Monday, January 18, 2021

नीज माझ्या नंदलाली

नीज माझ्या नंदलाली


          लहान मुलांना झोपवणं हे तसं अवघड काम. पण मनात आणलं आणि आवड असली तर तसं सोपंसुद्धा. प्रत्येकाच्या वैयक्तिक अनुभवावर ते अवलंबून असू शकतं. पण लहान मुलंसुद्धा अश्शी असतात अगदी !!! काहीही करा एकदा रडायला सुरुवात केली तर थांबता थांबत नाहीत. त्यांना कितीही आंजारा, कितीही गोंजारा. त्यांच्या मम्मीने घेईपर्यंत तोंड गप्प करणारच नाहीत. 

          माझंही तसंच झालं होतं. छकुलीला मी लहानपणापासून माझीच सवय लावली होती. दुपट्ट्यामध्ये गुंडाळून ठेवण्यापासून तिची शिशू काढण्यापर्यंत मी आनंदाने तिचे सर्वकाही करत होतो. अंगावर पिण्यापुरतीच ती मम्मीकडे जात असे. मला तिच्या सहवासात राहायला आवडे आणि तिला माझ्या. गोरीगोमटी गोंडस छकुली छान हसे. तिचे हास्य मला खुलवी. 

          तिच्या मम्मीच्या दुःखद निधनानंतर तिला सांभाळणे एक दिव्यच होते. शाळेत गेलो कि तिला माझी आई आणि छोटी बहिण छान सांभाळत. पण ती माझीच वाट बघत बसे. पप्पा कधी येणार असे विचारत राही. मी शाळेतून येताना बघितले कि धावत धावत माझ्या अंगावर येई. मी सुद्धा तिला आधी घेऊन तिचे समाधान झाल्यानंतरच हात पाय धुवायला जाई. तिला खाऊची गरज नसे पण माझी गरज असे. मी मग तिच्याशी बोलत राही. माझे बोलणे तिला इतके आवडे कि तीही तिच्या सगळ्या गोष्टी मला सांगत राही. 

          आता ती मोठी म्हणजे अठरा वर्षांची झाली आहे तरीही ती सगळ्या गोष्टी माझ्याकडे शेअर करते. रत्नागिरीला होस्टेलवर असताना मागील दोन वर्षे दरदिवशी रात्री नऊ ते साडेनऊ आमचा बोलण्याचा अर्धा तास असे. आता घरी आहे तर कधीकधी एवढेही बोलता येत नाही , तर ती माझ्यावर नाराजही होते. तिचे बरोबर आहे. आपल्या मुलांसाठी आपण वेळ दिलाच पाहिजे. अर्थात घरातल्या सगळ्यांसाठी वेळ दिला पाहिजे. घरातले सगळेजण माझ्याबरोबर बोलायला नेहमीच आतुर झालेले असतात. पण मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही ही माझी चुक आहे. या चुकीचे समर्थन मी सुद्धा करणार नाही. 

          आपण जे करतो ते आपल्या मुलांसाठीच ना ? आपल्या कुटुंबासाठीच ना ? मग त्यांच्यासाठी वेळ राखून ठेवायला नको का ? त्यांना काहीही नको असते, फक्त आपला अमूल्य वेळच हवा असतो आणि तो आपल्याकडे नसतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कितीतरी वेळ आपण मुलांसाठी, पत्नीसाठी, पतीसाठी, आईबाबांसाठी देऊ शकतो. फक्त ते मनात हवे. कधीकधी खुप काम असते. बोलायला , जेवायलाही वेळ नसतो. पण घरातले सर्व आपल्याला समजून घेतात ही माझ्यासाठी घेण्यासारखी गोष्ट असते. आपण आपले आपल्याच विश्वात दंग असतो. त्या विश्वाच्या कोशातून बाहेर यायला शिकायला हवे. 

          मी रोज रात्री माझ्या छकुलीला मांडीवर घेऊन बालगीते म्हणायचो. मला येणारी सगळी बालगीते संपली तरी ती कधीकधी झोपत नसे. आता दुसरं म्हणा , असं म्हणून मला गायला लावी. मग मी शक्कल लढवली. माझ्याकडे टेपरेकॉर्डर होता. त्यात बालगीतांची कॅसेट लावून ठेवू लागलो. अचानक लाईट गेली तर पुन्हा मलाच म्हणावी लागत. मांडीवर झोके देत , थापटवत असताना मग मलाही आणि तिलाही झोप येई. हे आता रोज रात्रीचे चालले होते.   

          तिच्या सगळी गाणी पाठांतर झाली होती. नंतर तर तीच मला म्हणून दाखवी. माझ्या कुशीत घट्ट मिठी मारुन झोपताना माझी बोटे ती आपल्या चिमुकल्या बोटांनी तितकीच घट्ट पकडून ठेवी. मध्यरात्री उठलो तरी तिची घट्ट इवली मुठ सोडताना तिला जाग कशी येई देव जाणे ? 

          आता माझ्या तिन्ही मुली मला माझ्या मुलाप्रमाणेच आहेत. दुसरी मुलगी गुड्डी आणि तिसरी उर्मी या दोन्ही मुली अगदी छकुलीच्या बालरुपातीलच आहेत. तिन्हींचे मेतकूट इतके छान जमते कि त्यांना एकत्र हसता,भांडताना , खेळताना बघून मी जगातील एक सुखी बाबा असल्याचा अनुभव घेत राहतो. कोणीही आपल्या मुलींना कधीच कमी मानू नका. रचनाकारांनी गाणीसुद्धा मुलांचीच बनवलेली आहेत. आपण ती बदलून मुलींची करुन म्हणावीत. जसे मी म्हणतो , " नीज माझ्या नंदलाली, नंदलाली गं ! ! ! !  "


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...