Wednesday, December 30, 2020

आमचे बाबा : एक अनमोल ग्रंथच

आमचे बाबा : एक अनमोल ग्रंथच         

            ९ ऑगस्ट क्रांतिदिनाच्याच दिवशी आमच्या घरात एक क्रांतिकारक जन्माला आले. आमच्या आयुष्यात क्रांती घडवणारे अनोखे व्यक्तिमत्त्व जन्माला आले तो हाच दिवस. आमचे बाबा आता ७४ वर्षांचे झाले. मला समजायला लागल्यापासून आमच्या सर्वांवर अतिशय प्रभाव असणारे आमचे बाबा अजूनही आमच्यासाठी मार्गदर्शकच आहेत. त्यांनी दिलेली शिकवण आम्हाला प्रगतीच्या दिशेने नेणारी ठरली. आमचे पिरगळलेले कान  याची साक्ष आहेत. 

          आमच्या पाठीवरील दिलेली प्रेमाची थाप आमच्या  अंगावर एक एक मूठ मांस चढवत गेलेली. त्यांनी दिलेला आश्वासक प्रत्येक शब्द त्यांनी पाळला . आज आपण शब्द देतो, पण किती पाळतो. परंतु बाबा शब्दाला पक्के. त्यांनी एकदा शब्द दिला कि काहीही झाले तरी , त्या दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी जीवाचा आटापिटा करतील पण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचा आत्मविश्वास प्रबळ. त्यांनी कधी कशात माघार नाही घेतली. सर्व कामे वेळच्या वेळी झाली पाहिजेत असा त्यांचा दंडक अजूनही आहे.

          त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदरयुक्त भीती आहे. त्यांनी आम्हाला नेहमी पुढे पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलेले आहे. कधी मागे ओढले नाही. आम्ही अभ्यासात नेहमी पुढे असावे यासाठी ते नेहमीच आग्रही भूमिका धरत. कधी कधी आम्हीच घाबरत घाबरत आमचे प्रगतीपत्रक दाखवत असू. चांगले गुण  मिळूनसुद्धा  ते प्रगतीपत्रक दाखवताना पोटात भीतीचा भलामोठा गोळा येई. आता बाबा काय म्हणतात कोण जाणे.पण त्यांनी आमच्याकडे पाहिलेली प्रेमाची नजर आमची भीती पळवून लावी. 

          आम्ही मग सर्वजण त्यांच्या मांडीवर बसून स्वर्गसुख घेत असू. त्यांची मांडी आमच्यासाठी राजाची गादीच असे. कारण त्यावर बसायला मिळणे ही साधी गोष्ट नव्हती. त्यावर मी बऱ्याचदा हक्क सांगत असे. त्यावरून आम्हा पाच भावंडांमध्ये वाद होत. पण मी काही केल्या माझे आसन सोडण्यास तयार नसे. शेवटी मी विजयी मुद्रा करून त्यांच्या मांडीवर ठाण  मांडून बसत असे आणि मी कसा जिंकलो आणि बाकी कसे हरले याचा आनंद घेत असे. म्हणून मी त्यांचा लाडका होतो असे नाही. त्यांना आम्ही सर्व भावंडे लाडकीच होतो. कोणालाही त्यांनी कधी कमी स्थान दिले नाही. 

          माझा छोटा भाऊ , आम्ही मोठी भावंडे त्याला न्हानू म्हणतो. त्याच्या उचापती करण्यामुळे त्याला बऱ्याचदा बाबांचा मार खावा लागला आहे. त्याच्यावर आईचे जीवापाड प्रेम होते. त्याला अचानक आकडी येत असे. तो रागाने आपले डोके भिंतीला किंवा जमिनीला आपटून घेत असे. त्यामुळे त्याला आईकडून कमरेवर घेऊन भरवणे होत असे. बाबा त्याला जवळ घेऊन समजावत असत. पण एकाच दिवसात तो ते विसरून जाई आणि आपल्या खोड्या सुरूच ठेवी. त्यामुळे त्याला प्रसाद मिळे. मार खाऊनही त्याला पुन्हा खोड्या करणे जमत असे. त्यामुळे त्याला बाबांची भीती वाटे. आपण कोणतीही गोष्ट केली तर बाबा आपल्यावर रागे भरतात असा  त्याचा समज त्यामुळे अधिक दृढ होत गेला. आता मात्र तो बाबांसाठी जे काही करतो आहे, ते बघून आम्हाला आमचा पूर्वीचा न्हानू आठवतो आणि त्याच्याबद्दलचा अभिमान अधिक दुणावतो. कारण आता आमचा न्हानू खूप ग्रेट झालेला आहे. त्याने फक्त बाबांबद्दल गैरसमज असतील तर ते घालवून शुद्ध व्हावे. कारण काहीही झाले तरी बाबा आपल्याला आपल्या  हिताचेच सांगतात. 

          न्हानूच्या नोकरीसाठी बाबानी केलेले प्रयत्न आणि त्यावेळी त्यांची होणारी घालमेल मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. बाबांनी आम्हा सर्वांना सुखात साथ दिलीच, पण दुःखात  ते आमच्या जास्त सोबत राहिलेले आहेत.

          मला डी एड ला पाठवण्याचा निर्णय त्यांचाच होता. त्यामुळे आज मी एक चांगला शिक्षक बनू शकलो. आमचे बाबा शिक्षक बनू  शकले नाहीत, काही काळ त्यांनी शिक्षकी पेशाचा अनुभव घेतलेला आहे, म्हणून त्यांचे स्वप्न होते कि माझ्या मुलांना मी शिक्षक बनविन. त्यांनी त्यांचे स्वप्न सत्यात उतरविले. आज त्यांचे दोन्ही मुलगे शिक्षक आहेत.  बाबा सगळ्यांना शिक्षकच वाटतात. त्यांनी शाळेत शिकवले कमी , पण आमच्या आयुष्यरूपी शाळेत त्यांनी आम्हाला वेळोवेळी जे शिकवले ते शाळेपेक्षाही अधिक लाखमोलाचे आहे. 

          त्यांच्याबरोबर माझे बऱ्याचदा वाद होतात, पण मी चुकीचा आहे हे मला नंतर पटते, पण माझे बोलणे ते सहन करण्याची शक्ती त्यांच्यात आहे. त्यांच्यासारखा मी कधीच होऊ शकत नाही.


            © प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )

No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...