Wednesday, December 30, 2020

मुंगीस्थान

 मुंगीस्थान


        शाळा सुटली. संध्याकाळचे साडेपाच वाजले तरी मी शाळेतच होतो. मुलेसुद्धा मी शाळा बंद करत नाही म्हणून शाळेतच थांबून होती. मी आता शाळेत राहत नव्हतो. तीन महिने शाळेत राहिल्यामुळे मुलांनाही शाळा सुटल्यानंतरही शाळेत थांबण्याची सवय झाली होती. 

          एका टेबलखालीच मी किचन बनवले होते. त्याला समोरुन पडदा लावून माझे स्वयंपाकघर दिसू नये याची खबरदारी घेतलेली होती. अर्थात माझे हे किचन बघायला कोण येतंय म्हणा ? पण ही गोष्ट  मला खवखवत होती त्याला मी तरी काय करणार ? त्याला जो पडदा लावला होता तो मी स्वतः डी.एड. ला असताना भरतकाम केलेला टेबलक्लाॕथच होता. बाहेर कपडे वाळत घालण्याच्या दोरीवरील कपडे दगा देऊ शकणार होते. 

          तीन महिन्यानंतर आता मी शाळेत राहात नव्हतो. पण जवळच एका मांगरात राहत असल्याने तिथे इतक्या लवकर जाऊन तरी काय करणार होतो. म्हणून शाळेतच वेळ घालवत बसलो. शाळा हे माझ्यासाठी नेहमीच मंदिर ठरलेले आहे. तिथे गेलो कि मी घराला पूर्णपणे विसरुन जातो. कोणत्याही अवघड क्षणी मला माझ्या शाळांनीच जास्त साथ दिली आहे. मी शाळेत इतका रमतो कि माझ्यासाठी इतके रमणीय स्थळ दुसरे कुठले नसेल. लहानपणापासून शाळेने साथ दिली. आता शिक्षक झाल्यामुळे शाळेची सदैव साथ राहणार आहे म्हणून मी मला जगातील सर्वात सुखी आणि समाधानी मनुष्य मानतो. 

          मुले काही जाता जात नव्हती. शेवटी त्यांना बाबापुता करुन मीच घरी पाठवले. मीच पाठवले, पण आता मला माझ्या मुलांची उणीव भासू लागली. मी आणि शाळा दोघेच उरलो. मुले नाहीत तर शाळा मला खायला येतेय असे वाटू लागले. विद्यार्थी असले तरच शाळेला किंमत नाहीतर उरतात फक्त रंगवलेल्या भिंती. त्या भिंती बोलक्या असल्या तरी माझ्याशी बोलत नव्हत्या. 

          कंटाळून मी मांगराचा रस्ता धरला. दोन मिनिटात रूमवर आलो. आता घराकडील आठवणी येऊ लागल्या. आज घरी गेलो असतो तर बरे झाले असते असे वाटू लागले. फोन किंवा मोबाईलची सोय असती तर किती मज्जा आली असती असे आता वाटतेय. मी दादरा नगर हवेली मध्ये बेटावर आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. दुपारची भांडी घासायला घेतली. दुपारचे जेवण तापवले. एकच जेवण तीन वेळा जेवायचे दिव्य करायचे होते. पण मला जेवण्यासाठी जगायचे नव्हते तर जगण्यासाठी जेवायचे होते. काय केले असेल ते मनापासून पोटात दवडायचे होते. 

          आज काय तिखट डाळ आणि भात होता. तोंडी लावायला भाजी नव्हतीच. आणलेले लोणचे बरणीच्या तळाला गेले होते. त्याच्यात बोट बुडवून आजच्या भाजीची कल्पना केली. कधी कधी मस्त कल्पना करायची म्हणजे त्रास होत नाही. त्यावेळी मी अशा अनेक कल्पना केल्याचे आठवून आजही हसू येते. जेवल्यानंतर पुन्हा भांडी घासली. तेव्हा मी घासलेली भांडी बहुदा चकचकीत दिसत. त्यात मी माझा चेहरा पाहू शकेन इतकी चकचकीत. 

          आता थोडे वाचन करून मग झोप आल्यानंतर झोपायचे होते. शेजारच्या गोठ्यातल्या शेरडांचे आवाज कानावर पडत होते. वाचता वाचता पुस्तक पोटावर ठेवून कधी झोपलो ते कळलेच नाही. झोपायच्या खोलीत  मालकांची धान्याची मोठी कोठी होती.त्यात भात ठेवलेले होते.ते भात खाण्यासाठी रात्री उंदरांची फौज गोळा होई. ती खडखड मला शिरशिरी आणायची. 

          पण ते आपली सोबत करत आहेत तर त्यांचा त्रास होतो असे म्हणणं कृतघ्नपणा ठरेल. गणपतीच्या वाहनाला मी घाबरत असे. त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारा तो आवाज शिसारी आणणाराच होता. अचानक रात्री चार वाजता डोक्यात काहीतरी चावतंय असं वाटलं. घाबरघुबरा होत जागा झालो. बघतो तर माझ्या भोवती लालभडक मुंग्यांनी वेढा दिला होता. चावऱ्या मुंग्या डोक्यात गेल्या होत्या. केसात शिरून सर्वांनी अचानक माझ्यावर हल्ला चढवला होता. मी प्रतिकार करू शकत नव्हतो. थोडा प्रतिकार केला म्हणून त्या इतक्या चवताळल्या कि अधिक चावा घेऊन मला सैरावैरा धावायला लागले होते. मग काय भररात्री मला बाहेर झोपावे लागले. झोप कसली लागते ? सकाळ होण्याची वाट पाहात मी जागा राहिलो. दुसऱ्या दिवसापासून मी त्या ' मुंगीस्थान ' चा धसका घेतला. माझ्या वाट्याला आलेले असे हे ' मुंगी स्थान ' कोणाच्याही वाटेला कधीही येऊ नये म्हणजे झाले.



 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

No comments:

Post a Comment

आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...