Sunday, September 4, 2022

🛑 बायग्या आका

🛑 बायग्या आका

          ऐन तारुण्यात पतीचे सौख्य निघून जावे आणि वैधव्य भोगणे नशिबी यावे यासारखे दुःख नाही. जिच्या पदरी असे भोगणे येईल तिला तिचे ठसठशीत कुंकू लावण्याचे दैनंदिन कार्य प्राक्तनाने कायमचे हिसकावून घेतलेले असेल. पुढील आयुष्य कसं कंठणार ती बिचारी माऊली ?

          तिच्या पदरात एक चिमुरडी देऊन सतत पिऊन जीवनाचा नाश करणाऱ्या या पुरुषांना म्हणावे तरी काय ? त्यात तिचा काय दोष ? 

          माझ्या आत्येच्या मुलीची ही शोककथा आहे. ती जन्माला आल्यानंतर काही काळ आपल्या घरी राहिली असेल. तिचे वडील अकाली गेले आणि माझी आत्या आपल्या मुलीसह आमच्या घरी येऊन राहिली ती कायमचीच. आमच्याच घरात लहानाची मोठी झाली. ती आमची सगळ्यात मोठी आत्येबहिण. जिला आम्ही सगळेच ' बायग्या आक्का ' म्हणतो. आम्ही लहान असल्याने आका म्हणतो , मोठे तिला बायग्या म्हणतात. नेहमी दुसऱ्यांची काळजी घेणारी. सगळ्यांची चौकशी करणारी. चौकशी अर्थात तब्येतीची. सगळे बरे असले की तिला बरे वाटते. तिच्या मनात कोणाबद्दल कधी द्वेष नसतो. प्रेम आणि आपुलकी मात्र कित्येक पटीने असते. 

          तिला सगळेच हवे असतात. भेटण्यासाठी ती आतुर झालेली असते. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी ती अक्षरशः मिठीच मारते. नाहीतर गाल कुस्करते. ती प्रेमाने असे करत असते , पण आम्हाला चारचौघात असे केलेले आवडत नाही. म्हणून तिला तेवढ्यासाठीच राग येतो. ती बरोबर असते , कदाचित आम्हीच चुकीचे असतो. 

          तिने आम्हाला लहानपणी आंघोळ घातली आहे. स्वच्छतेच्या सवयी लावल्या आहेत. कान , नखे यांची स्वच्छता केली आहे. आम्हां पाच भावंडांना वेगवेगळी नावे ठेवली आहेत. चेंब्रिक , शाम्बा , बाळीहुंड्री , अण्णांनू , वासरु अशी आमची पाच भावंडांची अभूतपूर्व नावे तिलाच सुचू शकतात. आम्हाला ती अजूनही याच नावाने हाक मारते.

          तिची शंकरावर अपार भक्ती. तिने सगळी व्रते केली असतील. तिला चांगला वर मिळायला हवा होता. सुरुवातीला चांगला वाटलेला तिचा नवरा अट्टल बेवडा होता. नवऱ्याच्या दारुच्या व्यसनाने माझ्या बहिणीचे आयुष्य बरबाद करुन टाकले. तिला एक मुलगी झाली. वाटले होते मुलगी झाल्यानंतर तिचा नवरा सुधारेल. पण तो अधिकच पिऊ लागला. आमच्याकडे आल्यावर तो चांगला असे. त्याचा स्वभाव चांगला होता. पण त्याचे व्यसन काही केल्या सुटता सुटत नव्हते. बहिणीने केलेली सर्व व्रतवैकल्ये व्यर्थ ठरली. अखेर त्याला दारुनेच संपवले. 

          आईसारखे आयुष्य तिच्या पदरी आले. आता एका मुलीला घेऊन त्या मुलीसाठी आयुष्य नव्याचे जगण्याचे आव्हान तिच्यासमोर होते. आम्ही तिला भेटायला गेलो. तिला रडताही येत नव्हते. ती खंबीर झाली होती. 

          तिने आपल्या मुलीला स्वतःच्या बळावर मोठे केले. शिक्षण दिले. तिचे लग्न लावून दिले. तिच्या मुलीला चांगला निर्व्यसनी नवरा मिळाला हे तिचे भाग्यच. आता ती आपल्या मुलीकडेच राहते आहे. 

          तिला लग्नात ओव्या म्हणण्याची , बारश्यात पाळणी म्हणण्याची , गणपती सणाला फुगड्या म्हणण्याची आवड आहे. तिला लोक बोलवून नेतात. बोलावले नसले तरी ती स्वतःहून जाते. तिला अहंकार नाही. काहीतरी मिळेल या अपेक्षेने ती गेलेली नसते. तिला माणसात राहायचे असते. तिला ते आवडते. 

          ती सर्वांना फोन करत असते. सर्वांची चौकशी करण्यात ती दिवस घालवते. कधी कधी आमची बोलणी खाते. तरीही ती तिच्यासारखीच वागते. रक्षाबंधन आणि भाऊबीज ती कधीही चुकवित नाही. असेल तिथून ती भावांना भेटायला धावत येते. तिला फक्त आमचे प्रेमच हवे असते. तिला ते मिळाले की ती आल्या पावली निघून जाते. 

          तिचे जीवन असे चालले आहे. तिला आपल्या जीवनाची अजिबात पर्वा नाही. दुसऱ्यांसाठी जगणारी अशी आमची बायग्या आका आहे. 

          लहानपणी तिने आमच्यासाठी एक चारोळी रचली होती. ती म्हणे , " 

दादा नि अण्णा 

काय तुमचा म्हन्ना

कित्याक गो आरडलस

आमका दोन्ना

ही चारोळी आता म्हणताना मला हसू येते. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...