Wednesday, May 5, 2021

सहांचा सहवास

 🟢 सहांचा सहवास

          आज चेकपोस्ट ड्युटीवरचा आमच्या पथकाचा शेवटचा दिवस ( पुढची ऑर्डर येईपर्यंत तरी ). गेले 12 दिवस ड्युटी करत असताना आमच्या पथकातील आम्ही सहा जण. मला दोन दिवसांनंतर पथक प्रमुख करण्यात आलं. माझ्यासोबत काम करणारे इतर पाचजण. माझे मित्र प्रशांत कुडतरकर , मंगेश खांबाळकर , अनिल खोत , सुनिल खांडेकर आणि आरोग्य विभागाच्या डॉक्टर अतिग्रे मॅडम या सर्वांनी केलेलं टीमवर्क महत्त्वाचे आहे. आम्ही शिक्षक वर्ग एकाच केंद्रातील असल्यामुळे आधीपासूनच ओळख होती. पण डॉ. अतिग्रे यांची नव्याने ओळख झालेली. शिक्षणक्षेत्रात काम करत असताना आम्ही शिक्षक बऱ्याचदा एकत्र येतो. पण आरोग्य कर्मचारी, डॉक्टर , पोलीस यांचा सहवास खूप कमी प्रमाणात लाभतो. 

          गेल्यावर्षी महिनाभर कोरोना योद्धा म्हणून काम केलेले होतं. तो ही अनुभव गाठीशी होताच. पण प्रत्येकवेळी टीम बदलते. अर्थात कामाची पद्धतही टीमनुसार कमी जास्त प्रमाणात बदलतेच. वरून ऑर्डर येतात त्याचीच अंमलबजावणी करायची असते. तरीही दिलेली ऑर्डर फॉलो करत कर्तव्यभावनेने काम करणारी माणसं भेटली की काम करायलासुद्धा जोश येतो. 

          शिक्षकांना अशा कामांची शासनाने सवयच लावलेली आहे. जे काम इतर कर्मचारी करू शकणार नाहीत , ते काम शिक्षक नक्कीच इमाने इतबारे पूर्ण करताना मी प्रत्यक्ष पाहिलेली आहेत. घरात महत्त्वाचा प्रॉब्लेम असतानाही ' ड्युटी फर्स्ट ' म्हणत कामावर हसतमुखाने हजर होणारी माणसे पाहिली की त्यांना सॅल्युट करावेसे वाटते. 

          माझ्या पथकात काम करणारे आम्ही सहाही जण 12 दिवसांसाठी एकूण 96 तासांसाठी एकत्र आलो. सर्वजण नियमांचे काळजीपूर्वक पालन करत आहेत. तशा तिन्ही टीमच्या ड्युट्या त्रासदायकच आहेत. प्रत्येकाला येताना किंवा जाताना काळोख मिळतो. सलग आठ तासांची ड्युटी असल्याने चहा, नाश्ता किंवा जेवण यांची गरज भासते. त्याप्रमाणे आम्ही प्रशासनाकडे मागणी केली आणि शासनाने ती ऐकली. आम्हाला गरमागरम चहा आणि नाश्ता मिळू लागला. कधी कधी आमच्या पथकातील सदस्य सर्वांसाठी आईस्क्रीम , कलिंगड , खरबूज आणि बिस्किटे आणत असत. दानशूर व्यक्तींनी आम्हाला रात्रीचे जेवणही देण्याचा प्रयत्न केला आहे. चिंचवली शाळेच्या मुख्याध्यापिका अकिवाटे मॅडम यांनी आम्हाला एकदा थंडगार मठ्ठाही आणून दिला. जनता ढाबा यांच्याकडून दररोज संध्याकाळी चहा , नाश्ता मिळू लागला. 

          खारेपाटण हा मुख्य चेकपोस्ट असल्यामुळे येथे खूपच अलर्ट राहावे लागते. पोलीस आपली कामे निरंतर करताना दिसतात. पोलीस येथे पोलीस कमी आणि पोलिसातील माणूस म्हणून जास्त वागताना दिसतात. शेवटी पोलीस हा एक माणूसच आहे. त्यालाही भावना असतात. त्यांना दिलेले काम ते करत असतात. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. काही खूप कडक वाटतात , पण त्यांच्या सहवासात गेल्यानंतर ते किती प्रेमळ आहेत याची प्रचिती मला प्रत्यक्ष आली आहे. बारा बारा तास ड्युटी करूनही ते आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य स्वस्थ ठेवत आहेत हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना कडक शिस्तीतच राहावे लागते , त्याला ते तरी बिचारे काय करणार !!!

          येणारे लोक विविध परिसरातून आलेले असतात. त्यांची भाषाही वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधावा लागतो. आमचे सर्व सदस्य त्यांच्याशी अदबीने बोलताना दिसत होते. प्रवाश्यांच्या भावना दुखवू नका , असे आमच्या आदेशातच नमूद केलेले असले तरी आमचे सदस्य त्यांच्याशी असे बोलत की जाताना त्यांनी आम्हाला थॅंक्यु म्हणावे. 

          काल एक कर्करोगाने पीडित पेशंट डेरवणपर्यंत गेला. त्यांच्या कुटुंबाने मोठी रिस्क घेऊन त्यांना डेरवणपर्यंत घेऊन गेले. पण त्या रुग्णाचा रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आल्याने उपचार न घेताच परत यावे लागले. कोणाचे नातेवाईक मृत्यू पावत आहेत , त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गडबडीने त्यांना जावे लागत आहे. जात असताना आमचा तपासणीचा ससेमिरा त्यांच्याही मागे आहेच. पण ही माणसे काही आमची शत्रू नाहीत , की आले की आम्ही त्यांच्यावर गृह विलगिकरणाचा शिक्का मारतोय. आम्हाला जे काम दिलेले आहे ते करणे आम्हाला भाग आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रवाश्यांच्या जर भावना दुखावल्या जात असतील तर आमचाही नाईलाज आहे. 

          काही माणसे उगीचच फिरत असतील तर त्यांना प्रतिबंध करण्यासाठीही अशी शिस्त गरजेची आहे. कोरोनाचे संक्रमण वाढत असल्यामुळे त्याला प्रतिबंध बसावा हाच हेतू शासनाचा आहे , पण लोकांना त्याचे गांभीर्य नसले तर असेच घडणार ना ? 

          चेकपोस्टवर दररोज सॅनिटायझेशन, मास्क , सफाई आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टीची विचारपूस करण्यात येत होती. पण काहीही झाले तरी येणाऱ्या माणसांपासून सुरक्षित अंतरावर राहून त्यांची माहिती घेणे तसे रिस्कीच काम आहे. जे काम करतात त्यांना काम करण्याचा अनुभव असतो. म्हणून ते कायमच सजगपणे पुढील ऑर्डर आली तरीही कामावर हजर होत राहतात. सर्वांना समान संधी मिळाली तर चांगलेच झाले असते. पण ज्यांना धोका पोहोचू शकतो , त्यांना अशा प्रकारे डेंजर झोन मध्ये काम करताना त्रास झाला तर ? हाही विचार करावा लागतो. आरोग्य खात्यातील महिला कर्मचारी ज्यावेळी रात्री उशिरापर्यंत ड्युटी करताना पाहून त्यांनाही सलाम करावासा वाटतो. 

          गेले 12 दिवस लाभलेला सहा जणांचा सहवास म्हणूनच अविस्मरणीय असाच आहे. कोणतेही शासकीय काम करत असताना अशी जागृत टीम मिळणं , त्यांची निवड होणं ही त्यांच्या पुढील अधिक चांगल्या कार्यासाठी असलेला आरंभच असतो. माझ्या पथकातील माझ्या सर्व सहा सदस्यांचे विशेष आभार. आमच्या सर्व पोलीस कर्मचारी , अधिकारी , आरोग्य कर्मचारी आणि प्रसंगानुसार मिळालेल्या सर्व ज्ञात अज्ञातांचे आभार. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , ( 9881471684 )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...