Sunday, January 31, 2021

टुमक्या

 टुमक्या


          लग्नात वाजंत्री मंडळाला त्याकाळी खूप मागणी होती. ' याचं वाजवलं, त्याचं वाजवलं ' अशी आपली प्रसिद्धी प्रत्येक वाजंत्री मंडळ करत असणार. आमचेही वाजंत्री मंडळ त्याला अपवाद नव्हते. आमच्या गावकडच्या वाडीत काही ठराविक हौशी तरुण ढोल, ताशा, ढोलकी इत्यादी आवड म्हणून वाजवत. या आवडीचे रुपांतर हळूहळू व्यवसायात कधी झाले ते त्यांना समजलेही नाही. 

          लोकं लग्न वाजवायला बोलवत कि हे आनंदाने निघालेच म्हणून समजा. पैसे मिळवणे हे एकमेव उद्दिष्ट नव्हते. तर शब्दाला किंमत देऊन त्यांच्या लग्नात जाऊन आपली वादन कला दाखवणे असाही सुप्त उद्देश होता. अर्थार्जनाबरोबर वाडीची आणि वादकांचीही प्रशंशा होत होती. प्रशंशा वाढत चालली. 

          प्रसिद्धी कणकवलीपर्यंत येऊन पोहोचली. वाजवणारे चार पाच लोक असत. हळूहळू कामधंद्याच्या निमित्तानं त्यातील एखादी व्यक्ती नसली तर तिथे अचानक एखादा नवीन वादक शोधावा लागे. मी आणि माझा भाऊ हे नवीन वादक बनलो होतो. माझा भाऊ न्हानू ढोलकी तालात वाजवायचा. 

          मी आपला टुमके वाजवणारा. टुमके म्हणजे ' टुम टुम ' असा आवाज करणारे एक छोटेसे वाद्य असे. टुमके या वाद्याला आम्ही मालवणी भाषेत ' टुमक्या ' म्हणत असू. हे वाद्य खूप हलके असते. काठीने फक्त दोन तीन सेकंदांच्या अंतराने बडवत राहायचे असते. इतर वाद्यांची गती वाढली कि आपणही टुमक्याची गती वाढवायची असे करत राहायचे. मोठ्या माणसांना याचा सराव असे. आम्ही शाळेत शिकत असल्याने लग्नातच आमचा सराव आणि रंगीत तालीम दोन्ही लाईव्ह चाले. ठेका चुकला तर आमचे तिन्ही काका  मला डोळ्यांनी खुणावत. बरोबर ठेका पडला तर ते माझ्याकडे प्रेमाने बघत , मग तर मी अधिक तालात येई. 

          आम्हांला खेड्यापाड्यातील लग्नांच्या जास्त आॕर्डरी असत. मला एका लग्नाला टुमके वाजवल्याबद्दल १०० ते १२० रुपये मिळत. मे महिन्यात सलग सात आठ लग्ने वाजवल्यानंतर पैसे मोजताना ते खूप वाटत. भरपूर पैसे मिळाल्याबद्दल बाबांकडून शाबासकी मिळे. मिळालेले पैसे आम्ही बाबांकडेच देत असू. बाबा ते आमच्या शिक्षणासाठी वापरायला देत. 

          बाबांनी आमच्या कष्टाचे पैसे कधीच स्वतःला घेतले नाहीत. पैसे मिळतात म्हणून आम्ही कधीकधी शाळेला दांडी मारुन लग्न वाजवायला जात असू. आम्ही लग्न समारंभात वाजंत्री मंडळातील आहोत असे समजल्यामुळे वराकडील किंवा वधूकडील मंडळी आम्हाला बाहेर बाजूला जेवायला वाढीत. मग आमच्या ओळखीचे लोक त्यांना ओरडत व आम्हांला सर्वांसोबत पंगतीत जेवण्याचा बहुमान मिळे. 

          त्यावेळी लहानपणीही वाटायचे , कि आपण सगळीच माणसे सारखीच आहोत, तरी हा वर्णभेद , जातीभेद का ? आपल्याच काही बांधवांना आत आणि काही बांधवांना बाहेर जेवण का देतो ? आपण माणुसकी हा धर्म पाळत नव्हतो हे त्यावेळीही आमच्या बालमनावर तीव्र आघात करणारी गोष्ट होती. 

          आम्ही नाभिक समाजाचे आहोत, म्हणूनही आम्ही अवमान सहन केलेला आहे. दाढी, केस स्वच्छ करताना आम्ही यांचे संपूर्ण डोकेच हातात घेतो, तरीही आम्ही कमी याची बोच मनात सतत टोचतच राही. टुमक्याच्या प्रत्येक आघाताबरोबर ही बोच वाढत चालली होती. पण मनात पक्के ठरवले होते कि कोणतेही काम प्रामाणिकपणे करायचे. 

          कणकवलीच्या लग्नाची आॕर्डर होती. वधुपक्षाकडून बोलावणे होते. त्यादिवशी शाळेला सुट्टी नव्हती. टुमक्या वाजवणारा उपलब्ध नव्हता. मला सांगण्यात आले. मी शाळेला दांडी मारुन टुमक्या वाजवण्यासाठी वधुपक्षाच्या घरी दाखल झालो. 

          वधुकडील मंडळी वाजतगाजत लग्न कार्यालयाकडे चालली. कार्यालय अगदी जवळ आले होते. लग्न कार्यालय म्हणजे आमचे एस्, एम्. हायस्कूल होते. खालच्या प्रार्थनाहाॕलमध्ये साध्या पद्धतीने लग्न समारंभ होता. वरच्या मजल्यांवरील वर्ग सुरु होते. मी ' टुमक्या ' वाजवत वर्गाच्या खालून मान खाली घालून निघालो होतो. 

          मान खाली घालून अशासाठी कि माझे मित्र मला वरच्या खिडकीतून बघून हसत होते. मला त्यांच्या हसण्यामुळे लाज वाटत होती. एक दोनदा त्यामुळे माझा ठेकाही चुकला होता. पण काकांनी माझ्याकडे डोळे वटारुन पाहिले होते. त्यामुळे ठेका चुकवून आणि लाजूनही चालणार नव्हते. शाळेला दांडी मारुन राहिल्याबद्दल वाईट वाटत होते. शिक्षकांनी मला बघितले तर ओरडणार म्हणून भिती वाटत होती. 

          पण हळूहळू धीर चेपला. गावाकडे ओळखीच्या माणसांची लग्ने वाजवताना लाजलो नाही , तर आता तरी का लाजावे ? मनाशी ठाम निश्चय केला , " वाईट करताना लाजावे, चांगले काम करताना अभिमान बाळगावा." त्यानंतर मी अशी अनेक लग्ने वाजवताना कधी लाजल्याचे आठवत नाही. लोकं हसतात , तेव्हा त्यांचे दात दिसतात , आपण शांत चित्ताने ते दात बघत राहावेत. कारण नंतर ही हसणारी माणसे आपल्यासाठी अभिमानाने टाळ्या वाजवतानाही मी प्रत्यक्ष अनुभवली आहेत. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



खामकरांचा खाऊ

 खामकरांचा खाऊ


          मराठी शाळेतून हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी जाताना माहेराकडून सासुरवाडीला गेल्यासारखे होते. पूर्वी मराठी शाळेत बसण्यासाठी साधी सारवलेली जमीन किंवा कोबा असे. 

          हायस्कूलमध्ये आरामात बेंचवर बसायला मिळणार याचा अधिक आनंद असल्यामुळे आम्हा मुलांना कमालीचे आकर्षण असे. नवीन गणवेश, नवीन मित्र , नवीन सर, नवीन मॕडम , नवीन वर्ग हे कधी एकदा बघायला आणि अनुभवायला मिळते असे होऊन जाई. तासिकेप्रमाणेच पुस्तके , वह्या न्याव्या लागणार होत्या.मोजकी पुस्तके, वह्या हातातून नेणारी मुलेही पाहायला मिळत. 

          पहिल्या दिवशी हजर राहून पहिली बेंच पकडण्यासाठी स्पर्धा लागे. आमचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण कणकवली नं.३ शाळेत झाले होते. गांगोवाडीत भाड्याने राहायचो. तिथून एसेम्हायस्कूल ( एस्.एम्. हायस्कूलचे लघुरुप ) जवळ होते. त्यावेळी आम्हाला त्याचा लाँगफाॕर्मही माहित नव्हता. 

          आम्ही अजूनही ' एसेम्हायस्कूल ' च म्हणतो. तेथे आम्हाला एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व पाहायला मिळणार होते. आता असे व्यक्तिमत्त्व अभावानेच पाहायला मिळत असावे. खामकरसर हे नाव ऐकून होतो. खामकरसर पाहायला मिळणे सर्वांनाच सोपे होते. पण त्यांना परिपूर्ण जाणून घेणे ही अवघड गोष्ट होती. 

          मी आठवीच्या एच् तुकडीत दाखल झालो. आमचा वर्ग तिसऱ्या मजल्यावर होता. पहिला दिवस अगदी मजेत गेला. माध्यमिक शिक्षणाला सुरुवात झाली होती. मुलांचे, मुलींचे घोळकेच्या घोळके शाळेकडे येत होते. त्यात मीही बुटका दिसतही नव्हतो. मधल्या सुट्टीत सर्वजण कँटिनमध्ये आले होते. मी ही आलो. रस्त्याच्या पलिकडेच कँटिन होते. 

          मी आपला कँटिनमधल्या तळलेल्या भज्यांचा वास घेत होतो. माझ्या मित्रांनी पैसे आणले होते. त्यांनी पटापट पैसे काढले. भजी खाल्ली. मी त्यांच्याकडे बघत होतो. मलाही भजी खावीशी वाटत होती. पण पैसे नव्हते. मित्रांनी भजी संपवली व वर्गात जायला निघाले. मी इतर काहीतरी बघत राहिलो होतो. असाच रेंगाळत असताना माझ्या पाठीवर एक उबदार हात पडला होता. 

          मागे वळून बघितले तर एक भारदस्त व्यक्तिमत्त्व उभे होते. त्यांनी बहुदा माझी समस्या जाणली असावी. त्यांनी लगेच एका भजीची आॕर्डर दिली होती. माझ्या समोर गरमागरम भज्यांची प्लेट आली. मी त्या गृहस्थांना ओळखत नव्हतो. मी संकोचलो. माझा हात अलगद पुढे झाला. मी एक भजी उचलली. चवदार भजी मी संपवून टाकली. नंतर बघतो तर ते भजी देणारे गृहस्थ शाळेच्या दिशेने दिसेनासे झाले होते. 

          मी वर्गात आलो. सर्वांना सांगितले. माझ्या वर्गातील एका ज्येष्ठ मुलाने मला त्यांचे नाव सांगितले. मी चक्रावूनच गेलो होतो. ते ' खामकरसरच ' होते. एका प्रसिद्ध प्रशालेचे मुख्याध्यापक खामकरसर असे विद्यार्थीप्रिय म्हणूनच असावेत यावर माझा विश्वास बसला. त्यानंतर खामकरसरांशी माझा अनेकदा संपर्क आला. त्यांनी आम्हाला वर्गावर येऊन शिकवले नाही. 

          सुट्टीत ते आम्हांला बोलवत. इंग्रजी करसिव लिपी सुलेखन पुस्तिका आमच्याकडून गिरवून घेत. आठवीपासून मी इंग्रजी रनिंग लिपी लिहू लागलो. पुढे मी नववीत असताना माझे हस्ताक्षर पाहून कणकवली काॕलेजमधील पंधरावीच्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे माझ्याकडून लिहून घेतली गेली. मला हे भाग्य मिळाले ते खामकरसरांमुळेच. 

          दर रविवारी खामकरसर आमचा हस्ताक्षराचा क्लास घेत. क्लासला आलेल्या सर्व मुलांना खामकरसरांकडून खाऊ मिळे. शिक्षणाचा खाऊ आणि खायचा खाऊ देणारे खामकरसर आम्ही कधीही विसरु शकणार नाही. आज मीही शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांचा हा गुण माझ्यात आणण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करतो तो त्यामुळेच.


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Saturday, January 30, 2021

के फोर हंड्रेड

 के फोर हंड्रेड


         प्रत्येकाच्या आयुष्यात जशी माणसं येतात, तशा गाड्यासुद्धा. माणसांशी नाती घट्ट होतात, तशीच गाड्यांशीही. फक्त माणसं सजीव असतात, ती बोलू शकतात. गाड्या निर्जीव असतात, त्या बोलतात यावर कोणाचाही विश्वास कसा बसणार ? आपण सायकलीपासून विमानापर्यंत विविध वाहतुकीची साधने विकत घेतो. 

          विकत घेतलेले वाहन आपला मित्र बनून जातं. त्या वाहनावर आपला जीवच जडतो. आता तर सगळ्यांकडेच अशी वाहने दिसत आहेत. टू व्हिलर, थ्री व्हिलर, फोर व्हिलर अशा चाकांची वाहने आपण सर्रास वापरतो. टू व्हिलर वाहनांचा तर कचराच झाला आहे. जागोजागी या टू व्हिलर गाड्यांचे ट्राफीक जाम झाल्याचे दिसून येते. 

          मलाही माझी स्वतःची टू व्हिलर असावी असे वाटत होते. वाटायला काहीच हरकत नव्हते . पण ते सहजच अमलात आणणे सोपी गोष्ट नव्हती. मी नोकरीला लागून ४ वर्षे होऊन गेली होती. मला आता टू व्हिलर गाडीची जास्त गरज भासू लागली होती. कोणीही अशा गाड्या विकत घेताना दिसत होते. मला मात्र एक साधी टू व्हिलर घ्यायला जमत नव्हते. त्यावेळी पगारही कमी होता. पण गाड्यांच्या किमतीसुद्धा कमी असल्या तरी मला त्या नेहमीच जास्त वाटत आलेल्या. 

          लग्न झाल्यानंतर गाडी घेण्याची इच्छा जास्त प्रबळ झाली. लग्नासाठी खर्चही झाला होता. माझ्या पत्नीने त्यासाठी रोख दहा हजारांची मदत केली. लग्नानंतर दोन महिन्यातच नागपंचमीच्या दिवशी आमच्या घरात पहिली टू व्हिलर आली. नुकताच एक नवीन शोरुम उघडला होता. त्या शोरुममध्ये कायनेटीकच्या टू व्हिलर्स होत्या. मी त्यातली ' के फोर हंड्रेड '  ही बाईक निवडली होती. लाल कलरची ही बाईक दिसायला छानच होती. माझ्या ती आवडीची बनली. मी ती फायनान्सने घेतली. गाडी बटनस्टार्ट होती. रत्नागिरीत असतानाच टू व्हिलर शिकल्याचा फायदा झाला होता. लायसेन्स काढले. गाडी चालवू लागलो. 

          आता माझी स्वतःची गाडी होती. घरात एक नवीन पाहुणी आली होती म्हणून तिचे जंगी स्वागत झाले होते. रोज तिला धुवून पुसून स्वच्छ ठेवत होतो. माझ्यापेक्षा मी माझ्या नव्या गाडीकडे जास्त लक्ष देऊ लागलो होतो. गाडीचे ॲवरेज ताशी नव्वद किलोमीटर मिळत होते. माझी गाडी दररोज ९० किलोमीटर पळत होती. कणकवली ते गढिताम्हाणे दादरावाडी शाळा ४५ किलोमीटर होती. यायला जायला नव्वद किलोमीटरचा प्रवास होई. रोज घरी यायला मिळत होते. शनिवार रविवार बायकोला फिरवायला नेताना गाडीचा चांगला उपयोग होत होता. सोमवारी पत्नीला बसपर्यंत सोडण्यासाठी गाडी उपयोगी पडे. पुन्हा आठवडाभर पत्नी नोकरीच्या ठिकाणी दाणोली येथे असे. 

          मला पत्नीची तीव्र आठवण आली कि माझी गाडी मला दाणोलीपर्यंत घेऊन जाई. पत्नी जवळ नसताना गाडीच माझी पत्नी झाल्याप्रमाणे साथ देत असे. त्यावेळी पेट्रोल २७ रुपये लीटर होते. दररोज ३० रुपयांचा पेट्रोलखर्च होई. पण बजेटमध्ये बसे. पत्नीची बदली झाल्यानंतर आम्ही पाटगांव येथे राहू लागलो. आता गाडीने आमचे जगणे सुसह्य बनवले. खेड्यात स्वतःची गाडी असणे हे अजूनही प्रतिष्ठेचे मानले जाते. 

          आमच्यासाठी गाडीचे असणे प्रतिष्ठेपेक्षा गरजेचे जास्त होते. गाडीने भरपूर प्रवास केला होता. पहिल्या वर्षाला ती वीस हजारपेक्षा जास्त किलोमीटर धावली असेल. पुढील सहा वर्षात ती लाखाच्या पुढेच गेली. माझ्यासाठी माझी गाडी परमप्रिय अशीच होती. ती वाटेत कधीच बंद पडली नाही. जवळ गॅरेज बघून ती बंद पडलेली मी स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे. 

          मी तिच्यावरुन पडलो तरी मला काहीच लागले नाही. गाडी बाजूला टाकून मी उभा राहत असे. गाडीलाही काही जास्त दुखापत होत नसे. माझी गाडी ' माझी लक्ष्मीच' होती जणू. तिच्यासोबतचे माझे ते अविस्मरणीय क्षण आठवले कि आजही अंगावर काटा येतो. त्यानंतर मी चार पाच गाड्या घेतल्या असतील , पण त्या पहिल्या ' के फोर हंड्रेड ' ची सर कोणालाच आलेली नाही. माझ्या जीवनाला गतीमान करण्यात त्या निर्जीव गाडीने दिलेली साथ म्हणून मला मोलाची वाटते. 

          ती गाडी फक्त मीच वापरली नाही तर माझ्या भावानेही वापरली. त्याच्यासाठी ती गाडी पहिली मैत्रीणच ठरली होती. त्यानंतर ती गाडी माझ्या मेहुण्याने वापरली. ती गाडी त्याची बहिणच झाली. त्याची सख्खी बहिण काळाने हिरावून नेली होती, पण ज्या गाडीवर त्याच्या स्वतःच्या बहिणीने सात वर्षे प्रवास केला होता ती गाडीच त्याची बहिण झाली होती. अशी ही माझी गाडी माझ्या आयुष्यातील एक सहचारिणीच होती असे म्हटले तरी चुकीचे ठरु नये. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Saturday, January 23, 2021

सर्जनशील अनिलसाहेब

सर्जनशील अनिलसाहेब

          माझी आणि अनिल अणावकर यांची ओळख कणकवली नं.३ शाळेत शिकत असल्यापासूनची आहे. पण आता ती ओळख गेल्या चार पाच वर्षात खुप दृढ झाली आहे. आमच्या लहानपणी आम्ही त्यांचे वडील म्हणजेच अणावकरगुरुजींची भाषणे ऐकत मोठे झालो आहोत. 

        अणावकरगुरुजींचा व्यासंग दांडगा होता. त्यांना माहित असलेल्या विषयांबद्दल ते भरभरुन बोलत. त्यांनी सानेगुरुजी कथामालेत सांगितलेली कथा मला सांगताना मला ते आता जसेच्या तसे दिसत आहेत. शुभ्र पांढरे कपडे परिधान केलेले आणि काळ्या फ्रेमचा चष्मा लावून हावभावासह कथा सांगणारे अणावकरगुरुजी म्हणून माझ्या मनात ते लहानपणीच फिट बसलेले होते. 

          अशा या आदर्श आणि सुप्रसिद्ध असलेल्या अणावकरांच्या देखरेखीत मोठे झालेले आमचे मित्र अनिल आमच्यासाठी आदर्शच आहेत. ब्युटीपार्लरचे आधुनिक शिक्षण घेऊन त्यांनी सुरु केलेले ' अनिल हेअर ड्रेसर्स ' हे त्याकाळातील सिंधुदुर्गातील पहिले अद्ययावत सलून असावे. कणकवलीत तर त्यांच्या सलूनचा बोलबाला अजूनही आहे. त्यांचे वडिल सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे सल्लागार म्हणून काम करत. वरिष्ठ पातळीवरील उच्च पदस्थ अधिकारी वर्ग त्यांच्या अधिक परिचयाचे असत. त्यांचे नाव सांगून अनेकांनी आपली कार्यालयातील न होणारी कामे करुन घेतल्याचे त्यांनीच मला एकदा सांगितले होते. मलाही त्यांनी माझ्या लहान बहिणीच्या शिक्षणाच्या वेळी प्रवेश मिळताना अडचण आल्यास माझे नाव सांगून काम करुन घ्या असे सांगितले होते. पण भितीपोटी मी वरिष्ठांना भेटायला गेलो नाही. अर्थात त्यामुळे माझ्या बहिणीला प्रवेश मिळाला नाहीच. अणावकरगुरुजींची ओळख सांगितली असती तर माझ्या बहिणीचा प्रवेश झाला असता तर !!! याचा मी विचारच केला नाही. मी माझा अहंभाव बाजूला ठेवला असता तर ? पण त्यावेळी माझी वृत्तीच मला अडसर ठरली होती. हे अणावकर कुटुंबाला माहितही नसेल. 

          सगळेजण गुरुजींना बाबा म्हणत, अजूनही म्हणतात. मी पाटगांवला असताना तिथले बबनरावही महिन्यातून एकदा तरी बाबांना भेटायला येत. नाभिक संघटनेतील त्यांचे सक्रिय काम मी खूप जवळून पाहिले आहे. आता आम्ही नवीन तंत्रज्ञान वापरुन प्रसिद्धी देतो. त्यावेळी जलदगतीची प्रसारमाध्यमे नसतानाही त्यांनी संघटना वाढवली होती.रात्रंदिवस लेखन करुन व शनिवार , रविवार दौरे करुन त्यांनी नाभिक संघटना सर्वदूर पोहोचवली. ते प्रत्येकवेळी पुढे नसले तरी तेच खरे सुत्रधार होते. त्यांनी अनेक उत्तम कार्यकर्ते घडवलेले मी पाहिले आहेत. नंतर त्यांचे कामाचे व्याप इतके वाढले कि निवृत्त झाल्यानंतरही त्यांना अजिबात वेळ पुरत नसे. तरीही त्यांचे लेखन, भाषण सुरुच होते. 

          अशा या हरहुन्नरी गुरुजींचा लहान मुलगा अनिल. अणावकरगुरुजींची समाजात ओळख असताना अनिलसाहेबांना आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करायची होती. अनिलसाहेबांनी कणकवलीत आपली ओळख ठळकपणे निर्माण केली. अनिल हेअर ड्रेसर्सचे नाव त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मोठे केले. 

          आज अनिल अणावकर नावाचा एक ब्रँड आहे असे म्हटले तरी वावगे ठरु नये. त्यांच्या सलूनात काम करुन नवनवीन कला कौशल्ये शिकून अनेक कारागिर एक्स्पर्ट बनलेले मी पाहिले आहेत. त्यांचे सलून म्हणजे एक प्रशिक्षण शाळाच होती. त्यांनी अनेक हेअर डिझायनर घडवले आहेत. अनेक सेमिनारांमध्ये अकुशलांना कुशल बनवले आहे. सलूनकाम शिकण्यासाठी पुढे सरसावलेल्या प्रत्येकामध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे.

          हळूहळू अनिलसाहेबांनी नाभिक संघटनेतही जोर धरला. उभे राहून आपले म्हणणे ठामपणे मांडू लागले. त्यांनी आपल्या बाबांचे व्रत सुरु ठेवले. बाबांनी दिलेला वसा ते जोपासत आहेत. कणकवली नाभिक संघटना मजबूत करण्यासाठीही त्यांनी आपले निवासस्थानच कार्यालय म्हणून कायमचे दिलेले आहे. आता गेली अनेक वर्षे जिल्हा संघटनेत त्यांना मानाचे स्थान आहे. 

          जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी अनेक उत्तम कामे केली आहेत, करत आहेत. त्यांना आज ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचे काम दिवसेंदिवस अधिकाधिक वृद्धिंगत होत जावो अशी भालचंद्रचरणी प्रार्थना करतो.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Friday, January 22, 2021

नकय नकय जावया

नकय नकय जावया


          आपण आपल्या इच्छा प्रत्येकवेळी सांगत बसत नाही. मनात ठेवून राहतो. पोटातली इच्छा ओठात येत नाही. तुमच्या ओठातून बाहेर आल्याशिवाय ती दुसऱ्यांना समजणार तरी कशी ? लहानपणापासून असेच होत राहते. इच्छा आकांक्षांची मोठीच्या मोठी लांबलचक यादी आपण आपल्यालाही कळू देत नाही एवढी लपवून ठेवतो. 

          मनात आलेली गोष्ट बोलण्याचा संकोच करत राहतो. यांना काय वाटेल ? त्यांना काय वाटेल ? असे विचार मनातल्या मनात करत राहतो आणि कधीकधी विसरुनही जातो कि आपण कोणत्या इच्छा मनात आणल्या होत्या ते !!!! काहीजण तर आपल्या इच्छा सतत मारण्याचं काम करत असतात. इच्छा असायलाच पाहिजेत. त्या चांगल्या असल्या पाहिजेत. त्या वाईटही असू शकतात. 

          वाईट इच्छा मात्र नक्कीच मारुन टाकाव्यात. त्यांना जवळ फिरकू देऊ नये. पण ज्यांना सोडायचं असतं त्याच आपण होऊन वेगाने मागे लागत असतात. त्यामुळे त्यांना सोडणंही शक्य नसतं. चांगल्या इच्छांचं सतत संवर्धन करत राहायला हवं. त्यांचं प्रबळ महत्त्वाकांक्षेत रुपांतर करायला हवं. त्या पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करुन तर बघा. त्या लवकरच पूर्ण होऊ लागतील. 

          अर्थात त्यासाठी आपल्याकडे कमालीचा संयम हवाच. ' इच्छा तिथे मार्ग ' असं सुवचनच आहे. इच्छाशक्ती असली तर सगळी योजलेली कार्ये हवी तशी घडू लागतात. सगळीच नाही साध्य होत , पण आपण प्रयत्न करण्यात कमी पडलो असं होऊ नये. आपण त्यांचा आपल्या गतीने पाठलाग करत राहायला हवं. कधीतरी सापडणार नक्की. आपला वेग त्या इच्छेला गाठणारा हवा. 

          नुसती इच्छा बाळगली आणि बसून वाट बघत राहिलो तर काहीच घडणार नाही. ' असेल माझा हरी , तर देईल खाटल्यावरी ' असं म्हणणारे सतत मागे राहीलेले मी पाहिले आहेत. ते सगळ्याला मुहुर्त बघत बसतात. आज शनिवार आहे म्हणून नाही करायचे अशी इच्छा बाळगतात. सगळे शनिवार फुकट घालवतात. ' न कर्त्याचा वार शनिवार ' ही म्हण त्यांना खरी करुन दाखवायची असते जणू. एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती लगेच अंमलात आणा. 

          वार आणि मुहुर्त बघत बसू नका. तुम्ही जन्माला येताना मुहुर्त बघून जन्माला आलात का ? नाही ना ? मग झालं तर .... तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कामाला सुरुवात कराल तो चांगला मुहुर्त आणि चांगला दिवस. सुरुवात करुन बघा , नको नको म्हणत वेळ दवडू नका. 

          एकदा एक जावई सासरवाडीला आले होते. त्यांच्यासाठी छान बेत केला होता. सासुबाईंनी व्हायनात ( मालवणी शब्द ) तीळ कुटून मस्त तिळकूट बनवलं होतं. जावयांच्या नाकात तो खमंग वास भरला होता. जेवायला वाढण्यात आले. जावई भरपूर जेवले. आग्रह करण्यात आला. संकोचून जावयांनी तिळकुट थोडेच खाल्ले. पण तिळकुटाची चव काही त्यांच्या चवदार जीभेवरुन जाता जाईना. सगळे झोपले. 

          जावई मात्र झोपेत जागे होते. डोळे मिटून सगळ्यांच्या झोपण्याची वाट पाहत झोपलेले. सगळे गाढ झोपलेले लक्षात येताच जावई मांजराच्या पावलांनी व्हायनसळापर्यंत वास काढत पोहोचले. जाता जाता सासुबाईंना त्यांचा पाय लागला होता. जावयांच्या ते लक्षात आले नाही. ते आपले आपल्याच तंद्रीत. व्हायन सापडले. जावयांनी योगा करायला सुरुवात केली. पोटावर झोपून ते मकरासन करु लागले. 

          सासुने हळूच उठून कानोसा घेतला. बघते तर काय ? जावई अंथरुणात नाहीत. अरे बापरे !!! आमचे जावई अंधारात चालतात कि काय असे तिला वाटले. ती त्यांच्या मागून गेली. अंधुक दिव्याच्या उजेडात स्पष्ट दिसत नव्हते. पण हालचाली जाणवत होत्या. आपले जावई रात्री योगाभ्यास करत असावेत असे तिला वाटले. तीने आणखी पुढे जाऊन बघितले. तिला मांजरासारखा चाटण्याचा आवाज आला. तिने खाली वाकून पाहिले तर तिचे जावई जमिनीला चिकटलेल्या व्हायनातील उरले सुरले तीळ चाटत होते. तिळकुटाचा आस्वाद घेत होते. सासू गालातल्या गालात हसली व परत जाऊन झोपली. 

          सकाळी सगळेजण उठले. जावईसुद्धा उठले. त्यांच्या जीभेवर अजूनही तिळकूटाची चव रेंगाळत असावी. सासूने जावयांना गमतीने म्हटले , " नकय नकय जावया , व्हायन चाटून खावया " हे ऐकताच जावयाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. जावयाची पुरती फजिती झाली होती. 

          अशा अनेक घटना आपल्या जवळपास घडत असतीलही. पण इच्छा असताना नको नको म्हणणे बरे नाही. नाहीतर इच्छा उफाळून येते आणि अशी फजितीही होऊ शकते. ही एक गंमतगोष्ट आहे. घडलेली असेल किंवा नसेलही. पण कित्येक माणसं या जावयांप्रमाणे असू शकतात. त्यांनी  " कशाला , कशाला " म्हणत लाजत राहू नये. हवी असलेली वस्तू विनंती करुन थेट मागावी. कधीकधी  जेवणाच्या पंगतीमध्ये असाही आग्रह केला जातो, " लाजू नका, मागू नका , पोटभर जेवा. " आता काय जेवणार कप्पाळ !!!! जेवढ्या इच्छा दाबून ठेवाल , त्या कधीतरी उचंबळून वर येतील. आपण त्यावर योग्य नियंत्रण ठेवणे हे आपल्या आणि आपल्याच हातात आहे. नाही का ?


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Thursday, January 21, 2021

केक आॕफ धीवर

 केक ऑफ धीवर


          वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. तो दिवस मस्त साजरा करावा असं प्रत्येकाला वाटत असणार. लहान मुलांना तर त्याचं किती अप्रुप !!! त्या दिवसाची तर ती आतुरतेने वाट पाहत असतात. आता तर त्यातून मोठेही सुटलेले नाहीत. अगदी म्हातारे आजोबा देखील या दिवसाची वाट पाहत असावेत. 

          पहिला वाढदिवस साजरा होत असताना मुलांना तितकेसे कळत नाही. खुप कमी जणांना आपला पहिला वाढदिवस आठवत असेल. एक वर्षाच्या वयात काहीच समज नसते. दुसऱ्या वाढदिवसापर्यंत समज आलेली असते. त्यामुळे दुसरा वाढदिवस मुले लक्षात ठेवतात. मग दरवर्षी वाढदिवस साजरा होत असताना होणारे भव्य सेलिब्रेशन त्यांना आनंदाचा उत्सवच वाटत राहतो. 

          मला वाटतं हा वाढदिवस मुलांचं एक वर्ष वाढवित असतो तसा एक वर्ष कमीही करत असतो. आपण म्हणूनच की काय तेवढया पेटत्या मेणबत्त्या विझवत जातो. जणू त्या विझत असलेल्या मेणबत्त्या आपल्याला जाणीव करुन देत असतात आपली तितकी वर्षं आयुष्यातील संपली असल्याबद्दल !!! मग कोणीतरी शक्कल लढवतात. मेणबत्त्या विझवायच्या नाहीत पेटवत जायच्या. मेणबत्या विझवल्या काय किंवा पेटवल्या काय , आयुष्य एका वर्षाने कमी झालेलं असतं. 

          हल्ली असे प्रकट दिन साजरे करण्याचं एक वेडच पसरत चाललं आहे. आमच्या लहानपणी आम्ही आमचा वाढदिवस शाळेत साजरा करत असू. तो कधीकधी वर्गापुरता मर्यादित असे. सगळ्यांना पेपरमिंटच्या गोळ्या वाटल्या कि झाला वाढदिवस साजरा. मग सर्व शिक्षकांना पायाला हात लावून नीट वाकून नम्र होऊन नमस्कार केला जात असे. औक्षण वगैरे माहितच नव्हते. शिक्षकांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला कि आपसुक औक्षणच घडे. सर्व मुले पाच मिनिटे गोळ्या आनंदे भरीत होऊन चघळत बसत. 

          वर्गात भरपूर मुले असली तर कधीकधी दोन तीन मुलांचे एकाच दिवशी वाढदिवस असत. मग सकाळ, दुपार , संध्याकाळ तीनवेळ डॉक्टर देतात तशा गोळ्या खायला मिळत. श्रीमंतांची मुले भारिवाली चाॕकलेट्स देत. आम्हांला कधीच न मिळणारी चाॕकलेट्स त्या दिवशी खाण्याचा योग येई. मी शिक्षक झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे वाढदिवस अभिनव पद्धतीने साजरे केलेले बघितले आहेत. 

          ४५० पटसंख्या असलेल्या शाळेत असताना एखाद्या दिवशी सात आठ मुलांचे वाढदिवस असत. एक दिवस आड करुन असे वाढदिवस येत राहत. मुलांचे पालक धनवान असल्यामुळे ते मुलांना चांगल्या वस्तू घेऊन देत. रुमाल, पेन, पेन्सिल, वह्या, गोष्टीचे पुस्तक, पट्टी अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाई. माझे टेबल अशा वस्तूंनी आठवडाभरात भरुन जाई. त्यांनी दिलेल्या खाऊने पोटही भरुन जाई. वाढदिवसानिमित्त शाळेलाही ५०१ रुपये देणगी यथाशक्ति प्रत्येकाकडून मिळे. 

          आता तर काही देणगीदार आपल्या किंवा आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत स्नेहभोजन देतात. मुलांना एक दिवस गोडधोड जेवणाचा आस्वाद घेता येतो ही एक चांगली गोष्ट त्यानिमित्ताने घडून येते. मांगवली नं.१ शाळेत असताना मनिषा राव यांनी राबवलेला उपक्रम मला भावून गेलेला आहे. स्नेहभोजन , भेटवस्तूंचे वितरण, शाळेला शैक्षणिक भेट आणि पहिली ते सातवीपर्यंतच्या पहिल्या तीन नंबरात आलेल्यांना आकर्षक बक्षिसे, रोख स्वरुपातील बक्षिसे असा त्यांचा एक दिवसीय उपक्रम दर एकोणतीस सप्टेंबर रोजी नित्य नियमाने राबवण्यात येतो हे विशेष. 

          अजय रावांचा हा मुलगा विहान ठाण्यातील काँन्व्हेंट स्कूलमध्ये शिकतोय. पण त्याचा वाढदिवस गावातील एका शाळेत उत्सवासारखा साजरा केला जातोय हे उल्लेखनीयच आहे. वाढदिवसाला विहान, अजय राव, मनिषा राव नसले तरी विहानच्या आजी आजोबांची उपस्थिती मात्र आवर्जून असतेच असते. विहानला फक्त मुलांनी हाय केलेले व्हिडिओ पाठवले तरी त्यांच्या पालकांना समाधान होत असते. असे सेवाभावी ग्रामस्थ ज्या शाळेला मिळतील तिथल्या मुलांनी त्यांचे सतत आभार मानले पाहिजेत. कारण त्यांच्यामुळे आपल्याला जी शैक्षणिक मदत दरवर्षी मिळते आहे त्याचे मोल पैशात करता येणार नाही असेच आहे. 

          माझ्या मोठ्या मुलीचा अठरावा वाढदिवस अठरा जानेवारीला साजरा करण्यात आला होता. तो आम्ही नेहमीप्रमाणे साजरा केला. तिला खूप आनंद झाल्याचे तिने बोलूनही दाखवले. पण तिचा तिसरा वाढदिवस असतानाची घटना आहे. पहिला वाढदिवस तिच्या लक्षात नसणारच. पण बालपणातील साजरे केलेले वाढदिवस तिला नीटसे आठवत नाहीत असे तिनेच मला सांगितले. 

          मी तिला तिच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या गमती सांगायला सुरुवात केली. आम्ही दोन्ही उभयता शिक्षक असल्यामुळे शाळेत गेलो होतो. शाळेचा कामाचा दिवस असल्यामुळे मला शहरात जाऊन केक आणायलाही जमले नव्हते. आम्ही पाटगांवसारख्या खेड्यात राहत होतो.    

          माझे मुख्याध्यापक खटावकरगुरुजी साळिस्त्याला राहात. ते नुकतेच त्यांच्या गावी जत्रेला गेले होते. येताना त्यांनी जत्रेतून आम्हां शिक्षकांसाठी खाऊ आणला होता. खाऊ म्हणजे काहीतरी पिवळ्या रंगाची जाड चकतीसारखी मिठाई होती असे दिसत होते. मी पहिल्यांदा तो पदार्थ पाहात होतो. मी सरांना त्या पदार्थाचे नाव विचारले. त्यांनी त्याचे नांव ' धीवर ' असे सांगितले. 

          मी धीवर पक्ष्याला नदीत सूर मारुन मासा पकडून उडताना पाहिले होते. आज हा नवीनच धीवर बघत होतो. मी तो धीवर पिशवीत जपून ठेवला घरी नेण्यासाठी. संध्याकाळी शाळा सुटली. साडे पाच वाजले होते. मी तळेरे येथे जाऊन केक आणायचा कंटाळा केला होता. 

          घरी पाटगांवला आलो. बायकोने केक आणलात काय विचारले. मी केक आणल्याचे खोटेच सांगितले. हळूच पिशवीतून धीवर काढून बायकोला दाखवत म्हणालो, " अगं, आज आपण या धीवरलाच केक बनवायचा !! " तेवढ्यात मुलगी धावतच मला मिठी मारायला आली होती. तिला तिचा वाढदिवस समजला होता. तिनेही केकबद्दल विचारले. मी तिला नंतर दाखवतो असे सांगून वेळ मारुन नेली. रात्री आठ वाजता आम्ही घरातले सगळे एकत्र जमलो. टीपाॕयवर धीवरला ठेवले. मुलीला तो केकच वाटला. तिला तो आगळा वेगळा केक आवडला होता. तिला तो कापायला सांगितला. तिला कापता येईना. म्हणून मी तिचा चिमुकला हात धरुन तो ताठ असलेला ' केक ऑफ धीवर ' जोर लावून कापला. छोटा तुकडा तोंडात भरवून तिला ' हॕप्पी बर्थ डै टू यु ' म्हटले. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसत होता. 

          त्यानंतर तिचे अनेक वाढदिवस साजरे केले. पण तो छोटेपणातला आनंद आताच्या मोठेपणातील आनंदापेक्षा नक्कीच भाव खाऊन गेल्याचे आजही मला प्रकर्षाने जाणवते. तो क्षण माझ्यासाठी आणि तिच्यासाठी आता विरळाच.


©️ प्रवीण कुबलसर ( 9881471684 )

Monday, January 18, 2021

मी दारु पितो

मी दारु पितो


          मी वयाच्या १४ वर्षापासून आमच्या सलूनमध्ये काम करायला लागलो होतो. एकाच दुकानात दोन व्यवसाय सुरु होते. सलून आणि शिवणकाम. बाबा उत्तम टेलरकाम शिकले होते. सलूनकाम नसताना बाबांचे टेलरिंग सुरु असे. सर्व प्रकारचे कपडे स्वतः कापून ते शिवण्याचे कौशल्य त्यांनी प्राप्त केले होते. आई शिवणकाम करायची. खूप काम असताना घरातले काम संपवून ती दुकानात येऊन शिवणकाम करत बसे. मी पोटात असताना सुद्धा तिने बाळंत होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत काम केल्याचे बाबा सांगतात. 

          आता गरोदरपणात सलग नऊ महिने बेडरेस्ट करण्याची प्रथा सुरु झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे सिझर होण्याचे प्रमाण वाढले असावे. पुढे कधीतरी नॉर्मल बाळंतपण हा दुर्मिळ योग समजला जाऊ शकेल. 

          दुकानात गिऱ्हाईक आले कि त्यांच्या दाढीला गरगरीत साबण लावण्याचे काम माझे असे. उंची नाही पुरली तरी शरीराचा पूर्ण झोका देऊन मी साबण लावण्याचे काम उत्साहाने करी. कधीकधी साबण गिऱ्हाईकांच्या तोंडात जाई. पण बिचारी गिऱ्हाईके सहनशील होती. ती म्हणत, " कर काय ते ?  पण शिक. " त्या गिऱ्हाईकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी शिकत गेलो. काही वयस्कर गिऱ्हाईकांचे चेहरे गाल आत गेलेले, हाडे बाहेर आलेले असत. त्यांची दाढी करणे अवघडच काम. 

          लोकांच्या तोंडाला नेहमी हे वाक्य मी ऐकलेले आहे , " काय करत होतास हजामती ? " " हजामत करायची नाहीय. " " हजाम आहेस काय ? " बोलणारे सहज बोलून जातात पण तो धंदा करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तींना नक्कीच आश्चर्य वाटते. कारण हजामत करणे एवढी सोपी गोष्ट आहे काय ? मला अवघड वाटलेली गोष्ट लोकांना सोपी कशी वाटते कोण जाणे ? पण कोणालाही जातीवरुन बोलणे बरोबर नाही हे मला लहानापासूनच कळले. आपल्या मनाला लागते तर ते दुसऱ्यांच्या मनालाही लागणारच ना !!! कधीतरी दुसऱ्यांच्या मनाचाही विचार करायला हवा. 

          त्या दिवशी दाढी करायला म्हाडेश्वर आले होते. त्यांची दाढी वस्तरा पाजळून करावी लागे. वस्तरा पाजळणे म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या दगडावर धार काढून मग तो चामड्याच्या पट्ट्यावर ' खणखणे ' पर्यंत घासणे. त्यात पाच मिनिटे जात. मला बाबांनी वस्तरा पाजळायला दिला. मी मस्तपैकी पाजळला. तो लखलखेपर्यंत. दाढीला गरगरीत साबण लावून दाढी करायला सुरवात केली. दाढीचे केस तुटता तुटत नव्हते. मला घाम आला. 

          बाबा मशिनवरुन उठले आणि त्यांनी दाढी पूर्ण केली. नंतर बरेचदा मी त्यांची दाढी घोटूनघोटून केल्याचे मला अजूनही चांगलेच आठवतेय. ते निघून गेले आणि त्यांच्यामागून आलेले गिऱ्हाईक म्हाडेश्वरांबद्दल बोलू लागले. ते म्हणाले , " हे म्हाडेश्वर रोज दारु पितात, मला माहित आहे." बाबांना हे खरे वाटेना. कारण बाबा त्यांना बरीच वर्षे ओळखत होते. त्यांना त्यांच्याबद्दल यत्किंचितही शंका आली नव्हती. 

          याच म्हाडेश्वरांच्या मुलाने काही कारणास्तव राॕकेल अंगावर ओतून पेटवून स्वतः आत्महत्या केली होती. त्यानंतर ते पुरते कोलमडून गेले होते. त्यांनी त्यांच्या मुलाचे भारीवाले सगळे कपडे आमच्या बाबांना आणून दिले होते. बाबांनी मग ते काही आपल्या भावांना तर काही गरजू व्यक्तींना वाटलेही होते. एखाद्या मुलाने वडिल असताना आत्महत्या केली असेल तर ते वडिल एवढे हतबल होतात कि ते रोजच मरणाची वाट पाहत मरत असतात. ते मरणच जगत होते. 

          चार पाच दिवसांनंतर पुन्हा ते आले. दाढी करता करता बाबांनीच विषय काढला. बाबा म्हणाले , " अहो म्हाडेश्वर , एका माणसाबद्दल मला एवढा विश्वास आहे कि तो माणूस कधीच दारु पित नाही असे मला वाटते , मला त्या व्यक्तीबद्दल दुसऱ्याने दारु पितात असे सांगितले तर मी विश्वास कसा ठेवायचा ? मला पडलेले हे कोडे आहे. तुम्ही मला मार्गदर्शन करा." म्हाडेश्वर खूप हुशार होते. ते काहीही उत्तर न देता निघून गेले होते. दोन तीन दिवसांनंतर दाढी करायला आले. दाढी करुन झाली. त्यांनी आपले तोंड उघडून बाबांच्या नाकाकडे नेले व दीर्घ श्वास सोडून म्हणाले , " मी दारु पितो." बाबांनी दारुचा वास ओळखला आणि त्यांना म्हाडेश्वरांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरही मिळाले होते. 

          असे हे म्हाडेश्वर आता या जगात हयात नसले तरीही म्हाडेश्वरांसारखी अशी कितीतरी माणसे आढळतील, जी आपली दुःखे विसरण्यासाठी असा मार्ग अवलंबतात. त्याने दुःख कमी होते कि नाही समजायला मार्ग नाही. काहीही झाले तरी दारु हा काही दुःख विसरण्याचा सर्वोत्तम मार्ग नाहीच नाही, मग तो इतरांनी तरी का अवलंबायचा ?


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



नीज माझ्या नंदलाली

नीज माझ्या नंदलाली


          लहान मुलांना झोपवणं हे तसं अवघड काम. पण मनात आणलं आणि आवड असली तर तसं सोपंसुद्धा. प्रत्येकाच्या वैयक्तिक अनुभवावर ते अवलंबून असू शकतं. पण लहान मुलंसुद्धा अश्शी असतात अगदी !!! काहीही करा एकदा रडायला सुरुवात केली तर थांबता थांबत नाहीत. त्यांना कितीही आंजारा, कितीही गोंजारा. त्यांच्या मम्मीने घेईपर्यंत तोंड गप्प करणारच नाहीत. 

          माझंही तसंच झालं होतं. छकुलीला मी लहानपणापासून माझीच सवय लावली होती. दुपट्ट्यामध्ये गुंडाळून ठेवण्यापासून तिची शिशू काढण्यापर्यंत मी आनंदाने तिचे सर्वकाही करत होतो. अंगावर पिण्यापुरतीच ती मम्मीकडे जात असे. मला तिच्या सहवासात राहायला आवडे आणि तिला माझ्या. गोरीगोमटी गोंडस छकुली छान हसे. तिचे हास्य मला खुलवी. 

          तिच्या मम्मीच्या दुःखद निधनानंतर तिला सांभाळणे एक दिव्यच होते. शाळेत गेलो कि तिला माझी आई आणि छोटी बहिण छान सांभाळत. पण ती माझीच वाट बघत बसे. पप्पा कधी येणार असे विचारत राही. मी शाळेतून येताना बघितले कि धावत धावत माझ्या अंगावर येई. मी सुद्धा तिला आधी घेऊन तिचे समाधान झाल्यानंतरच हात पाय धुवायला जाई. तिला खाऊची गरज नसे पण माझी गरज असे. मी मग तिच्याशी बोलत राही. माझे बोलणे तिला इतके आवडे कि तीही तिच्या सगळ्या गोष्टी मला सांगत राही. 

          आता ती मोठी म्हणजे अठरा वर्षांची झाली आहे तरीही ती सगळ्या गोष्टी माझ्याकडे शेअर करते. रत्नागिरीला होस्टेलवर असताना मागील दोन वर्षे दरदिवशी रात्री नऊ ते साडेनऊ आमचा बोलण्याचा अर्धा तास असे. आता घरी आहे तर कधीकधी एवढेही बोलता येत नाही , तर ती माझ्यावर नाराजही होते. तिचे बरोबर आहे. आपल्या मुलांसाठी आपण वेळ दिलाच पाहिजे. अर्थात घरातल्या सगळ्यांसाठी वेळ दिला पाहिजे. घरातले सगळेजण माझ्याबरोबर बोलायला नेहमीच आतुर झालेले असतात. पण मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही ही माझी चुक आहे. या चुकीचे समर्थन मी सुद्धा करणार नाही. 

          आपण जे करतो ते आपल्या मुलांसाठीच ना ? आपल्या कुटुंबासाठीच ना ? मग त्यांच्यासाठी वेळ राखून ठेवायला नको का ? त्यांना काहीही नको असते, फक्त आपला अमूल्य वेळच हवा असतो आणि तो आपल्याकडे नसतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कितीतरी वेळ आपण मुलांसाठी, पत्नीसाठी, पतीसाठी, आईबाबांसाठी देऊ शकतो. फक्त ते मनात हवे. कधीकधी खुप काम असते. बोलायला , जेवायलाही वेळ नसतो. पण घरातले सर्व आपल्याला समजून घेतात ही माझ्यासाठी घेण्यासारखी गोष्ट असते. आपण आपले आपल्याच विश्वात दंग असतो. त्या विश्वाच्या कोशातून बाहेर यायला शिकायला हवे. 

          मी रोज रात्री माझ्या छकुलीला मांडीवर घेऊन बालगीते म्हणायचो. मला येणारी सगळी बालगीते संपली तरी ती कधीकधी झोपत नसे. आता दुसरं म्हणा , असं म्हणून मला गायला लावी. मग मी शक्कल लढवली. माझ्याकडे टेपरेकॉर्डर होता. त्यात बालगीतांची कॅसेट लावून ठेवू लागलो. अचानक लाईट गेली तर पुन्हा मलाच म्हणावी लागत. मांडीवर झोके देत , थापटवत असताना मग मलाही आणि तिलाही झोप येई. हे आता रोज रात्रीचे चालले होते.   

          तिच्या सगळी गाणी पाठांतर झाली होती. नंतर तर तीच मला म्हणून दाखवी. माझ्या कुशीत घट्ट मिठी मारुन झोपताना माझी बोटे ती आपल्या चिमुकल्या बोटांनी तितकीच घट्ट पकडून ठेवी. मध्यरात्री उठलो तरी तिची घट्ट इवली मुठ सोडताना तिला जाग कशी येई देव जाणे ? 

          आता माझ्या तिन्ही मुली मला माझ्या मुलाप्रमाणेच आहेत. दुसरी मुलगी गुड्डी आणि तिसरी उर्मी या दोन्ही मुली अगदी छकुलीच्या बालरुपातीलच आहेत. तिन्हींचे मेतकूट इतके छान जमते कि त्यांना एकत्र हसता,भांडताना , खेळताना बघून मी जगातील एक सुखी बाबा असल्याचा अनुभव घेत राहतो. कोणीही आपल्या मुलींना कधीच कमी मानू नका. रचनाकारांनी गाणीसुद्धा मुलांचीच बनवलेली आहेत. आपण ती बदलून मुलींची करुन म्हणावीत. जसे मी म्हणतो , " नीज माझ्या नंदलाली, नंदलाली गं ! ! ! !  "


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Saturday, January 16, 2021

असा तरी कित्या

 असा तरी कित्या


          त्यावेळी शालेय पोषण आहाराचे वाटप वस्तुरुपात करण्यात येई. फक्त तांदळाचे वाटप होई. दर महिन्याला एका मुलाला तीन किलो तांदुळ मिळत. पहिली ते चौथी पर्यंत शाळा असल्याने प्रत्येक मुलाला दर दिवसाला शंभर ग्रॕमप्रमाणे पोषण आहार म्हणजेसुद्धा सरकारने तळागाळातील गरीब मुलांसाठी केलेली दैनंदिन मदतच होती. 

          आमच्या लहानपणी असे काही मिळत नसे, शिक्षण मात्र रोजच्या रोज पोट भरुन मिळे. त्या शिक्षणावरच आमचे बालपण संस्कारीत होत गेले. नंतर सुगंधी दुध मिळू लागले. ते ही मुले आवडीने पित असत. त्याची चव वेगळीच असे. मग कधी कधी सुकडी मिळे. तिचे लाडू करुनही दिले जात. आता सगळ्या मुलांची मज्जा आहे. दुपारी माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत गरमागरम तयार भोजन दिले जाते. शाळेत डबा नेण्याचीही गरज नाही. 

          सध्या शाळा सुरु नाही म्हणून सर्व मुलांना पालकांमार्फत तांदुळ, तुरडाळ, मटकी, मुग, चवळी दरमहा दिली जाते हेही शासनाचे उपकारच आहेत. मोफत पुस्तके दरवर्षी मिळतात. तयार गणवेश मिळतात. पूर्वी एवढं काही मिळत नसे. उलट त्यावेळी आम्हाला त्याची खरी गरज होती. आता सर्व काही मोफत मिळते म्हणून त्या गोष्टींची किंमत कमी झाली आहे असे वाटत राहते. 

          पूर्वी आम्ही एक पुस्तक संच मोठ्या भावंडांपासून छोट्या भावंडांपर्यंत वापरत असू. आता सहा महिन्यातच नवीन पुस्तकसंच फाटलेला दिसून येतो. फुकट मिळालेल्या वस्तूंची किंमत नसते हेच खरं !! माझी शाळा एकशिक्षकी होती. शिपायापासून सर्व कामे मलाच करावी लागत. 

          सर्व मराठी शाळेतील आजचे शिक्षक हे काम करत आहेत. मुलांचे हित लक्षात घेऊन सगळी कामे करत आहेत. ही कामे करता करता त्यातून वेळ मिळाला तर शिकवण्याचेही काम करत आहेत. रात्र थोडी नि सोंगे फार ,  अशी गत झाली तरी बिचारा शिक्षक प्रामाणिकपणे शिक्षणाची गाडी जोमाने हाकताना दिसत आहे. नवनवीन तंत्रज्ञान , ऑनलाईन कामे करुन अध्यापनाची विविध तंत्रे शिकत सतत अद्ययावत राहण्याचा प्रयत्न करत आहे. यातील प्रत्येकाचा वेग कमी जास्त असू शकतो. पण प्रत्येकाला मर्यादा असतात, तशाच त्या शिक्षकालाही आहेत. सर्वजण सेम टू सेम काम करुन दाखवू शकत नाहीत. पण सर्वजण आपली पूर्ण कार्यक्षमता आपापल्या परीने वापरत आहेत हे नक्की. 

          माझ्या शाळेत त्यावेळी चार वर्गात एकूण सतरा विद्यार्थी होते. मी एकटाच सर्व वर्ग शिकवत होतो. संध्याकाळपर्यंत शिकवून संपत नव्हते. दररोज १४ ते १५ विषय हाताळण्याची कधी कधी कसरत करावी लागत होती. एकशिक्षकी शाळेत शिकवणारे सर्वच शिक्षक असं करत असताना मी बघितले आहे. सातवीपर्यंत दोन शिक्षकी असणाऱ्या शाळांमध्ये सेम कसरत करावी लागते. कामगिरी शिक्षक आलेच तर त्यांना दोन्ही ठिकाणची जबाबदारी पार पाडतानाही पाहिले आहे. 

          एकूण काय तर  मुले कमी असली तरी कसरती तितक्याच. लोकांना मात्र पगाराचे आकडे दिसतात. त्यांना कामाचे स्वरुप दिसत नाही. बोलण्यासाठी मुद्दे भरपूर सापडतात. असो. काहीही झाले तरी हा संघर्ष सुरुच राहणार असे दिसते आहे. 

          तांदळाच्या पिशव्या नुकत्याच प्राप्त झाल्या होत्या. मी मुलांच्या हजेरीनुसार मागणी केली होती. त्यातील दोन मुले दोन महिने मुंबईला गेली होती. त्यांची रितसर गैरहजेरी लावली होती. दिपक आणि संदीप या दोन मुलांना तांदळाच्या पिशव्या दिल्या गेल्या नाहीत. ती मुले माझ्याकडे तांदुळ मागू लागली. मी त्यांना त्यांच्या गैरहजेरीचे कारण सांगितले. त्यांना ते समजले. पण सर्व मुलांना तांदळाच्या पिशव्या मिळाल्या , आम्हाला आमच्या गैरहजेरीमुळे मिळाल्या नाहीत याचे त्यांना वाईट वाटलेले दिसत होते. 

          सर्व मुलांनी तांदळाच्या पिशव्या दप्तरात भरल्या होत्या. काहींनी दप्तराजवळ ठेवल्या होत्या. या दोघांची नजर फिरुन फिरुन त्या तांदळांवरुन जाताना दिसत होती. शाळा सुटली.मुले घरी गेली.शेजारच्या मुलांनी आपले दप्तर भरभरुन आणल्याचे त्या दोन मुलांच्या माऊलीने पाहिले. सगळ्यांना तांदुळ मिळाले आणि माझ्या मुलांना अजिबात नाही म्हणून तिला मुलांचा राग आला. तिने मुलांना मार मार मारले. 

          दुसऱ्या दिवशी तिने त्या मुलांमार्फत मला चिठ्ठी पाठवून दिली. मी चकितच झालो. चिठ्ठी उघडून वाचू लागलो. चिठ्ठीत मालवणी भाषेत लिहिले होते , " सगल्या पोरांना तांदूल घावले , माज्या लेकांका नाय घावले , असा तरी कित्या ??? " मला चिठ्ठी वाचून खूप हसायला आले. मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना समजावून सांगितले तेव्हा तिला पटले. ती म्हणाली, " गुर्जी, सांगलास ता बरा झाला, आता मी माज्या दोनक लेकांका घराकडे ठेवचंय नाय , रोज शालेत पाठवतलंय , बघतंय मी तुमी तांदूल कसे देयत नाय ते "  

          मी घरी आलो आणि ही गोष्ट घरच्यांना सांगितली तर तेही मला खोखो हसत म्हणायला लागले , " असा तरी कित्या ? "


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Friday, January 15, 2021

मी अजून जिवंत आहे

 मी अजून जिवंत आहे


        वडीलधारी माणसे आपल्यापेक्षा अधिक पावसाळे बघितलेली असतात. त्यांना सर्व काही समजत असते. त्यांनी अनुभव घेत असताना त्यांना अनेकदा ठेच लागलेली असते. पुढच्यांना ठेच लागू नये अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असते. त्यामुळे मोठी माणसे सतत लहानांना सल्ला द्यायची एकही संधी सोडत नाहीत. 

          ह्या ज्येष्ठ श्रेष्ठांचा कनिष्ठांवर विश्वास कमीत कमी दिसून येतो. कनिष्ठ कायमच कनिष्ठच राहतात. किंवा त्यांच्यावर कुणीही श्रेष्ठ नसले तर तेही श्रेष्ठ होऊन जातात. आपल्यापेक्षा लहानांना सगळ्या गोष्टींबद्दल बारीकसारीक सांगत राहून नकोसे करुन सोडतात. 

          मोठ्यांचे ऐकलेच पाहिजे, पण याचा अर्थ असा नाही कि सगळ्याच गोष्टी मोठ्यांना विचारुनच कराव्यात. आपण आपल्या मनाने कधी घेणार निर्णय ?  मोठे म्हणतात , "  हे करु नको, ते करु नको." न विचारता केले तर म्हणतील, " आमचं ऐकत नाही ना ?  म्हणून असं होतं. आता भोगा आपल्या कर्माची फळं. "  

          चुकल्यानंतर कधीच समजून घेणार नाहीत. आपले निर्णय कसे बरोबर असतात तेच सतत सिद्ध करत बसतील. एखादी गोष्ट त्यांना न सांगता केली आणि आपल्याला यश मिळालेच तर त्याचे श्रेय आपणच घेतील. ठिक आहे, घेऊ देत श्रेय. पण यश मिळाल्यानंतरही त्यात इतकेही यश मिळाले नाही असेही सांगतील. पुन्हा हे ही सांगतील कि आम्ही शुन्यातून पृथ्वी निर्माण केली. असू दे. आपलेच आहेत, ऐकून घ्यायलाच पाहिजे. 

          काहीही करायचे असेल तर यांची परवानगी घ्यायला लागते. नाहीतर म्हणतील , " मी अजून जिवंत आहे ना ? अजून मेलेला नाही. " असेही म्हणतील , " माझे म्हणणे पूर्वी सर्वजण ऐकत असत , म्हणून सगळे कसे व्यवस्थित चालले होते. आता तुमच्या राज्यात कोण कोणाला विचारत नाही. म्हणतात ना .... वाघ पडला झाळी आणि वानर दाखवतो नाळी ....तशी तुमची खबर आहे."  ही वाक्ये मोठ्यांची ठरलेली वाक्ये आहेत. ते आपल्या काळजीपोटी हे सर्व करत असतात हे बरोबर आहे. पण पुढे जाणाऱ्याला मागे ओढणे म्हणजे अतिकाळजी झाली. 

          मग आम्ही छोटे पुढे कसे जाणार ? लहान मुलाला जोपर्यंत स्वतः कंदिलाला हात लावल्याशिवाय काच गरम असल्याचा चटका बसत नाही तोपर्यंत तो हात लावतच राहणार. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचा अनुभव एकदा तरी घ्यायला द्यावा. अर्थात इथे चांगल्या गोष्टींचा अनुभव असा अर्थ अभिप्रेत आहे. नाहीतर ही मोठी माणसे त्यातही कूस काढतील. 

          दाखवताना ते प्रथम दोषच दाखवतात, चांगल्या बाबी बघण्याचे विसरुनच जातात. मग जनरेशन गॕपची ओरड मारतात. आमच्यावेळी असे नव्हते बाबा ! !  तुमच्या काळातील ही पिढी पुढे काय दिवे लावणार तो परमेश्वरच जाणे ?  

          त्यांनासुद्धा आपल्या आजी आजोबांनी अगदी असेच म्हटलेले असणार. पुढे आपण मात्र पुढच्या पिढीला असे म्हणू नका म्हणजे मिळवली. चुका सर्वांकडूनच होतात, चुकत चुकत शिकणं खरंच चांगलं असतं. पण सतत सल्ले देऊन आपल्याच माणसांना परावलंबी बनवणं कितपत योग्य आहे ? 

          लहानांना स्वावलंबी बनवायचे असेल तर त्यांना सगळ्या गोष्टी बिनधास्त करायला दिल्या पाहिजेत. पहिल्यांदा चुकतीलही. पण हळूहळू चुकांचे प्रमाण कमी होत जाऊन कौशल्य प्राप्त होईल. केलेली चूक पुन्हा होणार नाही. 

          आईबाबा मुलांना सांगतात , "तुला हे जमणार नाही, ते जमणार नाही." स्वतः अपयशी ठरलेले पालक मुलांनाही अपयशीच होण्याचा मार्ग दाखवत राहात असतात हे त्यांना सांगणार कोण ? मोठ्ठे असतात ना ते ? त्यांचे कसे चुकेल , चुकले तर ते आमचेच. आमच्याच कपाळावर कायम चुकण्याचा शिक्का. 

          कित्येक हुशार आईवडिलांची मुले या अतिसल्ल्यांमुळे परावलंबी जीवन जगताना मी स्वतः पाहिली. अतिशिस्तीमुळे बिघडली गेलेली मुले आता अक्षरशः पालकांनाच नको झाल्याचीही उदाहरणे आहेत. व्यसनी झाली आहेत. पालकांशी शत्रुप्रमाणे वागत आहेत. 

          आपल्या पाल्यांशी पालकांनी मित्रत्वाचे नाते जोडायला हवे. आपलं मूल काय करतंय याकडे लक्ष दिलं पाहिजे, पण उलट तपासणी नको. मधल्या पिढीतल्या मध्यम मोठ्यांची मोठीच अडचण होऊन बसते. केस पिकले, वय झालं, टक्कल पडलं तरी त्यांच्या वरच्या मोठ्यांचं त्यांना ऐकून निर्णय घेण्याची कसरत करावी लागते. लहानांनी संयम ठेवला पाहिजे अशी अपेक्षा नेहमीच मोठी माणसे बाळगत असतात, तसाच संयम बोलताना जर मोठ्यांनी ठेवला तर छोटे मोठे वादविवाद होणारही नाहीत. आता हे वाचल्यानंतरही हे चुकीचे कसे आहे यावरही ते नक्की वाद घालतील यातही मला अजिबात शंका वाटत नाही.


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Thursday, January 14, 2021

कळीचे निर्माल्य

 कळीचे निर्माल्य


          पूर्वी आई होण्याची चाहुल लागली कि प्रत्येक पहिलटकरीन खुश होत असे. आता तसे घडतेच असे नाही. माझ्या पत्नीला दिवस गेल्याचे समजले आणि ती इतकी खुश झाली कि तिला स्वर्ग दोन बोटे उरला. मला आणि घरातल्यांना तेच हवे होते जे घडत होते. सर्वांनी तिची काळजी घ्यायला सुरूवात केली होती. तिला विविध सल्ले मिळू लागले. हे खाऊ नको, ते खाऊ नको अशांची सरबत्तीच झाली. तिला खावेसे वाटत असताना प्रतिबंध केला जात होता. खाल्लेले टिकत नव्हते. पण ते बाहेर पडल्यानंतर तिला बरे वाटत होते. 

          मी आमच्या झोपण्याच्या खोलीत छोट्या बाळांची चित्रे लावली. तिची काळजी घेऊ लागलो. तिला हा अनुभव मस्त वाटत होता. एक गोंडस बाळ जन्माला येणार म्हणून त्याच्या स्वागताची तयारी चालली होती. नवीन पाहुणा येणार म्हणून सगळेच खुश. हळूहळू पोट दिसू लागले. आता तीन महिने उलटून गेले होते. ती शाळेत जात होतीच. मी कणकवलीत आणि ती दाणोलीत. प्रवासाचा त्रास होऊ लागल्याचे दिसत होते. पण घरी राहून ती शाळेची काळजी करत बसे. तिच्याकडे वरचे वर्ग होते. 

          आपल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले तिला कधीच आवडले नव्हते. ती तशीच प्रवास करुन शाळेत जात होती. कणकवली ते दाणोली दोन गाड्या बदलून जाणे त्रासाचेच होते. प्रवास ६० किलोमीटरपेक्षा जास्त होता. ती सोमवारी गेली कि शनिवारी यायची. ५ वा महिना सुरू झाला. डॉक्टर मॅडमांनी तिला अधिक काळजी घ्यायला सांगितलं होतं. पोटातल्या हालचाली अलगद जाणवू लागल्या होत्या. 

          आतलं बाळ तिच्याशी संवाद साधू लागलं होतं. ती आपल्याच तंद्रीत. वाचनात कमालीची दंग होऊन जायची. जाड जाड पुस्तके एक दोन दिवसांत वाचून संपवायची. बाळांचं पोटातील गोल गोल फिरणं तिला गुदगुल्या करी. मग हळूच माझा हात ती आपल्या पोटावरुन फिरवून मलाही बाळाच्या ढुशा समजत. मलाही आनंदाच्या उकळ्या फुटत. मी तिच्याशी तासंनतास बोलत राही. ती आनंदी राहण्यासाठी जेवढे उपाय करु शकत होतो तेवढे करत होतो. पण काही बाबतीत ती रडून मोकळी होई. 

          आता तिला सहा महिन्यांची रजा घेण्याची गरज होती. पण मे महिना जवळ येत होता. सुट्टी पडणारच होती. मग रजा फुकट जाईल म्हणून तिनेच नकार दिला. मार्च ते एप्रिल हा दोन महिन्यांचा काळ तिच्यासाठी खूप कठीण काळ गेला होता. हाफ डे शाळा होती. कधी कधी मीच रजा घेऊन तिला भेटायला दाणोली मुक्कामी जात असे. 

          मे उजाडला. हायसे वाटले. आता आम्हाला उन्हाळी सुट्टी मिळाली होती. पण मला सुट्टी असली तरी मी दुकानात म्हणजेच सलूनात काम करत असे. पण मी तिला सतत तिच्यासोबत हवा होतो. रात्री ती माझी आतुरतेने वाट बघत बसे. दरवाजाशी उभी राहून त्या अवस्थेतही वाट पाहताना ती अजूनही मला दिसते आहे. माझी चाहुल लागली कि मस्त गालात हसे. कधीकधी उशीर झाला म्हणून लटक्या रागाने बोलतही नसे. तिची ती नेहमीची सवय माझ्या अंगवळणी पडली होती. तिच्यासोबत असताना ती स्वतःलाही हरवून जाई. माझ्याशी गप्पा मारत बसे. मीही तिच्या बोलण्याने दिवसभराचा थकलेला शीण विसरुन जाई. असे मे महिनाभर दररोज चालले होते. 

          आभाळात काळे ढग जमू लागले तशी ती अधिकच आनंदाने बोलू लागे. पाऊस पडायला लागल्यावर तिला भारीच वाटे. पोटातील बाळाच्या हालचाली आता वाढल्या होत्या. आमचा आनंदही वाढत चालला होता. जून कधी उजाडला समजलेदेखील नाही. नवीन शैक्षणिक वर्षाची चाहुल लागली होती. दोन तिन दिवसांनंतर शाळा सुरु होणार होती. ती शाळेत हजर होणार होती. शाळेत हजर झाल्यानंतर आठवडाभरात रजा घेऊन घरी येणार होती असे आमचे ठरत होते. 

          शाळेत जाण्यापूर्वी डॉक्टर मॅडमना दाखवून यावे म्हणून सोनोग्राफी करण्यासाठी मी तिला दवाखान्यात नेले होते. तिला बाळाची हालचाल मंदावलेली असल्याचे जाणवत होते. ती घाबरली होती. तिला तिचं बाळ ढुश्या मारणारंच हवं होतं. डॉक्टर मॅडमनी सोनोग्राफी केली होती. पाच दहा मिनिटे त्या सोनोग्राफीच करत होत्या. त्यांनाही घाम आलेला दिसला. त्यांनी मला बोलावून घेतले. मला समजावून सांगितले. 

          बाळाची हालचाल थांबून दोन दिवस झाले होते. त्यांनी बाळाची हालचाल अजिबातच होत नसल्याचे सांगितले होते. मी अक्षरशः त्या क्षणाला फक्त चक्कर येऊन पडायचाच शिल्लक राहिलो होतो. पण मी धीर सोडून चालणार नव्हते. मला तिला धीर द्यायचा होता. ती माझीच वाट बघत होती. मी तिला ठिक आहे असे म्हणालो होतो. औषधे आणतो असे सांगून पुन्हा डॉक्टर मॅडमांकडे गेलो होतो. त्यांनी गर्भपात करण्याचा सल्ला दिला होता. 

          दुसऱ्या दिवशी सकाळी अ‍ॅडमिट व्हायला सांगितले होते. मी तिला घेऊन घरी आलो. घरी येईपर्यंत तिने मला विविध प्रश्न विचारुन भंडावून सोडले होते. पण मी ही गोष्ट तिला वाटेत सांगणार नव्हतो. रात्री झोपताना सांगणार होतो. रात्री झोपताना तिने माझा हात नेहमीप्रमाणे पोटावर ठेवला होता. हालचाल कधीच थंड झाली होती. पण मी तिला दिलासा देत होतो. बोलता बोलता दोघांनाही झोप कधी लागली समजलेच नव्हते. 

          मध्यरात्री अचानक जाग आली. ती उठून बसली होती. आता मला तिला सांगायचे होते. पहाटे चार वाजता मी तिला विश्वासात घेऊन सांगून टाकले. तिचे बाळाचे स्वप्न धुळीला मिळाले होते. ती सकाळपर्यंत रडतच राहिली आणि रडण्याशिवाय पर्यायच नव्हता. नाहीतर ती वेडी झाली असती. सकाळी लवकरच तयारी करुन आम्ही दवाखान्यात गेलो. 

          नॉर्मल साठी प्रयत्न करता करता रात्रीचे ३ वाजले. माझा डोळा लागला होता. अचानक मला माझ्या काकांनी हलवले. सून मोकळी झाली म्हणून सांगितले गेले. मला बरे वाटले. बाळाला बघावेसे वाटले होते. त्यांनी बाळाला पाण्यात तरंगत ठेवले होते. बिचारं बाळ जन्माला येण्यापूर्वीच देवाघरी गेले होते. एका कळीचे फुलण्याआधीच निर्माल्य झाले होते.


©️ प्रवीण कुबलसर ( 9881471684 )



Wednesday, January 13, 2021

पसंत आहे मुलगी

 पसंत आहे मुलगी


          मी वयात आलो आणि बाबांनी माझ्यासाठी मुली बघायला सुरुवात केली. वयात आलो म्हणजे २५ वर्षांचा होतो. दोन नोकऱ्या सोडून तिसरी धरली होती. नोकरीनंतर छोकरी असं बाबांचं आणि घरच्यांचं साधं सोपं समीकरण बरोबरही असेल. पण छोकरी नोकरीवाली हवी असंही सर्वांच्या मनात होतं. 

          माझ्या मनात अजून छोकरीचा उगमच झाला नव्हता. मला लग्न करण्यासाठी अवकाश हवा होता. तो अवकाश मी घेत होतो. बाबांनी स्थळे बघायला सुरुवात केली होती. रत्नागिरीतील संगमेश्वरपासून देवगडातील शिरगांवपर्यंतची स्थळे बाबा बघूनही आले. मला माहितही नव्हते. बाबांची सूनपरीक्षा सुरु असताना आमच्या दुकानात माझ्या लग्नाविषयीची चर्चा पाटकरगुरुजींनी ऐकली. 

          पाटकरगुरुजी आमचे तीन नंबर शाळेतील वर्गशिक्षक. सातवीत ते आम्हाला गणित विषय अगदी तन्मयतेने शिकवित. त्यांचे व्यक्तिमत्त्व विशाल होते. ते काॕमन पुलचे शिक्षण विस्तार अधिकारी झाले होते. त्यांना जिल्ह्यात कोणत्याही शाळेत जाण्याची मुभा होती. 

          एकदा ते सावंतवाडी तालुक्यातील दाणोली गावठण या शाळेत भेटीसाठी गेले होते. तेथील शिक्षक तक्ता त्यांनी बघितला होता. त्यात ' ललिता तुकाराम चव्हाण ' या नाभिक समाजातील शिक्षिका होत्या. पाटकरगुरुजी आमचे कस्टमर. बाबा त्यांचे केस कापत असताना माझ्या लग्नाच्या चर्चेत त्यांनीही भाग घेतला. मग काय ? बाबा त्यांच्या मागेच लागले. त्यांनी त्या मुलीबद्दल माहिती आणून दिली. गाव समजले. 

          आता बाबा माझ्या मागे लागले. मी तयार नव्हतोच. मी एकदा बाबांना रागाने म्हणालो होतो, " बाबा, लग्न मला करायचेय कि तुम्हाला ? मला काही घाई नाही. मला एवढ्यात लग्न करावयाचे नाही. मी एकटा आहे तो बरा आहे. "  पण बाबांची चर्चा सुरु होती ती होतीच. त्यात दिवसेंदिवस वाढ होत होती, खंड अजिबात नव्हता. 

          मग एके दिवशी ' फर्नांडिस ' गुरुजी दुकानात आले. ते त्यावेळी शिरवल नं.१ शाळेचे मुख्याध्यापक असावेत. त्यांच्या गजाली ऐकत राहण्यासारख्या असत. विनोदी शैलीतील त्यांचे बोलणे सर्वांनाच आवडे. पण ते परखड आणि खरे होते. त्यांनी मला समजावले. मी लग्नाला तयार होण्यासाठी बाबांना फर्नांडिसगुरुजींची मदत उपयोगी पडली. अखेर मी लग्नाला होकार दिला. 

          आता बाबांना मैदान मोकळे झाले होते. ' माझो झिल लग्नाक तयार झालो ' च्या घोषणा त्यांनी सुरुच केल्या. होळीचे दिवस होते. दोन तीन दिवस सलग सुट्ट्या होत्या. बाबांनी मुलीचा पत्ता शोधून काढला होता. मुलीच्या घरी कल्पना न देता आम्ही निघालो. 

          वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे गाव कुडाळ पासून फक्त दहा किलोमीटरवर आहे. पोहोचलो एकदाचे. त्यांच्या घरी जाण्यासाठी ' सातेरी मंदिर ' स्टाॕपवर उतरुन चालत निघालो. वाटेत बाबांचे पूर्वीचे मित्र भेटले. ते नाभिक संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी कुठे जाता असे विचारले. बाबांनी संपूर्ण कथाच सांगितली. ते त्यांना अजूनही चांगलेच जमते. ज्या मुलीला आम्ही बघायला जात होतो ती त्यांची पुतणी होती. त्यांनी मुलीबद्दल प्रश्नच नाही, तुमच्या मुलाला तिने फक्त पसंत करायला हवे. बाकी सर्व माझ्याकडे लागले. 

          बाबा त्यांना भाई म्हणत. आम्ही पुढे त्यांना भाईअण्णा म्हणू लागलो. भाईअण्णा शिस्तप्रिय होते. मुद्देसुद बोलत. ते आम्हाला मुलीच्या घरी घेऊन गेले. ललिता आज घरीच होती. मी साध्या नेहमीच्या वेशात गेलो होतो. तिचे वडील तिठ्यावरील सलूनात काम करीत. साधे सरळ गृहस्थ. त्यांनी आपली मुलगी दाखवायला आढेवेढे घेतले नाहीत. 

          सहसा कोणताही बाप आपल्या मुलीला पहिल्या भेटीत मुलाला दाखवायला तयार होत नाही. पण मी शिक्षक आहे असे समजल्यावर ते खुश झाले. घरातील सर्वजण अतिशय कुतुहलाने बाहेर हळूच येऊन मला बघून जात होते. थोड्यावेळाने बघण्याचा कार्यक्रम सुरु झाला. मी आता घाबरलो होतो. 

          माझी पहिलीच वेळ होती. तिची पहिलीच वेळ नव्हती. तिला यापूर्वी काही स्थळे येऊन गेली होती. पण तिनेच ती नाकारली होती. तिला शिक्षकच हवा होता. मी शिक्षक होतो पण दिसायला काहीच आकर्षक नव्हतो. तिने चहा आणून दिला. मी हळूच मान वर करुन घाबरत घाबरतच तिच्याकडे बघितले. एक साधी सरळ पिवळसर साडी नेसलेली तोंडावर हात घेऊन खुदकन हसणारी मुलगी माझ्यासमोर उभी होती. माझी नजर तिच्या पावलांकडे गेली. ती सावधानस्थितीत उभी होती. तिला नाव विचारले गेले. मीही सांगितले. 

          मी शिक्षक आहे या एकाच गोष्टीवर ती खुश झाली होती. तिला पाहायला आलेला मी पहिला शिक्षक होतो. मी सायन्सचा विद्यार्थी होतो. ती दहावीमध्ये वेतोरे हायस्कूलमध्ये प्रथम आली होती. बारावी सायन्सला ६८ % म्हणजे अतिशय चांगले गुण होते. मी माझा बायोडेटा लिहून दिला. तिनेही सुंदर रेखीव हस्ताक्षरात आपला बायोडेटा मला दिला. मी तिला तिथेच मनापासून पसंत केले होते. मी तिला विचारले , " मी तुम्हाला पसंत आहे का ? " तिने मलाच उलट प्रतिप्रश्न केला , " तुम्हाला मी पसंत आहे का ? " मी तिला विचारले , " माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. " ती म्हणाली, " आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. " 

          मी सरळ सांगून टाकले, " पसंत आहे मुलगी. " ती मला गोड हसत म्हणाली, " मलाही तुम्ही पसंत आहात. " त्यावेळी तिच्या त्या होकारासह एक अनामिक सुगंध मला आला होता. ललिता एक उत्तम शिक्षिका होती. माझ्या डोक्यावर कमी झालेले केस तिला खटकले होते, पण ती आपल्या होकाराशी ठाम होती. घरातील सर्वांनी तिला पुन्हा पुन्हा विचारले तरी तिचा निर्धार कायम होता. 

          मे मध्ये आमचे प्रशिक्षण होते. १३ जून २००० रोजी आमचे लग्न झाले. तिच्या आणि माझ्या वयात एक ते दिड वर्षाचे अंतर होते. ती मनाने निर्मळ होती. मितभाषी होती. माझे मानसिक प्रेम सुरु झाले होते. 

          नुकताच ' हम दिल दे चुके सनम ' हा ऐश्वर्याचा सिनेमा मी पाहिला होता. त्यातील " झोका हवा आज भी , जुल्फे उडाता होगा ना, तेरा दुपट्टा आज भी मेरे सर से सरकता होगा ना ! ! ! !  "  या गाण्याची तर मी पारायणे केली. ललितामध्ये मी ऐश्वर्याच बघत होतो. तिचे नाव मी तिला विचारुन ऐश्वर्या ठेवले. तिलाही ते खूप आवडले. मी तिला ऐशू म्हणत असे. चुकून एखाद्या वेळी ऐश्वर्या म्हटले तर ती मला म्हणे, " अहो, रागावलात का माझ्यावर ? मला ऐशूच म्हणा , ऐश्वर्या नको. "  

          ऐशू ही हाक तिला अतिशय आवडे. आता ही हाक माझ्यासाठी दुर्मिळ झाली आहे. तिच्या फोटोसमोर जाऊन मी तिला नमस्कार करताना ' ऐशू ' असे म्हणूनच दिवसाची सुरुवात करतो. प्रेम हे मनावर करावं, शरीरावर नव्हे. आम्ही उभयतांनी एकमेकांच्या मनावर प्रेम केलं. ते अजूनही निरंतर तस्संच राहणार आहे कायमचं.


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

मयसा

 मयसा


          आमचे पाक्षिक सुरु होते. डीएड संपत असताना प्रत्यक्ष १५ दिवस पाठ शिक्षकांनी एखाद्या शाळेत सलग शिकवण्याचे काम करायचे असते. आम्हाला पाक्षिकासाठी माझी सातवीपर्यंत शिकत होतो तीच शाळा मिळाली. भालचंद्र महाराज विद्यालय कणकवली शाळा क्रमांक तीन मध्ये आमचे पाक्षिक सुरु झाले. 

          आम्ही ४० छात्रशिक्षक अगदी मनापासून शिकवत होतो. दरदिवशी मुख्याध्यापक बदलत असत. ते सांगतील त्याप्रमाणे आम्हाला वर्ग मिळे. तासिका घेताना खूप मजा येई. सर्व वर्गांवर जायला मिळे. शाळेतील ऑन ड्युटी काम करणाऱ्या शिक्षकांना त्यानिमित्ताने लेखी काम करायला उसंत मिळे. ते आमच्या सोबत सहकार्याने वागत. 

आम्ही काही छात्रशिक्षक तिथले जुनेच विद्यार्थी होतो. त्यामुळे ती शाळा आम्ही कधीही गेलो तरी आपलीच वाटते. सांस्कृतिक कार्यक्रम शेवटच्या दिवशी करावे लागत. आम्हीही त्याचे नियोजन पहिल्या दिवसापासूनच सुरु केले. 

          वर्गातील प्रत्येक मुलांच्या क्षमतेनुसार नकला , नृत्ये, नाट्यछटा, विनोदी बातम्या, नाच, रेकॉर्ड डान्स, एकांकिका, नाटुकली इत्यादी विविध प्रकार शिकवणे सुरु झाले. मी नाट्यछटा बसवण्याचे ठरवले. म्हणजे मी एक दोन मुलांना निवडून त्यांना नाट्यछटा देणार होतो. काही मुलांनी स्वतः हात वर केले. सगळ्यांनी भाग घेतला पाहिजे म्हणून मी काही सहभागी न होणाऱ्या मुलांकडे लक्ष केंद्रित केले. 

          माझ्या मित्राचा भाऊ सातवीत शिकत होता. त्याचे नाव महेश होते. त्याच्या घरी माझे येणे जाणे असे. त्यामुळे तो मला व्यक्तिगत ओळखत होता. त्याने घरी सांगून टाकले होते. आम्हाला माझ्या दादाचा मित्र शिकवायला आहे. तो मला शाळेत सर आणि शाळेबाहेर कुबलदादा म्हणत असे. त्याला घरी मयसा म्हणत. मीही त्याला प्रेमाने मयश्या किंवा मयसा म्हणू लागलो. त्यालाही ते आवडे. 

          त्याने मला सांगितले , “ दादा, मला नाट्यछटा करायची आहे. ” मी त्याला आश्वासन दिले. त्याला स्क्रिप्ट दिली. वाचण्याचा सराव घेतला. त्याचे वाचन चांगले होते. तो भावनाप्रधान होता. पण त्याचे उच्चार स्पष्ट येत नव्हते. मी त्याला अधिक सराव करायला सांगितले. तरीही उपयोग होत नव्हता. त्याचे पाठांतरही झाले होते. तो रोज घरी सराव करत होता. त्याच्या आईलाही त्यामुळे आनंद वाटला होता. बरेच कार्यक्रम बसवले जात होते. ऐनवेळी त्यात बदलही केले जात होते. निवड करताना बसवलेल्या काही कार्यक्रमांनाही नाकारण्यात आले. मला खूप वाईट वाटले. 

          कारण माझ्या मयश्याचा कार्यक्रम रिजेक्ट केला गेला होता. मी त्याला सांगितले, पण त्याची नाराजी मला स्पष्ट दिसत होती. तो रडकुंडीला आला होता. घरी जाऊन त्याने हे आपल्या आईला सांगितले. कार्यक्रम मस्त पार पडले. पाक्षिकही संपले. मी मयश्याचा तो विषय विसरूनही गेलो. 

          पण नंतर एकदा मला त्याची आई भेटली. ती म्हणाली, “ माझ्या मयशाला नाट्यछटा दिलीस तेव्हा मला किती आनंद झाला होता ?  तो रोज मला म्हणून दाखवत होता. पण त्याचे सर्वांसमोर सादरीकरण झाले नाही याबद्दल मला खूप वाईट वाटले. तू त्याला सहभाग दिला नसतास तरी चालले असते , पण त्याचा वाढत असलेला आत्मविश्वास मी कमी होताना पाहिला आहे. खरोखरचा शिक्षक झालास कि असे कधीच करू नकोस. मुले अपेक्षा ठेवून असतात. माझा मयसा असाच अपेक्षा ठेवून होता. त्याचा आणि माझा दोघांचाही तुझ्यामुळे अपेक्षाभंग झाला.” 

          मी त्या माऊलीचे उदगार ऐकून अक्षरशः निःशब्द झालो. माझ्याकडे उत्तर नव्हते. मी पुरता गांगरून गेलो. माझ्या मित्राच्या भावावर मी अन्याय केल्याचे माझ्या आता लक्षात आले होते. हा मयसा नंतर मला ज्या ज्या वेळी भेटे , त्या त्या वेळी मला त्याच्या आईचे ते मौल्यवान शब्द आठवत. त्याने मोठेपणी मोबाईल दुरुस्ती करण्याचा व्यवसाय सुरु केला होता. गोव्याला जाऊन जॉब करत होता. लग्न केले. 

          एके दिवशी माझ्या कानावर एक वाईट बातमी धडकली. मयश्याने आत्महत्या केली होती. मला खरेच वाटेना. पण बातमी खरीच होती. मी माझ्या मित्राला जाऊन भेटलो. त्याने सांगितले कि तो हल्ली टेन्शनमध्ये होता. मानसिक तणावात येऊन त्याने गळफास लावून घेतला होता. मला त्याच्या आईला भेटण्याची इच्छा असूनही भेटू शकलो नाही. मित्राच्या पाठीवर हात ठेवला आणि त्याचे सांत्वन केले. 

          त्याने ‘ बोलावणे आल्याशिवाय नाही ’ ही नाट्यछटा पाठ केल्याचे मला चांगले आठवते. पण बोलावणे आल्याशिवाय त्याने आपल्या मरणाला स्वतः जवळ केले होते. काहीही झाले तरी आपले आयुष्य कधीही महत्त्वाचे असते, ते असे बारीकसारीक गोष्टीसाठी कधीही संपवायचे नसते. 

          मयश्यासारखी अनेक तणावग्रस्त मुले या जगात असतील त्यांनी आपल्या जीवनाकडे सकारात्मक रितीने बघितले पाहिजे. आत्महत्या हा नकारात्मक दृष्टीकोन मनातून कायमचा हद्दपार करायलाच हवा. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Tuesday, January 12, 2021

किलवर तिरी

 किलवर तिरी


          कित्येकांच्या घराचा पत्ता नसतो पण त्यांच्या घरी पत्त्यांचा पत्ता असतो. पत्ते म्हणजे खेळातले पत्ते. टेबलाचे एखादे ड्रॉवर उघडावे तर पत्ते सापडतील ते पत्ते. या पत्त्यांना आता प्लेईंग कार्डस म्हणतात. हे नाव बाकी लगेच समजते. पूर्वी या पत्त्यांना कॅट म्हटले जाई. 

          कॅट म्हणजे मांजर. मांजर जसे प्रत्येक घरी पाळले जाई तसेच हे कॅट सुद्धा पाळले जाई म्हणून की काय त्यालाही कॅट म्हणत असावेत कदाचित. मांजराची जशी म्याँव चालते तशीच या कॅटची पिशी चाले. या पिशीने माणसे वेडीपिशी होताना मी बघितली आहेत. 

          आम्ही तेव्हा सावंतांच्या चाळीत भाड्याने राहायचो. मालक आणि सगळे शेजारी गुण्यागोविंदाने राहात. एकमेकांच्या सुखदुःखात सामील होत. एका घरात कायम पत्त्यांचा खेळ चाले. मोठी माणसे केवळ एक टाईमपास म्हणून पत्ते खेळत. टेपरेकॉर्डर चालू असे. त्यावर जुने ' आवारा हू ' हे गाणे लावलेले असे. कधीकधी ' सावज माझं गवसलं ' असे मराठी गाणे वाजत असे. गाणी थांबली कि आम्ही समजू कि पत्त्यांचा डाव संपलेला आहे. असे एकावेळी दोन मनोरंजनाचे खेळ सुरु असत. 

          आम्ही लहान होतो. आम्हाला पत्तेही कळत नसत आणि गाण्यांचा अर्थही. हळूच त्यांच्या घरी जाऊन एक फेरी मारुन येत असू. त्यांचे पत्ते पिसण्याचे कौशल्य बघत असू. पिसतानाचा टाळीसारखा येणारा आवाज आम्हाला आवडे. नवनवीन पत्ते आणि त्यावरील नवनवीन चित्रे बघताना मजा येई. निम्मे निम्मे पत्ते दोन हातात घेऊन फर्र असा आवाज करत पिसण्याची पद्धत आम्हाला तिथेच शिकायला मिळाली. 

          गाढवपिशी, पाच तीन दोन , मेंडीकोट आणि पत्त्यांच्या विविध गमतीदार जादू बघत बघत शिकत गेलो. समोरच्याला कोट देता देता किती कोट सेकंद वाया घालवले असतील नकळे. पण त्यातही मौज येत होती. जादू दाखवून समोरच्याला उल्लू बनवून निघून जाताना मोठेच ज्ञान घेतल्यासारखे वाटे. बघता बघता जसे पत्ते बदलत गेले, गाणीही बदलत गेली. ' सून सायबा सून , प्यार की धून , हो sss मैंने तुझे चुन लिया ' असे तोंडाने म्हणत पत्त्यांची पानेही चुन चुन चुनली जात होती. 

          बाबा घरी आले कि आमचे हे खेळ आपोआप थंड होत. एकदा तर बाबांनी आमचं पत्त्यांचं हे वाढतं वेड पाहून पत्त्यांना पेटत्या चुलीत घालून आम्हाला थंड करुन टाकलं होतं. परीक्षा जवळ आल्या कि आम्हाला अभ्यासाशिवाय काहीच करण्यास मज्जाव असे. गाणी ऐकू येत तेव्हा अभ्यास करताना समोर पत्ते नाचू लागत. आईने आमच्या घराचा दरवाजा बंद केलेला असे. मोठ्या ताईचाही डोळ्यांचा धाक असे. पण सुट्टीत पुन्हा पत्तेबाजार भरे. 

          शेजारचे राणेकाका एस.टीत कंडक्टर होते. ते ड्युटीवरुन आले कि पत्त्यांच्या पिसण्याचा आवाज येई. ते मेंडीकोट खेळण्यात पटाईत होते. समोरच्याला कोट घालून आपण उघडेबंब खेळत राहात. कोट घालून म्हणजे खेळात ते दुसऱ्यांना कोट चढवत असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे. खेळ एकदा रंगात आला कि ते आपल्या वयाचेही भान विसरुन जात. काकीने जेवायला बोलावले तरी त्यांना जेवायला जायला वेळच होई. अर्ध्या पाऊण तासांनंतर गेले तर गेले. नाहीतर स्वतः काकीच त्यांना हाताला धरुन घेऊन जाई. तरीही ते सुरु असलेला डाव संपवूनच उठत. 

          एकदा त्यांचा पत्त्यांचा खेळ रंगात आला होता. त्यांच्याकडे असलेले पत्ते तितकेसे स्ट्रॉन्ग नसावेत बहुदा. ते मोठ्याने ओरडत खेळत होते. त्यांनी ' किलवर तिरी ' हातात घेतली होती. ते टाकणार इतक्यात त्यांच्या लक्षात आले कि आपल्यावर कोट बसणार. ते सावध झाले. त्यांनी आपल्या पायाखाली दडवलेला तुरुपाचा पत्ता बाहेर काढला आणि ते कोटापासून वाचले. 

          दुसऱ्यांना कोट लावणारे स्वतः कोट लावून कसे घेणार ? अक्कलहुशारीने आणि शिताफीने त्यांनी स्वतःला मोठ्या संकटातून वाचल्याचा उदंड आनंद त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसत होता. त्यावेळी ते म्हणालेही होते , " किलवर तिरी टाकली असती तर काय झाले असते ? " मोठे संकट आले असते अशा आविर्भावात ते बोलताना पाहून मी ही ' फार मोठ्या संकटातून काका वाचले ' असा अभिनय करुन त्यावेळीही खळखळून हसलो होतो. घरी गेल्यावर आईबाबांना आणि भावंडांना सांगितल्यानंतर तर आम्ही सगळे इतके हसलो होतो कि राणेकाकी आम्हाला विचारायला आली होती. तिला सांगितले तर तिही मनसोक्त हसली. 

          जीवनात अशी ' किलवर तिरी ' सारखी नको असलेली माणसे येतात तसे हवे हवेसे वाटणारे तुरूपही येतात. असे तुरुप आले कि मनाला हुरुप येतो. माणसांचा हा तुरुप सतत रुपे बदलत राहतो. जीवनरुपी पत्त्यांचा खेळ हा असाच सुरु राहणार त्याला कधीच अंत नाही. आता ते राणेकाकाही नाहीत , पण त्यांची ही आठवण तुरुपासारखी काढून मी माझ्या जीवनाला नवीन रुप देण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय.


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Monday, January 11, 2021

सागरा, प्राण तळमळला

सागरा प्राण तळमळला


          आमच्या घरातील सर्वांनाच भजनाची खूपच आवड आहे. माझ्या लहानपणी तर आमच्या  भजनात माझे एक चुलत काका पट्टीचे बुवा असल्यामुळे मला भजनाची गोडी निर्माण झाली. भजनासाठी आम्ही तहानभूक विसरुन भजन असेल तिथे जाण्याचा प्रयत्न करु. 

          माझे बाबा, चार काका, मी, माझा भाऊ आणि बुवाकाकांचे दोन मुलगे असे नऊजण उत्तम भजन करत असू. बुवाकाका पेटी छान वाजवत. माझे भाईकाका मृदुंग वाजवत. बालाकाका झांज वाजवत. आणि आम्ही उरलेले सहाजण उत्तम कोरस होतो. सुर, लय आणि ताल यांची चांगली जाण असलेले आम्ही बुवाकाका जे म्हणत ते लगेचच उचलून धरत असू.    

          बुवाकाकांचे दोन्ही मुलगे संगीतप्रेमी होते. वडिलांचे सर्व गुण त्यांच्यात भिनले होते असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. बुवाकाका सर्वगुणसंपन्न. ते मृदुंगही छान वाजवत. भाईकाकांच्या मृदुंगाचा ठेका चुकला तर ते पेटीच्या दोन कडांवर हाताने वाजवून ठेका समजावून सांगताना मी कित्येकदा बघितले होते. 

          बुवाकाकांचा मोठा मुलगा सागर. तो अभ्यासातही हुशार होता. आमच्याबद्दल बुवाकाकांना अतिशय आदर होता आणि आम्हालाही त्यांच्याबद्दल अजूनही आदर आहे. जवळपासच्या पंचक्रोशीत तर बुवाकाका प्रसिध्दच. त्यांच्या भजनासाठी लोक झोपलेले उठून येत असत. आम्ही गणपतीच्या अकरा दिवसात दररोज सरासरी पाच भजने करत असू. एका रात्रीत तर आम्ही सलग १० - ११ भजने करेपर्यंत पहाट झाली होती. 

          आम्ही चौघे लहान असलो तरी आमची भजनाची आवड आम्हाला स्वस्थ बसू देत नव्हती. माझा भाऊ न्हानू दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीची भजने म्हणून घर दणाणून सोडायचा. सोबतीला आम्ही असायचोच. बुवाकाकांच्या मोठ्या मुलाला सागरला आम्ही राजू किंवा ' राजग्या ' म्हणायचो. राजू खरंच सगळ्यांच्या मनांवर राज्य करणारा असाच. त्याला आमच्याकडे यायला खूप आवडायचे. आमच्याबरोबर खेळता खेळता तो मोठा कधी झाला ते समजलेच नाही. तो मोठा झाला आणि आमचे बुवाकाकांबरोबरचे संबंध बिघडले होते. तरीही तो आमच्याकडे येत असे. पण हळूहळू त्याचे आमच्याकडे येणे बंद झाले. त्याचा स्वभाव बदलला नसला तरी त्याच्या सवयी बदलल्या होत्या. त्याने दारु प्यायला सुरुवात केली होती. त्याचे दररोज दारु पिऊन घरी येणे आम्हाला खटकत होते. पण आम्ही काहीही करु शकत नव्हतो. तो आता खूपच प्यायला लागला होता. 

          छोटा असतानाचा राजू आणि आताचा पस्तिशीतला राजू पूर्णपणे बदलून गेला होता. आम्ही वर्षातून दोन तीन वेळा जायचो तेव्हा तेव्हा राजग्याचं हे दारुमय जीवन बघून पायाखालची जमीन सरकायची. सहज तोंडातून उद्गार यायचे , " कोण होतास तू , काय झालास तू ?  " आम्ही रागाने त्याच्याशी बोलणे टाळू लागलो. तो बोलण्याचा प्रयत्न करीत असे, पण मी जाणूनबुजून त्याच्याशी बोलत नसे. माझा भाऊ त्याला जाताना येताना गाडीवर घेत असे. दया येई म्हणून प्रसंगानुसार पैसेही देत असे. 

          मला तो ' दादा ' म्हणे. आता त्याने आपली हेअरस्टाईल बदलली होती. लांबलचक दाट केस आणि दाढीसुद्धा हातभर वाढलेली. डोळे सतत लालभडक तांबारलेले. त्याच्याकडे बघून त्याचा रागही येई आणि दयासुद्धा. आमच्याकडचे त्यांचे येणे जाणे बंद असले तरी आमच्या घरात कुणाचेही मयत झाले तरी बुवाकाकांनी आणि राजूने स्मशानात सर्वांच्या आधी हजेरी लावलेली मी बघितलेली आहे. 

          नुकतेच माझ्या चुलत बहिणीचे लग्न होते. आम्ही लग्नाला गेलो होतो. लग्न झाले. सर्वांची जेवणे झाली.स्वागत समारंभ पार पडला. अचानक माझा फोन वाजला. गर्दीच्या आवाजात मला तो समजला नाही. सहज बाहेर आलो. फोन हातात घेतला. तीन मिस कॉल होते. एका नातेवाईकांचा फोन आला होता. मी त्यांना उलट फोन केला. 

          त्यांनी मला सांगितले , " सर, एक वाईट घटना घडली आहे. तुमच्या बुवाकाकांचा मोठा मुलगा ऑफ झाला. " मी त्यांना पुन्हा विचारले तरीही त्यांनी तेच उत्तर दिले. त्यावेळी मला अगदी लहानपणीचा तो ' राजू ' आठवला. तो निरागस , गोंडस राजू. 

          आधी राजू दारु पिऊ लागला होता आणि नंतर दारुच त्याला दररोज पित होती. दारु पिण्यासाठी त्याची पावले दिवसातून एकदातरी अड्ड्याकडे वळत होती. शेवटी दारुनेच त्याचा घात केला. त्याने दारुत स्वतःला बुडवून घेतले. आता दारुनेच त्याला कायमचे बुडवले होते. त्याचा दारुण मृत्यू झाला आणि त्या सागराचा प्राण कायमचा तळमळला. एक चांगला सागरच सागरात बुडाला. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Saturday, January 2, 2021

हर्ष दाती

 हर्ष दाती


          लग्न झालं की काही दिवसांत घरातल्यांचा एकच घोषा सुरु होतो. आता लवकरात लवकर घरात पाळणा हलला पाहिजे. त्यांचं सुद्धा बरोबर असतं म्हणा. 

          लवकर मूल झालं तर ते लवकर मोठं होतं. आपण नोकरीला असलो तर रिटायर्ड होईपर्यंत आपलं मूल आपल्या पायावर उभं राहिलेलं असतं. पण हे त्यावेळी आपल्याला समजत नाही. समजतं तेव्हा खूप वेळ झालेला असतो. 

          आमचं लग्न होऊन अडीच वर्षांनंतर मला मुलगी झाली. तोपर्यंत अनेकविध प्रसंग आमच्या आयुष्यात येऊन गेले. असे प्रसंग तर सर्वांच्याच आयुष्यात येतच असतात. असे प्रसंग येतात आणि आपल्याला अधिक कणखर बनवून जातात. 

          सर्वांची सत्वपरीक्षा होते. कोणीही त्यातून सुटत नाही. त्याची तीव्रता कमी जास्त असू शकते. काही त्याचा निकराने सामना करतात तर काही ढेपाळतात. प्रत्येकाच्या वैयक्तिक विचारसरणी व संस्कारांवर ते अवलंबून असते. 

          १८ जानेवारी २००३ हा आमच्या आयुष्यातील अतिशय प्रतिक्षेचा दिवस उजाडला होता. नऊ महिने पोटात बागडणाऱ्या जीवाला बाहेरचं जग पहायचं होतं. दोन जीव वेगळे होणार होते. माझी पत्नी आई होणार होती. 

डॉक्टरांनी सिझर करावं लागणार हे आधीच सांगून टाकलं होतं. शेवटी सिझर झालं. डॉक्टर हसत बाहेर आले होते. त्यांनी मला आत बोलावलं. मी घाबरतच आत गेलो. पांढऱ्या पसरट भांड्यात ठेवलेल्या बाळाला बघून मला जो  आनंद झाला तो आभाळापेक्षा मोठा होता. 

          डॉक्टरांनी मला बाळाच्या गळ्यात अडकलेली नाळ दाखवली. म्हणाले, " जरा उशीर झाला असता तर, बाळ घुसमटले असते. आता ते ठिक आहे. तुमची पत्नी थोड्या वेळाने शुद्धीवर येईल मग तुम्ही तिला भेटू शकता. "  मी निर्धास्त झालो.पण पत्नीला भेटून तिचे अभिनंदन करायला मी उतावीळ झालो होतो.

          आम्हाला एक गोड मुलगी झाली आहे हे मला तिला सर्वांच्या आधी सांगायचे होते. मला पहिली मुलगीच हवी होती. पण पत्नीला मुलगा हवा होता. मुलगी झाली म्हणून मी अत्यंत खुशीत सर्वांना सांगत सुटलो होतो. 

          पत्नी शुद्धीवर आली. तिला माझ्या अगोदरच समजले होते. पण ती मला म्हणाली, " तुमचंच खरं झालं, तुम्हाला हवी तशी मुलगी देवाने दिली आहे. तुमचा विजय झाला, अभिनंदन तुमचं! " मी तिचं अभिनंदन करायला जात होतो तर ती माझंच अभिनंदन करत होती. ती  माझं अभिनंदन करत असली तरी ती विजयी झाली नाही हे तिचा चेहरा मला सांगत होता. 

          गोरी गोमटी माझी मुलगी माझे प्राणच. हॉस्पिटलमध्ये असल्यापासून मी तिचा ताबा घेतला. तिच्याशी मी इतका बोलत राही की माझे बोलणे तिला नक्की कळत असावे असे मला नेहमीच वाटत राही. तेव्हाच तिचे नाव मी छकुली ठेवले. सगळे तिला छकुलीच म्हणू लागले. 

          तिचे नाव तिच्या काकांनी ठेवले. हर्षदा. खरंच मला नेहमीच हर्ष देणारी म्हणून मला तिचा जास्त अभिमान वाटतो. सर्वांनी मला सांगितले की पहिली बेटी धनाची पेटी असते. 

          धनासाठी मी कधीच आटापिटा केला नाही. पण तिच्या रूपाने एक न मोजता येणारं धन माझ्या पदरात पडलं म्हणून मी परमेश्वराचे त्याचवेळी साष्टांग नमस्कार घालून आभार मानले होते.


©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )

आजोबांचा अडकित्ता

 आजोबांचा अडकित्ता 

   

मी तेव्हा खूप लहान होतो. मला आजोबा धूसरसे आजही आठवतात. पण त्यांच्या आठवणी मला सांगताना बाबांनी सांगितलेल्या गोष्टीचा आधार घ्यावा लागतो. आम्ही भावंडांनी घरातल्या अंथरुणांबरोबर खेळायला सुरुवात केली होती. एक एक गुंडाळलेले अंथरून काढून ते लादीवरून गाडीसारखे ढकलत ढकलत पुढे सरकवत होतो. 

तेवढ्यात आजोबा तेथे आले होते आणि आम्हाला रागावले होते. त्यानंतर आम्ही तसला खेळ पुन्हा कधीच खेळलो नसू. मी अगदीच लहान. गोंडस बाळ. आजोबांचा लाडका. घरी असताना मला खेळवायला त्यांना खूप आवडे. आजोबा दिसायला हिरो होते हिरो. ते सगळ्या गोष्टी करण्यात पटाईत होते. त्यांचा आवाज सुरेल होता. ते तमाशात लावण्या नाचत. भजनात बुवागिरी करत. 

त्यांच्याकडे नेहमी पानाची चंची असे. चंची म्हणजे पान, सुपारी , तंबाखु , अडकित्ता आणि कात ठेवण्याची छोटी पिशवीच. त्यात तीन चार कप्पे असत. ती गुंडाळून ठेवता येत असे. त्यात आजोबा आपल्या गोळ्या , सुटे पैसे ठेवत असत. मी दोन वर्षाचा असतानाची गोष्ट असेल कदाचित. मी आजोबांच्या चंचीलाच हात घातला. त्यातली एक एक वस्तू मी काढू लागलो. आजोबा माझ्याकडे कौतुकाने बघत होते. 

मला काय खेळायचेच होते. माझा खेळ होत होता. ते सुद्धा त्यात लहान होऊन सहभागी झाले होते. बोबड्या बोलामध्ये माझ्याशी बोलत होते. ते नेहमी पंचा किंवा धोतर नेसत. आतासारख्या चड्ड्या घालणं त्यांना मान्य नव्हतं. त्यावर खिसा असलेली मांजरपाटाची बाबांनी शिवलेली बनियन असे. मांजरपाट म्हणजे साधे खळीचे कापड. पण या पेहरावात आमचे आजोबा नटासारखेच भासत. ते स्वतः गाणी रचत. कित्येक गाणी , अभंग, जेवणावळीचे श्लोक त्यांना पाठ होते. 

मी आता माझा मोर्चा अडकित्त्याकडे वळवला. मला ते यंत्र खेळणंच वाटलं. मी तो फेकत होतो. दुडूदुडू जाऊन परत आणत होतो. असं माझं खेळणं सुरुच होतं कि अचानक आजोबांनी माझ्याकडे अडकित्ता मागितला. मी माझ्या खेळात रंगून गेलो होतो. मी अडकित्ता द्यायला तयार नव्हतो. त्यांनी माझ्याकडून अडकित्ता काढून घेण्याचा प्रयत्न केला. 

मी चिमुकल्या मुठीत घट्ट पकडून धरलेला अडकित्ता सोडतच नव्हतो. ओढून घेण्याच्या प्रयत्नात माझ्या हाताला त्याची धार लागेल म्हणून ते काळजी घेत होते. माझी पकड आणखी घट्ट होत गेलेली. शेवटी आजोबांनी " नातवा , माका दी आडकती , दी बाबू " अशी विनवणी सुरु केली. मी अडकित्ता त्यांच्या दिशेने फेकला. अडकित्ता माझ्या हातातून सुटला होता. तो परत मागे येणार नव्हता. 

तो थेट आजोबांच्या कपाळावरच बसला. नशीब डोळ्यावर बसला नाही. कपाळाला नुसता बसला नाही तर त्याची धार लागून आजोबांच्या कपाळातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. आजोबांनी कपाळ दाबून धरले. तेवढ्यात तिथे बाबा आले आणि माझा पराक्रम बघितला. 

बाबा मला मोठ्या आवाजात ओरडले. मी बाबांच्या आवाजाने घाबरुन रडू लागलो. घरातले सगळे काय झाले म्हणून बघायला आले. आजोबांवर अडकित्ता मारला म्हणून मला कोणीही जवळ घेईनात. मी आणखीनच भोकाड पसरले. माझे प्रेमळ आजोबा मला काहीही बोलले नाहीत कि रागावलेही नाहीत. 

उलट त्यांनी मला हलकेच उचलून माझे पटापट पापा घेतले. आता मला माझे आजोबाही नाहीत आणि ते गोड गोड पापा सुद्धा. आता असे निरलस प्रेम मिळणे केवळ दुरापास्त झाले आहे.



©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



मी रंगवतोय

 मी रंगवतोय 

   

माझ्या भावाचा कलाशिक्षकाचा कोर्स नुकताच पूर्ण झाला होता. त्याने ए. टी. डी. केल्यानंतर पुढे जी. डी. आर्ट करण्याचे मनोमन ठरवले होते. मग काय ? त्याने ठरवले आणि आम्हीही त्याला परवानगी दिली. खर्चाची आम्हाला कल्पना नव्हती. पण त्याला कधी कधी आठवड्यालाच  २ - ३ हजाराचे रंग, ब्रश, कॅनव्हास अशा महागड्या वस्तू लागत. तो लगेचच मागत नसे. कारण त्याला आपल्या परिस्थितीची जाणीव होती. आपले अगदीच अडते आहे असे वाटले तरच तो मागणी करी. त्याने मागणी केल्यानंतर त्याला आठवड्याने वस्तू मिळत. 

गरिबांनी महागडे शिक्षण घेणे, ते व्यवस्थित पूर्ण करण्याला चिकाटी लागते. माझ्या भावाकडे चिकाटी होती. परिश्रम करण्याची क्षमता होती. पण तो बाबांना घाबरत असे. लहानपणी अनेक उचापती केल्यामुळे त्याला खोडकर म्हटले जाई. तो आईला सांगी. आईकडून बाबांकडे ते रात्री पोहोचे. मग बाबा म्हणत , “ उद्या बघू.” त्यांनी कधी नाही म्हटले नाही. ते तरी लवकर कसे देऊ शकणार होते ? आम्हाला त्यांचा संघर्ष दिसत होता. 

मग माझ्या भावानेच ठरवले. आपण काहीतरी काम करून पैसे मिळवायचे. एवढी डिग्री मिळवायची आहे तर रात्रंदिवस काम करून पैसे मिळवीन असे त्याने ठरवूनच टाकले. प्रत्येकवेळी बाबांकडे पैसे मागणेही त्याला अजिबात आवडत नव्हते. 

घरांना रंग काढून देणारे अनेकजण आमच्या दुकानात दाढी, केस करायला येत असत. त्यांच्यापैकी दोघांनी त्याला कामावर यायला सांगितले. घरांना रंग द्यायचे काम होते. काम असेल तसा हा जात असे. चार चार दिवस बाहेर राहून त्यांच्यासोबत भिंतींना रंग काढण्याचे काम करून येतील ते पैसे बाबांकडे आणून देण्याचे त्याने आता सुरु केले होते. बाबांनाही बरे वाटले. पण मला आवडले नव्हते. 

माझा कलाकार भाऊ भिंती रंगवतोय हे मला बघवत नव्हते. भिंतींवर जशीच्या तशी चित्रे काढणारा तो रंगाऱ्यांबरोबर भिंती रंगवून दिवसाची मजुरी आणून देत होता. त्याला आनंद वाटत असल्यामुळे मीही काही बोललो नाही. पण त्याला उन्हातान्हात कामे करताना भरपूर त्रास होत होता. त्याला होत असलेला त्रास मला जाणवे. 

त्यादिवशी तो असाच चार पाच दिवसानंतर कामावरून आला होता. मस्त हसत होता. कामाचे आलेले पैसे बाबांच्या हातात देऊन मनसोक्त जेवला. तो आज खूप दमलेला दिसला. त्याने लगेच अंथरून घातले आणि झोपी गेला.

रात्री चार वाजता मला जाग आली. कसला तरी आवाज आला होता. बघतो तर काय ? भाऊ उठला होता. मला वाटले पाणी प्यायला उठला असेल. तो भिंतीवर उजव्या हाताने काहीतरी वरखाली करत होता. त्याचे डोळे बंद होते. म्हणजे तो झोपेत होता. मी त्याला सहजच विचारले , “ काय रे न्हानू, काय करतोयस ? ” त्यावेळी तो डोळे बंद असतानाच म्हणाला होता , “ मी रंगवतोय.” मला हसू आले आणि वाईटही वाटले. मी त्याला हलकेच चिमटा काढून झोपेतून जागे केले. तेव्हा त्याचे लाल झालेले डोळे चोळत तो जागा झाला. त्याला आपण झोपेत असताना ब्रश घेऊन रंगवतोय हे लक्षात आले असावे. तोही गालातल्या गालात हसला आणि पुन्हा गाढ झोपी गेला. 

त्याला लहान असताना झोपेत चालण्याची सवय होती. पण मोठा झाल्यानंतरही तो त्याचं जागेपणीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपेतील स्वप्नातही आपल्या भविष्यातील आयुष्याला रंग देत होता असे मला वाटत होते. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असला तरी तो याबाबतीत माझ्यापेक्षाही नेहमीच मोठा असणार आहे. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...