटांचा संवाद असेल , पण त्यात प्रेमाचा सुवास भरलेला असतो. तो माझ्या मित्रपरिवारातील राम आहे , त्यांच्यासारखे मित्र माझ्या जीवनात आहेत म्हणून माझ्या जीवनात राम आहे.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )

🛑 माझी जलसफर

 🛑 माझी जलसफर


          लहानपणापासून मला पाण्याची भीती खूपच वाटत आली आहे. पाणी पितानाही अनेकदा माझ्या नाकातून आलेले होते. अर्थात मी पाणी तोंडावाटे पित होतो , पण नेहमी घाई नडायची. गडबडीत पाणी पिऊ नये हेच खरे. तोंड आकाशाच्या दिशेने उघडून त्यात पाणी भरल्यानंतर मला अनेकदा असा अनुभव आला आहे. पाणी तोंडातून घटाघटा आत पोहोचत असे. मध्येच ते नाकातून बाहेर पडताना मोठा ठसका लागे. 

          पाणी पिताना ही हालत होती. त्यामुळे पाण्यात सफर करताना त्याहीपेक्षा जास्त अनुभव आले होते. आम्हाला गावाकडे जाताना नदी ओलांडूनच जावे लागे. 

          माझा गाव किर्लोस आंबवणेवाडी. नदीच्या पल्याड आमचे मातीचे घर होते. आमचे घर शेत शिवार संपलं की पहिलंच होतं. आमची नदी पाऊस सुरु झाल्यानंतर पंधरा वीस दिवसांतच दुथडी भरुन वाहू लागते. तिच्या पाण्याचा प्रवाह गतिमान असतो. त्या प्रवाहाला तोडून पलिकडे जायचे म्हणजे एक दिव्यच होते. 

          अर्थात नदीकिनारी आमचा एक होडीवाला आम्हाला पलिकडे सुखरुप नेऊन सोडत असे. आम्ही त्यांना ' होडीवाले काका ' म्हणत असू. ते होडी बिनधास्त हाकत. मोठी माणसे त्यांना ' विठोबा ' नावाने प्रेमाची हाक मारत. 

          आम्ही पलिकडे नदीकिनारी आलो होतो. नदी वेगाने वाहत होती. मधेच एखादा लाकडाचा ओंडका जोरात वाहून जाताना दिसत होता. ती आपल्या पोटातून आणखी काय काय वाहून नेत होती तीच जाणे !! किनाऱ्यावर नदीचे पाणी जोरात आदळताना पाहून भीती वाटत होती.  आम्ही त्या रौद्ररूप धारण केलेल्या नदीच्या पलिकडे जाण्याची घाई करत होतो. पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. डोक्यावर धरलेली छत्री चार पाच वेळा उलटी होऊन पुन्हा सरळ झाली होती. 

          बाबांनी आणि काकांनी मोठ्यांदा कुकारे मारायला सुरुवात केली होती. होडीवाला कुकारे ऐकून होडी घेऊन येणार होता. बाबांना आणि काकांना व्यवस्थित कुकारे घालता येत. माझ्या कुकाऱ्यांचा आवाज ऐकू येतच नव्हता. 

          पलीकडील झोपडीतून कसलीशी हालचाल झाली होती. ते आमचे होडीवाले काका होते. एवढया  भयंकर नदीतून त्यांनी न घाबरता होडी घातली होती. पावसाचे पाणी होडीत साचले होते. काकांनी ते बाहेर काढले होते. काकांनी अतिशय कौशल्याने वल्हे मारत होडी आमच्या दिशेला हाकली होती. ते होडी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चढवत पुढे पुढे येत होते. नदीच्या मध्यभागी येताच होडी वाहून प्रवाहाबरोबर खालच्या दिशेने वेगात येत होती. काका पुन्हा वल्हे बदलून कधी उजवीकडे तर कधी डावीकडे वल्हे मारत लवकरच आमच्यापर्यंत येऊन पोहोचले होते. 

          होडी एकदम किनाऱ्यावर येऊ शकत नव्हती. त्यामुळे थोडे पाण्यात जाऊन आम्हाला होडीत बसावे लागले होते. आम्ही सर्व सात आठजण होडीत बसलो होतो. काकांनी होडी हाकायला पुन्हा सुरुवात केली होती. आमची जलसफर सुरु झाली होती. होडी पाण्यात हिंदोळे देत होती. आमची घाबरगुंडी उडाली होती. वारा थांबता थांबत नव्हता. पावसाचा जोर होताच. माझ्या भाईकाकांनी दुसऱ्या बाजूने वल्हा मारायला सुरुवात केली होती. आता पुन्हा एकदा होडी वरच्या दिशेला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला हाकणे नेटाने सुरु झाले होते. 

          होडीला कुठेतरी बारीकसे छिद्र होते. त्यातून पाणी येत होते. पावसाचे पाणी होडीत येत होतेच. बाबांनी होडीतले पाणी बाहेर ओतायला सुरुवात केली होती. आता होडी प्रवाहाच्या दिशेने वेगाने वाहायला लागली होती. होडीवाले काका थोडेसे घाबरलेले दिसले. त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला दिसत होता. होडी काही केल्या थांबता थांबत नव्हती. माझे काका जिवाच्या आकांताने वल्हे मारतच होते. होडी खूपच पुढे जाऊन एका झाडाच्या पाळाला जाऊन थबकली होती. आता किनारा जवळ होता. पण चारी बाजूला खोलवर पाणी होते. कोणीही होडीतून उतरु शकत नव्हते. शेवटी होडीवाले काकांनी जोरात वल्हे मारुन होडी किनाऱ्याला लावलीच. एवढया पावसातही त्यांच्या अंगातून थबाथब घाम ओथंबत होता. सर्वांचा जीव वाचल्याबद्दल आम्ही सर्वांनीच आमच्या कोसमीवाल्या महापुरुष देवाचे आभार मानले होते. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )

🛑 हायकोटायो

 🛑 हायकोटायो


          आपल्याला किती माणसं भेटत राहतात आयुष्यात ? त्यांचं जगणं बघत असताना त्यांचे कित्येक गुण आपणही नकळत आत्मसात करत असतो हे आपल्याला माहिती नसते. ह्या माणसांमध्ये एक वेगळंच चैतन्य भरुन राहिलेलं असतं. ते त्यांच्या नेहमीच्या वागण्या बोलण्यातून लक्षात येत राहतं. त्यांच्या भारदस्तपणाचं दडपण देखील आपल्यावर येत राहतं. दडपण म्हणजे अधिकची आदरयुक्त भीती असते. या माणसांशी बोलतानाही सतत भीती वाटत राहते. त्यांच्या बरोबर बोलताना कोणते शब्द वापरावेत याचाही खूपच विचार करावा लागतो. असंच एक धीरगंभीर अभिनयाची कार्यशाळा असलेलं व्यक्तिमत्त्व खूप जवळून पाहता आलं याचाही मला आनंद वाटतो. 

          उत्कृष्ट नाटकं करणं ही त्यांची खासियत म्हणायला हवी. त्यांची आवाजाची फेक मी खूप पूर्वीपासून अनुभवली आहे. त्यांच्या शब्द उच्चारांमुळे निर्जीव शब्दांना सजीवपणा प्राप्त होतो. हे सगळं वर्णन एखादया कसलेल्या अभिनेत्याचे असू शकते हे कोणीही मान्य करेल. हो , मी एका अभिनेत्याबद्दलच सांगतोय. त्यांचं नाव आहे सुहास वरूणकर. 

          एसटीत लिपिक म्हणून काम करताना त्यांच्यातील नाटककार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी प्रत्येक गॅदरिंगमध्ये प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवलं होतं. यांचे कार्यक्रम शेवटी ठेवले जात. त्यांचा परफॉर्मन्स बघितल्याशिवाय कॉलेज कुमार आणि कुमारीही जागा सोडत नसत. 

          मी त्यावेळी आठवी , नववीत शिकत असेन. माझी मोठी ताई कणकवली कॉलेजमध्ये शिकत होती. मी तिच्याबरोबर गॅदरिंग बघायला गेलो होतो. त्यावेळच्या कॉलेज जीवनातील विविध गमतीजमती मला बघायला मिळत होत्या. सुहास वरुणकर यांचा रंगमंचावर प्रवेश झाला होता. सगळी मुले त्यांच्या प्रवेशालाच टाळ्या आणि शिट्ट्या देऊ लागली होती. मी फक्त टाळ्या वाजवत होतो. मी शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न केला होता. पण फक्त हवाच बाहेर पडली होती , आवाज आलाच नव्हता. अजूनही माझे तसेच होते , त्यामुळे मी कधी शिट्टी वाजवण्याच्या फंदात पडत नाही. 

          वरुणकरांच्या दोन्ही हातात एक काठी होती. ती त्यांनी आडवी पकडली होती. पोटावर धरुन ते चालत होते. चालता चालता ते कोणते तरी गाणे म्हणत होते. ते जे म्हणत होते त्याचा मला त्यावेळीही अर्थ लागलेला नव्हता आणि आताही लागलेला नाही.  ते म्हणत होते , " हायकोटायो नादे खोटा , हायकोटायो नादे खोटा ". याचा अर्थ त्यांना लक्षात असू शकतो. 

          हे सुहास वरुणकर आमचे सलूनचे कस्टमर. मीही त्यांचे एकदोनदा केस कापले आणि रंगवलेही आहेत. त्यांचे केस कापणे ही सोपी गोष्ट नसते. ते सांगतील तेवढेच केस आपल्याला कापायचे असतात. त्यात जरा जरी कसूर झाली , तर कापणाऱ्याचे काही खरे नसते. बाबांना त्यांच्या केसाचे तंत्र माहिती होतं. त्यांनी कापलेल्या केसात सुहासजी खूप कमीवेळा त्रुटी काढत. एक मोठा अभिनेता आमच्या दुकानात येऊन केस कापून जातोय याचा आम्हाला अभिमान वाटे. ते कायम घाईत प्रवेश करत आणि आपले केस कापून निघून जात. जणू ते रंगमंचावर इन्ट्री करुन गेल्यासारखे वाटत. 

          एकदा मी त्यांच्या जुन्या घरी सहजच गेलो होतो. त्यावेळी ते कोणाचीतरी रिक्षाची सीट बनवून देण्यात मग्न होते. फावल्या वेळेत ते हे काम करीत. 

          नाथ पै एकांकिका , यंगस्टार मित्रमंडळ , अक्षरसिंधु कलामंच , कामगार कल्याण केंद्र , बागेश्री थिएटर आणि एसटीकडून होणाऱ्या अनेक एकांकिका स्पर्धा त्यांनी गाजवल्या. त्यांच्या अभिनयाची एक वेगळीच क्रेझ असते. ' तन माजोरी ' या नाटकात त्यांनी केलेले काम सहकलाकारांसाठी कायमच लक्षात राहणारे असेल. ' किरवंत , आमुषा ' अशा अनेक वेगळा संदेश देणाऱ्या नाटकांचं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे. अभिनय करता करता त्यांनी दिग्दर्शनाला सुरुवात केली. त्यांनी कित्येक नाटके , एकांकिका बसवल्या असतील. त्यांनी सादर केलेल्या नाटकांना नेहमीच राज्यस्तरावर गौरविण्यात आलेले आहे. 

          आता तर ते यु ट्यूबवर अनेक विनोदी प्रहसनांसाठी प्रसिद्ध झालेले आहेत. कणकवलीत नाट्यक्षेत्राशी निगडित असलेल्या अभिनेत्यांमध्ये त्यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. 

          नाटकासाठी एकदा त्यांना मिशी आणि केस पूर्ण काढावे लागले होते. त्यांची परमप्रिय मिशी त्यांनी काढली होती. त्यांना तसे ओळखताही येत नव्हते. नाट्यप्रकारासाठी वाहून घेतलेल्या या कलावंतांबरोबर मलाही काही क्षण जगता आले हेही माझे नाट्यमय भाग्यच. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )

🛑 निकिता ठाकूर : समितीचा अस्मितांकुर

 🛑 निकिता ठाकूर : समितीचा अस्मितांकुर

          काही माणसे खूप कमी काळात आपला प्रभाव दाखवतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी असण्याची गरज नसते. अशा व्यक्ती जातील तेथील माहोल प्रभावी बनवण्याची क्षमता बाळगतात. जसा माहोल बनत जाईल , तसा त्यांच्यातील प्रभाव हळूहळू जाणवू लागतो. माणसं एकत्र करण्याची कला अशा माणसांमध्ये प्रकर्षाने जाणवते. ही माणसं कधीच कोणाला नकोशी होत नाहीत. प्रतिभावंत व्यक्तिंच्या समुदायातही अशा व्यक्ती विशेष उठून दिसतात. 

          कणकवली तालुक्यात आल्यानंतर समितीच्या सभांना उपस्थित राहिल्यानंतर निकिता ठाकूर आणि त्यांच्या महिला आघाडीचे शैक्षणिक , सामाजिक कार्य पाहून अनेकदा मी थक्क झालो आहे. जास्त न बोलता त्या त्यांच्या कामातूनच बोलत असतात. निकिता ठाकूर नावाच्या महिला अध्यक्षा म्हणूनच समितीच्या अस्मितेचा अंकूर ठरतात. 

          अगदी साध्या सरळ. त्यांचं वागणं , राहणं सर्वसामान्यांसारखं. त्यांच्याकडे बघून कुणालाही वाटणार नाही की या एका शिक्षक संघटनेच्या उच्च पदावर आहेत. त्या कणकवली तालुक्याच्या तालुकाध्यक्षा झाल्या आणि त्यांच्या कार्याला समितीने प्रत्यक्ष पाहिले. अर्थात तालुकाध्यक्षा असल्या तरी त्या एकट्या कार्य करीत नाहीत , सर्वांना घेऊन काम करणे त्यांना आवडते. त्या सतत हसतमुख असतात. त्यांचे दिलखुलास हसणे कदाचित त्यांच्या यशाचे रहस्य असू शकते. 

          तालुका महिला मेळाव्यात त्या भाषण करायला उभ्या राहिल्या होत्या. मी समोर व्हिडीओ शुटींग करत होतो. त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली होती. त्यांनी आपले अध्यक्षीय भाषण अक्षरशः गाजवले होते. त्यांच्या अनेक वाक्यांना टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता. त्या आल्या होत्या , त्या बोलू लागल्या होत्या आणि त्यांनी सर्वांना जिंकूनही घेतलं होतं. जेवणाची वेळ निघून गेली असली तरी त्यांचं भाषण सुरु असताना कोणतीही गडबड नव्हती. त्यांनी सर्व उपक्रम , संघटनात्मक कार्य यांवर मुद्देसूद बोलत यशस्वी बॅटिंग केली होती. या सर्व कार्याचं श्रेय त्यांनी आपल्या संपूर्ण टीमलाच दिलं होतं. नेहा निकिता असा उल्लेख करत त्यांनी आपलं भाषण एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं. 

          शिक्षिका म्हणून त्यांचं शाळेतील काम बघण्याची संधी मला मिळाली नाही. पण संघटनेत एवढे हिरीरीने काम करताना पाहून त्यांचे शाळेतील काम किती जबरदस्त असेल याची कल्पना येते. त्यांचा आवाज श्रवणीय आहे. त्यांनी गायलेली कविता मी नीट ऐकली आहे. महिला आघाडीचे शैक्षणिक उपक्रम राबवताना त्यांनी केलेली व्हिडीओ निर्मिती एखाद्या तंत्रस्नेही व्यक्तीलाही लाजवेल अशी आहे. दुसऱ्या व्यक्तीकडून एखादं काम कसे करुन घ्यावे हे त्यांच्याकडून शिकावे. व्हिडीओ निर्माण करताना त्यातील बारीकसारीक गोष्टींची त्यांना परिपूर्ण माहिती आहे. 

          निकिता ठाकूर यांनी आपल्या समितीच्या अस्मितेचा अंकुर प्रत्येक महिलांच्या मनात रुजविण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यांची शिक्षक समितीच्या जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड व्हावी ही आमच्या महिला आघाडीची नव्हे तर समस्त कणकवली शाखेसाठी अस्मितेची बाब आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा अधिकाधिक वृद्धिंगत करत शिक्षक समितीच्या महिला आघाडीचा बोलबाला महाराष्ट्रातच नव्हे देशात वाढवत न्यावा अशा त्यांना आभाळ भरुन शुभेच्छा. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



🛑 स्काऊटिंग : एक अनुभवसंपन्न आऊटिंग

 🛑 स्काऊटिंग : एक अनुभवसंपन्न आऊटिंग


          शिक्षकी पेशामध्ये अनेक प्रशिक्षणे पूर्ण करावी लागतात. प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज असते. शिक्षणातील नवनवीन प्रवाह आणि बदल समजून घेतल्याने नव्या दृष्टीकोनाने शिकवता येते. रोज काहीतरी नवीन शिकता आलं पाहिजे. रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते , " शिक्षक निरंतर अध्ययनशील असल्याशिवाय तो विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाही. " 

          मला स्काऊटचे प्रगत प्रशिक्षण घ्यायचे होते. मी स्वतःहून प्रशिक्षणाची मागणी केली होती. ऑर्डर आली होती. पुण्यातील भोर आणि कोल्हापूरातील सोनतळी अशी दोन प्रशिक्षण स्थळे होती. मी सोनतळी येथे जाणे पसंत केले होते. 

          ४ मे ते १० मे असे सात दिवसांचे निवासी शिबीर होते. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण असल्यामुळे मुलांचे नुकसान होणार नव्हते ही माझ्या दृष्टीने चांगलीच गोष्ट होती. 

          ४ मे हा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत वाईट दिवस होता. त्या दिवशी पंधरा वर्षापूर्वी माझी पत्नी मला कायमची सोडून गेली होती. गेल्या पंधरा वर्षात मला कायमच हा दिवस असह्य होणारा असतो , तसा तो मला आजही अस्वस्थ करत होता. तरीही मी माझ्या अस्वस्थतेकडे काहीसे दुर्लक्ष करीत होतो. 

          राधानगरीमार्गे गाडीत बसून निघालो होतो. सोबत एक मोठी आणि एक छोटी अशा दोन बॅगा होत्या. रंकाळा येथे उतरलो होतो. मस्त गरमागरम चहा घेतला होता. तिथूनच चक्क दोनशे रुपये देऊन रिक्षानेच सोनतळी येथे पोहोचलो होतो. 

          प्रशिक्षण स्थळ म्हणजे " राजर्षी छत्रपती शाहू महाराज " यांचे वास्तव्य असलेला बंगलाच होता. तेथील निसर्गरम्य वातावरण पाहून येणारे प्रत्येक नवखे चेहरे भारावून जाताना दिसत होते. 

          मी स्काऊट प्रगत प्रशिक्षण घ्यायला गेलो असलो तरी ते तिथे उपलब्ध नव्हते. त्यामुळे मला कबमास्टरचे प्रगत प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पर्याय सुचविण्यात आला होता. मी तो मान्य केला होता. नोंदणी करुन झाली होती. 

          मी पत्नीने दिलेला भोजन डबा उघडून खाऊन घेतला होता. भूक लागली होती. आता जरा बरे वाटत होते. हळूहळू सूचना मिळू लागल्या होत्या. प्रशिक्षण प्रमुख आणि संचालक यांनी सात दिवसांचे वेळापत्रक नीट समजावून सांगितले होते. 

          पहाटे ४ वाजता उठून दिवसाची सुरुवात होत होती. इतक्या लवकर उठल्यावर आंघोळीसाठी नंबर लागत असे. फ्रेश होईपर्यंत कर्णमधुर भक्तिसंगीत ऐकायला मिळे. ५.२५ वा. रामधून सुरु होई. टाळ्यांचा ठेका धरत मंत्रमुग्ध होत प्रत्येकाच्या मुखातून अभंगवाणी बाहेर पडे. वातावरण प्रसन्न होऊन जाई. 

          त्यानंतर आपल्या तंबूची सजावट करण्याचे टास्क दिलेले असे. ते करताना आपल्या संकल्पना प्रत्यक्षात उतरताना दिसत. टोटम पोल , षटकाचे नाव , प्रशिक्षणार्थी , किल्ला , सुका कचरा , ओला कचरा , शोषखड्डा , तंबूची स्वछता , परिपूर्ण गणवेश , तंबूसाठी प्रवेशद्वार , मोगलीची गोष्ट , चप्पल स्टँड , वस्तू ठेवण्यासाठी मांडणी , गाठींचे प्रकार , रांगोळी , पताका , ले आऊट , तंबूची ओढणी इत्यादी अनेक गोष्टींची मुद्देसूद व काटेकोर पाहणी केली जात होती. अर्थात त्यासाठी लवकर उठण्याशिवाय पर्यायच नसे. 

          बी पी सिक्स चे सहा व्यायाम प्रकार शिकवण्यात आले. प्राणायाम , अनुलोम विलोम आणि योगासने शिकविण्यात आली होती. प्रत्येक बाबींवर पुरेसा वेळ देऊन सराव घेण्यात आला होता. वैयक्तिक लक्ष देऊन सुधारणा करण्यात आली होती. 

          चहा , नाश्ता रांगेत घ्यावा लागत होता. स्वतःची भांडी स्वतः घासावी लागत होती. हे सगळे निसर्गाच्या सानिध्यात घडवले जात होते. प्रत्येक सेशन वेगवेगळ्या ठिकाणी घेतले जात होते. वहीवर लिहिण्यासाठी घटक देण्यात आले होते. कोणत्या पानावर काय लिहावे हेही सांगण्यात आले होते. 

          कब मास्टर यांचे वय ६ ते १० करण्यासाठी अभिनवपणे उपक्रम घेण्यात आला होता. आमच्याकडे त्यांनी कबचे वय फेकले होते आणि आम्ही ते सर्वांनी अलगद पकडले होते. सगळेच उपक्रम वक्तशीरपणे घेण्यात आले होते. कामात नेहमीच बदल करण्यात येत होता.

          रिकामपणाची कामगिरी करणे म्हणजे तसे अवघड काम होते. प्रशिक्षकांनी दिलेल्या गोष्टी प्रत्यक्ष वैयक्तिक करुन दाखवायच्या होत्या. त्या करताना ब्लॅंक व्हायला होत होते. त्यामुळे त्या पुन्हा पुन्हा करुन दाखवाव्या लागत होत्या. कितीही तयारी केली असली तरी ट्रेनरसमोर सर्वांचीच तंतरली होती. अगदी पहिल्या झटक्यात बरोबर असणारी मंडळी हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकी कमी होती. शेवटी एकदा टास्क पूर्ण झाल्यानंतर ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद मोजता न येण्यासारखा होता. 

          ध्वजारोहण करताना क्रम चुकत होता. पुन्हा पुन्हा करुन घेतले जात होते. आपणच आपल्या चुका ओळखायच्या होत्या. ध्वजनेता , कबमास्टर , कब सहाय्यक यांच्या भूमिका करायच्या होत्या. या सर्व भूमिका प्रशिक्षकांनी प्रत्येकाकडून अचूक येइपर्यंत करुन घेतल्या होत्या. 

          राज्य पुरस्कार , राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत मुलांना कसे घेऊन जाता येईल तेही सांगण्यात आले होते. आपली मुलेही तिथपर्यंत पोहोचल्याची स्वप्नं पडायला लागली होती. 

          कृतियुक्त गाणी नाचून म्हटली जात होती. आरोळ्या देण्यात येत होत्या. वेगवेगळ्या प्रकारच्या टाळ्या वाजवायला शिकवल्या जात होत्या. वेळ भराभर निघून जात होता. कधीच भोजनाची घंटा होत होती. रांगेत भोजन वाढले आणि घेतले जात होते. ड्युटीप्रमाणे प्रत्येकजण आपली कामगिरी पार पाडताना दिसत होते. कोणीही त्यात कसूर करण्याचा प्रश्नच नव्हता. सूचनाच देण्याची पद्धत अशी होती की कुणीही दिलेली कामे करायला टंगळमंगळ करु शकत नव्हते. ज्यांनी आपल्या घरी काहीही काम केलेले नसेल त्यांना काम करताना पाहून आनंद आणि आश्चर्य अशा दोन्ही गोष्टी होत होत्या. 

          प्रशिक्षक स्वतः राब राब राबत होते. प्रशिक्षणार्थींना प्रत्येक गोष्ट गांभिर्याने करण्यास सांगत होते. ताण तणाव येत असला तरी सगळे उपक्रम पार पाडावेच लागत होते. कोणालाही त्यात सूट दिली जात नव्हती. त्यामुळे कित्येकांचे वजन आणि पोट दोन्हीही कमी कमी होत गेलेले दिसत होते. 

          निसर्ग निवासाची सवय किती आरोग्यदायी असते हेच जणू या प्रशिक्षणाच्या निमित्ताने सिद्ध केले जात होते. तंबूत झोपताना डासांची गाणी ऐकत झोपावे लागत होते. 

          पहिल्या दिवशी तर माझी हालतच झाली होती. पहिल्यांदा तंबूत झोपण्याचा प्रयत्न केला होता. एक तास तरी झोपच येईना. मग स्काऊट बंगल्यात फॅनच्या खाली असलेल्या बाकड्यावर झोपलो होतो. पण झोप आलीच नव्हती. झोपेत बाकड्यावरून पडेन ही भीती झोपू देत नव्हती. मग पुन्हा तीही जागा सोडली होती. आकाशाचे पांघरुण घेऊन बाहेर अंगणात गाढ झोपून गेलो होतो. माझ्याबरोबर अनेक मित्र घोरत पडलेले होते. त्या सूरसंगीतात मलाही सामील होण्याची अनमोल संधी मिळाली होती. 

          मोगलीची गोष्ट प्रत्यक्ष अनुभवता येत होती. भालू , भगिरा , का , मोगली यांचा डान्स करताना कितीतरी मजा आली होती. स्पर्श , चव , स्मरणशक्ती , डोळे इत्यादींवर आधारित किम गेम्स खेळले गेले होते. विविध गेम्स खेळताना लहान मुलांसारखी गंमत वाटत होती. सगळेजण आपलं वय खरंच विसरुन गेलेले दिसत होते. 

          रात्रीच्या शेकोटी कार्यक्रमात सर्वांनीच अक्षरशः धमालच केली होती. जे कधीही नाचले नसतील त्यांचे नृत्य हसायला लावत होते. सर्वांनी दिलेल्या थीमनुसार कार्यक्रमांचे सादरीकरण केले होते. तयारीसाठी पुरेसा वेळ न मिळाला तरी कार्यक्रम झक्कास होत होता. 

          सन्मान सभेमध्ये अध्यक्ष , सचिव यांची निवड करुन दिवसभराच्या कार्यक्रमांचा आढावा घेण्यात येत होता. दुसऱ्या दिवसाचे नियोजन आधीच सांगण्यात येत होते. वहीचे लेखन करण्यासाठी जागरण केले जात होते. आपल्या तंबूचा नंबर यावा , लाल रंगाचा फ्लॅग मिळावा म्हणून चढाओढ लागत होती. 

          गाठींचे प्रकार शिकवले गेले होते. प्रत्यक्ष जीवनात त्यांचा कसा वापर केला जातो हेही सांगितले गेले होते. कित्येकांनी बांबूंचा वापर करुन अभिनव गॅझेट्स बनवली होती. 

          प्रशिक्षण संपण्याच्या आदल्या दिवशी सहल नेण्यात आली होती. ज्योतिबा , महालक्ष्मी आणि रंकाळा अशा ठिकाणी ऐतिहासिक अनुभव घेतले जात होते. प्रवास करताना गाणे म्हणण्याचा मोह कोणालाही आवरता येत नव्हता. राज्यभरातून आलेले शिक्षक , शिक्षिका एकाच कुटुंबाचा भाग बनून गेलेले होते. रंकाळा हिरवळीवर अभिनय गीते नाचताना सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. 

          शेवटच्या शेकोटी कार्यक्रमात प्रत्येक गटातील प्रशिक्षणार्थीनी आपली हृदय मनोगते व्यक्त करताना अक्षरशः रडायला लावले होते. 

          क्लोझिंग कार्यक्रमात सर्वांनी एकमेकांना सलाम केला होता. प्रत्येकाला समारंभपूर्वक प्रमाणपत्रे मिळाली होती. जाताना प्रत्येकजण प्रत्येकाला निरोप देण्याच्या घाईत होता. या प्रशिक्षणात प्रत्येकाला एकसष्ठ मित्र मिळाले होते. प्रत्येकाला  सात ते आठ गुरु मिळाले होते. त्यांचा सर्वांचा निरोप घेताना सर्वांचेच डोळे आतून किंवा बाहेरुन पाणावलेले दिसत होते. स्काऊटिंग नावाचे हे प्रशिक्षण खरंच एक अनुभवसंपन्न आऊटिंग असल्याचे सिद्ध होत होते.


©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 ) ( कणकवली )

( सिंधुदुर्ग )


🛑 सुट्ट्या लागल्या आता मज्जा

 🛑 सुट्ट्या लागल्या आता मज्जा


          सुट्टी हा शब्द सगळ्यांनाच आवडणारा असेल. नुसता शब्द नाही तर त्याची प्रतिक्षा करण्यातही एक आगळा आनंद असतो. तशी प्रत्येकाला आठवड्यातून एक दिवसाची सुट्टी मिळत असेलच. आता काहीजण 24 गुणिले 7 काम करत असतील तर त्यांनाही सुट्टी घेणाऱ्यांचा हेवा वाटत असेल. अर्थात तशी सगळयांनाच कधीना कधी सुट्टी मिळतच असते , फक्त ते सांगत नसतात. किंवा त्यांना आपल्याला सुट्टी आहे हे जाणवत नसेल. 

          आयुष्यात अशा अनेक सुट्ट्या येत असतात. त्या येतात आणि जातातही. पण प्रत्येक सुट्टी आपलं एक वेगळेपण घेऊन येत असते. माणसाला विश्रांतीची गरज असते. ती विश्रांती सुट्टीमुळे त्याला मिळत असते. सुट्टी म्हणजे आपले स्वतःचे दिवस असतात. त्यावर आपला आणि आपलाच अधिकार असतो. ती आपली स्वतःची असते , म्हणून ती आपली लाडकी असते. ती आपल्याला नेहमीच हवीहवीशी वाटणारी असते. ती पुन्हा पुन्हा येत राहावी अशीही असू शकते. सुट्टी आली की आपल्या मनाचे करता येते हा आनंद असतो. तो आनंद कोणी हिरावून घेऊ नये असे प्रत्येकाला वाटत असते. आज मस्त सुट्टी आहे असे म्हणत जर तुम्ही तुमचा सुट्टीचा दिवस ' एक उनाड दिवस ' म्हणून साजरा करणार असाल तर त्यात जर कुणामुळे विघ्न आलंच तर आपण त्याच्यावर मनातून चरफडल्याशिवाय राहत नाही. 

          एक मे हा दिवस मुलांच्या सुट्टीचा सुरुवातीचा दिवस असावा. आता खूप लवकर परीक्षा होतात , त्यामुळे एप्रिलपासूनच मुले शाळेत यायची बंद होतात. परीक्षा झाल्या की शाळेत कशाला जायचे ? हा प्रश्न पडल्यामुळे मुलांना शाळेत पाठवले जात नाही. उलट याही दिवसात शाळांमध्ये शैक्षणिक कामकाज सुरू असते. निकाल , स्वाध्याय पूर्तता , तोंडी काम , तोंडी परीक्षा , प्रकल्प , शाळा पूर्व तयारी अभ्यासक्रम , अप्रगत मुलांसाठी उपचारात्मक अभ्यासक्रम इत्यादी कामकाज सुरुच असते. ते सुरुच असते , पण ते फक्त शिक्षकांना आणि शिक्षणाशी संबंधित घटकांना माहिती असते. 

          वर्षभर अभ्यास करुन करुन दमायला झालेले असते. थोडी विश्रांती म्हणून शाळेतील वाचनालयाच्या पुस्तकांचा वाचून फडशा पाडायला काय हरकत आहे. अनेक पुस्तके वाचल्यामुळे मुलांच्या ज्ञानात आणखी भरच पडणार असते. शिक्षकांनीही आपल्या शाळेतील डेडस्टॉक मध्ये बंदिस्त करुन ठेवलेली पुस्तके मुलांना वाचायला द्यावीत. पुस्तके वाचून फाटून गेली तर ती सार्थकी लागतील नाही का ? हल्ली मुलांच्या घरी पुस्तके असण्याची शक्यताच कमी असते. शहरात काही वाचनवेडे सोडले तर वाचनासाठी पुस्तके घरी आणणारे विरळेच आढळतील. शहरात जर ही अवस्था असेल तर खेड्यात वाचन अपेक्षा ठेवणे दूरच राहिले. दिवाणखान्यात किमती वस्तू दिसतील , पुस्तके दिसणार नाहीत. पुस्तके दाखवण्यासाठी नकोच , ती वाचनासाठी हवी. 

          आमच्या बालपणी आम्ही वाचनालयात बालवाचक म्हणून खाते उघडले होते. त्यावेळी महिन्याला पाच रुपयापेक्षा कमी वर्गणी होती. किती पुस्तके वाचायचो आम्ही. शनिवार रविवार कधी येतो आणि वाचनालय कधी गाठतो असे होईन जाई. आता वाचनालयात जाणे संपले आहे. आता घराचेच पुस्तकघर बनवून टाकले आहे. ज्यावेळी वाटेल त्यावेळी एखादे पुस्तक उघडावे आणि वाचत सुटावे. वेळ कसा निघून जातो समजतही नाही. आताच्या मुलांना वाचनाचा छंद कमीच दिसून येतो. त्यांना तुमचा आवडता छंद कोणता असे विचाराल तर खूप कमी मुलांचे उत्तर वाचन असे असेल. 

          या सुट्टीचा वापर मुलांनी वाचनासाठी करायला हवा. बालसाहित्य बाजारात उपलब्ध आहे. गोष्टींची पुस्तके आहेत. बालकथा , इसापनीती , अकबर बिरबल , नितीकथा , लोककथा , एकांकिका , बालनाट्ये , नाट्यछटा , किशोर , कुमार , ठकठक , चांदोबा , अमृत , कॉमिक्स , विक्रम वेताळ , आजोबांच्या गोष्टी , आजीच्या गोष्टी , सिंदबादच्या सफरी , गुलबकावली , लोटपोट , सिंहासन बत्तीशी , गोट्या , श्यामची आई , सानेगुरुजींच्या गोष्टी अशी अनेक पुस्तके आताच्या मुलांना माहीत असतील की नाही यांवर संशोधन करावे लागेल. या सर्व गोष्टी त्यांना यु ट्यूबवर उपलब्ध असतीलही. पण वाचण्यात जी वेगळी मज्जा असते , ती पाहण्यात नक्कीच असेल असे मला वाटत नाही. ते एक मनोरंजन होईल , पण ज्ञानार्जन कदाचित होईल. म्हणून आताच्या मुलांनी भरपूर वाचले पाहिजे. पुस्तकांचा फडशा पाडला पाहिजे. सकाळी उठून स्टेटस लावण्यापेक्षा एखाद्या पुस्तकातील चार ओळी वाचल्यास त्याचा आयुष्यभरासाठी नक्कीच फायदा होईल. 

          सध्या वर्तमानपत्रात देखील लहान मुलांसाठी विशिष्ट पान असते. ते लहानांपासून मोठ्यांनीही वाचले पाहिजे. घरातल्या मोठ्यांनाही हल्ली वाचनाचा विसर पडत चाललेला दिसून येतो आहे. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत मोबाईलने आपले जीवन ग्रस्त करून सोडले आहे. मध्यरात्री उठून बसलो तरी पहिल्यांदा मोबाईलकडे हात जाऊ लागला आहे. घराघरात क्रिकेट मॅच , सासूसुनांच्या मालिका सुरु आहेत. मुले , पालक हेच बघत आहेत. यातून वेळच मिळत नसल्यामुळे त्यांना पुस्तक वाचायला सवडच मिळताना दिसत नाही. 

          पूर्वीची मुले एवढी अभ्यासवेडी किंवा वाचनवेडी होती की त्यांच्या हातात नेहमी एखादे पुस्तक दिसे. आता मोबाईल दिसतो. त्या दिवशी वाचनालयात गेलो होतो. तिथे तरुण मंडळी दिसलीच नाहीत. खूप जुनी जाणती माणसेच पुस्तके वाचन करताना दिसली. या जुन्या माणसांनी आपला वाचनाचा छंद जोपासला आहे. व्यासंग जपला आहे. पूर्वीपेक्षा अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी कमी झालेली आहे , त्यामुळे मिळणारे गुण शंभर टक्क्यांपेक्षा जास्त असले तरी त्यांना अजिबात किंमत नाही. पूर्वीच्या साठ टक्क्यांच्या खालीच आहेत असेही बोलले जात आहे. 

          आता सुट्ट्या पडल्याचं आहेत , तर त्या सुट्टीचा वापर वाचनासाठी करायला हवा. मुलांनी वाचनवेडे बनायला हवे. आम्ही त्यावेळी जेवतानाही समोर पुस्तक उघडून बसत असू. तेव्हा आमचे बाबा आम्हाला ओरडत. आता जेवताना समोर टीव्ही चालू असतो , शेजारी मोबाईलच्या नोटिफिकेशन्सची रिंग वाजत असते. इकडे जेवत असतो , तिकडे हे सुरुच असते. त्यामुळे कधीकधी तोंडात घालायचा घास नाकात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकावेळी एकच काम करा. वाचताना वाचा आणि चावताना चावा. कारण काय चावतोय ते जसे समजायला हवे , तसे काय वाचतोय तेही समजायलाच हवे नाही का ? 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

🛑 पाण्याचा थेंब

🛑 पाण्याचा थेंब

          एक पुरातन काळातील कावळ्याची कथा सर्वांनाच माहिती आहे. त्या गोष्टीला किती वर्षे झाली असतील माहिती नाही. पण अजूनही शाळांमध्ये या कावळ्याची गोष्ट तशीच सांगितली जाते. एक तहानलेला कावळा असतो. तो पाण्याचा शोध घेत असतो. त्याला खूप लांबवर पाण्याचा हंडा दिसतो. त्यातील पाणी खूपच तळाशी असतं. कावळा खूप हुशार असतो. त्याला एक युक्ती सुचते. तो इकडे तिकडे पाहतो. त्याला दगडाचे खडे दिसतात. तो आपल्या चोचीने ते दगडाचे खडे एक एक करुन हंड्यात टाकतो. हंड्यातील तळाला असलेले पाणी वर येते. तो पोट भरुन पाणी पितो आणि आनंदाने उडून जातो. 

          पाण्याचे काही थेंब मिळून पाण्याचा हा साठा तयार होतो. पाणवठा होण्यासाठी पाण्याचे थेंब एकत्र यावे लागतात. थेंबे थेंबे तळे साचे. तळे साचण्यासाठी थेंबांची जरुरी असते हे या म्हणीतूनही स्पष्ट होते. याचा अर्थ पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. कावळ्याला तहान लागली होती , त्यावेळी त्याला कधी एकदा पाणी पितो असे झाले होते. त्याने विज्ञानातील आर्किमिडीजचे तत्त्व न शिकताही ते वापरले होते. दगडाचे खडे टाकून टाकून त्याने पाणी वर आणले होते. गरज ही शोधाची जननी आहे हे त्या कावळ्यानेही सिद्ध केले होते. आपण तर माणूस आहोत. आपणही तहान लागली की विहीर खणायला लागतो तसे. 

          लहानपणी आकाशवाणी पुणे नेहमी ऐकायचो. तेव्हा त्यातील उद्घोषक नेहमी काहीतरी चांगले सुविचार सांगत. त्यातील पाण्यासंबंधात एक सुविचार माझ्या चांगलाच लक्षात राहिला आहे. " आभाळातून पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब जपायला हवा , उद्याच्या अंकुरणाऱ्या कोंबासाठी. " खरंच पाण्याचा प्रत्येक थेंब जपायलाच हवा. 

          सध्या आपल्याला सगळ्यांनाच खूप तहान लागत असेल. तहान लागली की आपण आपली पाण्याची बाटली शोधतो. पाणी पितो तेव्हाच शांत होतो. पाणी पिऊन पिऊन संपून जाते. पाणी हवे असते , पण ते मिळत नसते. आता पाण्याची किंमत समजू लागते. जवळपास पाण्याची बाटली किंवा पाणी मिळते का बघतो. पाणी मिळाल्याशिवाय तृष्णा शांत होत नाही. पाणी मिळाले की ते घटाघटा पिण्यात जो आनंद असतो तो कशातही नसेल. जेवढे पाहिजे तेवढे पाणी पिल्याशिवाय आपण पाणी पिणे थांबवत नाही. आपल्या शरीराला पाण्याची इतकी गरज असते , की पाणी हे आपल्या जीवनाचे जीवन झालेले आहे. म्हणूनच पाण्याला जीवन म्हणत असावेत. हेच पाणी पिण्यासाठी महत्त्वाचे असते , तसे इतर अनेक सुविधांसाठी उपयोगी असते. 

          त्यादिवशी काही मुले नदीत पोहोण्यासाठी गेली होती. उन्हाळ्यात सर्वांनाच पाण्यात डुंबायला जायला खूप आवडते. त्यांनाही तो मोह आवरला नाही. पाण्याच्या खोल डोहात उतरल्यामुळे त्यातील एका मुलाला बुडून प्राण गमवावे लागले. जे पाणी तहान भागवते , ते अतिरिक्त घेतल्याने मृत्यूही ओढवतो. पाण्याने त्या मुलाचा प्राण घेतला होता. त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं होतं. तो बराच वेळ पाण्यात बुडून राहिल्यामुळे त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले होते. पोहता येणारे सुद्धा बुडतात. त्यात आमच्यासारख्यांचे काय ? 

          उन्हाळा संपता संपता पाण्याची टंचाई जाणवू लागते. सगळ्या विहिरींमधील पाणी संपू लागते. तळ दिसू लागतो. एकाच विहिरीवर चार पाच पंप लावलेले असतात. विहिरीत पाणी आहे का नाही बघितलेही जात नाही. बटन चालू करतात. पाणी भरुन घेतात. विहिरीमधले पाणी संपले तरी पाहिले जात नाही. कोणीतरी पंपाचा आवाज येतो आहे म्हणून बघायला जातो. तेव्हा लक्षात येते की विहिरीत पाणी नसल्यामुळे ' घरघर ' आवाज येत आहे. टाकीतील पाणी संपून जाते. घरखर्चासाठी पाणी मिळत नाही तेव्हा पाण्याचा वापर जपून करण्याचे लक्षात येते. रात्रभर पंप बंद राहतो. सकाळपर्यंत झऱ्यातून पाणी येत राहते. पुन्हा पाण्याच्या थेंबा थेंबानी विहिरीचा तळ भरुन जातो. तो पाहून पुन्हा हायसे वाटते. पंप पुनश्च सुरु केले जातात. पुन्हा तसेच घडत राहते. 

          उन्हाळ्याची सुट्टी लागते. मुंबईची चाकरमानी मंडळी गावात गर्दी करतात. पाण्याचा बेसुमार वापर सुरु होतो. माठातले थंडगार पाणी पिताना पिणाऱ्याचा तृप्त चेहरा बघत राहावासा वाटतो. गावात नदी असतेच. त्यात एखादी कोंडही असतेच असते. मुले दरवर्षी पोहोण्याची मजा लुटत असतात. एखादा बुडून जाणार असतो हे कोणाच्या गावीही नसतं. पुन्हा तशी नको असलेली घटना घडते. सन्नाटा पसरतो. दोन तीन दिवसांत सन्नाटा संपतो. 

          पावसाचे ढग आकाशात जमू लागतात. अमृतासारखे पाण्याचे थेंब धरतीला येऊन मिळतात. धरतीवर जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन जाते. शाळा सुरु होते. मी सातवीच्या वर्गाला शिकवित असतो. अचानक एक कविता समोर येते. " थेंब आज हा पाण्याचा " ही कविता शिकवताना मी शब्द साहित्य आणि व्याकरण शिकवत राहतो. त्यातील समानार्थी शब्द , यमक असणारे शब्द , विरुद्धार्थी शब्द , शब्दार्थ आणि साहित्यिक मूल्य शिकवत राहतो. हे शिकवताना मुलं ते कदाचित लक्षात ठेवतात. पाणी वाचवण्याचे विसरुनच जातात. मुलांना प्रश्नांची उत्तरे देता येतात. व्यवहारात वापरता येत नाही. हे असं चित्र पाहिलं की तो कावळा बरा वाटतो. नळ चालू असताना वाया जाणारे पाणी पाहून काहीच न करणारी माणसे बघून डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...