प्रसार म्हणजे एखादी गोष्ट सगळीकडे पसरवणे नाही का ? मग प्रसार माध्यमे तर कितीतरी आहेत. दृक स्वरुपातली आहेत, श्राव्य स्वरुपातली आहेत आणि दृक् - श्राव्य या दोन्ही प्रकारचीही आहेत. आता तर आपल्या हातात जग मावलेलं आहे.
छोट्या टचस्क्रीनवर नुसतं टच केलं तरी प्रचंड माहितीचा महासागरच आपल्यासमोर खुला होतो. जगाच्या कानाकोपर्यात काय घडते ते सर्वांना सदासर्वकाळ एका क्लिकवर समजू लागले आहे. वर्तमानपत्र, दुरदर्शन अशांमधून आपल्याला अधिकृत विश्वासार्ह माहिती मिळण्याची जास्त शक्यता असते.
केबल वाहिन्या , विविध ॲप्स, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यावरही क्षणाक्षणाला अधिकाधिक माहिती येऊन दाखल होते. नुसतं फक्त गुगल करत राहायचं. वेळही पुरणार नाही.मग एकाच विषयावर , घटकावर अनेक प्रकारची वेगवेगळी माहितीसुद्धा मिळते. मग आपण संभ्रमात पडतो. ही माहिती बरोबर कि ती माहिती बरोबर ? बातम्यांचा टी आर पी वाढण्यासाठीही न्यूज चॕनेलवाले बातमीला मीठमसाला लावून भडक करतात. मेकअप स्पष्ट दिसावा म्हणून दशावतारी नाटकातील कलाकार भडक मेकअप करतात ना अगदी तस्संच !! आता आपण चारचौघात उठून दिसण्यासाठी भडक लिपस्टिक लावतोच की !!
शोधपत्रकारितेच्या नादात शोधायची गोष्ट सोडून नको तेच शोधलं जातं. आपण सर्वसामान्य दर्शक किंवा वाचक काय करतो, आली नवीन माहिती की कर फाॕरवर्ड. अशाने चुकीचीच माहिती जास्त फाॕरवर्ड होत राहते. चांगली माहिती वाचायची राहूनच जाते, मग ती फाॕरवर्ड तरी कशी होणार ? काही लोकांना तर मॕसेज फाॕरवर्ड करत राहण्याची ॲडिक्शनच झाली आहे. आला मॕसेज.. कर फाॕरवर्ड. वाचतसुद्धा नाहीत आपण नक्की काय फाॕरवर्ड करतोय ते ? काही महाभाग तर आपलं नावसुद्धा बदलण्याची तसदी घेत नाहीत.दुसऱ्यांच्या नावानेच आहे तसाच फाॕरवर्ड करतात. अशाने या प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता कशी राहणार सांगा.
अधिकृत सुत्रांचा हवाला देऊन बातमी दिलेली असते त्यातही छपाई किंवा संपादनात जर ध चा मा झाला तर अर्थच बदलून जातो.
सध्या प्रसारमाध्यमांचं जाळंच जाळं पसरलं आहे, कोणी शिंकलं तरी त्याची बातमी होते. बातमीमध्ये आपल्या चॕनलचे वेगळे ट्विस्ट असले पाहिजे असं सगळ्याच प्रसारमाध्यमांना वाटत राहतंय की काय ?
विश्वासार्ह बातम्या देणारी सह्याद्री वाहिनी सोडून आपण इतर वाहिन्या सेकंदासेकंदाला बदलत राहतो याचा अर्थ काय समजायचा ? तुम्ही रिमोट हातात घेऊन ते नुसतं दाबत राहण्याचंच काम करत असणार , बरोबर ना ? मग प्रसार माध्यमेसुद्धा तुमच्या चंचल मनाचाच ताबा घेऊ लागल्या आहेत. त्यांची तरी चूक काय ? तुम्हाला जे हवे आहे ते देण्याचं काम माध्यमे करत आहेत. ते जास्त भडक झालं तरी चालेल पण ते तुमच्या गळी उतरवण्यासाठी करत असतील कदाचित नक्की सांगता येत नाही. त्यात आपल्याला असंही लक्षात येऊ लागलं आहे कि काही राजकीय पक्षांचीही वैयक्तिक चॕनल्स वारेमाप आली आहेत. त्याद्वारे त्या वाहिन्या अधिकची माहिती देऊन जनमानसाचं मत आपलंसं करण्याचाही प्रयत्न करतात.
पैसे देऊन घेऊन जर बातम्या दिल्या जात असतील तर त्या पेड बातम्यांचं वास्तव काय असणार ? त्यात खरी माहिती कमी आणि फुगवून दिलेली माहिती जास्त असणार यात शंकाच येऊ नये. हल्ली काय ते मतदानाचा कौलसुद्धा कोणाच्या बाजूने ते सांगण्याचा आठवडाभर भारंभार प्रयत्न केला जात असतो.
प्रसारमाध्यमांची पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. पण त्यातील वास्तवतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहतो. कोरोनाचा फैलाव वाढत चाललेला असतानाचे खरेखुरे मृतांचे आकडे समजले असते तर लोकं हाॕलमधून बेडरुममध्येही गेली नसती. सर्व प्रकारच्या आकडेवारीमध्ये अंदाजे आकडे देण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये आपापसांत वाढलेली जीवघेणी स्पर्धा या अवास्तवतेला कारणीभूत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. "इंग्रज सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? "असे म्हणणारे नरकेसरी लोकमान्य टिळक आता सापडणार नाहीत. आपल्या जीवाला घाबरुन दुसऱ्यांची स्तुती करत नको ती माहिती प्रसारमाध्यमांकडून फ्लॕश केली जातेय का ? हा सुद्धा एक संशोधनाचा विषय ठरु शकतो.
जसं आहे तसं प्रसारण झालं पाहिजे , प्रसारित होणारा शब्दनशब्द स्वच्छ काचेसारखा सुस्पष्ट असला पाहिजे.तर आणि तरच आजची प्रसारमाध्यमे नक्कीच लोकमानसात एक क्रांतीची ज्योत पेटवतील. या प्रसारमाध्यमांमध्येच लोकमत बदलण्याची दिव्य शक्ती आहे. लोकांनीही अशा भंपक आणि अवास्तव माहिती देणाऱ्या माध्यमांवर किती विश्वास ठेवायचा आणि चिकटून राहायचे ते ज्याचं त्यानं ठरवायचं आहे .नाही का ?
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
No comments:
Post a Comment