Saturday, May 27, 2023

🛑 एका तेजस्वी सूर्याचा खडतर प्रवास : सुर्यकांत चव्हाण

🛑 एका तेजस्वी सूर्याचा खडतर प्रवास : सुर्यकांत चव्हाण 

           " मुलाचे पाय पाळण्यात दिसतात " असे म्हटले जाते. अर्थात मुलाचे पाळण्यात हलणारे पाय बघूनच अशी कल्पना करण्यात येते. हळूहळू मोठा होताना त्याचे गुण अधिक लक्षात येत राहतात. मुलं नुसती वयाने आणि वजनाने मोठी झालेली कोणालाही आवडणार नाहीत. त्यांनी वर्तमान आणि भविष्य उजळून टाकावं असं भव्य दिव्य करावं अशी सर्वांचीच इच्छा असते. त्यामुळे प्रेरणा देत देत मुलांचं भविष्य घडवणं हे मोठ्यांचं आद्यकर्तव्य ठरतं. 

          ग्रामीण भागातील मुले विशेषतः तावून सुलाखून निघालेली असतात. विविध संकटांचा सामना करुन वज्रासारखी बनून जातात. गरीबी असली तरी त्यात सुखासमाधानाची भाकरी खाण्यातला आनंद विरळाच. 

          सुर्यकांत चव्हाण हे माझे भावोजी. मोठ्या मामांच्या मोठ्या मुलीचे पती. त्यांचा जन्म हिवाळे गावात झाला. वडिलांच्या तुटपुंज्या मिळकतीत पाच मुलांना उच्च शिक्षण देत मोठं करणं सोपी गोष्ट नव्हतीच. पण शिक्षणच आपणांस चांगले दिवस दाखवू शकतं हा ठाम विश्वास वडिलांनी सदैव बाळगला होता. मुलं मोठी मोठी होत गेली आणि शिक्षण घेता घेता कधी समंजस झाली ते वडिलांनाही कळलं नाही. 

          वडिलांनी मग आपली आणि कुटुंबाची जबाबदारी मोठ्या सुर्यकांतवर सोपवली. सुसंस्काराने वाढलेले झाड वाढायचे थांबत नसते. सुर्यकांत आणि त्यांची भावंडे जिद्दी होती. त्यांनी आपल्यावर आलेली जबाबदारी आनंदाने स्वीकारली.

          वडील आजारी पडले आणि मोठ्या सुर्यकांतने कुटुंबाची स्विकारली. सर्वांची लग्न लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. मोठा असल्यामुळे  स्वतः सुर्यकांत यांचा नंबर होता. माझी मोठी मामेबहिण सुर्यकांत यांच्याशी विवाहबद्ध झाली. 

          घर अगदी जुनेच होते. सुर्यकांत भावोजी कणकवलीत खाजगी नोकरी करत होते. मोठमोठ्या प्रोजेक्टची इंजिनिअरिंग डिझाईन करण्यात ते पटाईत होते. एकदा मला त्यांच्या त्या ऑफिसमध्ये जाण्याचा योग आला होता. तेव्हा मी त्यांचे काम अगदी जवळून पाहिले आहे. खाजगी नोकरी करत असताना एवढ्या मोठ्या कुटुंबाचा गाडा ओढताना त्यांना त्यांच्या भाऊरायांची साथ लाभली. 

          बांदा हायस्कुलमध्ये  सुर्यकांत रुजू झाले. एक भाऊ , एक वहिनी शिक्षिका आहेत. एक भाऊ इलेक्ट्रॉनिक दुकान चालवता चालवता जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. वित्त व बांधकाम सभापती झाले. एक बहिण आरोग्य विभागात नोकरीला लागली. एक बहीण पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये लेक्चरर झाली. सुर्यकांत यांचा सूर्य उगवू लागला होता. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. पत्नीची जबरदस्त साथ त्यांना वेळोवेळी मिळत होतीच. 

          जो प्रामाणिकपणे काम करतो , त्याच्या कार्याचा नक्कीच गौरव होत असतो. सुर्यकांत चव्हाण  बांदा हायस्कुल मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून  या पदावर काम करत असताना त्यांनी स्वतः अनेक प्रयोग करुन पाहिले आहेत. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी जिल्हास्तरावर नंबर यावा लागतो. आपल्या ज्ञानाच्या आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी सहा वेळा राज्यस्तरासाठी निवड झाली एक वेळा राज्यात उत्तेजनार्थ तिसरा क्रमांक व यावर्षी राज्यात तिसरा क्रमांक मिळाला. ही यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. यश मिळवत राहणे हे त्यांच्या रक्तात भिनलेले आहे. कितीही यश मिळवले तरीही त्यांना अहंकार नाही. त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. 

          यावर्षी होणाऱ्या माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत त्यांनी सहभाग नोंदवला आहे. ते उमेदवार जिल्ह्यासाठी इतर मागास प्रवर्गातून(OBC) उभे आहेत. त्यांनी केलेलं शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहेच. त्यांच्या अभिनव ज्ञानाचा उपयोग बँकेच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि पर्यायाने सभासदांच्या विकासासाठी नक्कीच होईल असा विश्वास वाटतो. हा विश्वास प्रत्येक मतदारालाही वाटेल यांत तिळमात्र शंका वाटत नाही. 

          शिक्षक बंधु आणि भगिनींनो , आपण आपल्या एका तळागाळातील कार्यकर्त्याला जिल्हा उमेदवार म्हणून निवडून द्याल आणि बँकेच्या तख्तावर बसवाल अशी कळकळीची विनंती करतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( पदवीधर शिक्षक , शिडवणे नं.१ )





🛑 दारु आणि मी

🛑 दारु आणि मी

          दारुबद्दल लिहायचे असेल तर दारु पिणाऱ्याबद्दल लिहिले पाहिजे असे बिल्कुल नाही.  दारु बनवणाऱ्यांची घरे , दारु विकणाऱ्यांची दुकाने चालली पाहिजेत म्हणून की काय काही लोक त्यांची दया येऊन दारु पित असावेत. तंबाखूमुक्त चळवळ जशी सुरु असते , तशी दारु विरोधी चळवळी सुरु असतात. 

          क्वचित एखादा चित्रपट असेल की ज्यात दारु दाखवली नसेल. आजच्या काळातील प्रत्येक चित्रपटात तिचा बेसुमार वापर केलेला दिसून येतो. सकाळ ते रात्री कोणत्याही वेळीचा प्रसंग असो , त्यात तिला मोठं स्थान दिल्याचं जाणवतं. पुरुषच काय , पण काही चित्रपटात स्त्रिया सुद्धा पिताना दाखवल्या जातात. 

          Drinking of Alcohol is injurious to health असं वाक्य चित्राच्या खाली बारीक अक्षरात लिहायला अजिबात विसरले जात नाही. आता ती मदिरा पिणे ही फॅशन आणि पॅशन झाली आहे. उलट ही मदिरा न पिणाऱ्यांची हसून खिल्ली उडवली जाते. 

          " अहो , महाशय , तुम्ही किती मागे आहात ? जरा पुढे जा आता !!! " हे वाक्य ऐकून जर तुम्ही घ्यायला किंवा प्यायला गेलात तर तुम्ही नक्कीचे पुढे जाणार हे ठरलेले आहे.   हे पुढे जाणं विनाशाच्या दिशेने असणार आहे हेही लक्षात असू द्या. 

          एकदा माझ्या जवळच्या नातेवाईकाच्या लग्नाला चाललो होतो. एसटीतून प्रवास सुरु होता. मला गाडीत दारुचा घाणेरडा वास आला. मी मागे वळून पाहिलं. कोणीतरी हळूच पित असल्याचे समजले. मला तो घाण वास सहन होईना. मी कासावीस झालो होतो. प्रवास कधी एकदा संपतो असे मला झाले होते. मी काहीही करु शकत नव्हतो. शेवटी प्रवास संपल्यावर एसटीतून उतरताच मी सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. 

          हल्ली पिणारी माणसे तिचा घाण वास येऊ नये म्हणून तीव्र वासाचे सेंट लावतात. त्यामुळे आणखी तयार झालेल्या मिश्रित वासाचा सामना करत राहावा लागतो. त्यांना बिचाऱ्यांना सवय झालेली असते , त्यामुळे त्यांना स्वतःला त्याचे काहीच वाटत नसावे. पण त्यांच्या सोबतीने जाण्याचे दुर्भाग्य लाभलं तर काही खरं नाही. 

          आपल्याला तशा अनेक सवयी असतात. त्यापैकी ही पिण्याची सवय असली तर ती घातक असू शकते हे लक्षात घ्यावे. कित्येकांचे संसार या अतिपिण्याने उध्वस्त झाल्याचे मी प्रत्यक्ष बघितले आहेत. दारु पिणाऱ्या माणसाला एकदा दारु पिऊ लागली कि तो माणूस संपलाच असे समजावे. 

          त्यादिवशी एके ठिकाणी एक चांगले इस्त्रीचे कपडे घातलेला चांगल्या घरातील माणूस दारु पिऊन रस्त्यात पडलेला मला दिसला. त्याचा हा अवतार बघून येणारे जाणारे लोक त्याच्याकडे तुच्छतेने बघताना दिसत होते. अगदी मीही. या दारुमुळे माणसाचं एका झटक्यात काय घडते ते पहा. 

          कधीकधी माझी छोटी मुलगी मला म्हणते , "  पप्पा , तुम्ही जर कधी दारु पिऊन घरी आलात ना , तर तुम्हाला मी अजिबात घरात घेणार नाही." तिचंही बरोबर आहे. तिलाही आता अशी माणसं चित्रपटात , यु ट्युबवर दिसत असतात. अशा पिणाऱ्या माणसांचा लहान मूलसुद्धा तिटकारा , तिरस्कार करत असतं हेही लक्षात असू द्या. 

          काही लोक तर सकाळी उठले की त्यानेच तोंड धुतात. उठले की सुटले. जोपर्यंत पित नाहीत , तोपर्यंत त्यांना बरे वाटत नाही. प्यायलेले नसले की ते थरथरत उभे राहतात , पुरेशी प्यायले की नीट उभे राहतात एवढी त्यांना सवय झालेली असते तिची. या सवयीच्या अधीन झालेल्या लोकांचं काय करायचं ते समजण्याच्या पलीकडचे आहे. 

          एकदा एक पोट धरुन हसवणारा नट कणकवलीत येणार होता. आम्ही त्याचे फॅन होतो. अर्धा तास लवकरच आम्ही त्याचा कार्यक्रम बघायला गेलो होतो. अजून तो नट आलाच नव्हता. नंतर कुणीतरी हळूच बोलताना ऐकू आले. तो पीत बसला होता. त्याचे पेग संपल्यावर तो आला. पण त्याचा कार्यक्रम बकवास झाला. पुन्हा तो पित असल्याचे समजल्याने त्याच्याबद्दलचा आमचा आदर कमी झाला तो कायमचाच. 

          काही माणसं पितात , पण अजिबात कळू देत नाहीत. या माणसांचा कोणालाही अजिबात त्रास नसतो. अशा माणसांना अति ताण आणि तणाव असतात , म्हणून ते पितात असे म्हटले जाते. पिल्यामुळे त्यांचा ताणतणाव कुठल्या कुठे पळून जातो असे तेच सांगतात. 

          या जगात ताण तणाव सगळ्यांनाच असतात. म्हणून दारु पिण्याचा मार्ग अवलंबून स्वतः बरोबर कुटुंबाची वाताहात करणे अजिबात समर्थनीय नाही. 

          जगात अशी दुःखी माणसे असंख्य असू शकतात , म्हणून ती सगळी दारु पिणारी आहेत का ? नाही ना ? अशा दुःखाचा सकारात्मक सामना करणाऱ्या माणसांकडे बघून तरी या माणसांनी आपल्या दुष्ट मैत्रिणीची साथसंगत सोडली पाहिजे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



🛑 इस्त्री आणि मी

🛑 इस्त्री आणि मी

          लहानपणीपासून कपड्यांना इस्त्री करण्याची सवय लागली आहे. स्वतःचे कपडे स्वतः इस्त्री करुन घालायचे. त्यावेळी इस्त्री कुठे होती ? पितळेचा तांब्या होता. त्यात पेटते निखारे घालायचे. थोडी फुंकर मारुन निखारे फुलवायचे. तांब्याचा तळ चांगलाच तापतो. त्यासोबत धातूच्या उष्णता संक्रमणामुळे तांब्याच्या तोंडापर्यंत उष्णता जाणवे. हात चांगलेच भाजत. ते भाजू नयेत , म्हणून ' भानशिरे ' घेतले जाई. भानशिरे म्हणजे जुना कापडी सुती फडका असे. तो चुलीवरची भांडी उचलून उचलून काळाकुट्ट झालेला असे. 

          इस्त्री करुन सुरकुत्या घालवून शर्ट , पॅन्ट छान दिसत. शाळेचा गणवेश जुना असला तरी नवीन वाटे. शाळेत जाताना पॉश कपडे घातल्याचा अनुभव येई. इतर मुलांचे नवनवे युनिफॉर्म बघून माझे इस्त्री केलेले कपडेही फिके पडत. 

          इस्त्री करुन करुन कपडे कोरम होत. शर्टाची कॉलर विरघळे. पँटीचा रंग बदलून जाई. पण पँट , शर्ट दोन्ही पूर्ण फाटेपर्यंत वापरावे लागत. उसवले तर बाबा शिवून देत. फाटले तर रिपू करावा लागे. हा रिपू कसातरीच दिसे. तरीही फाटक्या कपड्यांपेक्षा रिपू केलेले कपडे वापरणे केव्हाही चांगले. आता हे फाटलेले कपडे किंवा नको तिथे ठिगळ , रिपू ही फॅशन झाली आहे. 

          तांब्यानंतर बाबांनी हप्त्यावर एक साधी इस्त्री घेतली. तिला विजेची आवश्यकता असे. भाड्याने राहत असल्याने मालकांच्या परवानगीने लाईट वापरावी लागे. या नवीन इस्त्रीने इस्त्री करताना मजा येई. पटापट इस्त्री करता येई. कपडे आणखी चांगले दिसत. मामांकडे आजोळी माझे मामेभाऊ कसे इस्त्री करतात ते मी नीट बघून ठेवले होते. त्या निरीक्षणाचा उपयोग झाला. 

          आम्ही सर्व भावंडे इस्त्री करुनच कपडे वापरत असू. आता ऑटोमॅटिक इस्त्री आहे. ती कमी जास्त करता येऊ शकते. ती हलकी व सहज करता येण्यासारखी सुलभ आहे. 

          इस्त्री करताना आपण इतर काहीही करत नसतो. म्हणून मी नेहमी गाणी ऐकत इस्त्री करत असतो. आता मला ती सवयच जडली आहे. इस्त्री , गाणी आणि मी असे समीकरण झाले आहे. एखाद्या वेळी मी इस्त्री करताना गाणी लावली नाही तर माझ्या मुली मला विचारतात , " पप्पा , आज गाण्याशिवाय इस्त्री करताय , कमाल आहे ? " एवढी मला सवय झाली आहे म्हणजे बघा. 

          इस्त्री करताना मी अनेकदा भूतकाळात जात असतो. जुनी आणि मला नेहमी आवडणारी गाणीच मी ऐकत असतो. त्या गाण्यांचीही सवय झाली आहे म्हणा ना !! ही गाणी ऐकता ऐकता मी भराभर इस्त्री करत जातो. माझ्या आठवड्याच्या कपड्यांचा ढिग पडलेला असतो. 

          सलग दोन तासांचा हा इस्त्रीचा कार्यक्रम गाण्यांसह सुरुच असतो. इस्त्री कपड्यांच्या सुरकुत्या घालवत असते आणि गाणी माझ्या मनावरच्या. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर





Thursday, May 25, 2023

🛑 मोटू और पतलु की जोडी

🛑 मोटू और पतलु की जोडी

          बालपणी साधारण हिंदी भाषा समजू लागल्यानंतर ' लोटपोट ' हे हिंदी बाल मासिक हाती आले. कणकवली एस.टी. स्टँडवर असलेल्या पेपर स्टॉलवर हे मासिक मला पाहायला मिळाले. मी ते एकदा घेतले. त्यातील चित्रे आणि हिंदी भाषा जवळची वाटत गेली. 

          मुखपृष्ठावरील मोटू आणि पतलु या दोन कार्टून्सची चित्रे मला आकर्षित करु लागली होती. हळूहळू ही दोन्ही पात्रे माझे मित्र कधी झाली मला समजलेही नाही. मी वाचत गेलो आणि पुनःपुन्हा वाचतच राहिलो. एखाद्या महिन्यात ' लोटपोट ' आले नाही तर मी खट्टू होऊन परत येत असे.  मासिक वाचताना खरंच मी लोटपोट होऊन जात असे. आता हे मासिक जिओ मॅगझीन यावर ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध आहे. त्याचे वाचन करत गेलात तर तुमची हिंदी नक्कीच सुधारु शकते. 

          लहान मुलांनी अवांतर वाचन करणे ही आजची गरज आहे. आम्ही आमच्या लहानपणापासून ही वाचनाची आवड जोपासली आहे. मिळतील ती पुस्तके वाचून संपवली आहेत. सर्वच पुस्तके आता लक्षातही राहिली नाहीत. मराठीप्रमाणेच हिंदी वाचन करणेही गरजेचे आहे. कारण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. इंग्रजीकडे जास्त लक्ष देण्याच्या हव्यासापोटी हिंदीकडे होत असलेला दुर्लक्ष नाकारुन चालणार नाही. 

          लोटपोट सारखी बालमासिके वाचून आपण आपलं हिंदी भाषेतील ज्ञान वाढवत जाण्याची हिच वेळ आहे. आता सर्वकाही इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे इंटरनेटचा असा फायदा करुन घ्यायला हवा. उगीचच निरर्थक सर्फिंग करणे थांबवायला हवे. सर्वच गोष्टी गुगल करण्याची वाईट सवयसुद्धा सोडून द्यायला हवी. 

          एलईडी टिव्ही नावाच्या आयताकृती वस्तूसमोर बसून संपूर्ण दिवसभर कार्टून्स बघणारी मुले बघितली तर पुढील भावी पिढीची चिंता सतावते आहे. काय करायचं या मुलांचं ? कसं होणार या मुलांचं ? हे आणि असे अनेक प्रश्न प्रत्येक पालकाला पडत असावेत. टिव्ही बंद केला तर , मोबाईल आहेतच. मोबाईलच्या छोट्या स्क्रिनवर डोळे मिचिक मिचिक करत का होईना कार्टून्स आणि रिल्स बघणे सुरुच राहते आहे हा खरा घोळ आहे. 

          एका गोष्टीवर निर्बंध घातले तर दुसरी चुकीची गोष्टच करण्याकडेच मुलांचा कल असतो. त्यांना एखादी गोष्ट करु नका म्हटले तर तीच गोष्ट ती पुनःपुन्हा करत राहतात. मग आपणच कंटाळतो. विषयच सोडून देतो. काय करायचं ते करा असे म्हणत वैतागत आणि चरफडत राहतो. 

          आमच्याकडे बऱ्याचदा ही ' मोटू पतलु' मालिका सुरु असते. त्यातली पात्रं कमालीची आकर्षक आहेत. स्वतः मोटू हा धाडसी आहे. आपल्या ताकदीच्या जोरावर तो कितीही मोठ्या संकटांचा सामना करण्यास पुढे सरसावतो. समोसे खाल्ल्याशिवाय त्याला ताकद येत नाही. तो समोसे कधी चावताना दिसत नाही. तो समोसे गिळतो. आपल्याला असं समोसे गिळंकृत करणं या जन्मात तरी शक्य नाही. 

          पतलु हा त्याच्या नावाप्रमाणे बारीक आहे. तो अतिशय हुशार आहे. त्याने सुचविलेल्या युक्त्या भन्नाट असतात. या दोघांची जोडी म्हणूनच बालांच्याच नव्हे मोठ्यांच्याही मनावर अधिराज्य गाजवत आहे. तुम्ही अगदी कंटाळून घरी आलेले असाल तर ' मोटू पतलु' ही मालिका बघा. तुमचा सगळा शीण कुठल्या कुठे निघून जाईल. 

          त्यांच्यासोबत कायम ' चिंगम ' नावाचा पोलीस अधिकारी असतो. तोही अफलातून कॉमेडी दाखवला आहे. मोटू पतलु या द्वयींच्या मदतीने तो अनेकदा दुष्टांना पकडताना दिसतो. त्याने आपल्या बंदुकीने झाडलेली प्रत्येक गोळी नारळ पाडल्याशिवाय राहत नाही. नारळाचे झाड जवळपास नसले तरी नारळ पडतात त्यामुळे गंमत वाटत राहते. 

          डॉ. झटका यांची संशोधने हटके असतात. प्रयोग करताना होणाऱ्या गमतीजमती पाहताना हसू अजिबात आवरत नाही. ' यार ' हा त्यांच्या तोंडी दिलेला नेहमीचा शब्द तुमच्याही तोंडात कधी येईल ते सांगताही येणार नाही. सोबत घसीटाराम असतो. हे पात्र सुद्धा अवलीच आहे. 

          जॉन आणि त्याच्यासोबत असलेले दोन सहकारी काहीतरी कुरघोडी करण्यात पटाईत असतात. ' जॉन बनेगा डॉन ' असं म्हणत तो मोटू पतलु यांना नामोहरण करण्याचा सदैव प्रयत्न करतात. पण त्यांचे फंडे त्यांच्यावरच उलटतात. त्यामुळे गंमत वाढत राहते. 

          या पात्रांच्या हालचाली मजेशीर असतात. ते आकाशात स्वैरपणे संचार करतात. गाडीखाली सापडले तर त्यांची चपाती होते. पण ते कदापि मरत नाहीत. अशी ही सुखांतिका असलेली बालमालिका अतिशय मनोरंजक आणि हिंदी भाषा बोलण्यास प्रवृत्त करणारी आहे. आपणांस वेळ असेल तर आपणही ही ' मोटू और पतलु की जोडी ' जरुर पाहा आणि हास्याचे फवारे उडवून आपलं रक्त शुद्ध करा. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



🛑 अभिनंदन तुमच्या मुलांचं आणि तुमचंही

🛑 अभिनंदन तुमच्या मुलांचं आणि तुमचंही

          दहावी , बारावीचा रिझल्ट लागला. म्हणजे मराठीत निकाल लागला असे म्हणायचे ना ? 

          अनेक मुलांनी टॉप केलेले आहे. अनेकांनी मेडियम यश प्राप्त केलं आहे. स्वतःची सर्वसामान्य बुद्धिमत्ता आहे असे वाटणाऱ्या मुलांनीही काठापेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत. सर्व मुलांचं खरंच मनापासून अभिनंदन. त्यांच्या पालकांचं त्याहीपेक्षा जास्त अभिनंदन. 

          मुलांच्या आणि पालकांच्या दोहोंच्या परीक्षेचा आनंददायी निकाल लागल्यासारखे वाटते आहे. सर्वांनी आपल्या मुलांची गुणपत्रके स्टेटसवर ठेवून अधिक आनंद व्यक्त केलेला आहे यातच सगळे आले. सर्वांचे स्टेटस मुलांचे अभिनंदन करताना दिसत आहेत. हे अभिनंदन होत असताना मार्क्स मिळवणाऱ्या मुलांना कित्ती आनंद होत असेल नाही ? आजचे स्टेटस उद्या किंवा परवा असणार नाही. परंतु हे जबरदस्त स्टेटस कायम ठेवण्याची मुलांची आणि पालकांची जबाबदारीही वाढली आहे हे नक्की. त्यामुळे पुढील आयुष्याची शिखरं पादाक्रांत करताना दहावी , बारावीचे गुण महत्त्वाचे ठरणार आहेत. कोणत्या शाखेत ? किती गुण ? ग्रुपमध्ये किती ? आता पुढे काय ? अजून थोडे अधिक गुण मिळाले असते तर ? तू डॉक्टरच हो , नको नको इंजिनिअरिंग कर. त्यापेक्षा स्पर्धा परीक्षा दे. हे आणि अशा अनेक प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यावं लागणार आहे. यांची उत्तरे देतानाही नाकीनऊ येणार आहेत असे दिसते आहे. 

          शिक्षकांनी केलेले प्रयत्न , शाळेने केलेले प्रयत्न , संस्थेने केलेले प्रयत्न यांचा सर्वांचा कस लागलेला आहे. यांना यशाची आणि अपयशाची मोजणी करावी लागणार आहे. यापुढे अजून यश मिळवण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे. स्पर्धेत ' पळा पळा , कोण पुढे पळे तो ' असं सगळीकडेच बघायला मिळते आहे. 

          अभिनंदन आणि सत्कार यांचीही स्पर्धा सुरुच राहणार आहे. जास्त टक्के मिळवणारे आणि शिक्षणासाठी जास्त पैसे मोजू शकणारे मोठे कोणीतरी होतील यांत शंकाच नाही. परंतु जास्त गुण मिळवूनही केवळ पैशाची कमतरता असल्यामुळे , आर्थिक परिस्थितीमुळे सोपा कोर्स निवडताना दिसणार आहेत. कृपया त्यांनीही आपल्या मार्कांच्या जोरावर  चांगल्या व्यावसायिक प्रशिक्षणाला प्रवेश घ्यायला हवा. जे आपल्याला जमू शकतं , जे आपल्याला आवडतं , ते करण्याचा प्राधान्याने विचार करावा. उगीच दुसरे सांगतात , म्हणून कोणताही कोर्स जॉईन करणे आवश्यकच आहे असे नाही. तो कोर्स तुमच्यासाठी आवश्यक असेल , तर त्याचा थोडाबहुत अभ्यास करुन तो करावा की नाही ते जरुर ठरवावे. उगीच भावनिक होऊन एखादा अभ्यासक्रम सुरु करायचा आणि कंटाळा आला , जमत नाही असे म्हणून सोडून देण्यापेक्षा आधीच सारासार विचार करावा. 

          प्रत्येकवेळी मोठ्या पॅकेजचा विचार करणेही चुकीचे आहे. आपल्याला ज्या पॅकेजमध्ये मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही समाधान मिळू शकेल असे पॅकेज जरुर निवडावे. 

          काही मुले दहावी किंवा बारावी नंतर जॉबचा पर्याय निवडताना दिसतात. घरातील आर्थिक परिस्थितीनुसार त्यांना ते करावे लागू शकते. पण जॉब करता करता मुक्त विद्यापीठ जॉईन करता येते. आपल्याला हवे असेल ते शिक्षण घेण्याचा पर्याय शिल्लक आहे हे विसरू नये. नोकरी मिळाली तरी शिकतच राहावे. उच्चशिक्षण घेतले तर ते कधीही फुकट जात नसते. उलट तुमच्या पुढील वैभवशाली जीवनाला त्याने सुडौल आकारच मिळणार असतो. 

          सध्या मुली मुलांपेक्षा अधिक बाजी मारताना बघून सावित्रीबाई फुले यांची जास्त प्रकर्षाने आठवण होते आहे. फेसबुक , व्हाट्सएपच्या जगात आपल्याला मिळालेल्या लाईक्सना , कमेंट्सना महत्त्व नसून आपण एक महत्त्वाची परीक्षा पास झालो हे जास्त महत्त्वाचे आहे नाही का ? आता तुम्ही सोळा किंवा अठरा वर्षांचे झाला आहात , तुम्ही या भारताचे एक जागरुक नागरिक बनत चालला आहात हेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी खूपच वाढली आहे. तुम्ही आता लहान नाहीत. तुम्ही आता खऱ्या अर्थाने मोठे झाला आहात. तुम्ही वयाने मोठे झालात , ज्ञानाने मोठे झालात , आता मनानेही मोठे व्हा. समंजस , जिद्दी आणि सकारात्मक विचारसरणी अंगीकारा. तडजोड करायला शिका. आभासी दुनियेतून बाहेर पडा. उघडे असलेले डोळे अधिक व्यवस्थित उघडा आणि जगाकडे जाणीवपूर्वक सजगपणे बघा. तुम्ही मोठे आणि अधिकाधिक मोठे होणार हे फक्त तुमच्यावरच अवलंबून असतं. शुभेच्छा तुम्हाला या सर्वांसाठी. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , मुख्याध्यापक , शाळा शिडवणे नं.१



Tuesday, May 16, 2023

🛑 भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलचे भाग्य

🛑 भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलचे भाग्य

          गेल्या महिन्याभरात सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीची निवडणुकीची रणधुमाळी , प्रचार आणि प्रत्यक्ष भेटी यांच्या तोफा धुमधडाक्यात सुरु होत्या. 

          कालच निकाल लागला. दोन पॅनेलमध्ये जबरदस्त टक्कर पाहायला मिळाली. सर्व शिक्षक आपलेच आहेत. सर्वच शिक्षक हे प्राथमिक शिक्षक बँकेचे विद्यमान सदस्य आहेत. सर्व शिक्षक आपल्या बँकेवर अतिशय प्रेम करतात. शिक्षक बँक आहे म्हणून आपण आहोत असे म्हटले तरी अनेकांच्या बाबतीत ते अगदीच खरे ठरेल. ती आहे म्हणून आपण तिच्या एकटीच्या जीवावर कर्ज काढून घरे , लग्ने आणि आरोग्य विषयक अडचणींना तोंड देत आहोत. त्वरित कर्ज देणारी व कमी व्याज दर असणारी दुसरी बँक मला तरी माहिती नाही. 

          बँक चालवण्यासाठी त्यावर संचालक निवडून दिले जातात. बहुतेक चार वेळा सत्ता उपभोगणारे भाग्यलक्ष्मी सहकार पॅनल पाचव्या खेपेला बहुमतांनी निवडून येणे ही सोपी गोष्ट नव्हतीच. मतदार कधीही तेच तेच चेहरे पाहण्यास उत्सुक नसतात. नवीन तरुण तडपदार उमेदवार त्यांना बँकेवर हवे असतात असाच काहीसा अनुभव येतो आहे. 

          विरोधकांनी निवडून येण्यासाठी केलेले प्रयत्न नाकारुन अजिबात चालणार नाही. त्यांचा निसटता पराभव आपल्याला विचार करायला लावणारा आहे. हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या मताधिक्याने निवडून आलेल्या उमेदवारांना कदाचित या आकड्यांनी धक्काही बसला असेल. निवडून आलो म्हणून आनंदही झाला असला तरी मताधिक्य नसल्याचे दुःख सलणार हे नक्कीचे आहे. याचा अर्थ पुढील काळात डोळ्यांत तेल घालून काम करावे लागणार आहे. 

          आपण मतदार शिक्षकांना जी वचने , आश्वासने दिली आहेत ती परिपूर्ण करण्याची जबाबदारी अधिक वाढली आहे. प्रचाराच्या वेळी जसे जोमाने काम केले होते , त्याच्याहीपेक्षा जास्त काम बँकेच्या खुर्चीत बसून निरपेक्षपणे करावे लागणार आहे. पारदर्शक काम करत असताना सामान्य शिक्षक सभासदाच्या हिताचा विचार प्राधान्याने करावा लागणार आहे. सर्वच सामान्य शिक्षक बँकेत फक्त कामापुरतेच जात असतात. कधीतरी जाणाऱ्या शिक्षकांना बँकेकडून मिळणाऱ्या सेवा सुसह्य आणि लाभदायक वाटत राहायला हव्यात. शिक्षक बँकेतील कर्मचारी वर्ग अतिशय चांगला आहे. फक्त फोन केला तरी हवी असलेली माहिती मिळत असते. कर्मचारी कामात असले तर थोड्या वेळाने पुन्हा फोन करुन माहिती देतात ही सुद्धा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. कणकवली शाखेतील गेल्या चार वर्षातील माझा अनुभव सकारात्मक आहे. मी सहसा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला क्वचित उपस्थित असतो. विरोधकांनी चुकत असलेल्या गोष्टींसाठी विरोध जरुर करायला हवा या मताचा मीही आहे. परंतु विरोधासाठी विरोध करणे हेही योग्य नाही. चांगल्या गोष्टींचे त्यांनी कौतुक करायला हवे. बँकेच्या चांगल्या निर्णयांना मंजुर करण्यासाठी विरोधकांनी सुद्धा हातभार लावणे ही आपल्या सर्व शिक्षक बंधु भगिनींच्या हिताचे आहे. 

          प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात. ती अनेकदा एकसारखी होत नाहीत , म्हणूनच संवादाचे विसंवादात रुपांतर होते. शेवटी बहुमतांनी निर्णय घेतला जातोच. काही बांधव नाराज होतात. त्यांना राजी करताना नाकीनऊ येतात. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असताना त्यांनाही त्रास होतोच. मग तेही पुन्हा प्रवाहात आणि प्रवाहाच्या दिशेने वाहण्यासाठी सिद्ध होतात. त्यामुळे पुन्हा सर्व पूर्वीसारखेच सुरु होणार अशा आशा पल्लवित होण्याची चिन्हे दिसू लागतात आणि आनंद द्विगुणित होत जातो. सर्वांनी आनंदाने राहावे हेच आनंदी जगण्याचे रहस्य असते. हे रहस्य समजत जाईल तसे सर्वच सर्वांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करत राहतील.

          भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचा सूर्य पुन्हा पाच वर्षांसाठी प्रकाशमान झालेला आहे. कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करताना सदैव चारित्र्यसंपन्न राहता यायला पाहिजे. जिथे शंका येण्याची जराशी शक्यता वाटत असली तर त्यावर अधिक विचारमंथन होऊन योग्य निर्णयाप्रत यायला पाहिजे. जिथे विरोध होऊ शकतो तीच दुखरी नस असते , ती दुखू न देणे हाच तो एकमेव पर्याय आहे. कोणतेही निर्णय हे व्यक्तिनिष्ठ न होता ते बहुमतांनी आणि एकमत होऊन पारित झाले पाहिजेत. अर्थात मला यांत जास्त तपशीलवार कळत नाही , पण माझा स्वतःचा वैयक्तिक फायदा होत नसेल तर ते मला कळणार नाही असेही नाही. 

          बँकेच्या तख्तावर भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलच्या तेरा जणांची वर्णी लागली आहे. भाग्यलक्ष्मीच्या तेराही उमेदवारांसोबत आणखी दोन आपले विरोधक शिक्षक मित्र सहभागी असणार आहेत. त्यांनाही सदैव सोबत घेऊनच कार्य करावयाचे आहे. त्या उभयतांनीही नेहमी आपल्या शिक्षक बँकेच्या हिताचाच विचार केलेला असणार आहे. 

          भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलचे भाग्य पुनश्च उजळले आहे. ते सदैव आणि अक्षय उजळत राहो अशी भाग्यलक्ष्मी चरणी प्रार्थना करतो. सर्व नवनिर्वाचित संचालकांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील पाच वर्षांच्या दैदिप्यमान वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( कणकवली ) ( 9881471684 )

Friday, May 12, 2023

🛑 सावंतवाडीचे पाईक : नारायण नाईक

🛑 सावंतवाडीचे पाईक : नारायण नाईक

          सर्व सृष्टी संकटाच्या खाईत असताना आठवण येते ती विष्णू नारायणाची. नारदमुनी तर ' नारायण नारायण ' असा नित्य जप करत असतात. भाग्यलक्ष्मी आणि नारायण यांचं नात सर्वानाच ज्ञात आहे. सावंतवाडीचे भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलचे विद्यमान उमेदवार नारायण नाईकसर हे भाग्यलक्ष्मीचे पाईक आहेत. निष्ठावंत आहेत. शांत आणि संयत व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण आविष्कार आहेत. 

          स्वतः नारायण रिंगणात उतरले कि विजय ठरलेला असतो. हा विजय ' न भूतो , न भविष्यती ' असणार असे भाकित केले तरी ते खोटे थोडेच ठरणार आहे. आपले सर्व शिक्षक बंधु भगिनी मतदार अतिशय सुज्ञ आहेत. ते जुन्या जाणत्या आणि तरुण तडफदार उमेदवारांचा संयोग असणाऱ्या उमेदवारांना निवडून देणार हे स्पष्ट आहे. 

          सावंतवाडी ही सुंदरवाडी आहे. ती अधिक सुंदर बनण्यासाठी शिक्षक बँकेत ' नारायण ' नाईक जिंकुन आले पाहिजेत. सावंतवाडी बँकेसाठी ' नारायण नावाचं अस्त्र नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. ज्यांच्या नावात नारायण असतो , ते सदैव अजिंक्य ठरल्याची उदाहरणे आहेत. 

          शिक्षक समितीच्या सभा , अधिवेशनात नारायण नाईक यांची आणि माझी पुसटशी भेट घडत राहते आहे. भेट सतत घडली नाही तरीही एका भेटीतही नारायण नाईकांचा प्रभाव पडण्याइतके ते प्रभावी नक्कीच आहेत. 

          ते आता आमच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत हेही विसरुन चालणार नाही. एवढ्या मोठ्या संघटनेचे महत्त्वाचे पद सहजासहजी मिळत नसते. त्यासाठी माणसांत नारायण असावा लागतो. नावाप्रमाणे हा ' नारायण ' त्यांच्यात आहे. आमच्या कणकवली शाखेच्या अनेक कार्यक्रमांना असलेली त्यांची हजेरी म्हणूनच सार्थ ठरते. " ते आले , त्यांनी पाहिलं , ते बोलले आणि त्यांनी जिंकून घेतलं " असंच काहीसं त्यांच्याबाबतीत घडताना दिसतं. 

          एखादं नाटक सुरु असावं आणि अचानक मुख्य नटाच्या घरात दुःखद घटना घडावी. दुःख झालं तरी ' शो मस्ट गो ऑन ' असं म्हणत डोळ्यांतील अश्रूंना आवर घालत प्रयोग पूर्ण करणं हे एका आदर्श अभिनेत्याचं कर्तव्य असतं. तसंच घडलं जिल्हाध्यक्ष नारायण नाईकांच्या बाबतीत. त्यांच्या घरात दुःखद घटना घडली होती. त्यांना दुःख अनावर झालं होतं. त्यांनी आपल्या दुःखावर मात करण्याचा प्रयत्न केला. पोटात अतीव दुःख होतं , पण ते ओठात न आणण्याचा प्रयत्न करत होते. कधीकधी असंही करता आलं पाहिजे. मोठी माणसे सर्वांसमक्ष रडत बसत नाहीत , त्यांचं रुदन आतल्या आत असतं. 

          जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळताना घरातील अशा घटनांकडे भावनाविवश न होता जिद्दीने , चिकाटीने सामना करत राहिले. शाळा , सभा , आंदोलने , मोर्चा यांत सामील झाले. संघटनेला जिल्हाध्यक्ष म्हणून कमतरता जाणवू दिली नाही. आपली उपस्थिती फक्त हजेरीपुरती मर्यादित न ठेवता अनमोल असे मार्गदर्शन करत राहिले. 

          असे कणखर ' नारायण व्यक्तिमत्त्व ' आपल्याला लाभले आहे हे आमचे भाग्य म्हणायला हवे. आम्ही सर्व शिक्षक बंधु भगिनी आमच्या या नारायण नाईकांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणणारच. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



🛑 भाग्यलक्ष्मीचे खणखणीत नाणे : संतोष राणे

🛑 भाग्यलक्ष्मीचे खणखणीत नाणे : संतोष राणे 

          देवगड तालुक्यात असताना अनेक शिक्षकांच्या भेटी घडल्या. संतोष राणेसर यांची भेट तिथेच घडली. त्यांच्या पत्नी त्यावेळी चांदोशी शाळेत होत्या. मी त्याच तळवडे केंद्रात होतो. केंद्रसंमेलनाच्या निमित्ताने आम्ही चांदोशी शाळेत तीन ते चार वेळा तरी गेलो असेन. त्यावेळी मॅडम साटम नावाने आम्हाला परिचित होत्या. त्यांचे लग्न ज्यांच्याबरोबर झाले ते म्हणजे संतोष राणेसर. अतिशय दिलखुलास माणूस. हसरा चेहरा ही त्यांची विशेष ओळख. 

          शिक्षक समितीची सभा किंवा त्रैवार्षिक अधिवेशन असेल , तेव्हा संतोष राणेंचे प्रथम दर्शन झाले. त्यांच्या कार्याबद्दल जिल्ह्याचे पदाधिकारी भरभरुन बोलत होते. मी त्यांना अजिबातच ओळखत नव्हतो. त्या दिवसापासून त्यांचा हसतमुख चेहरा भावत गेला. त्यांनी स्वतः बद्दल सांगितले नाही. त्यांच्या शैक्षणिक कार्याने ते मला परिचित झाले. त्यांच्या भाषेतील माधुर्याने त्यांनी शाळा परिसरातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना , ग्रामस्थांना शाळेच्या उपक्रमात सक्रिय सहभागी होण्यास भाग पाडले होते. संतोष राणे गुरुजी मुलांचे साने गुरुजी ठरत गेले ते यामुळेच. जातील तिथे ते त्यांच्या कामाचा ठसा ठळकपणे उमटवून जातात. नंतर येणाऱ्या शिक्षकांना संतोष राणेंसारखे काम करणे म्हणूनच आवश्यक होऊन जाते. नाहीतर संतोष राणे सरांच्याच नावाचा उल्लेख सदासर्वदा कानी पडत राहतो. संतोष राणे आपले काम करत राहतात , त्यांचे काम बघून इतरांना तसे काम करण्याची आपसूकच प्रेरणा मिळत जाते. मलाही त्यांच्या कार्याने प्रेरणा मिळालेली आहे. 

          देवगड तालुक्यातील संतोष राणे हे सर्व शिक्षकांचं लाडकं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा मनुष्यसंग्रह अफाट आहे. एकदा ते मला ' नानासाहेब धर्माधिकारी ' यांच्या प्रतिष्ठानात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून पुन्हा दिसले. ते आपल्याला दिलेला विषय पोटतिडकीने मांडत होते. बोलून बोलून त्यांचा घसा बसला होता. येणाऱ्या सात आठ माणसांच्या गटाला तीच तीच माहिती पुन्हा पुन्हा सांगायची होती. परंतु न थकता संतोष राणे आपली जबाबदारी इमानेइतबारे पार पाडत होते. तिथे मला त्यांच्यातला एक अध्यात्मिक माणूस दिसला. शिक्षणातही अध्यात्म वापरता येतं या विचारांचा मीही आहे. अध्यात्माने त्यांच्या व्यक्तिमत्वात आलेला संयमीपणा जास्त दिसून येतो. मुखावर दिसणारे तेज चमकत राहते. मी ज्या शाळेत साडेतीन वर्षे अतिशय उत्साहाने काम केले , त्याच शाळेत ते सध्या आहेत. गोवळ गावठण शाळा. 

          संतोष राणे यांची निवड भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलने करुन दूरदृष्टीने विचार केलेला दिसून येतो. त्यांचा संयमी दृष्टिकोन आणि अध्यात्मिक विचारसरणी शिक्षक बँकेच्या यशात वृद्धी करण्यासाठी उपयोगी ठरेल हे नक्कीचे आहे. 

          माझ्या पत्नीच्या निधनानंतर माझे सांत्वन करण्यास ते आले होते. त्यामुळे मी त्यांना कसा विसरु ? माझा हात हातात घेताना त्यांच्याही डोळ्यांत अश्रुंची गर्दी झालेली मी पाहिलेली आहे. संकटकाळी मला त्यांनी दिलेला आधार मला मानसिक बळ देणारा ठरला. 

          असे दुसऱ्यांच्या दुःखात वेळीच आधार देणाऱ्या शिक्षकांपैकी ते एक आहेत. त्यांच्यासारखा संवेदनशील शिक्षक बँकेत असेल तर सर्वसामान्य शिक्षकांच्या गरजा पूर्ण होतील असे वाटते. संतोष राणे म्हणजे भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलचे एक खणखणीत नाणे आहे. हे नाणे नक्कीच प्रचंड निवडून येऊन गाजणार आणि वाजणार. संतोष राणेंच्या पाटीवर शिक्का मारुन त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणाल एवढीच आशा बाळगतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ,  कणकवली



🛑 आदर्श स्काऊट मास्टर : सीताराम लांबरसर

🛑 आदर्श स्काऊट मास्टर : सीताराम लांबरसर 

          काही निवडक शिक्षक शैक्षणिक प्रक्रिया राबवित असताना विविध उपक्रम राबवत असतात. हे उपक्रम राबवून ते थांबत नाहीत. त्यांना अधिक आणि वैशिष्टपूर्ण उपक्रमांची धडपड स्वस्थ बसू देत नाही. 

          सीताराम लांबर सर हे अनेक शिक्षकांमधून वेगळे असे त्यासाठीच ठरतात. स्काऊट नावाची चळवळ ते चालवतात. स्काऊटचे नऊ नियम ते काटेकोरपणे पाळतात , नव्हे ते नियम त्यांच्या अंगी भिनले आहेत म्हणा ना !!!

          हे मी आत्मविश्वासपूर्वक का सांगू शकतो ? कारण मी आणि सीताराम लांबरसर मालवण तळगाव येथे निवासी स्काऊट मास्टरचे प्रशिक्षण सलग सात दिवस केले आहे. एकत्र राहिल्यामुळे त्यांच्यासोबत काही महत्त्वाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. ते आमच्या पथकात नव्हते , तरी दिवसभरातील विविध क्रियाकलापांमध्ये त्यांचा असलेला सक्रिय सहभाग डोळ्यासमोर येऊन जातो आहे. 

          रात्री होणाऱ्या ' कॅम्प फायर ' मध्ये त्यांनी मोठया आवाजात दिलेल्या आणि स्वनिर्मित आरोळ्या सर्वांचेच लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या होत्या. नवोपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत , कदाचित या सर्वांचे लिखित स्वरुप त्यांच्याकडून करायचे राहून गेले असेल. 

          लांबरसर ज्या शाळेत जातात , त्या शाळेचा चेहरा मोहरा बदलून टाकतात. त्यांनी आतापर्यंत काम केलेल्या शाळेतील बालक आणि पालक याचे समर्पक उत्तर देऊ शकतात. त्यांनी सर्व शाळांमध्ये धडपड्या शिक्षकांसारखं कार्य केलेलं आहे. 

          लांबरसरांच्या माता पित्यांना त्यांचा रास्त अभिमान असायलाच हवा. त्यामुळे त्यांचं नावच त्यांनी सीताराम ठेवलं असावं.  त्यांच्या नावात सीता आणि राम या दोन्ही उभयतांचं अस्तित्व प्रत्येकवेळी जाणवत राहतं. एकवचनी , एकपत्नी आणि एकबाणी असलेला राम म्हणूनच आपल्या जास्त लक्षात राहतो. पतिव्रतेचं महान पावित्र्य जपणाऱ्या सीतेचं म्हणूनच आपण नित्य स्मरण करतो. या दोहोंच्या नावापासून बनलेल्या नावात आणि ते धारण करणाऱ्या व्यक्तीत देखील नक्कीच त्यांच्या दैवी गुणांचा अंश असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

          नेरुर माड्याचीवाडी माध्यमिक विद्यालयात एक दिवसीय ' भगीरथ प्रतिष्ठान ' चे शिक्षक प्रशिक्षण होते. त्यावेळी वेंगुर्ले तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून अतिशय मुद्देसूद असे मनोगत व्यक्त करणारे सीताराम लांबर सर म्हणूनच माझ्या जास्त लक्षात राहिले आहेत. ते अग्रकर्मी आहेत. कोणीतरी उठून उभे राहून बोलतील असा विचार न करता झटकन व्यासपीठाकडे हसतमुखाने जात विचार व्यक्त करणारी माणसं सहसा दुर्मिळ असतात. सीताराम लांबरसर त्या दुर्मिळ व्यक्तींपैकी एक आहेत. 

          भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलचे ते सीताराम आहेत. ते वेंगुर्ल्याच्या पतपेढीच्या सिंहासनावर विराजमान होतील याची शंका बाळगण्याचे कारण नाही. शिक्षक मतदार बंधु आणि भगिनींनो , आपल्या सीताराम लांबरसरांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्यायचे हे मात्र फक्त तुमच्या आणि तुमच्याच हातात आहे. मग 14 तारखेला होणाऱ्या मतदानाचा तुमचा  हक्क तुम्ही नक्कीच वापरा ही भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलची आपणांस कळकळीची विनंती आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली



Wednesday, May 10, 2023

🛑 विजय सावंतांचा विजय होणारच

🛑 विजय सावंतांचा विजय होणारच

          ज्यांच्या नावातच विजय आहे , ते विजयी होणार यात कोणालाही शंका असायला नको. या माणसाचा ज्यावेळी जन्म झाला असेल त्यावेळी त्यांच्या माता पित्यांनाही किती आनंद झाला असेल ? त्यांच्या जीवनात नव्या बालकाने पदार्पण केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या मनातील इच्छेचाच विजय झाला होता. असा गोड गोंडस बाळ जन्माला आल्यावर हा पुढे कायमच विजयी ठरावा म्हणून त्याचे नाव विजय ठेवण्यात आलं असावं. 

          कुडाळ तालुक्यातील पदवीधर शिक्षक विजय सावंतांबद्दल मी बोलतोय. एक प्रचंड विजयी मुद्रेचं व्यक्तिमत्त्व मला मित्र म्हणून लाभलं म्हणून मीही भाग्यवानच. 

          एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे विजय सावंत. शिक्षक हा शीलवान , क्षमाशील आणि कलाकार असावा लागतो. हे तिन्ही गुण विजय सरांमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. त्यांचं प्रेमळ हास्य आणि आपुलकीचे शब्द समोरच्या माणसाला मित्र करुन जातात. मित्राने कसं असावं ह्याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे विजय सावंत. 

          भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलच्या कुडाळ तालुक्यातील उमेदवार म्हणून विजय सावंत सरांची निवड ही अपेक्षितच होती. त्यांनी केलेला मनुष्य संग्रह त्यांना यावेळी नक्कीच उपयोगी पडणार आहे. काहीतरी मिळावं म्हणून तात्पुरता हा मनुष्यसंग्रह नसून तो कायमचा आहे हेही सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. विजय सावंत सर हे तळागाळापर्यंत जाऊन काम करणारे शिक्षक आहेत. विजय सर अन्यायाला वाचा फोडणारे आणि न्यायाची विजयश्री खेचून आणणारे आहेत हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांचा विजय हा 100 टक्के निश्चित आहे. 

          हे विजय सर माझे खास मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी लिहू शकतो आहे. यांचा आणि माझा परिचय देवगड तालुक्यात झाला. देवगड तालुका स्कुलमध्ये महिन्याच्या पगाराच्या वेळी अनेकदा आम्ही एकत्र आलो होतो. ओळख वाढत गेली आणि स्नेह वाढत गेला. त्यावेळी माझी गाडी नव्हती. विजय सावंत सरांनी मला बऱ्याचदा माझ्या मुक्कामी सोडले आहे. ' जाता जाता भलं करावं ' अश्या विचारसरणीचे ते आहेत. त्यांनी देवगड तालुक्यात कुवळे शाळेत असताना अनेक विद्यार्थीकेंद्रित उपक्रम राबवले होते. संगीत हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय आहे. संवादिनीवर त्यांची फिरणारी बोटं पाहिली कि त्याचा अंदाज येतो. त्यांचा स्वतःचा आवाजही कर्णमधुर आहे. त्यांच्या भजनात बसाल , तर भजन संपू नये असं वाटत राहील. त्यांना आपल्या या गुणांचा अजिबात गर्व नाही , अभिमान मात्र नक्कीच आहे. 

          कित्येक प्रशिक्षणांचे मास्टर ट्रेनर म्हणून अतिशय उत्साहाने काम करताना आम्ही त्यांना अनेकदा पाहिले आहे आणि अनुभवलेदेखील आहे. ते तत्त्ववादी आहेत. जे करायचे असते ते हमखास करणारच. त्यात आपला जीव ओतून काम करतील. तहानभूक विसरुन काम करण्याची त्यांची ही क्षमता ते शिक्षक बँकेच्या विकासासाठी नक्कीच वापरतील. आपल्या भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलच्या तत्त्वांशी प्रामाणिक राहून कार्य करणारा संचालक कुडाळ तालुक्यात प्रचंड बहुमतांनी निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. जे व्हायचे आहे ते होणारच. त्याला कोणीही विरोधकांनी विरोध करायचा म्हणून केला तरीही कोणताही फरक पडणार नाही. उलट फायदाच होईल. 

          विजय सावंतसर आणि मी एकदा शिरगाव हायस्कुलमध्ये 4 थी इंग्रजीचे मास्टर ट्रेनर म्हणून एका वर्गावर होतो. त्यावेळी त्यांची आणि माझी जास्त जवळीक झाली. त्यांच्या वक्तृत्वाने मी खरंच प्रभावित झालो. त्यांनी आपल्या अनुभवातून केलेलं विवेचन मी लक्षात ठेवलं आहे. त्यांची बोलण्याची शैली श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. मलाही त्यांचा सुवास आणि सहवास लागला आणि मी घडत गेलो. त्यांना असलेली गाण्याची जाण त्यांच्या गायनाने समजते. 

          त्यांच्या शिक्षक मित्रमंडळाच्या माध्यमातून कुडाळ शिक्षक कलामंच नावाची सांस्कृतिक संस्था कदाचित त्यांच्याच सुपिक डोक्यातून आली असावी असे माझे स्पष्ट मत आहे. कोरोना काळात त्यांनी केलेले सादरीकरण यु ट्यूबवरुन पाहताना मला माझ्या या मित्राबद्दलचा  अभिमान सदासर्वदा वाढवत जात होता. विजय सरांच्या शाळेचा संघ असेल तर क्रीडास्पर्धेत त्यांच्याबरोबर स्पर्धा करणं सोपी गोष्ट नसते. पूर्ण तयारीनिशी विजय सर स्पर्धेत उतरत असतात. यावेळीही विजय सावंतसर पूर्ण तयारीनिशी प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुक रिंगणात उतरले आहेत. त्यांनी खेचून आणलेली विजयश्री मला आताच समोर दिसू लागली आहे. विजय सर म्हणजे कुडाळ तालुक्याला लाभलेला एकमेव विजयाचा चेहरा आहे. माझ्या या खास मित्राला कुडाळ तालुक्यातील आपण शिक्षक बंधु भगिनी मिळून  सर्वांनी प्रचंड बहुमतांनी विजयी करणार आहात म्हणून आधीच मी आपले शतशः आभार मानतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Thursday, May 4, 2023

🛑 4 मे ची भीषण काळरात्र

🛑 4 मे ची भीषण काळरात्र

          दरवर्षी हा 4 मे येतो. गेली 16 वर्षे हा दिवस येताना मी मात्र जुन्या काळात जातोच जातो. कितीही कोणीही समजावून सांगितले तरी माझ्यात कोणताच फरक पडत नाही. 

          जगातील सगळ्या माणसांचं असंच होत असेल का ? मला माहित नाही. पण मला नाही सहन होत !!! त्या दिवसांपूर्वीचे दोन्ही संघर्षमय दिवस आठवून अंगाला कापरे भरतेच. रात्र रात्र पुन्हा तेच ते भयानक क्षण आठवत राहतात. 

          ती भयाण काळरात्र जशीच्या तशी आठवून तीव्र होत जात राहते. मी तिच्या जवळ बसलो आहे. तिच्यासोबत बोलत आहे. हातात हात घेतला आहे. तिच्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करतो आहे. तीही मग मी आनंदी दिसावं म्हणून तशीच करते आहे. मनातून दोघेही दुःखी असताना आनंदाचं नाटक करताना किती भीषण अनुभवत होतो मी. 

          दोन दिवसांपूर्वी तिच्या पदरातून नव्हे उदरातून गोंडस बाळाचं हिरावून नेणं ती कशी विसरु शकणार होती. शरीराला होत असलेल्या वेदना तिला कमी वाटत असाव्यात. मनाच्या वेदना मात्र तिच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी आणत होत्या. मी मात्र रडायला विसरु पाहत होतो. तिच्यासमोर न रडता तिच्या अपरोक्ष जेवढं जमेल तेवढं रड रड रडत होतो. 

          ती मला सांभाळू पाहात होती आणि मी तिला. तिने मला बऱ्यापैकी सावरले होते. मीच तिला सावरण्यात कुठे कमी पडलो की काय देव जाणे ?  

          रिकामं झालेलं शिवलेलं पोट तिला जणू नकोसं झालेलं. झालेला मुलगा आम्ही तिला बघूही दिला नव्हता हा मात्र आमचा सर्वात मोठा दोष असावा. तिला गतप्राण झालेला मुलगा आम्ही तरी कसा काय दाखवू शकणार होतो ? बोलण्याइतकी ती सोपी गोष्ट नक्कीच नव्हती. अर्थात मुलाला तसं दाखवल्यानंतर तिला मोठा मानसिक धक्का बसेल असे आम्हाला वाटले. भुलीतून बाहेर आल्यानंतर तिचे सत्य समजले तेव्हा तिला ते बिल्कुल मान्यच नव्हते. तिचे डोळे पाण्याने इतके भरुन गेले होते कि पाणी थांबता थांबत नव्हते.  

          मी एकांतात तिला अनेक पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मला अजून दुःख होऊ नये म्हणून तिने तिला झालेलं दुःखही गिळून टाकण्याचा प्रयत्न करुन पाहिला होता. शारीरिक वेदना आणि मानसिक वेदना या दोघांची बेरीज झाली होती. तिचे शरीर आणि मन दोन्ही तिला साथ देईनासे झाले होते. 

          एक दोन तासांनी नर्स येत आणि एखादे मोठे इंजेक्शन देऊन निघून जात. ते घेत असताना तिला दुखत असल्याचा लवलेश तिच्या चेहऱ्यावर दिसत नसे. आज मात्र इंजेक्शन दुखत असल्याचे मलाही जाणवले. तिला दरदरून घामही फुटला होता. मी तिचा घाम रुमालाने पुसण्याचा प्रयत्न करेपर्यंत तिचे डोळे पांढरे झाले होते. दातखिळी बसली होती. 

          परिस्थिती चिंताजनक असल्याचे समजताच डॉक्टर आले. त्यांनी आपल्या परीने तिला वाचवण्याचे शेवटचे प्रयत्न करताना मी प्रत्यक्ष पाहत होतो. मी मोठ्याने ओरडण्याशिवाय काहीही करु शकत नव्हतो. 

          तिचा हात माझ्या हातातून सुटला होता कायमचा. ती भीषण काळरात्र मी कधीही न विसरण्यासारखी आहे. माणसं जिवंत नसली तरी त्यांच्या सोबतच्या आठवणी मात्र जिवंत होऊन अशी पाठ धरतात. माझ्या कै. पत्नीला ( ऐश्वर्याला ) भावपूर्ण आदरांजली. ती गेली आणि तिनेच मला ईश्वरी आणून दिली आहे अशी माझी भावना आहे. इतकी वर्षे तिच्यात मी तिलाच बघतो आहे. त्यामुळे ऐश्वर्या आणि ईश्वरी दोघांच्या नावातही मी बरंच साम्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल



🛑 चंद्राचे हास्य लाभलेले पाताडेसर

🛑 चंद्राचे हास्य लाभलेले पाताडेसर

          सुंदर , निखळ आणि निर्मळ हास्य हा सत्याभिनय ज्यांच्या चेहऱ्यावर सदैव विराजमान असतो असे आमचे जिल्ह्याचे भाग्यलक्ष्मीचे तरुण तडफदार उमेदवार म्हणजे चंद्रसेन पाताडे. 

          जन्मतः चंद्रासारखे हास्य लाभलेल्या या शिक्षकाचं नावही कदाचित त्यावरुनच ठेवलं गेलं आहे की काय अशी खात्री वाटल्याखेरीज राहणार नाही. चंद्रासारखं शीतल हास्य ज्याच्या मुखात सदा विलसत असेल , त्या माणसाचा नुसता चेहरा बघितला तरी समोरचा माणूस शत्रुत्वही विसरेल. खरंच चंद्रसेन पाताडे सरांचं वर्णन करताना शब्दांची कोणतीही पत आडे ( पाताडे ) येत नाही. त्यांनी आपल्या आडनावाप्रमाणे आपली शिक्षकी पेशाची पत कायम राखली आहे. 

          शिक्षक समितीच्या प्लॅटफॉर्ममधून माझी आणि त्यांची अनेकदा भेट झाली आहे. त्यांचं आगळंवेगळं स्मितहास्य पाहणं ही माझ्यासाठी पर्वणीच. भेटू तिथे हस्तांदोलन ठरलेलेच. कुबलसर , कसे आहात ? ही आश्वासक विचारपूस हमखास असणारच. मी तसा स्वतःच्या प्रसिद्धीपासून कायम दुर राहणारा असलो तरी मी तालुका प्रसिद्धी प्रमुख झाल्यापासून जिल्हा आणि राज्य पदाधिकाऱ्यांच्या अधिक लक्षात राहू लागलो आहे. कणकवली तालुका शिक्षक समिती संघटनेने दिलेला हा विश्वास आहे. प्रसिद्धीबाबत मला जेवढे जमेल ते मी स्वतःहून करत असतो. तरीही प्रत्येक माणसाला मर्यादा आहेतच ना ? 

          चंद्रसेन पाताडे सरांच्या क्षमता मात्र अमर्याद आहेत. शिक्षक संघटना , शालेय कामकाज आणि त्यांची सामाजिक संघटना यांत ते स्वतःला झोकून देऊन काम करीत असतात. ओठात आणि पोटात दोन्ही ठिकाणी समान विचार धारण करणारे आपले चंद्रहास म्हणूनच खूप कमी वयात एवढे उच्च पदापर्यंत पोहोचू शकले. त्यांच्या समाज संघटनेमध्ये त्यांनी केलेले कार्य आणि मिळवलेले सन्मान यावरुनच या माणसाच्या सामाजिक असण्याची प्रचिती येते. 

          पाताडे सरांसोबत मी एकदा , दोनदा किंवा तीनदा जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेण्यासाठी होतो. त्यावेळी चर्चेत भाग घेताना त्यांनी मांडलेली परखड मते माझ्यावर आणि सर्वांवर प्रभाव टाकणारी होती. सहज बोलण्यातून समोरच्या व्यक्तीच्या मनात शिरणं त्यांना जमतं. एखाद्याच्या चांगल्या सादरीकरणाला दाद देणारे ते प्रोत्साहक आहेत. मी कुठल्या तरी शैक्षणिक प्रशिक्षणात एका बालगीताचे सादरीकरण केले होते. प्रशिक्षण संपताच पाताडे माझ्या अगदी जवळ आले आणि माझ्या गायनाची तोंड भरुन स्तुती केली. एखाद्याच्या चांगल्या कौशल्याची स्तुती करायलाही मोठं मन असावं लागतं. एवढं मोठं मन असल्यामुळेच ते आम्हा शिक्षकांच्या , समाजबांधवांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात आदराची पेरणी करु शकलेले आहेत. 

          भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलमधील अभ्यासू उमेदवारांमध्ये चंद्रसेन पाताडे सर अधिक उठून दिसतात. प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत जिल्हा उमेदवार म्हणून हमखास निवडून येऊ शकणारे आमचे मित्र चंद्रसेन पाताडे म्हणूनच मला जास्त महत्त्वाचे वाटतात. त्यांना निवडून आणणे हे मतदारराजा म्हणून फक्त तुमच्या आणि तुमच्याच हातात आहे. तुम्ही त्यांना प्रचंड मतांनी निवडून देणार हे चंद्राच्या शीतल प्रकाशाइतके खरे आहे. निवडणुकीपूर्वीच मला त्यांचं निवडून आलेलं चंद्रहास्य दिसू लागलं आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



Wednesday, May 3, 2023

🛑 समितीचे More ( मोअर ) संतोष

🛑 समितीचे More ( मोअर ) संतोष

          काही अशी माणसं शिक्षणक्षेत्रात आली आणि या क्षेत्राचं सोनं करुन टाकलं. शिक्षणक्षेत्रात धडाडीचं कार्य करता करता सहकार क्षेत्रात उतरुन तिथेही आपली पात्रता सिद्ध करुन दाखवली. सर्वांच्या मनात कायमच संतोष पेरण्याचं काम करणं सोपी गोष्ट कधीच नसते. पण हे व्यक्तिमत्त्व याला अपवाद ठरलं. नावातच संतोष असल्यामुळे की काय , जातील तिथे आनंदाच्या शब्दांची साखरपेरणी करत गेले.

          वैभववाडी तालुक्याला संतोष मोरे सरांच्या रुपाने एक अनमोल असा हिराच सापडला आहे म्हणा ना !! संतोष मोरे हे वैभववाडी तालुक्याचं वैभव आहेत. संतोष मोरेंचा तालुका म्हणूनही तालुक्याची ओळख करुन दिली तरी चालू शकेल इतकी त्यांची घरोघर पडलेली छाप सांगते. संतोष मोरे कमी बोलतात , पण त्यांनी केलेले कार्य जास्त बोलते. 

          मी 31 मार्च 2012 साली वैभववाडी तालुक्यातील मांगवली नं.१ शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून हजर झालो. काही कामानिमित्त भुईबावडा येथे जाणे झाले. तेथे संतोष मोरे सरांची पहिली भेट झाली. त्यांचं दाढीतून हसणं नेहमीच मला भावतं. त्यांच्या प्रेमळ शब्दांनी लगेचच माझं मित्रत्वाचं नातं जोडलं गेलं. असे करत करत त्यांनी अनेक शिक्षक बंधु भगिनी जोडले. शिक्षकच नव्हे तर शिक्षकेतर बांधव देखील त्यांना ओळखतात. एक विद्यार्थी पालकप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी आपली ओळख सर्वदूर पोहोचवली आहे. त्यांची वेगळी प्रसिद्धी करण्याची अजिबात गरज नाही. त्यांच्या आगळ्या वेगळ्या व्यक्तित्वामुळे त्यांची सुप्रसिद्धीच झाली आहे. वैभववाडी तालुक्याचे शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष असताना मी त्यांना अगदी जवळून अनुभवले आहे. त्यांनी आपल्या वेगळ्या शैलीतून शिक्षकांना एकत्र केले आहे. त्यांचे मित्रच जास्त आहेत. शक्यतो मोरे सर एकटे कमीवेळा दिसतील , पण शिक्षकांच्या गराड्यात जास्त दिसतील. 

          मला शिक्षक बँकेचे कर्ज काढायचे होते. मला दोन जामीन तारण शिक्षकांची नितांत गरज होती. मी वैभववाडीत नवीनच होतो. शाळेतील दोन्ही जामीन मिळणे कठीण झाले होते. प्रत्येकाने आपले त्रिकुट बनवून ठेवले होते. तरीही एक जामीन शाळेतूनच मिळाले. दुसरे जामीन कोण ? हा माझ्यासमोर प्रश्न होता. हा माझा प्रश्न मी न सांगताच त्यांच्यापर्यंत कसा पोहोचला मला माहिती नाही. उलट मोरे सरांनीच मला फोन करुन जामीन व्यक्तीचे नाव सांगितले. ते म्हणाले , " कुबलसर , तुम्ही फक्त प्रिती जाधव मॅडमांकडे जा आणि सही घ्या. माझे नाव सांगा , तुम्हाला सही मिळणार. " आणि खरेच तसेच घडले. हेत केंद्रशाळेत मला अनोळखी असलेल्या प्रिती जाधव मॅडम यांनी जामीन म्हणून सही दिलीसुद्धा. वैभववाडी तालुक्यातून बदली होईपर्यंत मला जामीन बदलण्याची वेळच आली नाही. संतोष मोरे सरांमुळे मला मिळालेली तातडीची सही मी कधीही विसरु शकणार नाही. 

          मी समितीमध्ये अधिक सक्रिय होण्यासाठी वैभववाडी तालुक्यामध्येच खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तिथे माझ्याकडे कोणतेही पद नव्हते , तरीही मोरे सर सांगतील तिथे मी जात होतो. 

          मोरे सरांच्या घरी सात वर्षांत वैयक्तिक कार्यक्रमांना अनेकदा गेलो असेन. त्यामुळे त्यांच्याशी घरोब्याचे संबंध प्रस्थापित होत गेले. माझ्यासारखे अनेक शिक्षक बंधु भगिनी असेच त्यांच्याशी कायमस्वरुपी जोडले गेले आहेत. पुन्हा कणकवलीत आल्यानंतर आता जाणे होत नाही. तरीही त्यांच्यासोबतच्या आठवणी आजही ताज्या आहेत.

          माझ्या कणकवलीतील आर्यादुर्गा येथील खोलीच्या गृहप्रवेश प्रसंगी संतोष मोरेसर आपल्या टीमसह आले होते. समिती संघटना वाढीसाठी मोरे सरांनी मोअर प्रयत्न केले आहेत , अजूनही करत आहेतच. 

          भाग्यलक्ष्मी पॅनलचे वैभववाडी तालुक्याचे उमेदवार म्हणून प्रचंड बहुमतांनी निवडून येणार हे सर्वांच्या मनात आधीच ठरलेले आहे. तरीही ते माझे लाडके शिक्षकनेते म्हणून मीही आवाहन करतो. आपण सर्व वैभववाडी तालुक्यातील शिक्षक बंधु भगिनींनो , आपल्या धडाडीच्या शिक्षक नेत्याला बहुसंख्य मतांनी निवडून आणा आणि वैभववाडी शिक्षक बँकेच्या तख्तावर पुनश्च विराजमान करा. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



🛑 महेंद्र पावसकरसर : एक शैक्षणिक महा इंद्र

 🛑 महेंद्र पावसकरसर : एक शैक्षणिक महा इंद्र

          शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकाकडे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असावे लागते. सगळ्यांकडे सगळेच गुण कसे असतील ? हे गुण प्रयत्नपूर्वक मिळवावे लागतात. कोणीही सर्वगुणसंपन्न नसतं. चांगल्या गुणांचा संचय असणारी माणसं चार चौघात उठून दिसतात. बाह्यगुण आणि आंतरिक गुण दोन्हींची पारख करुनच एखाद्याला मोठेपणा मिळत असतो. दिसणं आणि असणं या दोघांमध्ये थोडीशी जरी फारकत झाली तरी चरित्र डळमळू शकतं.
          माझे मित्र महेंद्र पावसकर हे एक उपक्रमशील शिक्षक आहेत. ते साधे , सरळ आहेत. शक्यतो ते मौन पाळतात. संथ वाहणाऱ्या सागराच्या अथांग खोलीचा अंदाज येत नसतो. महेंद्र पावसकर सरांचं ज्ञान हे अथांग सागरासारखं आहे. ते मार्गदर्शन करु लागले कि त्यांच्या ज्ञानाचा प्रत्यय येतो. ते उठसूट बोलत सुटत नाहीत. मोजकेच पण मुद्देसूद बोलण्याची त्यांची पद्धत आहे. त्यांचं बाह्य व्यक्तिमत्त्व आकर्षक आहेच हे कोणीही सांगेल.
          ते कलेचे वेडे आहेत. ते कृतीशील शिक्षक म्हणून ओळखले जातात. ' आधी केले , मग सांगितले " ही उक्ती त्यांना बरोबर लागू पडते. त्यांच्याकडे टाकाऊ साहित्य द्या , ते त्यापासून टिकाऊ आकर्षक उपयोगी साहित्य खूप कमी वेळात बनवून दाखवतील. ही चित्र , शिल्प प्रथम त्यांच्या मनात येतात , मगच ती प्रत्यक्षात अवतरतात. त्यांच्या मुलाला त्यांनी हेच कलेचं बाळकडू पाजलं आहे. त्यांचा मुलगा त्यांच्याहीपेक्षा वरचढ बनला आहे. बाप से बेटा सवाई म्हणतात ना !!! अगदी तस्साच.
          बाहुली नाट्य सादर करणं म्हणजे महेंद्र सरांच्या हातचा मळ आहे. एकदा फणसगाव बीटस्तरीय शिक्षक संमेलनात त्यांचा हा आविष्कार मला प्रत्यक्ष पाहायला मिळाला. बाहुल्या नाचवत बोलणं ही सोपी गोष्ट नसते. महेंद्र सरांनी त्याचं शास्त्रीय प्रशिक्षण घेतलं आहे.
          महेंद्र पावसकरसर यांची भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलमध्ये जिल्हा उमेदवार म्हणून झालेली निवड अतिशय योग्य आहे. आपल्याला दिलेलं कार्य इमाने इतबारे करताना मी त्यांना कित्येक वर्षे पाहात आलेलो आहे. कार्य तडीस कसं न्यायचं हे त्यांच्याकडून शिकावं. स्वतः कोणतेही टेन्शन न घेता आणि दुसऱ्यांनाही टेन्शन न देता कार्य सिद्धीस नेणं त्यांना लिलया जमतं. सतत काम करत राहणं हा त्यांचा खाक्या आहे.
          महेंद्र पावसकर सरांसारखे उच्च विद्याविभूषित पदव्युत्तर पदवी मिळवलेले शिक्षक जर शिक्षक बँकेत निवडून येतील तर बँकेला त्याचा फायदाच होणार आहे. त्यांच्या संकल्पना अफलातून असतात. त्यांनी विविध शाळेत केलेल्या अभिनव कार्याचा दृष्टिकोन ते बँकेसाठी नक्कीच वापरतील याची खात्री आहे. त्यांना अनेक उत्तम सन्मान , पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांची यादीही भलीमोठी आहे. ते स्वतः प्रसिद्धीपासून थोडे दूरच असतात. स्वतःबद्दल ते मोठेपणाचा टेंभा कधीच मिरवताना दिसलेले नाहीत.
          अशा या अभ्यासू आणि नवोपक्रमशील शिक्षकाला त्यांच्या नावाप्रमाणेच आपण महा इंद्र बनवाल आणि मतांचा पाऊस पाडाल अशी मोठी अपेक्षा करतो.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



🛑 निवडणुकीची ऋतुजा

🛑 निवडणुकीची ऋतुजा

          प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा ऋतु सुरु आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना ' भाग्यलक्ष्मी सहकार पॅनल ' ने प्रचाराचा धुमधडाका आरंभलेला आहे. 

          वारगाव नं. १ शाळेच्या पदवीधर शिक्षिका आणि मुख्याध्यापिका अशी दुहेरी कामगिरी बजावणाऱ्या ऋतुजा दिनेश जंगले यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कणकवली शाखेकडून जिल्हा महिला उमेदवार म्हणून अभिनंदनीय निवड झाली आहे. एका नवोपक्रमशील व्यक्तिमत्वाची निवड करुन समितीने ऋतुजा यांचा सन्मानच केला आहे. 

          एखादया गाण्याच्या कार्यक्रमामध्ये बझर टॅप करुन ' मौसम बदल दिया ' असे उत्साहाच्या भरात म्हणणाऱ्या परीक्षकांप्रमाणे ऋतुजा मॅडम या निवडणुकीत मौसम बदलतील असा ठाम विश्वास वाटतो. त्यांच्यासोबत उभे असलेले भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलचे सर्वच उमेदवार अतिरथी महारथी आहेत. त्यांच्या महारथी असण्यामुळे ते सर्वच प्रचंड बहुमतांनी निवडून येतील याची शंभर टक्के खात्री आहे.

          युद्धात लक्ष्मण मूर्च्छित पडल्यानंतर हनुमान द्रोणागिरी पर्वतावरील ' संजिवनी ' आणण्यासाठी गेला. त्याने संपूर्ण पर्वतच उचलून आणला. त्यामुळे युद्धभूमीवर सर्वच मुर्च्छितांना नवजीवन प्राप्त झाले. ' ऋतुजा जंगले ' मॅडम या आपल्या शिक्षक बॅंकेसाठी ' संजिवनी ' ठरतील अशी आशा करुया. काही नवनवीन अभिनव योजना आणून शिक्षकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देतील. आपले बॅंकेविषयीचे ज्ञान वाढवून बँकेच्या सभासदांच्या हिताचा विचार करतील. 

          आम्ही सिंधुदुर्गात नोकरीला लागलो तेव्हा बऱ्याच शिक्षकांची देवगड तालुक्यात रवानगी झाली. विजयदुर्ग , देवगड अशी दोन बसस्थानके असलेला देवगड तालुका 1998 मध्ये दुर्गम समजला जात होता. त्यावेळी ऋतुजा जंगलेमॅडम देवगड तालुक्यात कविता बोडेकर या नावाने रुजू झाल्या. शिरगाव बीटमध्ये विविध प्रशिक्षणांर्गत ऋतुजा मॅडमांची शैक्षणिक कारकिर्द अधोरेखित होताना दिसत होती. त्यांनी केलेल्या ऱ्हाईम्स सादरीकरणात प्रभावीपणे घेतलेला सहभाग त्यांच्यातील आवाजाचे , नृत्याचे आणि सभाधीटपणाचे प्रदर्शन घडवत होता. त्यांनी भाग घेतला असेल तर आम्हाला नंबर मिळणार नाही हे ठरलेलेच असे. त्यांना त्यांच्या घरातूनच शैक्षणिक बाळकडू मिळाले आहे. त्यांच्या घरातील आणि माहेरकडील सर्वच सदस्य प्रतिभावंत आहेत. 

          आमचे जिवलग मित्र दिनेश जंगले यांच्याशी त्यांचा विवाह संपन्न झाला. पुन्हा फणसगाव बीटमध्ये जंगले दाम्पत्याची भेट घडली. उंडील तिठ्यावर अनेकदा दोघांची भेट घडे. माझी पत्नी ऐश्वर्या आणि ऋतुजा यांची मैत्री झाली. दोघी मैत्रीणी असल्या तरी बहिणीच जास्त वाटत. 

          माझ्या पत्नीचे 2007 मध्ये निधन झाल्याचे समजताच दिनेश जंगले आणि संतोष राणे ( देवगड उमेदवार ) माझ्या दुःखदप्रसंगी धावून आले होते हे मी कदापि विसरणार नाही. 

          त्यानंतर आता पुन्हा दोघांचीही तळेरे प्रभागात पुनश्च भेट घडते आहे. साळीस्ते आणि शेर्पे केंद्राच्या टॅग मिटींग एकत्रित व्हायला लागल्या होत्या. त्यावेळीही पुन्हा एकदा ऋतुजा मॅडमांची इंग्रजीवरील मास्टरी दिसली. त्यांच्या इंग्रजी ज्ञानाचा आम्हाला बराच फायदा झाला. 

          असे अभ्यासू आणि शिक्षकांबद्दल आदर बाळगणाऱ्या व्यक्तींना निवडून देणे हे प्रत्येक शिक्षक मतदाराचे परमकर्तव्य आहे. मला वाटते ऋतुजा जंगले मॅडमांच्या अभ्यासू असण्याचा फायदा बँकेला होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अर्थात ऋतुजा मॅडम शिक्षक बँकेच्या या निवडणुकीत भाग्याचा ऋतू बहरुन टाकतील आणि भाग्यलक्ष्मी पॅनेलचे सर्वच उमेदवार निवडून देण्यासाठी मौसम बदलून टाकतील यासाठी आपण सर्व शिक्षक बंधु भगिनी त्यांच्या पाठीशी बहुमताने राहूया. 

©️ प्रवीण अशितोष कुबल



Monday, May 1, 2023

🛑 संजय पवारसरांची पॉवर

🛑 संजय पवारसरांची पॉवर

          कुरुक्षेत्रावर युद्ध सुरु झाले होते. त्यावेळी दिव्यांग धृतराष्ट्र राजाला दिव्यदृष्टी असलेला संजय कुरुक्षेत्रावरील चाललेले युद्ध सांगण्याचे महत्त्वाचे कार्य करत होता. संजयच्या अंगी असलेली ही पॉवर श्रेष्ठ म्हणायला हवी. युद्धभूमीवर नसताना तिचं जसंच्या तसं वर्णन करणं ही सोपी गोष्ट नव्हती. काही विशिष्ट व्यक्तींच्याच अंगी अशी पॉवर असते. ते त्या पॉवरचा अतिशय चांगला उपयोग करण्याचे संस्कारही त्यांच्यावर जन्मापासून झालेले असण्याची शक्यता असते. 

          आमच्या शेर्पे केंद्रात प्रभारी असलेले केंद्रप्रमुख संजय पवारसाहेब हे एक दूरदृष्टी असणारे केंद्रप्रमुख म्हटले तरी वावगे ठरु नये. कासार्डे आणि शेर्पे या दोन्ही केंद्रांची शैक्षणिक , प्रशासकीय गाडी चालवताना त्यांना त्यांच्या तंत्रस्नेही असण्याचा खूपच उपयोग होतो आहे. केंद्राचे कोणतेही कागद त्वरित किंवा जलदगतीने पाठविण्याचे काम त्यांच्या क्रियाशील कार्यतत्परतेमुळे होऊ शकते. 

          हल्लीच मला या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव आला. आमच्या शाळेत मुख्याध्यापक सहविचार सभा होती. केंद्रस्तर सर्व्हेक्षण करण्याचा विषय सुरु होता. आमच्याशी बोलत असतानाच संजय पवारसरांनी गुगल फॉर्म्स एप्लीकेशनचा वापर करुन लिंक तयार करुन ग्रुपवर पाठवलीसुद्धा. एवढ्या वेगात लिंक तयार करणारे पहिले केंद्रप्रमुख मी बघितले. त्यामुळे मी तरी त्यांच्याजवळच्या तंत्रज्ञान विषयक ज्ञानाने भारावून गेलो आहे. 

          शालेय तपासणीच्या वेळीही त्यांची तपासणीची पद्धत शिस्तबद्ध असते. काय करावे ते समजून सांगताना अधिकारी म्हणून थोडं कठोर होणं हे आवश्यक असतंच. पहिल्या वेळी कठोर वाटणारे पवारसाहेब त्यांच्या जास्त सहवासात गेल्यानंतर त्यांच्यातला मृदुपणा जाणवू लागला आहे. ते सर्वांचं म्हणणं नीट ऐकून घेतात आणि मगच आपलं मार्गदर्शक मत व्यक्त करतात. 

          भाग्यलक्ष्मी पॅनलच्या माध्यमातून आमच्या संजय पवार साहेबांची झालेली निवड अभिनंदनीय अशीच आहे. ते या पॅनेलमध्ये आपली पॉवर नक्कीच पणाला लावतील यांत कोणतीही शंका वाटत नाही. शिक्षक बँकेच्या मागील आकडेवारीचा आढावा त्यांच्या तोंडपाठ आहे. असे अभ्यासू व्यक्तिमत्त्व प्रचंड मतांनी निवडून आणल्यास आपल्या सर्वच शिक्षक बंधु भगिनींना दीर्घकाळ फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. महाभारतातील संजयाप्रमाणे आपले संजय पवार आपली तंत्रज्ञानाची पॉवर वापरुन शिक्षक बँकेला एका अधिक संपन्न असलेल्या आर्थिक उंचीवर नेऊन ठेवतील असे म्हणायला काहीच हरकत नाही. 

          तसे ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. आम्ही कणकवली डिएड कॉलेजला असताना कणकवलीत त्यांची आणि माझी पहिली भेट झाली. कणकवली बाजारपेठेत आपल्या जीवलग दोन मित्रांसोबत फेरफटका मारताना मी त्यांना त्यावेळी अनेकदा पाहिले होते. त्यावेळचा आणि आता केंद्रप्रमुख म्हणून असलेले वेगवेगळे अनुभव आहेत. आपल्या शैक्षणिक , व्यावसायिक पात्रतेमुळे माणसं उच्चपदापर्यंत पोहोचू शकतात हे त्यांच्याकडे बघून नक्कीच शिकता यावं इतके ते मोठे आहेत. 

          आज त्यांच्याच संकल्पनेतून बदली झालेल्या आठ शिक्षक शिक्षिकांचा सन्मानपत्र , शाल , श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत असतानाही आपल्या शिक्षकांचा सन्मान करण्यास न विसरणाऱ्या पवार साहेबांसारख्या केंद्रप्रमुखांना म्हणूनच निवडून देणे ही आपल्या प्रत्येक शिक्षकांची जबाबदारी असायला हवी. आपण ही जबाबदारी खात्रीपूर्वक पार पाडणार आणि संजय पवार साहेबांना बँकेतील महत्त्वाच्या पदावर विराजमान करणार ही तुमच्या प्रत्येकाच्या मनातील सुप्त भावना आहे हे संजय पवार यांनीही दूरदृष्टीने पाहिले आहे असे मी आत्मविश्वासपूर्वक सांगू शकतो. 

▪️ प्रवीण कुबलसर



💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...