Thursday, December 31, 2020

आंब्यार जाम

 आंब्यार जाम


          मिठबांवच्या निवासी शिक्षक प्रशिक्षणात रात्री सांस्कृतिक कार्यक्रम करावे लागत. दररात्री वेगवेगळ्या गटाकडे कार्यक्रम करण्याचे नियोजित असे. आमच्या गटाची पाळी आली होती. मला काहीतरी सादर करावेसे वाटू लागले. माझा मित्र सदानंद गांवकर हजरजबाबी आणि वक्ताही चांगला. त्याच्याशी बोललो. तो लगेच तयार झाला. 

          दोघांनी संवाद समजून घेतले. मी त्याला एकदाच समजावून सांगितले होते. पण त्याने तर बाजीच मारली. त्यात अधिक रंगत आणून त्याने केलेली मालवणी बतावणी अधिकच लक्षणीय ठरली होती. दशावतारी नाटकाच्या अगोदर लोकमनोरंजन करण्यासाठी ' शंकासूर ' येतो आणि लोकांना हसवतो. त्याच्या विनोदी बोलण्याने लोकांची हसून हसून मुरकुंडी वळते. 

          अर्थात शंकासूराचे काम करणारा तसा मिश्किल असावा लागतो. तो कोण आहे हे लोकांना समजत नाही. कारण त्याने बुरखा पांघरलेला असतो. त्याच्या आवाजाने ओळखणंसुद्धा कठीणच असतं. कारण शंकासूर आवाज बदलून कोणत्याही भाषेत बोलतो आणि मनाला येईल तसे बोलत जातो. 

          स्टेज डेरिंग येण्यासाठी नवीन आलेल्या कलाकाराला नाटकवाले ही भूमिका देऊन बोलकं करण्याचा प्रयत्न करतात. त्यात नाईकांची भूमिका बतावणीची असते. ते त्याला नीट समजावत समजावत मूळ मुद्द्यावर आणण्याचे महत्त्वाचे काम करतात. सदाने ही भूमिका अगदी पट्टीच्या नाईकाप्रमाणेच पार पाडली होती. 

          मी शंकासूर बनून आलो. मला बुरखा मिळाला नव्हताच. मी माझ्या लुंगीचा वापर केला. माझे तोंड दिसू नये, ते लपून राहावे असे झाकून घेतले. विचित्र हालचाली करत मी रंगमंचावर अवतीर्ण झालो. माझा अवतार बघूनच प्रेक्षागृहातून टाळ्यांचा कडकडाट झाला. मी लुंगीच्या आत खुश झालो. मी माझ्या संवादाला सुरुवात केली. 

          नायकांनो, ' तुमका सांगतंय, आंब्यार जाम , माडार गाय आनि समुद्रात वनवो दिसलो. ' या तिन्ही गोष्टी मी नाईकांना नीट समजावून सांगताना लोकं पोट धरुन हसताना पाहून मला आणखी चेव येत होता. आंब्यावर मला जाम दिसले. सगळीकडे जामच जाम होते. नंतर पुढे गेल्यावर मला माडावर गाय चरताना दिसली. पुढे समुद्रात वणवा पेटलेला दिसला. अशा असंबद्ध गोष्टी मी सांगत चाललो होतो. हालचालींनी प्रत्येक मुद्द्याला अधिक टाळ्या घेत होतो. 

          काही लोकांना हा संकासूर नवाच होता. त्यांनी कदाचित पहिल्यांदाच तो बघितला असावा. मी सुद्धा तो पहिल्यांदाच करत होतो. विद्यार्थीदशेत असताना अनेकविध भूमिका केल्या होत्या. नाईकांच्या सोज्ज्वळ भुमिकेत काम करणारा माझा मित्र सदानंद गांवकर अतिशय हुशारीने माझे म्हणणे खोडून काढत होता. मी सगळ्यांना ' पकवतोय ' या शब्दाने तर त्यानेच अनेकदा टाळ्या मिळवल्या होत्या. त्याने सर्वांना प्रत्येक गोष्ट समजेल अशी उलगडून दाखवली होती. 

          मी आपला त्याच्या प्रत्येक उत्तराला ' असा काय , माका वाटला तसा ' असं म्हणून हसणं उकळत होतो. सदाने नीट स्पष्टीकरण दिले होते. तो म्हणाला होता , " संकासुरा, अरे बाबा , तसा नायहा ... आंब्यार जाम म्हंजे एक माणूस जेवल्यावर आंब्यार चडलो, तेका जांभये येवंक लागले , म्हणून आंब्यार जाम ,  माडार गाय म्हंजे एक मानूस माडाच्या झाडावर माडी काडूक चडलो , तेना थोडी माडी पिल्यान , तो थयसर गावंक लागलो , म्हणून माडार गाय..... आणि शेवटचा समुद्रात वनवो म्हंजे आगीचो वनवो न्हय, समुद्रात जावंन पकडलले मासे वनवो रवान टोपलेत टाकूक लागलो, म्हणून समुद्रात वनवो , मेल्या तो वनवो न्हय. " असं करत करत त्याने माझी संकासूराची अक्षरशः दांडीच उडवली होती. 

          आमचा तो कार्यक्रम ७-८ मिनिटांचा होता, पण संपल्यानंतर सर्व मित्रांनी ' भारीच रे प्रवीण ' असा लगेचच प्रतिसाद दिला होता. मला मस्त वाटत होते. लोकांना हसवताना खूप मजा येते. लोक तसे लगेच हसत नाहीत. त्यांना हसवावे लागते. पण माझे मित्र खळखळून हसताना पाहून मला ' संकासूर ' वटवता आल्याचे समाधान वाटले. आयुष्यात असे अनेक संकासूर येतात, पकवतात. आपण नाईकांसारखे सावध राहिले पाहिजे. मी फक्त एक पात्र म्हणून ' संकासूर ' केला. बाकी मी काही खराखुरा संकासूर नाही.


© प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Wednesday, December 30, 2020

गोष्टींची कॅसेट

 गोस्तींची कॅसेत


          रत्नागिरीत माझ्या करिअरची मस्त सुरूवात झाली. नावाजलेल्या शाळेत नोकरीची संधी मिळाली होती. मी आनंदात होतो. राहण्याची सोय मामांकडेच झाल्यामुळे कोणतीच चिंता नव्हती. रत्नागिरीतील मामांना आम्ही ' बालामामा ' म्हणतो. त्यांची दोन मुले. एक मुलगी मनाली उर्फ गुड्डी. मुलगा मनिष उर्फ बबलू. 

          या दोन्ही मामेभावंडांनी मला माझ्या भावंडांची उणीव भासू दिली नाही. तो काळ खूप अनोखा होता माझ्यासाठी. नवीन नोकरी , नवीन घर, नवीन शाळा, नवीन नातेवाईक आणि नवनवे अनुभव यांनी माझी अनुभवांची शिदोरी दररोज भरुन जात होती. मी आपला साठवतच जात होतो. नवे नवे आकाश हवे , तसे घडत होते. कोकणनगर परिसर गजबजलेला असायचा. मामांचे शेजारीपाजारी चांगले होते. 

          साईबाबांची आरती करायला दर आठवड्यातून एकदा सगळ्यांकडे जायला मिळे. ओळख वाढली. ते मला चव्हाणांचा भाचा म्हणून ओळखू लागले. ' म्हाडा ' मध्ये नोकरीला असल्यामुळे मामा म्हाडाने दिलेल्या खोलीमध्ये राहात. खोली छोटी असली तरी मामा-मामींनी मला खुशाल राहू दिले होते. कधीतरी मी त्यांना लिखाणात मदत करत असे. मला त्यांच्या अधिकारी असण्याबद्दल अतिशय आदर होता. मामी भूमि अभिलेखमध्ये होती. दोघेही नोकरीला होते. नोकरी करताना त्यांची होणारी धावपळ मी अगदी जवळून पाहात होतो. नेहमी हसतमुखाने नोकरी करताना पाहून मी ही तसंच करु लागलो. 

          सहवासात राहणाऱ्यांचा चांगला वास मी माझ्या अंगाला नेहमीच लावून घेत गेलो. मामा मामी माझ्यासाठी आदर्श होते. राहणीमान कसे असायला हवे ते मी त्यांच्याकडून शिकलो. नीटनेटकेपणा, प्रमाणभाषेत बोलणं, इस्त्री करणं, योग्य खरेदी करणं, मोठ्या शहरात टू व्हिलर चालवणं, व्यवहारज्ञान इत्यादी गोष्टी मला त्यांनीच शिकवल्या. गुड्डी आणि बबलू यांच्याबरोबर खेळता खेळता त्यांची मला सवयच झाली. शाळेतून आल्यानंतर त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मजा येई. दोघांनाही भन्नाट प्रश्न पडत. त्यांचा अभ्यास घेताना मला विविधता वापरावी लागे. 

          मी त्यांच्यात इतका मिसळलो कि घरी आल्यानंतर मला मुले दिसली नाहीत तर बोअर व्हायला होई. त्यांनी लावलेला लळा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. घरी आले तरी मामा - मामी कामात मग्न असत. मग मी मुलांशी गप्पा मारत बसे. रोज गप्पा काय मारणार , म्हणून गाणी म्हणून दाखवी. एकदा मी शाळेतून ' गोष्टींची कॅसेट ' घेऊन आलो होतो. टेपरेकॉर्डरवर ती लावली. त्यात छान गोष्टी होत्या. बबलूला त्या इतक्या आवडल्या कि तो रोज त्या लावण्याचा आग्रह धरु लागला. मलाही बरे झाले. मी कॅसेट लावून देऊन माझी शाळेची कामे करु लागलो. कॅसेट शाळेची होती त्यामुळे मी लवकरच ती शाळेत परत नेऊन ठेवली. 

          त्या संध्याकाळी मी घरी आलो. आल्या आल्या त्याचा पहिला प्रश्न , " दादा, ती गोस्तींची कॅसेत लाव ना ? " मी दुसरीच कॅसेट लावून त्याला सांगितले कि ही मी नवीन आणली आहे. ती ऐक. तो खूप हुशार. त्याने मला सांगितले , " दादा, मला फसवू नकोस ? ही जुनीच आहे , मला तू शाळेतून आणलेली तीच कॅसेत हवी आहे. " शेवटी मी त्याला उद्या आणून देतो असे दररोज सांगत राहिलो आणि तो माझ्यावर विश्वास ठेवत राहिला. आजपासून आठ दिवसांनी त्याचे लग्न आहे. तो एक यशस्वी इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे. त्याला ही आठवण सांगितली कि आजही तो जे हसतो तेव्हा मला तो छोटाच बबलू दिसतो ' गोस्तींची कॅसेत ' वाला जसाच्या तसा.



©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

मुंगीस्थान

 मुंगीस्थान


        शाळा सुटली. संध्याकाळचे साडेपाच वाजले तरी मी शाळेतच होतो. मुलेसुद्धा मी शाळा बंद करत नाही म्हणून शाळेतच थांबून होती. मी आता शाळेत राहत नव्हतो. तीन महिने शाळेत राहिल्यामुळे मुलांनाही शाळा सुटल्यानंतरही शाळेत थांबण्याची सवय झाली होती. 

          एका टेबलखालीच मी किचन बनवले होते. त्याला समोरुन पडदा लावून माझे स्वयंपाकघर दिसू नये याची खबरदारी घेतलेली होती. अर्थात माझे हे किचन बघायला कोण येतंय म्हणा ? पण ही गोष्ट  मला खवखवत होती त्याला मी तरी काय करणार ? त्याला जो पडदा लावला होता तो मी स्वतः डी.एड. ला असताना भरतकाम केलेला टेबलक्लाॕथच होता. बाहेर कपडे वाळत घालण्याच्या दोरीवरील कपडे दगा देऊ शकणार होते. 

          तीन महिन्यानंतर आता मी शाळेत राहात नव्हतो. पण जवळच एका मांगरात राहत असल्याने तिथे इतक्या लवकर जाऊन तरी काय करणार होतो. म्हणून शाळेतच वेळ घालवत बसलो. शाळा हे माझ्यासाठी नेहमीच मंदिर ठरलेले आहे. तिथे गेलो कि मी घराला पूर्णपणे विसरुन जातो. कोणत्याही अवघड क्षणी मला माझ्या शाळांनीच जास्त साथ दिली आहे. मी शाळेत इतका रमतो कि माझ्यासाठी इतके रमणीय स्थळ दुसरे कुठले नसेल. लहानपणापासून शाळेने साथ दिली. आता शिक्षक झाल्यामुळे शाळेची सदैव साथ राहणार आहे म्हणून मी मला जगातील सर्वात सुखी आणि समाधानी मनुष्य मानतो. 

          मुले काही जाता जात नव्हती. शेवटी त्यांना बाबापुता करुन मीच घरी पाठवले. मीच पाठवले, पण आता मला माझ्या मुलांची उणीव भासू लागली. मी आणि शाळा दोघेच उरलो. मुले नाहीत तर शाळा मला खायला येतेय असे वाटू लागले. विद्यार्थी असले तरच शाळेला किंमत नाहीतर उरतात फक्त रंगवलेल्या भिंती. त्या भिंती बोलक्या असल्या तरी माझ्याशी बोलत नव्हत्या. 

          कंटाळून मी मांगराचा रस्ता धरला. दोन मिनिटात रूमवर आलो. आता घराकडील आठवणी येऊ लागल्या. आज घरी गेलो असतो तर बरे झाले असते असे वाटू लागले. फोन किंवा मोबाईलची सोय असती तर किती मज्जा आली असती असे आता वाटतेय. मी दादरा नगर हवेली मध्ये बेटावर आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. दुपारची भांडी घासायला घेतली. दुपारचे जेवण तापवले. एकच जेवण तीन वेळा जेवायचे दिव्य करायचे होते. पण मला जेवण्यासाठी जगायचे नव्हते तर जगण्यासाठी जेवायचे होते. काय केले असेल ते मनापासून पोटात दवडायचे होते. 

          आज काय तिखट डाळ आणि भात होता. तोंडी लावायला भाजी नव्हतीच. आणलेले लोणचे बरणीच्या तळाला गेले होते. त्याच्यात बोट बुडवून आजच्या भाजीची कल्पना केली. कधी कधी मस्त कल्पना करायची म्हणजे त्रास होत नाही. त्यावेळी मी अशा अनेक कल्पना केल्याचे आठवून आजही हसू येते. जेवल्यानंतर पुन्हा भांडी घासली. तेव्हा मी घासलेली भांडी बहुदा चकचकीत दिसत. त्यात मी माझा चेहरा पाहू शकेन इतकी चकचकीत. 

          आता थोडे वाचन करून मग झोप आल्यानंतर झोपायचे होते. शेजारच्या गोठ्यातल्या शेरडांचे आवाज कानावर पडत होते. वाचता वाचता पुस्तक पोटावर ठेवून कधी झोपलो ते कळलेच नाही. झोपायच्या खोलीत  मालकांची धान्याची मोठी कोठी होती.त्यात भात ठेवलेले होते.ते भात खाण्यासाठी रात्री उंदरांची फौज गोळा होई. ती खडखड मला शिरशिरी आणायची. 

          पण ते आपली सोबत करत आहेत तर त्यांचा त्रास होतो असे म्हणणं कृतघ्नपणा ठरेल. गणपतीच्या वाहनाला मी घाबरत असे. त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारा तो आवाज शिसारी आणणाराच होता. अचानक रात्री चार वाजता डोक्यात काहीतरी चावतंय असं वाटलं. घाबरघुबरा होत जागा झालो. बघतो तर माझ्या भोवती लालभडक मुंग्यांनी वेढा दिला होता. चावऱ्या मुंग्या डोक्यात गेल्या होत्या. केसात शिरून सर्वांनी अचानक माझ्यावर हल्ला चढवला होता. मी प्रतिकार करू शकत नव्हतो. थोडा प्रतिकार केला म्हणून त्या इतक्या चवताळल्या कि अधिक चावा घेऊन मला सैरावैरा धावायला लागले होते. मग काय भररात्री मला बाहेर झोपावे लागले. झोप कसली लागते ? सकाळ होण्याची वाट पाहात मी जागा राहिलो. दुसऱ्या दिवसापासून मी त्या ' मुंगीस्थान ' चा धसका घेतला. माझ्या वाट्याला आलेले असे हे ' मुंगी स्थान ' कोणाच्याही वाटेला कधीही येऊ नये म्हणजे झाले.



 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

डोक्यावर मारु नका सर

  डोक्यावर मारु नका सर         

           दादरा शाळेत असतानाची घटना आहे. शाळेत शिस्त असायला हवी हे सगळ्यांनाच मान्य असेल. त्यासाठी मुलांना थोडी शिक्षा करून वटणीवर आणण्याचे प्रयत्न होत असतात. मी सुध्दा लहानपणी शिक्षकांचा व पालकांचा मार खाल्ला आहे. पाढे पाठ नसले तर पाठीत धबके मिळाले आहेत. बाबांच्या काळात त्यांना रुळाने मारण्याची पद्धत होती असे म्हणतात. ' छडी लागे छम छम् विद्या येई घम घम् ' असे बालगीत त्यावरूनच आले असावे. 

          माझे लग्न झाल्यानंतर माझ्या बोटात सोन्याची अंगठी आली होती. मला दागिने घालण्याचा सोस नाही. पण लग्नात घातली. आता काढायची कशाला म्हणून घालूनच ठेवली. ती थोडी सैल होत होती म्हणून दोऱ्याने गुंडाळून तिचा व्यास कमी करून बोटात घट्ट बसवलेली. आता ती बोटातून सुटण्याची भिती नव्हती. 

          मुलांच्या अभ्यासाबाबत मी अजुनही काटेकोर आहे. दिलेला अभ्यास त्यांनी केलाच पाहिजे हा सर्वसाधारण दंडक असे. माझाही तसाच आग्रह नेहमीच असतो. कधी कधी कामाच्या व्यापात अभ्यास तपासणे होत नाही. मग नुसते पाहून सुध्दा प्रतिक्रिया देता येते. दैनंदिन अभ्यास करणे हे विद्यार्थ्यांचे जसे काम असते तसे दिलेला अभ्यास वेळच्या वेळी तपासून देणे हे शिक्षकाचे काम असते. 

          मी दररोज अभ्यास देत असे. अभ्यास न केलेल्या मुलांना पाठीवर प्रसाद मिळे. कधी हातावर काठीने हलकेच मारून अभ्यास न आणल्याबद्दल सौम्य शिक्षा देत असे. कितीही शिकवले तरी मुलांमध्ये फरक पडताना दिसत नव्हता. कारण मुले घरी अभ्यासच करत नव्हती. पालकच शिकलेले नव्हते. त्यांना शिक्षणाबद्दल आस्था होती. पण तरीही ते मुलांकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे माझी तळपायाची आग मस्तकात जाई. एवढे सांगूनही मुले अभ्यास करत नाहीत म्हणजे काय ? माझा संयम सुटत चालला होता. मी शिस्तीसाठी शिस्तीचे हत्यार वापरू लागलो. मुले शाळेत यायची बंद झाली. 

          मग मुलांना घरी जाऊन शाळेत आणू लागलो. मुलांना आता शाळेत यावेच लागत होते. नाहीतर सर घरी येतात हे समजले. पालकांनीही " मारा तुम्ही सर , अभ्यासासाठी मारलेत तरी हरकत नाही " असे सांगितले. मग काय मला परवानगी मिळाली होती. मुलांनी अभ्यास करून चांगले शिक्षित व्हावे हा मूळ हेतू होता. तरी मार देणे हा काही त्यावरचा पर्याय नव्हता. पण नाही शिक्षा केली तर मुलांची पाटी नेहमी कोरीच राहताना दिसत होती. माझा संयम सुटला की मारणे आलेच. पण या शिक्षेची सवय होणे कधीही वाईटच. कारण मारल्याशिवाय अभ्यास येतच नाही असा समज दृढ होत जातो. पालक म्हणू लागले ते सर भारी आहेत. शिस्तीचे भोक्ते आहेत. मुलांना भरपूर मारून मस्त अभ्यास करून घेतात. 

          दरमहाच्या मासिक भेटीत केंद्रप्रमुख सूचना देत. मुलांचा अभ्यास कमी आहे त्याकडे लक्ष द्या. ते गेल्यानंतर त्या शेऱ्याचा राग येई. तो राग शिक्षेच्या रूपाने मुलांना परत मिळे. मुले अभ्यास करू लागली तसा मार सुध्दा कमी झाला. पण आता डोक्यावर मारायला सुरुवात केली. खुर्चीवरून न उठता मारायला बरे. 

          तीन चार दिवसानंतर आमच्या ग्रामशिक्षण समितीची सदस्या कोयना बाई झोरे उर्फ कोंडी आजी शाळेत आली. म्हणाली, " सर, तुम्ही मस्त शिकवता. तुमचा मुलांवर छान धाक आहे. तुम्ही आल्यापासून मुले अभ्यास करू लागली आहेत. पण सर , तुम्ही मुलांच्या डोक्यावर मारू नका. कारण तुमची अंगठी त्यांच्या डोक्यात बसते. एखाद्या मुलाच्या डोक्याला खोक पडली तर काय कराल ? " 

          मला तिचे येणे, जाणे, बोलणे अपेक्षित होते. पण तिने जे सांगितले ते अपेक्षितच नव्हते. ती जास्त वेळ थांबली नाही. लगेच निघूनही गेली. ती रागावलीही नाही. पण एका अशिक्षित आजीने मला एक चांगला धडा दिला होता. त्याच दिवशी मी ती सोन्याची अंगठी काढली. पुन्हा ती कधीच घातली नाही. मुलांना मारणे सोडून दिले. 

          मुलांना प्रेमाने जवळ घेतले. मुले मला घाबरेनाशी झाली. पण रोज शाळेत येऊ लागली. दररोज दिलेला अभ्यास वेळच्या वेळी करू लागली. मलाही माझ्या रागावर नियंत्रण आले. माराशिवाय अभ्यास होऊ लागला. हजेरी वाढली. मी अध्यापनाची डिग्री घेतली असली तरी ती अशिक्षित आजी मला जे शिकवून गेली ते मी आजपर्यंत वापरत आहे. जे मारल्याने होत नाही ते प्रेम दिल्याने नक्कीच होते याचा मला पुरता अनुभव नेहमीच येतो आहे. त्यानंतर मी अनेक शाळांमध्ये कामे केली पण शिक्षणाला मी प्राधान्य दिले आणि शिक्षेला गौणत्व. प्रेमाने मुलांना जिंकता येते. शिक्षेने कधीच नाही.


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )




आता कसे मस्त दिसताय

 आता कसे मस्त दिसताय        

        मी कधीही स्वतःकडे तितकेसे लक्ष दिले नाही. प्रसंगानुरुप जसे लक्ष द्यायला पाहिजे तेवढेच लक्ष माझे माझ्याकडे असे. पण आपण मनाने चांगले असलो तर तनाने सुद्धा चांगलेच असतो. मी नेहमीच मनाने सुदृढ राहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला माझ्या शरीराकडे जाणीवपूर्वक लक्ष देता आले नाही. दुसऱ्यांना सुख देण्यात व्यस्त असताना स्वतःकडे लक्ष द्यायचे राहूनच गेले. 

          आठ दिवस पत्नी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असताना तर मला माझ्याकडे लक्ष देणे अजिबात शक्यच नव्हते. मी तिची काळजी घेत होतो. ती बेडवर होती. पण मला मानसिक आधार देत होती. अर्थात ती स्वतः मनातून हादरुन गेलेली होती हे मला समजत होते. पण मी काहीच करु शकत नव्हतो. 

          मी तिच्याजवळ बसून बोलत राही. जीवनात आनंद आहे हे सांगत राही. जीवन एक उत्सव आहे , तो साजरा करायला हवा असा पोकळ दिलासा देत राही. ती सुद्धा माझे बोलणे हताशपणे ऐकत असे. स्वतः आनंदाने हसते आहे असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राही. मी तिच्या गुडघ्यापर्यंत लांब असलेल्या केसात बोटे घालून तिला येत असलेली डोक्यातील खाज कमी करत होतो. नीट आंघोळही होत नव्हती. केस धुणे होतच नव्हते. केसात उवांनी थैमान घातले होते. मी आय सी यु मध्ये तिच्या उवा काढताना ती म्हणाली होती , " किती करता हो तुम्ही माझ्यासाठी ? मला लवकर घरी जायचे आहे. मला कंटाळा आलाय. कधी मी यातून मोकळी होणार देव जाणे ?  " शिवलिलामृत , मारुती स्तोत्र , गणपती स्तोत्र, महालक्ष्मी मंत्र, गायत्री मंत्र सगळंच तिच्या मुखोद्गत होतं. ती म्हणत असे आणि मी ऐकत असे. कधीतरी ती मला म्हणायला लावी. मग मी ही नाईलाजास्तव म्हणत असे. ती मनापासून म्हणायची. पण मला देवाचाच राग आला होता. त्यामुळे माझ्याकडून मनापासून म्हटले जात नव्हते. फक्त ओठ म्हणत होते , पोटातून भक्ती येत नव्हती. 

          आपला मुलगा पोटातच गेला हे समजल्यानंतरसुद्धा ती स्थिर राहण्याचा प्रयत्न करताना दिसत होती. तिच्याकडे बघून माझे काळीज तुटत होते. माझी दाढी वाढली होती. कसातरीच दिसत होतो. ५ मे ला शाळेचा शेवटचा दिवस होता. मी ४ मे पर्यंत रजा घेतली होती. ५ मे ला हजर होणार होतो. ६ मे पासून उन्हाळी सुट्टी पडणार होती. हॉस्पिटलमध्येच वस्तरा घेऊन स्वतःची दाढी केली अगदी आरश्याशिवाय. तिच्यासमोर गेलो तर ती त्यावेळी म्हणाली होती , " आता कसे मस्त दिसताय." तिने मला मस्त म्हणावे ही इच्छा मी कधीच ठेवली नव्हती. 

          त्याच रात्री तिने हॉस्पिटलच्या बेडवरच शेवटचा श्वास घेतला. मी पुरता कोलमडून गेलो. पुन्हा कधी आरश्यात बघताना मला तिचे हे वाक्य कायमच घुमत राहते - " आता कसे मस्त दिसताय." 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )


नेहमी खरे बोलावे

        नेहमी खरे बोलावे

         सोमवारी शिरगांवला बीटसंमेलन होते. संमेलन संपल्यानंतर मी एस्.टी. ने कणकवली गाठली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता उठून शाळेत जायच्या तयारीला लागलो. गढिताम्हाणे दादरावाडी शाळा कणकवलीपासून ४५ किलोमीटरवर होती. कणकवलीवरुन पहाटे सहा वाजताच्या रत्नागिरी गाडीने निघावे लागे. आईने माझ्याबरोबर उठून माझ्यासाठी डबा बनवला होता. बाबांनी मला हलवून उठायला सांगितले होते. उठायला सांगितल्यानंतरही मी १० मिनिटे झोपूनच असे. उठून तयारी करण्याचा कंटाळा येई. लवकर उठणे आणि गाडी मिळायला पाहिजे म्हणून घाईघाईने तयारी करताना नोकरीचा वैतागथोर राग येई. पण उठण्याशिवाय पर्याय नसे. अधिक काळ झोपून राहीलो आणि बाबांची पाठीत लाथ बसली तर ! उठून तयारी करुन लगबगीने निघे. 

          गाडी स्थानकात लागलेली पाहून हायसे वाटे. थंडी असली तरी तिची परवा न करता कसातरी चहा ढोसून माझी स्वारी गाडीत चढे. आता आठवडाभर घरी यायला मिळणार नाही याची जाणीव होऊन रडू येई. पण तोपर्यंत कंडक्टर तिकिट काढायला आलेला असे. विचार करता करता कधी तळेरे स्टँडवर आली ते कळतही नसे. 

          तिथेही पाटगांव गाडी लागलेली दिसे. त्या गाडीतून गेलो तर फणसगांवला उतरुन पुन्हा तिसरी गाडी पकडावी लागे. आज मला त्या गाडीने जायचा कंटाळा आला होता. मी गढिताम्हाणे गाडी पकडली. मी पळसकाटे येथील धनगरवाडीमध्ये एका घरात राहण्यास सुरुवात केली होती. १० मिनिटे चालून खोलीवर जाऊन फ्रेश झालो. शाळा साडे दहाची होती. आता १० वाजत आले होते. मी डबा घेऊन शाळेकडे पायी निघालो. सड्यावरुन चालत जायला मला अर्धा तास लागे. मला त्याची सवयच झाली होती. पण आज माझी पावले संथ पडत होती. पाऊलवाट खडकाळ आणि उंचसखल होती. मी शाळेकडे १०.२० पर्यंत पोहोचायला हवे होते. पण थोडा उशिर झाला.....

          मी यावेळी मुलांकडे शाळेची चावी देऊन ठेवलेली होती. शाळा सड्यावर असल्यामुळे मुले ऊन पावसात बाहेर उभी राहीली तर त्यांना त्रास होऊ नये हा एकमेव उद्देश होता. मी शाळेच्या जवळ आलो आणि बघतो तर काय ? ...... शाळेसमोर एक जीप उभी होती. तिच्यावर ' महाराष्ट्र शासन ' असे लिहिलेले होते. मला तिथे  दिवसातून दोनदाच गाडी दिसे. सकाळी ८ वाजता आणि संध्याकाळी ४ वाजता. पुढे गेलो तर शाळेच्या व्हरांड्यात दोन नवीन शुज दिसले. एक लेडीज आणि एक जेन्टस् . 

          माझ्या शाळेत मी येण्यापूर्वी कोणीतरी साहेब आले आहेत याची मला जाणीव झाली. त्यावेळी मी घाबरलो असलो तरी घाबरल्यासारखे न दाखवता आलेल्या साहेबांना नमस्कार केला. देवगड तालुक्याच्या सभापती मॅडम आणि गटविकास अधिकारी साहेब यांना बघून मी पुरता गांगरुन गेलो होतो. त्यांना बघून मीच शाळेत प्रवेश करताना ' मे आय कम इन साहेब ' असं म्हणून मला वर्गात प्रवेश करावा लागला होता. 

          १०.३५ वाजता शाळेत आलो होतो. मी आधी मस्टरवर १०.२० ची सही केली. लगेच राष्ट्रगीताची ऑर्डर दिली. प्रतिज्ञा झाली. प्रार्थना घेतली. सुविचार ' नेहमी खरे बोलावे ' मीच सांगितला. सर्व मुलांकडून घोकून घेतला. परिपाठाचे सर्व घटक घेऊन झाले. मुलांनी बरे सहकार्य केले. सायबांनी विचारले , " सर , तुम्ही शाळेत १०.३५ ला आलात आणि सही मात्र १०.२० ची केलीत. सुविचार शिकवताय , नेहमी खरे बोलावे " भिंतीवरील दिशा चुकीच्या लिहिल्या आहेत. सादिल किती मिळाला ? खुर्चीचा एक हात हालतोय...... असे मला निरुत्तर करणारे अनेक प्रश्न विचारले गेले. माझ्या मुलांनी साहेबांशी अतिशय उत्तम प्रकारे संवाद साधलेला होता. पण माझ्या एकवेळच्या उशिरा शाळेत जाण्याने माझ्याबद्दल अधिकाऱ्यांचे चांगले मत झालेले दिसत नव्हते. तिकडे खुर्चीचा हात हलत होता आणि मीही या आकस्मिक भेटीच्या धक्क्याने पुरता हादरुन गेलो होतो. तेव्हापासून कानाला खडा लावला, काहीही झाले तरी आपले विचार आणि आचार यात कधीही गल्लत करायची नाही. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )




संगीतवही कुठे आहे ?

 संगीतवही कुठे आहे ?

        मला त्यावेळीपासूनच संगीत विषयाची खूप आवड होती. आवड होती म्हणून सवडही मिळायची. कणकवली डी.एड्. कॉलेजला असताना घडलेली घटना माझी फजिती करणारी जास्त आहे. परिपाठात प्रार्थना , समुहगीते आणि संस्कारगीते सादर करावी लागत. मला परिपाठ आवडे तो यामुळेच. 

          पण कथाकथन , वक्तृत्व आणि निवेदन यात मी भाग घेत नसे. मला प्रतिज्ञा म्हणतानाही थरथरायला होत असल्याचे जाणवे. एक हात करुन पुढे प्रतिज्ञा म्हणताना माझा हात थरथरताना मी कित्येकदा प्रत्यक्ष पाहिलाय. पण गाणं म्हणताना कसातरी आत्मविश्वास आणून गायन करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असे. मी जरा लयीत आणि सुरात होतो कदाचित. पण तालाचा अद्याप पत्ता नव्हता. बोंडाळे मॅडम संगीत छान शिकवत. त्यांच्या आवाजाने भारावून जायला होई. 

          पेटी वाजवताना मॅडम तल्लीन होऊन गाऊ लागल्या कि मला आपणही गायला पाहिजे असे वाटत राही. त्यामुळे सहाजिकच मी त्यांनी शिकवलेली गाणी घरी येऊन म्हणू लागलो. सेकंड इयरच्या मुलांमधील सर्वच उपक्रमांमधील क्रियाशीलता बघून आम्ही सगळेचजण भारावून गेलो होतो. भावी आदर्श शिक्षक घडण्याची सुरुवात साक्षात पाहात होतो. मलाही त्यांच्यासारखे करायचे आहे ही ऊर्मी माझ्यात डोकावत होती. मी त्या ऊर्मीला वाट देत गेलो. आमचा पूर्ण वर्गच विविध व्यक्तिमत्वांनी संपन्नच होता. प्रत्येकजण एकमेवाद्वितीयच होता. मीच लाजराबुजरा होतो. हेसुद्धा माझे आगळेवेगळेपण असेलही. 

          मला संगीत विषयाची सर्व वही लिहून काढायची होती. मी ती जीवापाड जपत असे. त्यामुळे माझ्या संगीत वहीवर सर्वांचा डोळा होता कि काय नक्की सांगता येणार नाही. पण सगळेच माझी वही घेऊन आपला गाण्यांचा संग्रह वाढवत चाललेले मला आवडतही होते. एकदा असाच वर्गात असताना संगीतच्या तासिकेला माझी वही मला सापडेना. मी सगळीकडे शोधली. पण व्यर्थ !  काहीच उपयोग झाला नाही. सगळ्यांना विचारले. सगळ्यांची बाके तपासली. संगीत वही सापडली नाहीच. 

          मी अक्षरशः रडकुंडीला आलो होतो. मी रडायचा फक्त बाकी होतो. सगळेजण माझा चेहरा बघून ओळखून गेले होते. माझी फजिती करण्यासाठी कुणीतरी माझी संगीतवही मुद्दाम लपवून ठेवली होती. पण मी त्यांची ती गंमत समजू शकलो नाही. शेवटी अश्रू अनावर झाले. मी स्फुंदु लागलो आणि चरफडू लागलो. सर्वजण ' काय झाले रे प्रवीण  ? , आता बरा होतास ? या सोज्वळ आविर्भावात. मी त्यामुळे आणखी डिवचला जाई. शेवटी ज्याने वही लपवून ठेवली होती, त्याला माझा अधिक अंत पाहवेना. दोन दिवस मी वहीच्या शोधात होतो. घरी शोधली. दुकानात शोधली. घरचे सगळेजण मलाच दोष देत होते.

          माझा बेंचमेट संजय शेटे सुद्धा त्यांच्यात सामिल होता. दुसऱ्या दिवशी ' संतोष मधुकर तुळसकर ' ने माझी वही आणून दिली. आदल्या दिवशी त्याने वहीला वाळवी लागल्याचे खोटेच सांगितले होते. माझी संगीत वही मिळाली म्हणून माझा चेहरा खुलला. त्या वहीसाठी मी माझ्या भावासारख्या मित्रांबद्दल राग राग केला. ते माझे सर्व मित्र (  मैत्रिणी ) आता विविध शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य करत आहेत. फक्त ज्याने माझी वही लपवून ठेवली तो संतोष आज हयात नाही याचे वाईट वाटते. 

          खेडला क्षमताधिष्ठित प्रशिक्षण असताना पहाटे नदीत आंघोळीला गेलेला आमचा संतोष गेला तो परत आलाच नाही. संगीतवही कायमची हरवली असती तरी चालले असते , पण आमचा सर्वांना आनंद देणारा संतोष हवा होता. संतोषच्या परिवाराच्या आयुष्यातील संगीत कायमचे बेसूर झाले.


© प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )



टचस्क्रिन

 टचस्क्रिन        

        मला खरंच कमाल वाटते, पूर्वी लेखनाची साधने नसताना लेखन केले गेले आहे. , कवी, लेखक यांनी जर लेखन केले नसते तर आज जे आपण वाचन करतोय ते आम्हाला वाचायलाच मिळाले नसते. कसा, कधी वेळ काढत होते लिहायला ? आणि असे काही लिहित कि कधी पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटत राहाते. संग्रह करावासा वाटतो. अधोरेखित करुन ठेवावी अशी वाक्यरचना. 

          मी लहान असताना मला बाबांनी पेन्सिल दिली आणि हात धरुन लिहायला शिकवले. ताईने अक्षरे गिरवून घेतली. तेच तेच अक्षर गिरवताना ते चुकू नये यासाठी आकाने लक्ष ठेवले. आईने पाटी स्वच्छ पुसून दिली. रात्री घरी आल्यानंतर बाबांनी ती तपासली. पुन्हा पुन्हा हस्ताक्षर सराव करुन घेतला. अक्षर वाचावे असे वाचणार्‍याला वाटावे असा बाबांचा आग्रह. ताईचे मोत्यासारखे वळणदार अक्षर काढण्याचा माझा प्रयत्न असे. तिच्या अक्षराशी तुलना नाही होऊ शकत, पण शाळेत जाण्यापूर्वी मी घरच्या घरी अ, आ, ई काढायला शिकलो. 

          शाळेत जायची मला भिती वाटे. जबरदस्तीने शाळेत पाठवले गेले. मला पहिलीच्या वर्गात बसवण्यात आले. मी उठून ताईच्या वर्गात गेलो. ताईने मला पुन्हा पहिलीच्या वर्गात बसवले. मग आकाच्या वर्गात गेलो. आकाने मला पहिलीच्याच वर्गात सोडले. मी रडू लागलो. मला आईची आठवण येत होती. मी आवाज वाढवला तरी मला कोणीही घरी सोडायला तयार नव्हते. मग काय गप्प राहण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्या वर्गात आणखी इतर मुले माझीच नक्कल करत होती. 

          बाई वर्गात आल्या. मोठ्या आवाजात त्यांनी सर्वांना बसायला सांगितले. मी बसलो आपला. पण बाईंना बघून मला आईची अधिकच आठवण येऊ लागली. ' मला आईकडे जायचंय ' असं मला सांगायचं होतं. पण बाईच म्हणाल्या, " बाळा, रडू नको हो. तुला आईकडे जायचंय ना ? थांब हं, मी तुला आईकडे नेऊन सोडते." आता मला धीर आला. मला बाईंमध्ये माझी आई दिसू लागली. मला बरे वाटले. मी वाट पाहू लागलो. आता मला बाई माझ्या आईकडे सोडतील. पण बाईंनी दुसऱ्या मुलांनाही तसेच सांगितले आणि गप्प केले. न मारता , डोळे न वटारता बाईंनी संपूर्ण वर्ग शांत केला होता. 

          काळ्या शहाबादी फरशीवर थंडगार वाटत होते. दोन सुटलेल्या फरश्यांमधील वाळू मला खेळायला मिळाली होती. मी वाळू काढून काढून खेळू लागलो. बाईंचे माझ्याकडे लक्ष नाही हे माझ्या लक्षात आले. मी हळूच दप्तरासह बाहेर पळालो. आता मला ताईकडे किंवा आकाकडे जायचे नव्हते. कारण त्या मला पुन्हा पहिलीच्याच वर्गात सोडणार हे मला कळून चुकले होते. 

          मला वाट माहिती होती. आमचे दुकान शाळेपासून जवळच होते. कणकवली ढालकाठीजवळ आलो. बाबा दुकानात कोणाचीतरी दाढी करत असावेत. मला बघून त्यांचा पारा चढला. अ, आ शिकवताना प्रेमाने जवळ घेऊन शिकवले होते , आता मात्र त्यांनी दुकानातली झाडूच काढली. मला मारण्यासाठी त्यांनी झाडू माझ्यावर नुसती उगारली आणि म्हणाले,  " झिला, तुका मी आता मुगड्यान मारतलंय." मला बाबांचा मार चांगलाच माहिती होता. मी बाबांना हात जोडले आणि मारु नका म्हणून विनवणी करु लागलो. मला त्यांनी मारत मारत शाळेत सोडले. बाईंनाच सांगितले , " बाई , हा तुमचा विद्यार्थी घ्या, आमच्या दुकानात आला होता. शाळा सुटल्याशिवाय याला घरी पाठवू नका. " आता मला बाई मारणार याची मला पुरेपुर खात्री झाली होती. पण उलटच झाले. बाईंनी मला आईसारखे जवळ घेतले. आपल्याकडचा फळ्यावर लिहायचा खडू घेतला आणि म्हणाल्या , " प्रवीण, हा खडू घे आणि फळ्यावर ' अ ' काढ. " मी दोन गोळे काढले आणि एक काठी काढली. दोन्ही गोळ्यांचा अर्धा भाग पुसून ' अ ' तयार केला. मला बाईंनी पाठीवर शाबासकी दिली. त्यानंतर मला त्या तावडेबाईंची भिती वाटेनाशी झाली.

          आता मला हे सर्व आठवतं आणि मलाच माझी गंमत वाटते. सर्वजण यामधून गेले असतील. मोठे लेखक झाले असतील. अनेक पुस्तके लिहिली असतील. आता मी एक साधा उपशिक्षक आहे. बाईंनी मला पहिल्या दिवशी विद्यार्थी म्हणून फळ्यावर लिहायला सांगितले होते. आता मी कायमच फळ्यावर लिहितोय. 

          आज मी जे काही लेखन करतोय, त्यासाठी प्राथमिक शाळेत माझ्यावर झालेले संस्कारच कारणीभूत आहेत. आताची मुले मोबाईल या यंत्रांच्या ' टचस्क्रिन ' वर शिकत आहेत. काहीही झाले तरी मला माझा फळा आणि पाटीच खरी ' टचस्क्रिन ' वाटते. यांची संगत सर्वांनी करायला हवी. नाहीतर काही वर्षांनंतर आपण पेनाने , खडूने लिहायचे विसरुन जाऊ याची मला भिती वाटत राहते. संगणकाचा आणि मोबाईलचा कीबोर्ड आपलासा केलात तरी आपली खरी टचस्क्रिन कधीही विसरु नका. 



© प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )





नागपंचमी आणि उष्टी पाने

      नागपंचमी आणि उष्टी पाने

    आमचा किर्लोस गांव आता आंबवणेवाडी या नावानेदेखील ओळखला जातो. आमचा आंबवणे गाव आता महसुली गाव झाला आहे. नागपंचमीच्या दिवशी पाऊस अगदी बेसुमार पडत होता. आमच्या वरवडे कासरल बंधाऱ्यावरून पाणी वाहून जाताना दिसत होते. पाण्याचा वेग वाढत चाललेला दिसत होता. तरीही आमची घरी जायची ओढसुद्धा तितकीच वाढत चालली होती.  कधी एकदा घरी पोहोचतो असे झाले होते. ही  ओढ नागोबासाठी  आणि आमच्या घराच्या माणसांसाठी अधिक होती. नदीच्या पलीकडे आमचा गाव असल्यामुळे काहीही झाले तरी नदी पार करून जाणे भागच होते. मग आम्ही ठरवले कि, गाडी अलीकडेच ठेवून लोखंडी साकवावरून जायचे. 

          आम्ही गाडी अलीकडे सुरक्षित ठिकाणी लावली आणि चालत- चालत आमच्या घराच्या दिशेने निघालो. वाटेतील वर्षा ऋतूचा वर्षाव धो- धो सुरु होताच. पण त्यातही एक अनोखी गंमत अनुभवत शेतीच्या मेरेवरून चाललो होतो. चालता- चालता  नदी कधी आली ते समजले देखील नाही.  नदीच्या वर आम्ही फक्त १०-१५ फुटांवरून साकवावरून जात होतो. नदीचे पाणी अतिशय वेगाने समुद्राला भेटायला चालले होते. तो वेग इतका भयानक होता कि तो वेग पाहून आमचे डोळे गरगरायला लागले. पण नदीचे ते रौद्ररूप पाहून निसर्ग आपल्यावर इतका का कोपला आहे याचा प्रश्न मला पडला. 

          लांबलचक लोखंडी साकव एकदाचे पार करून आम्ही आमच्या शेतमळ्यांमध्ये प्रवेश केला. शेत छान डुलत होतं . आम्हाला जणू बोलावत होतं . आमचं  स्वागत करत होतं . बऱ्याच दिवसानंतर हिरवे हिरवे गार गालिचे पाहण्याची संधी उपलब्ध झाली होती. आम्ही ते आमच्या डोळ्यात साठवून ठेवत होतो. निसर्गाने दिलेले ते अविस्मरणीय क्षण टिपताना आमची त्रेधा होत होती. काय पाहू आणि काय नको असे झाले होते. मस्त मजेत रमत गमत आम्ही आमच्या घरी कधी पोचलो ते समजलेदेखील नाही. 

          आमची श्रीगणेश चित्रशाळा समोरच होती. त्यात प्रथम प्रवेश केला. गणेशाच्या अप्रतिम मातीच्या मूर्ती पाहून पुन्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तेव्हा आम्ही भावंडे मातीच्या मूर्ती बनवताना तासनतास आमच्या चित्रशाळेत बसून आमच्या  बाबांची,काकांची बोटे मातीत कशी लीलया फिरत त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत असू. नागोबा बनवून त्यांना रंग देण्यास बाबा आम्हास सांगत. आम्ही नागोबा बनवून ते रंगवताना आमचे भान हरवून जात असे. कोण आनंद होई त्याचे शब्दात वर्णन करणे खरेच कठीण आहे. 

          घरी आलो. मस्त वाफाळलेला चहा घेतला. आमच्या बाबांनी  बनवलेला, भावाने रंगवलेला मातीचा नागोबा पाटावर घेऊन मी घरी  आणला. सोबत सर्व लहान मुले जल्लोष करत होतीच.बबली आणि गुड्डी नागोबा विकून आलेले पैसे मोजण्यात दंग झाली होती.

          बाबानी नागोबाचे पूजन सुरु केले. नागोबा पूजन सुरु असताना आम्ही सर्व मंडळी त्यांच्या भोवती बसून होतो. लाह्यांचा नैवेद्द्य,  दुर्वा, फुले,बेलाची पाने आणि सुंदरशी रांगोळी असा सोहळा संपन्न होत होता.  सुखकर्ता  दुःखहर्ता ,  लवथवती विक्राळा अश्या आरत्या म्हणत सर्वांनी नागोबाचे मनोभावे पूजन केले. नंतर  केळीच्या पानावर भोजन वाढण्यात आले. साधा पांढरा भात , गोडी डाळ, कारल्याची भाजी,  जिलेबी,पापड, वाटाणे- बटाट्याची तिखट भाजी, मोदक असा मस्त बेत काकींनी केला होता. त्यांनी त्यात आपले प्रेम भरभरून ओतले होते. सर्वांनी आपापली पाने  संपूर्णपणे स्वच्छ केली होती. स्वाद काही औरच होता त्या  भोजनाचा. वर्षातून एकच असा दिवस असतो ज्या दिवशी आम्ही घरातील सर्व मंडळी एकत्र असतो. काहीही झाले , किंवा कितीही अडचणी आल्या तरी आम्ही सर्व कुटुंबीय या दिवशी एकत्र  येतोच.

          त्यालाही कारण तसेच आहे. बाबांच्या बालपणीची गोष्ट आहे. नागपंचमीचा दिवस होता. सर्वजण जेवायला बसले होते. माझे बाबासुद्धा जेवत होते. आजीने खीर बनवली होती. माझ्या बाबांना ती खूपच आवडली. त्यामुळे त्यांनी खीर पुन्हा पुन्हा मागून घेतली. आजी जेवली नव्हती. आजोबा जेवल्याशिवाय आजी जेवायला बसत नसे. सर्वांची जेवणे  झाली. आता आजी जेवायला बसली. बाबा तिच्या जवळच रेंगाळत होते. जेवल्यानंतर मुलांनी खाल्लेली खिरीची पाने आजी  चाटू लागली. ते माझ्या बाबांनी पाहिले  व आजीवर ओरडले. म्हणाले, आज सणादिवशी तू आमची पाने चाटून खातेस म्हणजे काय ? हे काही बरोबर नाही. सर्व भावंडांनी ते ऐकले व बाबांवरच ओरडायला लागली, ' तू आईच्या वाटणीची सर्वच्या सर्व खीर फस्त केलीस , त्यामुळे आईसाठी अजिबात खीर उरली नाही. तुझ्यामुळेच तिला आमची सर्वांची पाने चाटण्याची  वेळ आली आहे. तूच या गोष्टीला जबाबदार आहेस.'  हे ऐकल्याबरोबर माझ्या बाबांच्या सर्व प्रकार लक्षात आला. ते सरळ आजीच्या कुशीत शिरले आणि मोठ्याने रडू लागले. आजी म्हणाली , ' अरे बाळा, तू खीर खाल्लीस तेव्हाच माझे पोट  भरले, पण मी केलेली खीर कशी होती ती मला  बघायची होती, म्हणून मी माझ्या मुलांनी उष्टी पाने चाटून खात होते, तू वाईट वाटून घेऊ नकोस , आपल्याला यापेक्षा चांगले दिवस येतील तेव्हा तू मला आणखी चांगले पदार्थ खाऊ घालशील आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करशील ना ? आजीचे ते शब्द ऐकून त्यादिवसापासून माझ्या बाबांनी लहानपणीच ठरवले कि काहीही झाले तरी आपण आपली परिस्थिती बदलायचीच. म्हणून नागपंचमीचा तो दिवस बाबांच्या आणि आता आमच्याही आयुष्यातील एक अविस्मरणीय सण  आणि अविस्मरणीय क्षण बनला आहे तो यासाठीच. 

          संध्याकाळी नागाचे विसर्जन केले आणि आम्ही परत कणकवलीला येण्यासाठी बाहेर पडणार होतो. पण बाहेर पावसाने अगदी उधाण मांडले होते. तो आम्हाला बाहेर पडायला  देत नव्हता. शेवटी आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला. रात्रीपर्यंत नदीचे पाणी आमच्या घराच्या खालच्या कोपऱ्यापर्यंत येऊन पोहोचले होते. सर्वजण झोपण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते, पण पावसाचे पाणी आमच्या घरात घुसेल या भीतीने अनेकांची झोपच उडाली होती. सकाळी दुसऱ्यादिवशी आज पाणी वाढलेच होते. कमी होण्याची शक्यता नव्हतीच. शेवटी खाजगी गाडी करून आम्हाला आमच्या कणकवलीत घरी यावे लागले. शासनाने सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केल्याचे आम्हाला समजले आणि जीव भांड्यात पडला. कारण आम्हाला शाळेत जायचे नव्हते. दोन दिवसांच्या पाणीमय आठवणी सर्वांच्या डोळ्यात पाणी आणत होत्या. 


        © प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )

आमचे बाबा : एक अनमोल ग्रंथच

आमचे बाबा : एक अनमोल ग्रंथच         

            ९ ऑगस्ट क्रांतिदिनाच्याच दिवशी आमच्या घरात एक क्रांतिकारक जन्माला आले. आमच्या आयुष्यात क्रांती घडवणारे अनोखे व्यक्तिमत्त्व जन्माला आले तो हाच दिवस. आमचे बाबा आता ७४ वर्षांचे झाले. मला समजायला लागल्यापासून आमच्या सर्वांवर अतिशय प्रभाव असणारे आमचे बाबा अजूनही आमच्यासाठी मार्गदर्शकच आहेत. त्यांनी दिलेली शिकवण आम्हाला प्रगतीच्या दिशेने नेणारी ठरली. आमचे पिरगळलेले कान  याची साक्ष आहेत. 

          आमच्या पाठीवरील दिलेली प्रेमाची थाप आमच्या  अंगावर एक एक मूठ मांस चढवत गेलेली. त्यांनी दिलेला आश्वासक प्रत्येक शब्द त्यांनी पाळला . आज आपण शब्द देतो, पण किती पाळतो. परंतु बाबा शब्दाला पक्के. त्यांनी एकदा शब्द दिला कि काहीही झाले तरी , त्या दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी जीवाचा आटापिटा करतील पण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचा आत्मविश्वास प्रबळ. त्यांनी कधी कशात माघार नाही घेतली. सर्व कामे वेळच्या वेळी झाली पाहिजेत असा त्यांचा दंडक अजूनही आहे.

          त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदरयुक्त भीती आहे. त्यांनी आम्हाला नेहमी पुढे पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलेले आहे. कधी मागे ओढले नाही. आम्ही अभ्यासात नेहमी पुढे असावे यासाठी ते नेहमीच आग्रही भूमिका धरत. कधी कधी आम्हीच घाबरत घाबरत आमचे प्रगतीपत्रक दाखवत असू. चांगले गुण  मिळूनसुद्धा  ते प्रगतीपत्रक दाखवताना पोटात भीतीचा भलामोठा गोळा येई. आता बाबा काय म्हणतात कोण जाणे.पण त्यांनी आमच्याकडे पाहिलेली प्रेमाची नजर आमची भीती पळवून लावी. 

          आम्ही मग सर्वजण त्यांच्या मांडीवर बसून स्वर्गसुख घेत असू. त्यांची मांडी आमच्यासाठी राजाची गादीच असे. कारण त्यावर बसायला मिळणे ही साधी गोष्ट नव्हती. त्यावर मी बऱ्याचदा हक्क सांगत असे. त्यावरून आम्हा पाच भावंडांमध्ये वाद होत. पण मी काही केल्या माझे आसन सोडण्यास तयार नसे. शेवटी मी विजयी मुद्रा करून त्यांच्या मांडीवर ठाण  मांडून बसत असे आणि मी कसा जिंकलो आणि बाकी कसे हरले याचा आनंद घेत असे. म्हणून मी त्यांचा लाडका होतो असे नाही. त्यांना आम्ही सर्व भावंडे लाडकीच होतो. कोणालाही त्यांनी कधी कमी स्थान दिले नाही. 

          माझा छोटा भाऊ , आम्ही मोठी भावंडे त्याला न्हानू म्हणतो. त्याच्या उचापती करण्यामुळे त्याला बऱ्याचदा बाबांचा मार खावा लागला आहे. त्याच्यावर आईचे जीवापाड प्रेम होते. त्याला अचानक आकडी येत असे. तो रागाने आपले डोके भिंतीला किंवा जमिनीला आपटून घेत असे. त्यामुळे त्याला आईकडून कमरेवर घेऊन भरवणे होत असे. बाबा त्याला जवळ घेऊन समजावत असत. पण एकाच दिवसात तो ते विसरून जाई आणि आपल्या खोड्या सुरूच ठेवी. त्यामुळे त्याला प्रसाद मिळे. मार खाऊनही त्याला पुन्हा खोड्या करणे जमत असे. त्यामुळे त्याला बाबांची भीती वाटे. आपण कोणतीही गोष्ट केली तर बाबा आपल्यावर रागे भरतात असा  त्याचा समज त्यामुळे अधिक दृढ होत गेला. आता मात्र तो बाबांसाठी जे काही करतो आहे, ते बघून आम्हाला आमचा पूर्वीचा न्हानू आठवतो आणि त्याच्याबद्दलचा अभिमान अधिक दुणावतो. कारण आता आमचा न्हानू खूप ग्रेट झालेला आहे. त्याने फक्त बाबांबद्दल गैरसमज असतील तर ते घालवून शुद्ध व्हावे. कारण काहीही झाले तरी बाबा आपल्याला आपल्या  हिताचेच सांगतात. 

          न्हानूच्या नोकरीसाठी बाबानी केलेले प्रयत्न आणि त्यावेळी त्यांची होणारी घालमेल मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. बाबांनी आम्हा सर्वांना सुखात साथ दिलीच, पण दुःखात  ते आमच्या जास्त सोबत राहिलेले आहेत.

          मला डी एड ला पाठवण्याचा निर्णय त्यांचाच होता. त्यामुळे आज मी एक चांगला शिक्षक बनू शकलो. आमचे बाबा शिक्षक बनू  शकले नाहीत, काही काळ त्यांनी शिक्षकी पेशाचा अनुभव घेतलेला आहे, म्हणून त्यांचे स्वप्न होते कि माझ्या मुलांना मी शिक्षक बनविन. त्यांनी त्यांचे स्वप्न सत्यात उतरविले. आज त्यांचे दोन्ही मुलगे शिक्षक आहेत.  बाबा सगळ्यांना शिक्षकच वाटतात. त्यांनी शाळेत शिकवले कमी , पण आमच्या आयुष्यरूपी शाळेत त्यांनी आम्हाला वेळोवेळी जे शिकवले ते शाळेपेक्षाही अधिक लाखमोलाचे आहे. 

          त्यांच्याबरोबर माझे बऱ्याचदा वाद होतात, पण मी चुकीचा आहे हे मला नंतर पटते, पण माझे बोलणे ते सहन करण्याची शक्ती त्यांच्यात आहे. त्यांच्यासारखा मी कधीच होऊ शकत नाही.


            © प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )

माझी मम्मी आणि भाऊ कुठंय ?

 माझी मम्मी आणि भाऊ कुठंय ?          

    आज ती हयात नाही. पण तिच्या आठवणी सदैव माझ्यासोबत आहेत. ती जाऊन अनेक वर्षांचा लोटला आहे. तिची आठवण रोज मला येते. आज तिची मुलगी म्हणजे आमची मुलगी हर्षदा उर्फ छकुली १३ वीत  शिकत आहे या गोष्टीचा आनंद आहे. ती अगदी आपल्या आईच्या वळणावर गेली आहे. बोलते तशी, वागते तशी, तिचा माझ्या मुलीला फक्त चारच  वर्षाचा सहवास लाभला. तिची मम्मी तिला सोडून जाताना ती फक्त चार वर्षांची छकुली होती. तिला आपल्या मम्मीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला कधी एकदा बघतो असे झाले होते. पण नियतीला असे घडणे मंजूर नव्हते. गरोदरपणात ८ व्या महिन्यात मुलगा पोटातच दगावल्याने माझी पत्नी असह्य वेदना सहन करत होती. शेवटी डॉक्टरच हतबल झाले. त्यांनी हात टेकले. त्यांच्याने पुढील उपचार करताना होणारा धोका आम्हाला समजावून सांगितला. पण आम्ही बाळ गेले तरी आपली पत्नी व्यवस्थित असेल या भावनेने डॉक्टरांना धन्यवाद देत राहिलो. डॉक्टर आम्हाला दिलासा देत होते. आम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवून होतो. पण डॉक्टर देव नसतो, हे तेव्हा मला कळले. माझ्या समोर अखेरचा श्वास घेताना माझी ऐशू माझ्याशी शेवटची बोलत होती. तिला अतिशय घाम आला होता.

          तिला समजले कि आता मला जगणे शक्य नाही, तिला रक्तदाबाने घेरले. अतिशय कमी रक्तदाब असल्याने तिने आपले डोळे पांढरे केले. डॉक्टरांनी आपल्या पद्धतीने पुरेपूर प्रयत्न केले , पण व्यर्थ.....तिचे प्राण निघून गेले होते....परत पुन्हा न येण्यासाठी. ....मी एकटा पडलो होतो...सात वर्षे जिने मला अतिशय प्रेमाने साथ दिली होती ती माझी प्रिय पत्नी अखेरच्या घटका मोजत असताना मी पुरता ढासळून गेलो होतो. मी..तेव्हा मी राहिलो नाही....अक्षरशः वेड्यासारखा बरळत राहिलो. डॉक्टरांना काहीबाही बोललो...तेव्हा माझा राग अतिशय अनावर झाला होता...मी पिसाळलेल्या माणसासारखा हॉस्पिटलच्या बाहेर जे बडबडत होतो ...ते आता आठवले तरीही माझा थरकाप होतो...मला खूप त्रास झाला सत्य स्वीकारायला. पण अखेर सत्य स्वीकारणे भाग होते. माझ्या मुलीचा चेहरा मला दिसू लागला. तिला जेव्हा आपला भाऊ गेल्याचे समजले तेव्हा मी तिला कसे तरी समजावून सांगितले...म्हणालो, बाळा, तुझा भाऊ  खूप चांगला होता , पण तो देवाला आवडला असेल म्हणून त्याने त्याला आपल्याकडे नेले.....हे सांगितल्यानंतर ती एवढी रडली कि म्हणाली...पप्पा, मला माझा भाऊ हवा होता हो...माझ्याशी खेळायला तुम्ही मला भाऊ आणून देणार होतात तर मग मी आता कोणाशी खेळू ? गेले आठ महिने मला तुम्ही मला बाळ येणार ...बाळ येणार म्हणून सांगत होतात ...मग असं कसं  झालं ? ....आणि तिला समजावताना माझ्या नाकी नऊ आलेल्या...आता तर तिची मम्मा देखील हे जग सोडून गेली होती...आता हे तिला कसं  सांगायचं ? ....मन घट्ट केलं आणि तिला म्हणालो, बाळा, आपलं बाळ गेलं देवबाप्पाकडे....मग त्याला सांभाळायला कोण ? त्या बाळाला सांभाळायला तुझ्या मम्मीला देवबाप्पाकडे जावं लागलं....हे ऐकल्यानंतर तिने जो हंबरडा फोडला होता....तो मला आठवतो आणि हा लेख लिहितानाही माझ्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत.....खूप कठीण काळीज केलं आणि माझ्या प्रिय पत्नीचं जाणं गिळून टाकलं...ठरवलं कि आता मला माझ्या मुलीसाठी छकुलीसाठी जगायचं आहे...तिच्याशी नंतर मी इतकी मैत्री केली कि ती आपल्या मम्मीला विसरली...त्यासाठी मला तिची मम्मा आणि पप्पा या दोन्ही भूमिका बजावाव्या लागल्या.आता मी दुसरे लग्न करून चांगले आयुष्य जगतोय. दुसरी पत्नीदेखील जीवापाड प्रेम करणारी मिळालीय. पण तरीही कधीतरी अनेक प्रश्न मनात  काहूर आणून जातात. 


© प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )

मुले ही देवाघरची फुले आहेत

 मुले ही देवाघरची फुले आहेत

        नेहमीप्रमाणे शाळेची संपूर्ण आवारसफाई करण्यात आली. सर्व मुलांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. बागेची सफाई केली. सर्व तण काढून टाकले. काढलेले रान शोषखड्ड्यांमध्ये टाकण्यात आले. रंगमंचाची घासून स्वच्छता करण्यात आली. सर्व मुले आनंदाने न थकता कामे करत होती.  शिक्षकवृंद त्यांना मदत करत होते. आपली शाळा स्वच्छ दिसली पाहिजे हा एकाच ध्यास मुलांनी घेतला होता. शाळेतील सर्व मुले खूप चांगली आहेत. शिक्षकांचा अतिशय आदर करणारी आहेत. शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करणारी आहेत. शिक्षकांना विचारून व परवानगी घेऊनच जबाबदारीची कामे करणारी मुले काम करताना कामात दंग होऊन जातात. शिक्षक स्वतः देखील मुलांसोबत काम करतात. तेव्हा मुले म्हणतात, सर, तुम्ही नका करू, आम्ही करतो. हातातली झाडू ओढून घेतात.

          सर्व छोटी चिमुकली मुले काम करताना आपले भान हरपून जातात. त्यांना करण्यास सांगितलेली गोष्ट करतातच आणि ती गोष्ट पूर्ण झाली कि आणखी अधिक काम काय करायचे ते विचारतात. मी हे करू , मी ते करू असे करत जास्तीत जास्त काम करत राहतात. मग ती मुले ऊन पावसाची पर्वा करत नाहीत. काम पूर्ण होणे महत्त्वाचे हे त्यांचे उद्दिष्ट ठरलेले असते. ग्रामीण भागातली मुले आहेत. अजून आपल्या परंपरा जपत आहेत. त्याला फक्त विज्ञानाचा स्पर्श दिला कि झाले शिक्षण. 

आपली शाळा , माझी शाळा सुंदर शाळा आणि ती स्वच्छ असली पाहिजे, त्यामुळे स्वच्छतेचा वसा  घेतलेली ही  मुले खरंच किती चांगली आहेत. अजून त्यांना बाहेरच्या जगाचं  वारं  लागलेलं  नाही. अतिशय निरागस आणि शिक्षकांवर निरतिशय प्रेम करणारी मुले. प्रत्येक शाळेत अशीच मुले असावीत, त्यांना शिकवताना निसर्गात जावे, निसर्ग दाखवावा, कधी कधी ही मुलेच  खूप काही आपल्याला शिकवून जातात. कारण निसर्गाच्या सान्निध्यात दीर्घकाळ वास्तव्य करणारी ही  मुले निसर्गकन्या, निसर्गपुत्र आहेत. रानातल्या भाज्या शाळेत आणून त्यांची नावे  सांगतात. त्यांच्याबरोबर संवाद साधताना खूप चांगला अनुभव येतो. आपण त्यांना शिकवतोय कि तीच आपल्याला शिकवताहेत तेच कधी कधी समजायला मार्ग नसतो.

          ही मुले म्हणजे आमच्यासाठी देवच आहेत. कारण त्यांच्यामुळे आम्हाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. भरपूर मुले आणि त्यांच्यासमवेत दिवस कधी निघून जातो हे समजतसुद्धा नाही. शाळेचा रम्य परिसर, भव्य क्रीडांगण यात शाळेला प्राप्त असलेल्या अधिक उत्तम सुविधा , दानशूर ग्रामस्थ , मार्गदर्शक अधिकारीवर्ग आणि कार्यक्षम लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने आमची शाळा अधिकाधिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल यात शंका नाही. मुलांमध्ये रमून जाताना , विविध उपक्रमांमध्ये सहभागी होताना दिवस कसा संपून जातो ते समजत नाही. शाळा सुटली तरी शाळेतून जावेसे वाटत नाही अशी आमची शाळा . मी इंजिनियर होणार होतो, तो नाही झालो ते बरे झाले. आज मी शिक्षकी पेशामध्ये अतिशय आनंदात आहे. असा पेशा दुसरा कुठला असेल असे मला तरी वाटत नाही. मी योग्य पेशा निवडला आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे.


            © प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )




हादरा देणारी दादरा शाळा

हादरा देणारी दादरा शाळा

        आपली जन्मभूमी ही आपली कर्मभूमी असावी असे प्रत्येकाला वाटत असते. मला अगदी तसेच वाटत होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षक भरती होती. मी अर्ज केला. परीक्षा दिली.पास झालो. मुलाखतीत सोपे प्रश्न विचारले होते. पण मुलाखतीची मला नेहमीच भिती वाटत आलेली. शेवटी सिलेक्शन यादी प्रसिद्ध झाली. आदेश घरपोच मिळाल्यावर माझे बाबा स्वतः खेडला घेऊन आले. थेट शाळेतच आले. त्यावेळी संपर्क करण्यासाठी पत्रव्यवहार करावा लागे. पत्राने कळवले तर उशिर होणार होता. म्हणून स्वतः येऊन बाबांनी मला कमालीचे थक्क करुन सोडले. 

मला माझ्या जिल्ह्यात नोकरी करण्याची अनमोल संधी मिळाली होती. माझी बोलतीच बंद झाली होती. इतका आनंद झाला होता कि तो व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नव्हते. आपल्याला आता ही नोकरी सोडावी लागणार म्हणून रात्रभर झोपू शकलो नाही. जामगे सीमावाडीतील ग्रामस्थांना माझ्या नवीन नोकरीविषयी न सांगता मला निघायचे होते. नोकरीचा राजीनामा द्यायचा म्हणजे काही रितसर बाबी पूर्ण करायच्या होत्या. त्यावेळी १२०० रु. बेसिक पगार होता. खेड पंचायत समितीत १२०० रु.भरुन पावती घेतली. लेखी राजीनामा देऊन त्यावर पोच घेतली.

 कर्मभूमी सोडून जन्मभूमीची कर्मभूमी करायला निघालो तरीही हातपाय थरथरत होते. मी माझ्या पायावर धोंडा मारुन घेतोय असेही वाटून सर्वांगाला घाम फुटत होता. पण मनोमन निश्चय ठाम होत होता.माझ्यासारखे अनेकजण नोकऱ्या सोडून जाताना बघून धीर एकवटण्याचा प्रयत्न करत होतो. चेहऱ्यावर ' कभी खुशी , कभी गम ' च्या भावना दिसत होत्या. दोन- तीन गाड्या बदलत बदलत कणकवली मुक्काम गाठला. आई आणि भावंडे वाटच पाहत होती. आल्या आल्या पहिल्यांदा आईच्या कुशीत घुसलो. 

आई म्हणाली , " झिला, बरा झाला इलस तो, तू नाय तर आमका घर कसा खावंक येता. आता हयच नोकरी कर." मी सगळ्या भावंडांची विचारपूस केली. माझ्या मोठ्या दोन बहिणींची लग्ने झाली होती. आता लहान दोन भावंडे म्हणजे न्हानू आणि पपी यांचे शिक्षण सुरू होते. मला देवगड तालुका मिळाला होता. शाळा समजली नव्हती. दुसऱ्या दिवशी पंचायत समिती देवगड येथे लवकरच हजर झालो. पुढे सेवाज्येष्ठता मिळेल हा हेतू होता. 

त्यावेळी गढिताम्हाणे गावात ५ शाळा होत्या. त्यातील चार शाळा द्विशिक्षकी होत्या. आम्ही सुरुवातीला गेलेले चारजण गढिताम्हाण्यात नेमले गेलो. देविदास प्रभुगांवकर, वल्लभानंद प्रभु, सदानंद गांवकर आणि मी. जणू आम्हा चारजणांची गढिताम्हाणे गाव वाटच बघत होतं. मला गढि. दादरा शाळा मिळाली होती. दादरा नाव वाचून मला त्याचवेळी हादरा बसला होता. नंतर समजले कि ती धनगरवाडीची शाळा होती. ऐन पावसाचे दिवस होते. नद्या दुथडी भरुन वाहत होत्या. आम्हाला शाळेकडे जाण्याचे दोन मार्ग सांगण्यात आले. तळेरेमार्गे आणि तळेबाजारमार्गे असे ते दोन मार्ग होते. संध्याकाळ झाल्यामुळे त्याचदिवशी न जाता दुसऱ्या दिवशी शाळेकडे जायचे ठरवले. सकाळी सहाची कणकवली रत्नागिरी गाडी पकडली. तळेरे स्थानकात उतरलो. 

तिथून गढिताम्हाणे गाडीत बसून गढिताम्हाणे नं.१ शाळेकडील आमराईस्टाॕपवर उतरुन मुख्याध्यापकांच्या खोलीवर गेलो. गोसावीगुरुजी जेवण बनवत होते.  त्यांना आम्ही काल तालुक्याला हजर झाल्याचे सांगितले. पण त्यांनी मला आदल्या दिवशीच्या तारखेला हजर करुन घेण्यास नकार दर्शविला. मग काय आलो तो दिवस अखंड नोकरीची सुरुवातीची तारिख ठरली. माझी शाळा एकशिक्षकी होती. 

लक्ष्मण चौधरीगुरुजी तिथे एक नंबर शाळेतून कामगिरी करत होते. त्यांच्याबरोबर चालत चालत मी आणि बाबा मजल दरमजल करीत दादरा धनगरवाडी गाठली. तीन चार चढावाच्या घाट्या चालताना माझा आणि बाबांचा जीव चांगलाच वर आला. सलग चार किलोमीटर चालून पाय दुखून आले होते. धनगरांच्या शेळ्यांशिवाय वाटेत कुणीही दिसले नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या अनोळखी व्यक्तींना  चौधरीसर हात वर करुन दाखवताना दिसत होते. कुठे घेऊन चाललात सर ? कधी येणार शाळा ? असे प्रश्न मी विचारत होतो. ही काय आली, आता थोडेच चालायचे आहे असे म्हणत पाऊण तास चालतच होतो. 

अखेर शाळा लांबवर दिसू लागली. आता मी माझ्या चालण्याचा वेग वाढवला होता. शाळा एका वर्गखोलीची होती. तीन चार मुलं व्हरांड्यात बसून सरांची वाट बघत बसली होती. बाकीची मुलं सरांनी हाक मारुन बोलावून आणली होती. ८- ९ मुले ' के रं , के रं ' करत काहीतरी कुजबुजताना दिसली. मला त्यांची भाषा समजेना. सरांनी मला सांगितले कि ' के म्हणजे काय चे लघुरुप आहे ' मी निःशब्द झालो. पुढे साडेसहा वर्षे मला त्या शाळेत एकट्याने काम करायचे होते हे मला माहितही नव्हते. त्या शाळेत असताना मी तावून सुलाखून निघालो. 

केंद्रप्रमुख शिरवडकरसर यांनी दरभेटीच्या वेळी बारिकसारीक गोष्टींचा शेरेबुकात उल्लेख केल्याने खूप शिकता आले. घडीचित्रे व शब्दकार्डे हा नवोपक्रम राबवला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यात पहिला क्रमांक आला. मला वाटले मी आता खूप काही प्राप्त केले आहे. माझी ४ थीतील सर्व मुले संपूर्ण इंग्रजी पुस्तकाचे वाचन करु लागली होती. गढिताम्हाणे आमराईवाडीत यादवगुरुजींच्या घरी राहत होतो. रोज ८ किलोमीटर चालत तरी होतो नाहीतर सकाळी ९ वाजता गाडीने शाळेत येत होतो. गाडी पकडायची तर जेवण लवकर करुन डबा घेऊन गाडीसाठी पळत बाहेर पडावे लागे. एवढे करुनही उशिर झाला आणि गाडी चुकली तर ४ किलोमीटर चालण्याशिवाय पर्याय नसे. 

शेवटी काही महिने शाळेतच राहिलो. शाळेत लाईट नव्हती. रात्रीच्या अंधारात दिव्याच्या प्रकाशात कसेतरी पिठीभात बनवून रात्रा संपण्याची वाट पाहिली. शाळा वस्तीच्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेला होती. शाळेच्या बाजूला हापूस आंब्याच्या बागाच बागा होत्या. त्यात रानटी डुकरांचे वास्तव्य असल्याने शिकारी लोक दिवसा दिसत. एकदा तर बंदुकीच्या आवाजाने तीन चार रानडुकरे शाळेच्या दिशेने सैरावैरा धावत आलेली. मी धसका घेतला. मग धनगरवस्तीत राहायचे ठरवले. त्यांचा मांगर राहण्यास मिळाला. मुले रात्री अभ्यासाला येत. त्यांची सोबत होत होती. माणसे आदराने दूध , दही देत होती. शनिवारी घरी येताना ताज्या भाज्या देत होती. हापूस आंबे देत होती. मुलांचा मला लळा लागला. पालकांचा माझ्या कामावर विश्वास बसला. त्या शाळेने मला खूप शिकवले. त्या अशिक्षित ग्रामस्थांचे निष्पाप प्रेम बघत होतो. असं दुर्मिळ प्रेम मिळण्याचे भाग्य मला लाभले. आता ती शाळा बंद झाली असली तरी माझ्या मनात ती अजूनही तशीच सुरु आहे.



सीमा नसलेली शाळा

सीमा नसलेली शाळा

            कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात नोकरी करत असताना कोकण निवड मंडळ रत्नागिरीची परीक्षा दिली होती. परीक्षा शिर्के हायस्कूलमध्ये होती. मी रत्नागिरीतच असल्यामुळे परीक्षासुद्धा सहजच दिली. पण सहा महिन्यातच नोकरीचा कॉल आला. मला खेड तालुक्यातील    जामगे गावातील सीमावाडी शाळा मिळाली. मला अतिशय आनंद झाला होता. कारण मला जिल्हा परिषदेची नोकरी मिळाली होती. पण दुःखही झाले. कृ. चिं. आगाशे शाळा सोडणे माझ्या जीवावरच आले होते. पण पगार आणि पेन्शन या दोन शब्दांमध्ये मी अडकलो.    

              जिल्हा परिषदला नोकरी केली तर मला सुरुवातीपासूनच पूर्ण पगार मिळणार होता आणि निवृत्तीनंतरचे फायदे मिळणार होते. मी माझ्या प्राथमिक शाळेतील नारकरगुरुजींना भेटायला गेलो. त्यांनी सांगितले , " तुला जर शिक्षिका पत्नी हवी असेल तर जिल्हा परिषदेची नोकरी कर. म्हणजे तुम्ही कधीतरी पती पत्नी एकत्र येऊ शकाल. तुला आर्थिक मदत करणारी सहचारिणी मिळेल. म्हणजे तुझा तिहेरी फायदा होईल. "  मी त्यांचा सल्ला शिरसावंद्य मानला. चाळणी परीक्षा देऊन मिळवलेल्या कृ. चिं. शाळेचा मी राजीनामा दिला. राजीनामा देताना मला तेव्हा अवघड वाटलेच पण अजूनही पश्चात्ताप होतो आहे. मी केले ते बरोबर केले का ? या प्रश्नाचे मला उत्तर देता येत नाही. शेवटी माझ्या बाबांना आणि शिक्षक असलेल्या भाईमामांना घेऊन मी खेड गाठले. 

          माझ्याबरोबर माझे बरेच मित्र आणि मैत्रिणी नोकरीवर हजर व्हायला निघालेल्या होत्या. मला त्यांची सोबत होतीच. पण तरीही बाबा आणि मामा कुतुहल म्हणून बरोबर आले होते. शाळेचे गाव खेडपासून १२ किलोमीटर अंतरावर होते. रामदासभाई कदमांच्या गावात जायला मिळाले म्हणून विशेष आनंद होता. सीमावाडी शाळा दोन वाड्यांच्या मध्यभागी होती.

          द्विशिक्षकी शाळा. आठ मुले आणि मुख्याध्यापिका बाचीमबाई. मला बघून त्यांना कोण आनंद झाला. मी बाईंना नमस्कार केला. त्यांनी मला आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणेच समजले होते. मला शाळेतच आईसारख्या बाई मिळाल्याचे समाधान होते. दोन वर्गखोल्यांची शाळा. ३ री आणि ४ थी चे वरचे वर्ग मला बाईंनी शिकवायला दिले. माझ्या दोन्ही वर्गातील  ८ -९ विद्यार्थी माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहात होते. मी त्यांच्याकडे पाहिल्यावर खाली मान घालून लाजताना दिसत होते. 

            कुणबी समाजवस्ती असली तरी शिक्षकांबद्दल अपार आदर होता. तिकडे गुरुजींना ' गुर्जी ' म्हटले जाई. मीही लवकरच ' कुबलगुर्जी ' झालो. मागील शाळेतील एका वर्गात ६० मुले सांभाळली होती. आता शाळेतील एकूण १७ मुलांना सांभाळणे मला अगदीच सोपे जात होते. पूर्वीच्या शिक्षकांनी पालकसंपर्क ठेवला होता. शिंदेगुर्जी उपक्रमशील शिक्षक होते असे ऐकायला मिळू लागले. मला मुलांच्या शिक्षणात जास्त रुची होती. हळूहळू २-३ महिन्यांमध्ये मी त्या शाळेशी एकरुप होऊन गेलो. पण तिकडचे जेवण मला जेवायला जमत नव्हते. कसेतरी जेवलो तरी ते माझ्या पोटात टिकत नव्हते. 

          शेवटी माझ्या विधवा आत्येला मी तिकडे जेवण बनवण्यासाठी घेऊन गेलो. तिला आम्ही सगळे ' दांडगेआये ' म्हणतो. दांडगेआयेने माझी खूप काळजी घेतली. सकाळी पिठले भाकरी, दुपारी गरमागरम जेवण आणि रात्री पूर्ण जेवण जेवल्यामुळे मी आता तब्येतीने सुधारु लागलो. दांडगेआयेला सगळे मावशी म्हणू लागले. ती होतीच तशी प्रेमळ. तिला एक मुलगी झाल्यानंतर तिचा नवरा एका दुर्धर आजाराने गेला. ती त्या अर्भकाला घेऊन आमच्या घरी आली ती गेलीच नाही. ती आता आठवणींच्या रुपाने आमच्या सोबत आहे. माझी दांडगेआये मालवणी बोलायची. मी मराठीत बोलायचो. लोकांना ती तिच्या भाषेसह आवडू लागली. ' गुर्जींची आत्या ' म्हणून ती दोन्ही वाड्यांत प्रसिध्द झाली. पण तिचे ते भावनाविवश होऊन रडणे आणि गावरान भाषेत बोलणे मला चारचौघात लाजवू लागले. शेवटी मला एक चांगली खोली आणि खानावळ मिळाली.मी दांडगेआयेला घरी सोडून आलो. मोरेंचे घर रिकामे होते. त्यांनी विनाभाडे मला राहायला दिले. लाईटबिल दिले तरी ते घेत नसत इतक्या मोठ्या मनाची माणसे घरमालक लाभली होती. कालेकरांनी घरपोच जेवणाची सोय केली. 

             माझा विद्यार्थी निलेश कालेकर तिन्ही वेळेला माझा डबा आणून देई. संध्याकाळी जवळचे ७-८ विद्यार्थी अभ्यासाला येऊ लागले. १० वी पर्यंतच्या मुलामुलींना मी शिकवू लागलो. मला माझ्या घरच्यांची आठवण काढायला वेळच नव्हता. दोन तीन महिन्यांनी एकदा घरी जायला मिळे. कालेकरांकडील जेवणाने मी चांगलाच सुधारलो. रविवारी खेडला जाऊन दर आठवड्याला नवीन पिक्चर बघण्याव्यतिरिक्त कोणताच विरंगुळा नव्हता. नरवणकरांच्या खानावळीतील चिकन जेवणाची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. आंबये पाटील केंद्रामधील म्हादलेकर केंद्रप्रमुखांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. लवेल केंद्रप्रमुख अनंत शिंदेसर यांनी दहा दिवसीय निवासी प्रशिक्षणामध्ये माझ्यावर खूपच जीव लावला. माझ्या लग्नाला ते मुद्दाम कणकवलीला आले होते. केंद्रातील सगळ्या शिक्षकांकडून विविध नवोपक्रम शिकायला मिळाले. 

               अजय सावंत, आनंद सावंत , रामचंद्र कुबल यांनी सख्ख्या भावाप्रमाणे साथ दिली. सीमावाडी शाळेत २६ जानेवारीला मुलांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम केले. सर्व पालक , म्हातारी माणसे घरी येऊन २२ वर्षाच्या मला पायाला हात लावून पाया पडू लागली. त्यांच्या मळणीला जेवायला बोलवू लागली. सामाजिक कामात मोठा मान देऊ लागली. या त्यांच्या  सन्मानपूर्वक वागण्याने माझ्यातला अहंभाव कधीच निघून गेला. त्या शाळेत मी फक्त १९ महिनेच काम केले. आता या गोष्टीला २० -२२ वर्षे होऊन गेली तरी शेजारच्या १०१ वर्षाच्या घागआजीने मला घातलेला साष्टांग नमस्कार आठवून आताही गहिवरुन जायला होते.



माझी चेकपोस्ट ड्युटी

माझी चेकपोस्ट ड्युटी

            २१ मार्च पासून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने सांगितल्याप्रमाणे माझे दैनंदिन ऑनलाईन अभ्यास पाठवण्याचे काम सुरु झाले होते. त्यासाठी दिवसाचे बरेच तास अभ्यास साहित्य बनवण्यामध्ये घालवत होतो. साहित्य बनवण्याच्या दृष्टीने आधी नियोजन करावे लागत होते. १० मिनिटांच्या व्हिडिओसाठी २ ते ३ तास बसून लॅपटॉपसमोर प्रयत्न सुरु होते. सर्व विद्यार्थ्यांना फोन करून सांगत होतो. शाळेपेक्षा जास्त वेळ अभ्यास तयार करणे, पाठवणे आणि केलेला अभ्यास तपासणे या गोष्टींसाठी जात असला तरी मुले शिकत आहेत याचा आनंद होत होता. काही मुलांपर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. त्यांच्यापर्यंत कसे पोहोचता येईल याचाही विचार करत होतो. 

अचानक आमच्या Whats App ग्रुपवर एक ऑर्डर येऊन धडकली. मी आपली सहजच वाचली. त्यात माझे नाव होते. मला चेकपोस्टची ड्युटी लागली होती. खारेपाटण चेकपोस्टला जायचे होते. रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत १० तासांची ड्युटी करण्याबाबत ऑर्डरमध्ये उल्लेख होता. माझे काही मित्र माझ्यासोबत असल्यामुळे मी निश्चिन्त होतो. आतापर्यंत मतदान, जनगणना, बी.एल.ओ., पल्स पोलिओ आणि इतर कामे केली होती. हेच काम करायचे बाकी राहिले होते. पहिल्यांदाच माझी ऑर्डर असल्यामुळे थोडे अप्रूपही वाटले. चेकपोस्टवर पोलिसांप्रमाणे ड्युटी करावी लागणार होती म्हणून एक वेगळाच अनुभव मिळणार या आनंदाने प्रेरित झालो होतो. मग काय स्वतः तहसीलदार कचेरीत जाऊन ऑर्डर ताब्यात घेतली. रात्रभर जागे राहावे लागणार होते. दुपारी २ - ३ तास सलग झोपण्याचा प्रयत्न केला. झोप काही येईना. शेवटी उठलो. मुलांना दुसऱ्या दिवशी पाठवायच्या अभ्यासाच्या तयारीला लागलो. घरातल्या सर्वांची मनाची तयारी केली. लहान मुलीला कसेतरी समजावून जेवल्यानंतर रात्रीच्या पहिल्यावहिल्या ड्युटीला निघालो. ती मी दिसेनासा होईपर्यंत रडत होती. जरा पुढे गेल्यानंतर मलाही रडावेसे वाटले. पण रडून उपयोग नव्हता. ६० - ७० च्या स्पीडने खारेपाटण चेकपोस्ट गाठले. 

तिथे आधीचे ड्युटीवाले ड्युटी सोडून चाललेले दिसले. मी सॅनिटायझर लावून आणि तोंडाला घट्ट मास्क लावून कामावर हजर झालो. जुन्यांकडून काम समजावून घेतले. आम्हा शिक्षकांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना बाहेरील जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्याची ड्युटी देण्यात आली होती. 

लोकांची नुसती रिघ लागली होती. लोक कोरोनाच्या भीतीने आपापले गाव गाठत होते. १४ दिवसांचे संस्थात्मक विलगीकरण सुद्धा आनंदाने स्विकारत होते. विलगीकरणाचे संमतीपत्र भरून दिल्यानंतरही लोक थँक्यू म्हणत होते. लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना बघून जीव कळवळत होता. पण त्यांच्यापासून सुरक्षित अंतरावर राहून बोलत होतो. तोंडाला मास्क लावल्यामुळे चष्म्यावर वाफ जमा होत होती. ती पुसण्यात वेळ जात होता. मला संगणकीय काम देण्यात आले. मी आलेल्या सर्वांची नोंद ऑफलाईन किंवा ऑनलाईन करत होतो. प्रत्येक व्यक्तीचे १५ ते १६ कॉलम भरण्याचे काम सलग करूनही सकाळपर्यंत पूर्ण होत नव्हते. अर्थात झोप घेताच येत नव्हती. असे सलग १० दिवस काम केले. पोलीस बिचारे १२ तासांची ड्युटी करून हैराण झाले होते. त्यांनीही कित्येक लोकांना आपल्याकडील पाणी दिले , खाऊ दिला. कधी कधी झोपण्यासाठी आपल्याकडील चादरही दिली. पोलिसांमधील मानवता पाहून गहिवरून गेलो. पोलिसांना काम करताना आमच्यापेक्षा त्रास होत होता. पण तरीही न कंटाळता ते करताना पाहायला मिळत होते. सर्वांशी मैत्री झाली. त्यांच्यातील प्रेमळ माणूस बघायला मिळाला.

तीन वेळा ड्युटी केली. शाळेतही ड्युटी केली. ऑनलाईन अभ्यास देण्याचे काम सुरूच होते. कित्येक कर्मचाऱ्यांनी हा अनुभव घेतला. नातेवाईकांचे फोन येऊ लागले. आम्हाला चेकपोस्टला अडवू नका, पुढे सोडा अशा विनंत्या होऊ लागल्या. सर्वांना नियमानुसारच सोडण्यात येत होते. तरीही आम्ही त्यांना दिलासा देत होतो. तुम्ही या, आम्ही आहोतच. तुम्हाला लगेच सोडतो. २ - ३  तासांनंतर सोडून सुद्धा लोक धन्यवाद देत असताना दिसत होते. लोक आपल्यासमोर असे हवालदिल होताना बघून प्रत्येकवेळी आमचाही जीव कासावीस होत होता. देवा, पुन्हा अशी ड्युटी नको या मागणीशिवाय मी आता काहीही मागणार नव्हतो.


            © प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )




माझी अविस्मरणीय शाळा : कृ. चि. आगाशे प्राथमिक विद्यामंदिर

माझी अविस्मरणीय शाळा : कृ. चि. आगाशे प्राथमिक विद्यामंदिर

                    कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरमधील शिक्षक ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट होती. मला दुसरीचा वर्ग देण्यात आला. पटवर्धन हायस्कूलद्वारा चालवली जाणारी रत्नागिरीतील ती एक प्रसिध्द शाळा असा उल्लेख केला तरी तो चुकीचा ठरणार नाही. नगर परिषदेच्या २२ शाळांमध्ये ही तेवीसावी. त्यावेळी १ ली ते ४ थी चे प्रत्येकी दोन तुकड्यांप्रमाणे एकूण आठ वर्ग होते. पहिली गुलाब , पहिली चमेली , दुसरी ज्ञानेश, दुसरी मुक्ताई, तिसरी ध्रुव, तिसरी प्रल्हाद, चौथी शिवाजी, चौथी महाराणा प्रताप अशी तुकड्यांची नावे. माझ्या तुकडीचे नाव दुसरी मुक्ताई. 

          माझ्या वर्गात एकूण ६० विद्यार्थी होते. मी वर्गात प्रवेश केला. राष्ट्रगीताची घंटा कानावर पडताच मुले सावधान स्थितीत उभी राहिली. मुले त्या ४२ सेकंदात ६० प्रकारच्या हालचाली करताना दिसत होती. त्यांना बिचाऱ्यांना राष्ट्रगीताचे महत्त्व ते काय माहित ! ! ती निरागस भाबडी मुले पाहून मला त्यांना किती शिकवू आणि किती नको असे झाले होते. मी त्यांच्यासाठी नवखा होतो. मुलांनी मला ' काका ' म्हणायला सुरुवात केली. त्यांना कुठे माहिती होते कि मी त्यांचे नवीन सर होतो ते ? थोड्याच वेळात मुख्याध्यापिका शीतल काळेमॅडम आल्या. त्यांनी मुलांना अगदी नीट समजावून सांगितले. त्यानंतर मुलांनी टाळ्या वाजवून माझे स्वागत केले. मला त्यावेळी जो आनंद झाला तो काय वर्णावा ! इंजिनिअर झालो असतो, कदाचित डॉक्टरही. पण शिक्षकी पेशामध्ये मिळणारा हा आनंद आगळा वेगळाच असतो. त्यासाठी शिक्षकच व्हावे लागते. मी मुलांशी त्यांच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न सुरु केला.  मुले सर्व प्रकारची होती. अत्युच्च , उच्च आणि मध्यमवर्गीय पालकांची मुले असल्याने ती बोलकी होती. पहिल्या दिवशी त्यांनी मला अनेक प्रश्न विचारुन भंडावून सोडले. त्यानंतर मी ६ ते ७ शाळांमध्ये सेवा केली तरी हाच दिवस मला सुखावणारा वाटत राहतो. माझी आणि मुलांची पहिल्या दिवसापासून गट्टी जमली. माझं लटक्या रागानं पाहणं , ओरडणं त्यांना समजू लागलं. मी त्यांना माराची भिती दाखवली, पण मारले मुळीच नाही. माझे व्यक्तिमत्त्व अजिबात आकर्षक नव्हते. पण मुले व्यक्तिमत्व नाही, तर स्वभाव बघतात. त्यांनी माझ्या दिसण्याकडे नाही , तर असण्याकडे लक्ष दिलं असावं. त्यावेळी माझ्या डोक्यावर दाट केस होते. आता ते शोधावे लागतात इतकेच. 

          मला कणकवली डी.एड. कॉलेजला असताना मिळालेल्या मित्रमैत्रिणींच्या सहवासाने घडवले म्हणायला हरकत नाही. तेथे दोन वर्षात सर्वांमधील विविध सुप्त क्षमता बघून माझ्यातला खरा शिक्षक जागा झाला आणि मी घडत गेलो. मला त्यावेळी सगळ्यांची इतकी साथ मिळाली कि मी माझ्या वर्गमित्रांना ( मैत्रिणींनाही ) कधीच विसरणार नाही. आता बर्‍याच वर्षांनंतर ते मला माझ्या केसांमुळेच ओळखू शकत नाहीत ही खरी गोष्ट असेल कदाचित. पण केस गेल्यामुळे किंवा माझ्या टकलामुळे माझे कधीच कुठे अडले नाही हे मी इतक्या वर्षांनंतरही ठामपणे सांगू शकतो. 

          परिपाठापासून शाळा सुटेपर्यंत मी मुलांना अभ्यासात एवढा गुंतवून ठेवी कि मुले शाळा सुटली तरी घरी जायला बघत नसत. मी सतत कामच करत असे. शाळेत एकूण ८ शिक्षिका होत्या, मी एकटाच पुरुष शिक्षक होतो. मी मालवणी होतो. त्या सगळ्या शुद्ध भाषा बोलणार्‍या होत्या. मी त्यांच्या संस्काराने सर्व शिकलो. त्यांनी मला सर्व जबाबदाऱ्या दिल्या. दैनंदिन फलकलेखन करायला दिले. बाहेरील कोणतेही काम , सुशोभन इत्यादी करताना त्यांना माझ्या कल्पना आवडू लागल्या. पण भरसभेत पालकांसमोर त्या जितक्या धीटपणाने बोलत , तेवढं मला जमत नसे. मला ते अधिकारीवर्ग असलेले पालक पाहून त्यांच्याशी बोलताना संकोच वाटे. त्यातील माझे बहुतांशी पालक महिला असत. त्यांच्याशी बोलताना तर मी कमालीचा लाजून जाई. पण त्या महिला पालकांनी मला विश्वास दिला. त्या दररोज मुलांच्या अभ्यासाविषयी माझ्या वर्गात येऊन माझ्याशी बोलत असत. त्यामुळे मला धीर येत गेला. माझ्या शिकवण्याबद्दल मुले घरी जाऊन पालकांना सांगत असत. त्यामुळे पालकदेखील माझ्यावर खुश होते. हळूहळू माझ्यातला आत्मविश्वास वाढत गेला. मी एखाद्या कार्यक्रमामध्ये मला मुख्याध्यापिका यांनी दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडू लागलो. माझे अक्षर वळणदार असल्यामुळे मला लिखाणकामही देण्यात येऊ लागले. मी आपला देतील ते काम आपलेपणाने करतच गेलो. कधीही नकार दिला नाही. त्यामुळे मी सगळ्या प्रकारची शैक्षणिक कामे करण्यात पटाईत झालो. तेथे सर्व सहशालेय उपक्रम समारंभपूर्वक साजरे केले जाण्याची पद्धत मला खूप आवडली. कार्यक्रम झाल्यानंतर त्याचे अहवाललेखन बर्‍याचदा मला करण्याची संधी मिळाली. मी संधीचे सोने करत गेलो. कंटाळा करणे माझ्या रक्तातच नाही. फक्त आर्थिक बाबतीत कमी पडत आहे हे मुख्याध्यापिका मॅडमांच्या लक्षात आले. कारण मला त्यावेळी १२०० रु. पगार होता. मामांकडे खानावळ ३०० रु. देत होतो. ती कमीच होती. पण मामा मामींनी माझ्याकडे कधी खानावळ मागितली नाही. पण मी त्यांच्याकडे पैसे न देता राहणे मला स्वतःला पटणारे नव्हते. पगार झाला कि मी कणकवली गाठत असे. माझा सगळा पगार मी बाबांकडे देई. मी त्यातील एकही रुपया कधी माझ्याकडे ठेवला नाही. 

          आर्थिक प्रश्न सुटावा म्हणून मॅडमांनी मला शाळेतच वर्ग सुरु होण्याअगोदर एक तास लवकर येऊन जादा क्लास घेण्यास सांगितले. मला क्लाससाठी २० विद्यार्थी मिळाले. प्रत्येकी ३० रु. मासिक फी घेऊन मला महिना ६०० रु. मिळू लागले. मी त्यातील ३०० रु. खानावळ आणि ३०० रु. कणकवली ते रत्नागिरी प्रवास यासाठी वापरुन सगळा पगार जसाच्या तसा घरी कायमच दिला. मामा त्यावेळी कोकणनगरला राहात. मी एक ५०० रुपयांची जुनी लेडीज सायकल घेतली. सायकलनेच मी शाळेत जाऊ लागलो. 

          १५ जून ते नोव्हेंबर १९९६ असे सहा महिने मी तिथे नोकरी केली. मी तिथे काम करताना सहा महिन्यात शिकलेल्या गोष्टींचा मला पुढील जीवनात अजूनही उपयोग होतो आहे आणि होत राहील. मला तिथली नोकरी सोडताना ज्या जोग सरांनी पाठबळ दिले होते , ते म्हणाले ,  " अरे , आम्हांला आता पुन्हा तुझ्यासारखा शिक्षक शोधावा लागणार." आता मी त्या शाळेत नसलो तरी त्या पहिल्या शाळेत म्हटली जाणारी प्रार्थना अजूनही म्हणतो आहे आणि मी जणू त्याच शाळेत असल्याचा मलाच दिलासा देत आहे ...... 


दयासागरा सद्गुणांचा निधी तू , 

सदासर्वदा रक्षी आम्हासी रे तू , 

तुझ्या भक्तिरुपे तुला ओळखावे , 

तुला आठवावे , तुला रे पहावे .


© प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )





💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...