Wednesday, December 30, 2020

शाळा सुरु होण्यातील स्वानंद

 कधी एकदा शाळा सुरु होते असे सर्वांनाच झाले आहे. मी तर एक शिक्षक आहे. मला लागलेली ओढ मीच सांगू शकतो. विविध संपर्क माध्यमे वापरून आता अगदी कंटाळा आला आहे. मुलांना मंदिरात बोलावून अभ्यास देत असताना मार्गदर्शन करावे लागे. एक दिवस आड करून मुलांशी संवाद साधताना मुलांनाही आपल्या घराचा कंटाळा आल्याचे प्रकर्षाने जाणवतय. 

मी सुद्धा घराचा कंटाळा येत होता म्हणून शालेय परिसराकडे जात असे. मुलेसुद्धा ठरवलेल्या ठिकाणी वेळेअगोदर येऊन वाट बघत थांबलेली असत. त्यांना अभ्यास करता यावा यासाठी थोडे सुलभीकरण करून देण्याचा प्रयत्न करत होतो. स्वाध्यायकार्डे, स्वाध्यायपुस्तिका , साप्ताहिक अभ्यासमालिका यांचा वापर करत होतो. मुले बऱ्यापैकी प्रतिसाद देताना दिसत होती. माझाही उत्साह अधिक वाढत चालला. पण कोविड नियमावलीचे पालन करावयाचे होते. त्यात गफलत करून चालणार नव्हती. 

घाबरत घाबरत मुले आणि शिक्षक यांचे अध्ययन,अध्यापन चालले होते. दर आठवड्याला शासनाकडे अहवाल पाठवायचा होता. तो खरा पाठवायचा होता.ज्या विद्यार्थ्यांशी संपर्क झाला नाही, त्यांचीही आकडेवारी भरायची होती. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क करण्याशिवाय पर्यायच नव्हता. मग काय, लागलो कामाला. सर्व पालकांचे संपर्क क्रमांक गोळा केले. त्यांना फोन केले. मुलांशी थेट वैयक्तिकपणे बोलायला सुरुवात केली. 

कधी एका विद्यार्थ्याबरोबर बराच वेळ बोलल्याने तेच तेच इतरांबरोबर बोलून तोंड दुखू लागले. मग सहा जणांचे ग्रुप करून कॉन्फरन्स कॉल करू लागलो. जरा काम सोपे झाले. पण गणित, विज्ञान असे विषय समजून देण्यात अडचणी येऊ लागल्या. त्यासाठी व्हिडीओ तयार करून यु ट्युब वर अपलोड केले. शाळेत असताना दिवसामध्ये सहा तास मुलांच्या समोर असणारा मी आता सकाळपासून रात्रीपर्यंत मुलांसाठी मी आज काय करू शकतो ? याचाच विचार करू लागलो.

यासाठी विविध उपक्रम राबवू लागलो. अर्थात सर्व उपक्रम राबवताना मुलांशी प्रत्यक्ष संपर्क न करता राबवताना माझी जी तारांबळ उडाली ती माझ्या घरातले बघत होते. त्यांनी मला खूप सहकार्य केले. गुगल फॉर्म पासून चाचण्या बनवून त्या दररोज स्टेटसवर ठेवू लागलो. त्याला अनेक शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही माझ्या गुगल चाचण्यांची वाट पाहू लागले. मलाही हुरूप येत गेला. मुले अभ्यास करतायत म्हणून पालकही खुश. पण शाळा ती शाळा. तिचं वेगळेपण काहीही केलं तरी जाणवतच होतं. आता शाळा सुरु होणार असं समजलं आणि माझा जीव भांड्यात पडलाय. कधी एकदा शाळा सुरु होते आणि माझे विद्यार्थी शाळेत येतायत असं मला झालं आहे. 


© प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )




No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...