🟦 होणारा होतला
माणसाचं कधी काय घडेल समजणार नाही. आता चांगला असलेला माणूस थोड्या वेळानंतर चांगला असेल याची खात्री देत येत नाही. माणसाचं जीवन असं कसं बनलं आहे ? देव जाणे !!! देवाची आराधना केली तरीही देवाच्या मनात असेल तर तसेच घडेल , नाही का ? म्हणूनच की काय माणूस हे जग कायमचे सोडून गेला की ' तो देवाघरी गेला ' किंवा ' त्याला देवाज्ञा झाली ' असे म्हटले जाते. कोरोनामुळे तर मानवाचं जीवन अगदीच क्षणभंगुर झालेलं आहे. ' आज हाय , तर उद्या न्हाय ' असं झालंय. रोजच्या बातम्या वाचून , ऐकून आणि पाहून तर अगदी सुन्न व्हायला होतं.
' जे जे लिहिले भाळी , ते चुके न कदा काळी ' असे म्हटले जाते. आपल्या भाळावर लिहून ठेवलेले आहे , असे प्रत्येकाच्या भाळावर त्याचे आयुष्य लिहायला त्या विधात्याला ( निर्मात्याला ) किती त्रास झाला असेल माहीत नाही. आजचा दिवस निघून गेला की आपण " सुटलो बुवा एकदाचे " असा सुटकेचा श्वास टाकायचा. फक्त त्यावेळी आपला श्वास मात्र पुरेसा असायला तरी हवा.
आजचा दिवस म्हणजेच चार मे , हा दिवस माझ्यासाठी खूपच दुःखदायक असाच आहे. माझ्या पूर्वपत्नीचा आज स्मृतिदिन. गेलेल्या माणसाची जास्त आठवण काढत बसू नये , असे मला बहुतेकांनी सांगितल्याचे आठवते. त्यांचे फोटो बघत बसू नये , मोबाईलमध्ये त्यांचा फोटो बघत राहू नये , असे अनेकांनी मार्गदर्शन केलेलं माझ्या चांगलेच लक्षात आहे. पण मी त्याकडे लक्ष देत नाही. कारण मी माझे आयुष्य अधिक चांगले व्हावे यासाठी या गोष्टींचा उपयोग करत आहे. प्रत्येकाच्या जीवनात असे अनेक प्रसंग येतात. ते येऊ नयेत यासाठीही अनेकजण प्रयत्न करत असतात. पण जे घडू नये असे नेहमी वाटत राहते ना , तेच घडू लागते आणि आपला आत्मविश्वास डळमळीत होऊ लागतो. एकदा आपला आत्मविश्वास कमी व्हायला लागला, की अर्थातच आपला न्यूनगंड वाढू लागतो.
ती गेल्यानंतर मला समजले की , या जीवनात काहीच अर्थ नाही. सगळं निरर्थक आहे. क्षणभंगुर आहे. आपलाही कधीतरी शेवट ठरलेला आहे. तो दिवस फक्त आपल्याला माहीत नाही. तो दिवस माहीत नाही हे एक बरे आहे. तो दिवस माहीत असता तर .... त्या दिवसाच्या आधीच आपण संपून गेलो असतो.
एखादी प्रिय व्यक्ती आपल्यातून गेली की जे दुःख होतं , त्याची तीव्रता त्याच्यासोबत राहणाऱ्या व्यक्तींनाच जास्त प्रकर्षाने जाणवते. गेलेली व्यक्ती फक्त शरीराने जात असते. आठवणींच्या रूपाने ती सतत आपल्यासोबतच असते. त्या व्यक्तीबरोबर व्यतीत केलेले क्षण जसेच्या तसे आठवतात. त्यावेळी या आशयाच्या ओळीं मुखात येतात , ' भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले , एवढे मी भोगिले की मज हसावे लागले .... लोक भेटायास आले काढत्या पायासवे ..... अन अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले......
गेलेली माझी पत्नी आठवणींच्या रूपाने माझ्या सतत सोबत आहे अशा माझ्या भावना आहेत. व्यक्तिपरत्वे त्या बदलूही शकतील. पण तिचे माझ्या आयुष्यातील स्थान कधीही कमी होऊ शकत नाही. आज ती जाऊन 14 वर्षे झाली आहेत. तिचा मला सात वर्षांचा सहवास लाभला. दुसऱ्या पत्नीने मला दिलेली तेरा वर्षांची साथ अतिशय मोलाची अशी आहे. गेलेली ऐश्वर्या होती आणि आता आलेली ईश्वरी आहे. आज मी ऐश्वर्यासह ईश्वरी जीवन जगत आहे ही माझ्यासाठी आणि माझ्या समस्त कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
©️ *प्रवीण अशितोष कुबलसर , 9881471684*
No comments:
Post a Comment