Sunday, May 30, 2021
🔴 काबुलीवाले गांधी
Friday, May 28, 2021
मी वासुदेव झालो
🟣 मी वासुदेव झालो
पूर्वी सकाळी सकाळी दारोदारी एक पिंगळा येत असे. गळ्यात कवड्याच्या माळा , मोरपिसाची टोपी , बाराबंदी घातलेला , कपाळी टिळा , छोटी झांज वाजवत व हरिनामाचा गजर करत येणारा वासुदेव म्हणजेच पिंगळा आम्ही अनेकदा बघितला आहे. आता हल्ली हा वासुदेव दिसेनासा झाला आहे. या वासुदेवाची कोणतीही अपेक्षा असत नसे. तुम्ही जे द्याल ते घेऊन तो पुढच्या घरी जात असे. हसतमुखाने आशीर्वाद देऊन जाणाऱ्या वासुदेवाकडे पाहिले की दिवस कसा मस्त जात असे. त्यानंतर भविष्य सांगणारे येत. तेही घरातल्या सर्वांचे भविष्य सांगत. हे भविष्यवेत्ते भरपूर तांदूळ , गहू , रोख रक्कम यांची मागणी करत. आमच्याकडे एक तुणतुणेवाला येत असे. तो तुणतुण करत एखादा सुंदर अभंग गात असे. त्याचा स्वर चांगला लागे. ते ऐकण्यासाठी मी त्याच्या जवळ जात असे. पण त्याच्याकडे एक उग्र वास येत असे. मी बाबांना विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितले कि त्याने काल थोडी घेतली असणार त्याचा उग्र वास अजून त्याच्या अंगाला येतो आहे. मला त्यामुळे नंतर त्या तुणतुणेवाल्याचा राग येई. तो आला कि त्याचे गाणे न ऐकताच मी त्याला घरातून काहीतरी आणून देऊन हाकलवून लावी.
अक्षरसिंधु संस्थेत काम करत असताना मला अनेकदा ' वासुदेव ' सादर करण्याची संधी प्राप्त झाली होती. मीही त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न केला. माझा आवाज चांगला होता , त्यामुळेही ते मला शक्य झाले असावे. लहानपणी रविंद्र महाजनीचा ' देवता ' हा चित्रपट बघितला होता. त्यात त्याने वटवलेला वासुदेव किती छान होता !! वासुदेव आला हो , वासुदेव आला ..... सकाळच्या पारी हरिनाम बोला .... असे म्हणत आपल्या मैत्रिणीला तुरुंगातून सोडवायला आलेला दरोडेखोर लाखनसिंग त्यावेळी खूप प्रसिद्ध झाला होता. मी तो चित्रपट चार ते पाच वेळा तरी पाहिला असेन.
वासुदेव करायचा म्हणजे धोतर नेसावे लागे. सुधाकर प्रभूमिराशी किंवा सुप्रिया प्रभूमिराशी मला छान धोतर नेसवीत. त्यावर बाराबंदी घालावी लागे. कवड्याच्या माळा , मोरपिसाची टोपी . एका हातात चिपळी, दुसऱ्या हातात खंजिरी . नाम लावून हरिनामाचा नामजप करत मी रंगमंचावर नाचत येई. माझ्या येण्यापूर्वी रंगमंचावर ओव्या सुरू होत. बायका दळण दळत असत. दळताना त्यांच्या ओठातून सुस्वर गाणे बाहेर पडे.
' कोंबडा घाली साद ,
जग समदं गं झालं जागं '
याच्या पाच सहा ओळी झाल्या की मी गाणे म्हणत व नाचत नाचत रंगमंचावर दाखल होई. काही भगिनी रांगोळी काढत , काही मुसळाच्या साहाय्याने मसाला कुटण्याचा हावभाव करत. एक घरण म्हणजे घरातली सुहासिनी महिला तुळशीला पाणी घालायला येई. सकाळचा मंगल ध्वनी सुरू असतानाच माझा प्रवेश होई आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट होई.
तुळस वंदावी , तुळस वंदावी
अहो , माऊली दिनांची साऊली , तुळस वंदावी ।।
दारापुढती लावलं रोप , त्याला निर्माल्याचा खप
नित्य प्रभाती उठून , करा जलाचे सिंचन
येई आरोग्य त्यातून , जावे त्याच्यात डुंबून , तुळस वंदावी ।।
हे गाणं संपलं की ती घरंदाज संस्कारित भगिनी मला म्हणजे वासुदेवाला ' दानधर्म ' करीत असे. धर्म म्हणजे तिच्याकडे असलेले तांदूळ किंवा इतर धान्य मला मनोभावे दान देत असे. मी हे दान घेतले की पुढचे गाणे म्हणू लागे.
दान पावलं हो , धर्म पावला
गळ्यात घातल्या कवड्याच्या माळा
बाराबंदीच्या गाठी बांधल्या
नाजूक लाविले गंध कपाळा
शिरी शोभते मुकुट जैसी
मोरपंखांची मोहक टोपी
हरिनामाचा गजर ओठी , दान पावलं हो धर्म पावला .......
आकाशामध्ये सूर्यदेवाला
भूमीमधल्या नागदेवाला
पंढरीच्या पांडुरंगाला , दान पावलं हो धर्म पावला .......
असे म्हणत मी आनंदाने पुढच्या घरी जात असे. पुढच्या घरी जाताना पुढील गाणे म्हणत असे.
वासुदेव आला हो , वासुदेव आला
सकाळच्या पारी हरिनाम बोला
आज बऱ्याच वर्षांनंतर मला मी वासुदेव झालो होतो ती आठवण झाली. एकदा आपण एखाद्या भूमिकेत शिरलो की आपले राहत नाही हेच खरे. मी अगदी वासुदेवच होऊन जात असे. गोवा येथे साखळी येथे प्रयोग होता. त्यावेळी मी सुरुवातीला ' ज्ञानेश्वर ' झालो होतो. पसायदान म्हणणारे कुणी दुसरेच गायक होते. माझ्या समोर ज्ञानेश्वरी ठेवली होती. समईच्या अंधुक प्रकाशात मी ज्ञानेश्वर ' पसायदान ' म्हणायला लागलो. अर्थात मी फक्त ओठ हलवत होतो. पण माझे पसायदान पूर्ण पाठ असल्यामुळे ते मीच म्हणत आहे असे प्रेक्षकांना वाटून गेले होते. त्यानंतर माझे वासुदेवाचे सादरीकरण झाले. तेही इतके सुंदर झाले की कार्यक्रम झाल्यानंतर पडद्यामागे चार पाच अनोळखी लोकांनी येऊन सांगितले होते , " तुमचा ज्ञानेश्वर आणि वासुदेव दोन्ही आम्हाला खूप आवडले . " मला त्यावेळी जो आनंद झाला तो आगळा नि वेगळा असाच होता.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
©️ चित्र रेखांकन : तुलसी आर्ट : तुळशीदास अशितोष कुबलसर ( 9405218189 )
ठंडे ठंडे पानी से नहाना चाहीये
🔴 ठंडे ठंडे पानी से नहाना चाहीये
उन्हाळा सुरू झाला की थंड पाण्याने आंघोळ करावीशी वाटते. थंडीच्या दिवसांत मात्र थंड पाण्याची आंघोळ करणे जीवावर येते. आपलं शरीर गरम झालं कि ते थंड करण्यासाठी शरीराने नैसर्गिकपणे ' घाम ' आणण्याची केलेली प्रक्रिया अत्यावश्यकच आहे. हा घाम आला की फॅनच्या खाली बसलात की कोण आनंद होतो ? पण हा उकाडा कोणालाही सहन होत नाही. ती थंडी परवडली , पण उन्हाळ्याच्या झळा सोसत नाहीत.
पूर्वीचं सगळ्यांचं आवडतं हिंदी गाणं आंघोळ करताना अजूनही सर्वजण म्हणत असतील. ' ठंडे ठंडे पानी से नहाना चाहीये ' . हे गाणे नुसते म्हणून उपयोगाचे नाही. सोबत थंड पाण्याच्या धारा डोक्यावर पडत असतील तर तो अनुभव काय वर्णावा !! हल्ली शॉवरखाली आंघोळ केली जाते. बंद खोलीत शॉवरखाली आंघोळ , आणि ओठावर ते हिंदी गाणं , थोडावेळ डोळे बंद करून पावसात भिजण्याचा मस्त फील घ्यायचा. लहानपणी पावसात भिजताना घेतलेला आनंद , शेतात गुट्यावर बसून चिखलात बैलांच्या मागे पळण्याचा आनंद , टू व्हीलर गाडीवरून जात असताना अचानक पडलेल्या पावसाने भिजण्याचा आनंद , छत्री डोक्यावर धरलेली असताना वादळाने छत्री उडून गेल्यानंतर भिजायला झाल्याचा आनंद , रेनकोट घातल्यानंतरही त्यात पाणी येऊन अर्धे निम्मे भिजताना होणारा आनंद , बाहेर तुफान पाऊस पडत आहे आणि गारा पडू लागल्या आहेत , त्या गारा वेचत असताना भिजायला होत असल्याचा आनंद हे सगळे आनंद थंड पाण्यामुळे मिळणारे आहेत.
ज्यांना सतत गरम पाण्याची आंघोळ करण्याची सवय असेल , त्यांनीसुद्धा कधीकाळी हा सर्व प्रकारचा आनंद घेतलाच असेल. पण आता तो घेता येत नसला तरी आपण हा आनंद पूर्वी घेतलेला आहे , हा सुद्धा आनंदच नाही का ? मी कधी गावी गेलो की नदीत डुंबण्यात मिळणारा आनंद , प्लास्टिकच्या भरलेल्या बादलीत येत नाही. शेतात काम करताना इरले , प्लास्टिक पिशवीची खोळ , कांबळे ( आडनाव असणाऱ्यांनी राग मानू नये ) घालून पावसात भिजताना होणारा आनंद कुडकुडतानाही जाणवतो. विहिरीतील पाणी स्वतः ओढून काढून कळशी कळशीने आंघोळ करताना ती आंघोळ संपूच नये असे वाटत राहते. एक कळशी डोक्यावर रिकामी केली की दुसरी , तिसरी करत दहा पंधरा कळश्या डोक्यावर पालथ्या केल्या तरी समाधान होत नाही. खरंच अशा आंघोळीसारखा आनंद नाही.
आमच्या शेजारी एक कुटुंब राहत असे. त्यांचे घर रस्त्याच्या पलीकडे होते. आमच्या मालकांच्या विहिरीचे पाणी संपले की आम्हाला त्यांच्या विहिरीचे पाणी आणावे लागे. त्यांच्या कुटुंबात सगळी तरुण पुरुष मंडळी होती. या सर्व मुलांना विहिरीवर आंघोळ करण्याची रोजची सवय. आम्ही आमच्या खोलीबाहेर आलो , तरी सकाळ , दुपार , संध्याकाळ त्यांच्यापैकी कुणीतरी आंघोळ करताना नजरेस पडे. कळशी भरून पाणी काढायचे आणि धबाधब डोक्यावर ओतायचे. ते बघूनच माझ्या अंगावर शहारे यायचे. थंडीच्या दिवसातही ते थंड पाण्याची आंघोळ करत याची कमाल वाटे. मग गरगरीत साबण लावून तो जाईपर्यंत सात ते आठ कळश्यांचा त्यांच्या अंगावर महाअभिषेक होई. मी त्यानंतर थंड पाण्याची आंघोळ करण्याचा संकल्प करी , पण सकाळी गरम पाण्याची आंघोळ केल्यानंतर पुन्हा तोच संकल्प करत असे.
आता आंघोळीसाठी टब बाथ वगैरे पद्धती अस्तित्वात आल्या आहेत. माझी पाच वर्षांची लहान मुलगी मोठ्या प्लास्टिकच्या टबात आंघोळ करत असताना मला या ' ठंडे ठंडे पानी से नहाना चाहीये ' च्या आंघोळीविषयी सुचले. कारण तीसुद्धा आंघोळ करताना हेच गाणे मोठ्याने म्हणत या आंघोळीचा मनमुराद आनंद घेत होती.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
तुलसी आर्ट : तुळशीदास अशितोष कुबलसर ( 9405218189 )
Thursday, May 27, 2021
दारावरचा न्हेल्यानी
🐀 दारावरचा न्हेल्यानी
आपण राहण्यासाठी एखाद्या शहरामध्ये भाड्याची खोली घेतो. त्यात आपल्याला राहायचे असते. घरातल्या कुटुंबासोबत काही नको असलेले सदस्य आपल्याबरोबर राहायला आलेले असतात. ते पूर्वीपासूनच राहत असतात , फक्त आता आपली त्यांना सोबत झालेली असते इतकेच. मी उंदीर , झुरळे , मुंग्या , कोळी यांच्याबद्दल बोलतोय हे तुमच्या एव्हाना लक्षात आले असेलच. अर्थात स्वतःचे घर असले म्हणून हे अनवॉन्टेड सोबती यायचे राहात नाहीत , ते कुठूनतरी येतातच. चांगल्या फ्लॅटमध्येही बेसिनच्या खाली झुरळांची ये- जा सुरू असतेच. स्वयंपाकघरातील त्यांचा वावर आपल्याला शिसारी आणणारा असतो.
मुंग्यांनीही बेजार करून सोडलेले असते. जिथे तिथे आपल्या घरात कोळी आपले घर बांधताना दिसतात. हे सगळे कीटक परवडले , पण उंदीर नको. तसे सगळेच कीटक उपद्रवीच असतात. पण उंदीर, चिचुंद्री यांचा उपद्रव अधिक जाणवतो. सीतेला कुटीत एकटी सोडून जाताना लक्ष्मणाने जशी ' लक्ष्मणरेषा ' आखलेली असते , तशी ' लक्ष्मणरेषा ' बाजारातून विकत आणून आपण त्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करतो. मग हे अनवॉन्टेड रावण सैरावैरा पळतात आणि त्यांना मारण्यासाठी आपण त्यांच्या मागून सैरावैरा पळतो. त्यांना काठीने मारताना चुकून एखादा घाव आपल्याच माणसांवर किंवा एखाद्या चांगल्या वस्तूंवर करायलाही आपण कमी करत नाही. आपल्यात त्यावेळी कमालीची वीरश्री संचारलेली असते. काही तर उगीचच धावत असतात. शेवटी सगळे हे प्राणी आपल्या आपल्या निवाऱ्यात काही काळ लॉकडाउनप्रमाणे जाऊन राहतात आणि औषधाचा असर संपला की पुन्हा त्यांचे अनलॉक झालेले असते.
आमच्या घरी या उंदरांना पळवून लावण्यासाठी ' पिंजरा ' आणून ठेवलेला असे. उंदरांनी खूपच उच्छाद मांडला होता. त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे होते. लोखंडी पिंजऱ्यात जाण्यासाठी एक दरवाजा असे. त्यात प्रवेश केल्यानंतर पुन्हा बाहेर पडता येत नसे. रात्री आईने त्या पिंजऱ्याच्या दरवाजावर ' हिरवी कोथिंबीर ' लावून ठेवली होती. आम्ही सर्व भावंडांनी आपापली अंथरुणे घातली. नेहमीसारखे गाढ झोपी गेलो. बाबा पडल्यापडल्या घोरायला लागले. मीही त्यांच्या पोटात शिरून झोपलो. आई उशिरापर्यंत जागी असे. ती उद्याची तयारी करून ठेवत असे. तीही झोपली. आज तिला शांत झोप लागली असावी. सकाळी लवकर उठण्याची तिची सवय नव्हती. तिला माझे बाबा उठवत असत. बाबांची तयारी झाली की मग आई उठत असे. बाबांना गडबड असली तर कधीकधी ते आईला लवकर उठवून जेवणाची तयारी करायला सांगत.
पण का कोण जाणे , आज बाबांच्या अगोदर आई उठली होती. उठल्याउठल्या तिने काहीतरी पाहिले असावे. ते पाहताक्षणी ती मोठ्याने बोलली नव्हे ओरडलीच , " ओ , दारावरचा न्हेल्यानी " हे वाक्य ती मोठ्याने बोललीच. पण बाबांच्या कानाकडे जाऊन पुन्हा हळू आवाजात बोलली , " ओ , दारावरचा न्हेल्यानी " . बाबा तसेच घाबऱ्याघुबऱ्या उठले आणि बाहेरच्या दरवाजाकडे गेले. त्यांनी बाहेरच्या दरवाजाकडे ठेवलेल्या सर्व आपल्या वस्तू पडताळून पाहिल्या. सर्व वस्तू होत्या तश्याच होत्या. घरवालीने उगीचच काहीतरी सांगितले म्हणून तिला ते ओरडण्यासाठी वळले. आम्हीही आईच्या ओरडण्याने जागे झालो होतो. पण अंथरुणातून उठलो नव्हतो. पुन्हा आई ओरडली , " ओ , हकडे येवा , हेनी सगळा दारावरचा न्हेल्यानी " . तेव्हा बाबा स्वयंपाकघरात गेले तर तिथे पिंजऱ्यात एकही उंदीर नव्हता. पण पिंजऱ्याच्या दारावर ठेवलेली कोथिंबीर त्या उंदरांनी पळवली होती. एकही उंदीर त्या पिंजऱ्यात अडकला नव्हता. दारावर ठेवलेली कोथिंबीर पळवल्याबद्दल आई तसे म्हणत होती , " ओ , दारावरचा न्हेल्यानी ".
उंदीर एवढे हुशार झाले होते की त्यांना पिंजऱ्यात न सापडता खाऊ घेऊन जाता येत होता. त्यानंतर वेगवेगळे प्रकार करुन उंदरांना पकडण्याचे काम सुरूच राहिले. आजही ' दारावरचा न्हेल्यानी ' या वाक्याला आम्हाला पोट धरून हसू येते. तुम्हालाही हसू आले असेल तर तुम्हीही पोट धरुन हसू शकता. फक्त हसताना तुमचे पोट धरा म्हणजे झाले.
©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )
सामंतांचे वडे
🔵 सामंतांचे वडे
वडे कोणाला नको होतील का ? अर्थात मी बटाटेवडयांबद्दल बोलतोय हे तुम्हाला समजले असेलच. त्याबरोबर पावाची आठवण येऊ शकते. सोबत खोबऱ्याची हिरवी चटणी किंवा लाल मसाला चटणी असेल तर काय ? जिभेला पाणीच सुटेल. नुसत्या वासानेसुद्धा आपण वडापाव , भजी खाण्यासाठी थांबत असणार . पार्सल आणून घरी एकत्र बसून मस्त गरमागरम वड्यांवर ताव मारत असणार , नाही का ? एक वडापाव खाल्ल्यानंतर अजून एक खावासा वाटणे , आणखी एक करत चार ते पाच वडापाव खाणारेही महाभाग मी बघितले आहेत. आता लॉकडाऊन काळातही बाजार घ्यायला बाहेर पडलो तर , वडापावची टपरी उघडी असली तर एखादा तरी वडापाव खाण्याचा मोह कोणालाही आवरत नसेल ना ? खरं आहे ते.
एखादी गृहिणी यु ट्युब वर बघून चवदार बटाटेवडे बनवतही असेल , पण पार्सल आणून तो वडापाव खाण्यात जी मजा आहे ती येत नाही. मग दर संध्याकाळी वडापाव खाण्याची सवय होऊन जाते. घरी बाजार आणल्यानंतर त्यात ' वडापाव ' चे पार्सल शोधले जाते. वडे बनवणारी गृहिणीसुध्दा यातून सुटत नाही. तीसुद्धा बाजारात जाताना आपल्या धन्याला हळूच सांगते , " अहो , येताना गरमागरम वडापाव घेऊन या ना !! " हे हळूचचं सांगणं ऐकणार नाही तो धनी कसला ?
आमच्या दुकानापासून जवळ एक वडेवाले राहत असत. कणकवली बाजारपेठेत त्यांचे वडे प्रसिद्ध होते. आम्हाला त्यांच्या वड्याची चव लागली होती. ' वडे , वडे ' असे त्यांचे शब्द कानावर पडले की आमच्या जिभेला पाणी सुटे. मग बाबांना सांगून एखादा तरी वडा खायला मिळतच असे. त्या वडेवाल्यांचे पूर्ण नाव मला माहित नाही , त्यांचे आडनाव ' सामंत ' होते. त्यामुळे ते वडे ' सामंतांचे वडे ' या नावानेच अजूनही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वड्यांची चव विशिष्ट अशी होती. कित्येक ठिकाणचे वडे खाल्ले तरी ' सामंतांच्या वड्यांची तुलना होऊ शकत नाही. हल्ली आम्ही दरवेळी वडेवाले बदलत राहतो. पण प्रत्येकवेळी त्यांच्या वड्यांची चव बदलत असल्याचे लक्षात येते. पण सामंतांच्या वड्यांची चव कधीही बदलली नाही. ते आमच्या दुकानापासून लांब गेले की ते पुन्हा येईपर्यंत आम्हाला थारा नसे. कधी एकदा ' सामंतांचा वडा ' खातो असे होऊन जाई. ते पाच दहा मिनिटांनी येत आणि म्हणत , " काय ओ कुबलांनु , मघाशी एवढो मोठ्यान ओरडत गेलय ,तेवा लक्ष खय होतो तुमचो " त्यावर बाबा म्हणत , " अहो सामंत , मी माझ्या कामात होतय , ह्या पोरांनी सांगल्यानी म्हणून तुमका हाक मारुची लागली . तेंका तुमच्या वड्याशिवाय चैनच पडत नाय ". असे म्हणत असतानाच सामंत रद्दी पेपरात दोन तीन वडे बांधून देत. बाबा मग त्यांचे प्रत्येकी दोन ते तीन भाग करत. त्यातला छोटा भाग आम्हाला खायला मिळे. पण तेवढा छोटा वडासुद्धा अमृतासमान लागत असे. तशी अमृताची चव आम्ही कधीच चाखलेली नाही. पण तसे म्हणण्याची एक पद्धत आहे. आम्ही अमृत प्यायलो नाही , म्हणून त्या वड्याला ' अमृताची चव ' देऊन टाकली इतका तो सामंतांचा वडा चविष्ट होता.
एकदा हे सामंत दुकानाकडून वडे घेऊन चालले होते. त्यांचे वड्यांचे दुकान कधीच नव्हते. ते फिरून फिरून तासाभरात शंभर इतके वडे विकून येत असत. सगळे कणकवलीकर ' सामंतांच्या वड्यांचे ' शौकीन होते. मी सामंतांना हाक मारली , " ओ सामंतकाका , कसे आहात ? " ते फक्त हसले आणि पुढे निघून गेले. दररोज आम्ही वडे मागू शकत नव्हतो. बाबांनी बरेचदा आम्ही न सांगताही आम्हाला वडे घेऊन दिले होते. पण दुकानात काम नसताना उगीच खाऊसाठी खर्च करणे आम्हालाही पटत नव्हते. एखादी गोष्ट हवी वाटली तर ती लगेचच मिळायला हवी असे नाही. ती मिळण्यासाठी थोडा अवकाश जायला हवा. आम्हाला तो अवकाश मिळत असे. आज वडा मिळाला तर तीन चार दिवसांनी वडा खायला मिळणार हे नक्की. पण तसा संयम ठेवायला हवा. आम्ही तसा संयम ठेवत असू. बाबांना आमची आवड माहिती असली तरी त्यांनीही आम्हाला वाईट सवय लावली नाही. तसंही , वाट पाहण्यात किंवा एखादी गोष्ट मिळणार आहे याची प्रतिक्षा करण्यातही वेगळीच मौज असते. ती मौज आम्ही पाचही भावंडांनी अनुभवलेली आहे. आज वडा मिळणार नाही हे आम्हाला ठाऊक होते. त्यामुळे मी आपला माझ्या अभ्यासाचे पुस्तक वाचण्यात मग्न होतो.
तेवढ्यात माझ्या डोक्यावर कोणीतरी टपली मारली. मी पुस्तकातून डोके वर काढले. समोर वडेवाले सामंत उभे होते. त्यांनी माझी हाक ऐकली होती. तरीही ते पुढे गेले होते. एक वडा माझ्यासाठी शिल्लक ठेऊन त्यांनी बाकी सर्व वडे विकले होते. तो माझ्यासाठी शिल्लक ठेवलेला वडा त्यांनी माझ्या चिमुकल्या हातात दिला. बाबांनी माझ्याकडे बघितले. मला बाबांची भीती वाटली. पण बाबांनी माझ्याकडे रागाने बघितले नव्हते. त्यांनी पैशाच्या ड्रॉव्हरला हात घातला. बाबा त्यांना वड्याचे पैसे देऊ लागले. पण सामंतांनी ते पैसे घेतले नाहीत. ते म्हणाले , " कुबल , मी वड्यांचा धंदा करतो , पण मला या वड्याचे पैसे नकोत , जाताना तुमच्या मुलाने मला जी प्रेमाने हाक मारली , त्यामुळे मी मुद्दामच आज त्याला हा वडा मोफत देत आहे. " दुकानातली इतर गिऱ्हाईके त्यांच्यातल्या या वेगळ्या माणसाकडे पाहून गप्पच झाली. नेहमीप्रमाणे सामंतांचा तो ' प्रेमळ वडा ' आम्ही सगळ्यांनी वाटून खाल्ला हे वेगळे सांगायलाच नको.
आम्ही त्यानंतर अनेक दुकाने बदलली तरी खायचा वडा कधीही बदलला नाही. सामंतांनी अनेकदा आम्हा भावंडांना असे फुकट वडे दिले आहेत. त्यांचा एखादा वडा खाल्ल्यानंतर पोट भरून जात असे. माझी सर्व भावंडे अगदी माझ्यासह लहानपणी असं म्हणत असत , " मी सामंतांकडचे खोलीभर वडे खाईन ". या वड्याबरोबर पाव नसे , चटणी नसे , कांदा नसे , ओली चटणी नसे , पण त्या वड्यात त्यांचे प्रेम मात्र ओतप्रोत भरून राहिलेले असे .
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
Wednesday, May 12, 2021
वस्तऱ्याने मोठे केले
🪒 वस्तऱ्याने मोठे केले
गाव गाता गजाली ही मराठी मालिका प्रसिद्ध झाली होती. त्यात एक नाभिक व्यावसायिकाचे पात्र रंगविण्यात आले होते. त्यात असणारा नाभिक नेहमी एक वाक्य म्हणत असतो. ते वाक्य " वस्तरो मारीन " असे होते. त्या बिचाऱ्याने ते वाक्य फक्त म्हणण्याचे काम केले. कधी वस्तरा मारला मात्र नाही. त्या नाभिकाचा हुबेहूब अभिनय करणारा कलाकार म्हणजे आमचे ग्राहकमित्र अभय नेवगीसर. आमच्या केशकर्तनालयात येऊन बऱ्याचदा दाढी आणि केस कापून गेले आहेत. आम्हाला या गोष्टीचा अभिमानही आहे की " त्या " सिरियलमध्ये काम करणारा कलाकार आमच्या दुकानात येऊन आमची सेवा घेत आहे.
एकदा तर मला त्यांना फोन करण्याचा मोह झाला. मी फोन केला तर माझ्या मुलींनाही त्यांच्यासोबत बोलायचे होते. त्यांच्या प्रत्यक्ष संवादाने माझ्या मुली आनंदल्या. छोटी उर्मी तर अजूनही त्यांच्याशी बोलायला आतुर आहे. त्यांच्याशी बोलताना मी त्यांना सहजच विचारले , " नेवगीसाहेब , तुम्ही उत्तम प्रकारे नाभिक दुकानदाराची भूमिका वटवली आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा. पण तुम्ही ते ' वस्तरो मारीन ' हे वाक्य का म्हणता ? " त्यावर त्यांनी छान उत्तर दिले , " अहो , ते माझं सहजवाक्य आहे. ते माझ्या तोंडात पटकथाकाराने दिलं आहे. ह्या वाक्याने मी तुमचा ' वस्तरा ' साता समुद्रापार नेला आहे. मला तुमच्या या वस्तऱ्यामुळे अमाप प्रसिद्धी मिळते आहे. मी वस्तऱ्याला मोठे केले तर वस्तऱ्याने मला मोठे केले. " फोन ठेवल्यानंतर मी विचार करत बसलो. तर माझ्या लक्षात आले की या ' वस्तऱ्याने ' आमच्या सर्व नाभिक व्यावसायिकांना मोठे केले आहे.
आठवीत गेल्यापासून हा वस्तरा माझ्यासोबत आहे. त्यापूर्वीही होताच पण लक्षात येत नव्हता. कोणीही ' वस्तरा पाजळण्याचा ' अभिनय करून चिडवले तर वैतागथोर राग येई. त्यावेळी मनात येई , " वस्तरो मारीन " . पण मनात आलेले कधी बोललोही नाही. केलेही नाही. राग गिळून टाकीत सहन करीत राहिलो. आज काहीजण सहजच म्हणतात , " काय हजामती करायच्या आहेत काय ? " जे असे म्हणत असतील त्यांना हजामतीच्या कामाची माहिती नसावी . कारण त्यांनी ते काम करून बघितले असते तर तसे म्हटलेच नसते. कारण ' हजामती ' करणे तेवढी सोपी गोष्ट नाही. असे म्हणणाऱ्यांनी तसे करूनच पाहावे. त्यांनी आमच्यासारखी गुळगुळीत हजामत करून दाखवावी. आता कितीही सांगून जर म्हणणारे म्हणतच असतील तर आम्ही काय त्यांच्या तोंडाला धरू शकत नाही. पण दाढी आणि केस कापताना सर्व ग्राहक आपले पूर्ण डोके आमच्याच हातात देतात ना ? त्यावेळी तरी आम्हाला त्यांच्या तोंडाला धरावेच लागणार.
आमच्या दुकानाची जागा गेली होती. आम्ही नवीन जागेत एका घराच्या पडवीत तेली आळीत दुकान थाटले. सर्व ग्राहकांना समजेपर्यंत थोडे दिवस ग्राहकांची वाट पाहत बसावे लागले. मी , माझा भाऊ त्यावेळी मराठी शाळेत जात होतो. शाळेतून आलो की दुकानात यायचे आणि घरी जाताना बाबा देतील तो बाजार घेऊन जायचा असे आमचे नेहमी चाले. दुकानाची जागा बदलल्यामुळे गेले दोन तीन दिवस दुकानाकडे कधीतरी एखादा ग्राहक फिरकत असे. आम्ही वाट पाहून दमत असू. बाबांना तर आमची काळजी लागून राहिली होती. तेवढ्यात एक ग्राहक दुकानात शिरले. त्यांची दाढी आणि केस दोन्ही करायचे होते. बाबांनी लगेच उठून खुर्चीवर टॉवेल झटकून कामाला सुरुवात केली. माझा छोटा भाऊ दरपत्रक वाचत बसला होता. तो मला म्हणाला , " अरे , आता आम्हाला 5 रुपये मिळणार " खरंच केस आणि दाढी केल्यानंतर त्यावेळी पाच रुपयेच मिळणार होते. ते पाच रुपये मिळाल्यानंतर बाबा आम्हाला घरातील बाजार आणून देणार होते आणि आम्ही तो घरी नेऊन दिल्यानंतर आई जेवण बनवणार होती.
ते काही दिवस खूपच हलाखीचे गेले. पण या वस्तऱ्याने आम्हाला जगवले. 14 व्या वर्षी मी दुकानात कामाला सुरुवात केली. वस्तरा हातात घेऊन पैसे मिळवू लागलो. हा वस्तरा आम्हाला पैसे मिळवून देत होता. अजूनही आम्ही या वस्तऱ्याला मनोमन पूजतो आहोत आणि पूजत राहणार. कारण या वस्तऱ्यानेच आम्हाला मोठे केले.
©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )
Tuesday, May 11, 2021
एका टकलाची गोष्ट
🔴 एका टकलाची गोष्ट
डोक्यावर केस नसले की त्या व्यक्तीला ' टक्कल आहे ' असे म्हटले जाते. थोडे केस असले तरी टक्कल आणि अजिबात केस नसले तरी टक्कलच. त्या माणसाची मग ' टकलू ' या नावाने वेगळी ओळख होऊ लागते. हे टक्कल कधी आनुवंशिक असते , तर कधी ' केस सांभाळता आले नाही म्हणून असते. केस सांभाळता आले नाहीत म्हणजे ते गळताना थांबवता आले असते पण योग्य उपचार घेऊन थांबवले नाहीत. त्यामुळे ते केस काही गळायचे थांबले नाहीत. अर्थात थोड्याच दिवसात मस्त टक्कल दिसू लागले. चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो , तसे टक्कलही वाढत जाते. पौर्णिमेनंतर ते कलेकलेने कमी होत जात नाही हे विशेष.
व. पु. काळे म्हणतात , " टकलातही सौदर्य असते. टकलाला अजिबात मेंटेनन्स नाही. " त्यांनाही टक्कल होते म्हणून ते म्हणाले असतील का ? पु. ल. देशपांडेंनी त्यावर छान विनोद केला आहे. ते म्हणतात , " टक्कल असल्यामुळे चेहरा कुठपर्यंत धुवावा हे समजत नाही. " खरं आहे ते , मलाही तो अनुभव येतोय.
आमच्या घरात आजोबांना टक्कल होते, त्यानंतर बाबा , काका आणि आता मला. केस पुसण्यासाठी जास्त वेळ लागत नाही हाही एक फायदाच आहे. पूर्वी मी खिश्यात फणी बाळगत असे. आता फणीची गरज नाही. कारण फणीचे दात इतके टोचतात की नको वाटते. माझं टक्कल बघून कदाचित ते दात ओठ खात असावेत असा आपला माझा गोड गैरसमज.
टक्कल विविध प्रकारची पहावयास मिळतात. विमानतळ टक्कल , सागर किनारा टक्कल , मैदान टक्कल , खापा खापांचे टक्कल, बेटासारखे टक्कल , हिरवळीचे टक्कल , लॉन टक्कल , स्मश्रु टक्कल , गुळगुळीत टक्कल , गरगरीत टक्कल , आकर्षक टक्कल , टक्केवारीचे टक्कल आणि विशेष टक्कल असे अनेक प्रकार बनवता येतील. आता आपण विचाराल , तुमचे टक्कल वरील कोणत्या प्रकारात मोडते ? त्याचे उत्तर तुम्हीच सांगू शकाल. कारण माझे टक्कल मला दिसत नाही ते तुम्हाला दिसते ना ? असो.
एकदा एक छोटी मुलगी फोटोंचा जुना अल्बम बघत असते. त्यात तिला आपल्या मम्मीबरोबर एक केस असलेला माणूस दिसतो. ती मम्मीला विचारते , " हे तुझ्यासोबत कोण आहेत ? " मम्मी सांगते , " अग वेडे , हे तुझे पप्पा आहेत . " त्यावर ती मुलगी आईला विचारते , " मग मम्मा , हल्ली आमच्याकडे एक टकल्या राहतो तो कोण गं ? "
वरचा विनोद आहे , तो वाचताना हसायला येते. डोक्याला टक्कल पडले तरी आपली अक्कल कमी पडत नाही. ती आपल्याला जीवन जगताना कामी येते. म्हणून माणसाच्या दिसण्यावर जाऊ नका , असण्यावर लक्ष केंद्रित करा.
टक्कल पडलेले महाशय आपले टक्कल दिसू नये म्हणून कृत्रिम केशरोपण करून घेतात. काही केसांचे टोप वापरतात. जसा जिरेटोप असतो , तसा ते घालून मिरवतात. त्यांना वाटते मला केस नाहीत हे कुणाला समजणार नाही. पण त्यांना आनंद मिळतोय ना ? मग आपण उगीच त्यांच्या टकलावर ( आनंदावर ) विरजण का घालायचं ?
कित्येक महापुरुष होऊन गेले ज्यांना टक्कल होतं. त्यांचे कोठेही अडलेले मला माहीत नाही. उलट ते त्यांचं सौदर्यच म्हणावं लागेल. केशकर्तनालयात टक्कल असलेल्या माणसांचे केस कापण्याचे तितकेच पैसे घेतले जातात. एकदा एका माणसाने सहज हीच शंका विचारली. केशकर्तनकाराने उत्तर दिले , " आम्ही केस कापण्याचे पैसे घेत नाही तर केस शोधून कापण्याचे पैसे घेतो. " आता बोला ?
मी डीएडला असेपर्यंत माझ्या डोक्यावर दाट केस होते. मी बारीकही होतो. कंठही बाहेर आलेला दिसत असे. नोकरीला लागल्यानंतर केसांची गळती सुरू झाली. कौटुंबिक अडचणींचा सामना करत असताना केसांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचे राहूनच गेले. माझे मित्र माझ्या डोक्याकडे पाहून एखादी कॉमेंट देत असत. मी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत आलो. काहींनी माझ्या टकलावर एखादी टपली मारण्याचा आनंदही घेतला असेल. मी त्यांना कधीही काहीही बोललेलो नाही. बोललो असेन तर त्यांनी जरूर सांगावे.
टकलावरून अनेक विनोद प्रसिद्ध आहेत. तीन टकले होते वगैरे वगैरे ...... टकले आडनाव असलेल्या माणसांना टक्कल अजिबात नसल्याचे मी बघितले आहे. ऋषिकेश नावाच्या मुलाचे केस ऋषीसारखेही बघितले नाहीत. नावात काय आहे म्हणा. दिलेले नाव आपल्याला सार्थ करता आले पाहिजे म्हणजे झालं !!!
माझ्या टकलाची मला कोणतीही अडचण झाली नाही. उलट ते हेल्मेटमध्ये व्यवस्थित मावते. फक्त कुठे डोके आपटलेच तर मस्त गोल गरगरीत टेंगुळ येतं. हा एकच तोटा असावा , बाकी सगळे फायदेच फायदे !!! याचा अर्थ हे फायदे तोटे माझ्यासाठी आहेत हं !!! नाहीतर फायदे आहेत म्हणून तुम्ही केसाळ असाल तर टक्कल करून घेण्याच्या अजिबात फंदात पडू नका.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
लोण्यासारखे लोणे
🔵 लोण्यासारखे लोणे
माझ्या वडिलांचे शिक्षण किर्लोस आंबवणे शाळेत झाले. त्यावेळी सातवी फायनल पर्यंतचे शिक्षण अतिशय महत्वाचे मानले जाई. ते सातवीपर्यंत शिकले. इंग्रजी नसूनही ते इंग्रजी वाचतात. आज माझे वडील 75 वर्षांचे आहेत. चष्मा न लावता बारीक मजकूर वाचू शकतात. त्यांच्या दोन्ही डोळ्यांत लेन्स बसविल्या आहेत. लेन्स बसविल्यानंतरही चष्मा लागतो. पण बाबांना चष्म्याशिवाय स्पष्ट दिसते ही त्या डोळ्यांच्या डॉक्टरांसाठीही गर्वाची बाब ठरली असे ते डॉक्टरच सांगतात. बाबा आता अँड्रॉइड मोबाईलवर Whats App , फेसबुक वापरतात.
त्यावेळी बाबांना शिकवायला लोणे नावाचे गुरुजी होते. लोणेगुरुजी अतिशय प्रेमळ असले तरी शिस्तबद्ध होते. गावातील सर्व विद्यार्थी , पालक यांचे ते आवडते शिक्षक होते. शिस्तीसाठी ते मारत , पण चांगल्या वर्तनासाठी ते मुलांना शाबासकीही देत असत. त्यांची स्वतःची मुलेही त्याच शाळेत प्राथमिक शिक्षण घेत होती. ही माझी मुले आणि ती पालकांची मुले असा त्यांनी कधी भेद केला नाही. स्वतःच्या मुलांनाही त्यांनी कडक शिस्तीतच वाढवले. आता त्यांची मुलेही म्हातारी झाली आहेत. त्यांनी वयाच्या 98 व्या वर्षी आपला देह ठेवला.
आपल्या गुरुजींच्या दुःखद निधनाची बातमी समजल्यानंतर माझे बाबा अस्वस्थ झाले. आपल्या शिक्षकांसाठी अस्वस्थ होणारे असे विद्यार्थी आजच्या जगात नक्कीच सापडतील का ? शोधावे लागतील. नक्कीच सापडू शकतात. मग काय ? बाबांना घेऊन जावे लागले मालवणला त्यांच्या घरी. आम्ही सगळेच गेलो. लोणेगुरुजींना आम्ही सगळे यापूर्वी प्रत्यक्ष भेटलो होतो. त्यांना ऐकू येणे कमी झाले होते. पण त्यांचे प्रेमळ बोलणे सर्वांनाच आवडले. आज आम्ही त्यांच्या घरी गेलो तरी ते भेटणार नव्हते.
लोणेगुरुजींचे सर्व मुलगे , सुना , नातू , नातसुना यांना बघून आम्ही भारावून गेलो. ते सर्वजण आम्हाला बघून भारावून गेलेले दिसत होते. त्यांचा एक मुलगा तर अक्षरशः रडू लागला. बाबांनी त्याला शांत केले. गुरुजींच्या या मुलाला पॅरॅलिसिस झाल्यामुळे खुर्चीवर नीट बसताही येत नव्हते.
गुरुजींचे घर तारकर्ली बीच पासून जवळ होते. आम्ही गाडी बाहेर पार्क केली होती. लोणेगुरुजींचा नातू आम्हाला सोडायला गाडीपर्यंत आला. कितीतरी वर्षानंतर विसरले न गेलेले हे प्राथमिक शिक्षक बाबांनी शोधून काढले होते. लोणेगुरुजींचा फोटो बाबांच्या पैशाच्या पाकिटात आणि कायमचा हृदयात पाहायला मिळतो. लोणेगुरुजींनी बाबांना शिकवले , बाबांनी आम्हाला शिकवले आणि आम्ही आता शिक्षक होऊन शिक्षणाचे हे लोण सगळीकडे लोण्यासारखे होऊन पसरवत आहोत ही आमच्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
Monday, May 10, 2021
मला मेमो मिळतो
🟧 मला मेमो मिळतो
शासकीय किंवा खाजगी कर्मचाऱ्यांना आपल्या वरील अधिकाऱ्यांकडून चुका केल्याबद्दल ' कारणे दाखवा ' नोटीस मिळते. त्यासाठी ' ज्ञापन ' किंवा ' मेमो ' हा शब्द सगळीकडे परिचित आहे. काम करत असताना चुका होतात. अर्थात काम करणाऱ्यांच्या चुका होतात. कामे न करणाऱ्यांची एकच मोठी चूक असते ( खिळा म्हणूया का ? ) ती म्हणजे ते कधीतरी काम करतात. अशा लोकांना शंका खूप येतात. त्या शंका असल्यामुळे ते कामे करत नसतील. त्यांचा त्यात दोष नसतो , काम करताना चुका झाल्या तर त्यावर बोलणी खाण्यापेक्षा कामे न केलेली बरी असा त्यांचा समज झालेला असतो. कामे करणाऱ्यांना जसे प्रोत्साहन मिळत असतं , तसाच कामे न करणाऱ्यांना मेमो मिळत असतो. मेमो ही काही अभिमानास्पद गोष्ट नसते. मेमो म्हणजे आपला अपमानच असतो. मेमोची सवय असणाऱ्यांना त्याचे काहीही वाटत नाही. अशी माणसं मेमो आला की त्याचे काय उत्तर द्यायचे ते ठरवूनच असतात बहुतेक. पण काम करूनही जर मेमो मिळाला तर ? ..... तर मात्र खूप वाईट वाटतं. मेमो देणारे अधिकारी आपले मेमो देऊन मोकळे होतात. ते त्या व्यक्तीचा भावनिकदृष्ट्या विचार करतात की नाही माहीत नाही. त्यासाठी अधिकारी व्हावे लागेल. शेवटी मेमो अशासाठी दिला जातो की समोरच्या कर्मचाऱ्यांचे वर्तन सुधारावे , त्यात अपेक्षित बदल घडावा. त्यापेक्षा तोंडी समजावून सांगून काही फरक पडत नसेल तर कल्पना देऊन जर मेमो दिला तर ........ शेवटी हा तर आहे. हा तर काही केल्या संपत नाही. तो येतच राहतो.
मी त्यावेळी गढीताम्हाणे दादरा या धनगरवाडीच्या शाळेत एकटाच होतो. दुसरा शिक्षक नसल्यामुळे असे घडले असावे. मला किरकोळ रजा हवी असल्यास मोठ्या शाळेकडे शिक्षक मागावा लागे. त्यांनी शिक्षक दिला तरच मला रजेवर जाता येई. एक रजा मंजूर करण्यासाठी 5 ते 6 किलोमीटर चालून एक नंबर शाळेत जावे लागे. त्यावेळी मोबाईल नव्हते. मुख्याध्यापक कक्षात फोन नव्हते. वरच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांकडे अर्ज दिला तर तो पोहोचू शकत असे.
मला बरे वाटत नव्हते. ताप , सर्दी , खोकला आणि जुलाब असा त्रास सुरू झाला होता. लगेच रजा अर्ज भरला आणि मोठया शाळेत पोहोचवण्याची व्यवस्था केली. त्यांनी शाळेत एक दिवस कामगिरी शिक्षक देण्याचे कबूल केले. मी निर्धास्त होऊन माझ्या घरी कणकवलीत पोहोचलो. डॉक्टर उपचार सुरू केले. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो. मुले येण्याअगोदर मी शाळेत आलो होतो. हळूहळू मुले आली. तिसरीतल्या संतोषने माझ्याकडे एक चिठ्ठी आणून दिली. काल केंद्रप्रमुख आले होते. त्यांनी ' मेमो ' लिहून मुलांच्या हातात दिला होता. मुलांनी तो माझ्याकडे दिला होता.
म्हणजे काल शाळा बंद नसताना मला मेमो कसा काय ? मी घाबरत घाबरतच चिठ्ठी उघडली. शाळा वेळेत उघडली नाही , याचा उल्लेख करत त्याचे ' खाली सही करणार ' यांच्याकडे लेखी उत्तर द्यायला सांगितले होते. मला समजेना. मी मुलांना विचारले. तेव्हा मुलांकडूनच समजले. मुले नेहमीप्रमाणे शाळेत आली होती. पण मोठ्या शाळेतील शिक्षक एक तास उशिराने शाळेत आले होते. चार पाच किलोमीटर चालून यायचे म्हणजे तेवढा उशीर होणार हे गृहीतच होते. पण त्यांच्यापुर्वीच आमचे केंद्रप्रमुख शाळेत आले होते. त्यांनी मुलांकडे चौकशी केली. मी मुलांकडे माझ्या रजेबद्दल बोललो नव्हतो. त्यांनी ' कुबलगुरुजी ' येणार आहेत असे सांगितले. मी अजून आलो नाही म्हणून केंद्रप्रमुखसाहेबांनी बंद शाळेच्या व्हरांड्यातच ' मेमो ' लिहिला असेल आणि मुलांच्या हातात दिला असेल याची मला खात्री झाली. केंद्रप्रमुख गेल्यानंतर मोठ्या शाळेतील काळे चौधरीगुरुजी आले होते. मोठ्या शाळेत दोन चौधरी गुरुजी होते. एक गोरे होते आणि दुसरे काळे होते. त्यामुळे मुलांनीच त्यांना काळे चौधरी आणि पांढरे चौधरी अशी नावे दिलेली होती. तिकडच्या परिसरात ' गोरे ' हा शब्द न वापरता ' पांढरे ' हा शब्द जास्त प्रचलित असावा. त्या दोन्ही चौधरींनीही या नवीन नावांचा स्वीकार केलेला होता. शेवटी मुलांनी ठेवलेल्या नावांचा अस्वीकार कोण करील ?
मी मला मिळालेला मेमो कोणालाही न दाखवता त्याचे ' खाली सही करणार ' यांच्यासाठी खुलासा पत्र लिहिले. पुढील सहविचार सभेच्या वेळी त्यांच्याकडे प्रत्यक्ष सुपूर्द केले. त्यांनी ते माझ्याकडे न बघताच घेतले आणि आपल्या पाकिटात ठेवले.
आज मी त्या केंद्रप्रमुखांना वर्षातून एकदा किंवा दोनदा तरी फोन करतो. ते माझ्याशी अगदी प्रेमाने बोलतात. त्यांच्या हा विषय लक्षातही नसेल. त्यांनी मला साडे सहा वर्षात केलेले शैक्षणिक व प्रशासकीय मार्गदर्शन अनमोल असेच होते. हा मला मिळालेला मेमो हा त्यांच्यापुरता मर्यादित होता. त्यांनी तो पुढे पाठवला नाही. पण त्यांच्या मेमोने मला त्रास झाला , पण नवीन शिकायलाही मिळाले. त्यांनी त्यांचे काम केले , मी माझे काम करतच राहणार आहे. दुर्गम भागात नोकरी करताना असे अनेक त्रासदायक अनुभव आलेले आहेत. अनेकदा न्यूनगंड निर्माण झाला आहे, नोकरी सोडून द्यावीशी वाटली आहे , स्वतःवरच चिडत राहिलो आहे. एकटाच रडत राहिलो आहे. पण या सर्वांवर विजय मिळवण्याचा आणि अधिक कणखरपणे समस्यांवर मात करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करत गेलो आहे.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
माका खूप होया
🟤 माका खूप होया
आपण बोलताना कायम ' मी असं केलं , मी तसं केलं ' असंच बोलत असतो. यात आपण स्वतः प्रक्षेपित होण्याचाच जास्त प्रयत्न करत असतो. आपलं ते चांगलं आणि दुसऱ्याचं ते वाईट , अशी भावना देखील कायम आपल्या मनात येत असणार. ही गोष्ट आपल्या लहानपणापासूनच जन्माला येते. घरातल्या माणसांना बघूनच आपण लहानाचे मोठे होत असतो. आपण लहान असलो तरी आपल्या मोठ्यांची आपण एक छोटी प्रतिकृतीच असतो म्हणा ना !!!
मला सर्व गोष्टी अधिक मिळाव्यात ही लालसा प्रत्येकात जन्मताच असते कदाचित. मिळणाऱ्या गोष्टी चांगल्या असल्या तर त्या खूप मिळाव्यात , वाईट गोष्टी मात्र खूप नको हं !!!! नाहीतर त्याही जास्त मिळाव्यात असाही नकारात्मक अट्टाहास धरणारे लोकही आजच्या जमान्यात असू शकतात. आजच्या जगात काहीही घडू शकते , तसे काहीही बिघडूही शकते. ते सध्या कोरोनाच्या दररोजच्या बातम्यांनी आपण बघतोच आहे.
आपल्याला जीवन हवं असतं , पण मरण नको असतं. आज काहींना मरण हवं असलं तर ते मिळत नाही , ज्यांना ते नको असतं त्यांना मात्र ते अधिक मिळत असतं. का कोण जाणे , हा विरोधाभास काही आपल्या कधीच पचनी पडणारा नाही. असो. आपल्याला देवाने जे मस्त जीवन दिलंय , ते आपल्याला मजेत जगायचं आहे. ते आपण मजेत जगत नसलो तर ..... तर मात्र जरा थांबून विचार करायचा आहे. आणि सध्या आपल्याला थांबून विचार करण्यासाठी या कोरोनाने खूपच वेळ देऊन ठेवला आहे.
आपला हव्यास काही कमी होत नाही. मला हे हवे , ते ही हवेच. जे मिळाले नाही त्यासाठी कायमच आपण अतृप्त राहणार. जे मिळाले आहे त्याकडे कधी पाहणारच नाही. आपल्याला हा स्वार्थी भाव सोडून देता यायला हवा. आपला जीव सगळ्यातच गुंतून पडतो आहे. म्हणून देवाने दिलेल्या या देहाकडे लक्ष न देता भौतिक सुख मिळण्यासाठी नुसते धाव धाव धावतो आहोत. अजून थोडं मिळवूया , अजून थोडं ..... हे अजून थोडं कधी संपतच नाही.
माझी लहानपणीची गोष्ट सांगतो. मला माझ्या घरात आणल्या जाणाऱ्या सगळ्या खाऊच्या वस्तू अधिक लागत. बाबा बटर घेऊन येत. पूर्वी वर्किचे बटर प्रसिद्द होते. ते स्वस्त आणि मस्त असत. बाबा तेच आणत. आम्हा पाचही भावंडांना ते एका दिवसाला पुरण्याइतके असत. ते चहामध्ये बुडवून खाताना चविष्ट लागत. आणखी दुसऱ्या चांगल्या बटरांची चवच घेतली नव्हती , त्यामुळे जे मिळत ते चांगलेच लागत असे म्हणूया. पण आम्हा पाच भावंडांमध्ये मी ' माका खूप होया ' असे म्हणून अधिक बटरांची मागणी करत असे. त्यामुळे बाबा मला ' खूप बटर ' देत असत. मला ते खूप असलेले बटर खाताना मजा येई. मजा अशासाठी की माझ्या इतर भावंडांना माझ्यापेक्षा कमी बटर मिळाले याचा आनंद मला जास्त होई.
बाबांनी मला खुश करण्यासाठी एक योजना आखली होती. मला जास्त बटर वाटावेत , म्हणून ते एका बटराचे तीन ते चार तुकडे करून मला देत. एक पेक्षा जास्त संख्या असल्यामुळे मला ते बटर जास्त वाटत असत. मी खुश होऊन न भांडता बटर खात असे. त्यावेळी मला ते समजले नाही. थोडा मोठा झाल्यानंतर लक्षात आले. पण तेव्हा थोडे शहाणपण आले होते. जे मिळे त्याच्यात खुश होत होतो. माणसाच्या शरीरात वयानुसार जसे बदल घडतात , तसेच मनातही बदल घडतात. तसे चांगले बदल माझ्यात घडत गेले. मग मी माझ्याकडील अधिकच्या वस्तू माझ्या भावंडांना आणि मित्रांनाही देत असे.
आता मात्र ' माका खूप होया ' हे वाक्य मला परत बालपणाकडे घेऊन जाते. पूर्वीचा मी आणि आताचा मी .... यात बराच फरक पडला आहे. माझे बाबा अजूनही म्हणतात , ' माझो पूर्वीचो झिल गेलो खय ' . आता तो पूर्वीचा मी अजिबात राहिलो नाही हे मात्र त्यांचे वाक्य शंभर टक्के बरोबर आहे.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
पिठी , भात आणि बांगडो
🐟 पिठी , भात आणि बांगडो
सिंधु उत्सव 1999 मला चांगला आठवतोय. त्या वर्षी अक्षरसिंधु कणकवली यांच्या वतीने एक ध्वनिफीत तयार करण्यात येत होती. त्यात सिंधुदुर्ग विषयक अनेक गाण्यांचा समावेश करण्यात आला होता. मी साधारण गात असे. तसा अजूनही गातो. पण त्यावेळेच्या आणि आताच्या आवाजात नक्कीच फरक पडला आहे. आता गाण्यांचा रियाज होणे थांबले आहे. माझे मित्र विजय चव्हाण म्हणजेच आताचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी मला सिंधु उत्सव 99 च्या कॅसेट मध्ये एक गाणे गाण्याची संधी दिली. मी त्यावेळी गढिताम्हाणे दादरा या एकशिक्षकी शाळेत कार्यरत होतो. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस रेकॉर्डिंग करायचे होते.
मला त्यातली सगळीच गाणी म्हणता येत होती. गाण्यांच्या चालीसुद्धा चांगल्या बांधल्या गेल्या होत्या. मला कोणतेही गाणे दिले तरी मी म्हणू शकणार होतो. तेवढा त्यावेळी आत्मविश्वास होता. हा आत्मविश्वास माझ्यात अक्षरसिंधु आणि कलासानिध्य या दोन्ही सांस्कृतिक संस्थांनी निर्माण केला होता. साहित्याची आवड वाढण्यासाठी मला या दोन्ही संस्थांची अधिकाधिक मदतच झाली आहे.
मला जे गाणे म्हणायचे होते , ते गाणे नक्की कोणते ते समजले. माझ्यासोबत पल्लवी पवार ही गायिका गाणार होती. तिचा आवाज अभिनयासाठी चांगला होता. पण ती माझ्यासोबत गाणार असल्याने मला आनंदच होता. यापूर्वी मी स्वाती जाधव म्हणजेच आताच्या स्वराशा कासले यांच्यासोबत काही गाणी म्हटली होती. स्वातीची बहीण भारती हिच्यासोबतही मला गाणी म्हणायला मिळाली होती. मी शास्त्रशुद्ध शिकलो नव्हतो. पण गाण्यातले मला कळत होते.
वरवडे शाळेत रेकॉर्डिंग सुरू झाले होते. आम्हाला दोन वर्ग देण्यात आले होते. एक रेकॉर्डिंगसाठी आणि एक सरावासाठी. मी आणि पल्लवी दोघांनीही भरपूर सराव केला होता. तिचा आणि माझा आवाज मॅच व्हायला वेळ लागला. फायनल रेकॉर्डिंग जवळ आले. आमच्या दोघांचे बरेच टेक रिटेक झाले. शेवटी एकदाचे गाणे अंतिम टप्प्यात आले आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. एक गाणे गाण्यासाठी आम्हाला सात ते आठ तास लागले होते. रात्री खूप उशिरापर्यंत गाणे पूर्णत्वास पोचले होते. गाण्याचे बोल असे होते.
कोकणला लाभलाय सागर किनारा
चल चल पारू जाऊ दर्याला
नको नको धन्या मी जातंय देवीला
म्हावऱ्यासाठी गाऱ्हाणं घालीन देवीला
ए , पारू गो पारू , काय करतस
बांगडो मी भाजतंय झकास मिठास
अगो , पिठी , भात बांगडो वाढतस काय
खाऊन बघशाल तर हाय रे हाय
अहो , मंडळी चला कोकणाला
पिठी भात बांगडो खायाला
असे हे गाणे म्हणून झाल्यानंतर मी ज्यावेळी माझा आवाज कॅसेटवर ऐकला तेव्हा मला माझेच कौतुक वाटले होते. साऊंड सिस्टीममुळे गाणे इतके अफलातून वाटत होते की एखाद्या कसलेल्या गायकांनी ते गाणे म्हटले असावे. पल्लवीचा आवाजही छान लागला होता. गाण्याचा परफॉर्मन्स देणे आणि गाणे रेकॉर्डिंग करणे यात असलेला फरक मला समजला. त्यावेळी माझ्या एक लक्षात आले की आज आपण जी सुरेल आवाजातील गाणी ऐकतो त्यामागे त्या गीतकारांचे , संगीतकारांचे आणि गायकांचे किती श्रम असतील ? खरंच या सर्व कलाकारांना माझे विनम्र अभिवादनच असेल.
पिठी , भात आणि बांगडो आमच्या कोकणातील प्रसिद्ध मेनू आहे. आम्ही आमच्या आईकडून हा मेनू अनेकदा करून घेतला आहे. गावाकडच्या घरीही तो एक दिवसाआड असायचा. कुळथाची पिठी आणि भाजलेला बांगडा भाताबरोबर खाताना एक घास अधिकचा पोटात जाई. पिठी शिजत असताना त्याचा सुगंध जवळच्या घरापर्यंत जात असे. चुलीवरच्या निखाऱ्यांवर बांगडा भाजताना येणारा दुर्गंध सुगंधच वाटत असे. मस्त उकडा भात , त्यावर गरमागरम कुळथाची पिठी आणि नुकताच चुलीवर भाजलेला बांगडा खातानाचे दिवस आठवले की आताही जिभेला पाणी सुटते. आता बाजारातील बासमती तांदळाचा भात मिळतो. बाजारातली पिठी मिळते. गॅसवर भाजलेला बांगडा मिळतो. पण त्यावेळची ती चव येत नाही.
©️ प्रवीण अशितोष कुबल , ( 9881471684 )
Saturday, May 8, 2021
आईच सर्वश्रेष्ठ
🟡 आईच सर्वश्रेष्ठ
आई म्हणजे आपला आत्मा असतो असे म्हटले तरी बरोबर असेल. आई म्हणजे ईश्वर सुद्धा आहे. आई या शब्दाच्या दोन अक्षरामध्ये अनेक अर्थ लपलेले आहेत. ' आपला ईश्वर ' असेही मोठे रूप आपण बनवू शकतो. आई आपल्यासाठी काय करत नाही सांगा. ती आपल्या मुलांसाठी सर्वकाही करते. आपण मात्र तिच्यासाठी काय करतो , किंवा तिच्यासाठी काय केले याचा विचार केला तर त्याचे नीट उत्तर आपल्याकडे नसेल. कारण तिने आपल्यासाठी जे केले असेल, त्याच्यापेक्षा नक्कीच आपण तिच्यासाठी कमीच केले असेल. आईने आपल्यासाठी केले म्हणून आपण त्याची परतफेड करावी या अपेक्षेने ती मुळीच करत नसते. ती सतत करत राहते. आपली सर्व मुले त्यांच्या आयुष्यात यशस्वी व्हावीत हा तिचा मनातील निर्मळ आणि शुद्ध हेतू असतो. आपल्याला मात्र तो दिसत नाही. ती असल्यावर तर अजिबातच दिसत नाही , ती गेली की तिची आठवण राहून राहून येते.
तिन्ही जगांचा स्वामी देखील आईविना भिकारी आहे. मग आपण तर एक सर्वसामान्य मानव प्राणी आहोत. आज जगात सगळे दिन साजरे केले जातात. ' माता दिन ' किंवा मदर्स डे साजरा करत असतात , फक्त त्याच दिवशी आईची ममता दाखवायची आणि बाकीच्या दिवशी आईला विसरून जायचे असे होता कामा नये.
माझी आई माझ्यासाठी मला आजन्म आठवत राहावी अशीच आहे. ती आमच्यातून जाऊन आता 12 वर्षे होऊन गेली. आमचे सुख हेच तिचे सुख. तिचे सुख हेच आमचे सुख असे कधी घडले नाही. तिने आमच्यासाठी अनेक खस्ता खाल्ल्या. ती दम्याने त्रस्त असे. तिला बाकी कोणतेही आजार नव्हते. ती नेहमी हसतमुख असे. आमच्या एकत्र कुटुंबासाठी तिने केलेला त्याग आज आम्हाला कळतो. तिची सहनशीलता अपार होती. तिने कोणाशीही कधी भांडण केले नाही. ती नाराज असली तरी कोणाला टाकून कधीच बोलली नाही. तिला ते कधीच जमलेही नसते. कारण दुसऱ्याला दुःख देणे तिच्या स्वभावातच नव्हते. तिचे दुःख आम्ही तिच्या डोळ्यात बघितले आहे. आम्ही लहान असल्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही. मोठे झाल्यानंतर शाळा , अभ्यास , करियर , नोकरी , मोठे कुटुंब आणि पत्नी , मुले यांच्यात अडकल्यानंतर तिच्याकडे म्हणावे तसे लक्ष द्यायचे राहूनच गेले.
तिला कणकवलीत स्वतःचे घर हवे होते. भाड्याच्या खोल्यांमध्ये राहून ती कंटाळली होती. माझे लग्न झाल्यानंतर लवकरच आम्ही नवीन रुम घेण्याच्या प्रयत्नात होतो. पण लग्न झाल्यानंतर मी आणि माझी पत्नी देवगड तालुक्यात नोकरी करत असल्याने सर्वांनाच मी तिकडेच घेऊन गेलो. लग्नानंतर अवघ्या सात वर्षांनी माझ्या पत्नीचे बाळंतपणात आकस्मिक निधन झाले. मला बसलेला धक्का मीच सहन करू शकत नव्हतो. त्यामुळे आमचे सगळे कुटुंबच कोसळले. आम्ही गावी राहायला गेलो. दुसरे लग्न करावे लागले. 4 वर्षाची मुलगी सांभाळण्याचे काम माझी आई करू लागली. आम्हाला सांभाळले पण आता नातीलाही सांभाळताना तिचे नाकीनऊ आले. आता आई दमली होती. सुनेच्या जाण्याने ती अर्धी संपली होती. फक्त शरीर उरले होते. नाईलाजाने ती घरात वावरत होती. मध्येच कुठेतरी शून्यात हरवताना दिसत होती. तिच्या हट्टासाठी मी दुसरे लग्न केले. त्यानंतर पुन्हा नवीन संघर्ष सुरू झाला. भावाचे लग्न केले. त्याला मुलगी झाली. ती अजूनही सर्वांचे करतच होती. सोबत दोन्ही सुना होत्याच. आई जुन्या पद्धतीची होती. सुना लेकीसारख्याच होत्या. सुना आईने सांगितल्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत होत्या. दोन्ही सुना तिच्या लेकीच झाल्या होत्या. मोठ्या सुनेचे जाणे तिच्या जिव्हारी लागले होते. ती खंगू लागली. तिने जेवणही सोडले. ती जास्त आजारी पडली. आमचे बाबाच तिची सगळी सेवा करत. तिला इतर कोणीही हात लावलेला चालत नसे. आम्ही काही करायला लागलो की ती बाबांना बोलवायला पाठवी. बाबांनी तिचे सर्व केले. आम्हाला तिने काहीही करायला दिले नाही. बाबांशी ती बोलत असे. बाबांजवळ आपले मन मोकळे करत असे. आपली व्यथा तिने आम्हाला कधीही सांगितली नाही. माझी पत्नी गेल्यानंतर फक्त दोन वर्षांच्या फरकाने आई आम्हाला सोडून गेली.
आमच्या गावच्या घरी आईचे निधन झाले. मला त्यावेळी न्यूमोनिया झाला होता. मी कणकवलीत उपचार घेत होतो. तसाच मी घरी गेलो. आईचा निच्छेष्ठ देह पाहून मोठ्याने रडू लागलो. मी आईविना भिकारी झालो होतो. ज्या आईने आम्हाला अंगाखांद्यावर खेळवले होते , ती गेली हे खरेच वाटत नव्हते. ती गेली आणि माझ्या शरीरातील वीजच निघून गेली होती. तिच्या कुटुंबासाठी ती झिजली होती. तिला स्वतःला काहीही मिळाले नव्हते. तिच्यासाठी मी कणकवलीत एक स्वतःचा रुम घेतला. त्यातही ती काही महिनेच राहिली. गेल्यावर्षी आम्ही गावाकडे नवीन घर बांधले. त्या घराला आम्ही ' आईचं स्वप्न ' असं नाव देण्याव्यतिरिक्त काहीही करू शकलेलो नाही. तिने आमच्यासाठी घेतलेले कष्ट आम्ही पाचही भावंडे कधीही विसरू शकणार नाही. खरंच आपली आई नाही तर आपण भिकारीच नाही का ?
तुमच्याकडे सगळं असलं आणि त्यात फक्त तुमची आई नसली तर ते सगळं निरर्थकच आहे. ' प्रेमाचा पान्हा ' मुखी पाजून जाणारी आमची आई आमच्या सर्वांसाठी कायमच सर्वश्रेष्ठ असणार आहे.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
Wednesday, May 5, 2021
टेस्ट ऑफ कोविड
🟡 टेस्ट ऑफ कोविड
शाळा सुरू होणार होत्या. त्यामुळे आम्हां सर्व शिक्षकांच्या कोविड टेस्ट होणार होत्या. सर्वांची आर. टी. पी. सी. आर. करणे शासनाने बंधनकारक केले होते. तशा ऑर्डर्स आल्या. माझा दिवस जवळ आला होता. आणि तो दिवस उजाडला. मी मनातून घाबरून गेलो होतो. मला वाटतं माझ्यासारखे सगळेजण घाबरले असतील बहुतेक. पण सगळ्यांनी मला घाबरायला होतं , म्हणून घाबरण्याची अजिबात गरज नाही. मी अशासाठी घाबरत होतो , की जर मी पॉझिटिव्ह आलो तर ? या तरचा मी जरा जास्तच विचार करत होतो. पण मनाचे बळ वाढवले आणि तपासणीसाठी ' कणकवली शासकीय विश्रामगृहात ' वेळेपेक्षा थोडा उशिराच हजर झालो. माझ्याआधी 35 शिक्षक हजर झाले होते. एवढे सगळे शिक्षक बघितल्यानंतर मी थोडा सावरलो. ज्यांचे नंबर जवळ येत होते , त्यांची तपासणी मी अधिक निरीक्षणपूर्वक बघू लागलो. हेतू हा , की बघू ते कशी प्रतिक्रिया देतात ते !!!
नंबर आला की प्रत्येक शिक्षक बाहेर ठेवलेल्या खुर्चीवर बसत असत. बसलेल्या शिक्षकाच्या नाकात एक लांबलचक बारीक टोकदार हिरासारखी काडी घालत असत. मला नाकात जरा धूळ गेली तरी शिंक यायची सवय. आता कसे होणार ? माझा नंबर येईपर्यंत प्रत्येकजण आपली मान त्रासदायक हलवताना दिसत होता. दुखत असले तरी दुखत नाही म्हणून सांगत होता.
शेवटी एकदाचा माझा नंबर आला. मी खुर्चीवर बसलो. माझे नाक त्यांच्या ताब्यात दिले. कोविड टेस्ट काडीने माझ्या नाकात प्रवेश केला. काडी जरा वेळ आतल्या आत वळवळली. पुन्हा बाहेर आली. तोपर्यंत मी श्वास रोखून होतो. टेस्ट काडी नाकाच्या खूप आत गेल्यानंतर माझ्या डोळ्यातून येणारे पाणी मी रोखू शकलो नाही. चला ... काडी बाहेर आल्यानंतर ' सुटलो एकदाचे ' असे म्हणत बाहेर पडलो आणि गाडीवर बसेपर्यंत पुन्हा एक शंका भेडसावत राहिली होती. माझा रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आला तर ? .... दोन ते तीन दिवस घरच्या घरी विलगिकरण करून राहिलो. रिपोर्ट दोन दिवसांनी समजला आणि जीव भांड्यात पडला. रिपोर्ट निगेटिव्ह होता ना !! आपल्या जीवनात बाकी सगळं पॉझिटिव्ह व्हायला लागतं ...... फक्त कोविड रिपोर्ट तेवढा निगेटिव्ह आला म्हणजे झाले. घरातली मंडळी खुश झालीच , पण त्याहीपेक्षा जास्त खुश शाळेकडची मंडळी झाली. असो.
त्यानंतर शाळा सुरू झाली. खूप चांगले दिवस पुन्हा सुरू झाले होते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्यापन करता येऊ लागले होते. विद्यार्थी तर कमालीचे खुश झाले होते. शाळेची वेळ तीन तासांची असल्यामुळे तर त्यांना लवकर शाळा सुटण्याचा आनंद घेता येत होता. आणि लवकरच दुसरी कोविड लाट येते आहे असे कळले. पुन्हा लॉकडाऊनची घंटा मोठ्याने वाजली. आता ठरवले कोविडची लस घ्यायची.
नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ' कोविड लस ' घेण्यासाठी दाखल झालो. लहानपणी इंजेक्शन घेणे माझ्या जीवावर येई. पण आता स्वतःहून इंजेक्शन घेण्यासाठी आलो होतो. इथेही नंबर सिस्टीम होतीच. पण सुदैवाने लवकर नंबर लागला. मी आणि माझे मुख्याध्यापक दोघेही एकाच दिवशी लस घ्यायला गेलो होतो. डॉ, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य होते. जयंती साजरी करून येताना इंजेक्शन घ्यायचे महत्त्वाचे कार्य करायचे होते.
इंजेक्शनची नोंदणी झाली. परिचारिका मॅडमनी इंजेक्शन हळुवार टोचले होते. त्यानंतर अर्धा तास विश्रांती घेऊन घरी गेलो. कोणताही त्रास होत नव्हता ही चांगली गोष्ट होती. दुपारी आणि रात्री जेवल्यानंतर ' पॅरिसिटीमॉल ' गोळी घेतली होती. रात्री मस्त झोपलो. मध्यरात्री अचानक तापाने फणफणायला झालं. रात्री 1 वाजल्यापासून झोपच गेली. सगळं अंग मोडून आलं होतं. पूर्वी माझी आई अंग दुखत असलं की म्हणायची , " माझं अंग पुवासारखं दुखतंय ". मला त्यावेळी हसू यायचं. आज माझी तीच अवस्था झाली होती. म्हणतात ना ... जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.
सकाळी अंथरुणातून उठलो. हात पाय धुवून घेतले. डोकं जड झालं होतं. ताप होताच. बाहेर ढगाळ वातावरण असल्यामुळे मला सगळीकडे निळं निळं दिसू लागलं. मी खूपच बेजार झालो. इंजेक्शन घेतल्यानंतर हा त्रास होणार असे मला सांगण्यात आले होतेच. पुन्हा गोळी घेतली तसे साधारण बरे वाटू लागले. पण उत्साही अजिबात वाटत नव्हते. रोज मोबाईल , लॅपटॉप किंवा पुस्तक समोर घेऊन बसणारा मी ..... बाबांना माझे यातले काहीच बघायला मिळत नव्हते म्हणून ते विशेष घाबरले होते. तिसऱ्या दिवशी मात्र मी पूर्वस्थितीत आलो. तरीही डोकं जड होतच. म्हणून माझ्या मेहुण्याच्या साखरपुड्यालाही जाऊ शकलो नव्हतो.
आता चेकपोस्ट ऑर्डर आल्यामुळे दोन दिवस चेकपोस्टवर काम करत असताना तिथला एक पोलीस अधिकारी पॉझिटिव्ह आल्याचे समजले. पुन्हा माझी पाचावर धारण बसली. आपण त्यांच्या संपर्कात तर आलो नाही ना ? शंका आली म्हणून त्याच दिवशी रॅपिड टेस्ट करून घेतली. तीही निगेटिव्ह आली. सुखावलो. पुनश्च ड्युटी जॉईन केली. आता ड्युटी करत असताना कुठेही स्पर्श झाला तरी सॅनिटायझर लावण्याचे काम करतोय. भीती कायमच पाठीमागून येत असलेली. पण काहीही झाले तरी आपण आपली काळजी घेण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नाही. कोविडसह जगायला शिकायला हवं. कारण हा राक्षस कधी जाईल हे आज या वक्ताला तरी सांगता येणं शक्य नाही. लस घेतली तरी काळजी घ्यायलाच हवी. आणि हे ही खरेच की ' काळ ' जी काळजी घेतो ती खरी काळजी !! नाही का ?
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
सहांचा सहवास
🟢 सहांचा सहवास
आज चेकपोस्ट ड्युटीवरचा आमच्या पथकाचा शेवटचा दिवस ( पुढची ऑर्डर येईपर्यंत तरी ). गेले 12 दिवस ड्युटी करत असताना आमच्या पथकातील आम्ही सहा जण. मला दोन दिवसांनंतर पथक प्रमुख करण्यात आलं. माझ्यासोबत काम करणारे इतर पाचजण. माझे मित्र प्रशांत कुडतरकर , मंगेश खांबाळकर , अनिल खोत , सुनिल खांडेकर आणि आरोग्य विभागाच्या डॉक्टर अतिग्रे मॅडम या सर्वांनी केलेलं टीमवर्क महत्त्वाचे आहे. आम्ही शिक्षक वर्ग एकाच केंद्रातील असल्यामुळे आधीपासूनच ओळख होती. पण डॉ. अतिग्रे यांची नव्याने ओळख झालेली. शिक्षणक्षेत्रात काम करत असताना आम्ही शिक्षक बऱ्याचदा एकत्र येतो. पण आरोग्य कर्मचारी, डॉक्टर , पोलीस यांचा सहवास खूप कमी प्रमाणात लाभतो.
गेल्यावर्षी महिनाभर कोरोना योद्धा म्हणून काम केलेले होतं. तो ही अनुभव गाठीशी होताच. पण प्रत्येकवेळी टीम बदलते. अर्थात कामाची पद्धतही टीमनुसार कमी जास्त प्रमाणात बदलतेच. वरून ऑर्डर येतात त्याचीच अंमलबजावणी करायची असते. तरीही दिलेली ऑर्डर फॉलो करत कर्तव्यभावनेने काम करणारी माणसं भेटली की काम करायलासुद्धा जोश येतो.
शिक्षकांना अशा कामांची शासनाने सवयच लावलेली आहे. जे काम इतर कर्मचारी करू शकणार नाहीत , ते काम शिक्षक नक्कीच इमाने इतबारे पूर्ण करताना मी प्रत्यक्ष पाहिलेली आहेत. घरात महत्त्वाचा प्रॉब्लेम असतानाही ' ड्युटी फर्स्ट ' म्हणत कामावर हसतमुखाने हजर होणारी माणसे पाहिली की त्यांना सॅल्युट करावेसे वाटते.
माझ्या पथकात काम करणारे आम्ही सहाही जण 12 दिवसांसाठी एकूण 96 तासांसाठी एकत्र आलो. सर्वजण नियमांचे काळजीपूर्वक पालन करत आहेत. तशा तिन्ही टीमच्या ड्युट्या त्रासदायकच आहेत. प्रत्येकाला येताना किंवा जाताना काळोख मिळतो. सलग आठ तासांची ड्युटी असल्याने चहा, नाश्ता किंवा जेवण यांची गरज भासते. त्याप्रमाणे आम्ही प्रशासनाकडे मागणी केली आणि शासनाने ती ऐकली. आम्हाला गरमागरम चहा आणि नाश्ता मिळू लागला. कधी कधी आमच्या पथकातील सदस्य सर्वांसाठी आईस्क्रीम , कलिंगड , खरबूज आणि बिस्किटे आणत असत. दानशूर व्यक्तींनी आम्हाला रात्रीचे जेवणही देण्याचा प्रयत्न केला आहे. चिंचवली शाळेच्या मुख्याध्यापिका अकिवाटे मॅडम यांनी आम्हाला एकदा थंडगार मठ्ठाही आणून दिला. जनता ढाबा यांच्याकडून दररोज संध्याकाळी चहा , नाश्ता मिळू लागला.
खारेपाटण हा मुख्य चेकपोस्ट असल्यामुळे येथे खूपच अलर्ट राहावे लागते. पोलीस आपली कामे निरंतर करताना दिसतात. पोलीस येथे पोलीस कमी आणि पोलिसातील माणूस म्हणून जास्त वागताना दिसतात. शेवटी पोलीस हा एक माणूसच आहे. त्यालाही भावना असतात. त्यांना दिलेले काम ते करत असतात. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. काही खूप कडक वाटतात , पण त्यांच्या सहवासात गेल्यानंतर ते किती प्रेमळ आहेत याची प्रचिती मला प्रत्यक्ष आली आहे. बारा बारा तास ड्युटी करूनही ते आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य स्वस्थ ठेवत आहेत हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना कडक शिस्तीतच राहावे लागते , त्याला ते तरी बिचारे काय करणार !!!
येणारे लोक विविध परिसरातून आलेले असतात. त्यांची भाषाही वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधावा लागतो. आमचे सर्व सदस्य त्यांच्याशी अदबीने बोलताना दिसत होते. प्रवाश्यांच्या भावना दुखवू नका , असे आमच्या आदेशातच नमूद केलेले असले तरी आमचे सदस्य त्यांच्याशी असे बोलत की जाताना त्यांनी आम्हाला थॅंक्यु म्हणावे.
काल एक कर्करोगाने पीडित पेशंट डेरवणपर्यंत गेला. त्यांच्या कुटुंबाने मोठी रिस्क घेऊन त्यांना डेरवणपर्यंत घेऊन गेले. पण त्या रुग्णाचा रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आल्याने उपचार न घेताच परत यावे लागले. कोणाचे नातेवाईक मृत्यू पावत आहेत , त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गडबडीने त्यांना जावे लागत आहे. जात असताना आमचा तपासणीचा ससेमिरा त्यांच्याही मागे आहेच. पण ही माणसे काही आमची शत्रू नाहीत , की आले की आम्ही त्यांच्यावर गृह विलगिकरणाचा शिक्का मारतोय. आम्हाला जे काम दिलेले आहे ते करणे आम्हाला भाग आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रवाश्यांच्या जर भावना दुखावल्या जात असतील तर आमचाही नाईलाज आहे.
काही माणसे उगीचच फिरत असतील तर त्यांना प्रतिबंध करण्यासाठीही अशी शिस्त गरजेची आहे. कोरोनाचे संक्रमण वाढत असल्यामुळे त्याला प्रतिबंध बसावा हाच हेतू शासनाचा आहे , पण लोकांना त्याचे गांभीर्य नसले तर असेच घडणार ना ?
चेकपोस्टवर दररोज सॅनिटायझेशन, मास्क , सफाई आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टीची विचारपूस करण्यात येत होती. पण काहीही झाले तरी येणाऱ्या माणसांपासून सुरक्षित अंतरावर राहून त्यांची माहिती घेणे तसे रिस्कीच काम आहे. जे काम करतात त्यांना काम करण्याचा अनुभव असतो. म्हणून ते कायमच सजगपणे पुढील ऑर्डर आली तरीही कामावर हजर होत राहतात. सर्वांना समान संधी मिळाली तर चांगलेच झाले असते. पण ज्यांना धोका पोहोचू शकतो , त्यांना अशा प्रकारे डेंजर झोन मध्ये काम करताना त्रास झाला तर ? हाही विचार करावा लागतो. आरोग्य खात्यातील महिला कर्मचारी ज्यावेळी रात्री उशिरापर्यंत ड्युटी करताना पाहून त्यांनाही सलाम करावासा वाटतो.
गेले 12 दिवस लाभलेला सहा जणांचा सहवास म्हणूनच अविस्मरणीय असाच आहे. कोणतेही शासकीय काम करत असताना अशी जागृत टीम मिळणं , त्यांची निवड होणं ही त्यांच्या पुढील अधिक चांगल्या कार्यासाठी असलेला आरंभच असतो. माझ्या पथकातील माझ्या सर्व सहा सदस्यांचे विशेष आभार. आमच्या सर्व पोलीस कर्मचारी , अधिकारी , आरोग्य कर्मचारी आणि प्रसंगानुसार मिळालेल्या सर्व ज्ञात अज्ञातांचे आभार.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर , ( 9881471684 )
🟢 प्रदिप मांजरेकरसर : एक शैक्षणिक दीपस्तंभ
🟢 प्रदिप मांजरेकरसर : एक शैक्षणिक दीपस्तंभ
बारावी झाल्यानंतर काय करावे हा आमच्यासमोर प्रश्न होता. बऱ्याच विचारमंथनानंतर डीएड करण्याविषयी ठरले. त्याचवर्षी बारावीनंतर डीएड सुरू झाले होते. आमचे मार्क्स बऱ्यापैकी असल्यामुळे आम्हाला डीएडला प्रवेश मिळाला. 40 जागांमध्ये आमचे सिलेक्शन झाले.
40 पैकी 40 विद्यार्थी अत्युच्च गुण असलेले होते. त्यातील काही ग्रॅज्युएट झालेले होते. ते सर्व आमचे दादा आणि ताई होते. पण 40 पैकी 40 क्लासमेट्स असल्यामुळे आम्ही एकमेकांना नावानेच हाक मारत असू.
सहदेव पालकर, स्मिता निमणकर , योगिता उपरकर , प्रदीप मांजरेकर , संतोष लाड , अरुणा माळवदे , रविंद्र कुडतरकर , दशरथ सावंत असे अतिशय हुशार पदवीधर आम्हाला क्लासमेट म्हणून लाभले. अजूनही होते , पण आता जेवढे आठवले तेवढे सांगितले. सर्वजण त्यांच्या शाखेमध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त केलेले होते. या सर्वांनी महाविद्यालयीन जीवन अनुभवलेले होते. त्यामुळे महाविद्यालयात शिक्षण घेतानाचे अनेक अनुभव त्यांच्या गाठीशी होते. आम्ही मात्र नुकतेच ज्युनिअर कॉलेजमधून महाविद्यालयात पदार्पण केले होते.
आम्हाला या मोठ्या अनुभवी मित्र मैत्रिणींचा आधार होता. पहिले एक दोन महिने आम्ही गप्पच होतो. पण हळूहळू आमचे महाविद्यालयीन जीवन खऱ्या अर्थाने सुरू झाले होते.
आमच्या वर्गातील मांजरेकरांचा ' प्रदीप ' आमचा नेता होता. तो दररोज काहीतरी नवीन संकल्पना सांगत असे. डीएड प्रशासनास विरोध करण्याची क्षमता त्याच्या शब्दात होती. अन्याय कधीही सहन करायचा नाही असे त्याचे कायमच म्हणणे असते. त्याच्याकडून आम्ही बरेच काही शिकलो. अर्थात सगळ्यांकडूनच आम्हाला शिकता आले , पण त्याच्याकडून जरा जास्तच शिकलो.
आत्मविश्वासाने लढा देण्याचे सामर्थ्य त्यानेच आमच्यात आणले. त्याने एखादी गोष्ट करायची ठरवली आणि आम्ही ती नाही केली असे कधी झाले नाही. त्याला आम्ही कधीही विरोध केला नाही. त्याचा विरोध बरोबर होता हे आम्हाला समजत होते , कळत होते , पण वळत नव्हते. कारण आम्ही घाबरट होतो. आमचा हा भित्रेपणा त्याने लवकरच घालवला. त्याच्या शब्दांनी आमच्यात वीरश्री संचारत असे. तो आमच्यासाठी कायमच आदर्श असणार आहे. आता त्याला आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
त्याचे विचार परखड असतात. त्याने आम्हा सगळ्यांच्यात आपले विचार पेरले होते. दोन वर्षातील डीएड कालावधीत महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आम्हाला व्यावसायिक मार्गदर्शन केले आणि प्रदीपने आम्हाला अनुभवांचे शिक्षण दिले. तो आमच्यापेक्षा वयाने आणि ज्ञानानेही कायमच मोठा होता आणि असणार आहे.
आपल्या जिल्हयातील आणि परजिल्ह्यातील असे आम्ही 40 मित्र मैत्रिणी विचारांनी एकत्र बांधले गेलो होतो. आज हे सगळे मित्र आणि मैत्रिणी विविध जिल्हा परिषद किंवा माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून आपले कर्तव्य प्रभावीपणे बजावताना दिसत आहेत.
' कॉमन ऑफ ' हा आमच्या वर्गाचा एक ट्रेंड बनला होता. त्यामुळे तर आमचा प्रदीप संपूर्ण कणकवलीत प्रसिद्द झाला होता. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे , या एका वाक्यावर आमच्या क्लासमेट्सनी 5 ते 6 तरी कॉमन ऑफ घेतले असतील. प्रशासन एखादा त्रासदायक नियम आमच्यावर लादत आहे असे समजले की दुसऱ्या दिवशी त्यांना कल्पना देऊन ' कॉमन ऑफ ' होत असे. कॉमन ऑफ म्हणजे आम्ही घेतलेली सामुहिक सुट्टी असे. या सामूहिक सुट्टीची संकल्पना आम्हाला नवीनच होती.
आज आम्ही सगळे एकमेकांच्या जवळ नसलो तरी आठवणींच्या रूपाने नेहमीच जवळ आहोत. प्रदीपला सगळे ' पदो ' किंवा ' पदया ' म्हणतात. डीएड कॉलेजची आठवण आली की आम्हाला आमचा कॉमन ऑफ आठवतो. आणि कॉमन ऑफ आठवला की पदोपदी आमचा प्रदीप मांजरेकर आठवतो. कित्येक वर्षानंतर Whats App आले आणि आमचा व्हाट्स अँप ग्रुप स्थापन झाला. आमच्या ग्रुपचे नावसुद्धा " कॉमन ऑफ ' ग्रुप असेच आहे , आता बोला ?
©️ प्रवीण अशितोष कुबलसर , ( 9881471684 )
Tuesday, May 4, 2021
सो गया है रस्ता
🟢 सो गया है रस्ता
गेले दहा बारा दिवस कणकवली ते खारेपाटण प्रवास सुरू आहे. चेकपोस्ट ड्युटीच्या निमित्ताने खारेपाटण चेकपोस्टवर रुजू झाल्यापासून दुपारी साडे बारा वाजता निघतो. दोन वाजण्याच्या अगोदर चेकपोस्टवर पोचायचे असते ना !! जाताना रस्ते मोकळेच असतात. मोकळे म्हणजे उघडे. आता उघडे म्हणजे काय ? तर रस्त्यावर गाड्या तरी असायला पाहिजेत ना ? बिचारे ते या मे महिन्याच्या कडक उन्हात ताप ताप तापताहेत ..... मस्त काळे कुळकुळीत रस्ते. आता दोन बाजूंनी प्रवास सुरू झाला आहे. गाडी चालवायला आणि लवकर अपेक्षित ठिकाणी पोहोचणं सोपं झालंय अगदी.
गाडीचा वेग वाढवणं आपल्याच हातात असतं. तरीही वेग वाढता वाढत नाही. हेच जर शाळेत जायचं असतं तर वेग नक्कीच वाढला असता. तरीही जाताजाता शाळेकडे जाणारा रस्ता वाटेत मिळतोच. गाडी आपसूकच शाळेच्या रस्त्याला वळते. मी आपला नेहमीप्रमाणे गाडी पुढे नेत राहतो. शाळेचा आतला रस्ता सुनसान आणि चिडीचूप. फक्त मैदानातील वृक्ष रुक्षपणे उभे असलेले. खोखोचं मैदानही मुलांशिवाय खायला येत होतं. शाळेचे व्हरांडेही मुलांची वाट बघत असल्यासारखे. शाळेचे दरवाजे मला आपल्याला उघडण्यास सांगताहेत. फक्त कार्यालय उघडून मी कसातरी आत शिरतो आणि जरा वेळच बसल्यासारखे करत पुन्हा दरवाजा बंद करून टाकतो. सगळी शाळाच मला खायला येते आहे असे वाटून मी शाळेतून तसाच निघतो. गाडीचा वेग वाढलेला असतो. मी चेकपोस्ट गाठतो.
कोविड प्रादुर्भावामुळे घाबरून किंवा कंटाळून लोकं पुन्हा एकदा गावाकडे येत असलेली बघून रस्ता सुखावतो. आमचे चेकपोस्टवरचे कर्मचारी येणाऱ्यांची नीट नोंदणी करून घेतात. पोलीस बिचारे येणाऱ्या सर्व गाड्यांना थांबवत आहेत. बारा बारा तासांची ड्युटी करत आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी, शिक्षण विभागातील शिक्षक वर्ग चेकपोस्टवर जीवावर उदार होऊन नोंदणीचे उत्तम प्रकारे काम करताहेत.
अधिकारी आणि पदाधिकारी सुद्धा काम सुरळीतपणे सुरू आहे का खात्री करत आहेत. येणारी माणसं घाबरत घाबरत प्रवास करून येत आहेत. आल्यानंतर आदरपूर्वक आपली माहिती देत आहेत. सर्व तपासणी करूनही शिक्के मारून घेऊनसुद्धा ' धन्यवाद ' असे म्हणत निघून जात आहेत. लहान मुले सुद्धा जाताना बाय बाय करत आहेत. या येणाऱ्या माणसांना बघून रस्ता खुश होत चाललाय बहुतेक.
दुपारी माणसं कमी असताना तो तापतोय, रात्री मात्र माणसांची संख्या वाढत चालली की तो थंडगार पडतोय. असे करता करता रात्रीचे दहा कधी वाजतात मला समजतसुद्धा नाही. मी आपली ड्युटी संपवून रात्री निघतो तेव्हा पुन्हा एकदा शांत संयत रस्त्याशी माझी गाठ पडते. नेहमी वर्दळीचा असणारा रस्ता गाड्यांची आपणहून वाट पाहताना दिसू लागतो. जाताना संचारबंदी कडक दिसून येते. वाऱ्याच्या झुळकीसह एक गाणं हळुवार कानात गुंजन करू लागतं. ' सो गया ये जहाँ ... सो गया आसमा..... सो गयी है सारी मंजिले .... सो गया है रस्ता ..... मी आपला त्या गाण्यांच्या ओळी गुणगुणत पुढे निघतो.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
सगळ्याच बॅटी
🟣 सगळ्याच बॅटी
त्यावेळी आमच्याकडे मातीची चूल होती. भुसा भरून पेटवण्याची शेगडी होती. चूल असल्यामुळे लाकडे आणि शेगडी असल्यामुळे लाकडाचा भुसा आणावा लागत असे. भाड्याच्या खोलीत राहत होतो. लाकडाच्या गिरणीवरून लाकडे आणि भुसा आणावा लागे. सुट्टीच्या दिवशी आम्ही भावंडे आईला मदत करत असू. खोलीपासून दोन तीन किलोमीटरवर लाकडाची गिरणी होती. आई गिरणीवर जाताना आम्हा सर्व भावंडांना घेऊन जात असे. आमची तिला तेवढीच मदत होई. आम्ही सुकी लाकडे काढून देत असू. आई भुसा काढून पोत्यात भरत असे. मग ते भरलेले भलेमोठे पोते डोक्यावरून घरी आणत असे. आईची तब्येत बरी नसली तरी ती अशी ताकदीची कामे करत असे. तिला दम्याचा त्रास सुरू झाला होता. डॉक्टर मराठे यांच्याशिवाय ती कोणत्याही डॉक्टरांकडे जात नसे. आईचा त्रास दिसू लागला होता. त्यामुळे माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींनी लाकडे आणि भुसा आणण्याची जबाबदारी स्वीकारली होती. तसे ते सोपे काम नव्हते , पण महत्वाकांक्षा दांडगी होती. मग आम्ही पाचही भावंडे आपापल्या परीने कामे करण्याचा प्रयत्न करत होतो. माझा छोटा भाऊ आमच्या सोबत कायम असायचा. तो लाकडाच्या गिरणीवर लाकडाची बॅट शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करी. सगळ्या लाकडांमध्ये त्याला बॅटच दिसे. लाकडे घरी आणल्यानंतर कोयता घेऊन त्याची बॅट करून तो खेळायला सुरुवात करी. कधी बॅट , कधी स्टंप असे बनवून झाले की ती लाकडे तो जीवापाड जपून ठेवत असे. घरातील लाकडे जाळून संपली की आई त्याच्या ह्या बनवलेल्या बॅटी जाळायला घेई. शाळेतून घरी आल्यानंतर चहा घेऊन झाला की भावाचा मोर्चा बॉल, बॅट आणि स्टंप यांच्याकडे वळे. आपल्या बॅट्स दिसल्या नाहीत तर तो रडून गोंधळ घालत असे. मग माझी मोठी ताई , आका त्याला समजावून सांगत. मी समजावण्याच्या भानगडीत पडत नसे. कारण त्यामुळे आमच्यात मारामारी होण्याचीच शक्यता अधिक असे. तो माझ्या पोटावर बसेल या भीतीनेच मी त्याच्याशी नाहक वाद घालत नसे.
कुठे जत्रा असली की आम्ही जायचो. बाबा आम्हाला पैसे देत. आम्ही त्याचे खाऊ घेत असू. पण माझा भाऊ मात्र खाऊ न घेता प्रत्येकवेळी बॉल विकत घेत असे. दुकानदार जेवढे सांगतील ते पैसे अजिबात आढेवेढे न घेता लगेच देऊन बॉल पदरात पाडून घेत असे. आम्ही दोघेजण क्रिकेट खेळत असू. तो मला लगेचच आऊट करत असे. मला मात्र तो अजिबात आऊट होत नसे. तो इतक्या लांबून बॉलिंग करी की तो बॉल माझ्यावर बसेल या भीतीने मीच स्टंपवर बॉल सोडून देत आऊट होत असे. आमच्यात सतत या ना त्या कारणावरून वाद होत. पण त्या लाकडाच्या बॅटी आमच्यातले वाद विसरायला मदत करत. घरी आलो की वाद विसरून पुन्हा खेळायला निघून जात असू. आता आम्ही मोठे झालो. आणि दोघेही शिक्षक झालो. मी जिल्हा परिषद आणि तो माध्यमिक. माझा भाऊ मितभाषी असला तरी प्रेमळ आहे. मी त्याला लहानपणी मारले असेल , आताही त्याला बोलतो. तो ऐकून घेतो, पण उलट उत्तर कधीच करत नाही. आज आम्ही दोघेही वेगवेगळे राहत असलो तरी मनाने कायमच एकत्र असणार आहोत. क्रिकेट खेळणार नसलो तरी आयुष्याची बॉलिंग नक्कीच चांगली करणार आहोत. कधीतरी आऊट होण्याची भीती असली तरी संयमाने सामोरे जाणार आहोत. संकटांचा कितीही गुगली चेंडू पडला तरी लाकडाच्या साध्या फळीने ( संयमाने ) ते संकट टोलवणार आहोत.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
होणारा होतला
🟦 होणारा होतला
माणसाचं कधी काय घडेल समजणार नाही. आता चांगला असलेला माणूस थोड्या वेळानंतर चांगला असेल याची खात्री देत येत नाही. माणसाचं जीवन असं कसं बनलं आहे ? देव जाणे !!! देवाची आराधना केली तरीही देवाच्या मनात असेल तर तसेच घडेल , नाही का ? म्हणूनच की काय माणूस हे जग कायमचे सोडून गेला की ' तो देवाघरी गेला ' किंवा ' त्याला देवाज्ञा झाली ' असे म्हटले जाते. कोरोनामुळे तर मानवाचं जीवन अगदीच क्षणभंगुर झालेलं आहे. ' आज हाय , तर उद्या न्हाय ' असं झालंय. रोजच्या बातम्या वाचून , ऐकून आणि पाहून तर अगदी सुन्न व्हायला होतं.
' जे जे लिहिले भाळी , ते चुके न कदा काळी ' असे म्हटले जाते. आपल्या भाळावर लिहून ठेवलेले आहे , असे प्रत्येकाच्या भाळावर त्याचे आयुष्य लिहायला त्या विधात्याला ( निर्मात्याला ) किती त्रास झाला असेल माहीत नाही. आजचा दिवस निघून गेला की आपण " सुटलो बुवा एकदाचे " असा सुटकेचा श्वास टाकायचा. फक्त त्यावेळी आपला श्वास मात्र पुरेसा असायला तरी हवा.
आजचा दिवस म्हणजेच चार मे , हा दिवस माझ्यासाठी खूपच दुःखदायक असाच आहे. माझ्या पूर्वपत्नीचा आज स्मृतिदिन. गेलेल्या माणसाची जास्त आठवण काढत बसू नये , असे मला बहुतेकांनी सांगितल्याचे आठवते. त्यांचे फोटो बघत बसू नये , मोबाईलमध्ये त्यांचा फोटो बघत राहू नये , असे अनेकांनी मार्गदर्शन केलेलं माझ्या चांगलेच लक्षात आहे. पण मी त्याकडे लक्ष देत नाही. कारण मी माझे आयुष्य अधिक चांगले व्हावे यासाठी या गोष्टींचा उपयोग करत आहे. प्रत्येकाच्या जीवनात असे अनेक प्रसंग येतात. ते येऊ नयेत यासाठीही अनेकजण प्रयत्न करत असतात. पण जे घडू नये असे नेहमी वाटत राहते ना , तेच घडू लागते आणि आपला आत्मविश्वास डळमळीत होऊ लागतो. एकदा आपला आत्मविश्वास कमी व्हायला लागला, की अर्थातच आपला न्यूनगंड वाढू लागतो.
ती गेल्यानंतर मला समजले की , या जीवनात काहीच अर्थ नाही. सगळं निरर्थक आहे. क्षणभंगुर आहे. आपलाही कधीतरी शेवट ठरलेला आहे. तो दिवस फक्त आपल्याला माहीत नाही. तो दिवस माहीत नाही हे एक बरे आहे. तो दिवस माहीत असता तर .... त्या दिवसाच्या आधीच आपण संपून गेलो असतो.
एखादी प्रिय व्यक्ती आपल्यातून गेली की जे दुःख होतं , त्याची तीव्रता त्याच्यासोबत राहणाऱ्या व्यक्तींनाच जास्त प्रकर्षाने जाणवते. गेलेली व्यक्ती फक्त शरीराने जात असते. आठवणींच्या रूपाने ती सतत आपल्यासोबतच असते. त्या व्यक्तीबरोबर व्यतीत केलेले क्षण जसेच्या तसे आठवतात. त्यावेळी या आशयाच्या ओळीं मुखात येतात , ' भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले , एवढे मी भोगिले की मज हसावे लागले .... लोक भेटायास आले काढत्या पायासवे ..... अन अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले......
गेलेली माझी पत्नी आठवणींच्या रूपाने माझ्या सतत सोबत आहे अशा माझ्या भावना आहेत. व्यक्तिपरत्वे त्या बदलूही शकतील. पण तिचे माझ्या आयुष्यातील स्थान कधीही कमी होऊ शकत नाही. आज ती जाऊन 14 वर्षे झाली आहेत. तिचा मला सात वर्षांचा सहवास लाभला. दुसऱ्या पत्नीने मला दिलेली तेरा वर्षांची साथ अतिशय मोलाची अशी आहे. गेलेली ऐश्वर्या होती आणि आता आलेली ईश्वरी आहे. आज मी ऐश्वर्यासह ईश्वरी जीवन जगत आहे ही माझ्यासाठी आणि माझ्या समस्त कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
©️ *प्रवीण अशितोष कुबलसर , 9881471684*
Monday, May 3, 2021
झाकराचा आंबा
🟩 झाकराचा आंबा
आम्ही आंब्याच्या काळात गावी गेलो की एक आंब्याचे झाड आमचा मित्र झालेलं होतं. ते आंब्याचं झाड आमच्या घरापासून 100 मीटर अंतरावर होतं. त्या आंब्याच्या झाडासोबत आमची सदैव मैत्री असे. त्या आंब्याच्या झाडाला आम्ही एक नाव दिले होते. झाडाला आम्ही ' झाकराचा आंबा ' असे म्हणत असू. झाकराच्या आंब्याची सावली दाट पडायची. झाडाखाली एकावेळी 20 - 25 माणसे असली तरी त्यांना सावली मिळत असे. एवढे मोठे आंब्याचे झाड ' सर्वांना झाकण्याची क्षमता ' असल्यामुळे कदाचित त्याला झाकराचा आंबा असे नाव पडले असावे.
आम्ही घरी गेलो रे गेलो की पहिल्यांदा झाकराला भेटायला जात असू. झाडाखाली जाऊन आंबे गोळा करायचे आणि ते पोट भरेपर्यंत खायचे. काय उत्तम चव होती म्हणून सांगू ? आंब्याचे झाड मोठे असले तरी त्याचे आंबे मात्र बिटकी एवढे छोटे होते. आंबा कापण्याची कधीच आवश्यकता नव्हती. फक्त मागची बाजू पिळून त्यातला चीक काढून टाकायचा आणि मनसोक्त चोखून आंबा संपवायचा. चव इतकी गोड की एखाद्या नवख्याने आंबा मागितला तर तो पुन्हा पुन्हा आंबा मागेल असा होता तो झाकराचा आंबा. आयुष्यात कित्येक प्रकारचे आंबे खाल्ले असतील , पण झाकराच्या त्या आंब्याची सर दुसऱ्या कुठल्या आंब्याला आलेली नाही. आज आता तो आंबा आम्हाला खावासा वाटला तरी खाता येणार नाही. कारण आमचा तो परमप्रिय झाकराचा आंबा वादळवाऱ्यामुळे अस्तंगत झाला आहे. त्यामुळे जमीनमालकांकडून तो नाईलाजास्तव तोडण्यात आला असे ऐकायला मिळाले.
त्या आंब्याशी आम्ही अक्षरशः बोलत असू. त्याच्याशी हितगुज करत असू. तोही मग आपल्या फांद्या हलवून वाऱ्याची शीळ घालत आम्हाला दाद देत असे. आम्ही त्यावेळी एका काठीला खिळा लावून ठेवला होता. जर झाकराने आंबा पाडला नाही तर , मी किंवा माझा भाऊ त्या खिळा असलेल्या काठीने झाडाच्या मुळाला खिळ्याने टोचत असू. असे आम्ही सतत करत नसू. कारण प्रत्येकवेळी आम्हाला झाडाखाली आंब्यांचा सडा पडलेला दिसे. एखाद्या दिवशी वाराच नसला तर आंबे पडत नसत. पण आम्ही आमची काठी उगारली किंवा काठीचा खिळा टोचला की एकतरी आंबा पडेच पडे. असे बरेचदा घडल्यामुळे आमच्या बालमनाला वाटले की झाडाला शिक्षा केली की झाड आपणांस आंबे देते. झाडाला अशी शिक्षा करणे हे चुकीचे आहे , हे आम्हाला मोठ्यांनी समजून सांगितल्यानंतर आम्ही तो प्रकार बंद केला.
आज आम्ही आमच्या घरी गेलो की त्या झाडाची ती मोकळी जागा खायला येते. बालपणातील या निसर्गप्रेमी आठवणी जाग्या होतात. आज तो आंबा नाही पण त्याच्यासोबत आम्ही घालवलेले ते अविस्मरणीय दिवस नक्कीच जिवंत आहेत असे म्हणायला हरकत नाही.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( 9881471684 )
खळ्यातले लाडू
🟪 खळ्यातले लाडू
शाळेच्या परीक्षा संपल्या की आम्ही गावाकडे जात असू. निकाल लागण्याच्या अगोदरच आम्ही आमच्या गावचा रस्ता धरलेला असायचा. शहरात गरमही व्हायचे. गावाकडे कसं थंडगार वाटायचं. गावातील घर नदीपासून अगदीच जवळ आहे. घर आणि नदी यांच्यामध्ये हिरवीगार शेती असल्यामुळे त्या निसर्गरम्य वातावरणात नयन मनोहर वाटत असे. सगळे शेतकरी शेतात काम करण्यात दंग असलेले आताही पाहायला मिळतात. दुपारी जेवल्यानंतरही कामे थांबत नसत.
दुपारनंतर खळ्यातली कामे सुरू होत. शेतात भात झोडण्यासाठी खळी बनवली जात. आमच्या घराच्या शेजारीच अशी अनेक खळी होती. प्रत्येकजण आपापल्या खळ्यात नाचण्याची कणसे झोडत असत. आमची आजी आम्हाला प्रत्येक खळ्यावर जायला सांगत असते. आम्ही लहान असल्यामुळे आम्ही नाचण्याची कणसे झोडण्यासाठी उपयोगी नसलो तरी त्यांना पाणी देणे, चहा नेऊन देणे या कामांसाठी उपयोगी पडत असू. माझे तिन्ही काका कणसे झोडण्यात पटाईत. माझे बाबासुद्धा शेतात कामे करत. पण ते कायम सलून कामात दंग असल्याने ते शक्यतो शेतीकामात नसत.
कणसे झोडून झाली की सर्वांना लाडू मिळत असत. घरगुती बनवलेले शेंगदाण्याचे लाडू , मुगाचे लाडू , चवळीचे लाडू मस्त मोठे चवदार असत. एक लाडू खाल्ला तर रात्री जेवलो नाही तरी चालत असे. आम्ही पाणी , चहा देत असताना आम्हालाही खळ्यातले लाडू मिळून जात. आम्ही शहराकडून कधीतरी येत असल्यामुळे आमच्यावर अधिक माया असे. प्रेमाने एखादा लाडू अधिकचा आम्हाला मिळून जाई. असे हे प्रेमळ आणि गोड लाडू मिळावेत या एकमेव उद्देशाने आमची आजी आम्हा सर्व भावंडांना खळ्यात पाठवी.
आजीचा आदेश शिरसावंद्य मानून आम्ही खळ्यात हजर होऊ. मी आणि माझा भाऊ दोघेही लाडवांचा फडशा पाडत असू. उरलेले लाडू घरी घेऊन येत असू. घरी आल्यानंतर आजी आमच्याकडून सगळे लाडू काढून घेई. ती त्यातला एकही लाडू कधी खाताना आम्ही बघितलेला नाही. ती बिचारी आमच्या इतर भावंडांना त्याचे बारीक बारीक तुकडे करून अगदी समसमान सर्वांना कशी वाटणी येईल याची काळजी घेत असे. तिचे नेहमी असे म्हणणे असे की , ' घरात येणारा पदार्थ सर्वांच्या मुखाला लागला पाहिजे. ' आमच्या मुखाला पदार्थ लागला की तिचे पोट भरून जाई.
शेंगदाण्याचे भलेमोठे गुळयुक्त लाडू खाताना त्यांची चव आणखी वाढत जाई. एक लाडू खाऊन झाला की आणखी एखादा खावासा वाटे. मग आजीला बाबापुता करून तिच्याकडून आणखी एखादा लाडवाचा तुकडा कसा मिळेल यासाठी आमची स्पर्धा चाले.
आता बाजारात विविध प्रकारचे लाडू विकत मिळतात. ते आम्ही विकत आणतो. खातो. पण ते ' खळ्यातले लाडू ' त्यांची चव आमच्या जिभेवर जी ठाण मांडून बसली आहे ती चव आताच्या कोणत्याही लाडवांना येणार नाही हे तितकंच खरं आहे.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
Sunday, May 2, 2021
कोंबा आरवला
🔴 कोंबा आरवला
मे महिन्याची सुट्टी पडली की आम्ही सर्व भावंडे आमच्या मुळघरी किर्लोस येथे जात असू. सुट्टी पडली की सगळेच जण आपल्या मूळगावी जायला उत्सुक असतात. वर्षभर शहरात राहून त्या जीवनाचा कंटाळा आलेला असतो. गावातल्या लोकांना मात्र शहराचं अप्रूप असतं. गावाकडच्यांना म्हणावा तसा शहराचा लाभ घडत नाही. शहरातले मात्र दरवर्षी गावाकडे जातातच. आले की सगळे पाहुणे , नातेवाईक यांच्याकडे फिरून येतात. इथली गावाकडची माणसं कामात मग्न , त्यांना कुठे फिरायला उसंत. याचा अर्थ असा नव्हे की शहराकडल्यांना कामच नसतं. त्यांना त्यांच्या कामाचा कंटाळा आलेला असतो, म्हणून ती विश्रांतीसाठी गावाला हवा खायला आलेली असतात. गावाकडची हवाच भारी. ती सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी. या हवेचा कधीच कंटाळा येत नाही. स्वच्छ , शुद्ध हवा आणि निसर्गसौदर्य यांनी भारलेलं जीवन अनुभवण्यासाठी सगळी शहरातील मंडळी अतिआतुर झालेली असतात.
सकाळीच उठताना कानावर पडणारे नैसर्गिक आवाज उत्साह वाढवतात. लहानपणी एक गाणे ऐकले होते. ते आम्ही होळीच्या सणात गोमुच्या वेळीही म्हणत असू. ' कोंबा आरवला , चाराच्या ठोक्याला , बायको उठविते आपुल्या नवऱ्याला , अहो उठा उठा ... गिरणीचा भोंगा झाला ' हे गाणे तुम्हालाही माहीत असेल कदाचित. ते शहरातील गिरणी कामगारांच्या बायकांसाठी असेलही. पण आता शंका येते , गिरणी शहरात होत्या , मग तिकडे शहरात कोंबडे होते का ? होते तर ते गावाकडे आरवतात तसे आरवत असतील का ? पूर्वीचे कोंबडे असतीलही तसे. किंवा गिरणी कामगारांकडे घड्याळे नसतील तर त्यांना समजणार कसे ? म्हणून त्यांच्या बायकांनी ( की बायकोनी ) कोंबडा आपल्या सोबत नेला असेल तर ? असो. पण त्यावेळचे कोंबडेच भारी होते , ते वेळीच ओरडत. पण आताच्या कोंबड्यांमध्ये तितकासा आरव राहिलेला नाही.
आमच्या घरी भरपूर कोंबडी पाळलेली होती. आमच्या आजीचा त्यांच्यावर खूप जीव. तपकिरी कोंबडे , काळे कोंबडे , खुडकाची कोंबडी, काली कोंबडी, मानकापी कोंबडी , लांब शेपटीचे तुरेवाले कोंबडे असे अनेक प्रकार खुराड्यात पाहायला मिळत. तरुण कोंबडीला तलाग असे म्हणत. तिच्या मागे कोंबडे फिरू लागले की काही दिवसातच ती अंडी देणार हे आम्हाला आमच्या आजीनेच सांगितले होते.
संध्याकाळ झाली की ही कोंबडेमंडळी आपल्या खुराड्यात दाखल होण्यास येत. त्यांना अलगद पकडून किंवा त्यांच्या मागे धावून त्यांना पकडण्याची मज्जा काही औरच असे. एखाद्या रविवारी त्यापैकी एकाचे प्राण पणाला लागत. गावठी कोंबडी घराभोवती फिरताना परिसर स्वच्छ करून टाकत. घरातही त्यांचा वावर स्वच्छंदी असे. जणू आपल्या घरातले सदस्यच असल्याप्रमाणे स्वयंपाक घरापासून शयनगृहापर्यंत त्यांना परवानगी दिलेली असल्याने त्यांनी आपल्या ' शिटीने ' रांगोळीच काढलेली असे.
एखादी कोंबडी घरातच कुठेतरी कोपऱ्यात खुडूक करून बसे. ती निघून गेली की तिथे एक पांढरट गुलाबी रंगाचे अंडे मिळे. आम्ही ते आमच्या आजीकडे नेऊन देऊ आणि छानशी शाबासकी किंवा खाऊ मिळवत असू. दुसऱ्या दिवशी त्या अंड्याची पोळी , भुर्जी किंवा अंडाकडी खायला मिळत असे.
आजीच्या मदतीला आमची दांडगी आत्येही असे. तिला कोंबड्यांची भारी हौस. मंगळवारच्या बाजारात ती कोंबड्या विकून मिळालेल्या पैशात बाजार घेऊन येत असे. घरात एखादा धार्मिक कार्यक्रम असला तरीही बिचाऱ्या कोंबड्यांवर संक्रांत येई. देवाने निर्माण केलेल्या कोंबड्यांनाच देवाला देण्यात येई. घराच्या बाहेर असलेल्या उदंड देवतांना स्मरून न दिसणाऱ्या देवाला ' एखादा कोंबडा ' बळी दिला जाई. बळी देताना त्याची मान कापून त्याला तडफडताना पाहून आमचा जीव तडफडत असे.
आमच्या गणपतीकडे गौरी आणली जाई. त्यावेळी गौरीला ' कोंबड्याची सागोती ' लागत असे. त्यावेळीही एका कोंबड्याचा हकनाक जीव जाई. एकदा मीच माझ्या बाबांना सांगितले की यावर्षी गौरीला कोंबडीचा नैवेद्य दाखवू नका. बाबांनी नाईलाजाने ते ऐकले. त्याच दिवशी संध्याकाळी ' तो ' कोंबडा गायब झालेला होता. माझी आजी शोधून शोधून दमली. शेवटी तिनेच निष्कर्ष काढला की आज गौरीला कोंबडं दिलं नाही म्हणून तिने आपलं कोंबडं नेलं.
पुढील वर्षांपासून दरवर्षी पुनश्च कोंबडी वडे चा नैवेद्य देणे सुरू झाले. तो कोंबडा गणपतीच्या आईने नेला असे आम्हाला सांगण्यात आले. मी रात्रभर विचार करत राहिलो. पण आता मोठा झालो तरी मला या गोष्टीला विरोध करता येत नाही.
©️ प्रवीण कुबलसर
💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖
💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖 कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...
-
बा. स. लाड सर... केवळ एक नाव नाही, तर एक प्रेरणास्रोत, एक आदर्श व्यक्तिमत्व! ते एक चालते-फिरते ज्ञानभांडार होते, एक असा अनमोल ग्रं...
-
🔴 आजोळच्या आठवणी: नात्यांचा गोडवा आणि नव्या पिढीचं नातं काल कणकवलीतील कलमठ येथे चव्हाण कुटुंबीयांच्या सत्यनारायण पूजेनिमित्त माझ्य...
-
🛑 सुहास्य वदनी साहेब सरकारी नोकरीत असल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क येत असतो. अधिकारी हे अधिकार गाजवण्यासाठी नसतात. ते आपल्या ...







.jpeg)