बरं बाबा
काही माणसं अशी असतात , त्यांना कोणाचेही काहीही देणं घेणं नसतं. आपल्या स्वतःच्या कोशात रमलेली अनेक माणसे या जगात असू शकतात. त्यांना कितीही , काहीही सांगण्याचा प्रयत्न करा , ती काही त्या कोशातून बाहेर येऊ शकत नाहीत. का कोण जाणे ? पण अशीही माणसे जगात आहेत याचे वेगळे आश्चर्य वाटण्याची गरज नाही.
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी माणसे येऊन गेलेली असतील. आली नसतील तर ती पुढील आयुष्यात येऊ शकतील. या माणसांपासून तुम्हाला कोणताही त्रास होणार नसतो. फक्त त्यांचा तुम्हाला उपयोग किती होईल हेही सांगता येणं कठीण आहे.
त्यामुळे अशी माणसं आपल्या नेहमीच लक्षात राहतात. ती निर्विकार असतात. त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही आठ्या पडत नाहीत. त्यांनाही तणाव येत असेलच. पण हा तणाव काही केल्या त्यांच्या चेहऱ्यावर दिसता दिसत नाही. कधी कधी असं वाटतं , या माणसांसारखं आपणही व्हावं. तसं होण्याचा प्रयत्न केला तरी तसे होणे जमत नाही. त्यांना ते कसं जमत असावं त्यांनाच माहित ?
एकदा असेच एक गृहस्थ माझ्या आयुष्यात आले. त्यांना सतत ' बरं बाबा ' असं म्हणण्याची सवय होती. कोणाचे काहीही झाले तरी त्यांचं आपलं ठरलेलं वाक्य ' बरं बाबा '. त्यांना दुसऱ्यांबद्दल आपुलकी असेलही , पण एखादा कोण आयुष्यातून कायमचा निघून गेल्याच्या बातमीलाही त्यांचं हेच उत्तर असे , " बरं बाबा ". आपण कसे " अरेरे , वाईट झाले. " असे तरी म्हणतो. त्यांनी असं कधीच म्हटलं नसावं. कारण त्यांच्या या वाक्याचा मला कित्येकदा अनुभव आलाय म्हणून मी ठामपणे सांगू शकतो.
आपण नेहमी आपल्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न करत असतो. हे डोकावणं कधी कधी झोकून देणं होऊन जातं. झोकून देताना दुसऱ्याला निर्मळ मनाने मदत करण्याची इच्छा आपल्याला तसे करायला प्रवृत्त करत असते.
हे ' बरं बाबा ' म्हणणारे आजोबा आता जिवंत नाहीत. ते स्वतः कायमचे निघून गेल्यानंतर त्यांच्याबद्दल ' बरं बाबा ' असं म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणंही जीवावर येतंय.
@ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 )
No comments:
Post a Comment