Saturday, May 8, 2021

आईच सर्वश्रेष्ठ

 🟡 आईच सर्वश्रेष्ठ

          आई म्हणजे आपला आत्मा असतो असे म्हटले तरी बरोबर असेल. आई म्हणजे ईश्वर सुद्धा आहे. आई या शब्दाच्या दोन अक्षरामध्ये अनेक अर्थ लपलेले आहेत. ' आपला ईश्वर ' असेही मोठे रूप आपण बनवू शकतो. आई आपल्यासाठी काय करत नाही  सांगा. ती आपल्या मुलांसाठी सर्वकाही करते. आपण मात्र तिच्यासाठी काय करतो , किंवा तिच्यासाठी काय केले याचा विचार केला तर त्याचे नीट उत्तर आपल्याकडे नसेल. कारण तिने आपल्यासाठी जे केले असेल, त्याच्यापेक्षा नक्कीच आपण तिच्यासाठी कमीच केले असेल. आईने आपल्यासाठी केले म्हणून आपण त्याची परतफेड करावी या अपेक्षेने ती मुळीच करत नसते. ती सतत करत राहते. आपली सर्व मुले त्यांच्या आयुष्यात यशस्वी व्हावीत हा तिचा मनातील निर्मळ आणि शुद्ध हेतू असतो. आपल्याला मात्र तो दिसत नाही. ती असल्यावर तर अजिबातच दिसत नाही , ती गेली की तिची आठवण राहून राहून येते. 

          तिन्ही जगांचा स्वामी देखील आईविना भिकारी आहे. मग आपण तर एक सर्वसामान्य मानव प्राणी आहोत. आज जगात सगळे दिन साजरे केले जातात. ' माता दिन ' किंवा मदर्स डे साजरा करत असतात , फक्त त्याच दिवशी आईची ममता दाखवायची आणि बाकीच्या दिवशी आईला विसरून जायचे असे होता कामा नये. 

          माझी आई माझ्यासाठी मला आजन्म आठवत राहावी अशीच आहे. ती आमच्यातून जाऊन आता 12 वर्षे होऊन गेली. आमचे सुख हेच तिचे सुख. तिचे सुख हेच आमचे सुख असे कधी घडले नाही. तिने आमच्यासाठी अनेक खस्ता खाल्ल्या. ती दम्याने त्रस्त असे. तिला बाकी कोणतेही आजार नव्हते. ती नेहमी हसतमुख असे. आमच्या एकत्र कुटुंबासाठी तिने केलेला त्याग आज आम्हाला कळतो. तिची सहनशीलता अपार होती. तिने कोणाशीही कधी भांडण केले नाही. ती नाराज असली तरी कोणाला टाकून कधीच बोलली नाही. तिला ते कधीच जमलेही नसते. कारण दुसऱ्याला दुःख देणे तिच्या स्वभावातच नव्हते. तिचे दुःख आम्ही तिच्या डोळ्यात बघितले आहे. आम्ही लहान असल्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही. मोठे झाल्यानंतर शाळा , अभ्यास , करियर , नोकरी , मोठे कुटुंब आणि पत्नी , मुले यांच्यात अडकल्यानंतर तिच्याकडे म्हणावे तसे लक्ष द्यायचे राहूनच गेले. 

          तिला कणकवलीत स्वतःचे घर हवे होते. भाड्याच्या खोल्यांमध्ये राहून ती कंटाळली होती. माझे लग्न झाल्यानंतर लवकरच आम्ही नवीन रुम घेण्याच्या प्रयत्नात होतो. पण लग्न झाल्यानंतर मी आणि माझी पत्नी देवगड तालुक्यात नोकरी करत असल्याने सर्वांनाच मी तिकडेच घेऊन गेलो. लग्नानंतर अवघ्या सात वर्षांनी माझ्या पत्नीचे बाळंतपणात आकस्मिक निधन झाले. मला बसलेला धक्का मीच सहन करू शकत नव्हतो. त्यामुळे आमचे सगळे कुटुंबच कोसळले. आम्ही गावी राहायला गेलो. दुसरे लग्न करावे लागले. 4 वर्षाची मुलगी सांभाळण्याचे काम माझी आई करू लागली. आम्हाला सांभाळले पण आता नातीलाही सांभाळताना तिचे नाकीनऊ आले. आता आई दमली होती. सुनेच्या जाण्याने ती अर्धी संपली होती. फक्त शरीर उरले होते. नाईलाजाने ती घरात वावरत होती. मध्येच कुठेतरी शून्यात हरवताना दिसत होती. तिच्या हट्टासाठी मी दुसरे लग्न केले. त्यानंतर पुन्हा नवीन संघर्ष सुरू झाला. भावाचे लग्न केले. त्याला मुलगी झाली. ती अजूनही सर्वांचे करतच होती. सोबत दोन्ही सुना होत्याच. आई जुन्या पद्धतीची होती. सुना लेकीसारख्याच होत्या. सुना आईने सांगितल्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत होत्या. दोन्ही सुना तिच्या लेकीच झाल्या होत्या. मोठ्या सुनेचे जाणे तिच्या जिव्हारी लागले होते. ती खंगू लागली. तिने जेवणही सोडले. ती जास्त आजारी पडली. आमचे बाबाच तिची सगळी सेवा करत. तिला इतर कोणीही हात लावलेला चालत नसे. आम्ही काही करायला लागलो की ती बाबांना बोलवायला पाठवी. बाबांनी तिचे सर्व केले. आम्हाला तिने काहीही करायला दिले नाही. बाबांशी ती बोलत असे. बाबांजवळ आपले मन मोकळे करत असे. आपली व्यथा तिने आम्हाला कधीही सांगितली नाही. माझी पत्नी गेल्यानंतर फक्त दोन वर्षांच्या फरकाने आई आम्हाला सोडून गेली. 

          आमच्या गावच्या घरी आईचे निधन झाले. मला त्यावेळी न्यूमोनिया झाला होता. मी कणकवलीत उपचार घेत होतो. तसाच मी घरी गेलो. आईचा निच्छेष्ठ देह पाहून मोठ्याने रडू लागलो. मी आईविना भिकारी झालो होतो. ज्या आईने आम्हाला अंगाखांद्यावर खेळवले होते , ती गेली हे खरेच वाटत नव्हते. ती गेली आणि माझ्या शरीरातील वीजच निघून गेली होती. तिच्या कुटुंबासाठी ती झिजली होती. तिला स्वतःला काहीही मिळाले नव्हते. तिच्यासाठी मी कणकवलीत एक स्वतःचा रुम घेतला. त्यातही ती काही महिनेच राहिली. गेल्यावर्षी आम्ही गावाकडे नवीन घर बांधले. त्या घराला आम्ही ' आईचं स्वप्न ' असं नाव देण्याव्यतिरिक्त काहीही करू शकलेलो नाही. तिने आमच्यासाठी घेतलेले कष्ट आम्ही पाचही भावंडे कधीही विसरू शकणार नाही. खरंच आपली आई नाही तर आपण भिकारीच नाही का ? 

          तुमच्याकडे सगळं असलं आणि त्यात फक्त तुमची आई नसली तर ते सगळं निरर्थकच आहे. ' प्रेमाचा पान्हा ' मुखी पाजून जाणारी आमची आई आमच्या सर्वांसाठी कायमच सर्वश्रेष्ठ असणार आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...