Sunday, July 18, 2021

बालामामा : माय आयडियल ब्रँड

           आमचे बाला मामा रत्नागिरीत राहतात. मी त्यांच्याकडे नोकरीनिमित्ताने 6 ते 7 महिने राहिलो असेन. त्यापूर्वीही मी अनेकदा त्यांच्याकडे सुट्टीमध्ये गेलो आहे. मामा , मामी , बबलू , गुड्डी आणि आजी या सर्वांकडून मला जे प्रेम मिळाले ते एका लेखातून व्यक्त होणे शक्य नाही. आमच्या संपूर्ण नातेवाईकांमध्ये नोकरीला असलेले जवळचे नातेवाईक म्हणजे आमचे मामा आणि मामी दोनच होते. कणकवलीचे त्यांचे मोठे भाऊ भाईमामा हेही माझे आदर्श आहेत. त्यांच्याविषयी मी नंतर स्वतंत्र लेखात अधिक सांगेनच. 

          बालामामांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग असे आहे. त्यांना राग कधी आलेला नाही. ते नेहमी संयमाने बोलतात. नोकरी आणि घर यात गल्लत करत नाहीत. नोकरी करताना नोकरीच करावी. घरी असताना नोकरीचा विचार न करता घराकडे लक्ष द्यावे. मामांचे ऑफिस घराच्या जवळच होते. मामी भूमी अभिलेख कार्यालयात क्लार्क होती. ती अतिशय प्रेमळ स्वभावाची. घरात देवपूजा झाली की सर्वांना विभूती लावताना ती मलाही आठवणीने विभूती लावत असे. जेवणात तिचा हात धरणारे कुणीही नसेल इतका फक्कड स्वयंपाक करत असे. तिने केलेली माशांची कढी अजूनही आठवते. जेवताना आम्ही सगळे एकत्र जेवत असू. आपल्याला हवे तितके आपण स्वतः वाढून घ्यायचे असे. मी न लाजता मला हवे तितके जेवण घेत असे. मी कमी घेईन म्हणून मला माझी मामी आठवणीने चौकशी करून आग्रहपूर्वक जेवू घाले. पण मीच संकोच करत असे. 

          मामांचे माझ्याकडे विशेष लक्ष असे. आपल्या बहिणीचा मुलगा पुढे जावा अशी त्यांची नेहमीच भावना राहिलेली आहे. त्यांना न समजलेली गोष्ट ते मलाही विचारत असत. मी त्यांचा भाचा असूनही मी शिक्षक आहे याचा त्यांना कायमच आदर वाटत आलेला आहे. ते माझ्याबद्दल अभिमानाने बोलताना मी ऐकलेले आहे. रत्नागिरीसारख्या शहरात नोकरी करून एक चांगले ' चव्हाणभाऊ ' म्हणून त्यांनी सन्मान मिळवलेला मी प्रत्यक्ष पाहिलाय. म्हाडा वसाहतीमध्ये राहताना त्यांना अनेकदा संघर्षाला तोंड द्यावे लागले आहे. पण शांत डोक्याने त्यांनी त्याचा प्रतिकारही केला आहे. त्यांची कामाची पद्धत मला खूप काही शिकवून गेली आहे. घरातील कोणतेही काम करताना त्यांनी कंटाळा केला नाही. त्यांच्याकडे बघून मलाही त्यांच्यासारखे व्हावे असा दृष्टिकोन तेव्हापासूनच माझ्या मनात येत राही. मी त्यांच्यासारखा होऊ शकलो नसेन. पण आज मी जो आहे त्यात मामा आणि मामी या दोघांचाही तितकाच वाटा आहे. 

          एकदा मला रत्नागिरीवरून घरी यायचे होते. मी मला घरी येताना घ्यावयाच्या वस्तू एका पॅडवरील पांढऱ्याशुभ्र कागदावर लिहून ठेवल्या होत्या. मामांनी त्या बघितल्या. त्यावर छत्री वगैरे असे काहीबाही लिहिले होते. तो कागद उलटून बघितल्यानंतर समजले कि तो साधा कागद नव्हता तर तो एक त्यांच्या कस्टमरने दिलेला बॉंड पेपर होता. माझ्या त्या लिहिण्यामुळे तो खराब झाला होता. तरीही मामा मला काहीही बोलले नाहीत. माझ्याकडून तर चूक झालीच होती. मला त्यावेळी त्यांच्याकडे क्षमाही मागता आलेली नाही. त्यांनी मला कधीच क्षमा करून टाकली होती. आपल्या भाच्याला वाईट वाटेल असे ते कधीच वागले नाहीत. कदाचित माझ्याकडूनच अनेक चुका झाल्या असतील. मामा आणि मामी यांनी त्यावेळी मला दिलेला आधार माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या इमारतीचा मुख्य पिलर असावा असे मला वाटते. 


©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )

No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...