Monday, May 10, 2021

माका खूप होया

 🟤 माका खूप होया

          आपण बोलताना कायम ' मी असं केलं , मी तसं केलं ' असंच बोलत असतो. यात आपण स्वतः प्रक्षेपित होण्याचाच जास्त प्रयत्न करत असतो. आपलं ते चांगलं आणि दुसऱ्याचं ते वाईट , अशी भावना देखील कायम आपल्या मनात येत असणार. ही गोष्ट आपल्या लहानपणापासूनच जन्माला येते. घरातल्या माणसांना बघूनच आपण लहानाचे मोठे होत असतो. आपण लहान असलो तरी आपल्या मोठ्यांची आपण एक छोटी प्रतिकृतीच असतो म्हणा ना !!! 

          मला सर्व गोष्टी अधिक मिळाव्यात ही लालसा प्रत्येकात जन्मताच असते कदाचित. मिळणाऱ्या गोष्टी चांगल्या असल्या तर त्या खूप मिळाव्यात , वाईट गोष्टी मात्र खूप नको हं !!!! नाहीतर त्याही जास्त मिळाव्यात असाही नकारात्मक अट्टाहास धरणारे लोकही आजच्या जमान्यात असू शकतात. आजच्या जगात काहीही घडू शकते , तसे काहीही बिघडूही शकते. ते सध्या कोरोनाच्या दररोजच्या बातम्यांनी आपण बघतोच आहे. 

          आपल्याला जीवन हवं असतं , पण मरण नको असतं. आज काहींना मरण हवं असलं तर ते मिळत नाही , ज्यांना ते नको असतं त्यांना मात्र ते अधिक मिळत असतं. का कोण जाणे , हा विरोधाभास काही आपल्या कधीच पचनी पडणारा नाही. असो. आपल्याला देवाने जे मस्त जीवन दिलंय , ते आपल्याला मजेत जगायचं आहे. ते आपण मजेत जगत नसलो तर ..... तर मात्र जरा थांबून विचार करायचा आहे. आणि सध्या आपल्याला थांबून विचार करण्यासाठी या कोरोनाने खूपच वेळ देऊन ठेवला आहे. 

          आपला हव्यास काही कमी होत नाही. मला हे हवे , ते ही हवेच. जे मिळाले नाही त्यासाठी कायमच आपण अतृप्त राहणार. जे मिळाले आहे त्याकडे कधी पाहणारच नाही. आपल्याला हा स्वार्थी भाव सोडून देता यायला हवा. आपला जीव सगळ्यातच गुंतून पडतो आहे. म्हणून देवाने दिलेल्या या देहाकडे लक्ष न देता भौतिक सुख मिळण्यासाठी नुसते धाव धाव धावतो आहोत. अजून थोडं मिळवूया , अजून थोडं ..... हे अजून थोडं कधी संपतच नाही. 

          माझी लहानपणीची गोष्ट सांगतो. मला माझ्या घरात आणल्या जाणाऱ्या सगळ्या खाऊच्या वस्तू अधिक लागत. बाबा बटर घेऊन येत. पूर्वी वर्किचे बटर प्रसिद्द होते. ते स्वस्त आणि मस्त असत. बाबा तेच आणत. आम्हा पाचही भावंडांना ते एका दिवसाला पुरण्याइतके असत. ते चहामध्ये बुडवून खाताना चविष्ट लागत. आणखी दुसऱ्या चांगल्या बटरांची चवच घेतली नव्हती , त्यामुळे जे मिळत ते चांगलेच लागत असे म्हणूया. पण आम्हा पाच भावंडांमध्ये मी ' माका खूप होया ' असे म्हणून अधिक बटरांची मागणी करत असे. त्यामुळे बाबा मला ' खूप बटर ' देत असत. मला ते खूप असलेले बटर खाताना मजा येई. मजा अशासाठी की माझ्या इतर भावंडांना माझ्यापेक्षा कमी बटर मिळाले याचा आनंद मला जास्त होई. 

          बाबांनी मला खुश करण्यासाठी एक योजना आखली होती. मला जास्त बटर वाटावेत , म्हणून ते एका बटराचे तीन ते चार तुकडे करून मला देत. एक पेक्षा जास्त संख्या असल्यामुळे मला ते बटर जास्त वाटत असत. मी खुश होऊन न भांडता बटर खात असे. त्यावेळी मला ते समजले नाही. थोडा मोठा झाल्यानंतर लक्षात आले. पण तेव्हा थोडे शहाणपण आले होते. जे मिळे त्याच्यात खुश होत होतो. माणसाच्या शरीरात वयानुसार जसे बदल घडतात , तसेच मनातही बदल घडतात. तसे चांगले बदल माझ्यात घडत गेले. मग मी माझ्याकडील अधिकच्या वस्तू माझ्या भावंडांना आणि मित्रांनाही देत असे. 

          आता मात्र ' माका खूप होया ' हे वाक्य मला परत बालपणाकडे घेऊन जाते. पूर्वीचा मी आणि आताचा मी .... यात बराच फरक पडला आहे. माझे बाबा अजूनही म्हणतात , ' माझो पूर्वीचो झिल गेलो खय ' . आता तो पूर्वीचा मी अजिबात राहिलो नाही हे मात्र त्यांचे वाक्य शंभर टक्के बरोबर आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...