Monday, December 30, 2024

🛑 जय श्रीराम विभूते : मी पाहिलेले सूत्रसंचालक सर

 🛑 जय श्रीराम विभूते : मी पाहिलेले सूत्रसंचालक सर


          २०१९ पासून मी तळेरे बीटमध्ये आहे. तेव्हापासून माझी आणि त्यांची भेट होत आहे. नावात राम आणि आडनावात विभुती असणारे हे व्यक्तिमत्व. 

          सध्या तळेरे नं. १ शाळेत कार्यरत असणारे माझे मित्र मा. श्रीराम विभूते यांच्याबद्दल मी बोलतोय हे एव्हाना आपल्या लक्षात आले असेलच. 

          तळेरे प्रभागातील अनेक उत्तम कार्यक्रम तळेरे नं. १ शाळेत संपन्न होत असताना मी अनेकदा त्या सर्व कार्यक्रमांना उपस्थितही होतो. प्रत्येक वेळी श्रीराम विभूते सरांचं ' सूत्रसंचालन ' अनुभवलं आहे. त्यांच्या हातात ' माईक ' गेला कि त्या ' माईकचं ' कर्णमधुर आवाजात रूपांतर होताना मी कित्येकदा ऐकलं आणि पाहिलं आहे. त्यांचा आवाज लांबूनही मी ओळखू शकेन इतका तो माझ्या ओळखीचा झाला आहे. त्यांच्या मुखातून बाहेर पडणारी विद्येची देवता ऐकत राहावी अशीच. विद्येचं आराध्य दैवत जणू त्यांच्यावर सदानकदा प्रसन्न झालेलं असतं. त्यांनी बोललेली सुभाषिते, शायरी, चारोळ्या कार्यक्रमाची रंगत वाढवत जातात तेव्हा तो प्रेक्षकांसाठी अनमोल क्षण असतो. त्यांनी बोलत राहावं आणि रसिकांनी टाळ्या वाजवत नियमित दाद देत राहावी असं त्यांचं सूत्रसंचालन मला नव्हे सर्वांनाच मोहवून टाकणारं असतं. 

          ते समोर येतात तेव्हा एखाद्या कार्यक्रमाचा सुश्राव्य आरंभ होत असतो. मान्यवरांचे स्वागत करताना त्यांच्याबद्दल ' ऑन द स्पॉट ' स्तुतीसुमने उधळणारे श्रीराम विभूते सर पाहिले कि त्यांच्या अभ्यासू व्यासंगी व्यक्तिमत्वाची छोटीशी झलकच झळकते.

          प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या सूत्रसंचालनाला नेहमीच ते असतात. त्यावेळी बक्षीस वितरणाचे त्यांचे सूत्रसंचालन कुतूहल जागृत करणारं असतं. त्यांच्या स्वतःच्या शाळेने अनेकदा तालुकास्तरापर्यंत किंवा जिल्हास्तरापर्यंत बाजी मारलेली असते तेव्हा तर त्यांच्या सूत्रसंचालनाला अधिक बहर आलेला असतो. 

          NAS सर्वेक्षण होते. माझी नेमणूक कासार्डे तांबळवाडी शाळेत झाली होतो. ते त्या शाळेत काम करुन बदली होऊन तळेरे नं. १ गेले आहेत. तांबळवाडी शाळेत ' CCTV कॅमेरे पाहिले. श्रीराम विभूते सरांनी त्यावेळी तांबळवाडी शाळेला डिजिटल बनविण्यात महत्वाची भूमिका निभावली होती असे ऐकायला मिळाले आणि मला अधिक आनंद झाला. 

          ते एक उत्तम तबलावादक आहेत. त्यांनी एका कार्यक्रमात तबला वाजवताना मी स्वतः पाहिले आहे. शिक्षकाने अष्टपैलू असायला हवे. त्यांच्यात अनेक उत्तम गुण आहेत. मला त्यांच्यातल्या उत्तम गुणांविषयी अतीव आदर आहे. त्यामुळे ते एखाद्या मोठ्या कार्यक्रमात उठून दिसतात. त्यांना तीन राष्ट्रीय पुरस्कार व सिंधदुर्ग जिल्ह्याचा गुरू गौरव पुरस्कार मिळाला आहे.

          त्यांचे स्टेटस भारी असतात. त्यांचे सामान्यज्ञान अफलातून आहे. त्यात नेहमीच वाढ होत असते. १ जानेवारीला त्यांचा वाढदिवस येतो. वर्षाच्या पहिल्या दिवशी वाढदिवस असणं ही भाग्याची गोष्ट आहे. श्रीराम विभूते सरांनी आपल्या चांगल्या गुणांमध्ये अधिक वृद्धी करावी आणि आपल्या व कुटुंबाच्या आयुष्यात पुढील वाटचालीसाठी समृद्धीचे, सुखाचे, भरभराटीचे दिन सदैव येवोत अशा कोट्यावधी शुभेच्छा. 


©️ प्रवीण कुबल, मुख्याध्यापक शिडवणे नं. १



Saturday, December 21, 2024

जल्लोष बाल खेळाडूंचा

 जल्लोष बाल खेळाडूंचा 


मुलांसाठी खेळ ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. खेळ त्यांच्या जीवनात नियमित आनंद फुलवणारे क्षण निर्माण करत असतो. त्यामुळेच खेळ मुलांसाठी जल्लोष असतो. बालजीवनात चैतन्य आणण्याचे कार्य करणारा हा खेळ सतत येत राहिला तर मुलांचं तन आणि मन दोन्ही तंदुरुस्त होण्यास नक्कीच मदत होईल. 

गेले काही दिवस आम्ही सर्व शिक्षक या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत. मुलांसोबत विविध खेळांचा आनंद घेत आहोत. मुलांसाठी आणि मुलांसोबत खेळताना होणारा आनंद काय वर्णावा !! बाल कला , क्रीडा आणि ज्ञानी मी होणार महोत्सव मुलांच्या जीवनात दरवर्षी प्रसन्नतेचं पीक आणणारा काळ असतो. या दुर्मिळ क्षणांची ही मुले अगदी आतुरतेने वाट पाहताना मी स्वतः अनेकदा पाहिली आहेत. मुलांना खेळताना त्यांच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद पाहण्यासारखं सुख नाही. मुलं मस्त खेळत आहेत , मस्ती करत आहेत , भांडत आहेत , स्वतःच भांडणं सोडवत आहेत असं चित्र सगळीकडेच थोड्याफार फरकाने पाहायला मिळतं. शिक्षकांना हे सतत दिसणारं दृश्य आहे. मुलं तक्रारी सांगतात , त्या सोडवतात. भांडण करतात , भांडणं विसरून जातात. हा त्यांच्यातला निरागसपणा आम्हां मोठ्या माणसांना टिपता यायला हवा. 

केंद्राच्या स्पर्धा संपन्न होत असताना मला उपक्रीडाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मी मला दिलेली जबाबदारी अधिक उत्तम रीतीने नेहमीच बजावण्याचा प्रयत्न करतो. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये , आपल्याला त्रास झाला तरी चालेल हे माझं नेहमीच सूत्र असतं. कोणालाही थेट नकार द्यायला मला आवडत नाही. त्यामुळे मला जबाबदारी दिली नसली तरी माझीही जबाबदारी आहे असं समजून मी सर्वतोपरी अधिकाधिक प्रयत्न करत राहतो. ती माझी सवयच आहे. त्यामुळे माझ्यावर अधिक जबाबदारी येऊन पडते आणि मग ती पार पडताना माझी दमछाक झाली तरी मी ती निमूटपणे सहन करत राहतो. 

मुलं छान खेळताना बघून केंद्रात यशस्वी होऊन प्रभागात जाताना एका विशिष्ट चाळणी प्रक्रियेतून जात असतात. प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झालेली मुलेच पुढे पुढे खेळू शकतात. स्पर्धेत यशस्वी व्हायचंच असं ठरवून आलेली मुलं अपयशी ठरली कि अक्षरशः रडू लागतात. यावेळी मी हे क्षण पुन्हा अनुभवले. माझ्या शाळेतील मुलांचा केंद्रात ज्ञानी मी होणार मोठ्या गटात निसटता विजय झाला. अर्थात मुलांनी केलेला अभ्यास मुलांना विजेता ठरवून गेला होता. प्रतिस्पर्धी शाळेतील मुलांनीही खूप अभ्यास केला होता. पण उपविजेता ठरुनसुद्धा त्यांना अश्रू आवरले नाहीत. मुलांना खिलाडूवृत्ती माहिती आहे , तरीही डोळ्यातून पाणी येतंच. मुलांची चाचणी आणि चाचपणी होत असताना जणू शिक्षकांचीच चाचणी होत असते. शिक्षक आणि मुले या दोघांनीही केलेल्या परिश्रमांचं ते दुहेरी यश असतं. यात जेव्हा पालकही जबाबदारी घेतात , तेव्हा मुलांच्या उत्तर देण्याचं प्रमाण अजून वाढत जातं. मुलं पटापट उत्तर देऊ लागली कि टाय फेरीची वेळ येते. 

टाय फेरीपर्यंत पोहोचलेली मुले खऱ्या अर्थाने विजेता ठरलेली असतात. फक्त पुढे एक कोणतातरी संघ न्यावा लागतो म्हणून एक संघ बाद ठरविण्याची ही एक निकषरुपी पद्धत आहे. जी मुलं आणि जे शिक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा करुन पुढे आलेली असतात , त्यांच्या त्यावेळी डोळ्यांतून पाणी आल्याखेरीज राहत नाही. मुलांच्या ते प्रत्यक्ष येतं , शिक्षकांच्या डोळ्यांत पाणी आलं तरी ते लपवून ठेवावं लागतं. कारण त्यावेळी मुलांना सांभाळून घेणं अधिक गरजेचं असतं ना !!! 

मुलं आपलं कोणत्याही खेळातलं सादरीकरण बिनधास्त करतात. आमच्या खोखोच्या संघातील काही मुले आम्हांला इतकी छान खेळतील असं अजिबात वाटलं नव्हतं. आम्ही त्यांना नेहमीच प्रोत्साहन देत राहिलो होतो. आमचे माजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थिनी येऊन येऊन मुलांना क्रीडांगणावर निपुणतेने खेळण्यासाठी धडे देत होते. या सगळ्या मुलांच्या अंगात खोखो हा खेळ इतका भिनला आहे कि बघताना प्रत्येकात चैतन्य संचारावं. अर्थात मी माझ्या मुलांचा खेळ पाहत होतो. मी स्वतः असा कधीही मैदानावर खोखो खेळ खेळलेलो नाही. कारण आमच्या बालवयात अशा क्रीडा स्पर्धा होत नसत. मी नोकरीला लागल्यापासून या स्पर्धा सुरु झाल्यामुळे आताच्या मुलांना असं खेळण्याची संधी सरकारकडूनच मिळालेली आहे. 

गेली अठ्ठावीस वर्षे मी शिक्षण क्षेत्रात काम करत असताना मुलांच्या अभ्यासाबरोबर खेळसुद्धा घेण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. छोट्या आणि एकशिक्षकी शाळेत काम करताना मुले छोटी असल्याने मुलांना खेळात सहभागी करूनसुद्धा मुलं खेळात कमी पडताना दिसत होती.त्यामुळे भाग घेऊनसुद्धा कधी जल्लोष वगैरे करता आला नाही. आपले विद्यार्थी खेळात नैपुण्य दाखवतात तेव्हाच मनापासून जल्लोष करता येतो. गोवळ गावठण शाळेत असताना मुले कबड्डी छान खेळत. अनेकदा मुलांनी आणि मुलींनी शाळा समूह योजनेतही ट्रॉफ्या मिळविल्या. तेव्हापासून मुलांमधील खेळातील आवड माझीही आवड बनायला लागली. लोकांनी , पालकांनी यशस्वी झालेल्या मुलांचे ढोल वाजवून केलेले स्वागत मी अजूनही विसरलेलो नाही. खेळात पुढे जाणारी मुले जेव्हा त्या वर्षी ज्ञानी मी होणार स्पर्धेत जिल्ह्यापर्यंत जाऊन पोहोचली होती. 

पुन्हा जेव्हा वैभववाडीत ‘ मांगवली नं. १  ’ शाळेत सात वर्षे असताना नेहमीच खोखो संघाचे नेतृत्व करता आले. आमची मुले स्प्रिंगसारखी खेळताना आमच्या पालकांचा आनंद गगनात मावेनासा होई. मुलांना दुखले खुपले तरी त्यांना काही वाटत नसे. खेळावर असलेलं त्यांचं प्रेम अंतर्मनात पूर्ण रुजलेले होते. अभ्यासातही चमक दाखवणारी मुले खेळातही अप्रतिम कौशल्ये दाखवताना आम्ही कमालीचे भारावून जात होती. 

आता तर मी ज्या शाळेत आहे , ती शिडवणे नं. १ शाळा तर खोखोसाठी प्रसिद्ध असलेली शाळा आहे. त्यामुळे आमचे अनेक माजी विद्यार्थी खोखो खेळताना पाहिले कि आमचे आजी विद्यार्थीसुद्धा भारावून जाऊन खेळतात. छोटी छोटी मुले खोखो खेळातील हे कौशल्य दाखवताना दिसतात , तेव्हा कधी कधी प्रश्न पडतो कि ही मुले हे कधी शिकली ? मुले बघून बघून आणि आपल्या भावंडांकडूनही परंपरेने खूप काही शिकत असतात. शिक्षकांपेक्षाही आपल्या मोठ्या भावंडांकडून शिकताना त्यांना कोणतीही भीती वाटत नाही. 

यंदा मला प्रभागाचा क्रीडाप्रमुख म्हणून सर्वानुमते निवडण्यात आले. त्यामुळे मला कामाचा बराच लोड आला. एकतर माझ्या शाळेमध्ये एक शिक्षिका सहा महिन्यांच्या रजेवर गेल्यामुळे दोन वर्ग सांभाळून मुख्याध्यापक काम करताना होणारी धावपळ , माझा अचानक वाढलेला बीपी , घरातील येणाऱ्या आकस्मिक अडचणी या सर्वांवर मात करताना खूप त्रास होत असला तरी तो त्रास दुसऱ्यांना न दाखवता हसतमुखाने काम करत राहणे एवढेच मला माहिती आहे. क्रीडाप्रमुख म्हणून दिलेली जबाबदारी सांभाळतानाही गरम इस्त्री डोक्यावर घेतल्याचा भास होत होता. माझ्या शाळेत कमी शिक्षक असल्याने माझ्या शाळेतील माझ्या वर्गातील मुलांसाठी मला द्यायला पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही याची खंत सतावते आहे. 

मुलांचा जल्लोष दिसतो आहे. माझी खंत मनात सलते आहे. क्रीडाप्रमुख म्हणून जबाबदारी पार पडत असताना माझ्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासास मी किती खरा उतरलो ते मला माहिती नाही. पण मी मात्र मला जमले तितके प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत लॅपटॉपसमोर बसून काम करताना मी अजिबात थकत नव्हतो. कारण मला दिलेले कार्य मला निर्विघ्नपणे पार पडायचे होते. 

शिक्षक मला आदर देत होते. विद्यार्थी हसतमुखाने सामोरे जात होते. पंचांना दिलेले काम वेळीच पूर्ण होताना दिसत होते. सर्वांना घेऊन काम करताना मला माझ्या शाळेत संयोजक म्हणून काम केल्याचा अनुभव कामी आला. सर्व विजेते ट्रॉफी घेत होते , तेव्हा माझ्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होत चालला होता. मला क्रीडाप्रमुख बनवलं तेव्हा मला वाटलं होतं कि मला बनवलं तर नाही ना ? पण माझी तब्येत बरी नसतानाही मी क्रीडाप्रमुख म्हणून मला दिलेली जबाबदारी पार पडू शकलो याचा माझ्या बाबांना अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. आज ते जिवंत असते तर त्यांच्या चेहऱ्यावर पडलेल्या हसऱ्या सुरकुत्या पाहून मी नक्कीच सुखावलो असतो. मला सहकार्य करणाऱ्या माझ्या प्रभागातील अधिकाऱ्यांपासून सर्व शिक्षक , पंच , परीक्षक , पदाधिकारी , पालक , ग्रामस्थ आणि देणगीदार  यांचे ऋण कसे फेडू ? 


© प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १


Wednesday, December 4, 2024

' परखलेले सर्वे '

         परख नावाच्या परखलेल्या म्हणजेच विशेष पारखून अभ्यासलेल्या सर्वेसाठी माझी नुकतीच क्षेत्रीय अन्वेषक म्हणून निवड झाली होती .  त्यानिमित्ताने शासनाच्या एका सर्वेक्षणामध्ये भाग घेण्याची सुवर्णसंधी लाभली हे माझे भाग्यच. 

        तशीही ही माझी तिसऱ्यांदा निवड झाल्याने मला यापूर्वी सर्वेक्षण केल्याबद्दलचा अनुभव गाठीशी होताच .  पहिल्या वेळी मला ' कासार्डे तांबळवाडी ' या जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गाचा सर्वे करता आला. त्या शाळेत तर सी. सी. टी. व्ही. कॅमेरे लावलेले दिसले. तिथे काम करत असलेल्या आणि काम करुन गेलेल्या शिक्षकांनी गावातील , वाडीतील लोकांच्या सहभागातून शाळेचा चेहरा बदलून टाकल्याचं ते चित्र मला मोहित करणारं होतं. त्या शाळेतील केसरकर मॅडम आणि राठोड सर यांनी केलेला उत्तम पाहुणचार अजिबात विसरता येणार नाहीच.  बिचारे राठोड सर आज हयात नाहीत याची खंत वाटते आहे.  त्यांचा चेहरा मला अजूनही जसाच्या तसा दिसतो आहे.  

        विद्यार्थी सुरक्षा संदर्भात परिपत्रक येण्यापूर्वीच यांनी खूप पूर्वी केलेला विचार खरोखरच त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्यासारखाच आहे. असा भविष्यकालीन विचार करुन कार्य करणाऱ्या शिक्षकांना खरंच सलाम केले तरी कमी पडतील .  

        त्यानंतर दुसऱ्यांदा मला तळेरे येथील ' स्वीटलँड इंग्लिश मेडीयम स्कुल ' मिळाली होती .  इयत्ता सहावीच्या मुलांचा NAS सर्वे करतानाही मला खूप छान अनुभव प्राप्त झाला होता. तिथे मिळालेली वागणूक आदरयुक्त होती .  

        यंदा मिळालेली शाळा पुन्हा एकदा इंग्रजी माध्यमाची होती.  मी मराठी किंवा सेमी माध्यमाला शिकवणारा शिक्षक असलो तरी सर्वे करताना भाषेची कोणतीही अडचण मला आलेली नाही हे महत्त्वाचे आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून आम्हां शिक्षकांना मिळालेलं मुद्देसूद प्रशिक्षण हे त्याला कारणीभूत आहे .  कोणतीही शंका न ठेवता सर्वांच्या सर्व प्रकारच्या शंकांना उत्तरे देणारे मार्गदर्शक खरंच मोलाचे ठरतात ते त्यासाठीच .  त्यांच्याकडे कोणत्याही अवघड शंकेचं मुद्देसूद उत्तर असतं. लहान मुलांना सांगावं तसं ते पुन्हा पुन्हा सुद्धा सांगतात तेव्हा त्यांच्या संयमाची दाद द्यावीशी वाटते. म्हणूनच त्यांनी दिलेले प्रशिक्षण शंभर टक्के शिक्षकांपर्यंत पोहोचते .  

        मला यावेळी मिळालेली शाळा माझ्या शाळेपासून जवळ असली तरी मी कधीही त्या शाळेत गेलेलो नव्हतो .  नडगिवे हे गाव शिडवणे पासून जवळ म्हणायला हरकत नाही .  एका खाजगी शाळेच्या आणि तेसुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील सहावीच्या विद्यार्थ्यांची सर्वे परीक्षा घेण्यासाठी माझी निवड झाली होती.  असं काही वेगळं करण्यासाठी शिक्षक म्हणून मी नेहमीच उत्साही असतो .  यावेळीही माझा उत्साह नेहमीसारखाच होता .  

Saturday, November 16, 2024

🔴 फोन संध्या

🔴 फोन संध्या

        सध्या फोनवरुन ओळखी होण्याचे दिवस आले आहेत.  पूर्वी आपले पत्रमित्र असत.  आता फोन मित्रांची ( किंवा मैत्रिणींची ) संख्या वाढली आहे. पत्रमित्र इतिहासजमा झाले आहेत.  माझे अनेक फोन मित्र आहेत.  ज्यांची कधीतरी पुसटशी भेट झाली असेल, त्यांच्याशीही आपली फोन मैत्री होऊन जाते.  काहीवेळा ही फोन मैत्री करण्यासंदर्भात खूपच काळजी घ्यावी लागण्याचेही दिवस आले आहेत.  

        फेक कॉल येतात तेव्हा बेजार व्हायला होते.  त्रास देण्यासाठी अनोळखी फोन येतात , तेव्हा ते समजून कट करणं जास्त सावधगिरीचं असतं. एकूणच काय  तर  फोन करणं  , फोन येणं , फोन घेणं , फोनवर जास्तवेळ बोलत राहणं , फोनवर मित संभाषण करणं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. 

        माझे तसे अनेक मित्र आहेत. मैत्रिणी असल्या तरी त्यांचे कामाशिवाय कधीच फोन येत नाहीत. मित्र सुद्धा उगीच फोन करुन त्रास देणारे अजिबात नाहीत. मीही तसा कोणाला फोन करुन तासनतास बोलत राहणं टाळतो.  प्रत्येकाचा वेळ महत्त्वाचा असतो.  मी शिक्षक आणि मुख्याध्यापक असल्याने पालकांचे फोन येतात. ते महत्त्वाचे असतात , ते माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. फोन करणारे नातेवाईक क्वचित असतात.  त्यात वर वधु यांच्या माहितीसाठीचे फोन जास्तीचे असतात. आपल्याला आता कोणतेही फोन नको असले तर फोन स्विच ऑफ ठेवणं अधिक चांगलं असतं. तरीही आपला महत्त्वाचा फोन येण्याची शक्यता असली तर फोन चालू ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. संध्याकाळी कामावरुन आल्यावर अनेकजण निवांतपणे फोनवर बोलताना मी अनेकदा पाहिले आहे .  

             काही युवक युवती तर सतत कानाला ब्लुटुथ डिव्हाईस लावूनच असतात.  त्यांचे खूप महत्त्वाचे फोन सतत चालू असतात.  समोरुन कुणीतरी बोलत असतो / असते , इकडून कधीतरी रिप्लाय दिले जात असतात.  त्यांची कोड लँग्वेज आमच्या जुन्या पिढीला खूप कमी समजते. त्यासाठी एखादी पीएचडी करावी लागेल. ही मंडळी नुसती फोनला कायमची चिकटूनच असतात. रेंज गेली कि यांचा प्रॉब्लेम होतो खरा. प्रवासात तर यांच्या फोनचा पुरेपूर वापर होत असतो . मोबाईल अजिबातच बाजूला ठेवण्याचे नाव घेत नाहीत ही मंडळी. बॅटरी डिस्चार्ज होईपर्यंत ' लगे रहो ' हे ब्रीदवाक्य इमानदारीने पाळणे यांचा चांगले जमते.  

            त्यादिवशी मी सावंतवाडीवरुन कणकवलीपर्यंत एसटीने प्रवास करत होतो .  

        

Thursday, October 31, 2024

🛑 आली दिवाळी घरोघरी

 🛑 आली दिवाळी घरोघरी


          दिवाळी जवळ आली कि कधी एकदा दिवाळीची सुट्टी पडते असे होऊन जाते. मुलांना आणि मोठ्यांना दोघांनाही दिवाळीच्या सुट्टीची ओढ असते. शाळा आणि दिवाळीची सुट्टी हे दरवर्षीचं समीकरण आहे. मुलांना सुट्टी हवीसुद्धा असते आणि पालकांना ती कधी हवी किंवा नकोसुद्धा असते. 

          दिवाळीत खूप मौज करायची असते. मामाच्या घरी जायचे असते. ज्यांना मामा असतात, त्यांना होणारा आनंद वर्णनीय असतो. मुलांच्या मामाच्या घरी जायच्या ओढीने आईलासुद्धा आपल्या माहेरी जायची संधी मिळत असते. एखादी रात्र मामाच्या किंवा भावाच्या घरी राहण्यातली मज्जा तिथे आनंद उपभोगणाऱ्या माझ्यासारख्या भाच्याला नक्कीच सांगता येईल. 

          “ दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा ” हे जे म्हटलं गेलं आहे ते अगदी खरंच आहे. आमच्या मामांच्या घरच्या दिवाळीने आमच्या तनमनात दिवाळी साजरी केली आहे. बालपणापासूनच आम्हां सर्व भावंडांना आजोळीची आत्यंतिक ओढ होती. ती अजूनही आहे. मामांनी आम्हाला खूप दिले. धन, धान्य, संस्कार, प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा हे सर्व शब्द कमी पडतील. आम्हाला घडवणारे आमचे आजोळच होते. कारण प्रत्येक मामा म्हणजे आमच्यासाठी एकेक संस्कारयुक्त शिदोरीच असे. त्यांच्या सहवासात गेल्यावर आमच्या सहवासाला सुगंधी उठण्याचा वास येऊ लागला.

          मामांच्या घरचे संस्कारांचे मोती आम्हांला नेहमीच चकचकीत करीत होते. त्यांची वागणूक आम्ही प्रत्यक्ष पाहात होतो. दिवाळी सणाला माझ्या बाबांनी माझ्या आजोळी जाऊन ‘ नरक चतुर्दशीच्या ‘ चाव दिवशी एकत्र घेतलेला फराळ मला अजूनही आठवतो आहे. सर्व मुले, माणसे एकत्र येऊन त्यांचं ते आनंदाचं आदरातिथ्य फराळातल्या गोड पदार्थांपेक्षाही कित्येक पटीने गोड असे. मामांच्या या गोडपणाचा स्पर्श आम्हांला झाला आणि आम्हीही काही प्रमाणात गोड बनण्याचा प्रयत्न केला. मामा, मामी आणि त्यांची मुले आम्हांला आपल्या घरातील समजत. त्यांचं नारळाचं दुकान, सलून दुकान, काहींच्या खाजगी नोकऱ्या, काहींच्या सरकारी नोकऱ्या या सगळ्या गोष्टींचं मला अप्रूप असे. आपणही त्यांच्यासारखं व्हावं असं वाटायला लागावं असं प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व. आमच्या मामांनी आमच्या घराला नेहमीच आपलंसं मानलं त्यात माझ्या आई बाबांचा सिंहाचा वाटा आहे. आम्ही गरीब असलो तरी मामांनी आमच्या आईबाबांचा नेहमी सन्मानच केला आहे. 

          फराळ खाण्यात मजा नसते, तो एकत्र खाण्यात मजा असते. एकत्र गप्पा गोष्टी मारत मारत फराळाची गोडी अधिक वाढत जाते. आमच्या मामांनी भाऊबीजेला आमच्या घरी येणं, हा म्हणजे आमच्यासाठी खरा दिवाळीचा सण असे. मामांनी आणलेली प्रत्येक गोष्ट माझ्या आईसाठी सन्माननीय असे. आईने आपल्या मोठ्या भावांना कधी ‘ अरे ’ म्हटले नाही. भावांचा निरतिशय आदर करणारी आई आम्हांला लाभली होती. अशी प्रेमळ आई, प्रेमळ मावशी, प्रेमळ आत्या, प्रेमळ बायको आणि प्रेमळ आजी होणे कठीण आहे. आईने केलेले गोड पोहे, कांदेपोहे, रव्याचे लाडू, बेसनलाडू, करंज्या, चकल्या, शंकरपाळ्या अजूनही आठवतात. त्या करतानाच आम्ही जास्त खाल्ल्या असतील. पण तिने त्या आम्हांला खायला दिल्या. कधीही हे खाऊ नकोस म्हणाली नाही. 

          दिवाळीचा ‘ आकाश कंदील ’ बनवणे माझे आवडते काम. मी आणि माझा भाऊ चिव्याच्या काठ्यांचा आकाश कंदील बनवत असू. काहीवेळा तो आम्हांला नीटसा साधत नसे. तेव्हा मोठी ताई, आक्का यांची साथ मिळे. पताकाच्या कागदांना कापून त्याच्या करंज्या बनवून लावणे भारीच असे. आपण स्वतः केलेल्या ‘ कंद्याची ’ मज्जा काही औरच. आता तसे घडत नाही. घडले तरी तो आनंद अगदी तस्साच मिळत नाही. 

          आज ही माझी पहिली दिवाळी असेल, माझी दिवाळी आहे, पण ती बघायला बाबा फोटोत आहेत. ते नाहीत, आई नाही. माझ्या कुटुंबाने केलेली दिवाळी कायम लक्षात राहण्यासारखी असते. त्यात एखाद्या माणसाची उणीव म्हणजे फराळात लाडू नसल्यासारखेच. माणसांनी दिवाळी नक्की करावी, असलेल्या माणसांना सुखी ठेवत, त्यांच्या मनातले दिवे सतत जिव्हाळ्याने पेटते ठेवलात तर ती समाधानाची दिवाळी होईल यात अजिबात शंका नाही. 


लेखन : श्री. प्रवीण अशितोष कुबल ( मुख्याध्यापक, शिडवणे नं. १) 

दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२४ 

वेळ : सायंकाळी ७. १५ वाजता

Saturday, October 26, 2024

🛑 अंधाराच्या बेटावर गेलो तेव्हा .......

🛑 अंधाराच्या बेटावर गेलो तेव्हा ....... 

          एखाद्या खऱ्याखुऱ्या बेटावर जाण्याची वेळ अजूनतरी माझ्यावर आलेली नाही. कदाचित तसा योग पुढे कधी येईल असेही वाटत नाही. तरीही काल एका अंधाराच्या बेटावर जाण्याची संधी ‘ ध्यास परफॉर्मिंग आर्टस् , पुणे ’ यांच्या दोन अंकी नाटकानं दिली. वामन पंडितांच्या Whats App मेसेजमुळेही संधी मिळत असली तरी ‘ निलायम ’ या त्यांच्या वैयक्तिक थिएटर मुळे माझ्यासारख्या नाटकाची आवड असणाऱ्या माणसांना चांगलं बघण्याची सुवर्णसंधी मात्र प्राप्त झाली आहे असे मी म्हटले तरी तेही ‘ सोळा आणे ’ सच आहे. 

          नाटकाचे अप्रूप मला लहानपणापासूनच आहे. ते आजही तसेच आहे. नाटक घरात प्रवेश करताना आज मला एका बेटावर जायला मिळणार ही उत्सुकता होतीच. नाटक सुरु होण्याच्या अर्धा तास अगोदरच मी ‘ निलायम ‘ मध्ये पोहोचलो. काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच नाट्यवेडी माणसं तिथे माझ्याआधीच येऊन बसलेली दिसली. त्यात माझ्याहीपेक्षा वयाने मोठी असलेली माणसंच अधिक प्रमाणात होती. नंतर हळूहळू माणसांची संख्या वाढत गेली. तिकीट काढलं आणि तिकीट काढणाऱ्या काकांशी बोलत बसलो. नाटक घरात लवकर प्रवेश करता यावा ही अधीरता होतीच. सात वाजता नाटकाची वेळ होती. बरोबर सात वाजता नाटकघराचं दार उघडलं. मी एक नंबरवालं तिकीट काढणारा होतो याचा मला आनंद वाटत होता. माझ्यासारखे नाटक बघायला आतुर झालेले नाट्यवेडे दरवाजाकडे गर्दी करु लागले. मीही त्यात मिसळून गेलो. प्रवेश करताना स्वतः कलाकारांनी आमचं स्वागत केलं. त्यांनी आमच्या हाताला ‘ नाटकाचं अत्तर ’ लावलं. हातात एक ‘ हिरवं पान ’ दिलं. ते पान आणि तो अत्तराचा वास घेत मी माझ्या आसनावर जाऊन बसलो. नाटकातील काही कलाकार रंगमंचावर आधीच उपस्थित होते. हसतमुखाने स्वागत करताना स्वतः एक वाद्य वाजवत एक वेगळालं गाणं म्हणत होते. तो रिदम आपलासा वाटत होता. प्रेक्षक बसेपर्यंत कलाकारांचं हे वादन जणू आपल्याला वंदन करत आहे असा भास होत होता. नाटकाचं हे एक भन्नाट नैसर्गिक संगीत रसिकांच्या मनात पुढील नाटक बघण्याचं कुतूहल वाढवणारं होतं. 

          मी माझ्या हाताचा वास घेत असताना मिळालेल्या पानाकडे बघत राहिलो होतो. ते पान म्हणजे रंगमंचावर केलेल्या बेटाच्या नेपथ्याचा एक भाग होतं. बेटावरील अनेक वेलींच्या कुंजातील पाने प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या हातात एकेक दिसत होती. आपणही या बेटावर गेल्याची ही नाटकाची खरी सुरुवात होती. 

          नाटक बरोबर सव्वा सात वाजता सुरु झालं. नाटकातील सर्व कलाकार अप्रतिम अभिनय करत होते. प्रत्येक कलाकार आपला अभिनय नैसर्गिक करत आहेत असं वाटत होतं. उगीच आपले शब्द फेकत राहावेत असं काही घडत नव्हतं. त्यामुळे ते नाटक लवकरच आपलंसं झालं होतं. ज्या लेखकाने नाटक लिहिलं त्यानेच ते परफॉर्म करावं ही नेहमीच अधिक चांगली गोष्ट असते. कारण एक तर ते नाटक म्हणजे त्याचंच अपत्य असतं. त्या अपत्याशी कसं वागावं हे त्याच्याशिवाय अधिक चांगलं कुणालाच कळू शकत नाही. नाटकाचे लेखक , दिग्दर्शक , मुख्य अभिनेते नाटकवेडे ‘ श्रीकांत भिडे ’ यांनी लिहिलेले नाटक अफलातून आहे. एकांकिकेचं एका दिर्घांकात रुपांतर झाल्यानंतर देखील नाटकाला बघताना शेवटपर्यंत कंटाळा येत नाही हे विशेष आहे. कुडाळचे श्रीकांत भिडे खरंच माझ्या मनात भिडले. 

          सुरुवातीपासूनच हे नाटक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतं. कलाकारांनी स्वतः ते नाटक जगले आहेत. सर्व कलाकारांचं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. जी भूमिका मिळाली , त्या भूमिकेचं प्रत्येकानं ‘ सोन्याचं हिरवं पान ’ केलेले होतं , जे आम्ही आमच्या हातात अत्तराच्या वासासहित घरापर्यंत घेऊन आलो होतो. माझ्या घरातल्या सदस्यांनाही मी या नाटकाचं वेगळेपण सांगितल्यावर त्यांनाही आपण नाटकाला न गेल्याचं शल्य जाणवावं इतकं नाटक मनात रुजलं होतं. 

          अर्थात प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. नाटकाबद्दल माहिती असणारे आणि नाटकावर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला अतिशय आवडावं असंच हे नाटक आहे. मी या नाटकाबद्दल सकाळी लवकर उठून लिहितो आहे , असं मला का वाटलं ? यातच त्याचं खरं उत्तर दडलेलं आहे. हा लेख लिहिताना माझ्या हाताला लावलेल्या अत्तराचा मी वास घेतो आहे , तो अजूनही तसाच आहे. दिलेले ते हिरवं पान माझ्यासमोर आहे आणि हसत हसत ते माझ्याकडे बघतं आहे. 

          एका अंधाराच्या बेटात गेलेल्या ‘ राख्या ’ नावाच्या कलाकाराची ही कथा आहे. नाटक तसं म्हटलं तर पैसे देणारं , नाहीतर असलेले पैसे घालवणारं असतं . एखादं नाटक प्रेक्षकांच्या मनात रुजायला वेळ लागतो. हे नाटक नाटकवाल्यांची ‘ व्यथा ’ सांगणारं नाटक आहे. बेटावरील बोचरी थंडी लागते म्हणून केलेली शेकोटी प्रत्येक रसिक प्रेक्षकालाही ऊब देणारी ठरली. शेकोटीत तयार झालेली राख तोंडाला फासून ‘ आपल्या नाटकाच्या आयुष्याचं नाटक ’ दाखवताना श्रीकांत भिडे यांनी केलेला अभिनय टाळ्या द्यायलाही विसरायला लावतो. इथे विनोद नाहीत , पण आपण स्वतः मनातल्या मनात आपल्यावर हसण्यासारखं खूप काही आहे. नाटकाचा शेवट झाला तरी प्रेक्षक टाळ्या द्यायला विसरतात , कारण त्यांना हे नाटक संपूच नये असं वाटत राहतं म्हणून. 

          नाटकाचा सूत्रधार म्हणून डॉक्टरांची भूमिका केलेल्या कलाकाराने केलेला अभिनय , आवाजाची शब्दफेक थेट मेंदूत जाते. राख्याच्या मित्रांनी , मैत्रिणींनी राख्यावर केलेलं प्रेम त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणून गेलं तेव्हा त्या कलाकारांचा त्या नाटकाचा अभ्यास किती सखोल असेल याची कल्पना येते. नाटकाच्या संहितेबद्दल परिपूर्ण लिहिणं चुकीचं आहे , कारण रसिक प्रेक्षकांनी तिकीट काढून हे असलं नाटक थिएटर मध्ये जाऊन बघतानाचा आस्वाद घ्यायला हवा. नेपथ्य , प्रकाश योजना , ध्वनी योजना खरंच भडकावू नाहीत. 

          नाटकात एक दोन प्रणय प्रसंग आहेत. तेही अश्लिल नाहीत , ते श्रुंगारपूर्ण आहेत. नेपथ्याचा केलेला काळजीपूर्वक वापर , ती वस्तू तिथेच चांगली आहे असं वाटावं. राजाच्या मुलीने केलेली वेशभूषा आणि अभिनय अप्रतिम. रात्रीच्या अंधारात कंदिलाचा केलेला वापर ‘ अंधाराचं बेट ’ प्रत्यक्ष समोर ठाकल्यासारखा. या नाटकाविषयी बरंच काही लिहिल्यानंतरही आठवत राहावं असं बरंच काही अजूनही मनात रेंगाळतं आहे. पण नाटक करणाऱ्यानं कधी थांबायचं , हे जसं त्याला कळलं पाहिजे , अगदी तसंच लिहिणाऱ्यानेही कधी थांबावं हे त्याला कळलं पाहिजे. नाटकाबद्दल काहीतरी रिव्ह्यू द्यावा म्हणून हा लेखनप्रपंच नसून , तो लिहिल्याशिवाय राहवलं नाही म्हणून लिहून मी स्वतः समाधानाने मोकळा झालो आहे. 

© प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १ ( मोबाईल : 9881471684 ) 
















Sunday, October 20, 2024

भय इथले संपत नाही

 भय इथले संपत नाही 

        हल्ली मुलींच्या सुरक्षेविषयीचा प्रश्न खूपच ऐरणीवर आला आहे.घरातून मुली बाहेर पडल्यानंतर त्या पुन्हा घरी येईपर्यंत त्यांच्या सुरक्षेविषयी अतिशय काळजी वाटू लागली आहे. पेपर उघडला कि एखादी नव्हे तर मुलींवर होणाऱ्या अनेक अत्याचारांच्या बातम्या वाचून प्रत्येकाचे मन भयग्रस्त होऊ लागले आहे. 

        ज्यांच्या घरात अनेक मुलींचा जन्म झाला असेल , त्यांना तर खूपच काळजी वाटू लागली आहे .  घरात एखादी मुलगी असली तरी तिच्या पालकांना धास्ती वाटते. ही धास्ती वाढत गेली कि मग त्याचे तणावात रुपांतर होत जाते. जगात असे अनेक पालक असतील जे मुलींना घराबाहेर एकटीला पाठवताना दहावेळा तरी विचार करत असतील. 

        प्रसार माध्यमांच्या आकर्षणाच्या जाळ्यात अडकलेल्या ह्या नवीन पिढीतील युवक युवती ज्यावेळी आपलं सर्व जीवनच सोशल करुन टाकतात , तेव्हा त्यांच्या शोषणाला सुरुवात होण्याची जास्त शक्यता असते .  आपलं संपूर्ण जीवन आपण माध्यमांच्या स्वाधीन करुन आपल्या लाईकची वाट पाहत बसतो , तिथेच आपले चुकते. आपणही काहीअंशी समोरच्याला आपल्याशी संवाद साधण्याची संधी देऊन मोकळे होतो. मग संवादांना सुरुवात झाल्यावर मग त्याला एखादा रिप्लाय दिला तरी पुढून लगेचच रिप्लाय वर रिप्लाय येत जातात. या रिप्लायच्या जाळ्यात सापडणाऱ्या मुली त्यांचे भक्ष्य बनण्याची अधिक शक्यता असते. या मिडीयावर आता ओळखीपाळखीशिवायच मैत्री होण्याचे प्रमाण वाढले आहे .  

        ही मैत्री मग भयानक रुप घेऊन पुढे येते. कुठेतरी एकांतात बोलाविले जाते. मुलगी कोणालाही न सांगता तिकडे जाते. तिच्या आयुष्याची वाट लावायला काही नराधम टपून बसलेले असतात. ती जाते आणि त्यांच्या सापळ्यात सापडते. मग ती पुन्हा मागे येऊच शकत नाही अशीही परिस्थिती निर्माण करण्यात येते. तिला ब्लॅकमेलिंग केलं जातं. तिच्याकडून हवी तशी कोणतीही कामे करुन घेण्यात येतात. तिच्या आयुष्याची पुरती धूळधाण उडते. तिला यातून मागे यायचे मनात येते , पण आपण पुन्हा समाजात कोणत्या तोंडाने जाणार अशी भीती वाटून ती होणारा अत्याचार सहन करत राहते. ज्यावेळी या सहनशीलतेचा कळस होतो , तेव्हा आपलं आयुष्य संपवण्याशिवाय तिला कोणताही पर्याय ठेवला जात नाही. ती आत्महत्येचा अघोरी मार्ग निवडते. खरंच , हे सारं वाचताना , लिहिताना जर अंगाचा थरकाप उडवणारं असेल , तर ज्यांच्यावर हे प्रसंग प्रत्यक्ष येत असतील त्यांची काय अवस्था होत असेल , याची फक्त कल्पना केली तरी आपल्या पायाखालची जमीन सरकते. 

        ही अशी एखादी घटना आपल्या घरी घडत नाही , तोपर्यंत आपल्याला त्याचे काहीही गांभीर्य वाटत नाही. आपल्या आप्तजनांच्या बाबतीत घडल्यानंतरच आपल्याला त्याची भयानकता समोर येते. आपल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत म्हणून आपण त्यांना कायमचं घरी डांबून ठेवू शकत नाही ना ? 

        माझ्या लहानपणी मी एक ' मोहरा ' नावाचा हिंदी चित्रपट पाहिला होता. त्यात एका मुलीवर ' पार्टी ' मध्ये अत्याचार करण्यात आलेला होता. तो अत्याचार समजण्याचं माझं त्यावेळी वयही नव्हतं. तरीही मला त्या युवकांचा खूप राग आला होता. माझ्या बहिणीसुद्धा सुरक्षित नाहीत , हे त्यावेळीही माझ्या लक्षात आले होते. मला माझ्या दोन मोठ्या बहिणी व एक लहान बहिण असल्याने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आम्हां भावांवर आहे ही समज मला त्यावेळी अंतर्मनात रुजली होती. त्या जिथे जिथे जात , तिथे तिथे मी स्वतः उपस्थित राहून त्यांच्यावर लक्ष ठेवीत असे. अर्थात त्या काळात मोबाईल , फोन संस्कृती नव्हती. त्यामुळे आज जेवढ्या घटना घडत आहेत , तशा घटना वारंवार घडताना दिसत नव्हत्या.

        आजच्या मुली आणि मुलगे , युवक , युवती , लग्न झालेल्या विवाहिता यांच्यावर अन्याय , अत्याचार होताना पाहून मन विषन्न होते. आकाशवाणीवर माझ्या लग्नापूर्वी मी एक नभोनाट्य ऐकले होते. ' वाटेवरती काचा गं ' असं त्या नाट्याचं शीर्षक होतं. मुलींना नेहमीच अशा काचांनी भरलेल्या वाटेने चालत जावं लागत असेल. बिचाऱ्या कित्येक वर्षं हा अन्याय , अत्याचार सहन करत आल्या आहेत. त्यांना होणारे वाईट स्पर्श , त्यांच्याकडे बघणाऱ्या वखवखलेल्या नजरा कधी कमी होणार हे आम्हांला अजूनही माहिती नाही. सोशल मीडियाची माहिती नसणाऱ्या किंवा ज्यांना अत्याचार म्हणजे काय असतो हेही माहिती नसणाऱ्या निरागस छोट्या मुलींवर असा अन्याय झाल्याचे ऐकतो , वाचतो तेव्हा तर आपल्या तळपायाची आग मस्तकात जाते. 

        हल्लीच एका मराठी चॅनलवर एक अशी धीट युवती दाखवण्यात आली आहे कि ती मुलासारखी वागते. तिच्या वडिलांनी तिला लहानपणापासून मुलासारखी वागणूक दिली , त्यामुळे ती ' दुर्गेसारखी ' अन्यायाविरुद्ध तुटून पडते. अन्याय करणे हा गुन्हा आहे ,  तसंच अन्याय सहन करणे हासुद्धा गुन्हाच आहे. त्यामुळे हल्लीच्या महिला वर्गाने अन्याय सहन करणं सोडून दिलं पाहिजे. अन्यायाचा निकराने प्रतिकार केला पाहिजे. मोबाईलचा वापर करुन पोलिसांना वेळीच कल्पना देऊन कायदेशीर मार्गाने अशा नराधमांना शिक्षा होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. तर आणि तरच इथले भय संपण्याच्या आशेचा किरण दिसेल. 

© प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं . १ 

Wednesday, October 2, 2024

हत्ती घूस रेडा गेंडा

🛑 मनात घुसलेला हत्ती 

          वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान म्हणजे कणकवलीकरांचं नाटकघर म्हणून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही सुप्रसिद्ध आहे असे म्हटले तर वावगं ठरू नये. मी या प्रतिष्ठानची अनेक नाटकं , एकांकिका बघितल्या आहेत. त्यांनी केलेली नाटकं किंवा एकांकिका मनात घर करतात. त्यातील संदेश मनाच्या आतल्या कोपऱ्यात पोहोचतो. 

          ' हत्ती घूस रेडा गेंडा ' हे सुद्धा एक असं आगळं वेगळं नाटक नुकतंच पाहण्याची सुवर्णसंधी लाभली. असं विचार करायला लावणारं दोन अंकी नाटक करण्याचं धाडस जेव्हा वसंतराव प्रतिष्ठान करतं, तेव्हा त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित होत जातो. नाटकाला झालेली गर्दी म्हणजे एखाद्या व्यावसायिक नाटकाला लाजवेल अशीच. खूप कमी प्रवेशमुल्यात असं बोधप्रद नाटक सर्व जिल्हावासियांना पाहायला मिळालं. खूप लांबून लांबून नाट्यरसिक आले होते. देवगड, सावंतवाडी, वैभववाडी, मालवण मधील माझे काही शिक्षक मित्र, नाटक मित्र आलेले पाहून मला माझ्या कणकवलीचा अभिमान वाटला. 

          अर्थात गेले कित्येक वर्षं प्रतिष्ठानची ही नाट्यचळवळ सुरु असलेली मी प्रत्यक्ष पाहतो आहे. माझं बालपण कणकवलीत झाल्यामुळे प्रतिष्ठानचे अनेक कलाकार माझ्या ओळखीचे आहेत. शरद सावंत यांचा अभिनय वाखाणण्यासारखा. सुदिन तांबे यांना परीक्षक म्हणून पाहिलं होतं. त्यांचा अभिनय अफलातून. पुरळकर यांना यु ट्यूबवर पाहिले, त्या दिवशी त्यांचा अभिनय जवळून पाहिला. विकास कदम यांचं ढोल वाजवताना बोलण्याचं टायमिंग लाजबाब. माझे मित्र काणेकरांचे राकेश आणि खटावकरांचे सिद्धेश यांच्या अभिनयाला सलाम करावासा वाटतो. युवा अभिनेत्री व गायिका प्रतिक्षा कोयंडे हिचा आवाज ऐकतच राहावा असाच. अगदी सर्वांच्याच अभिनयाची दाद द्यायला हवी. विंगेतून टिपऱ्या वाजवून संगीत देणारी युवती ( सोनाली कोरगावकर ) पाहिली. अगदी समरसून ती संगीत देण्यात मग्न होती. दिग्दर्शक केतन जाधव यांनी अप्रतिम कलाकृती बसवली आहे याचा प्रत्यय आला. नाटकाची संकल्पना मनात येणं सोपं असतं, ते प्रत्यक्षात राबवताना त्यांना कोणकोणत्या दिव्यातून जावं लागलं असेल याची कल्पनाच केलेली बरी. 

          माझ्या दोन मुली नाटकाला जायचंच असा हट्ट धरुन बसल्या होत्या. तसंही मी त्यांना नेहमीच नाटकांना नेत असतो. पण या नाटकाची जाहिरात पाहिल्यापासूनच ती माझ्यामागे लागली होती. तनिष्का ( 9 वी ) आणि स्वानंदी ( 3 री ) दोन्हीही मुलींनी नाटकाचा शेवटपर्यंत आस्वाद घेतला. त्यांनी सर्वांच्या अभिनयाचे माझ्याकडे कौतुक केले. पुढच्या पिढीकडून कौतुक होणं हे आजच्या तरुण पिढीसाठी खूप मोठी पावती आहे. आजच्या आभासी दुनियेत ' नाटक ' तिकीट काढून पाहणं लोकं टाळू लागले आहेत. कोरोना काळात तर या नाट्यअभिनेत्यांची खूपच आर्थिक गोची झाली असेल. पुन्हा एकदा नव्या दमाने आजच्या युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे असे कलाकार वेगळं समाजमनावर राज्य करु पाहणारं दाखवणार असतील तर ' नाटकांचा उदय ' पुन्हा झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री वाटते. 

          छोट्या स्वानंदीला अगदी जवळून ' हत्ती, घूस, रेडा, गेंडा ' हे सर्व प्राणी पाहायचे होते. आमची तिकीट एक्सच्या म्हणजे शेवटच्या रांगेत होती. तिथून तिला काहीही दिसत नव्हते. ती कुठे अचानक गायब झाली होती. मी शेजारीच बसलेल्या माझ्या शिक्षक मैत्रिणीला ' कल्पना मलये ' हिला विचारलं. मला वाटलं तिच्याकडे बसली असेल. ती तिथेही नव्हती. ती थेट सी रांगेत जाऊन एका रिकाम्या सीटवर बसून अगदी जवळून नाटक बघण्यात दंग होऊन गेली होती. नाटकाच्या पहिल्या अंकाच्या समाप्तीनंतर दहा मिनिटांच्या रिसेसमध्ये मी तिला शोधून काढण्यात यशस्वी ठरलो. 

          नाटकाला माझ्या मुलींच्या वयाची मुलेसुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. सर्वांचे माझ्यासारखेच अनुभव असू शकतील असे नाही. मुलांना नाटकं दाखवली पाहिजेत या मताचा मी आहे. हल्ली मुले मोबाईलवर गेम खेळतात. त्यांचा स्क्रिन टाइम कमी करण्यासाठी ' नाटक ' हे एक उत्तम माध्यम आहे असं मला वाटतं. सर्व पालकांनी आपल्या मुलांना आपल्यासह असंच ' वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली ' यांच्या विविध उपक्रमांना सातत्याने भेट देत राहावी आणि जे  कमी वेळेत जास्त प्रबोधन करणारं असं काहीतरी शिकून शहाणं होऊन जावं. 

          प्रतिष्ठान पुढील काळात अनेक उत्तम प्रयोग घेऊन आपल्यासाठी येत आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मी कायमच ' रंगवाचा ' हे त्यांचे उत्तम त्रैमासिक वाचत असतो. वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या सर्व कलाकारांना, सदस्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १ 

( 9881471684 )



Tuesday, September 10, 2024

🛑 मत्स्यगंधा

🛑 मत्स्यगंधा

          मत्स्यगंधा माझ्या आयुष्यात आली. माझ्या बालपणात या मत्स्यगंधेची आणि माझी भेट झाली. मत्स्यगंधा म्हणजे कोण ? हा प्रश्न वाचकांना पडणार याचे मला भान आहे. तिचा आणि माझा संबंध होता याबद्दलही अनेकांना कुतूहल वाटल्याशिवाय राहणार नाही. 

          काल कितीतरी वर्षांनी मला ही मत्स्यगंधा पुन्हा एकदा भेटली. मला खूप आनंद झाला. सलग पाऊण तासापेक्षा जास्त काळ मी तिच्यासोबत होतो. हे वाचून तर तुमचा गैरसमज अधिकच वाढणार याबद्दल मला खात्रीच झाली आहे. 

          मला लहानपणापासून भजनांची खूप आवड. ही भजने करताना, भजने ऐकताना ही मत्स्यगंधा मला भेटली. ही अदृश्य मत्स्यगंधा मला पुढे दरवर्षी गणेश चतुर्थीला भेटू लागली. गेले काही वर्षे ती मला भेटली नव्हती. काल ती अनेक वर्षांनी पुन्हा भेटली तेव्हाचा आनंद मी शब्दांत व्यक्त करताना कमी पडेन. 

          आमचा नेहमीचा बुवा. हेमंत बुवा लाड याने आमची आणि तिची अनेक वर्षानंतर पुनःश्च भेट घडवून आणली. या अविस्मरणीय भेटीचे श्रेय पूर्णपणे ' हेमंत लाडबुवा ' यांनाच द्यायला हवे. त्यामुळे माझ्या तिच्यासोबतच्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या.

         कोकण दर्शन गजराचे निर्माते कै. परशुराम पांचाळ यांनी माझ्या बालपणात सादर केलेल्या ' मत्स्यगंधा ' भारुडाबद्दल मी बोलतोय. परशुराम पांचाळबुवा माझे आवडते भजनीबुवा. त्यांना मी प्रत्यक्ष ऐकले आहे. त्यांचा ' कोकण दर्शन ' हा गजर माझा सर्वात लाडका गजर. डीएडला असताना ' कोकण दर्शन ' हा गजर मी एकदा किंवा दोनदा तरी परिपाठात सादर केल्याचे आठवते. त्यावेळी कॅसेट्स होत्या. टेपरेकॉर्डर होते. त्यांची ही कॅसेट मी कित्येकदा ऐकली असेन. त्यामध्ये मला ' मत्स्यगंधा ' सापडली. पांचाळबुवांनी रचलेले मत्स्यगंधा भारूड लोकं अजूनही शेवटपर्यंत ऐकतात. त्यांच्या आवाजात ताकद होती. त्यांच्या शब्दांना अर्थ होता. त्यांचा लय, सूर आणि ताल उल्लेखनीय होता. त्यातील कथा सांगण्याची त्यांची पद्धत पुढे पुढे ऐकत राहण्यासारखी असे. त्यामुळे त्यांना पुन्हा ऐकावे असे अजूनही वाटते. कंटाळा येत नाही. आळस तर अजिबातच येत नाही. उलट आळस कुठल्या कुठे पळवून लावण्याची किमया पांचाळबुवांच्या गायनात होती. 

कोळ्याची कन्या मत्स्यगंधा आणि पराशर ऋषी यांच्याबद्दल त्यात अधिक माहिती सांगितली आहे. नव्या आणि जुन्या गीतांच्या चालींचा त्यात सुरेख संगम साधला आहे. म्हणून आपण पण पांचाळबुवांनी सादर केलेल्या रचनांच्या प्रेमात पडतो. 

          मला जात्याच गाण्यांची आवड आहे. त्यात असे पांचाळबुवांसारखे शास्त्रीय गायन करणारे बुवा असले तर माझ्यासारख्या भजनवेड्यांसाठी ती पर्वणीच असते. मी आणि माझा भाऊ दोघांनीही त्यावेळी अनेकदा या मत्स्यगंधा भारुडाचे पारायणच केले होते म्हणानात. 

          हेमंत बुवांनी हे ' मत्स्यगंधा ' भारूड म्हणून पुन्हा आमच्या दोघांच्या लहानपणीच्या आठवणी जागृत करुन आम्हांला जो आनंद दिला आहे त्याची गणना करता येणार नाही. अशी ही ' मत्स्यगंधा ' पुनःश्च मला भेटली होती. ती पुन्हा जेव्हा कधी भेटेल तेव्हा कदाचित एखादे वर्ष झालेले असेल. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

मुख्याध्यापक शिडवणे नं. १

🛑 शाळा करा रे प्रसन्न

🛑 शाळा करा रे प्रसन्न

          शाळा हे प्रत्येकाच्या जीवनात अनेक वर्षांसाठी आलेलं विद्येचे घर आहे. या शाळेला अनेकांनी जवळ केलं, ज्यांनी जवळ केलं ते शिकले. ज्यांना शाळेची भिती वाटली, त्यांनी शिकायचा कंटाळा केला, अर्थात शिक्षणच त्यांच्यापासून दूर गेलं. 

          पूर्वीच्या शाळा आणि आताची शाळा यात जमीन अस्मानाचा फरक पडला आहे. पूर्वीच्या शाळा मुलांनी भरभरून वाहणाऱ्या असत. गावाकडच्या आमच्या शाळांत मुलांना बसायला जागा नसे. शिक्षकांची संख्या भरपूर असे. एकूणच शाळेत जायला शिक्षकांची आपुलकी कारणीभूत असे. मारकुटे शिक्षक असले तर त्यांच्याबद्दल आधीच गावभर समजे. त्यामुळे मुले भीतीनेच शाळेची पायरी चढत नसत. आता मात्र मारकुटे गुरुजी राहिलेले नाहीत. असले तरी त्यांना मुलांना मारण्याची परवानगी शासनाने अजिबातच दिलेली नाही. त्यामुळे मुलांना मारणाऱ्या शाळा आज असू नयेत असे शासन वारंवार सांगते. अर्थात मुलांना न मारता अध्यापन करुन त्यांचे अध्ययन घडवणे तारेवरची कसरतच आहे. 

          आज सर्व शाळा प्रसन्न आहेत. शाळेत मुलांची संख्या कमी आहे. प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक शिकवता येण्यासारखी परिस्थिती आहे. शाळेत सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. शाळेतील शिक्षक पदव्युत्तर पर्यंत शिकलेले आहेत. ते स्वतः तंत्रस्नेही आहेत. मुलांना तंत्रस्नेही बनवत आहेत. 

          वर्गखोल्या मुलांशी बोलत आहेत. शिक्षक विविध उपक्रम राबवत आहेत. दप्तराविना शाळा, आनंददायी शनिवार असे उपक्रम मुलांसाठी उपयुक्त ठरत आहेत. मुले प्रसन्न होत आहेत. मुले प्रसन्न होण्यासाठी शिक्षक आपल्या जीवाचे रान करत आहेत. प्रसन्न शिक्षक असल्यामुळे मुले प्रसन्न होत आहेत. मुले आणि शिक्षक हेच शाळेचे प्राण आहेत. तेच शाळेत नसतील तर शाळा प्रसन्न आहे असे कसे म्हणता येईल ? कमी पटसंख्या असली तरी त्यांना शिकविण्यासाठी तेवढीच शैक्षणिक कामे करावी लागतात. सुट्टीच्या काळात शाळांच्या इमारती पाहाव्यात, मुले नसल्याने त्या गप्प गप्प असतात. या शाळांचा प्राण असणारी मुले आणि त्यांना हासून हसवून खेळून शिकवणारे शिक्षक नसतील तर नेहमीच प्रसन्न असणाऱ्या शाळा अप्रसन्न दिसल्याशिवाय राहणार नाहीत.

          शाळा, मुले, पालक, ग्रामस्थ, देणगीदार, अधिकारी, शासन आणि शाळेशी संबंधित यंत्रणा जेव्हा मुलांच्या गुणवत्तेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी निष्ठेने कार्य करत असतात, तेव्हा तिथल्या शाळा सदासर्वकाळ प्रसन्न राहतील यात कोणतीही शंका वाटत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

मुख्याध्यापक शिडवणे नं. १

Sunday, September 8, 2024

🛑 पाहिला गजानन

🛑 पाहिला गजानन

         आपला गणपती पाहिला कि आपलं मन भरुन येतं. गणपती चित्रशाळेत ऑर्डर दिल्यापासून आपलं गणपतीवर लक्ष असतं. आपला गजानन सुस्वरूप दिसावा ही आपल्या घरातील सर्वांचीच तीव्र इच्छा असते. 

          चित्रशाळेत सर्वांचे गणपती असतात. पण आपला गणेश सर्वांचे लक्ष वेधून घेणारा असायला हवा असं प्रत्येकाला वाटतं. आपला गणपती आपल्याला खूप खूप आवडतो. अर्थात सर्वांचेच गणपती सुंदरच असतात, पण आपला गणपती आपल्या मनात भरलेला असतो. 

          माझे बाबा गणपती सुंदर बनवत. असे हे सुंदर गणपती पाहण्यासाठी दररोज आमच्या चित्रशाळेत झालेली गर्दी मी प्रत्यक्ष पाहिली आहे. सुबक गणपती होईपर्यंत बाबा गणपती बाजूला करत नसत. बाबांच्या समोर प्रत्येक गणपती येणारच असे. तो अधिक सुंदर होऊन जाताना बाबांनी त्यात आपला जीव ओतलेला असे. त्यांचे निरीक्षण अफलातून होते. एकही चूक कधीही त्यांच्या नजरेतून सुटत नसे. त्यामुळे गणपती घेऊन जाणारे लोक खुश होऊन जात. पाच पन्नास रुपये जास्त देऊ शकणाऱ्यांपेक्षा खुश होऊन जाणारे लोक बाबांना आणि आम्हांलाही जास्त आवडत. 

          बाबांची गणपतीची शाळा पुढे चालू राहावी ही सर्वांचीच इच्छा आहे. बाबा गेल्यानंतर चित्रशाळेतील त्यांची उणीव कधीही भरुन न येणारी. त्यांची जागा काका, बाला आणि भाऊ यांनी घेतली आहे. हे तिघेही दिलेली जबाबदारी अधिक गंभीरपणे पेलत आहेत ही विशेष नमूद करण्यासाठी गोष्ट आहे. मी त्यांच्यात कोणत्याही प्रकारे इंटरफियर करीत नाही. 

          गणेश चतुर्थीचा दिवस आमच्यासाठी ' गाजावाजा ' असणारा दिवस असतो. गणपती न्यायला येणारे लोक आपल्या सोबत संपूर्ण कुटुंबाला घेऊन येत असतात. गणपती वाहून नेण्यासाठी ते गाड्या घेऊन येतात. काही वेळा वाजंत्री मंडळेही घेऊन येतात. अशी मज्जा असणारा हा दिवस पुन्हा येण्यासाठी एक वर्षभर वाट पाहावी लागते. आम्ही गणपतीच्या शाळेचे मालक आहोत हा आमचा अभिमान असतो. हा अभिमान आमच्या कुटुंबातील महिलांना सुद्धा द्यायला हवा. आमच्या घरातील माझ्या बहिणी गायत्री, तृप्ती यांनी गणपतींना अधिक उत्तम दिसण्यासाठी केलेले सजावट काम बघत राहावे असेच असते. 

          गणपतींच्या यादीत आमच्या गणपतीचे नाव ' घरचा गणपती ' असे लिहिलेले असते. सगळ्यांचे गणपती घरपोच गेले कि आमच्या घरच्या गणपतीचे आगमन होण्याची वेळ येते. घरातील मुले माणसे यासाठी आतुर झालेली असतात. शेवटी गणरायाचे आगमन होते. सुस्वरूप तेजस्वी दृष्टीने आमच्याकडे पाहणारा आमचा गणराय आमच्याकडे पाहू लागतो. त्याने प्रत्येकाकडे पाहत राहावे असे आमच्या सतत मनात असते. आम्ही समोर जिथे उभे राहू, तिथून तो आमच्याकडेच बघतोय असा आमचा गणपती असतो. 

          आरती सुरु झाली. आरती म्हणजे बाबांचा आवडता विषय. दुपारी आणि रात्री जोशात आरती झालेली बाबांना हवी असे. आज बाबा नाहीत म्हणून मला आरती घ्यावी लागली. आरती घेण्याचा बाबांचा पहिला मान. यंदा ही पहिली चतुर्थी असेल ज्या दिवशी बाबा नाहीत. बाबा आरतीत दंग होऊन जात. आरतीचे स्वर बाबांनी ऐकले आणि बाबा पहिल्या आरतीला आले. आले म्हणजे माझ्या वहिणीच्या अंगात आले. माझ्या हातातील आरती गरम झाली होती, चटके बसू लागले होते. तरीही मला तशीच गरम आरती त्यांच्या हातात द्यावी लागली. बाबांनी थरथरत्या हातांनी आपल्या गणपतीला ' आरती ' ओवाळली आणि आपला सुंदर गजानन पाहिला. आम्ही आमचा गजानन पाहिलाच, पण बाबांनीही तो पाहिला याचा आनंद सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणून गेला. 

 ©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शिडवणे नं. १

🛑 तू बुद्धी दे या बालका

🛑 तू बुद्धी दे या बालका

          चतुर्थीला शाळेला सुट्टी असते. गणपतीच्या येण्याची सर्वांना आतुरता असते. शाळेतील मुलांना तर ती खूपच असते. ती तर गणपती सुट्टीची वाटच बघत असतात. सुट्टी पडते एकदाची. मुलांचा आनंद गगनात मावेनासा झालेला त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. हा मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तर गणेशाचे आगमन झालेले असते. 

          शाळेत शिक्षकांनी अभ्यास दिलेला असतो. मुलांना अभ्यास हवा सुद्धा असतो आणि नको सुद्धा असतो. शाळेत असताना अभ्यास हवा असतो , पण एकदा घरी गणपती आला की या दिलेल्या अभ्यासाचे त्यांना ओझे वाटू लागते. हल्ली दप्तराचे ओझे होते म्हणून तोलून मापून भरलेले दप्तर शाळेत आणावे लागते. ते ओझेच नको म्हणून दहा दिवस शनिवारी ' दप्तराविना ' शाळा उपक्रम सुरु केला आहे. मुलांना ' आनंददायी शनिवार ' च्या रुपाने अधिक ज्ञान मिळवण्याची संधी मिळालेली आहे. मुलांनी या संधीचे सोने करायला हवे. 

          काही शाळांमध्ये दर व्हेकेशनला प्रिंटिंग अभ्यास दिलेला असतो. मुलांनी घरी काहीतरी वाचन करावे, लेखन करावे, उदाहरणे सोडवावीत अशी माफक अपेक्षा असते. या सरावामुळे मुले नियमित वाचत लिहत रहावीत हा उद्देश असतो. हा उद्देश काही मुले संपूर्णपणे अभ्यास करुन पूर्ण करतात. काही मुले त्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. त्यांना या उपक्रमशील अभ्यासाचे ओझे वाटते. 

          गणपती ही बुद्धीची देवता आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना गणपतीची आराधना केली जाते. या गणनायकाची मुले जितकी भक्ती करतील तितकी अभ्यासावरची त्यांची पकड घट्ट होत जायला हवी आहे. केवळ भक्ती करुन उपयोगाची नाही. शाळेत दिलेला अभ्यास करणारी मुले गणपतीला जास्त आवडतील. पाठांतर तर आजकाल लुप्त होत चालले आहे. मुलांनी विविध गोष्टी, कथा, कविता, गाणी पाठ कराव्यात. आरत्या पाठ करुन न बघता म्हणाव्यात. या पाठांतराचा उपयोग पुढे भाषण करताना नक्की होणार आहे. निबंध लिहिताना , स्वतःचे मनोगत व्यक्त करताना नक्की होणार आहे. 

          मुलांनो, म्हणूनच मी तुम्हाला प्रेमाची विनंती करतो की कोणत्याही सुट्टीत दिलेला अभ्यास हा सरावासाठी दिलेला असतो. तो केल्याने तुम्ही अभ्यासाच्या प्रक्रियेत राहता. तुम्ही शाळेत नुकताच शिकलेला अभ्यास अधिक लक्षात ठेवू शकता. तुमची स्मरणशक्ती वाढते. तुमचे सर्व पाढे पाठ असतात, त्यामुळे गुणाकार, भागाकार या मूलभूत क्रिया करताना तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही. 

          माझ्या लाडक्या मुलांनो, सुट्टी ही तुमच्यासाठी मौजेची असली तरी तिचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी नक्की करा. वाईट गोष्टी सतत खुणावत राहतात. त्या तुम्हाला कराव्याशा वाटतात, पण त्यांना तुम्ही बाय बाय म्हणा. चांगल्या गोष्टी शिका, नवीन गोष्टी आत्मसात करा. हे गणपतीदेवा, माझ्या मुलांना चांगली बुद्धी दे अशी मी तुझ्याकडे प्रेमळ मागणी करीत आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

 मुख्याध्यापक , शाळा शिडवणे नं.१

Wednesday, September 4, 2024

🛑 बाबांविण नाही दुजा आधार

 🛑 बाबांविण नाही दुजा आधार 

          बाबा मला नेहमीच गुरुच्या जागी आहेत. मी आयुष्यात अनेक गुरूंचे मार्गदर्शन घेतले आहे. त्या सर्वांचे शिक्षक दिनादिवशी ऋण व्यक्त करतो. बाबा माझे पहिले शिक्षक होते. त्यांच्याशिवाय मी अधुरा आहे. ते गेले आणि माझा भक्कम आधारच गेला. शरीरातील स्फूल्लिंगाइतके तरतरी पेरणारे माझे बाबा मला अधिक जवळचे होते. 

          ते गेल्यानंतर मी सगळ्या गोष्टी नियमित करतो आहे. पण त्यांची उणीव भरुन येत नाहीच. ते नाहीत म्हणजे काहीच नाही. ते आहेत म्हणजे सर्वकाही आहे. त्यांच्या सगळ्या गोष्टी मला आज आता अगदी जशाच्या तशा आठवत आहेत. मी त्या विसरता येणे अजिबात शक्यच नाही. 

          दोन दिवसांवर गणपती येत आहे. आज माझे बाबा असते तर गणपतीच्या आगमनाची त्यांनी जय्यत तयारी केली असती. मी सुद्धा करणार पण त्यांची सर मला अजिबातच येणार नाही. त्यांचा गणपतीवर भारीच जीव होता. त्यांच्या हातात गणपतीची माती जिवंत होत असे. त्यांनी माती वळवली ती त्यांना हवी तशी वळत असे. 

          बाबांनी आमच्या देहाच्या मातीला असेच वळवले. त्यांना हवे तसे वळवले आणि सुंदर संस्कारीत बनवले. त्यांनी केलेले संस्कार आजच्या पिढीसाठी आदर्श आहेत. ते शिक्षक नव्हते, पण शिक्षकांपेक्षा वरचढ होते. त्यांनी आमच्यापेक्षा जास्त पुस्तके आणि जास्त माणसे वाचली होती. त्यांच्या ज्ञानाची भूक कधीही न संपणारी होती. 

         त्यांनी सांगितलेल्या गोष्टी केल्या तर यश नक्की मिळे. नाही केल्या तर यशापर्यंत पोहोचताना त्यांच्या शब्दांची आठवण येत राही. आता बाबा नसले तरी ते सतत माझ्यासोबतच आहेत असा मला अनुभव येतो आहे. कोणतीही गोष्ट करताना बाबांना विचारून करण्याची माझी सवय होती. आता सुद्धा मी त्यांच्याशी हृदय संवाद साधू शकतो. ते अदृश्य रुपाने आमच्यात वास करतात. ते घरातील प्रत्येक गोष्टीत लपलेले दिसतात. त्यांची नजर कायमच आमच्यावर भिरभिरते आहे. माझ्यावर जरा जास्तच. का कोण जाणे, पण त्यांनी मला झिला म्हणावे असे मला सतत वाटत राही. त्यांची ती गोड हाक आज ऐकू येत नाही आणि मी कमालीचा कावराबावरा होतो. 

          त्यांचे अदृश्य अस्तित्व माझे चैतन्य बनले आहे. त्यांचा हा अदृश्य सहवास मला लाभतो आहे हे माझे भाग्यच. मी त्यांना कदापि विसरूच शकणार नाही. 

          माझी पत्नी गेल्यानंतर सुद्धा मी असाच झालो होतो. तिच्या आठवांनी मी सतत डोळ्यात पाणी आणत असे. ती गेल्याचे दुःख प्रचंड होते. ती गेल्यावर मी दुसऱ्या पत्नीमध्ये तिचे रुप पाहिले. त्यामुळे ती अजूनही माझ्याजवळच आहे असे मी स्वतःला समजावून समजावून आता ती तीच आली आहे या निर्णयापर्यंत आलो आहे. आपले जीवन पुनःश्च होते तसेच जगायचे असेल तर मी बाळगलेला दृष्टिकोन मला बरोबर वाटतो.

          बायकोची रिप्लेसमेंट करता आली हे चांगलेच झाले. पण बाबांची जागा भरुन कशी काढणार ? ते कुडीने माझ्यासोबत नाहीत, ते पवित्र आत्म्याच्या रूपाने सतत माझ्या पाठीशी आहेत हा दृष्टिकोन मला नियमित जागृत ठेवावा लागण्याशिवाय गत्यंतर नाही.

          काल रात्री झोपताना बाबांच्या आठवणी सांगत असताना माझी छोटी मुलगी उर्मी मला म्हणाली, " पप्पा, आता अजून बाबांना आठवू नका, मला रडू येते आहे. " तिच्या त्या शब्दांनी आमच्या सर्वांच्याच डोळ्यातून घळाघळा पाणी ओघळू लागले होते. 

©️ प्रवीण अशितोष कुबल 

मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १



Friday, August 16, 2024

🛑 शंभर नंबरी शुद्ध सज्जन

🛑 शंभर नंबरी शुद्ध सज्जन

          जो स्वतः चांगलं वागतो आणि दुसऱ्यांशी चांगलं वागतो तो खरा सज्जन. सज्जन माणसाला अशा अनेक व्याख्या जोडता येतील. ज्याच्या मनात दुसऱ्यांबद्दल अपार प्रेम भरलेले असते तो स्वतःवरही तितकाच प्रेम करत असला पाहिजे. अशी सज्जन माणसं आपल्याला भेटतात तेव्हा ती पुन्हापुन्हा भेटत राहावीत असे वाटत राहते. 

         सज्जन बनणं हे सर्वस्वी आपल्याच हातात असतं. सज्जनपणाचं नाटक अजिबात करायचं नसतं. ते करु लागलात तर ते कळायला वेळ लागत नाही. कधीही सज्जनपणाचा आव आणू नये. सज्जनपणाचा अभिनय करणाऱ्या माणसांचे बुरखे फाडले जातात तेव्हा खऱ्या सज्जनांवर अविश्वास दाखवले जातात. म्हणून आपल्याला सज्जन बनायचे नसेल तर बनू नका, पण खोटे सज्जन अजिबात बनू नका. 

         टीव्ही मालिकांमधील अशी माणसं पाहिली की त्यांच्या वागण्याची आपल्यालाही सवय होईल की काय अशी भिती वाटते. एकाच घरातील दोन सख्खी भावंडे सज्जन आणि दुर्जन दाखवली जातात तेव्हा आश्चर्य वाटते. एकाच सुसंस्कारातून जाणारी काही मुले  कुविचार कशी करु शकतात ? याचे नवल वाटते. 

         माझ्या घरातील माणसे ' शंभर नंबरी शुद्ध सज्जन ' बनायला माझ्या बाबांचे संस्कार कामी आले आहेत. माझे बाबा खऱ्या अर्थाने शंभर नंबरी सोनं होते. ते सज्जन होते आणि शुद्ध आचरण करणारे होते. त्यांच्याकडे बघत बघत आम्हीही त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यासारखे बनणं खूपच कठीण गोष्ट आहे. त्यांच्या जीवनाचा अखंड प्रवास खूपच गुंतागुंतीचा होता. अनेक अवघड अडचणींनी कायमच भरलेला होता. कितीही संकटे आली तरी त्यावर पाय ठेवून पुढे जाणारे माझे बाबा पाहिले कि आमच्या जिद्दीची दोरी बळकट का झाली मूळ कारण समजते.

         बाबा देवाघरी जाण्यापूर्वी सुद्धा बाबांची चौकशी करत राहणारे लोक आजही बाबांच्या जाण्यामुळं हळहळताना दिसतात तेव्हा बाबांच्या मोठेपणाचा नित्यनियमित अभिमान वाटत राहतो. बाबा गेल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक शोकाकुल व्यक्तीकडे बघून बाबांच्या गोष्टी सांगताना मी त्यांच्या डोळ्यातले पाणी बघितले आहे. सज्जन बाबांच्या सज्जन स्नेही मंडळींना माझा मानाचा मुजरा. त्यांच्या जाण्याने उणीवेचा मोठा खोल खड्डा पडला आहे. तो भरुन काढण्याचा प्रयत्न आम्ही भावंडे नक्कीच करणार आहोत. 

©️ मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १

Thursday, August 8, 2024

🛑 हेमलो

🛑 हेमलो

         नाव वाचल्यानंतर आश्चर्यचकीत झाला असाल ना? हे नाव मराठीतील आहे. मालवणीत ' हेमंत ' नावाची माझ्या बाबांनी मारलेली प्रेमाची हाक आहे ती. 

         हेमंत म्हणजे आमच्या किर्लोस आंबवणेवाडी मधला खालच्या लाडवाडीतील हेमंत लाड. साधा, सरळ आणि शास्त्रीय भजन, गायनाची आवड जोपासणारा आजच्या काळातील तरुण बुवा. 

         त्याची आणि माझी ओळख खूप वर्षांपूर्वीची आहे. तो आमच्या कुटुंबाचा नेहमीच आदर करत आला आहे. माझ्या बाबांचे आणि त्याचे चांगलेच जमे. ते त्याला प्रेमाने काही गोष्टी ऐकवत. तो त्या मंत्रमुग्ध होऊन ऐकायचा. त्याचे भजन आम्हांला आवडते. 

         कै. परशुराम पांचाळबुवांचा तो फॅन आहे. राजापूरच्या संतोष शिर्सेकरबुवांचा तो पट्टशिष्य आहे. तो त्याच्या गायन आणि संवादिनी वादन कलेत पारंगत आहे. तो या कलांची आराधना करताना स्वतःचे भान हरपून जातो. त्याचे गायन लांब राहून ऐकलात तर कै. परशुराम पांचाळबुवाच गात आहेत असा भास होतो. 

         सुरुवातीच्या काळात तो शिकत असताना घाबरत असे. हे घाबरणे म्हणजे त्याचे लाजणे होते. त्याने आतापर्यंत अनेक संगीत बाऱ्या केल्या आहेत. त्याला साथ देणारे कोरस तरुण अतिशय मनापासून गाताना पाहून मला माझे बालपण आठवते. मी मला त्यांच्यात पाहतो. कारण मीसुद्धा हेमंत सारखाच भजनवेडाच आहे. त्याचं गायन माझ्या मनाचा ठाव घेतं. त्यामुळे माझा त्याच्याबद्दलचा आदर अधिकाधिक वाढतच जातो. 

         त्याचे वडिलही बुवा आहेत. त्यांचं गायनदेखील मला आवडते. नव्या दमाचा, नव्या युगाचा गायक म्हणून ' हेमंत लाडबुवा ' आमच्या पिढीचं नेतृत्व करतो तेव्हा माझी छाती आनंदाने फुलून येते. मला त्याचा सार्थ अभिमान वाटतो. मला माझ्या भजनमंडळींचा आदर वाटतो. आमच्याकडे त्यांनी केलेल्या भजनांच्या व्हिडीओज आहेत. आठवण आली कि आम्ही त्या बघत बसतो. 

         गणेश चतुर्थीला आमच्या हेमंतला खूप मागणी असते. तो शक्यतो कोणाला नाही म्हणत नाही. पण तो एकटा कोणाकोणाला पुरणार. तरीही तो कोणाला नाराज करत नाही. जमतील तेवढी भजने करत राहतो. जुन्या कलाकार मंडळींचा तो आदर करतो. नुकताच त्याने मला आमच्या जुन्या तमाशा मंडळाचा फोटो पाठवला. त्यात माझे बाबा आणि काका आहेत. त्यावेळचे धुरंधर कलाकार. अजूनही त्यातील काही कलाकार आपली कला जोपासत आहेत. काही आज हयात नाहीत. त्यांच्या आठवणी मात्र हेमंतच्या मनात हयात आहेत. त्याने त्यांचा तो दुर्मिळ फोटो पाठवला, त्यावेळी ' जुना सोना ' असे कॅप्शन लिहून पाठवले. खरंच तो फोटो पाहून माझ्याही अंगावर सरकन काटा उभा राहिला. असं २४ कॅरेटचे सोने आता मिळणे खूप कठीण आहे. 

         मला वाटते हेमंत लाड म्हणजे आजच्या युगातील भजनी बुवांच्या भाषेत बोलायचे तर शंभर नंबरी सोने आहे. त्यामळे ते जिथे जिथे जाईल तिथे तिथे चमकल्याशिवाय राहणार नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १

Tuesday, August 6, 2024

🛑 बाराव्याला बाबा आले

🛑 बाराव्याला बाबा आले

          बाबांचा बारावा दिवस. सकाळपासून माणसांची गर्दी व्हायला सुरु झाली होती. बाबांसाठी हाक मारायला येणाऱ्या हजारो माणसांना शोकाकुल होताना पाहून बाबांचा मोठेपणा अधिक ठळकपणे दिसू लागला होता. मी त्यांच्यासमोर काहीच नाही. ते नेहमीच म्हणत, " मी जे नखाने करीन, ते तुम्हाला कुऱ्हाडीने जमणार नाही. " बाबांचे हे वाक्य अगदी खरे आहे. त्यांनी केलेल्या गोष्टी मला करता येणार नाहीत. त्यांच्या सानिध्यात इतकी वर्षे राहूनसुद्धा मला त्यांच्या नखाचीही सर येणार नाही इतके ते मोठे होते. 

         दहाव्या दिवशी बाबांच्या पिंडाला काकस्पर्श झाला नाही म्हणून बाबा माझ्यावर नाराज असतील असे मला वाटणे साहजिकच होते. माझे प्रेम खरे असेल तर बाबा माझ्यावर नाराज होऊच शकत नाहीत असा भाबडा विश्वास मी नेहमीच बाळगत आलो आहे. 

         त्यांच्याशी माझे मित्रत्वाचे नाते होते. बाबा रागावले तरी त्यांचा तो राग तात्पुरता असे. माझ्या प्रेमाने ते पुनःश्च मेणासारखे विरघळून जात.  मी अगदी त्यांच्यासारखाच झेरॉक्स कॉपी आहे. माझाही राग असाच विरघळून जात असतो. त्यांच्याकडूनच वारसा मिळालाय. प्रेमाने राग जिंकता येतो. 

         दिवसभर बाराव्या दिवसाचे विविध धार्मिक विधी संपन्न होत असताना दुपारनंतर ' सुत '  घालण्याचा विधी सुरु झाला. हा विधी बघवत नाही. तो करत असताना मी डोळे बंद करुन बाबांची आराधना करत होतो. परंपरेने चालत आलेल्या या विविध प्रथा करताना त्या बाबांसाठी करतो आहोत याची जाणीव होती. त्यामुळे बाबांसाठी काहीही करण्याची तयारी असणारा मी निमूटपणे सर्वकाही करत राहत होतो.

         ज्येष्ठ व्यक्तींनी मार्गदर्शन करायला सुरुवात केली होती. माझे लक्ष त्यांच्या शब्दांकडे होते. ते शब्द बाबांचेच आहेत असे मला वाटत होते. मला आलेल्या सर्वांचे हृदय आभार मानावेसे वाटले. मी स्वतःहून उभा राहून बोलू लागलो. मला सर्वांचे आभार मानायचे होते. मी सर्वांच्या ऋणात राहण्याचे ठरवले असल्याचे सांगितले. घरच्यांनी गेले काही दिवस माझ्यासोबत जो प्रेमळ व्यवहार केला होता त्यामुळे मी भावनाप्रधान झालो होतो. माझ्या अश्रुंचा बांध फुटू लागला होता. मी रडताना मलाच मी आवडत नव्हतो. पण रडू काहीकेल्या थांबवता येत नव्हते. मी माझ्या चुका मान्य करुन टाकल्या होत्या. बाबा मला जाताना काहीही सांगून गेले नव्हते. बाबा गेल्याचे दुःख सर्वांनाच झाले होते, पण मला झालेले दुःख मला क्षणाक्षणाला बाबांची माफी मागत राहायला लावणारे होते. बाबा नेहमीच क्षमाशील होते. ते मला क्षमा करणार ही काळ्या दगडावरची रेघ. पण तरीही मनातील भिती डोके वर काढत होती. जाता जाता त्यांनी मला काहीतरी सांगावे असे मला वाटत होते, जे त्यांच्या अचानक जाण्याने राहून गेले होते. 

         त्यांनी आमच्या संगोपनात कोणतीही कसूर सोडली नसताना आम्ही त्यांच्या सेवेत काहीतरी दिरंगाई केली की काय ? अशा प्रश्नांनी माझा मीच व्याकुळ होत होतो. 

        रात्री भजन सुरु झाले. भैरवीचे आर्त सूर आणि टाळांचा आवाज टिपेला पोचत असतानाच आमचे बाबा तेजस्विनीच्या ( वहिणी ) अंगात संचारू लागले होते. ते बाबाच आहेत का याची खात्री करण्यासाठी माझ्या बालाकाकांनी नेहमीप्रमाणे तीन फुले ठेवून त्यातले एक उचलण्याची विनंती केली. काकांच्या मनातील चाफ्याचे फुल त्यांनी न ओळखता पिवळे झेंडूचे फुल त्यांनी निवडले. मी मात्र पिवळे फुलच मनात धरले होते. ते बाबाच आहेत याची मला अगदी खात्री झाली होती. 

         तरीही मी धुपारतीचे भांडे घेऊनच होतो. त्यांनी मला स्वतःहून हाक मारावी अशी माझी इच्छा होती. माझी इच्छा त्यांना कशी समजली तेच जाणो. त्यांनी काहीवेळातच पहिली मलाच हाक मारली. मी आणि सगळेच अवाक झाले. मी धावतच त्यांच्यापाशी गेलो. त्यांनी मला गोंजारले. मी त्यांच्यापाशी काही दिवस सतत बसून होतो. माझी अपेक्षा त्यांनी पूर्ण केली होती. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मी आणि माझा भाऊ पेलू शकतो हे त्यांना जिवंतपणीच माहिती होते. तरीही त्यांनी दिलेली ही धुरा मी समर्थपणे सांभाळण्यासाठी त्यांचा भक्कम आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असणार याबाबत मी निशंक झालो आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १










Sunday, August 4, 2024

🛑 दूर देशी गेले बाबा

🛑 दूर देशी गेले बाबा

         सलील कुलकर्णी यांच्या अल्बम मधील ' दूर देशी गेला बाबा ' हे गाणे मला खूप आवडत असे. बाबा सोबत असताना हे गाणं ऐकताना त्यातल्या शब्दांकडे कमी लक्ष जाई. सलीलच्या आवाजातील आर्तता मला नेहमीच आवडते. पण आता बाबा नसताना हे गाणं ऐकणं मला तरी कठीण जाईल. 

         लहानपणापासून ज्या बाबांचे बोट पकडून कायमच सगळीकडे जाणारा मी आता या बोटाला पारखा झालो आहे. बाबांचे बोट पकडण्यात एक वेगळ्या प्रकारची आश्वासकता होती. कितीही मोठा झालो तरी बऱ्याच गोष्टी बाबांना विचारल्याशिवाय मी केल्या नाहीत. त्यांचा आदेश शिरसावंद्य मानूनच पुढे जाणे सावधगिरीचे असे याचा मी अनेकदा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. 

         त्यांची आणि माझी सोबत कधीही न संपणारी असेल असे मला वाटले होते. बाबा गेले आणि माझ्यातून एक अदृश्य चैतन्यशक्ती वेगळी होत असल्याची थरथर जाणवते आहे. बाबा म्हणजे काय अदभूत रसायन असतं ना ? 

         आज आई आणि बाबा दोघेही नाहीत. त्यांच्यासोबतच्या अनेक उत्तम आठवणी माझ्याभोवती नुसत्या रुंजी घालत आहेत. त्यातल्या अनेक माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. त्या जपून ठेवणे माझे कर्तव्य आहे. माझे बाबा माझ्यासोबत सतत सोबत्यासारखे पाठीशी राहिलेले आहेत. त्यांच्या केवळ असण्याने माझी अवघड कामेसुद्धा चुटकीसरशी मार्गी लागत असत. आता मात्र मला त्यांची तीव्र उणीव भासत राहणार आहे. 

         त्यांच्यासाठी काही दिवसांपूर्वीच नवा बेड घेतला होता. तो बघून त्यांना किती आनंद झाला होता. त्यावर बसून त्यांचे टीव्ही पाहणे, मोबाईल बघणे, पेपर वाचणे अशी दैनंदिन कार्यें पार पडत. आता तो बेड सुना सुना बघवणार नाही. त्यांनी वापरलेल्या सर्व वस्तूंमध्ये मला ते दिसत राहतील. पहिल्यांदा मला त्याचा त्रास होईल, पण मग त्यांच्या आठवणीच्या कोषात मी रमून जाईनही. हे माझे आताचे दिवास्वप्न आहे. 

         काल बाबा गेल्यानंतरचा दहावा दिवस होता. आम्ही नदीशेजारी स्मशानभूमीत धार्मिक विधीसाठी गेलो होतो. एकही कावळा कुठेही दिसत नव्हता. पिंडाला कावळा स्पर्श करायला येईल अशी सर्वांची इच्छा होती. मी पिंड हातात घेऊन इकडे तिकडे फिरत बाबांना हाका मारत होतो. काव काव, बाबा या हो..... पिंडाला स्पर्श करा ना..... मला एका क्षणाला मोठ्याने हंबरडा फोडावा असे वाटले होते. पण मी स्वतःला सावरलं. माझे बाबा माझे नक्कीच ऐकणारे होते. त्यांनी काकरूपाने येऊन माझ्या हातातील पिंडाला स्पर्श करावा असे वाटत असले तरी मला मुळीच वाईट वाटलेले नाही. त्यांचे माझ्यावर अपार प्रेम होते. त्यांचे पुत्रप्रेम असेच अबाधित राहणार आहे याबद्दल शंका बाळगण्याचे कारणच उरत नाही. 

         कारण स्वतः बाबांनी मला सांगितले होते. ते असेच कधीतरी वाढी ठेवत होते. लहानगा मी त्यांच्या सोबतच असे. ते ' आ आ ' करत होते. एकही कावळा वाढीला स्पर्श करायला आला नव्हता. मी न राहवून बाबांना विचारले होते, " बाबा, आज कावळा का आला नाही? " तेव्हा बाबा म्हणाले होते, " अरे झिला, हे कावळे असेच असतात, कधी येतील, कधी येणार नाहीत, पण आपण आपल्या पूर्वजांना अजिबात विसरायचे नाही. " बाबा आमचे प्रॅक्टिकल होते. ते आधी करत,मगच सांगत. त्यामुळे त्यांच्या सर्व गोष्टी मला पटत. 

         कणकवलीतील आमच्या रूमवर बाहेरच्या कटड्यावर बाबांनी बिस्किटे ठेवताक्षणी कुठूनतरी कावळे येत आणि बिस्किटे वरच्यावर उचलत. बाबांना आणि आमच्या घरातील सर्वांनाच मग दैनंदिन सवयच लागली आहे. देवाचे पूजन झाले की आपण काहीही खाण्यापूर्वी कावळ्यांना बिस्किटे, फरसाण असे खाऊ घालण्यात येते. 

         काल नदीशेजारी एकही कावळा फिरकताना दिसला नाही. कदाचित हे सगळे कावळे कणकवलीला आमच्या खोलीच्या बाहेर बाबांची वाट बघत नसतील ना? किती दिवस खोली बंद आहे. आमचा खाऊ घालणारा कुठे गेला असेल ? 

         आता तेराव्या दिवशी कणकवलीला गेलो कि मी पहिल्यांदा बाबांच्या ' काकमित्रांसाठी ' साद घालीन आणि त्यांना बिस्किटे, खाऊ दिल्याशिवाय मला स्वतःला स्वस्थता लाभणार नाही. माझे दूर देशी गेलेले बाबा सुद्धा त्यांच्याबरोबर यावेत अशी मी माझ्या बाबांच्या पवित्र आत्म्याकडे साश्रू नयनांनी प्रार्थना करतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १



🛑 शिक्षक स्मृती ठेवुनी जाती

🛑 शिक्षक स्मृती ठेवुनी जाती

          बदली हवी असली तर ती झाली पाहिजे अशी प्रत्येकाची तीव्र इच्छा असते. कोकणात येणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला परत आपल्या जिल्ह्यात जायची इच्छा झाली तर नवल वाटायला नको. आमचे काही मित्र एकदम बदली न करता सामूहिक राजीनामे देऊन आलो तेव्हा असेच झाले होते. सिंधुदुर्गात नोकरी मिळाली म्हणून आम्हांला खूप आनंद झाला होता. एक नोकरी सोडताना डोळ्यात आसू होते आणि दुसरी लगेचच स्वीकारताना ओठात हसूही होते.

         खोत आणि कासार दोघेही कोकणातील सिंधुदुर्गात मिसळून गेले होते. दोघेही तंत्रस्नेही. उच्चविद्याविभुषित. ज्या शाळेत जातील तिथे वेगळा ठसा उमटवणारे नवोपक्रमशील शिक्षक. 

         रस्सा मंडळातील काही सदस्य आधीच बदलीने निघून गेल्यानंतर आता तर रस्सा संपून गेल्याची जाणीव होऊ लागली आहे. रस्याची चव तेवढी जिभेवर रेंगाळते आहे. असे गेट टुगेदर करताना त्यांनी केलेली नियोजने नेहमीच भाव खाऊन गेलेली. आपुलकीचे शब्द आणि जिव्हाळ्याचा रस्सा थंड होत असताना तो पुनरुज्जीवीत करण्याची जबाबदारी नवनियुक्त शिक्षकांनी पेलावी अशी आम्ही जुने शिक्षक अपेक्षा बाळगून आहोत. नवनियुक्त शिक्षक नव्या दमाचे आहेत. ते जुन्यांपेक्षा अधिक तंत्रस्नेही असतील तर त्यांच्याकडूनही खूप शिकण्याची आमची तयारी आहे. 

         अनिल खोत आणि प्रवीण कासार मला येथेच भेटले. त्यांच्याकडून आम्ही सगळेच शिक्षक खूप काही शिकलो आहोत. अनिल खोत म्हणजे जणू केंद्राचे खोतच. त्यांनी एखादी गोष्ट सुचवली त्यावेळी ती आम्ही सर्वांनी उचलून धरली आहे. त्यांचं बोलणं नेहमीच ऐकत राहावं असं. बोलण्यात विनोदी शैली आणि विषयाचे मुद्देसूद विवेचनसुद्धा. त्यांनी अनेकदा सूत्रसंचालन केलेले मी पाहिले आहे. त्यांचे वक्तृत्व ओघवते असते म्हणून ते सर्वांना आवडते. ते उभे राहतील तिथे त्या जागेचे सोने करतील. सोने म्हणजे ते सोने नव्हे. ते नेहमीच सभा जिंकत. यापुढेही त्यांनी असेच करावे. संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्यांना अधिक जवळून पाहता आले. त्यांनी केलेली शैक्षणिक साहित्याची पखरण वर्गभर वर्षत राहणारी अशीच. ते पुढे अजून अधिक शिकत आहेत म्हणून मला त्यांचा अधिक अभिमान वाटतो. 

         कासार ह्यांच्या नावातच प्रवीण आहे. त्यांचं हसणं लाजबाब. त्यांचं सहकार्य लाखमोलाचं असतं. त्यांनी कमी कालावधीत सजवलेला वर्ग आमच्याशी शिक्षण परिषदेच्या वेळी बोलला आहे. ज्यांच्या वर्गाच्या भिंती बोलतात, त्यांचा वर्गही तसाच बोलू लागतो. त्यांनी अगदी तसेच केले आहे. पुढे हजर होणाऱ्या शिक्षकांना असे वर्ग अधिक पुढे नेण्यासाठी खूप सोपे जाणार हे नक्कीचे आहे. मला एकदा एका लिंकबद्दल काही अडचणी आल्या होत्या. मला काहीकेल्या जमत नव्हते. मग मला कासारांच्या प्रवीणतेची आठवण आली. मी त्यांना फोन करुन समस्या सांगितली. त्यांनी पाचच मिनिटात माझे काम करुन त्याचा स्क्रिनशॉट सुद्धा पाठविला. क्रीडास्पर्धेच्या वेळी या सर्वांनीच मला उदंड सहकार्य केलेले आहे. शेर्पे केंद्रातील सर्वच शिक्षकांकडून आपल्याला हवा असतो त्यापेक्षा जास्त आदर मिळत असतो हे त्यांचे मोठेपणच आहे. 

         असे हरहुन्नरी शिक्षक बदली होऊन जातात तेव्हा खूप हुरहूर लागते. चणचण भासते. त्यांची उणीव भरुन काढणारे शिक्षक नियुक्त होतीलच. तरीही त्यांच्यासोबत घालविलेल्या आठवणी आम्हां सर्वांसाठी अनमोल ठेवा असणार आहेत. 

         आमच्या शाळेतील सुजाता कुडतरकर मॅडम यांचीही बदली झाली आहे. गेली ५ वर्षे आम्ही शिक्षक जे टीमवर्क करत होतो त्याला तोड नाही. प्रत्येकाचे काम आणि कामाची पद्धत वेगळी असते. त्यांच्या कामाचा उरक चांगला होता. मी नसताना त्यांनी माझ्यापेक्षा शिस्तबद्ध शाळा ठेवली आहे. वृक्षारोपण कार्यक्रमात मी नसताना त्यांनी मारलेली बाजी मी लोकांच्या तोंडून ऐकली आहे. मला त्यावेळी जो आनंद झाला तो शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. 

         बदली होऊन गेलात,  तुम्हांला चांगलं वाटावं म्हणून मी हे लिहित नसून मला मनापासून लिहावेसे वाटले म्हणूनच लिहित आहे. तुमचा सर्वांचा आदर करत शब्दप्रपंच थांबवतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शिडवणे नं. १

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...