Monday, January 11, 2021

सागरा, प्राण तळमळला

सागरा प्राण तळमळला


          आमच्या घरातील सर्वांनाच भजनाची खूपच आवड आहे. माझ्या लहानपणी तर आमच्या  भजनात माझे एक चुलत काका पट्टीचे बुवा असल्यामुळे मला भजनाची गोडी निर्माण झाली. भजनासाठी आम्ही तहानभूक विसरुन भजन असेल तिथे जाण्याचा प्रयत्न करु. 

          माझे बाबा, चार काका, मी, माझा भाऊ आणि बुवाकाकांचे दोन मुलगे असे नऊजण उत्तम भजन करत असू. बुवाकाका पेटी छान वाजवत. माझे भाईकाका मृदुंग वाजवत. बालाकाका झांज वाजवत. आणि आम्ही उरलेले सहाजण उत्तम कोरस होतो. सुर, लय आणि ताल यांची चांगली जाण असलेले आम्ही बुवाकाका जे म्हणत ते लगेचच उचलून धरत असू.    

          बुवाकाकांचे दोन्ही मुलगे संगीतप्रेमी होते. वडिलांचे सर्व गुण त्यांच्यात भिनले होते असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. बुवाकाका सर्वगुणसंपन्न. ते मृदुंगही छान वाजवत. भाईकाकांच्या मृदुंगाचा ठेका चुकला तर ते पेटीच्या दोन कडांवर हाताने वाजवून ठेका समजावून सांगताना मी कित्येकदा बघितले होते. 

          बुवाकाकांचा मोठा मुलगा सागर. तो अभ्यासातही हुशार होता. आमच्याबद्दल बुवाकाकांना अतिशय आदर होता आणि आम्हालाही त्यांच्याबद्दल अजूनही आदर आहे. जवळपासच्या पंचक्रोशीत तर बुवाकाका प्रसिध्दच. त्यांच्या भजनासाठी लोक झोपलेले उठून येत असत. आम्ही गणपतीच्या अकरा दिवसात दररोज सरासरी पाच भजने करत असू. एका रात्रीत तर आम्ही सलग १० - ११ भजने करेपर्यंत पहाट झाली होती. 

          आम्ही चौघे लहान असलो तरी आमची भजनाची आवड आम्हाला स्वस्थ बसू देत नव्हती. माझा भाऊ न्हानू दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीची भजने म्हणून घर दणाणून सोडायचा. सोबतीला आम्ही असायचोच. बुवाकाकांच्या मोठ्या मुलाला सागरला आम्ही राजू किंवा ' राजग्या ' म्हणायचो. राजू खरंच सगळ्यांच्या मनांवर राज्य करणारा असाच. त्याला आमच्याकडे यायला खूप आवडायचे. आमच्याबरोबर खेळता खेळता तो मोठा कधी झाला ते समजलेच नाही. तो मोठा झाला आणि आमचे बुवाकाकांबरोबरचे संबंध बिघडले होते. तरीही तो आमच्याकडे येत असे. पण हळूहळू त्याचे आमच्याकडे येणे बंद झाले. त्याचा स्वभाव बदलला नसला तरी त्याच्या सवयी बदलल्या होत्या. त्याने दारु प्यायला सुरुवात केली होती. त्याचे दररोज दारु पिऊन घरी येणे आम्हाला खटकत होते. पण आम्ही काहीही करु शकत नव्हतो. तो आता खूपच प्यायला लागला होता. 

          छोटा असतानाचा राजू आणि आताचा पस्तिशीतला राजू पूर्णपणे बदलून गेला होता. आम्ही वर्षातून दोन तीन वेळा जायचो तेव्हा तेव्हा राजग्याचं हे दारुमय जीवन बघून पायाखालची जमीन सरकायची. सहज तोंडातून उद्गार यायचे , " कोण होतास तू , काय झालास तू ?  " आम्ही रागाने त्याच्याशी बोलणे टाळू लागलो. तो बोलण्याचा प्रयत्न करीत असे, पण मी जाणूनबुजून त्याच्याशी बोलत नसे. माझा भाऊ त्याला जाताना येताना गाडीवर घेत असे. दया येई म्हणून प्रसंगानुसार पैसेही देत असे. 

          मला तो ' दादा ' म्हणे. आता त्याने आपली हेअरस्टाईल बदलली होती. लांबलचक दाट केस आणि दाढीसुद्धा हातभर वाढलेली. डोळे सतत लालभडक तांबारलेले. त्याच्याकडे बघून त्याचा रागही येई आणि दयासुद्धा. आमच्याकडचे त्यांचे येणे जाणे बंद असले तरी आमच्या घरात कुणाचेही मयत झाले तरी बुवाकाकांनी आणि राजूने स्मशानात सर्वांच्या आधी हजेरी लावलेली मी बघितलेली आहे. 

          नुकतेच माझ्या चुलत बहिणीचे लग्न होते. आम्ही लग्नाला गेलो होतो. लग्न झाले. सर्वांची जेवणे झाली.स्वागत समारंभ पार पडला. अचानक माझा फोन वाजला. गर्दीच्या आवाजात मला तो समजला नाही. सहज बाहेर आलो. फोन हातात घेतला. तीन मिस कॉल होते. एका नातेवाईकांचा फोन आला होता. मी त्यांना उलट फोन केला. 

          त्यांनी मला सांगितले , " सर, एक वाईट घटना घडली आहे. तुमच्या बुवाकाकांचा मोठा मुलगा ऑफ झाला. " मी त्यांना पुन्हा विचारले तरीही त्यांनी तेच उत्तर दिले. त्यावेळी मला अगदी लहानपणीचा तो ' राजू ' आठवला. तो निरागस , गोंडस राजू. 

          आधी राजू दारु पिऊ लागला होता आणि नंतर दारुच त्याला दररोज पित होती. दारु पिण्यासाठी त्याची पावले दिवसातून एकदातरी अड्ड्याकडे वळत होती. शेवटी दारुनेच त्याचा घात केला. त्याने दारुत स्वतःला बुडवून घेतले. आता दारुनेच त्याला कायमचे बुडवले होते. त्याचा दारुण मृत्यू झाला आणि त्या सागराचा प्राण कायमचा तळमळला. एक चांगला सागरच सागरात बुडाला. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...