🟣 जाता जाता पावसाने
रात्रीच्या ड्युटीला जायची गडबड सुरू होती. कणकवलीपासून खारेपाटण पर्यंतचा प्रवास तसा पस्तीस ते चाळीस किलोमीटरचा असेल. टू व्हीलरने सतत ये जा करण्याची सवय असल्यामुळे काही वाटत नव्हते. दुपार सत्र , सकाळ सत्र संपून रात्रीचे सत्र सुरू झाले होते. गेल्यावर्षी पासून अनेक सत्रे पार पाडली असल्याने आत्मविश्वास विचलित होण्याचाही प्रश्न नव्हता. ही बहुदा सातवी ड्युटी असावी. कोविड ड्युटी शाळेत विलगीकरण कक्ष , प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि खारेपाटण चेकपोस्ट येथे करुन करुन शाळेतल्या कामाचा विसर पडत चालला आहे अशीही जाणीव होऊन कावरेबावरे किंवा कासावीस व्हायला होते होते.
मला पाऊस नको होता. पण मी बाहेर पडताना तो मुद्दाम येत होता. रेनकोट घालून बाहेर पडायचे माझ्या जीवावर आलेले होते. बायकोने मस्त चवळीची उसळ आणि गरमागरम चपात्या बनवलेल्या होत्या . मी टीव्हीवर सुरु असलेला ' या फुलांना सुगंध मातीचा ' हा कार्यक्रम बघतच कश्यातरी दोन तीन चपात्यांचा फडशा पाडत होतो. आज रात्रीच्या ड्युटीवर जायला जीवावरच आलेले होते. पण नाईलाज होता. मी नाराजीतच रेनकोट चढवत होतो. घरातल्यांच्या चेहऱ्यावरची नाराजीही स्पष्ट दिसत होती. तरीही ते मला कृत्रिम हसत निरोप देत होते. छोटी उर्मी उचलून घ्यायला सांगत होती. तिचा एक गालगुच्चा मला संपूर्ण प्रवासात साथ करणार होता. माझा त्रासदायक प्रवास मला सुखकारक होण्यासाठी मला ते गरजेचे वाटत होते. ती मला येताना ' चुपाचूप ' नावाचा खाऊ आणायला सांगत होती , मी तिला उद्या येताना सकाळी आणता येणार नाही असे म्हणून चूप करुन टाकत होतो.
' पेरुचा पापा ' घेऊन निघायचे होते. पेन , रुमाल , चावी , पाणी आणि पाकीट या पाच शब्दांची आद्याक्षरे घेऊन बनवलेले ते संक्षिप्त रुप बनवलेले होते. त्यात आता रेनकोट , हेल्मेट, मोबाईल, चष्मा हे आणखी चार शब्द मिळवायचे बाकी होते. लक्षात राहण्यासाठी आपण बऱ्याचदा असे शॉर्टकट वापरतो. पण तरीही मी काहीतरी विसरलोच होतो. त्या दिवशी मी मोबाईल विसरुन आलो होतो तर मला ड्युटीचे आठ तास म्हणजे कमालीची शिक्षा वाटू लागली होती. पण तेवढा इंटरनेटमुक्त जीवन जगण्याचा आनंदही झाला होता.
आज मी रुमाल आणायला विसरलो होतो. सुरुवातीला रिमझिम पडत असलेला पाऊस दोन तीन किलोमीटर नंतर धोधो पडू लागला होता. मी माझा मास्क आधीच काढून ठेवला होता. हेल्मेट चढवल्यानंतर मास्कची गरज नव्हती. हेल्मेटवर काच असल्यामुळे पाणी तोंडावर येण्याची भीती नव्हती. मी चष्मेवाला असल्यामुळे तो घातल्याशिवाय मला स्पष्ट दिसणार नव्हते. मी चष्मा चढवला होता. आता पावसाने आपला वेग वाढवला होता. रपारप पाऊस प्रवासात अडथळे आणत होता. हेल्मेटच्या काचेवरुन पाणी ओघळू लागले होते. समोरचे स्पष्ट दिसत नव्हते. हेल्मेटला वायफर असते तर किती बरे झाले असते असे क्षणभर वाटून माझे मलाच हसू आले होते.
मी एकटा जातोय म्हणून हा मुसळधार पाऊस माझी सोबत करु पाहत होता. मला त्याची सोबत आता मात्र नकोशी झाली होती. समोर दिसत नव्हते , म्हणून मी हेल्मेटची काच वर केली होती. सगळा पाऊस माझ्या डोळयांत, नाकात आणि तोंडात शिरु लागला होता. चष्म्यावर पाणी आल्याने समोरचा रस्ता दिसेनासा झाला होता. पुढचा रस्ता दिसायला हवा होता. मी चष्मा काढुन ठेवला होता. आता रस्ता साधारण दिसू लागला होता. काळाभोर रस्ता सोबत करु लागला. रस्त्याच्या मधली पांढरी रेषा पुढे जायला मदत करत होती. मित्र असलेला पाऊस आता शत्रू होऊन डोळ्यांत पाणी आणू लागला होता. पाऊस थांबण्याचे अजिबात चिन्ह दिसत नव्हते. रेनकोटातून पाऊस आत यायला बघत होता. माझे कपडे ओले करुन विजयी झाल्यासारखे आकाशात ढोल वाजवत होता. मधेच वीजबाई चमकून अंगावर येत असलेले शहारे वाढवत होती. रस्ता संपता संपत नव्हता.
एकेरी वाहतूक असल्यामुळे समोरुन गाड्या येण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही एखाद्या ठिकाणी उलट दिशेने गाड्या हाकणारे येत होतेच. त्यांच्यापासून जीव मुठीत घेऊन सुखरूपपणे खारेपाटण चेकपोस्ट गाठायचे दिव्य करायचे होते. पाण्याचे ओहळ रस्त्यावरून वाहताना दिसत होते. अचानक रस्त्यावर जास्त साचलेल्या पाण्याचा आवाज येऊन छातीत धस्स होत होते. कुठेही थांबायचे नव्हते. गाडी बंद केली आणि पुन्हा गाडी स्टार्ट नाही झाली तर ? हा प्रश्न सतावत होताच. त्यामुळे गाडी मध्येच थांबवून पाऊस कमी होण्याची वाट पाहणेही धोक्याचेच वाटत होते. पावसाचा मारा सहन करत गाडी रस्ता आणि पाऊस दोन्ही कापत पुढे पुढे चालली होती.
मी या कोविड राक्षसाचा राग राग करत खारेपाटण चेकपोस्टची प्रतिक्षा करत होतो. पंचेचाळीस मिनिटांच्या सलग प्रवासानंतर मी सुखरूप खारेपाटणला चेकपोस्टवर पोचलो याचा आनंद होत होता. दुपारची टीम आमच्या टीमची वाट पाहत असल्याचे दिसत होते. पुढील कामकाज आमच्याकडे सोपवून जाताना त्यांना सुटकेचा निःश्वास टाकताना पाहून आम्हाला रात्र काढायची आहे या भीतीने पोटात आलेला गोळा मोठा मोठा होऊ लागला होता.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
👍
ReplyDeleteखूप छान लेखन
ReplyDeleteखूपच सुंदर सर
ReplyDeleteकुबल सर ,खूप छान लिहिता .लेखन खूप जवळचे वाटते
ReplyDeleteवा, प्रसंग नजरेसमोर उभा केलात साहेब
ReplyDelete९९२३५९०९४२
आपण लेखन तर छानच करता पण असा थरारक प्रवास करू नका.एखाद्या वेळी उशीर झाला तरी चालेल.काळजी घ्या सर.
ReplyDeleteThanks to all
ReplyDeleteछान लेखन....��मनपूर्वक शुभेच्छा
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteरोमांचकारी
ReplyDeleteमात्र सुरेख सत्य वर्णन
पावसाचे खूप सुंदर वर्णन।आपण खरच प्रवास करतोय याचा अनुभव आला।आपण लेखनातही तो जिवंतपणा जपलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन
ReplyDelete