Tuesday, October 29, 2019

भाऊबीज म्हणजे भावांसाठी आणि बहिणींसाठीचा आनंदमय दिवस

          असे अनेक दिवस साजरे केले जातात, पण भाऊबीज हा दिवस साजरा केला जातो तो फक्त बहिणींच्या आणि भावांच्या आत्यंतिक प्रेमभावनेचे प्रतीक म्हणूनच. भाऊ बहिणींकडे जातात, बहिणी त्यांना प्रेमाने ओवाळतात, साष्टांग नमस्कार करतात. आदरपूर्वक स्नेहभेट देऊ करतात. भेटवस्तू एक आठवणभेट असते. तिचे मूल्य करता येत नाही. ते अमूल्य असते प्रत्येकासाठी. माझ्या बहिणीने ती भेट दिलेली आहे, हा आनंद भावाच्या मनात सदैव दरवळत असतो. बहिणी वाट बघत असतात, भावांच्या येण्याची. त्यांना फक्त भावाचे येणे हवे असते. त्याने आणलेली भेटवस्तू त्यांच्यासाठी महत्त्वाची असली तरी त्याचसाठी भाऊबीज होत नसते. माझ्या घरी भाऊ आला याचा आनंद ती बहीण मिरवीत असते. दिवाळीच्या सर्व दिवसांमधील अत्यंत आनंदाचे क्षण असतात ते तिच्यासाठी. भावाचे आदरातिथ्य करताना काही चुकणार तर नाही ना, ही भीतीसुद्धा असते तिला. आपण दिलेली भेट माझ्या भावाला आवडेल तरी, कि भाऊ नाराज होईल असे अनेक प्रश्न तिला नेहमीच पडत असावेत.
          पण भाऊ मात्र निरपेक्ष भावनेने तिच्या घरी गेलेला असतो. आपल्या कुटुंबातील आनंद जपता जपता त्याला आपल्या बहिणींना सुद्धा सुखी पहावयाचे असते. तिच्या चेहऱ्यावरील आनंदाच्या लकेरी पाहण्यासाठी भाऊ तिच्या घरी धावून जात असतो. तो आपल्या मिळकतीमधील आपल्या बहिणीला साजेल असा उपहार नेण्याचा नक्कीच प्रयत्न करीत असतो. त्याची किंमत कमीसुद्धा असेल , पण त्यात भावाची माया भरलेली असते. ती वस्तू माझी लाडकी बहीण वापरणार आहे, हा विश्वास त्याला असतो. बहिणीचे सर्व कुटुंब सुखी बघताना भावाला जो आनंद होत असतो , तो आनंद फक्त भावांनाच माहित असतो. कधी भावाच्या डोळ्यात आनंदाचे उबदार अश्रू येतात. तो भाऊ हळुवार पुसून पुन्हा कुणाला जाणवू देत नसतो. अपार श्रद्धा असते त्याची आपल्या बहिणीवर. ती बहीण मोठी असो नाहोतर छोटी असो, बहीण म्हणजे आईच असते. आईनंतर लगेचच प्रेमाने कुरवाळणारी ती ताई असते किंवा आक्का असते. छोटी असली तर कुशीत शिरणारी पपी देखील असते.
           माझ्या बहिणी किती याचं  उत्तर संख्येत देणं चुकीचं ठरेल. कारण माझ्या अनंत बहिणी आहेत. ताई, आका, पपी , पिंक्या, बिंटा , आरती, सीमा, भारती , मुन्नी, सरिता, ज्ञानी, चित्रा , क्रांती, शांती, गायत्री, तृप्ती, नीलिमा, सुविधा, सुप्रिया, मनाली आणि बायग्या आका अशा सर्व बहिणी आज मला आठवतात. याचा अर्थ असा नव्हे कि त्या मला आजच आठवतात. प्रसंगानुरूप त्यांची आठवण येतच असते. पैकी चार बहिणींची लग्ने अजून झालेली नाहीत. बाकी सर्व बहिणी लग्न होऊन आपापल्या घरी सुखात आहेत. बहिणी सख्ख्या , चुलत, मामे, आत्ये असा भेद आमच्याकडून कधीच झाला नाही. तो कधी होणार नाही याची काळजी घेणं ही  आमची जबाबदारी असणार आहे. पण फक्त भाऊबीजेपुरतं भावाबहिणीचं नातं मला मान्य नाही. माझ्या दृष्टीने ज्या दिवशी माझ्या बहिणी माझ्या घरी येतील, तेव्हा तेव्हा माझ्यासाठी रक्षाबंधन आणि भाऊबीजच असते. म्हणूनच मी गेल्या वर्षांपासून माझ्या प्रिय बहिणींकडे जाण्याचे टाळायला लागलो आहे. माझे हे चुकीचे असेल कदाचित. पण काही बहिणींकडे गेलो आणि काही बहिणींकडे गेलो नाही तर  मात्र ज्यांच्याकडे गेलो नाही त्यांना वाईट वाटणे साहजिकच आहे. पण म्हणून काय माझ्या प्रिय बहिणींबद्दलचे प्रेम काही कमी होत नाही. उलट मी गेलो नाही म्हणून तर मला माझ्या सर्व बहिणी अगदी खूप जवळ आल्यासारख्या वाटत आहेत. त्यांच्या माझ्या बालपणीच्या आठवणी तर अगदी  ताज्यातवान्या होऊन माझ्यासमोर नाचू लागल्या आहेत. आज मला सगळ्या बहिणींचे फोन आले. शुभेच्छा मिळाल्या. मी धन्य झालो. माझ्या सर्व बहिणींची माया मला माझ्या आयुष्यात अधिक पुढे नेण्यासाठी बळ देते आहे असे म्हटले तर ती अजिबात अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण माझ्या सर्व बहिणी निःस्वार्थी आहेत, हे मी निक्षून सांगू शकतो. माझ्यावर  निरपेक्ष भावनेने प्रेम करणाऱ्यां माझ्या सगळ्या बहिणी मला महानच वाटतात. त्यांनी कधी आम्हा भावांचा राग केला नाही. भावांकडून कधीच कसलीच अपेक्षा ठेवली नाही. आम्ही फक्त त्यांच्यासोबत आहोत हा आधारच त्यांना हवा असतो. त्यासाठी त्या आसुसलेल्या असतात. आज माझा भाऊ न्हानू किंवा सर्वांचा अण्णा बहुतेक बहिणींच्या गृही जाऊन भाऊबीज साजरी केली. त्याने तो आनंद साजरा केला. तो दरवर्षीच जातो. कधी चुकवण्याचा प्रयत्न त्याच्याकडून होत नाही. जेवढे जमेल तेवढे सर्व बहिणींना खुश ठेवण्याच्या त्याच्या प्रयत्नांना माझे सलाम आहेत. तो माझ्यापेक्षा लहान असला तरी मनाने माझ्यापेक्षा खूपच मोठा आहे. तो रागावतो, रुसून बसतो, पण त्यात त्याचे प्रेमच लपलेले असते. तो जेव्हा खुश असतो, तेव्हा त्याचे डोळे पाहावे , मी असा खुश झालेला माझा न्हानू बऱ्याचदा पाहिला आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी तो माझ्याकडे आला  आणि मला घट्ट कडकडून मिठी मारली. त्यात जे प्रेम होते , ते त्याचे प्रेम मला सतत मिळत राहावे असे वाटत राहते. मी मोठा असल्यामुळे कधी कधी कठोर होतो, पण मी सुद्धा हळवा आहे. माझ्या भावाला उदंड आयुष्य लाभो. कधी कधी वाटते, आपल्या परमप्रिय भावाला भाऊबीज केली तर ? भावाभावांमधली नाती अधिक सुदृढ होण्यासाठी असेही घडायला हवे. आम्हाला भरपूर बहिणी आहेत, म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. ज्यांना बहिणी नाहीत त्यांचे काय होत असेल ? ज्यांना भाऊ नाहीत त्यांचे काय होत असेल ? कल्पनाच केलेली बरी. सर्व बहिणी आणि भाऊ जिथे असतील तिथे त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत. त्यांच्यावर येणारे संकट वळून आमच्यावर येवो, आणि त्या आलेल्या सर्व संकटांना पार करण्याचे सामर्थ्य सर्व भावांमध्ये येवो. सर्व माझ्या बहिणींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा बाळू किंवा लाडका दादा. 

No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...